फॉलोअर

सोमवार, २ मार्च, २०२०

चिक्केवाडी या दुर्गम वस्तीची जाणून घेतलेली दुर्दशा..






'चिक्केवाडीला विकासाची वाट कधी मिळणार..?'
                                               
                      भुदरगड तालुक्यातील गारगोटी या मुख्य ठिकाणापासून पाटगाव हे ३५ किलोमीटर अंतरावरचे गांव.१६ व्या शतकात मौनी महाराजांचे या गावी वास्तव्य होते.छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या स्वारीवर जात असताना मौनी महाराजांची या ठिकाणी राजांनी भेट घेतली होती असे हे ऐतिहासिक ठिकाण. दोन महान विभूतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी ही पवित्र भूमी...अजूनही मौनी महारांचा मठ त्या पुण्यभेटीची साक्ष देतो.मावळत्या अंगाला विस्तीर्ण असे पाटगाव धरण...संपूर्ण परिसर जलमय दिसतो.या धरणाच्या पाण्याने चहूबाजूंचा परिसर अगदी सुजलाम सुफलाम झालेलाय.हिरवाईने नटलेला शिवार..सुखासमाधानं नांदणारी देखणीपान घरं. घरासमोर अंगण.असं कोकणरूप ल्यालेलं पाटगाव.या गावापासून साधारण वीस किलोमीटर अंतरावर  घनदाट झाडीझुडपांच्या जंगलात वसलेला प्राचीन असा रांगणा  किल्ला आहे आणि या किल्ल्याचा पायथ्याशी चिक्केवाडी ही छोटीशी लोकवस्ती.
चिक्केवाडीला जाताना खडकाळ चढसखल टपोऱ्या बुरमाने भरलेला खाचखळग्यांचा रस्ता.कुठून वाट काढावी असा प्रश्न घेऊन चालावे लागते.आजूबाजूला निबिड घनदाट जंगल...दोन्हीं बाजूला थाटामाटात उभा असलेली ती उंचच उंच झाडांची गर्दी..त्यात झुडपांची मांदियाळी... जंगलात  हिंस्र प्राण्यांचा वावर.. खासकरुन गवा प्राणी या जंगलात जास्त आढळतात..


                      प्राचीन रांगडा रांगणा किल्ला... या किल्ल्याच्या पायथ्याशी चिक्केवाडी ही अतिशय दुर्गम अशी वस्ती..सभोवार लाकडी दांड्याचे कुंपण.उतरत्या बंगलोर कौलारु छपराची आणि पावळणीला केंबळाची हातभर रुंदीची आडवी पट्टी बांधलेली.जाडजूड मातीच्या भिंती बऱ्यापैकी चांगली घरे. घराला समोर ओटा..बसायला सोपा अशी रचना. एकूण या वस्तीत सात घरे आहेत.



                            पंधरा माणसं इथं राहतात.दोन पुरुष आणि दोन महिला तेवढ्या सोडल्या तरी सर्वजण म्हातारेकोतारेच.काही वृद्ध वयाने सत्तरी ऐंशी पार केलेली. पुरुष शिडशिडीत वाळलेल्या खारकेगत खीडखीडीत अंगाचे.काही म्हाताऱ्या माणसांच्या अंगावर कपडेच नव्हते.जीर्ण झालेल्या नऊवारी लुगड्यातल्या,गोल साडीतल्या आयाबाया.
     
                     
 आपण इथं राहता कसे..?आपल्या काय अडचणी येतात.? आमचा पहीला प्रश्न "काय करायचं तसंच ऱ्हायाचं.."त्यांनी लागोपाठ आपले गाऱ्हाणं आमच्यापुढे मांडायला सुरुवात केली. "काय बी इथं सोय नाय..." "कस आसल तर दिस काढायचा.." ".दवाखाना नाय...माणूस आजारी पडला तर त्याकां घोंगड्यात घालून न्यावा लागता...रस्त्याची सोय नाय." ."मधी पाण्याचं वढा लागता लै अडचणी येता...इथं सगळी म्हातारी माणसंच" एका तरुणाकडे पाहत ती माऊली बोलली..' ह्यो मुलगा हाय तरुण,त्यो बी पोटासाठी खाली(कोकणात) असतो कसं न्याचं...आजारी माणूस एकेकदा इथंच सपता." मुलां का शाळेची सोय नाय...आमची मुलं शाळा शिकली नाय...आता कोलापूरात हाटीलात काम करत्यात..आताची लहान पोरं शिकायला पाव्हण्याघरी आहेती". .एक तरुण भाऊ बोलत होते" पावसापाण्याची कुठं जाण्याची सोय नाय...इथंच थांबावं लागता..आता माया बापच आजारी हाय..लकवा मारला..दवाखान्याला कसं न्याचा ह्यो प्रश्न हाय..."

                          मग आपण काय काम करता उत्पन्नांच कसं..? आमचा पुढचा प्रश्न.." काय उत्पान.. रोपं करताव भाताची शेती कराची..आता तुमी येताना बघितल्यानं तेवढीच बगा शेती." एक आजोबा बोलले " ती शेतीबी आमच्या नावावर नाय...गवं रेडा.. रानडुकरं पिकाची नासधूस करत्यात..तेज्यातन काय उरलं ते पदरात पडतं... या जंगलामधी वाघ..हत्ती..अस्वल प्राणी हाय..तेंच्यापासून धोका आसतो.."
मग आपली जनावरे किती...दूध वैगेरे काय करता..?
"कसली जनावरां औतावाट दोन जनावरे हायत...गायी म्हस लै न्हायत."
"मग घरात काय साहित्य लागतं साखर चहापूड वैगरे असा किराणामाल कोठून आणता..बाजार कुठे करता..?"
 एक माऊली बोलली "इथून बगा भटवाडीला चालत जावं लागता..चालत यावं लागता दिस मोडतो .पंधरा दिसातन एकदा जातो.".मी निरखत होतो..मनातलं दुःख ओठांवर मांडताना एक ताई हे सगळं सांगताना बाकीच्या त्या माऊलींना गलबलून गेल्या होत्या. मी त्यांचे डोळे निरखले त्यांच्या डोळ्यात पाणी तरळत होतं...जास्तीजण वृद्ध दिसत होते म्हणून मी प्रश्न केला तुम्हांला पेन्शन मिळते का..? "हो मिळते ना महिन्याका साशे रुपय भेटता.पण तेबी आणाया वीस पंचवीस मैल लांब तांबळ्याला बँकत जावं लागता"....

                       "तुम्हाला रेशनकार्ड आहे..दोन रूपयांचे धान्य मिळते..?"  " हो आमका दोन रूपायाचे कार्ड हाय..तांदूळ गहू भेटता"...माझी नजर समोरच्या एका ठिकाणी विजेचा डांब होता तिकडे गेली आणि मी प्रश्न केला..तुमच्या वस्तीत वीज कधी आली...? "गेल्यावर्षी ही लाईट आली नाय तर आतापतोर आमी अंधारातच होतो".
.".शासनाने जर ठरवलं आपलं पुनर्वसन करायचं.. तर आपली तयारी आहे का..?यावर एक आजोबा बोलले..."मग काय आमच्या देवाचा कौल घेऊन करू इचार पुढचा"..बरं याहून आणखीन तुमची सरकारकडं काय मागणी .? त्यावर मागच्या खांबाला टेकलेले खिडमीडीत आजोबा बोलले..."आवो सरकार आमच्या वरच्या आंगच्या रांगणा किल्याला म्हणं आता कोट रुपय खर्च करालय...आमच्या किती पिढ्या या जंगलात हालवनवसात खपल्या..जित्या माणसांकडं कधी बघणार हाय.? एक माऊली बोलू लागली..".पयल भाऊ आमच्यासाठी रस्ता झाला पायजे...शाळा नाही मुलां का शाळा झाली पाहिजे... दवाखान्याची सोया नाय...ती सोय झाली पायजे...खरं तर त्या सगळ्या  माऊलींचे डोळे उचंबळून आले होते..डोळ्यांत पाणी साठलं होतं... आतापर्यंत जे भोगलं जे सोसलं.त्या ठसठसणाऱ्या वेदनांचं प्रतीक त्यांच्या डोळ्यांत चमकत होतं.आम्हीही गलबलून गेलो होतो.आम्हीं त्यांच्या दुःखाशी एकरूप झालो होतो.
 तिथून मग आम्हीं जे आजोबा लकव्याने आजारी होते त्या घरी गेलो..सोप्यावर एका आराम खुर्चीत आजोबांना बसवलं होतं.



(प्रत्यक्ष पहा आजोबांची स्थिती खालील लिंकवर)
     https://youtu.be/jfQJ-lNWwmw

                          वय साधारण साठीच्या आसपास.त्यांच्या मुलग्याने सारी माहिती सांगितली..पंधरा दिवसांपूर्वी लकवा मारला आणि शरीर लुळे पडले..बोलता येत नाही ना काही खाता येतं.. टाळा पगळलेला आवासून दिनवाणी झालेला चेहरा..पापण्यांची मंद उघडझाप..तशीच मंद हालचाल... किती दिवसांपासून अन्नाचा कण पोटात गेलेला नाही..काही खावं म्हटलं तरी ठचका लागतो अन्न गिळत नाही..साधी भाताची प्याज करून जरी पाजली तरी ठचका लागतो..गळ्याखाली पाण्याशिवाय काहीच उतरत नाही...मग काय अवस्था होणार..हाडांचा सांगाडा शिल्लक आहे. उपचारासाठी दवाखान्यात न्यावे म्हटले तरी कसे नेणार कसे..?.रस्ता नीट नाही ..म्हणून एका आयुर्वेदिक वैद्याचा झाडपाल्याचे औषधोपचार सुरू केलेत काही फरक नाही..जीवाची नुसती तगमग होते...रात्रीला जराही झोप लागत नाही..वेदनेने अंग ठसठसत... कुणाला दुखणं खुपण सांगायचं म्हटलं तरी तोंड नाही आतल्या आत सहन करायचं..रात्रभर नुसती कणकण विव्हळण सुरू असत. ते सगळं चित्र पाहून आणि ती व्यथा ऐकून थक्क झालो आम्हीं...काय बोलावं..? आतून सगळं भरून येत होतं..डोळ्यातून फक्त गळायचं बाकी राहिलेलं...त्या दुःखाने बधिर झालेल्या मनाने आम्हीं सर्व बाहेर पडलो..

                         कोल्हापूरसारख्या सुजलाम सुफलाम जिल्ह्यातील ही शेवटच्या टोकाची लोकवस्ती. वाळीत टाकलेल्या अवस्थेत असणारी.ज्या ठिकाणी कोणत्याही मूलभूत सोयीसुविधा नाहीत...एकीकडे भरभराटीला आलेली स्वच्छ सुदंर अशी विकास पावलेली गावं. आणि दुसरीकडे चिक्केवाडीसारख्या दुर्गम वस्त्या ज्या विकासापासून कोसो दूर असलेल्या.असा आपल्या राज्यात विकासाचा विरोधाभास दिसून येतो.  छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन विकासाची स्वप्नं दाखवणाऱ्या महाराष्ट्र शासनाला आम्हांला हे प्रश्न विचारायचे आहेत..या महाराष्ट्राच्या नकाशावर सात घरांची चिक्केवाडी नावाची अर्थात माणसांची वस्ती आहे हे ठाऊक आहे का..?.आणि माहीत असेल तर ती याच राज्यात अशी अजून का वाळीत पडली?जी लोकवस्ती स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही आपल्या मूलभूत गरजापासून वंचित आहे...आपलं सरकार वर्षावर्षांला राज्याचं आर्थिक बजेट सादर करतं त्यात चिक्केवाडीसारख्या गावाच्या वाट्याला काय जात..? हजारो-लाखों कोटी रुपये खर्च करून विकासाचे जाळे विणणारे आपले गुळगुळीत हायवे तयार होतायेत..गावोगावी गल्लीबोळातील रस्त्यांचे नुतनीकरण होते... कोटींची मंदिरे गावोगावी उभारली जातायत..
                           पण ज्यांचं जगणं-मरणं ज्या रस्त्यावाचून अडून राहिलं अशा चिक्केवाडीसारख्या दुर्गम भागातील गावांना जोडणारा रस्ता म्हणजे त्यांची जीवनवाहिनी का नाही होऊ शकत..? अशा २० किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी का नाही निधी देता येत..? राज्यात सर्व शिक्षा अभियान राबविले जाते शिक्षण सर्वांच्या हक्काचे असे म्हणतात.मग या वस्तीवरच्या मुलांना शाळेची सोय का नाही.? आतापर्यंत ती मुले निरक्षर राहून सध्या हॉटेलमध्ये कपडा मारायचे काम करतात...मग सर्व शिक्षा अभियानाचा फायदा त्यांना काय झाला नी नेमके हे अभियान कुठपर्यंत पोहोचले..? आज तिथल्या लोकांना आपली मुले पाहुण्यांच्या ठिकाणी शिकण्यासाठी ठेवावी लागतात...दुसऱ्यांच्या आधारावर ती मुले कितपत शिक्षणाची उंची गाठणार आणि आपली परिस्थिती कशी बदलणार..? आजही चिक्केवाडीसारखी गावे आरोग्याच्या मूलभूत सोयीसुविधापासून वंचित आहेत..एकीकडे राज्यात जलद आणि आरामदायी प्रवासाच्या उद्देशाने मेट्रोसारखे प्रगत प्रयोग अंमलात आणताना इकडे आमच्या चिक्केवाडीसारख्या वाडीवस्त्यावरचा एखादा माणूस आजारी पडला तरी १०८ नंबरची अम्ब्युलन्स तिथे जाऊ नाही शकत.कारण रस्ताच नाही...पाच ते सहा पाण्याने भरून वाहणारे ओढे लागतात.पावसाळ्यात तर त्या ओढ्यांच्यामुळे रस्ता पूर्णपणे बंदच..आजही आजारी माणूस घोंगड्यातुन चार माणसांच्या खांद्यावरून दवाखान्याला आणावा लागतो..पावसापाण्यात रस्ताच बंद अशावेळी तिथेच आजारी माणसाला तळमळून तळमळून जीव सोडावा लागतो..असे कित्येक जीव मातीआड झाले असतील त्यांच्या पापाचे खापर कोणाच्या माथ्यावर फोडायचे.? त्या लोकांना तुमच्या आरोग्य सेवेचा फायदा काय..?आज चिक्केवाडीतील त्या लकवा मारलेल्या आजोबांना रस्ता नसल्याने दवाखान्याला घेऊन जाता येत नाही..आज त्यांना आय.सी.यू. ची गरज असताना एका प्लास्टिकच्या खुर्चीत जीव जात नाही म्हणून तळमळत पडावं लागतं पंधरा दिवसापासूअन्नाचा कण पोटात नाही...घरच्या मालकाला आणि जन्मदात्या बापाला उपाशी ठेऊन त्या मायलेकरांना रोजचा घास गळ्याखाली कसा उतरत असेल..? विकासाची जबाबदारी घेणाऱ्या या शासनकर्त्यांना आम्हाला विचारायचंय.ही पण आपल्यासारखीच एक माणसं आहेत ना.
                                 व्यवस्था ही माणसांची अवस्था बदलण्यासाठी उपयोगात आणावी लागते. पण  इथे खरंच आपण  मान्य करा की,आपली ही व्यवस्था या लोकांची अवस्था बदवण्यासाठी अपयशी ठरली आहे..तुम्हीं म्हणताय ना..विकासाच्या बाबतीत आपले राज्य आता सगळ्या राज्यात  पुढे पण मागे राहिलेल्या मागास अशा या एक दुर्गम चिक्केवाडीं आणि अशासारख्या वाडीवस्त्यांचं काय..?.महाराष्ट्राचा विकास झाला असं म्हणताना इथं आल्यानंतर तो आपला विकास खरंच मृगजळासारखा भासतो.इथं आल्यावर कळतं की, आपल्या राज्याचा कितपत विकास झाला आहे..मी तर म्हणतो...जोपर्यंत आपल्या चिक्केवाडीसारख्या रानावनातल्या दुर्गम वस्तीवरच्या माणसांच्यापर्यंत  विकास पोहोचणार नाही तोपर्यंत तुमच्या विकास या शब्दावर आमचा विश्वास कदापिही बसणार नाही...देश महासत्ता होण्याची स्वप्नं बघताना चिक्केवाडीसारखी गांव बघितली आणि अजूनही घोंगड्यात घालून लोकांना दवाखान्याला आणावं लागतं हे चित्र डोळ्यासमोर आणलं तर ते स्वप्नंच भंगून जातं.विकासाला अजून किती मुळापासून हात घालावा लागेल व त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल याची जाणीव होते.
                           आज शेजारी असणाऱ्या रांगणा किल्याच्या दुरुस्तीसाठी आपण कोटी रुपयांचा निधी खर्च करता..हरकत नाही. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या वैभवशाली परंपरेची साक्ष देणारे हे किल्ले जरूर साजिवंत करा.पण त्याच्या पायथ्याला राहणारी जिवंत प्रजाही महाराजांना तेवढीच प्यारी होती...त्या रयतेच्या कल्याणाचेही बघा...तुम्हीं जसा किल्ल्यासाठी निधी मंजूर केला तसा चिक्केवाडीच्या विकासासाठी निधी मंजूर कधी करणार..?त्यांनाही त्यांच्या हक्काच्या मूलभूत सोयी सुविधा कधी मिळणार ..? ज्या रस्त्यासाठी त्या मायमाऊलींनी डोळ्यात पाणी भरलं तो त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न सोडवणारा रस्ता कधी होणार..? अशा या सर्व प्रश्नांची उत्तरे चिक्केवाडीतील त्या गोरगरीब लोकांना या शासनाच्या कृतीतून मिळाली तर बरे होईल.एक तर चिक्केवाडीला विकासाकडे नेणारी नवी वाट तयार करा नाही तर चिक्केवाडीला तरी विकासाच्या वाटेवर आणा.


(आपण संवाद साधू शकता.)
श्री.राजाराम शिंदे.(स्थानिक चिक्केवाडीकर)
- 9420878752
------------------------------------------------------

               - किरण सुभाष चव्हाण(पांगिरे)
                मोबा- ८८०६७३७५२८.

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...