फॉलोअर

शनिवार, २७ जून, २०२०

'आयुष्याच्या संध्याकाळी हवाय एक निवारा... मायेचा उबारा...समाधानाचा किनारा.'


'आयुष्याच्या संध्याकाळी हवाय एक निवारा... मायेचा उबारा..समाधानाचा किनारा.'

 "पांडुरंगा...दुख सांगायचं तर कुणाला सांगायचं...म्या तुझा माळकरी.२२ वरसं झाली  तुझी माळ गळ्यात हाय.नेमानं तुझ्या पंढरीची वारी करतू…म्या पंढरीचा वारकरी..
"संसार पंढरी आम्हीं वारकरी... आगा पांडुरंगा सुखी ठेव सारी.."
असा अभंगाचा सूर कधी भजनात आळीवायचो...तुझ्या हरिनामात दंग व्हवून जायाचो...पण तुझ्या पंढरीच्या वाटचा हा वारकरी कधी भिकारी झाला कळालंच न्हाई बघ...कुणाला माझं दुख सांगायचं...आता हाय का माझं तुझ्याबिगार कुणी...? कोण ऐकून घिल माझ्या येड्यागबाळ्याचं...आन ऐकून घ्यायला कुणी जवळ तर यायला पायजे नवं... कोण ईल माझ्याजवळ आता...मी तर एक म्हारोगी..."
                      हे आहेत श्री.सदाशिव रावबा सुतार भुदरगड तालुक्यातील हेदवडे हे गांव.वार्धक्याकडे झुकलेलं अंदाजे ८० पर्यंत वय.पत्नीनं अर्ध्यावर साथ सोडली. पोटाला एक मुलगा.कष्टकरी जीवन...सुतारकाम करण्यात उभी हयात गेली...टीचभर पोटासाठी आजही उतारवयात कष्ट सुरूच होतं...पण नियतीला हे मान्य नव्हतं.चार पाच वर्षांपासून थकलेल्या शरीराला कसला आजार जडला...हातापायाला जखमा झाल्या... हळूहळू चिघळल्या...रक्तस्राव
होऊ लागला...हाताची बोटे सडली...
आणि झडलीसुद्धा.तळपायाला झालेल्या मोठ्या जखमेतून  रक्त-पू गळत असायचा काही काळानंतर त्यामध्ये जंतू तयार झाले...आणि निदान झालं ही सगळी लक्षणे म्हणजे हाच तो दुर्धर रोग म्हणजे कुष्ठरोग...
कुष्ठरोग होणं म्हणजे मोठं पाप...समाजाला ताप...यावर त्याला एकच शाप.. वाळीत टाकणं.अशी या रोगाच्या गैरसमजुतीची पाळमुळं अजूनही घट्ट आहेत आपल्या समाजात म्हटल्यावर.अशा अवस्थेत कोण त्यांची काळजी वाहणार..? कोण त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करणार..? कोण शुश्रुषा करणार..? उलट जे व्हायचं तेच सुरू झालं.वाळीत टाकणं आलं...समाजाची हेटाळणी आली..बघण्याचा नकारात्मक दृष्टीकोन...आणि सुरू झाली थकल्या भागल्या खंगलेल्या देहाची अवहेलना..आणि.कुडीतल्या उरल्या सुरल्या जीवाची कुचंबना...म्हणतात ना 'जन हे दिल्या घेतल्यांचे अंत काळीचे कोणी नाही...' उभ्या हयातीत कष्ट उपसलं... पण आता कोणी जवळ करेनात.
कुठल्या वळचणीला आसरा घ्यायची मुश्किल झाली. पाच वर्षे झाली या रोगाशी लढताना शेवटी  जगण्याची ही सुरू असलेली विटंबना मुकाटपणे सहन करत जगताहेत बिचारे बाबा.
                       पण सामाजिक कार्यकर्ते शिवम
साधक श्री.सागर गुरव यांच्या धडपडीमुळे C.P.R रुग्णालयामधून उपचार झालेत. चांगल्या उपचारांमुळे आज त्यांच्या जखमा बऱ्या झाल्या आहेत.तब्येतीत बरीच सुधारणा झाली आहे.सागर गुरवच गेली वर्षभर त्यांना पोटगी देत आहेत. आज या बाबांनी काळम्मावाडी मराठी शाळेच्या व्हरांड्यात पावसापाण्याचा तात्पुरता आसरा घेतलाय...
बाहेरच्या ठिकाणी तीन दगडांची चूल मांडायची आणि डाळ भात रांधायची.तिथंच तीन दगडांच्या चुलीच्या उबीला फटकुरावर दिवसभर कलंडायचं आणि पुन्हा रात्री झोपण्यासाठी  गावातील मारुती मंदिरातल्या एका बगलेवर थंडगार फरशीवर जुनीपाणी वळकटी अंथरून झोपी जायचं.
                   ना घर ना दार...कुणी घर देता का घर...?ही याचना राहू द्या...कोणी वळचणीलाही राहू देईना...आणि राहिलं तरी हेटाळणी...आणि जिथून तिथून पिटाळणी..अशी वेळ आलीय.आम्हीं त्यांना भेटलो सागरजींनी तर त्यांना मिठीच मारली..त्यांच्या जवळ बसून विचारपूस केली नंतर त्यांना बोलतं केलं त्यावेळी त्यांचे पाणावलेले डोळेचं अधिक बोलके भासत होते..प्रत्येक शब्दागणिक उचंबळून येत होतं त्यांना..सारा इतिहास जमा होत होता त्यांच्या नजरेसमोर...अश्रूंची वाट अडवण मुश्किल झालं होतं.

                    २२ वर्षे न चुकता पंढरीची वारी..पंढरीचा वारकरी...गळ्यात तुळशीची माळ...माळकरी..भजनाची आवड..पेटी वाजवण्यात वस्ताद.रात्रंदिवस हरिनामाचा जागर मांडला.शेजारील दोन तीन गावातील पोरांना पेटी वाजवण्यात पारंगत केलं..हरीनामाच्या सेवेत राहूनही शेवटी ही वेळ...वाईट तर खूप वाटतं... शिवम साधक सागर गुरव त्यांच्यासाठी खूप धडपडताहेत...काळजी घेताहेत..जणू तोच त्यांच्या पोटचा गोळा. त्यांच्या निवाऱ्यासाठी येणाजाणाऱ्याला...पोटतिडकीन सांगत आहेत."नुसती हातपाय पसरण्यापुरती गावालगत जागा द्या हो...पाऊसवाऱ्याचं नकाडं झोपडं उभा करतों"
 पण ती साद नुसती कानापर्यंत पोहोचते त्यांच्या...अजूनतरी हृदयापर्यंत नाही पोहोचली.
               बरोबर आहे देवळातला देव कधी सांगतही नाही आम्हांला तरी गावोगावी कोटींची मंदिरं बांधतोय आम्हीं... स्वखुशीने लाखो रुपये देणग्या देतोय.. देवावरती आपली किती अढळ श्रद्धा आहे ना आपली.पण माणसातल्याच एका देवाला हातपाय पसरण्यापूरती झोपडी पाहीजे...पण आपण नाही देऊ शकत..कारण माणसांवर कुठे श्रद्धा आहे आपली..?
पंढरीला विठ्ठलाच्या भेटीला  जाणारे आम्हीं पण गावपंढरीतल्या जित्याजागत्या विठ्ठलाला ओळखायलाच तयार नाही...पाषाणमूर्तीमध्ये देव शोधणारे आम्हीं माणसाच्या रूपातून भेटणारा देव कधी ओळखलाच नाही..'जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा'...असं म्हणतात...मग कुणी कुणी त्या बाबांच्यातला देव जाणला..?  कुष्ठरोग्यांची सेवा करायला एकट्या बाबा आमटेनांच का जन्म घ्यावा लागणार इथे...? का नाही आपल्यामध्ये असे एक बाबा आमटे निर्माण होत..? महारोग्यांना वेगळं आनंदवनच निर्माण करावं का..?.एका कुष्ठरोग्यासाठी आपलं गांव नाही का आनंदवन होऊ शकत..? आयुष्याच्या संध्याकाळी तो जीव जिवंतपणी मरणयातना भोगतोय...त्यानं आणखीन असंच भोगायच कां..? की उरले-सुरले दिवस सुखाने जगायचं...मंडळी हे आपल्या संवेदनशील समाजाच्या ईच्छाशक्तीवर अवलंबून आहे...आपलं दातृत्व घालू शकतं त्यांच्या दुःखावर फुंकर...देऊ शकतं... एक निवारा...मायेचा उबारा...दुःखाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या गलबताला मिळू दे ना पैलतीर समाधानाचा किनारा...आयुष्याच्या संध्याकाळी.

प्रत्यक्ष पहा अवस्था खालील व्हिडीओवर क्लिक करा.

  मदतीसाठी संपर्क : शिवम साधक.
श्री. सागर गुरव - 9146148904
आकाश पाटील - 9158469301
-------------------------------------------
                  - किरण सुभाष चव्हाण.(पांगिरे)
                   मोबा - ८८०६७३७५२८.

शुक्रवार, २६ जून, २०२०

कविता- पैसा झाला मोठा नाती झाली खोटी....-किरण चव्हाण.


'पैसा झाला मोठा नाती झाली खोटी.'

पैशापायी माणसाला वळखू येईनात नाती.
पैशाच्या मागं मागं सारी दुनिया धावती.

आईबाप स्वतःचं स्वस्त झालं की गा याला,
पैशानच नाही का याला जलोम दिला.

भाऊ-बहीण मग तर काय लांबचीच गोष्ट,
दोघच राजाराणी कसं सुखात ऱ्हात्यात मस्त.

काय याचा मिजास काय तो तोरा कुणाचीही किंमत नाही,
वाटतं याला माझ्यासारखा दुसरा कुणीच नाही.

रोजचा हिशोब ठेवत असशील ना? किती पैसा कमावला,
फक्त हिशोब नसेल याचा किती किती नाती गमवला.

सगळं काही भेटत पैशानं पण एकच भेटत नाही,
जीवाला जीव देणारं माणसं पैशानं मिळत नाही.

बांधशील माडी वर माडी फिरायला नवी गाडी.
सारं इथंच ऱ्हायाचं,तुझ्यासाठी पुरल शेवटी एकच काडी.

काय घेऊन आलो नी घेऊन काय जाणार कधी विचार केला?
आरं जगजेता सिकंदरही शेवटी हात हालवत गेला.

फक्त पैसाच नाही येत,येती मदतीला माणसही,
तवा जपतोस जसा पैसा तसं जपायला शिक नातीही.
                                      - किरण चव्हाण.

बुधवार, १० जून, २०२०

कविता - धरित्रीचा बाळ..---किरण चव्हाण.



धरित्रीचा बाळ.

माझी धरित्री गं माय
ओली बाळंतीण बाय
तिच्या कुशीतून कसं
अंकुरलं तान्हं बिय...

मऊ मऊ लोण्यागत
ओल्या मायेचा पदर
पिकबाळराजा तिचा
पोसतो तिच्या अंगावर

कोळ कोळ किती पात
इवलासा नाजूक देठ
दिस साजिरं गोजिरं
कुठं लावू त्याला तिटं

सुवासिनीगत बाई
झाडवेली गं सजल्या
धरित्रीच्या या लेकीबाळी 
बाळ पाहुनी नटल्या.

गडी राकट रांगडा
बाळ मायेचा आधार
उभा पाठीशी तो हाय
भाऊ पाठचा डोंगर.

वारा झुलवतो झुला 
खेळवतो बाळराजा
सवंगडी वारा करतुया
लाडक्याला गुदगुल्या.

आली नणंद काठाला
नदी धरित्रीला भेटाया
आलं तिला गं भरून
बाळराजाला बघून 

तान्हा पीकबाळ त्याला 
किती जपावं जपावं.
माया करावी तरी कशी
कोडकौतुक करावं.

बाप मेघराजा येतो
माय-लेकरांची भेट घेतो
त्यांचा बाळपिकराजा
कसा दिसामासानं वाढतो.
------------------------------------------------------
-किरण चव्हाण.
मोबा-८८०६७३७५२८.


शुक्रवार, ५ जून, २०२०

प्रयोगशील शेती.


प्रयोगशील शेतीमधून आधुनिक पद्धतीने मिळविले जाते भरघोस उत्पादन.
                     
                            श्री.ज्ञानदेव दशरथ येलकर मूळ गाव-बेगवडे एक धरणग्रस्त... परंतु शासनाकडून पुनर्वसनातून बामणे सरहद्दीत त्यांना ६६ गुंठे जमीन मिळाली.पेशाने प्राथमिक शिक्षक पण त्यांच्यात दडला आहे एक कुशल शेतकरी.आणि त्यांच्यातल्या शेतकऱ्याने अगदी नियोजन पध्दतीने या  जमिनीत नंदनवन साकारले आहे..६६ गुंठ्यापैकी ४५ गुंठ्यांत ऊसाची लागवड केली आहे.आणि उरलेल्या २० गुंठ्याच्या एका सरळ पट्टीमध्ये शतावरी पीक घेण्याच्या उद्देशाने ३ फूट अंतरावर सऱ्या काढल्या आहेत.शतावरी औषधी वनस्पतीच्या पीकाचा कालावधी साधारण दीड वर्षाचा आहे. त्याच्या मुळकांड्या सरासरी २०० रु किलो दराने विकल्या जातात.पण शतावरी पिकाची लागवड करण्याच्या अगोदर त्यांनी वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे २९ जानेवारीला आंतरपीक म्हणून TAG-24 (फुले-२४) हे उन्हाळी भुईमुगाचे पीक घेतले.तीन फूट अंतरावर असलेल्या बोदावर दोन फूट अंतरावर फक्त दोन दाण्यांची टोकणनी केली. एकूण २० गुंठ्यांसाठी ४ किलो भुईमूगाचे दाणे लागले.त्यानंतर मध्ये २ मार्चला त्या भुईमुगाच्या दोन टोकणणीच्यामध्ये शतावरीची लागवड केली.

या शतावरी औषधी वनस्पतींची रोपे खास उत्तरप्रदेशमधील गाझियाबाद येथील 'औषधीय खेती विकास संस्थान' या संस्थेमधून ५०००  रोपे मागवली पैकी ४५०० रोपे लावली  या शतावरी पिकामधून दीड वर्षांनंतर चार लाख रुपये इतक्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.संपूर्ण पिकांसाठी ते आपल्या शेतात ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देतात.
भुईमुगाच्या पिकासाठी ४ दिवसांच्या अंतराने २ तास पाणी दिले गेले... खत म्हणाल तर कोणत्याही रासायनिक खतांचा वापर नाही...तर सेंद्रिय व जिवाणू खतांचा वापर केला. आणि बघता बघता चार महिन्यांत भुईमूगाच्या एकेका जाळीने आपल्या भोवतालचा तीन फूट जागा व्यापून घेतला इतकी त्याची भरघोस वाढ झाली.
बोदाच्या टापेपासून तळापर्यंत पसरलेल्या हिरव्याकंच जाळ्या आणि जमिनीला जखडून ठेवलेले ताने...संपूर्ण २० गुंठ्याचा प्लॉट हिरव्यागार भुईमुगाने आच्छादून घेतला.
आपल्या सामान्य भुईमुगाच्या तीन चार जाळ्या समान ती एकच जाळी...४ महिन्याच्या कालावधीत काढनीला येणारे हे पीक सरांनी २५ मे ला या भुईमुगाची काढणी केली..

तर काय आश्चर्य..? एका जाळीला सरासरी १८० ते २५० च्या दरम्यान लगडलेल्या भुईमुगाच्या शेंगा.हिरवीगार वजनदार टपोर शेंगांचे घोसच्या घोस असणारी एकेक जाळी.
अशा २० गुंठ्यांतून तब्बल १२ पोती शेंगांचे उत्पन्न झाले आहे. ४ किलो बियाण्यांतून १२ पोती शेंगा. म्हणजे १ किलो बियाण्यां मागे ३ पोती शेंगा असा या पिकाचा उतारा पडला आहे.
यासाठी एकूण खर्चाचा विचार केला तर १३५ रु प्रमाणे ४ किलो बियाण्यांचे ५४० अधिक जिवाणू खत एकूण साधारण १००० रु खर्च आला. आणि यातून उत्पन्न म्हणाल तर १ क्विंटल शेंगाचा दर ५,५०० एकूण चार क्विंटल शेंगा झाल्या म्हणजे २२००० रु.उत्पन्न फक्त चार महिन्यात मिळाले
 ते ही मुख्यपिकातून नव्हे आंतरपीक घेऊन.
एवढेच नाही तर शेजारी असणारी ऊसाची चार महिन्याची लावण सुद्धा तरारून आली आहे.

त्याचबरोबर शेताच्या सभोवती हापूस आंब्याची सहा,नारळाची सहा,सीताफळ एक अशी झाडे आहेत या झाडांच्या मोहराकडे मधमाशा आकर्षिल्या जाऊन नैसर्गिक अधिवास मिळाल्यामुळे पोळे बनवतात व शेतात राहतात

या मधमाश्यांनी भुईमुग,कारले,काकडी यांच्यावरील विविध फुलांचे नैसर्गिक परागीभवन केल्यामुळे भुईमूग पिकाबरोबर भाजीपाल्या मधूनही जवळपास पाच हजार रुपये चे इतर उत्पादन मिळाले आहे असे येलकर सरांचे म्हणणे आहे.
                       श्री.येलकर सरांना यासाठी धामणे गावचे श्री.प्रकाश रावण सरांचे शेतीविषयक मार्गदर्शन लाभले.या यशाचे सर गमक सांगतात की,आपल्या शेतकरी बांधवांनी योग्य मार्गदर्शन घेऊन ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला पाहिजे तसेच अधिकाधिक रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे.एकूणच काय तर योग्य मार्गदर्शन... नियोजन,ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा, रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय व जीवाणू खतांचा वापर करून आपण कमी खर्चात कमी कालावधीत  चांगले पीक घेऊन चांगला नफा घेऊ शकतो...

खालील व्हिडीओवर क्लीक करा आणि प्रत्यक्ष पहा.
------------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क : श्री.ज्ञानदेव दशरथ येलकर.
मोबा - +917038868508

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...