'बँकिंग क्षेत्रातील ४१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून आदरणीय श्री.जनार्दन बोटे साहेब आज रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला हा आढावा...'
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पांगिरे या छोट्याशा गावी श्री. महादेव जोतिबा बोटे व सोनाबाई उर्फ गयाबाई महादेव बोटे या पुण्याशील दांपत्याच्या पोटी जनार्दन बोटे यांचा १५ जुलै १९६२ रोजी पांगिरे येथे जन्म झाला.एक भाऊ व बहीण अशी ही मिळून तीन भावंडं. वडील मुबंईला गिरणी कामगार म्हणून कामाला.तुटपुंजा पगार.आई गावी शेतमजूरी करायची.घरची हालाखीची परिस्थिती. गरिबी तर पाचवीलाच पुजलेली.जनार्दन बोटे यांचे प्राथमिक शिक्षण पहिली ते तिसरी पर्यंत पांगिरे या गावी झाले.आणि मग त्यानंतर ४ थी इयत्तेपासून मुंबईत शिक्षण सुरू झाले.उपजतच हुशार,चुणचुणीत असलेले बोटे साहेब प्रत्येक इयत्तेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.त्यानंतर ८ पासून १० पर्यंत नावाजलेल्या शारदा आश्रम विद्या मंदिर दादर या शाळेत शिक्षणासाठी दाखल झाले.कुशाग्र बुद्धिमत्ता,अभ्यासातली आवड,सुदंर हस्ताक्षर असा हा गुणी मुलगा आपसूकच शिक्षकांच्या हृदयात भरला. म्हणून तर शाळेतील कोणत्याही कार्यक्रमानिमित्त सुदंर हस्ताक्षरात फलकलेखन करण्यास हक्काने शिक्षक त्यांनाच सांगायचे.या शाळेत शिकत असताना शेवटपर्यंत अगदी आवडीने हे काम करीत राहिले.शिक्षकांचा असा हा आवडता विद्यार्थी शाळेतील तब्बल ३००० विद्यार्थ्यांमधुन त्या काळी आदर्श विद्यार्थी म्हणून निवडला गेला.विशेषतः शाळेत ब्राम्हण विद्यार्थ्यांची संख्या अधिक त्यातून एखाद्या सामान्य घरातील विद्यार्थ्याला हा मान मिळणे ही असामान्य गोष्ट होती.
दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरच्या परिस्थितीच्या असहायतेमुळे शिकण्याची इच्छा असताना नाईलाजास्तव जि.टी. पारसिक बँक ठाणे इथे १९७९ साली शिपाई या पदावर काम करण्यास सुरुवात केली.पण शिकण्याची प्रखर जिद्द उर्मी मनात काही स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून ११ व १२ वीचे शिक्षण रात्रीच्या (नाईट कॉलेज)मधून पूर्ण केले.त्यानंतर (बी.कॉम) पदवीचे तीन वर्षांचे शिक्षण मॉर्निंग कॉलेजमधून पूर्ण केले.शिकण्याची ही तळमळ पाहून आईवडिलांचे प्रोत्साहन तर होतेच पण पारसिक बँकेचे चेअरमन कैलासवासी गोपीनाथ शिवराम पाटील व्हा.चेअरमन श्री. नारायण गजानन गावण यांनी पुढे शिकण्यासाठी प्रेरणा दिली ,सहकार्य केले.म्हणून तर ही ऊर्जा घेऊन बँकिंग क्षेत्रातील विविध पदव्या ते घेत गेले.
पंखात बळ भरलं की भरारी घ्यायला आकाश ठेंगनं पडतं तसं जिद्दीने पूर्ण केलेल्या शिक्षणाच्या बळावर एक उदात्त ध्येय...एक मोठं स्वप्न..साकारायचं होतं.आणि मग सुरू झाला त्या ध्येयाप्रद प्रवास.. शिपाई या पदावरून झेप घेत पहिल्यांदा .ज्युनि.क्लार्क, सिनि.क्लार्क..ज्युनि.ऑफिसर..सिनि. ऑफिसर,पुढे चीफ मॅनेजर, असि. जनरल मॅनेजर,डेप्युुडी जनरल मॅनेजर आणि शेवटी मग जनरल मॅनेजर अशी त्यांच्या बँकिंग क्षेत्रातील कारकीर्द बहरत गेली.
आपल्या सेवेच्या काळात त्यांनी अतिशय प्रमाणिकपणे आपल्या कार्याप्रति स्वतःला वाहून घेऊन काम केले. विशेषतः ते सरकारमान्य वसुली अधिकारी म्हणून आपले कर्तव्य उत्तमप्रकारे पार पाडत राहिले.याचा परिणाम म्हणजे त्यांच्या काळात बँकेचा रिकव्हरी रेट उत्तम राहिला.पारसिक बँकेला जनार्दन बोटेंच्या माध्यमातून असा सारथी लाभला ज्यामुळे त्यांच्या काळात बँकेची डेव्हलपमेंट चांगल्याप्रकारे होत राहिली.महाराष्ट्रभर तसेच गोव्यापर्यंत या बँकेच्या शाखा विखुरल्या आहेत.बँकेचे हे सारथ्य पार पाडत असताना आपल्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य देत रात्रंदिवस फक्त एकच ध्यास आपल्या बँकेची वाढ..वृद्धी..विकास आणि विस्तार..आणि हे करत असताना त्यांनी नेहमी आपल्या सहकार्यांना विश्वासात घेऊन टीम वर्क पद्धतीने काम करीत राहिले.बँकेतील कर्मचाऱ्यांशी त्यांचे असे नाते म्हणजे की बँक म्हणजे एकप्रकारे आपले कुटुंबच.तिथला प्रत्येक कर्मचारी हा आपला जिवाभावाचा सोबती सहकारी..प्रत्येकाशी प्रेमाने आदराने वागून प्रत्येकाला प्रेरणा प्रोत्साहन देत पुढे जात त्यांनी आपल्या कारकिर्दीत अधिकारी..सहकारी..कर्मचारी.. ग्राहक यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे वलय निर्माण केले..हे सर्व करत असताना त्यांनी एक तत्व प्रमाण मानले की,बँकेने आपल्याला मोठे केले त्या बँकेला आपण मोठे करणार आणि या जाणिवेतून ते अव्याहतपणे काम करीत राहिले.आज पारसिक बँक एक नावाजलेली विश्वासार्ह अशी अग्रणी बँक आहे.
'इवलेसे रोप लावियेलें दारी त्याचा वेलू गेला उंच गगनावरी.'
श्री.जनार्दन बोटे व पारसिक बँक कधी काळी हे छोटं असणारं नाव आज खूप मोठं झालंय.नावारूपाला आलंय.
आज ते ४१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून जनरल मॅनेजर या पदावरून सेवानिवृत्त होत असताना
एखाद्या आईला आपलं लेकरू पारख व्हावं तसा या मायलेकरांच्या ताटातुटीचा आजचा दिवस आहे.तस कोवळ्या वयात तिच्या पदरात दाखल झालेलं हे लेकरू तिच्याच पदरात मोठं झालं तिची सेवा करू लागलं... आणि सेवा करता करता या आईचा उपकाराची परतफेड म्हणून तिला नावारूपाला आणलं.या मायरुपी पारसिक बँकेनेही बोटे साहेबांना खूप काही दिलं.. जन्माची भाकरी दिली मान,सन्मान, प्रतिष्ठा...जे काही नव्हतं ते सारं काही दिलं.आज आपल्या कर्तव्याच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण केलं.कधी काळी हक्काचं घर नव्हतं आज मुंबईसारख्या शहरात आणि कोल्हापूर या ठिकाणी दोन फ्लॅट आहेत.मुलगा आज डिप्लोमा इंजिनिअरचे शिक्षण पूर्ण करून मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करतो.आणि हे सर्व करत असताना जसं म्हटलं जातं एखाद्या कर्तबगार पुरुषामागे एक स्त्री उभी असते तशी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.रंजना बोटे यांची त्यांना मोलाची साथ मिळत गेली.
नोकरीच्या निमित्ताने जरी बोटेसाहेब बाहेर असले तरी गावच्या मातीशी त्यांची नाळ अजूनही अतुट आहे.अशी बरीच मंडळी हवेत नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने गाव सोडून गेली आणि शेवटी गावच विसरून गेली पण बोटे साहेब त्याला अपवाद आहेत.गावच्या मातीशी..माणसांशी अजूनही त्यांचे मायेचे नाते कटिबद्ध आहे खरं तर या संस्कारांची प्रेरणा त्यांना वडिलांपासून मिळाली.वडिलांना गावच्या मातीची प्रचंड ओढ..गावची माणसं म्हणजे त्यांच्या मनातील हळवा कोपरा.सतत त्यांचे मन गावाकडे धाव घेई.वडील दत्तगुरुंचे निस्सीम भक्त त्यामुळे बोटे साहेबानी २०१० सालापासून गावात दत्त जयंतीची प्रथा पुनर्जीवित केली.आजही दरवर्षीच्या दत्तजयंतीला जतिनिशी हजर राहून आपली सेवा बजावत असतात.संपूर्ण गावाला महाप्रसाद देतात.
आपल्या गावातील नवीन पिढी शिकावी मोठी व्हावी यासाठी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी त्यांना प्रेरणा द्यावी,गावातील हुशार गुणवंत विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद सारख्या विभूतींची पुस्तके भेट देऊन त्यांचा सत्कार करणे ही संकल्पना त्यांनी गावी रुजवायला सुरुवात केली.
अजूनही गावचा विकास..प्रगती यासाठी काही करण्याची त्यांची मनिच्छा आहे. १९९३ साली स्वप्रयत्नातुन पतसंस्था काढली आहे.आज त्याच्या दोन शाखा आणि वार्षिक ८ ते १० कोटींची उलाढाल आहे.
एका गरीब आईबापाच्या पोटी जन्म घेऊन या तिन्हीं भावंडांनी आपल्या मायबापाची कुस उजवली आहे.
आज जनरल मॅनेजर पदावरून निवृत्त होणारे जनार्दन बोटे साहेब त्यांची. एक बहीण मुंबईतील एका शाळेत मुख्याध्यापिका म्हणून तर भाऊ व्यावसायिक आहे.
पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रैलोकी झेंडा.
कन्या व्हावी ऐसी संत मीरा,मुक्ताबाई जैसी.
पोटाला अशी लेकरं जन्माला यावीत आज ते पुण्यवंत आईवडील हयात नाहीत पण हयात असताना याची देही याची डोळा आपल्या लेकरांची ही कर्तबगारी त्यांनी पाहिली आहे.मातृपितृभक्त या मुलांनी त्यांची अखेरपर्यंत चांगली सेवा केली.जन्माचे पांग फिटलेल्या त्या मातापित्यानि अपार समाधानाने डोळे मिटले.धन्य...धन्य ते माता पिता.
एखाद्या गावखेड्यात गरीब आईबापाच्या पोटी जन्म घेऊन शिक्षणाच्या बळावर प्रचंड जिद्द चिकाटी मेहनत घेऊन एखाद्या शिपाई पदावरून एका प्रतिष्ठित बँकेचा जनरल या बँकेचा जनरल मॅनेजर या पदापर्यंत खूप मोठी भरारी घेणं.. ही खरंच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे.आपल्या कर्तबगारीने बोटे साहेब खरंच आपण आईवडीलांचे,गावचे आपल्या बँकेचे नाव रोशन केले... 'याची केला होता हट्टाहास.' याप्रमाणे जीवनातले असे एक भव्य दिव्य उज्वल उदात्त ध्येय..एक स्वप्न साकार केलात.आणि आज आपण ४१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून मुक्त होता आहात पण.. आज असंख्य जणांची आपण प्रेरणा आहात... कसं शिकावं कसं जगावं..आणि कसं मोठं व्हावं याचं प्रत्येकासाठी मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आपण आहात...आज जरी बँकिंग क्षेत्रातील सेवेतून निवृत्त होणार असला तरी समाजसेवारुपी कार्यात प्रवृत्त होणार हे निश्चित..एक आदर्शवत..निष्कलंक..निर्विवाद..कार्यसेवेतून निवृत्त होत आहात याबद्दल प्रथमतः आपले आपल्याला मोलाची साथ देणारे आपले कुटूंब व आपला सहकारी परिवार आपणा सर्वांचे खूप खूप अभिनंदन... आपले पुढील आयुष्य सुख शांती समाधान..भरभराटीचे जावो... तुमच्या संपूर्ण ईच्छा सफल होवो.. जे जे तुम्हांस हवे ते ते मिळो...
हीच परमेश्वर चरणी प्रार्थना...जय गुरुदेव दत्त.
जय हो... मंगल हो..
-----------------------------------------------
- किरण चव्हाण.(पांगिरे)
८८०६७३७५२८.