फॉलोअर

शुक्रवार, ६ मे, २०२२

पुस्तक परीक्षण- महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर यांचे जीवनचरित्र उलघडणारे पुस्तक.- किरण चव्हाण.


महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर यांचे जीवनचरित्र उलघडणारे पुस्तक.

                    रग तांबड्या मातीची..झुंज वाघाची हे महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित असलेले सदानंद पुंडपाळ व पी ए पाटील या लेखक द्वयीनी लिहिलेलं पुस्तक आहे.जोशीलकरांच्या जन्मापासून आतापर्यंतच्या विस्तारित व भरगच्च कारकीर्दीला अत्यंत सूक्ष्मपणे शब्दांतून उजाळा दिला आहे.चंदगड तालुक्यातल्या किणी सारख्या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबातला पै.विष्णू जोशीलकर यांचा जन्म. एकत्र कुटुंबात आठ भावंडांच्या सान्निध्यात गेलेलं बालपण. आईवडील ज्येष्ठ भावंडांकडून,नातेवाईकांकडून मिळालेलं प्रेम,संस्कार, शाळेतील शिक्षक  यांचे मिळणारे मार्गदर्शन.लहान वयापासून कुस्तीचे असणारे वेड त्यात दोन थोरले बंधू तालमीत सरावाला जात असत ते पाहून कुस्तीविषयी निर्माण होत गेलेले आकर्षण.अशाप्रकारे गावच्या तालमीच्या लाल मातीत उद्याचा एक महान कुस्तीगीर आकार घेतो. लहान वयातच या पठ्ठ्याच्या अंगातली रग दिसून येते ती म्हणजे दहावीला असताना मोकळी बैलगाडी चाके न फिरता चाके घासत पुढे ओढण्याच्या स्पर्धेत सहभाग घेऊन बाजी मारतो.

                        अवघ्या तेरा वर्षांचे असताना वडीलांच निधन होतं. पण थोरले बंधू कुमाणा आणि वहिनी लक्ष्मीबाई यांचे पुत्रवत प्रेम त्यांना मिळते."कुस्तीसाठी जमीन विकायला लागली तरी चाललं पण लहानग्या भावाला कुस्तीसाठी कुठे कमी पडायचं नाही.असा आपल्या लहानग्या भावासाठी थोरल्या बंधूचा असणारा निर्धार व जिद्द.. तर लक्ष्मीबाई वाहिनीचे आईचे प्रेम त्यांना मिळते.'धाकट्या' या प्रेमळ नावाने ते बोलवतात.एवढेच नव्हे तर वाहिनीचे  भाऊ सुद्धा अनेक गावांतून लोणी गोळा करून जोशीलकरांना  पाठवतात मायेच्या नात्याचे असे हे दुर्मिळ उदाहरण म्हणावे लागेल.पुतण्या पै.राजाराम तर सावलीसारखा जोशीलकरांना साथ देतो. सर्व कुटूंब त्यांच्या जडणघडणीत त्यांच्या पाठीशी उभे राहते. 

                      गावातील दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पुढच्या शिक्षणासाठी व कुस्तीसाठी जोशीलकर राजर्षी शाहू महाराजांच्या कुस्तीनगरीत दाखल होतात.ज्या शाहू महाराजांनी मल्लविद्येला प्राधान्य दिले,पैलवानांना आश्रय दिला. त्या कुस्तीगिरांच्या नगरीत हिंद केसरी गणपतराव आंदळकर सारख्या दिग्गज वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचा सराव सुरू होतो.पुढे अल्पावधीतच अनेक नामवंत मल्लांना धूळ चारत विजयाची लाल माती भाळावर लेवून विष्णू जोशीलकर एक नामवंत पैलवान म्हणून नावारूपाला येतात.आताचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे पाठबळ,प्रेरणा आणि आशीर्वाद त्यांना पूर्वीपासून लाभत आले आणि आजही त्यांचे कृपाछत्र जोशीलकरांच्यावर आहे. जिथे कुठे कुस्तीचे मैदान असेल तेंव्हा शाहू महाराज कुस्ती पहायला जात.एकदा कुस्ती जिंकल्यावर लाल मातीत मळलेल्या आपल्या पैलवानाला शाहू महाराज अभिमानाने मिठी मारतात हा प्रसंग वाचताना छाती अभिमानाने फुलून येते. पहाडी छाती, पिळदार बाहू, कसदार शरीर अशी भरगच्च शरीराची ठेवण असलेले पै.विष्णू जोशीलकर यांची कुस्तीतील प्रत्येक झुंज ही शर्थीची,कौशल्याची आणि अटीतटीची होती हे वाचताना कळून येते.कुस्ती हाच श्वास कुस्ती हाच ध्यास याप्रमाणे त्यांनी कुस्तीला वाहून घेतलेला हा पैलवान मनाने तितकाच संस्कारशील,शिस्तबद्ध आणि संयमी..घुटना डाव ही त्यांच्या कुस्तीतील खासियत. या घुटना डावाने अनेक नामवंत मल्लांना त्यांनी चितपट केले.

                      कोल्हापूर,पुणे,मुंबई,पंजाब  दिल्ली असा एकूणच त्यांच्या कुस्तीखेळाचा आलेख उंचावत जातो. जिल्हा ते राष्ट्रीय पातळीपर्यंत कुस्तीच्या खेळांतली त्यांची  चमकदार कामगिरी ही थक्क करणारी आहे.यशाचे दावेदार असणाऱ्या मल्लाशी बेधडकपणे झुंज देणारे अनेक प्रसंग वाचनात येतात.  कुस्तीच्या एका खेळात खांद्याला जबर दुखापत झाली असताना म्हणजे खांदा निखळला असताना वेदनाशामक औषधे घेऊन दिल्लीला कुस्ती खेळण्यासाठी रवाना होतात. ही कुस्ती म्हणजे त्यांच्या एकूणच संयमाची आणि जिद्दीची परीक्षा बघणारी होती. कारण खांद्याला दुखापत असताना देखील एका दिवसात चार काटा कुस्ती आणि सलग ९ वेळा कुस्ती खेळताना त्यांनी दिलेली झुंज थक्क करणारी आहे, तो प्रसंग वाचताना अंगावर रोमांच उभे राहतात.

                   मधल्या काळात थोरले बंधू कुमाणा व बहिणीचे लागोपाठ झालेले निधन आणि कुस्ती खेळात काहीवेळा आलेल्या अपयशामुळे काही वेळा अत्यंत निराशेचा काळही जीवनात येतो.ते वाचत असताना आपल्याही मनात अस्वस्थता निर्माण होते. उदास झालेले जोशीलकरांचे मन गावाकडे आपल्या नात्याकडे धाव घेते.घरच्यांचा व गुरूंचा मिळणारा मोठा आधार यामुळे पुन्हा नव्याने उभारी घेऊन नव्या जोमाने आखाड्यात उतरतात. यशापयशाची कडू गोड चाखत अथक प्रयत्नातून अखेर महाराष्ट्र केसरीचे जे उद्दिष्ट होते.अनेकवेळा त्या यशाने हुलकावणी दिली होती. अखेर १९८५ साली महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान सिद्धीस जातो. आणि कुस्तीच्या इतिहासात महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर नावाचा इतिहास रचला जातो.चंदगड तालुक्यातील किणी सारख्या गावाचा डंखा देशात गाजतो. सर्वच स्तरातून कौतुकाचा, सन्मानाचा वर्षाव होत राहतो. पैलवनासाठी वेडे झालेले गांव जोशीलकरांची  बैलगाडीतून आनंदानं मिरवणूक काढते. अशाप्रकारे रंगतदार कुस्तीची अनेक मैदाने गाजवणाऱ्या पैलवानाची भरगच्च यशोगाथा पानापानांवर वाचायला मिळते.

                              वीज मंडळात नोकरी करत असताना देखील मंडळाच्या वतीने कुस्ती स्पर्धेत सहभागी होऊन महामंडळाला प्रतिष्ठा मिळवून देतात. कुस्ती मधून निवृत्त झाल्यानंतर आजदेखील नवीन पैलवनांना ते मार्गदर्शन करत आहेत.पुस्तकाच्या उत्तरार्धात त्यांच्या आजच्या वाटचालीवर प्रकाशझोत टाकला आहे. राजकीय, सामाजिक ,शैक्षणिक, सहकार क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत.पतसंस्थेच्या चेअरमन पदाचा कार्यभार सांभाळताना मालक नव्हे तर चालक म्हणून सर्वांच्या सहकार्यातून चांगली वाटचाल केली. हे सर्व करत असताना त्यांचा अभिनयकलेशी नाते जुळाले. 'तालीम' या चित्रपटात ही त्यांनी कुस्ती वस्तादाची भूमिका ताकदीने साकारली आहे तसेच काही मालिकेतही भूमिका केली आहे.  वयाच्या ५० व्या त्यांनी पदवी संपादन केली.म्हणजे शिकण्याची ही उर्मी आजच्या तरुणांच्या समोर एक उदाहरण आहे. शासन आणि संस्था यांच्या कडून अनेक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.

                     अशा एका गाव खेड्यात जन्माला आलेला पोर कुस्तीच्या जोरावर कशी गरुडझेप घेतो याचा लेखाजोखा अगदी पध्द्तीशिरपणे या पुस्तकात मांडण्यात आला आहे. जोशीलकरांच्या बालपणापासून आजमितीपर्यंतचा शब्दप्रवास वाचताना त्यांचा संपूर्ण जीवनपट वाचकांसमोर उलगडत जातो. पुस्तकाच्या शेवटी त्यांच्याविषयीं नातेवाईकांनी लिहलेल्या कविता मनाचा ठाव घेतात. ओघवत्या व सखोल मांडनीने त्यांच्या जीवनाच्या अनेक पैलूंना स्पर्श केला आहे. कुस्तीच्या आराखड्यातील एका पैलवानाची झुंज ही फक्त यश आणि अपयश यापुरती मर्यादित न राहता. ती अनेक अंगाने वाचकांसमोर येते. कुस्ती ही फक्त शक्तीचे प्रदर्शन नाही तर त्यातून कौशल्याचे, संयमाचे शक्तीचे आणि युक्तीचेही  दर्शन होत असते. एका कर्तृत्ववान पैलवानाच्या जीवनावर आधारलेले हे पुस्तक जीवनाच्या पटावर पराभवाने खचून जायचे नाही आणि यशाने हुरळून जायचे नाही तर संयमीपणाने,कौशल्याने आणि धैर्याने झुंज देत राहायचं हा महान बोध देऊन जाते.

                    खरंचं या दोन लेखक द्वयींनी घेतलेले कष्ट वाखाणण्याजोगे आहेत. लेखनसामग्री गोळा करून असे जीवनचरित्र मांडणे ही सोपी गोष्ट नाही. त्या व्यक्तिमत्वाच्या जीवनाशी समरस होऊन लिहिताना लेखक स्वतः त्या भूमिकेत शिरला आहे. म्हणून तर वाचकाला ते वाचत असताना त्या व्यक्तीरेखेशी एकरूप होता येते. त्यांच्या लेखन कष्टाचे विशेष कौतुक आहे कारण, त्यांच्या अथक प्रयत्नामुळे  एखाद्या महान पैलवानाचे आत्मचरित्र,जीवनाचे अंतरंग, विविधांगी पैलू आणि कुस्तीच्या मैदानातील त्यांची प्रत्येक झुंज सर्वांसमोर आणून एक महत्वाचे काम केले आहे.या पुस्तकाशिवाय जोशीलकरांच्या एवढ्या सगळ्या उत्तुंग वाटचालीबद्दल संवेदनशील वाचक व समाज अनभिज्ञ राहिला असता. अत्यंत क्रमबद्ध आणि विस्तारित रुपात जीवनाचा सार वाचकाला वाचायला मिळतो.पुस्तकाला ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार यांची सखोल,विश्लेषणात्मक आणि अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना लाभली आहे. प्रत्येक कुस्तीपट्टू,पैलवान, कुस्तीशौकीन किंबहुना सर्व वाचकांनी वाचायला हवे असे हे पुस्तक आहे. कारण कुस्तीच्या आखाड्यातील तांबड्या मातीतील एका वाघाची झुंज आपण शब्दागणिक अनुभवू शकतो तशीच जीवनाच्या आखड्यात कशी झुंज द्यावी हे ही यातून शिकू शकतो.



किरण सुभाष चव्हाण.

मोबा - ८८०६७३७५२८.



पुस्तक - रग तांबड्या मातीची...झुंज वाघाची. 


पुस्तक मूल्य : २००/-

प्रकाशक - अक्षरदीप प्रकाशन 

पुस्तकासाठी संपर्क - सदानंद पुंडपाळ -+91 94049 68829

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...