शांत शिस्तप्रिय,मायाळू विद्यार्थीप्रिय गुरू श्री. विनायक पाटील सर..
काही माणसं शांत, संयमी आणि आपल्या नेमून दिलेल्या कार्याकडे प्रामाणिक पणे वाटचाल करणारी असतात. ती बोलकी नसतीलही पण त्यांचे काम मात्र बोलके असते. त्यांच्या मनाची ऊर्जा, एकाग्रता ही त्यांनी सातत्याने आपल्या कामाप्रतिचं व्यतीत केलेली असते. असेच एक शांत, संयमी,मितभाषी व्यक्तिमत्त्व म्हणजे गुरुवर्य विनायक पाटील सर आज ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत.
अगदी भर उन्हात स्वतःच सेवानिवृत्त समारंभाची पत्रिका घेऊन सर माझ्या घरी आले.पत्रिका हातात देत आग्रहाचं निमंत्रण दिलं तेंव्हा सहजच माझे हात सरांच्या पायाशी गेले. सरांचे चरणस्पर्श केले. सरांना बसण्याची विनंती केली पण घाईगडबडीत उभ्या उभ्याच सर आमंत्रण देऊन घरातून बाहेर पडले. सर निघून गेले आणि हातात निमंत्रण पत्रिका घेत..न्याहाळू लागलो ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सर सेवानिवृत्त होत आहेत.. त्या ३३ वर्षांच्या कारकिर्दीतील विद्या मंदिर पांगिरे शाळेतील सरांचा सेवा काळ नजरे समोरून तरळू लागला. मराठी शाळेच्या त्या भूतकाळात मन डोकावू लागलं. त्यावेळी आम्हीं मराठी शाळेत शिकत असू. एका शिक्षकाने एकच वर्ग सांभाळायचा असल्याने सरांचा कधी आमच्यावर वर्गावर तसा तास झाला नाही. परंतु सरांचे बोलणे,चालणे, शिकवणे एकंदरीतच त्यांच्या त्या व्यक्तित्वाची छाप तशी लहानपणापासून आमच्या मनांवर पडलेली आहे. स्कॉलरशिप परीक्षेत सरांचा हातखंडा. त्यामुळे परिसरातल्या गावचे विद्यार्थी सुद्धा आमच्या शाळेत यायचे. पूर्वीपासूनच पांगिरे गावची मराठी शाळा स्कॉलरशिप परिक्षेत अव्वल ठरलेली आहे. आणि त्यामध्ये सर्व गुरुजनांच्यासह विनायक पाटील सरांचे योगदान अधोरेखित करण्यासारखे आहे. मला अजूनही आठवतंय सरांचा मुलगा स्वप्नील हा देखील त्यावेळी शिकण्यासाठी मांगनूर हुन येत असे. सोबत अभिजित नावाचा सुद्धा एक मुलगा असायचा ही दोन्ही मुले हुशार व संस्कारक्षम होती. शिक्षकांची मुले कशी असतात याचं एक आदर्श उदाहरण आमच्या डोळ्यासमोर असायचं.
सरांना मी लहानपणापासून पाहत आलेलो आहे. शिडशिडीत अंगकाठी मितभाषी साधा सरळ स्वभाव, विद्यार्थ्यांप्रति ओलावा, शिकवण्यातली तळमळ, बोलताना चेहऱ्यावर संयमी स्मितहास्य, अगदी साधा पेहराव जसे की साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असे व्यक्तिमत्त्व.
सरांचा अगदी साधा गरीब स्वभाव, कुणाच्या अध्यात ना मध्यात आपली शाळा विद्यार्थी आणि अध्यापन. एकंदरीतच त्यांनी आपले जीवन या तीन घटकांना वाहूनच घेतले होते. सरांची आणखीन एक आठवण सांगायची म्हणजे सरांची Hero Honda CD 100 गाडी आजही आठवते गाडीचा मराठीत नंबर होता ८०. सरांच्या त्यावेळच्या या गाडीने सुद्धा आमच्या आठवणींच्या कप्प्यात आपले घर केले आहे.
मी लिहायला सुरुवात केली होती आणि मी पहिलीच लिहिलेली कादंबरी 'नवसाचं पॉर' सरांना वाचायला द्यावीशी वाटली. कारण मला माहिती होते सर ती आवर्जून वाचून मला काही सूचना सुचवतील. मी मोडक्या तोडक्या शब्दांत लिहिलेली ती कादंबरी सरांनी मनापासून वाचून पेन्सिलने काही शब्दांना अधोरेखित करून बदल सुचवले होते. 'जीव भांड्यात पडला' या वाक्यप्रचाराचा खरा अर्थ सरांनी त्यावेळी मला समजून दिला होता तो कायमस्वरूपी समरणात राहिला आहे.
सरांच्या अंगी लिहिण्याची सुप्त आवड आहे पण अजूनही ती सरांनी गुप्तचं ठेवली आहे असं मला वाटतं. सरांच्या काही काव्यरचना आहेत कधी भेटले तर यासंदर्भात आवर्जून बोलतात. आता निवृत्तीनंतर सरांनी मुक्तपणे व्यक्त व्हावं अशी आशा करतो.
क्वचित अलीकडे कधी शाळेत जाणे झाले तर मी पाहिलेलं आहे. स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना वर्गात पाठीमागे गोलाकार बसवून सर शिकवत असायचे. अगदी तल्लीन एकरूप होऊन विद्यार्थ्यांत मिळून मिसळून अध्यापन करायचे. मी हे चित्रं जवळून अनुभवले आहे त्यामुळे याचे वर्णन करताना मला आवर्जून साने गुरुजींची आठवण होते. मनात साने गुरुजींची छबी उभा राहते. जणू शांत, गरीब स्वभावाचे साने गुरुजी आपल्या विद्यार्थ्यांना सहजपणे ज्ञानाचे धडे देत आहेत असेच ते चित्र असायचे. शाळेसाठी केवळ दहा ते पाच या वेळेला बांधील न राहता सकाळ पासून संध्याकाळी उशिरापर्यंत सरांनी जादा तास घेऊन विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम केले म्हणून तर स्कॉलरशिप परीक्षेत शाळेने उज्ज्वल नाव कमावले. आजही त्यांचे विद्यार्थी, पालक नांव काढतात. सरांनी फक्त अध्यापनच केले नाही तर बाप हृदयाने त्यांची काळजी घेतली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कोणत्या अडचणी आहेत,त्या समजून उमजून घेऊन त्या विद्यार्थ्यांना पालकांना विश्वासात घेऊन सरांनी मार्गदर्शन केले आहे. एखादा विद्यार्थी कोणत्या कारणांने अभ्यासात मागे राहिला तर वैयक्तिकरित्या त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्याला सर्वांबरोबर घेऊन जाण्याची तळमळ सरांची असायची.
म्हणून तर ते विद्यार्थी आज म्हणतात की, आज आम्हीं जे काही आहोत ते पाटील सरांच्यामुळे आहोत. आमच्या यशाची खरी प्रेरणा म्हणजे आमचे पाटील सर. म्हणून तर एक शिक्षक या नात्याने पलीकडे जाऊन बापाची माया,काळजी या शिक्षकाने वाहिली आणि आजही त्याच अंतकरणाने विचारपूस करतात म्हणून तर त्यांचे विद्यार्थी आणि आईवडील सरांचे आवर्जून नांव काढतात.
बस याहून एका शिक्षकाने काय कमवायचं असतं..
आज त्यांच्या हाताखाली शिकलेले विद्यार्थी विविध क्षेत्रांत मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांचं जीवन यशस्वी झालं त्या पाठीमागे सरांचे प्रामाणिक कष्ट आहेत.
आजपर्यंत सरांना किती आदर्श पुरस्कार मिळाले आहेत माहिती नाहीत. आणि तो मिळावा अशी अपेक्षाही सरांनी कधी केली नसेल. कारण हयातभर त्यांनी आपल्या ज्ञानातून एक असा आदर्श निर्माण केला आहे की तो कुठल्याही पुरस्कारापेक्षा कमी नाही. सरांनी घडवलेला इथला प्रत्येक विद्यार्थी हा सरांचा पुरस्कार आहे. आणि मी एक सरांचा विद्यार्थी म्हणून या निमित्ताने सांगतो की सर तुम्हीं विद्यार्थ्यांच्या साठी इतक्या प्रामाणिकपणे राबत आला आहात की आम्हीं विद्यार्थ्यांनीचं आमचा एक आदर्श शिक्षक हा पुरस्कार मनातूनच आपल्याला बहाल केला आहे.
तुम्हीं सर आमच्यासाठी खूप मोठे आदर्श व्यक्तिमत्त्व आहात.
ज्यांच्या शिकवणीतून, संस्कारांतून जीवनाची वाट चालण्याचे बळ आम्हांला मिळत राहील.
. असो...
आपलीच एक कविता आहे
आभाळ सारं भेदायचं असतं..
दुबळ बनून पाखरानं घरट्यात कधी राहायचं नसतं.
पंखाच्या बळावरती आभाळ सारं भेदायचं असतं.
आभाळाला भेटलं तरी मागे वळून पाहायचं असतं.
जन्म घेतलेल्या घरट्याला पाखरांनं कधी विसरायचं नसतं.
अशी आभाळाला गवसणी घालण्याची प्रेरणा देणाऱ्या आपल्यासारख्या गुरुवर्यांना या सेवानिवृत्त समारंभाच्या निमित्ताने मी आभाळभर शुभेच्छा देतो. आज आपण ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहात.. निवृत्ती हे निमित्त आहे आपल्यासारखे शिक्षक हे अखंडपणे कार्यरत असतील. यात शकांच नाही. आपल्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा..! आपणास उदंड, निरोगी, निरामय ,समृद्ध व संपन्न असे दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वरणी प्रार्थना...
जय हो...! मंगल हो...!!
आपलाच...
एक विद्यार्थी