आजच्या समाजातील 'स्त्री' चे स्थान ?
आजच्या समाजातील स्त्रीचे स्थान काय..? या प्रश्नाकडे वळताना आईच्या उदरापासूनचं सुरुवात करावी लागेल.. आईच्या गर्भात खुडणाऱ्या स्त्रीचं स्थान सांगावं की, अंतराळात जाणाऱ्या स्त्रीचं ? उंबरठ्याच्या आत घुटमळलेल्या स्त्रीचं सांगावं की, सातासमुद्रापार गेलेल्या स्त्रीचं स्थान सांगावं..? मणिपूर मध्ये विवस्त्र अवस्थेत नग्न धिंड काढणाऱ्या स्त्रीचं सांगावं की,...देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या नारीच सांगावं... घरात चूल आणि मूल सांभाळणाऱ्या स्त्रीचं सांगावं की, राष्ट्राच्या सर्वोच्च पदाच्या राष्ट्रपतीची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्त्री सांगावं...नेमकं स्त्री चं समाजातील कोणतं स्थान सांगावं..?.एकेकाळी चूल आणि मूल सांभाळणारी आमची स्त्री...घराच्या उंबरठ्यात स्थानबद्ध असणारी स्त्री आज सातासमुद्रापार जाते...अवकाशात मजल मारते. जिच्या शिक्षणाची दारे एकेकाळी बंद होती...आज ती शिकते सवरते आणि आपलं करिअर घडवते.. आज असं कोणतंही क्षेत्र नाही की,तिथे स्त्रीने आपलं कर्तृत्व सिद्ध केलेले नाही...
पण तरी देखील हा प्रश्न का उपस्थित करावा लागतोय..? उपस्थित करावा लागतोय कारण तशी परिस्थिती आपल्या आजूबाजूला दिसते आहे..आणि या प्रश्नाला भिडताना त्याच्या उत्तरांच्या मुळाशी शिरताना... आजच्या समाजातील स्त्री चं स्थान शोधताना त्या स्त्रीविषयी पहिल्यांदा आपल्या मनातील स्थान नेमकं कसं आहे...स्त्री कडे बघण्याचा आपला दृष्टिकोन नेमका कसा आहे..? हा मूलभूत प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. नाही तरी स्त्रीला आदिशक्ती ,आदिमाता, दुर्गामाता म्हणायचं म्हणजे तिला एकीकडे मातेचं स्थान द्यायचं परंतु त्याच मातेला भररस्त्यात विवस्त्र करून तिची धिंड काढायची आणि लोकांनी बघ्याची भूमिका घ्यायची, त्या नराधमांनी तिच्या शरीराचे लचके तोडायचे आणि समाजाने ते शांतपणे पहायचे इतकी घोर विटंबना आपल्या समाजात स्त्री ची होत असेल तर..? स्त्रीच्या स्थानाबद्दल कसा विचार करायचा...?
एकीकडे मातेचे स्थान देणाऱ्या समाजात दुसऱ्या बाजूला इतकी पातळी कशी घसरते..? देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आज आपण अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यपर्व आपण साजरे करतो आहोत. पण स्त्री स्वातंत्र्याची पायमल्ली होताना आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो आहोत..? म्हणजे आजही या देशात तिचे स्थान कोणत्या अवस्थेत आहे हे आज घडणाऱ्या अशा घटनांतून लक्षात येत असेल. अहो जिथं मुळात गर्भातलं स्त्रीचं स्थान नष्ट करण्याचं महापाप खुद्द जन्मदात्या मातापित्यांकडून केलं जातं..?. कित्येक निरागस कळ्या गर्भात खुडल्या जाताहेत. फांदीवर उमलण्याचं, फुलण्याचं,बहरण्याचं स्वच्छदी जीवन काढून घेतलं जातंय... मुळात तिच्या अंकुरण्याच्या भूमीतलं तिचं स्थान आज सुरक्षित नाही..? मग तिच्या भविष्यातल्या समाजातील स्थानाचा विचार ही तर लांबची गोष्ट आहे... आमच्या लेकीबाळी रात्री- अपरात्री आमच्या गावाघरात, शहरात रस्त्यावर आहेत का सुखरुप..? आज कोणतीही मुलगी रात्रीअपरात्री निर्धास्तपणे वावरू शकते का आपल्या समाजात..? नाही तरी दिल्ली, कोपर्डी तल्या सारखे हैवान आहेतच खुले तिच्या शरीराचे लचके तोडायला. आणि मग प्रश्न पडतो आजच्या समाजात स्त्रीचं स्थान आहे सुरक्षित...?
एका जागतिक निरीक्षणाच्या अभ्यासातून एक निष्कर्ष मांडण्यात आला आहे तो असा की, जगातील महिलांच्यासाठी असे (Top 10 Dangerous Country for women) महिलांच्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने 10 धोकादायक देश आहेत ज्यामध्ये दुर्दैवाने आपल्या देशाचे नांव आहे..ही किती महिलांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे..
आज आपल्या स्रीनें अंतराळात झेप घेतली हो..पण आमच्या रस्त्यावर आजची स्त्री सुरक्षित नाही त्याचं काय..? इतिहासापासून आपण पाहत आलोय.. स्त्री ला किती बंधनात ठेवण्यात आलं,तिच्यावर अन्याय, अत्याचार केले.. तिला तिचं कोणतंही वैयक्तिक स्वातंत्र्य आपण दिल नाही पण आज या सर्वांतून मुक्त होत.. आता कुठे तिला स्वातंत्र्य मिळतंय, आज ती शिक्षण घेते आहे आणि अगदी काही काळातच तिने आपली बुद्धीमता,कौशल्य सिद्ध करून अनेक क्षेत्रांत तिने आपलं कर्तृत्व सिद्ध केलं...आणि स्त्री पुन्हा उभा राहिली... अर्थातच समाजातील तिने पुरुषांच्या बरोबरीच आपलं स्थान सिद्ध करून दाखवलंय, एवढेच नव्हे तर आजच जे तिचं स्थान आहे तिला ते सहजासहजी मिळालेलं नाही तर खूप मोठ्या दिव्यातून जाऊन तिने आपलं हे स्थान दृढ केलंआहे..तरीही एवढं सगळं कर्तृत्व संपादन करूनही स्त्रीच्या बाबतीत आपल्याला अजूनही या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात.
इतिहासामध्ये हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि ते सत्यात येण्यासाठी शिवबा सारखा तेजस्वी कर्तृत्ववान पुत्र घडवणाऱ्या जिजामाता, मुघलांशी निकराची झुंज देऊन आपलं मराठी साम्राज्य टिकवून ठेवणाऱ्या महाराणी ताराबाई,झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर अशा कर्तृत्वा महिलांनी इथला समाज रक्षिला, वाढवला टिकवून ठेवला हा स्त्री कर्तृत्वाचा आपल्या समाजाला लाभलेला इतिहास आहे... समाजातील तिचे स्थान शोधताना इतिहासात डोकावले तर एका अर्थाने या समाजाला दिशा द्यायचे व समाजाची दशा बदलायचे काम पुढे येऊन स्त्रीने केले आहे...मग पुन्हा पुन्हा आजच्या समाजात स्त्री स्वातंत्र्य, समता आणि स्त्री मुक्ती अशा बाबतीत स्त्रीचे स्थान शोधण्याचा सायास आपल्याला का करावा लागतो हा चिंतनाचा विषय आहे. आज राष्ट्राची राष्ट्रपती पदाची सर्वोच्च धुरा सांभाळणारी ही एक स्त्री आहे...एखादं घर सांभाळणारी असो किंवा देश सांभाळणारी स्त्री असो सामाजिक स्तरावर तिचा विचार करताना तिचे स्थान हे समतोल आहे. सर्वांच्या बरोबरीचे आहे. किंबहुना ते सरस आहेच. पण समाजातील स्त्रीचे स्थान ठरवताना प्रत्येकांनी तिला आपल्या मनात कोणते स्थान दिले आहे. हे फार महत्वाचे आहे. कारण स्त्री कडे पाहण्याचा दृष्टिकोन, तिच्याविषयी मनातील सन्मान आणि समता हे जर आतून सकारात्मक असेल तर समाजमनातील तिचे स्थान ही नक्कीच सकारात्मक पातळीवरचे असणार आहे.
मुळात प्रत्येक घरात स्त्री ला कोणते स्थान मिळते आहे.यावरून तिचे समाजातील स्थान ठरते कारण आजच्या समाजव्यवस्थेत पुरुषसत्ताक संस्कृती दिसून येते. आणि परंपरागत चालत आलेल्या रूढी, प्रथा ,परंपरा यांनी स्त्रीला अनेक बंधनात अडकवून ठेवले. नेहमीच तिला दुय्यम आणि कमीपणाचे स्थान देण्यात आले. घरातील कामे ही स्त्रीने करावयाची किंबहुना असा एक पूर्वपार अलिखित नियमच चालत आलेला आहे. पण स्त्रीने कधीही हे काम नाकारले नाही तर तिने आपले कर्तव्यचं मानले.
जिने आपल्या गर्भातून जन्म दिला तिला आजही काही मंदिरांच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला जातो. अशी इथल्या समाजाची मानसिकता आहे. अजूनही स्त्रीयांच्या बाबतीतला भेद कमी झालेला दिसून येत नाही. समाजात स्त्रीला सन्मानाचे स्थान द्यायचे असेल तर पहिल्यांदा आपल्या मनात दिले पाहिजे..आपल्या विचारांत दिले पाहिजे, आपल्या डोळ्यांत दिले पाहिजे तरंच स्त्री कडे बघण्याचा आपला दृष्टीकोण बदलू शकेल. नाही तर स्त्री-पुरुष समानतेचा डंका वरवर पिटायचा आणि आतून स्त्री विषयक संकुचीत विचार ठेवायचा तर स्त्रीचे समाजातील स्थान बदलणार कसे..? म्हणून प्रत्येकाने आपल्या आचार विचार,संस्कार आणि संस्कृती मध्ये स्त्रीचा सन्मान राखला तरंच समाजातील तिचे स्थान बदलणार आहे. आजची स्त्री खऱ्या अर्थाने सन्मानाने जगू शकणार आहे. कारण ज्या समाजात स्त्रीचा सन्मान केला जातो.. तोच पोषक आणि सुसंस्कृत समाज म्हणून ओळखला जातो. आणि ज्या समाजात स्त्रीला योग्य सन्मान राखला जात नाही तो समाज अधोगतीकडे जाणारा असतो.
म्हणून आजच्या समाजात स्त्रीचे स्थान या प्रश्नाच्या मुळाशी शिरून विचार करताना इथल्या प्रत्येक माणसाने जरूर हे चिंतन करावे की, जिच्या उदरात आपण नऊ महिने वाढलो, आपल्या अंगावर तिने पोसलं आहे, पालन पोषण केलं आहे..एकंदरीत जशी या मातीने आपल्याला स्थान दिलं आणि तिच्या जीवावर जगतो आहोत. तशीच स्त्री ही एक विश्वातील अशी माता आहे..जी आपल्या उदरात स्थान देते,ती आपल्याला जन्म देते अशा स्त्री ला समाजाच्या उदरात सन्मानाचे स्थान देणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे.
समाजात स्त्रीचे ठेवूया योग्य स्थान,
स्त्रीचे अस्तित्व जगात आहे महान.
देऊया मान राखुया तिचा सन्मान,
तरंच स्त्री होईल सर्वार्थाने बलवान.