फॉलोअर

शनिवार, १८ जानेवारी, २०२०

'सर्वगुणसंपन्न सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व : गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी.'


'सर्वगुणसंपन्न सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व : आदरणीय गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी.'
                   
                     सांगली जिल्ह्यातील विटा शहराजवळच्या माहुली या छोट्याशा गावी श्री.दत्ताजीराव भाऊसाहेब देशमुख व सौ.विजयालक्ष्मी दत्ताजीराव देशमुख या पुण्यशील दाम्पत्याच्या पोटी आठ लेकरं जन्मली.म्हणतात ना..."शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी." तशी ही लेकरं. आणि त्यातले रसाळ गोमटे शेंडेफळ म्हणजे परमपूज्य गुरुवर्य इंद्रजीत देशमुख (काकाजी) ऊर्फ वासुदेवानंद सरस्वती.काकाजींना तीन भाऊ व पाच बहिणी अशी एकूण आठ भावंडे. एकंदरीत मोठा परिवार.१९ ऑक्टोबर १९६५ रोजीचा काकाजींचा जन्म..आज सर्व आबालवृद्ध आदराने व मायेने त्यांना काकाजी म्हणून संबोधतात..आई विजयालक्ष्मी देशमुख जुनी अकरावी पास असलेल्या तर वडील श्री दत्ताजीराव भाऊसाहेब देशमुख १० वर्षे आमदार होते.मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून प्रथम ज्या दोन आमदारांनी त्यावेळी राजीनामा दिला,त्यापैकी एक काकांजीचे वडील होते.काकाजींच्या वडिलांनी सन १९४५ च्या दरम्यान आपल्या लग्नात स्वतःची ७२ एकर जमीन व मिळालेला आठ हजार रुपये हुंडा त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेला दान स्वरूपात दिला.सामाजिक ऋणानुबंधाच्या दृढतेसाठी केंद्राला स्वमालकीची जागा देऊन माहुलीमध्ये पोस्ट ऑफिस सुरू करणारे काकजींचे देशमुख कुटुंब हे देशातील पहिले कुटूंब होय.१९८२ साली देशमुख कुटुंबाच्याच प्रयत्नाने बँक ऑफ बरोडा या शाखेची स्थापना माहुली या ठिकाणी करण्यात आली.अशा समाजाप्रती उदात्त कळवळा असणाऱ्या समाजसेवी कुटुंबातच काकाजींवर समाजशीलतेचा संस्कार रुजला.काकाजींचे भाग्य मोठे की असे उदार अंतःकरणाचे मायबाप त्यांना लाभले.
                             काकाजींचे प्राथमिक शिक्षण गावच्या जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय माहुली या ठिकाणी झाले.बळवंत कॉलेज विटा येथून बारावी झाल्यानंतर कोल्हापूर येथे बी.एस्सी.ऍग्री व त्यानंतर महात्मा फुले विद्यापीठ राहुरी येथे एम.एस.सी एग्री अभ्यासक्रम पूर्ण केला.असा एकंदरीत त्यांचा शैक्षणिक प्रवास सुरू असताना नंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला.आणि त्यानंतर एम.पी.एस.सी च्या मुलाखतीसाठी पुण्याला जात असताना   काकाजींच्या आयुष्यात एक अनपेक्षित घटना घडली तो दिवस होता २ ऑगस्ट १९९२.कात्रजच्या घाटात काकाजींच्या जीब गाडीचा अपघात झाला. गाडीतले दोघे मित्र जागीच गतप्राण झाले आणि थोरले बंधू आबासाहेब जखमी झाले.सुदैवाने काकाजी थोडक्यात बचावले पण पायाला गंभीर दुखापत झाली.पण अशा जीवावर बेतलेल्या संकटाला धीराने तोंड देत पायाला प्लास्टर असताना काकाजींनी त्यावेळेस स्ट्रेचरवरून मुलाखत दिली.अशाप्रकारे मुलाखत देण्याची एम.पी.एस. सी.च्या इतिहासातील ही पहिलीच घटना असावी पण या अपघाताने काकाजींना आत्मसाक्षात्कार घडला...गाडीमधले दोन जीव जागीच गतप्राण झाले पण परमेश्वर कृपेने आपण जिवंत राहिलो याच्यामागे माझ्याकडून काही चांगले कर्म करवून घेण्यासाठीच दैवाने मला हा पुनर्जन्म दिला आहे.मग असे असेल तर इथून पुढचे जीवन अवघ्या जीवांसाठी वाहून घ्यायचे.अशा आत्मचिंतनातून काकाजींच्या आध्यात्मिक व सत्कार्याची दिशा निश्चित झाली.पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतून पहिल्यांदा गटविकास अधिकारी म्हणून शिरोळ या ठिकाणी रुजू झाले.या ठिकाणी वास्तव्यास असताना काकाजींचे नृसिंहवाडीला येणे जाणे व्हायचे त्यामुळे त्यांच्यातील अध्यात्मिक वृत्ती अधिक दृढ झाली.
                          दत्तगुरूंच्या ठायी असणारे आदरणीय कर्नल रघुनाथराव पाटील उर्फ स्वामी प्रणवानंद यांचे गुरुपद स्वीकारून त्यांचे शिष्यत्व पत्करले..तसेच मुरगुड येथील आदरणीय श्री कृष्ण देशमुख काकाजी यांना ते गुरुपदी मानतात. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर, उपायुक्त जलस्वराज्य पुणे ,पाणी पुरवठा, वसुंधरा प्रकल्पावर सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर इथपर्यंत त्यांचा प्रशासकीय कार्यकिर्दीचा आलेख सर्वोत्तम राहिला..प्रशासनातील स्वच्छ,प्रामाणिक व कर्तबगार अधिकारी व सर्वसामान्य जनतेसाठी त्यांच्या कार्यालयाचे दरवाजे उघडे होते अशी त्यांची कारकीर्द एकंदरीत लोकसेवेकरिता राहिली.नजीकच्या काळात ३१ जुलै २०१८ रोजी त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर येथून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.त्यामुळे पूर्णवेळ समाजसेवारुपी कार्याला त्यांनी अखंड वाहून घेतले आहे.अशा सेवाकार्याच्यामागे काकाजींच्या अर्धांगिनी व अवघ्यांच्या आईसाहेब सौ.प्रतिभाताई इंद्रजीत देशमुख यांची सदैव मोलाची साथ लाभत असते.तसेच काकाजींच्या संसाररूपी वेलीवर संस्काररुपी मुले कन्या यशोमतीदीदी एम.बी.बी.एस चे शिक्षण पूर्ण करून सध्या पी.जी.अभ्यास करत आहे व चिरंजीव प्रणवभैया बारावीचे शिक्षण पूर्ण करून पुढील पदवीधर शिक्षण घेत आहे अशाप्रकारे दरवळणाऱ्या सुगंधी फुलासारखे या मुलांचे जीवन बहरत आहे.
                             ज्ञानाची अखंड वाहणारी  गंगा म्हणजे  काकांजीची अमोघ ओघवती अमृतवाणी.वाचनाचा प्रचंड व्यासंग.काकाजींचे जवळजवळ ७००० पुस्तकांचे स्वतःचे सुसज्ज ग्रंथालय आहे.तसेच काकाजींची स्वतःची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.आपल्या अमृतवाणीतून संतापासून मंहतापर्यंत आणि विचारवंतांपासून समाजसुधारकांच्या विचार संस्काराच्या ज्ञानामृताची संजीवनी अवघ्या जीवांना देत असतात.संतांच्या विचारांचा सार सांगताना शितल असणारी वाणी...छत्रपती शिवाजी महाराजांच्या,मावळ्यांच्या क्रांतीवीरांच्या पराक्रमाची गाथा सांगताना ही वाणी तितकीच प्रखर वीररसाने रोमारोमात अंगार फुलवते.'अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्हीं लोक' माऊलींचा हा संस्कार लेवून काकांजी त्याच माऊलींच्या अंतःकरणाने सुखाचे हे बीज आपल्या मधूर वाणीने जनमाणसांच्या हृदयी रुजवत असतात.अशा मानवसेवेच्या उन्नत कार्यासाठी दिवसरात्र त्यांच्या रथाची चाके अखंड भिरभिरीत असतात.अखंड महाराष्ट्र काकाजींच्या वाणीवर भरभरून प्रेम करतो.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन विचारांचा,प्रबोधनाचा जागर ते मांडत असतात.आजही सोशल मीडियाच्या प्रभावशाली माध्यमातून काकाजींचे विचार सर्वदूर ऐकले जातात.काही मिनिटात जीवनाचा सार सांगणारी अर्थपूर्ण अंतर्मुख करायला लावणारी ही अमृतवाणी  व्हाट्सएपच्या माध्यमातून मोबाईलवर ऐकायला मिळते. त्यातील मौलिक विचार मनाचे आरोग्य उत्तम राखून रोजच्या जगण्याला नवं बळ देतात.अशी काही उदाहरणे आहेत की,दुर्धर आजाराने ग्रासलेल्या रोगी बांधवानाही या अमृतवाणीने नकारात्मक विचारातून बाहेर काढून त्या आजाराशी लढून जगण्याची सकारात्मक प्रेरणा निर्माण केली आहे.कीर्तनकार, प्रवचनकार, नामवंत प्रेरणादायी व्याख्याते,विचारवंत,संत साहित्याचे गाढे अभ्यासक,लेखक,कवी अशी विविध रूपे काकाजींच्या व्यक्तीमत्वात सामावलेली आहेत.अशा बहुआयामी  संगमाच्या उगमस्थानातून प्रसवरवणारी विचारवाणी ज्ञानप्रवाहित होऊन जनासागराला मिळत असते.
                                     नव्या दमाच्या पिढीची ऊर्जा व प्रेरणास्रोत म्हणजे काकाजी.नव्या तरुणाईमध्ये काकाजींच्याविषयी प्रचंड आत्मीयता व लगावआहे. तमाम नवयुवकांना योग्य दिशा देऊन उज्वल,समृद्ध व सक्षमीकरणाचे काकाजींचे अभियान सतत सुरू असते.भारताचे भविष्य ज्या पिढीच्या हातात आहे.तो भारत स्वामी विवेकानंदांच्या आदर्शवादी विचारांचा बलशाली भारत झाला पाहिजे.या विचारमंथनातून स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा वसा व वारसा पुढे नेण्यासाठी आणि समाजसेवेच्या वृंधिंगत  व्यापक विचारातून काकाजींच्या मार्गदर्शनाखाली १२ जानेवारी २००० साली शिवम अध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेची स्थापना घारेवाडी येथे करण्यात आली.या शिवम प्रतिष्ठानच्या माध्यमातून काकांजीच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली लहान मुलांकरिता बालसंस्कार शिबीर,बलशाली भारताच्या स्वप्नपूर्तीच्या उद्देशाने घेतले जाणारे बलशाली युवा हृदय संमेलन जकर..दुष्काळग्रस्त भागात मे महिन्यात माय भू सेवा यात्रेअंतर्गत श्रमदान शिबिर राबविले जाते,पालकांच्यासाठी पालकसंस्कार शिबीर,शिक्षकांसाठी गुरुजन हृदय संमेलन,महाराष्ट्रातील समाजसेवेला वाहून घेतलेल्या व्यक्ती व संस्था यांच्या भेटीचा अभ्यासपूर्ण दौरा म्हणजे सृजनयात्रा,शेतकऱ्यांसाठी शेतकरी हृदय संमेलन, महिलांच्यासाठी शौर्यवर्धिनी शिबिर.असे वर्षभरात सर्वांच्यासाठी सर्वसमावेशक विविध उपक्रम घेतले जातात.अलीकडे नव्याने वृद्धांसाठी सावली वृद्धाश्रम सुरू केले आहे.काकाजी आणि नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर,मकरंद अनासपुरे यांच्या सहयोगातून सध्या महाराष्ट्रात शेतकरी विषयक कार्याचा विस्तार होतोय..नाम फाउंडेशन संस्था व शिवम प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतकरी जीवन हे सुखी,समृद्ध आणि संपन्न व्हावे कोणत्याही शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागू नये यासाठीची एक चळवळ महाराष्ट्रात निर्माण होत आहे.अशाप्रकारे काकाजींच्या सामाजिक कार्याचा विस्तार महाराष्ट्रभर दिवसेंदिवस अधिकाधिक व्यापकदृष्ट्या वृंद्धीगत होतोय.
                       काकांजीबद्दल काय बोलावं आणि किती बोलावं...? आकाशासारखे विशाल आणि महासागरासारखे अथांग असे आमचे काकाजी.त्यांची महती शब्दांत मांडताना त्यांची व्याप्ती त्या शब्दांत मावणे कठीण आहे.

 'इं'- द्रायणीच्या काठचा ज्ञाना वदतो आपल्या मुखातूनी..
ज्ञानामृताने ओंथबती शब्दे पाझरती हृदयातूनी.

'द्र'- वती पाषाणहृदयेही आपुल्या शीतल वाणीने
धन्य होती वाणी वर्षावात भिजूनी अवघ्यांची तने-मने.

'जी'- वा सवे जीव जडवी मायेचा धागा गुंफती आपुली वचने.
चांगुलपणाच्या सुवासाने दरवळती इथली सुमने.

'त'- याजयांच्या सुखाचा ध्यास अखंड आपुल्या हृदयांतळी
अवघ्यांच्या कल्याणाचे साकार करावया स्वप्ने आपुला जिवात्मा तळमळी.

      'इंद्रजीत' या चार अक्षरातून निघणारा अर्थच इतका व्यापक असेल तर मग इंद्रजीत देशमुख काकाजी या व्यक्तिमत्त्वाचे स्वरूप अवकाशाप्रमाणेच किती अथांग.
                                        काकाजी म्हणजे अवघ्यांचे हृदय...अंतरीचे हृदयरुपी काकाजी म्हणजे जगण्यातला चेतनामयी जिवंतपणा...ज्ञानाचा निखळता...खळखळता... नितळ झरा...बुद्धीला शुद्धीची....मनाला मांगल्याची आणि जनाला सज्जनाची जोड देऊन कसं जगावं व कशासाठी जगावं या उद्दिष्टांप्रती आत्मप्रचिती घडवून आणणारी..अशी चैतन्याची,पावित्र्याची,मांगल्याची सर्वांगसुंदर सर्वगुणसंपन्न  मूर्ती... ज्या मंगलमयी मुखातून साक्षात ज्ञानाची वदते सरस्वती असे आमुचे इंद्रजीत देशमुख (काकाजी) उर्फ स्वामी वासुदेवानंद सरस्वती .ज्या कुणाला ही सदमूर्ती भेटली..त्यांना जीवन कळले हो..जीवनाचे सार्थक झाले हो.!!
                                                                     जय हो....मंगल हो...!!
               
गुरुवर्य काकाजींची ध्वनिफीत खालील युट्यूब चॅनेलवर जरूर ऐका.

https://youtu.be/LoFlJ1epcuE

- शिवम साधक
किरण सुभाष चव्हाण
मोबा - ८८०६७३७५२८.

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२०

सामाजिक कार्यकर्ते श्री. सागर गुरव - किरण चव्हाण.


'सागर गुरव म्हणजे  समाजसेवेला वाहून घेतलेलं एक जीवन...'

                         भुदरगड तालुक्यातील कोळवण हे थोडं दुर्गमचं म्हणावं लागेल असं गांव...जेमतेम दोन हजाराच्या घरात असलेली लोकसंख्या...शेती हा प्रमुख तर त्याच्या जोडीला पशुपालन हा जोडव्यवसाय.. अशा या खेडेगावात...सागर गुरव यांचा अतिशय गरीब कुटुंबात जन्म झाला...आईवडील शेतमजूर...घरची फक्त पाच गुंठे जमीन...कुठे तरी मोलमजुरी केल्याशिवाय भागायचे नाही...हातावरचे पोट... आणि त्यात ही तीन मुले पोटाला...सागरजींना तीन भावंडे...थोरली बहीण...भाऊ मग सागरजी...बहीण लग्न होऊन सासरी गेली...भावाचे लग्न झाले...कालांतराने...त्यावेळी सागरजी दहावीला असतील... भावाने आपला वेगळा संसार थाटला...आपला सख्खा भाऊ आपल्यापासून दूर गेल्याची बोच त्यांच्या लहान मनाला लागली...घरचा कर्ता पुरुष म्हणून ज्या भावाने कुटूंबाची  जबाबदारी स्वीकारायची...तोच आपली जबाबदारी झटकून मोकळा झाला...पुढे आणखीन एक दोन वर्षाने सागरजींना असाच धक्का बसला...१२ वी ला असताना वडिलांचे डोळे गेले...दोन्हीं डोळ्यांनी वडील पूर्णपणे अंध झाले..भाऊ तर आधीच विभक्त झालेला...आणि आता वडिलांचा होता आधार तो ही अशाप्रकारे अधू झालेला...आता काय करावं..? घर कस चालवावं..?सागरजींच्या डोळ्यापुढे सगळाच अंधार दाटून आला होता.शिक्षण पूर्ण करायचं की घर चालवायचं...? पण जिद्द न सोडता आर.ए.मोहिते. टेक्स्टाईल या कंपनीत दिवसभर काम करून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे रात्रीच्या कॉलेजमधून ११ वी चे शिक्षण घेतले..आणि पुन्हा गावी येऊन आपले घर सांभाळत १२ वीचे शिक्षण पूर्ण केले.पण आता पुढे खूपच मोठा प्रश्न निर्माण झाला... शिक्षणाकडे लक्ष दिले तर माझ्या वयस्कर आईवडिलांना कसे सांभाळता येईल..? एकीकडे घरची जबाबदारी आणि दुसरीकडे शिक्षण अशा परिस्थितीत स्वतःच्या आईवडिलांकडे पाहून पोरसवदा वयात घराची जबाबदारी अंगावर घेतली...आणि शिक्षण सुटलं...
            पण संकटं काही पाठ सोडायला तयार नव्हती.. थोरला भाऊ दारूच्या पूर्णपणे आहारी गेला होता...दारूचे व्यसन त्याला जडले होते...पुन्हां प्रश्न निर्माण झाला... आपले घर सावरता सावरता आता समोर भावाचे घर उध्वस्त होताना पहायचे का..? चार माणसात बसता-उठता पंचाईत होत होती..नाही मला काही तरी केलं पाहिजे. दारूमुळे मी माझ्या भावाचा संसार उध्वस्त होताना नाही पाहू शकत...मन पेटून उठलं...आणि नकळत पहिल्यांदा इथेच समाजकार्याची पहिली ठिणगी मनात पडली...ती व्यसनमुक्तीची....काहीही झालं तरी या दारूच्या व्यसनातून भावाला सोडवायचा हा विडाच त्यावेळी त्यांनी उचलला..
भावाला समजावून सांगितले ,दारूच्या दुकानात जाऊन सांगावं लागलं माझ्या भावाला दारू देऊ नका म्हणून.पण जिथं आपलंच नाणं खोटं तिथं दुसऱ्याला सांगून तरी काय उपयोग...कित्येक वेळा समजावून सांगण्याचा  हा अयशस्वी प्रयत्न केला... उपयोग झाला नाही...शेवटी गावातील दारूबंदी झाली पाहिजे यासाठी लोकांच्यात मिसळून जनजागृतीला करायला सुरुवात केली...घरोघरी जाऊन दारूबंदी साठी प्रबोधन करावे लागले...गावातील मंडळाच्या माध्यमातून कार्यक्रम राबवून दारू बंदीच्या विरोधात लोकप्रबोधन सुरू केले...सभा घेतल्या...

एक चळवळ उभी केली...यात त्यांच्या पत्नी सौ.अनुराधा गुरव यांची त्यांना मोलाची साथ मिळत गेली.. काहीवेळा रागाने ग्रामपंचायतीच्या दारात दारूचा साठा जाळण्याचाही प्रयत्न केला...शेवटी चांगल्या लोकांच्या सहकार्याने असा एक निर्णय घेतला की,जो कोणी गावात दारू पिऊन येईल त्याची...मुंडन करून धिंड काढण्यात येईल...पण इथे एक सत्वाची आणि तत्वाची परीक्षा सागरजींना द्यावी लागली...की काही विघ्न संतोषी लोकांनी सागरजींच्याच भावाला मुद्दाम माघारी दारू पाजवून गावात आणले...आता कसली धिंड आणि कसलं मुंडन...?त्यांना गंमत बघायची होती... या संकल्पनेची टर उडवायची होती...पण सागरजींनी हिंमत दाखवली...नियम तर सर्वांनाच लागू आहे भाऊ असला म्हणून काय झाले...सागरजींनी स्वतः आपल्या भावाचे मुंडन करून गावातून धिंड काढली...बोले तैसा चाले...या उक्तीप्रमाणे त्याची प्रचीती दाखवून दिली. की फक्त मी बोलतच नाही करून दाखवतो..आणि  लोकांना त्यावेळी पटलं की,नाही एक भाऊ जर अशाप्रकारे भावाची धिंड काढण्याची कठोर पाऊले उचलत असेल तर खरंच ती दारू किती वाईट आहे... हळूहळू यातून भावाचे व्यसन सुटले...पण समाजात आणखीन असे असंख्य भाऊ आहेत जे अशा व्यसनाच्या विळख्यात सापडले आहेत... म्हणून सागरजींनी ही दारूबंदीची चळवळ अधिक व्यापक केली. प्रसंगी पत्नीची कर्णफुले या कार्यासाठी गहाण ठेवली.वटपौर्णिमेच्या दिवशी सहा हजार महिला भगिनींचा मेळावा घेऊन आपल्या गावात कायमची दारूबंदी झाली पाहिजे याचा निर्धार करून गावातील दारूबंदी पूर्णपणे यशस्वी करण्याच्या दृष्टीने पाउले उचलली.या घटनेला आज नऊ वर्षे लोटली. आजतागायत गावात पूर्णपणे दारूबंदी आहे.
           घरची परिस्थिती लक्षात घेऊन अवघ्या २१ व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

एक अशा गरीब कुटूंबातील मुलगीशी लग्न केले की, त्या घराचाही आपल्याला भविष्यात आधार होता येईल...वडिलोपार्जित पाच गुंठे जमीन आणि दोन म्हैशी... एवढीच काय ती दौलत गाठीला.आणि संसार सुरू झाला...अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्हीं लोक..या उक्तीप्रमाणे आपल्या संसाराबरोबर समाजाचा संसारही बघायचा होता...जबाबदारी खूप मोठी होती.. समाजाला आपले कुटुंब मानून समाजसेवेचे व्रत हाती घेतले आणि खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यात सागरजींनी स्वतःला झोकून दिले.
                  व्यसनमुक्ती या कार्यापाठोपाठ अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हाती घेतले ,आसपासच्या शाळेत जाऊन मुलांना याविषयी मार्गदर्शन करणे...लेक वाचवा या गंभीर सामाजिक विषयासंदर्भात शाळेत, समाजात जाणीव जागृती निर्माण करण्यास सुरुवात केली...आपल्या स्वतःच्या कुटूंबाचा मरणोत्तर अवयव दानाचा संकल्प त्यांनी केला आहे एवढेच नाही तर अशाप्रकारे आतापर्यंत २५० जणांना अवयव दान करण्यासाठी परावृत्त केले...वर्षातून तीन वेळा असे आजपर्यंत तब्बल २१ वेळा सागरजींनी रक्तदान केले आहे...सरकारच्या काहीं योजनांचा लाभ गरीब व गरजू लोकांच्यापर्यंत पोहचवणे..


जीवनदायी योजनेच्या माध्यमातून सुमारे २५० पेक्षा जास्त लोकांना लाभ मिळवून दिला...परिसरात वृक्षारोपण करणे,लोकसहभागातून विद्या मंदिर कोळवण या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे...गावातील मयताच्या उतरकार्याला भांडी देण्याची प्रथा मोडीत काढून त्याऐवजी शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी असे शैक्षणिक साहित्य देणे आणि रक्षाविसर्जन नदीमध्ये न करता एखाद्या झाडाला ती घालणे... अशा पारंपरिक प्रथेला मुरड घालून बदलत्या काळानुसार परिवर्तनवादीसंकल्पना त्यांनी मांडल्या आणि त्या सत्यातही उतरवल्या...सागरजी स्वतःच्या बापाची केस,दाढी आजही स्वतः करतात..

 या निमित्ताने आपल्या बापाच्या गालाला मायेचा स्पर्श करण्याची संधी न सोडणारा हा विरळा पुत्र असेल...उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहार समाजातील मुलगा... आईवडील पोटाची खळगी भरण्यासाठी इकडे आलेले ,गावोगाव फिरून लोहारकाम करायचे...अशा भटकंतीमुळे मुलांचे शिक्षण खुंटले होते...जेंव्हा ही गोष्ट सागरजींच्या लक्षात आली तेंव्हा जातिनिशी त्यांनी यात लक्ष घालून त्या आईवडिलांची समजूत काढून त्या मुलाला आणि त्याच्या मामाच्या मुलाला अशा दोन मुलांना मुरगुड विद्यालय मुरगुड येथे  प्रवेश घेतला आणि त्यांचे इ९वीचे शिक्षण सुरु झाले... या मुलांच्या लागणाऱ्या शिक्षणाचा खर्च सागरजींआज लोकसहभागातून  करताहेत.

तसेच मुरगुडमधील शिवमचे साधक डॉ.श्री रणजितसिंह साठे डॉक्टर या मुलांच्या आजारपणात पूर्णपणे मोफत उपचार करतात..आज ही मुले आनंदाने शिक्षण घेत आहेत..आईवडिलांना उपस्थित राहता येत नाही म्हणून स्वतः सागरजी शाळेतील पालकमिटिंगला हजर राहतात...आजही पूर्णपणे त्या मुलाकडे त्यांचे लक्ष देतात.अशाप्रकारे शिक्षणाविना वंचित राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्याला एक नवे जीवन देण्याचे हे मोलाचे कार्य सागरजींच्या हातून घडले आणि घडत आहे..असा हा सागरजींच्या सामाजिक कार्याचा उंचावणाराच आलेख...दोन अडीच वर्षांपासून ते ज्यांना गुरुबंधू मानतात ते दाभोळे साहेब यांच्यामुळे शिवम फाउंडेशनला जोडले गेले...आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या या कार्याची पुण्याई म्हणावी लागेल...की त्यांची इथे मा.इंद्रजीत देशमुख साहेब(काकाजीं) यांच्याशी भेट झाली..


.पुण्याई फळाला आली... गुरुभेट झाली...सागरजींना आपला परमेश्वर भेटला...गुरुशिष्याचे नाते इतके घट्ट झाले...की उठता बसता आपल्या गुरूंचे नामस्मरण करून...सागरजी आपले कार्य पुढे नेटाने करू लागले...प्रातःकाळी उठल्या उठल्या त्यांच्या डोळ्यासमोर पहिल्यांदा उभे राहते ते परमपूज्य काकाजींचे रुप...एवढे सागरजींच्या हृदयात खोलवर रुजले आहेत काकाजीं..आता या कार्याच्या पाठीमागे खरी प्रेरणा,प्रोत्साहन आणि मार्गदर्शन होते ते साक्षात गुरूंचे...मग काय समाजसेवेचा वसा आता अमाप ऊर्जेने आणि प्रेरणेने अगदी जोमाने पुढे चालू आहे.. शिवमच्या माध्यमातून गेल्यावर्षी सिंदखेड लपाली आणि यावर्षी मान तालुक्यातील शिंदी खुर्द या गावी पाणी फाउंडेशनने सुरू केलेल्या पाणी आडवा पाणी जिरवा या श्रमदान शिबिरात ही सागरजींनी उत्साहाने सहभाग घेऊन...पूर्णपणे तनामनाने  श्रमदान केले..


शिवम फाउंडेशनच्या कोणत्याही कार्यात आणि कार्यक्रमात सागरजींचा मोठा सहभाग असतो...एक प्रमुख भूमिका असते...काकाजींचा एकेक शब्द ते जीवाप्रमाण मानतात...काकाजींचा शब्द आणि आशीर्वाद घेऊनच सागरजीं कोणत्याही कामाची सुरुवात करतात.काकांजीची विचारधारा हीच सागरजींची जीवनधारा बनली आहे....
                    सागरजींच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्या  समाजसेवेच्या नीतीला  योग्य गती मिळावी यासाठी अयोध्या फाऊंडेशन कोल्हापूर यांच्यावतीने यावर्षीच्या युवा हृदय संमेलन घारेवाडी येथे सन्मानपूर्वक नाना पाटेकर यांच्या हस्ते बोलेरो गाडी सागरजीना प्रदान करण्यात आली..

त्यांच्या सामाजिक कार्याची ही पोचपावतीच म्हणावी लागेल.आता आपल्याबरोबरीने या गाडीलाही त्यांनी समाजसेवेत रुजू केले आहे...
आपल्या भागातील  गोरगरीब लोकांची सेवा करण्याची अनोखी संधी यातुन त्यांना मिळाली...भागातील अनेक रुग्णांना विनामोबदला फक्त डिझेल खर्च घेऊन जिल्ह्याच्या दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याची सेवा या गाडीच्या माध्यमातून सध्या ते करत आहेत...आज अनेकजण सांगतात...वेळेवर सागर गुरव यांची गाडी आली नि मला वेळेवर उपचार मिळाले....काहीजण सांगतात की खरंच सागरदादांच्या मुळे मला हे नवीन जीवन मिळाले.आहे..आजपर्यंत सहा सात महिन्याच्या काळात ४० भर रुग्णांना दवाखान्याच्या दारात वेळेत पोहोचवण्याची सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली... आज सागरदादांची ही गाडी म्हणजे गोरगरीब, सामान्य जनतेची जीवनवाहिनी बनून फिरते आहे...


पण काहीवेळा अशी ही वेळ येते की साधे डिझेलचे पैसेही समोरच्यांकडून मिळत नाहीत.स्वतःच्या खिशातले तरी कितीवेळा घालायचे...अशी एकेकदा निराशा पदरी यायची...आणि काय योगायोग... ठरलेल्या पेट्रोल पंपावर गाडी घेऊन गेल्यानंतर हजार रुपयांचे डिझेल घाला म्हणतांना तो पाच हजारांचे डिझेल टाकीत भरतो...आणि वरून म्हणतो...सागरदादा एक व्यक्ती आली होती पाच हजार रुपये देऊन गेली...ज्यावेळी सागर गुरुवांची गाडी डीझेल भरायला येईल त्यावेळी या पैशांचे डिझेल त्या गाडीत भरा.म्हणून.आणि हो जाताना माझे नाव त्यांना सांगू नका बरं असे सांगून गेली...आणखीन एक अशीच घटना.ओळख ना पाळख सागरजींच्या माघारी एक व्यक्ती त्यांच्या पत्नीच्या हातात शंभर रुपये ठेवते आणि हे सागरदादांच्या कार्यासाठी घ्या म्हणून सांगते...तेंव्हा खरंच ते पाच हजार असतील किंवा शंभर रुपये... ते केवळ पैसे नसतात तर पैशांच्या रुपात चांगल्या कार्यासाठी मिळालेली ती एक प्रेरणा असते...निराशा बाजूला सरते आणि मन नव्या ऊर्जेने भरते.पुन्हा पुढच्या कामासाठी नवी स्फूर्ती मिळते....असा हा सागरजींचा अनुभव आहे.
                 अलीकडे गावातील शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष पद गावकऱ्यांनी सर्वानुमते सागरजींना दिले आहे..आणि मिळालेल्या या संधीचे सोने करायचे या उद्देशाने अध्यक्ष कसा असावा याचा आदर्श ते आपल्या कामातून घालून देत आहेत... लोकसहभागातून शाळेतील मुलांना जास्तीत जास्त शालेय उपयोगी साहित्य उपलब्ध करून देणे आणि चांगले व्याख्याते,वक्ते मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी शाळेत आणणे असे विविध कार्य अध्यक्ष पदावर राहून ते करत आहेत..तसेच शाळेतील दोन विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शाळेचा संपूर्ण खर्च ते स्वतः करत आहेत... त्याचबरोबर पाच अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करत त्यांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी स्वीकारायची..असा त्यांचा मानस आहे...
               त्यांच्या आतापर्यंतच्या अशा सामाजिक कार्याची दखल घेऊन अनेक संस्थाच्या मार्फत सन्मान व पुरस्कार मिळाले आणि मिळत आहेत...काहीवेळा ते पुरस्कार स्वीकारण्यास तयार होत नाहीत कारण  आपलं कार्यच सर्वश्रेष्ठ मानणारे सागरजी नेहमी अशा प्रसिद्धीपासून स्वतःला दूर ठेवतात...अलीकडेच त्यांना अखिल भारतीय ग्राहक मंच कोल्हापूर यांच्यावतीने मौनी विद्यापीठ गारगोटी येथे  जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे...


                     बोलण्यात नम्रता...वागण्यात सौजन्यता.... लहानथोर कुणाशीही बोलताना पहिल्यांदा मुखात राम कृष्ण हरी हा उच्चार...लहानांची कदर आणि मोठ्यांचा आदर मनापासून करणारे हे व्यक्तिमत्त्व.अतिशय गोड हृदयाचा माणूस...त्यांच्या सहवासात कुणीही राहिलं की हमखास हा गोडवा आपल्याला चाखायला मिळतो...काहीही असो ओठातून नाही तर पोटातून बोलणारा हा माणूस आहे.              स्वतःच्या प्रतिकूल परिस्थितीवर हिमतीने मात करत...समाजकार्याचे व्रत हाती घेतले...आणि आजतागायत ते प्रामाणिकपणे आपले सर्वस्व पणाला लावून हे काम ते करताहेत...आणि यामध्ये मोलाची साथ आहे ती त्यांच्या अर्धांगिनीची......एका आईबापाचा मुलगा एक भाऊ,एक पती, एक पिता ,एक शिष्य आणि एक समजासेवक अशा अनेक रूपातील एक आदर्श जीवन आज सागरजी जगत आहेत..
           खरं तर ऐनवेळी लहान असताना स्वतःच्या भावाने साथ सोडली...आपला वेगळा संसार थाटला...नंतर दारूच्या आहरी गेला..संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर....पण सागरजींनी या स्वतःच्या भावाला मार्गावर आणलेच...त्यांचा संसार सावरलाच भाऊ आज वारकरी झाले आहेत पण समाजातील अशा अनेक बांधवांना आपलेसे करून आपल्या भावाप्रमाणे त्यांचे दारूचे व्यसन सोडायला लावून त्यांना चांगल्या मार्गावर आणले...अनेकांचे या दारूपायी उध्वस्त होणारे संसार वाचवले...कित्येक माताभगिनींच्या कपाळाचे कुंकू त्यांनी मजबूत केले... खरंच पैसा म्हणजे ज्या लोकांना सर्वस्व वाटतो त्या लोकांनी एकदा ह्या व्यक्तीमत्वाकडे जरूर पहावं...जाणून घ्यावं... एका दुर्गम अशा खेडेगावात गरीबीत जन्म घेतलेला,हातावरचे पोट असणारा हा सामान्य माणूस...पण आज असे असामान्य कर्तृत्व करतो..फक्त पैसा असून चालत नाही तर त्यासाठी मनात खूप मोठी जिगर असावी लागते ...मनात आणलं असतं तर कुठेतरी चांगल्याचुंगल्या पगाराची नोकरी करून सुखासमाधानाचा एकट्याचाच संसार थाटला असता...आपल्या बायकामुलांत आनंदात राहता आलं असतं..मग कशासाठी एवढा हट्टाहास ..? कशासाठी एवढी जीवाची धडपड...?पण
हे विश्वची माझे घर
या माऊलींच्या उक्तीप्रमाणे त्यांनी समाजलाच आपले कुटुंब मानले.. माऊलींनी सांगितलंय..
"अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्हीं लोक."
जन्माला आलोय ना तर एकट्याचा नाही अवघ्यांच्या सुखासाठी मी धडपडणार.आहे..मी माझ्या एकट्यासाठी नाही तर संगळ्यांच्यासाठी जगणार आहे.


हा माऊलींच्या विचारांचा वसा आणि वारसा  खऱ्या अर्थाने जगणारा आणि पुढे नेणारा हा माणूस आहे.जो  फक्त स्वतःसाठी जगतो तो कधीच मेलेला असतो पण जो इतरांसाठी जगतो तोच खरा जगतो….आणि हे खरं जगणं सागरजींच्याकडे पाहिल्यानंतर कळतं...धन्य आहे आपले जीवन...आपला हा जीवनप्रवाह म्हणजे निखळ,निर्मळ झऱ्यासारखा आहे... की जीवनाच्या वाटसरुला या आपल्या प्रवाहात आल्यानंतर तृप्तीचा आनंद मिळावा. आणि जीवनाचा खरा मार्ग सापडावा…आपले जीवनकार्य म्हणजे चालते बोलते विद्यापीठ आहे…
का जगावे...?कसे जगावे..? आणि कशासाठी जगावे...? हे सारं काही आपल्याकडून शिकता येतं...खूप काही घेता येतं...शेवटी
आपले हे समाजसेवेचे कार्य पुढे असेच चालू राहो.
आपले विचार,आपल्या संकल्पना पूर्णत्वास जावो..आणि हे सर्व करण्यासाठी आपल्याला व आपल्या परिवाराला निरोगी,उदंड असे आयुष्य मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना... धन्यवाद...

जय हो..!मंगल हो..!!


संवाद साधण्यासाठी संपर्क : 
सामाजिक कार्यकर्ते श्री सागर गुुुुरव.
मोबा - 9146148904


 -किरण सुभाष चव्हाण.
पांगिरे,ता-भुदरगड,जि- कोल्हापूर.
मोबा - ८८०६७३७५२८.

'नववर्षाचे एक कॅलेंडर घेऊन अंध प्रल्हादच्या संघर्षाला बळ देऊ शकता.'





'नववर्षाचे एक कॅलेंडर घेऊन अंध प्रल्हादच्या संघर्षाला बळ देऊ शकता.'
                  
                  वर्षाच्या सरतेशेवटी शहरातून,बाजारपेठेतुन अथवा एखाद्या गल्लीतून अंध व्यक्ती एका हातात काठी व दुसऱ्या आडव्या हातावर कॅलेंडरांची उळी घेऊन फिरत असताना आपल्याला दिसतात.आणि मग संवेदनशील माणसांची आपसूकच पावले त्यांच्याकडील कॅलेंडर विकत घेण्यासाठी वळतात.खरं तर अंध व्यक्तींचे असे कष्ट आणि मुळात त्यांच्याविषयी वाटणारी सहानुभूती यामुळे त्यांच्याकडील कॅलेंडरचा खप होतो ही एक जमेची बाजू आहे...
                  प्रल्हाद दत्तू पाटील ही अशीच एक अंध तरुण व्यक्ती.अंदाजे चाळीसपर्यंत असणारे वय.पाचगांव येथे विरविनायक कॉलनीत महिला मंडळ गिरणीजवळ राहतात.जन्मतः अंधत्व असलेलं. रोज उगवणारा सूर्य त्यांच्या आयुष्यात अंधार घेऊन येतो.लहान असताना त्याांच्या
वडिलांनी आई व या मुलाला सोडून दिले.आणि मग या तान्ह्या लेकराला उराशी कवटाळून आई माहेरी पाचगावमध्ये येऊन राहिली.आई म्हैशी पाळायची.त्यावेळी चार ते पाच म्हैशी घरी होत्या.लहानगा प्रल्हादही आईमागोमाग म्हैशीकडे जायचा.मुळात अंध आणि गरिबी यामुळं शिक्षण घेणं जमलं नाही.अंध मुलगा म्हणून नवऱ्यान जरी  साथ सोडली असली तरी तिच्यातली आई हार मानणारी नव्हती.अगदी हिंमतीने त्या आईने हरेकप्रकारे प्रल्हादला जोपासले.लहानाचे मोठे केले.प्रल्हादही आईला जमेल तशी मदत करायचा.दिवस मागे सरत होते.मायलेकरांची जोडी आनंदाने रहात होती.पण नियतीला हे मान्य नसावं मध्येच आई प्रल्हादला सोडून गेली.हृदय विकाराच्या झटक्याने ती वारली.दुःखाचा डोंगर प्रल्हादवर कोसळला आणि अंध प्रल्हाद मायेविना पोरका झाला.अंधाऱ्या जगातला मायेचा दीपस्तंभ विझला आणि प्रल्हादचे जीवन आणखीनच आतून- बाहेरून अंधकारमय झाले.माय आधाराची काठी होती...माय पुढे आणि पाठी होती.आधाराचे सारे खांब निखळून पडावेत असे झाले.आता जीवनच ओसाड झाले...पण म्हणतात ना 'माय मरो आणि मावशी उरो' आईच्या माघारी मावशीने प्रल्हादला आधार दिला सांभाळ केला. पण त्या मावशीचेही नुकतेच निधन झाले. प्रल्हादचे मामा-मामी ही आज त्याच्याकडे लक्ष देतात. प्रल्हाद स्वतंत्र खोलीत राहतो पण त्याच्या खाण्यापिण्याची सर्व  सोय हे नातलग करतात. आई गेली,मावशी पण गेली या दुःखातून सावरत स्वतःचा धीर खचू न देता प्रल्हाद पुन्हा उभा राहिलाय..आईची जागा आता काठीने घेतली, तीच त्याची सोबतीनं.
                     पण काही का असेना म्हैशीच्या मागे जाण्याची आईची शिकवण शेवटी कामाला आली.प्रल्हादने एक रेडी पाळली होती.रोज तिच्या उसाभरीत तो असायचा.तिच्या खाण्यापिण्याच्या उलाढालीत त्याचा दिवस सरायचा. कोणाच्याही आधाराविना स्वतःच्या शेतातून जमेल तशी वैरणकाडी आणायचा. .दुपारच्या वेळेस रेडीला चारायला सोडणं.विशेष म्हणजे तिला दोरी न लावता बाहेर चारण्यास घेऊन जाणं. प्रल्हादला रेडीचा विशेष लळा लागला होता. असं म्हणायला हरकत नाही की,आईवरच्या प्रेमाची जागा आता त्या मुक्या जनावाराने घेतली आहे. त्याची रेडीही त्याच्या सहवासात माणसाळलेली होती.तो आपल्या रेडीला लाडाने 'रंभा' नावाने हाक मारायचा."रंभा हांई$$" अशी हाळी मारायची पुरशत ती लागलीच त्याच्या जवळ येऊन उभा रहायची.म्हैशीचे शेण काढणे.ते आपल्या शेतात नेऊन त्याच्या शेणी वळणे,कधी म्हैशीचे केस वस्ताऱ्याने कापणे.अशी कामे प्रल्हाद करायचा. पण नियतीला हे नातं ही मान्य नसावं लाडागोडाने जपलेली रंभा सुद्धा अचानक प्रल्हादला सोडून गेली. जवळची म्हैस सुद्धा मरून गेली.प्रल्हाद आता एकटा पडलाय. परंतु त्याने हार मानलेली नाही. स्वतःची दाढी स्वतः करणे.जेवलेली भांडी विसळवून ठेवणे,कपडे धुणे अशी एकंदरीत कामे तो स्वतः करतो. अशाप्रकारे प्रल्हाद स्वावलंबी आहे.
                 वर्षाच्या शेवटी प्रल्हाद दरवर्षी परिसरात कॅलेंडर विकतो.या वर्षीही  त्याने कॅलेंडर विकायला सुरुवात केली आहे.  सकाळी ७ ला घरातून बाहेर पडल्यानंतर कॅलेंडर विकून घरी येण्यास ९-१० वाजतात.रात्रीचे घरी परतताना कधी कोणी गाडीवरुन घरी सोडतात तर कोणी रस्ता दाखवतात. गिऱ्हाईकांच्या हाती कॅलेंडर सोपताना अगदी नम्रपणे प्रल्हाद नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो.पाचगाव परिसरात प्रल्हादची आता ठराविक गिऱ्हाईक तयार झालेत जे दरवर्षी त्याच्याकडून कॅलेंडर घेतात.किंवा असेही काही गिऱ्हाईक आहेत की स्वतःहून प्रल्हादच्या घरी जाऊन खरेदी करतात.
                प्रल्हाद जसा वरून दिसायला साधाभोळा तसा आतूनही.डोळ्यावर घातलेला काळा गॉगल.हातात जाडशीर काठी.खूप नम्र व निरागस स्वभाव.बोलण्यात गोडवा. गाण्याची ही कला अंगात आहे.प्रल्हाद गाणी,अभंग,आरती छानपैकी गातो.
                 प्रल्हादची जिद्द,चिकाटी, मेहनतीच्या बळावर प्रल्हादची जगण्याची लढाई सुरूचं राहणार आहे. अपंगत्वाचे भांडवल करून तो कुणाकडे मदत मागत नाही तर कॅलेंडर विकून किंवा असे छोटेमोठे उद्योग करून स्वाभिमानाने जगू पाहतोय. जीवनाच्या या लढाईत तो एकटा पडलाय. पण ज्याला कोणी नाही त्याला आम्हीं आहोत. प्रल्हाद एकटा नाही तर आपण सर्व त्याच्यासोबत आहोत. चला त्याला हे दाखवून देऊयात आणि जगण्याची हिंमत देऊयात. तसे तर कुठूनही आपण नवीन वर्षाचे कॅलेंडर खरेदी करीतच असतो पण तेच कॅलेंडर आपण प्रल्हादकडून घेऊयात. जेणेकरून प्रल्हादला त्यामाध्यमातून मदतही होईल. हे कॅलेंडर तुमच्या भिंतीवर प्रल्हादच्या संघर्षमय जगण्याची साक्ष देताना तुम्हांला ही जगण्याची प्रेरणा देत राहील आणि तुमच्या प्रतिसादाने  प्रल्हादलाही जगण्याची नवी उमेद मिळत राहील. 

 प्रल्हादकडुन नववर्षाचे कॅलेंडर खरेदी करण्यासाठी....    

संपर्क : प्रल्हाद पाटील पाचगाव.
'मोबा - ७४९९०२९५०५'

- किरण सुभाष चव्हाण 
 (पांगिरे)
मोबा - ८८०६७३७५२८.




-------------------------------------------------------------

ऑडीओ ...


बुधवार, १५ जानेवारी, २०२०

ललितबंध- त्या तिन्हीसांजेला. - किरण चव्हाण.

                           
           
                    त्या तिन्हींसांजेला...
                                                   
                               ...ढळल्या सांजेबरोबर पापण्याही अलगद ढळतात.आणि त्या तिथल्या चाफ्याच्या सावलीत झाडाखाली.... कोमट किरणांत ढळलेली सांज खोलवर आठवत राहते.. तो मवाळ गोळा पुसट डोंगराच्या माथ्यावरून अस्ताला जाताना  कांही क्षणांपुरतीचं अस्तित्व लाभलेली ती उरली सुरली सोनेरी किरणं... सभोवार पसरलेली. शेजारच्या त्या हिरव्यागार गच्च झुडुपवेलींच्या महालातून माघारी वळणाऱ्या किरणांचे कवडसे लुप्त होताना अंधारलेलं ते एकटंदुकटं झुडूप...एका कोपऱ्यातलं भरजरी घनघोर वेळूच बन.त्या तिथे तळ्यातील नितळकाच पाण्यात कमलकळ्या स्वतःला मिटून उभ्या असलेल्या. 


कुठल्याशा घरट्यात परतीची पाखरं जमा होऊन फडफड करत असलेली.आपल्या दमल्या भागल्या पंखाखाली चिमुकल्या पिल्लांना ऊबीला घेताना मायलेकरांच्यात चाललेली चिवचिव.गळून पडलेल्या नाजूक साजूक हिरव्याकंच दांड्याची ताज्या मऊ पाकळी चाफ्याच्या फुलांचा भोवतीभोर पडलेला सडा... 


त्यातलंच एक फुल उचलून तिने माझ्या हातात दिल आणि मोकळ्या सोडलेल्या काळ्याभोर केसांत माझ्या हाताने माळून घेतलं. एका साजिऱ्या फुलाला चिमटीत धरून गोल गोल फिरवत अगदीच त्याला लळा लावत तिचं ते लाडीगोडी लावणं...किंचित माझ्याहून त्या फुलासवे रमलेली ती.माझ्या अधीर मनाला मी कसं समजवावं...?
                                कातरवेळ गडद होताना त्या शांत निरव चाफ्याच्या झाडाखाली अंथरलेल्या चाफ्याच्या फुलांवरची अबोलशी बैठक.


भिडलेल्या नजरेच्या कटाक्षात फक्त एकमेकांच्या एकमेकांनी पुरेपुर भरून घेतलेल्या जागा. डोळे तर तिचे...कोरीव काठांच्या आतला काळांनिळा निशांत डोह...तिच्या त्या पाणीदार डोळ्यातल्या कडकोपऱ्यात साचून राहिलेली ती कातरवेळ...एकट्या दुकट्या त्या शांत नजरेत स्वतःला भरताना कातरभीतीही हवीहवीशी वाटणारी मनात.आणि मग अशावेळी पापण्यांचीही नकोशी झालेली उगाचंच अडसर.पण शेवटी त्या निष्पापाणे हा नजरेंचा डाव उधळला ना..? कुठून कसे घरंगळुन अलगद टपकले तिच्या मऊसूत केसांवर पांढुरके ते इवलेसे फुल...लबाड ..? तिच्या काळ्याभोर केसांच्या भांगेत रुतून बसले अगदी थाटात...  पण एखाद्या मुकुटासारखे शोभत होते तिच्या डोक्यावर...मला हसू फुटलं...आणि मग ती ही लागली ना नकळत हसायला.. मंद वाऱ्याची झुळुकही अधनमधून आमच्यात रेंगाळणारी .तिच्या गालावर अलगद ढळलेली ती नाजूक बट..तिच्याशी  खेळू लागायची वाऱ्याची ती मंद झुळूक...
                              गवताच्या निस्तेज कोवळ्या पात्यावरून कोमल हात मायेने फिरवावा तिने.दुडलेल्या एका निरागस पात्यावर मग रोखावी अखेर शून्यातली नजर.. पाने सळसळतायत ना अधेमधे चाफ्याची.सतारीसारखी वेळूचीही करकर कानाशी भिनत आहे.पुरत्या ढळलेल्या सांजेची किणकिणही कानी गुंज घालतेय आता.अंधार झिरपत आहे ना सर्वदूर..पण तू कुठे चाललीस..? नको...नको...अशी मला तू सोडून दूर जाऊ...भरल्या तिन्हींसांजेला असं मला एकटं टाकून जाणार तू.?  बघ ना  एकवार माााझ्याकडे लपवते 
आहेस का स्वतःला माझ्यापासून...काय तुझ्या डोळ्यांत पाणी.? नको ना गं भरू डोळ्यांत पाणी...नको ना रडू वेडे...,तुझं रडवेलपण बघवेल का मला..?...बघ हं...मी पाहतोय तुझ्या डोळ्यांतील निखळणारे थेंब त्या बिचाऱ्या कोवळ्या फुलांच्या अंगावर टपकताना...बघवेल का गं असं तुझ्या अश्रूंत त्यांना भिजायला...पुरे ना आता  नको ना अशी कासावीस होऊ मलाही कसनुस होतंय गं...
                     .....अंधारले की..कुठे गेलीस...अगं कुठे आहेस तू...?  आता तर इथे होतीस कुठे गेलीस.. कुठे शोधू मी तुला..?....कुठे...........थांब रे वेड्या थांब...थांब ....मिटल्या पापण्यांच्या दाराआड अंधारात किती शोधशील रे तिला..?
उघड ती दारे गच्च मिटलेल्या पापण्यांची...उघड पाहू वाट मोकळी करून दे त्या अश्रूंना...नको रे त्यांना सांजवेळी असे अडवत जाऊ...बिचारे रोज ढासळतायेत अशा सांजेला...मिटल्या पापण्यांआड कुठंवर शोधशील तिला..? नाही भेटावयाची ती तुला... आता जराही ढळू देऊ नकोस पापणी तिन्हींसांजेला.. गेली रे गेली ती लयाला....त्या तिन्हींसांजेला...
                                 




महापूर

                   

                            'महापूर.'
             
                             आभाळच फाटल्याल...वरच्या काळ्या ढगांच्या कप्प्यातन नुसता मुसंडा खाली गळत व्हता.पाऊस बेभान होऊन दंगा घालीता.आज चार दिस झालं धार तुटली नव्हती.रातंदिस नुसता पाऊस मोग्यान वतालता.गल्लीबोळातन,वगळातन वढयासारखं पाणी धुमाळीला पळत व्हतं.बाहेर नुसता त्याचा थयथयाट सुरू व्हता..घराबाहेर कुणीच पडत नव्हतं.घरं तर आकडून बसलेल्या म्हाताऱ्यासारखी एकाकडन गांगरून उभारल्याली.
                              सखा नुसता बाहेरच्या सोप्यात हुंबऱ्यापतोर येरझाऱ्या मारत व्हता..तेज्या मनाची नुसती उलाघाल सुरू व्हती...सखाचा म्हातारा बा आडभीतीला टेकून घोगंडयावर थट्ट होऊन बसल्याला...
सखा 'बा'ला बोलला...
"बा सांजपतोर नदीचा काठ जवळच्या म्हाताऱ्या चीचपाशी आला हुता... मला लई काळजी वाटालीया...पाणी आता गावात शिरायला उशीरबी लागणार नाही बग"

"पोरा तू म्हणतोस ते खरं हाय...माझा जलोम गेला,बरंच पावसाळ बघितलं... पण आसला ह्यो पाऊसकाळ येगळाच म्हणायचा... त्या येळला पाऊस लागायचा लई-लई तर पाटलाच्या चिमणी पतोर नदीचं पाणी यायचं...आता इतक्या जवळ आलंय म्हटल्यावर मला बी काळजी वाटायला लागलीया..."
सखाला काय सुचत नव्हतं.आख्या जलमात एवढा त्यानं कधी पाऊस बघितला न्हव्हता...
                      बाहेरच्या सोप्यात म्हातारा म्हातारी नुसतीच  चितागती व्हवून आडवी पडल्याली... सखा माजघरात आला..सुभद्रा पुढ्यात दोन लेकरं घेऊन,डोळं उघडून नुसती पडून राहिल्याली.लेकराकडनी बघून सखाला लईच काळजी वाटायला लागली.
"काय वो... मला तर लई भ्या वाटून राहीलय...पाणी गावात शिरणारं असं लोकं काय बाय बोलत व्हती." सुभद्रा बोलली तसा सखा मनातल्या मनात आणखीन खचला...तसाच तो काही न बोलता हातरुणावर लवांडला.उशी खाली हात घेतला.नजर वरच्या वल्या खापऱ्यात अडकून पडली...
सुभद्रान उशाचा पेटता दिवा इजीवला... तसा डोळ्यात अंधार शिरला...वरच्या खापरीवर पाऊस नुसता दणाणा आपटत व्हता...सरीवर सर चापून बडवत व्हती आणि नुसता तेजाच आवाज कानात घुमत व्हता.
                     या कुशीवरनं त्या कुशीवर तळमळून तळमळून निम्या रातीला नकाडा सखाचा डोळा लागायला...बाहेर कुणीतरी जोरानं वराडलं
"आर पळा पळा पाणी गावात शिरलं..बाहेर पडा."
ते ऐकूनच सखाच काळीज एकदम चराकल.. झाटदिश्यांन उठून बाहेरच्या सोप्यात आला.. लाईट लावली..आणि समोर बघतोय तर दाराच्या चिरुटीतन पाणी थेट आत ईत व्हतं...एखादा ईषारी नाग आत यावा तसं सखाला वाटू लागलं...खालचा निमा लगसोपा पाण्यानं भरून गेलता...
"पोरा काय रं हे...पाणी घरात शिरलकी." म्हातारा चितागती होऊन बोलला.सुभद्रान तर डोळ्यात पाणी भरलं...म्हातारीच्या हातरुणाजवळ जाऊन ती रडायला लागली...म्हातारी तिला गप करायला लागली.
सखा बोलला..."आता थांबून उपेग नाय...पाणी वर चढायला लागलय..आईबा आवरा...सुभद्रा आवर लेकरासनी उठीव..घे त्यासनी..."
बा..आवरायला हुव कुठं तरी जाऊ... बाहेर पडायलाच हुव.. आणि जराश्यान घर पाण्यानं भरल..."

"व्हय लेकरा पण आता या रातीला कुठं जायाचं"
सखाची आई बोलली.

बाहेर गल्लीत कालवा उसळलेला...जो तो घर सोडून बाहेर पडत व्हता.
सखान गडबड केली...
म्हातारा म्हातारीला पुढं घातली...थोरल्या पोराला सुभद्राच्या हवाली केलं..आणि न्हानगं आपल्याजवळ घेतलं...आता जीव नुसता गोठ्यातल्या मुक्या जीवात अडकून पडल्याला....दोन म्हशी..बैल...नुकताच उपजल्याला लाडका बारका सोन्या..दोन दिसापासन तेच्या अंगात ताप भरल्याला...काय करावं...?  यांच्या जीवाला कसं वाचवावं? पर आपला तरी जीव शाबूत ऱ्हायला पायजे..संग तरी कसं घ्यावं...?पुढं जावाव की माग ऱ्हावं..?. सखाचा जीव तरी वरखाली व्हयालता...येळ नव्हता..पाट्याच्या सांदरीला ठेवल्याला ईळा घेतला आणि सखा गोठ्यात गेला... कचाचा दावी कापली...हुर्द भरलं.. डोळ्यात पाणी साकाळलं...देवाला हात जोडावं तस तेंच्याम्होरं हात जोडून सखा उभा राहिला...
"माझ्या लेकरांनू माफी करा रं ममहापूरला...तुमच्या जिवा वर संसार केला आणि या वक्ताला तुमचा धनी तुम्हाला असं सोडून चालला...मी तरी काय करू रं...मी तरी काय करू...येळचं वंगाळ..आम्ही आमुचा जीव वाचीवतो तुम्हीं तुमचा वाचवा रं आपुला आपणच जीव वाचवायचा..." आणि तिथंच गोरणीत बसून डोक्याला हात लावून सखा हमसून हमसून रडायला लागला.
             येळ दवडून चालणार नव्हती...पाणी वाढत चाललं व्हतं...कंबरला लागलं व्हतं.. गल्लीतली सगळी माणसं एका जागी गोळा झाल्याली...बारकी पोरं आई बाला बिलगून रडत व्हती...काळामेख अंधार...कुणाला कोण वळखत नव्हतं.गल्लीतला जानता बंडातात्या म्होरं व्हवून सांगत होता.
"पोरा वो आपल्याला टेकडावरच्या बिरोबच्या मंदिरात जायला हुव...बायका पोरासनी म्हताऱ्याकोताऱ्यासनी पुढं घालून त्यासनी पयल्यादा सांभाळून न्या..." माणस जिवाच्या भीतीनं कधीच वाटला लागल्याली...डोळ्यात काळामीट अंधार रुतून बसल्याला.. पुढचं मागचं धड दिसत नव्हतं..पाण्यानं तर चहूबाजूनं वेढल्याल...वरून वैरी अंगावर कोसळावा तसा बरसत व्हता.एखादी इज तरी ढगांच्या कप्प्यात नाचली असती तरी..उजेडात थोडं थोडकं दिसलं असत..म्होरच मागचं कायच दिसत नव्हतं. माणसं एकमेकांच्या आधारानं पाण्यातन अंदाजानं वाट काढीत पुढं सरकत व्हती...आपल्या चिल्यापिल्यासनी उराला कवटाळून बायाबापय. कंबरएवढ्या पाण्यातन पाय वडीत व्हती...गावातली तरणी पोरं म्होरं हुन "या बाजूनं या, त्या बगलन या"म्हणून हाका देत सांगत व्हती...हाकेच्या अंदाजानं अंधार कापत वरचा पाऊस झेलत माणसं टेकडावरच्या बिरोबाच्या देवळाकडं धाव घित व्हती...पाण्याला रेटत कसतरी माग काढत माणसं पांदीच्या वाटला लागली...पाणी जरा सरलं आणि दगडा धोंड्याचा रस्ता लागला...आता तर झपापा पावलं पडू लागली...म्हातारा म्हातारी सुभद्राला पुढं घालून सखा मागणं चालत व्हता..सुभद्रा थोरल्या पोराला धरून चालत होती..धाकट्या नकाड्या पोराला सखान खांद्यावर घितल्याल... वयंन जोराचा पाऊस बडवत होता...न्हानगी पोरं... म्हाताऱ्यासकट सगळी माणस उभ्या आंगानं भिजत होती..सखा गडबडीन पावलं उचलत व्हता..पिवरीच्या वळणाला यायला एका कोचीच्या दगडाला सखाला जोराची ठेच लागली...आणि तोंडावर पडता पडता आपला तोल सावरत वरच्या पोराला आवरत सखा खाली बसला...एक जोराची कळ मस्तकात भिनली..डोळ्यात चांदण्या चमचमल्या...अंगठयाच नाकाडा उचलून आंगठा रक्ताबंर झाला...खांद्यावरचं लेकरू रडायला लागलं..पुढं चालणारी माणसं बिचागती होऊन थांबली..
".काय झालं वो का थांबलाईसा..." सुभद्रान काळजीत विचारलं...
तस सखा बोलला..."काय न्हाई..चला चला व्हा तुम्हीं म्होरं.." असं म्हणून दाबून धरल्याला अंगठा सोडून दिला तशीच पायात कळ घेऊन सखा म्होर चालू  लागला...पाय सुदं झालता उचलत नव्हता...रक्तानं रंगलेला पाय नुसता टाचवर टेकत सखा लंगडत चालत व्हता. कळ बेभान होऊन अंगभर नाचत व्हती...डोळ्यांतन टीपं गळत व्हती...कुणाला दुखणं सांगायचं...आतल्या आत कोंबायचं आणि पुढं चालायचं...बिरोबाची टेकडी जवळ आली...देवळातल्या ठावक्याचा तांबूस नकाडा ठिपका नजरेला दिसायला लागला...देऊळ जवळ आल्यालं..काही माणसं पुढं येऊन थांबली व्हती...अजून निमिअर्धी माग वाटलाच व्हती.देवळाचा दरबार गावच्या माणसांनी फुलून गेल्याला.आयाबाया आपल्या लेकरासनी पुढयात घेऊन पदरान त्यांचं आंग पुशीत व्हत्या...
सखानं खांद्यावरच्या पोराला पायरीवर ठेवलं, आणि माटक्यान खाली बसला.सुभद्राला हाळी मारली...
"सुभा...अग पोराला आत घेऊन जा" तशी आत आल्याली सुभद्रा बाहेर आली पोराला जवळ घेतलं..नवऱ्याचा नूर तिनं वळीखला...ठावक्याच्या उजेडात तिनं नवऱ्याचा चेहरा रापला...वेगळीच कळा चेहऱ्यावर दिसली..सखा खूप त्रासून गेल्याला अंगात सनक भरल्यावणी झालत..
तिनं अंगाला हात लावला एवढं वलीचं आंग पर गरम लागलं.
.."आव आंगात ताप भरलाया नवं अस काय झालं तुम्हांसनी.." तीन नवऱ्याच्या हाताला धरून आत आणलं...गाभाऱ्यावजवळच्या ठावक्याच्या दाट उजेडात नेलं आणि बघितलं.. पायाचा अंगठा फुटल्याला रक्ताची धावर अजूनबी सुरू होती...बघून सुभद्राचं सगळं आंगच गळाटून गेलं.पदराचा शेव टरारा फाडला...आणि आंगठ्याभोवती गुंडाळला...आता या येळला काय लावायचं आणि कुठलं वशीध आणायचं...फडक्यातन आबदर ऊगुळ फुटल्यागत रगात हळूच बाहीर ईत व्हतं.लेकाचं हे दुःख डोळ्यानं बघवणार नव्हतं तरी म्हातारा म्हातारी डोळ्यात पाणी आणून सखाकडं बघत व्हती.भोवतीन माणसं जमा झाल्याली सखाला आणि सगळ्यासनी धीर दित व्हती.
                      बाहेर काळ्याकुट रातीला पाऊस टिपणीला पोचला व्हता.. रात लवकर माग सरत नव्हती..माणसांनी वल्याचीब अंगानं उरली सुरली रात कशीतरी बसून काढली...अंगात आदीच पाणी मुरल्याल त्यात गारठा आंगाला झोबंत व्हता. लहानग्या लेकरासनी.. म्हाताऱ्या कोताऱ्यासनी छळत व्हता..माणसं कुडकुडत व्हती.लेकरं आईपुढं रडत कुडत व्हती...आता भगटायला आल्याल...थेंबका जरासाच तुटल्याला जोर वसारल्याला...काळ्या ढगातनं गाळून आल्याला पांढरा उजेड अजून एवढा फेक दिसत नव्हता...
                     सखा देवळाच्या पायरीवरनं आबदर उतरून बाहेर आला....जरा म्होरं व्हवून उघड्या माळावर येऊन खायच्या बाजूवर नदार टाकली....नदीमायेनं गावाला पोटात घेतलं होतं... तांबड्या पाण्यात गावची तांबडी माती एक झाली व्हती.घरं बुडाली व्हती...गावच्या विठ्ठल मंदिराचा कळस तेवढा डोकं वर काढून उभा राहिल्यासारा दिसत व्हता...सखाची नजर त्या पाण्यात दडल्याल आपलं घरटं शोधत व्हती....कुठं आसल माझं घरटं...? कुठं असतील माझी मुकी जनावरं..? कुठं पळून गेला आसल माझा सोन्या...?त्या आगळ  पंगळ पसरलेल्या पाण्याकडं सखा बराच उशीर बघत व्हता....आख्या गावाला गिळून बसल्याला तो महापूर डोळ्यात मावण्यासारखा नव्हता.पायातली आणि उरातली ठसठणारी कळ आता एक झाली व्हती.


                           




     
                         - किरण सुभाष चव्हाण.पांगिरे
                                        - ८८०६७३७५२८.
------------------------------------------------------
पूरग्रस्त भागातील आमच्या शिवम परिवाराची मोहीम या लिंकवर अवश्य https://youtu.be/QTlbhTx4fpk

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...