'महापूर.'
आभाळच फाटल्याल...वरच्या काळ्या ढगांच्या कप्प्यातन नुसता मुसंडा खाली गळत व्हता.पाऊस बेभान होऊन दंगा घालीता.आज चार दिस झालं धार तुटली नव्हती.रातंदिस नुसता पाऊस मोग्यान वतालता.गल्लीबोळातन,वगळातन वढयासारखं पाणी धुमाळीला पळत व्हतं.बाहेर नुसता त्याचा थयथयाट सुरू व्हता..घराबाहेर कुणीच पडत नव्हतं.घरं तर आकडून बसलेल्या म्हाताऱ्यासारखी एकाकडन गांगरून उभारल्याली.
सखा नुसता बाहेरच्या सोप्यात हुंबऱ्यापतोर येरझाऱ्या मारत व्हता..तेज्या मनाची नुसती उलाघाल सुरू व्हती...सखाचा म्हातारा बा आडभीतीला टेकून घोगंडयावर थट्ट होऊन बसल्याला...
सखा 'बा'ला बोलला...
"बा सांजपतोर नदीचा काठ जवळच्या म्हाताऱ्या चीचपाशी आला हुता... मला लई काळजी वाटालीया...पाणी आता गावात शिरायला उशीरबी लागणार नाही बग"
"पोरा तू म्हणतोस ते खरं हाय...माझा जलोम गेला,बरंच पावसाळ बघितलं... पण आसला ह्यो पाऊसकाळ येगळाच म्हणायचा... त्या येळला पाऊस लागायचा लई-लई तर पाटलाच्या चिमणी पतोर नदीचं पाणी यायचं...आता इतक्या जवळ आलंय म्हटल्यावर मला बी काळजी वाटायला लागलीया..."
सखाला काय सुचत नव्हतं.आख्या जलमात एवढा त्यानं कधी पाऊस बघितला न्हव्हता...
बाहेरच्या सोप्यात म्हातारा म्हातारी नुसतीच चितागती व्हवून आडवी पडल्याली... सखा माजघरात आला..सुभद्रा पुढ्यात दोन लेकरं घेऊन,डोळं उघडून नुसती पडून राहिल्याली.लेकराकडनी बघून सखाला लईच काळजी वाटायला लागली.
"काय वो... मला तर लई भ्या वाटून राहीलय...पाणी गावात शिरणारं असं लोकं काय बाय बोलत व्हती." सुभद्रा बोलली तसा सखा मनातल्या मनात आणखीन खचला...तसाच तो काही न बोलता हातरुणावर लवांडला.उशी खाली हात घेतला.नजर वरच्या वल्या खापऱ्यात अडकून पडली...
सुभद्रान उशाचा पेटता दिवा इजीवला... तसा डोळ्यात अंधार शिरला...वरच्या खापरीवर पाऊस नुसता दणाणा आपटत व्हता...सरीवर सर चापून बडवत व्हती आणि नुसता तेजाच आवाज कानात घुमत व्हता.
या कुशीवरनं त्या कुशीवर तळमळून तळमळून निम्या रातीला नकाडा सखाचा डोळा लागायला...बाहेर कुणीतरी जोरानं वराडलं
"आर पळा पळा पाणी गावात शिरलं..बाहेर पडा."
ते ऐकूनच सखाच काळीज एकदम चराकल.. झाटदिश्यांन उठून बाहेरच्या सोप्यात आला.. लाईट लावली..आणि समोर बघतोय तर दाराच्या चिरुटीतन पाणी थेट आत ईत व्हतं...एखादा ईषारी नाग आत यावा तसं सखाला वाटू लागलं...खालचा निमा लगसोपा पाण्यानं भरून गेलता...
"पोरा काय रं हे...पाणी घरात शिरलकी." म्हातारा चितागती होऊन बोलला.सुभद्रान तर डोळ्यात पाणी भरलं...म्हातारीच्या हातरुणाजवळ जाऊन ती रडायला लागली...म्हातारी तिला गप करायला लागली.
सखा बोलला..."आता थांबून उपेग नाय...पाणी वर चढायला लागलय..आईबा आवरा...सुभद्रा आवर लेकरासनी उठीव..घे त्यासनी..."
बा..आवरायला हुव कुठं तरी जाऊ... बाहेर पडायलाच हुव.. आणि जराश्यान घर पाण्यानं भरल..."
"व्हय लेकरा पण आता या रातीला कुठं जायाचं"
सखाची आई बोलली.
बाहेर गल्लीत कालवा उसळलेला...जो तो घर सोडून बाहेर पडत व्हता.
सखान गडबड केली...
म्हातारा म्हातारीला पुढं घातली...थोरल्या पोराला सुभद्राच्या हवाली केलं..आणि न्हानगं आपल्याजवळ घेतलं...आता जीव नुसता गोठ्यातल्या मुक्या जीवात अडकून पडल्याला....दोन म्हशी..बैल...नुकताच उपजल्याला लाडका बारका सोन्या..दोन दिसापासन तेच्या अंगात ताप भरल्याला...काय करावं...? यांच्या जीवाला कसं वाचवावं? पर आपला तरी जीव शाबूत ऱ्हायला पायजे..संग तरी कसं घ्यावं...?पुढं जावाव की माग ऱ्हावं..?. सखाचा जीव तरी वरखाली व्हयालता...येळ नव्हता..पाट्याच्या सांदरीला ठेवल्याला ईळा घेतला आणि सखा गोठ्यात गेला... कचाचा दावी कापली...हुर्द भरलं.. डोळ्यात पाणी साकाळलं...देवाला हात जोडावं तस तेंच्याम्होरं हात जोडून सखा उभा राहिला...
"माझ्या लेकरांनू माफी करा रं ममहापूरला...तुमच्या जिवा वर संसार केला आणि या वक्ताला तुमचा धनी तुम्हाला असं सोडून चालला...मी तरी काय करू रं...मी तरी काय करू...येळचं वंगाळ..आम्ही आमुचा जीव वाचीवतो तुम्हीं तुमचा वाचवा रं आपुला आपणच जीव वाचवायचा..." आणि तिथंच गोरणीत बसून डोक्याला हात लावून सखा हमसून हमसून रडायला लागला.
येळ दवडून चालणार नव्हती...पाणी वाढत चाललं व्हतं...कंबरला लागलं व्हतं.. गल्लीतली सगळी माणसं एका जागी गोळा झाल्याली...बारकी पोरं आई बाला बिलगून रडत व्हती...काळामेख अंधार...कुणाला कोण वळखत नव्हतं.गल्लीतला जानता बंडातात्या म्होरं व्हवून सांगत होता.
"पोरा वो आपल्याला टेकडावरच्या बिरोबच्या मंदिरात जायला हुव...बायका पोरासनी म्हताऱ्याकोताऱ्यासनी पुढं घालून त्यासनी पयल्यादा सांभाळून न्या..." माणस जिवाच्या भीतीनं कधीच वाटला लागल्याली...डोळ्यात काळामीट अंधार रुतून बसल्याला.. पुढचं मागचं धड दिसत नव्हतं..पाण्यानं तर चहूबाजूनं वेढल्याल...वरून वैरी अंगावर कोसळावा तसा बरसत व्हता.एखादी इज तरी ढगांच्या कप्प्यात नाचली असती तरी..उजेडात थोडं थोडकं दिसलं असत..म्होरच मागचं कायच दिसत नव्हतं. माणसं एकमेकांच्या आधारानं पाण्यातन अंदाजानं वाट काढीत पुढं सरकत व्हती...आपल्या चिल्यापिल्यासनी उराला कवटाळून बायाबापय. कंबरएवढ्या पाण्यातन पाय वडीत व्हती...गावातली तरणी पोरं म्होरं हुन "या बाजूनं या, त्या बगलन या"म्हणून हाका देत सांगत व्हती...हाकेच्या अंदाजानं अंधार कापत वरचा पाऊस झेलत माणसं टेकडावरच्या बिरोबाच्या देवळाकडं धाव घित व्हती...पाण्याला रेटत कसतरी माग काढत माणसं पांदीच्या वाटला लागली...पाणी जरा सरलं आणि दगडा धोंड्याचा रस्ता लागला...आता तर झपापा पावलं पडू लागली...म्हातारा म्हातारी सुभद्राला पुढं घालून सखा मागणं चालत व्हता..सुभद्रा थोरल्या पोराला धरून चालत होती..धाकट्या नकाड्या पोराला सखान खांद्यावर घितल्याल... वयंन जोराचा पाऊस बडवत होता...न्हानगी पोरं... म्हाताऱ्यासकट सगळी माणस उभ्या आंगानं भिजत होती..सखा गडबडीन पावलं उचलत व्हता..पिवरीच्या वळणाला यायला एका कोचीच्या दगडाला सखाला जोराची ठेच लागली...आणि तोंडावर पडता पडता आपला तोल सावरत वरच्या पोराला आवरत सखा खाली बसला...एक जोराची कळ मस्तकात भिनली..डोळ्यात चांदण्या चमचमल्या...अंगठयाच नाकाडा उचलून आंगठा रक्ताबंर झाला...खांद्यावरचं लेकरू रडायला लागलं..पुढं चालणारी माणसं बिचागती होऊन थांबली..
".काय झालं वो का थांबलाईसा..." सुभद्रान काळजीत विचारलं...
तस सखा बोलला..."काय न्हाई..चला चला व्हा तुम्हीं म्होरं.." असं म्हणून दाबून धरल्याला अंगठा सोडून दिला तशीच पायात कळ घेऊन सखा म्होर चालू लागला...पाय सुदं झालता उचलत नव्हता...रक्तानं रंगलेला पाय नुसता टाचवर टेकत सखा लंगडत चालत व्हता. कळ बेभान होऊन अंगभर नाचत व्हती...डोळ्यांतन टीपं गळत व्हती...कुणाला दुखणं सांगायचं...आतल्या आत कोंबायचं आणि पुढं चालायचं...बिरोबाची टेकडी जवळ आली...देवळातल्या ठावक्याचा तांबूस नकाडा ठिपका नजरेला दिसायला लागला...देऊळ जवळ आल्यालं..काही माणसं पुढं येऊन थांबली व्हती...अजून निमिअर्धी माग वाटलाच व्हती.देवळाचा दरबार गावच्या माणसांनी फुलून गेल्याला.आयाबाया आपल्या लेकरासनी पुढयात घेऊन पदरान त्यांचं आंग पुशीत व्हत्या...
सखानं खांद्यावरच्या पोराला पायरीवर ठेवलं, आणि माटक्यान खाली बसला.सुभद्राला हाळी मारली...
"सुभा...अग पोराला आत घेऊन जा" तशी आत आल्याली सुभद्रा बाहेर आली पोराला जवळ घेतलं..नवऱ्याचा नूर तिनं वळीखला...ठावक्याच्या उजेडात तिनं नवऱ्याचा चेहरा रापला...वेगळीच कळा चेहऱ्यावर दिसली..सखा खूप त्रासून गेल्याला अंगात सनक भरल्यावणी झालत..
तिनं अंगाला हात लावला एवढं वलीचं आंग पर गरम लागलं.
.."आव आंगात ताप भरलाया नवं अस काय झालं तुम्हांसनी.." तीन नवऱ्याच्या हाताला धरून आत आणलं...गाभाऱ्यावजवळच्या ठावक्याच्या दाट उजेडात नेलं आणि बघितलं.. पायाचा अंगठा फुटल्याला रक्ताची धावर अजूनबी सुरू होती...बघून सुभद्राचं सगळं आंगच गळाटून गेलं.पदराचा शेव टरारा फाडला...आणि आंगठ्याभोवती गुंडाळला...आता या येळला काय लावायचं आणि कुठलं वशीध आणायचं...फडक्यातन आबदर ऊगुळ फुटल्यागत रगात हळूच बाहीर ईत व्हतं.लेकाचं हे दुःख डोळ्यानं बघवणार नव्हतं तरी म्हातारा म्हातारी डोळ्यात पाणी आणून सखाकडं बघत व्हती.भोवतीन माणसं जमा झाल्याली सखाला आणि सगळ्यासनी धीर दित व्हती.
बाहेर काळ्याकुट रातीला पाऊस टिपणीला पोचला व्हता.. रात लवकर माग सरत नव्हती..माणसांनी वल्याचीब अंगानं उरली सुरली रात कशीतरी बसून काढली...अंगात आदीच पाणी मुरल्याल त्यात गारठा आंगाला झोबंत व्हता. लहानग्या लेकरासनी.. म्हाताऱ्या कोताऱ्यासनी छळत व्हता..माणसं कुडकुडत व्हती.लेकरं आईपुढं रडत कुडत व्हती...आता भगटायला आल्याल...थेंबका जरासाच तुटल्याला जोर वसारल्याला...काळ्या ढगातनं गाळून आल्याला पांढरा उजेड अजून एवढा फेक दिसत नव्हता...
सखा देवळाच्या पायरीवरनं आबदर उतरून बाहेर आला....जरा म्होरं व्हवून उघड्या माळावर येऊन खायच्या बाजूवर नदार टाकली....नदीमायेनं गावाला पोटात घेतलं होतं... तांबड्या पाण्यात गावची तांबडी माती एक झाली व्हती.घरं बुडाली व्हती...गावच्या विठ्ठल मंदिराचा कळस तेवढा डोकं वर काढून उभा राहिल्यासारा दिसत व्हता...सखाची नजर त्या पाण्यात दडल्याल आपलं घरटं शोधत व्हती....कुठं आसल माझं घरटं...? कुठं असतील माझी मुकी जनावरं..? कुठं पळून गेला आसल माझा सोन्या...?त्या आगळ पंगळ पसरलेल्या पाण्याकडं सखा बराच उशीर बघत व्हता....आख्या गावाला गिळून बसल्याला तो महापूर डोळ्यात मावण्यासारखा नव्हता.पायातली आणि उरातली ठसठणारी कळ आता एक झाली व्हती.
- किरण सुभाष चव्हाण.पांगिरे
- ८८०६७३७५२८.
------------------------------------------------------
पूरग्रस्त भागातील आमच्या शिवम परिवाराची मोहीम या लिंकवर अवश्य https://youtu.be/QTlbhTx4fpk
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा