फॉलोअर

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०२२

माझा बाप आणि रुडीयार्ड किपलिंग यांची कविता. - किरण चव्हाण.



 

माझा बाप आणि रुडीयार्ड किपलिंग यांची कविता.

                                  आजचा दिवस एक विलक्षण योगायोग घेऊन सुरू झाला. भल्या पहाटेच्या समयी मनपरिवर्तनाचा झालेला साक्षात्कार हा मला अचंबित करणारा होता. याला मानवी जीवनातील एक चमत्कृती म्हणूया की, एका दीर्घ चिंतनाचा जगण्याच्या अर्थाशी घातलेला मेळ म्हणूया. ते कसं ठरवावं.?  ही घटना सांगण्याच्या अगोदर अर्थातच माझ्या मानसिक आंदोलनाची थोडी पार्श्वभूमी लक्षात घ्यावीच लागेल.किंबहुना मला ती परखडपणे व्यक्त केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. जगणं म्हणजे समुद्राच्या लाटेसारखं चढउतार घेत किनाऱ्याला लागत असतं. तसंच जगण्याच्या चढउतारात मध्येचं घुटमळत असलेला मी. जीवनातील अशा काही घडामोडींनी सहनशक्तीच्या पलीकडे गेलेली दुभंगलेल्या मनाची नकारात्मक अवस्था. पालापाचोळ्यासारख्या विस्कटून सैरभैर झालेल्या भावना. काही केल्या ताबा मिळवता येणार नाही इतकं मोकाट सुटलेलं मन. अधीर झालेल्या मनाला संयमाच्या कोणत्या धाग्याने करकचून बांधावं अशी केविलवाणी झालेली अवस्था. सद्सविवेक बुद्धीची हरपलेली शुद्ध. वरून जरी निर्मळ शांतता दिसली तरी अविचारीपणाचे असंख्य विखारी डंख मूकपणे सोसत असलेलं आतून कमालीचं अशांत मन. अशी एक प्रकारची मनाची वादळी अवस्था. मानवी मन म्हणजे चित्रविचित्र भावनांचा आणि विचार,अतिविचारांचा माजलेला कल्लोळचं असतो म्हणा. 

                              आज विजयादशमीची शाळेला सुट्टी असल्यामुळे संपूर्ण दिवस घरीच होतो. चांगला सणाचा भरला दिवस. याचा आनंद घ्यायचा राहू द्या बाजूलाच. माझं मन एका वेगळ्याच वादळाच्या कचाट्यात सापडल्यासारखं आपल्याच भोवतीने फिरत होतं. आजूबाजूच्या परिस्थितीपासून अनभिज्ञ असलेलं मन. एखादं चांगलं पुस्तक वाचावं, नाही तरी कुठे फिरायला जावं काहीच करू वाटेना. बरं मोबाइलवर काही चांगलं बघावं तरी तिथेही मन कुठंच रमत नव्हतं, नुसत्या विचारांच्या तंद्रीत धुदंपणे सगळा दिवस झोपून काढला झोप तरी कुठली लागतेय म्हणा लोळूनचं काढला..

                           अशी सगळी आदल्या दिवशीची पार्श्वभूमी. रोजच्या सवयीप्रमाणे आज भल्या पहाटे उठून सव्वा पाचला फिरावयास बाहेर पडलो. पहाटेच्या अगोदरचा काळाकुट्ट गडद अंधार आजूबाजूला पसरलेला,एकप्रकारची निरव शांतता, वातावरणातील बोचरा गारवा आणि मी रस्त्याने एकटाचं चालत असलेलो. मनात विचारांचा हल्लकल्लोळ माजलेला आणि मग या घालमेलीतून सुटका करण्यासाठी सवयीप्रमाणे स्वसंवाद साधत म्हणजे स्वतःशी संवाद करत पुढे चालणे सुरू होते. जगण्याच्या या वळणावर अति जटिल झालेले प्रश्न सोडवताना खरंच माझी दमछाक होत होती. याच चिंतनात डुबलो असताना बापाच्या जगण्याची तीव्रतेने आठवण झाली.  बापाच्या अस्तित्वाची किंमत मला जाणवत होती.

                          बाप..!  बाप असताना नाही तर गेल्यानंतर खऱ्या अर्थाने अधिक कळतो. बाप असताना मला कळायचाच राहून गेला. आणि आता कळत असताना बाप जवळ नाही. बापाविना पोरका असलेला आजचा मी. डोळ्यांत, मनात आठवणीतला बाप घेऊन वास्तवात बापाविना जगतोय खरा पण क्षणाक्षणाला बाप आठवत राहतो, मनातल्या आठवणींच्या दाटीन गळ्यात हुंदका दाटत राहतो. 'बाप' या दोन अक्षरांच्या नावानं टचकन पाणी येतं याच्यापलिकडे आज माझ्या हातात बाप उरला नाही.  मूकपणे अश्रूं गाळण्याइतपत कशानेही बाप व्यक्त करता येत नाही.पण एक खरंय मेलेली माणसं जगासाठी दूर गेलेली असतात. पण जिवाभावाच्या माणसांच्या अधिक ती जवळ आलेली असतात. फरक एवढाच असतो. फक्त ती देहानं जरी नसली तरी त्यांच्या आठवणींच्या अस्तित्वाचा सुगंध मनाच्या कुपीत दरवळत असतो.प्रत्येक श्वासात,ध्यासात भरलेला असतो.

                        हे गुपित सहसा उघड करायला नको हवं होतं. तरीही ते का करतोय कुणास ठाऊक ? बापाला भेटण्याची, त्याच्याशी हितगुज करण्याची एक चांगली जागा मला सापडलीय. ती म्हणजे एकांत. बापाची आणि माझी भेट घालून देतो तो म्हणजे हा एकांत आणि सोबतचा हा काळामिट्ट अंधार. मी बेभान होऊन बोलत राहतो बापाशी. त्याच्यावाचून एकटेपणाच्या जाणिवेने आकांत मांडतो. त्या काळ्याकुट्ट अंधाराच्या पोटात बापाच्या ओढीनं रडत राहतो अंदाधुंद ओक्साबोक्शी. आणि शेवटी माझे अश्रू माझे मीच पुसून मनाची समजूत घालून त्या अंधारातून बाहेर पडतो आणि पुन्हा सामील होतो या झगमगीत दुनियेतील माणसांच्या गर्दीत. पुन्हा बापावीना ओसाड जीणं सुरू होतं. या अगोदर पुढे जाताना मागे बाप नावाचा आधार होता.जग जरी फिरून आलो तरी बापाजवळ मुक्काम होता. जगण्याच्या वाटेवर चालताना मागे बापपणाच्या ऊर्जेचा स्रोत होता. आता मागे वळून पाहिलं की बाप नाही. या जगण्याच्या प्रवाहात पुढे वाहवत जाताना मागे बाप नावाचे उगमस्थान नाही. 

                    बाळ पावलं टाकत असताना आई हळुवार हात सोडवून घेते कारण बाळांन स्वतःहून चालावं.  आता बापानं मला स्वतःच्या हिंमतीवर जगण्यासाठी सोडून दिलंय असं वाटतं. आणि मग जगण्याच्या या संघर्षात ती हिंमत सिद्ध करताना माझा कस लागतोय. मला भेटलेली चांगली, वाईट माणसं. मनाला सकारात्मक ऊर्जा देणारी तर कधी  मनाला नकारात्मकतेच्या खाईत लोटणारी माणसं. आपला वापर करून घेणारी, गैरसमज पसरवून देणारी, सहनशिलतेचा अंत पाहणारी, अनादर करणारी, अशी कितीतरी माणसं. कधी दूरची  तर कधी जवळची माणसं देखील याला अपवाद ठरू शकत नाहीत. जीवापाड जपलेल्या,जीव लावलेल्या आपल्या प्रेमाच्या माणसांच्याकडूनही मनांवर आघात होत राहतात. खरं तर माणसाच्या उभारणीला आणि ढासळण्याला भोवतालच्या परिघातली माणसचं कारणीभूत असतात. जणू ही माणसं पचवण्यासाठीच जीवनातील शक्ती खर्च होतेय. पण या सर्वांना पुरून उरण्याची शक्ती देणारा बाप ज्यावेळी जवळ असतो त्यावेळी अशी माणसं क्षुल्लक वाटतात. पण बापचं नसेल तर स्वतःलाचं क्षुल्लकपणाची तीव्र जाणीव होते. नुसत्या 'बाप' नावाच्या दोन अक्षरांचं पाठबळ काय असतं ना ? ते असं माणसांनी भरलेल्या जगात बापाविना एकटं पडल्यावर कळतं.

                    माणसांच्या गर्दीत अक्षरशः जीव गुदमरून जातो. जगण्याच्या या वास्तवतेला भिडताना मी कुठेतरी कमी पडण्याची सत्यता मला नाकारता येणार नाही. संपूर्ण शक्ती एकवटून जगण्याची ही लढाई पूर्णपणे ताकदीने लढावी असं वाटत नाही. मग मी खरंच दुबळा आहे का ? साध्या, सरळपणाने इथे जगताचं येणार नाही का.?  आणि खरंच जगण्याची ही लढाई शेवटपर्यंत मला लढता येईल का  ? जगण्याची हिंमत शेवटपर्यंत टिकवून ठेवता येईल का..? अशा प्रश्नांची उत्तरं शोधताना आतल्याआत घुसमट होत राहते.

                    अशावेळी शेवटी बापच आठवत राहतो.  जो बाप ज्याला डोळ्याने धड दिसत नव्हतं. चालताना धडपडत जायचा,चाचपडत काम करायचा आणि कुटुंब चालवायचा तो माझा बाप पण कुठल्याही संकटाला झुकला नाही, वाकला नाही शेवटपर्यंत जगण्याचा हा संघर्ष चिवटपणे नी चिकाटीने पेलत राहिला. जो बाप ज्याला दृष्टी नव्हती पण ज्याने जगण्याला एक दृष्टिकोन दिला होता. कुठल्याही बाक्या कठीण प्रसंगात बापाचा असणारा करारी बाणा. जवळ काही नसताना जगण्याची ही लढाई न कुरकुरता स्वाभिमानाने लढत राहिला.ज्या बापाने स्वतःच्या जगण्यातून जगण्याचा असा धडा मला घालून दिला होता.

                       आणि आज माझ्याकडे सर्व काही असून जगण्याच्या या लढाईत माझी एवढी हतबलता का व्हावी ? कशासाठी ?  आताच्या वेळेला बापाचं जगणं स्पष्टपणे माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं... बापाच्या नजरेतून स्वतःला पारखु लागलो. जणू बाप आज मला या अवस्थेत पाहतोय. माझ्या बापाला माझी अशी हतबल झालेली अवस्था पाहवेल ? नाही कदापि नाही.  असा लेक माझ्या बापाला पसंत नाही. संघर्ष,वादळं येणारचं आहेत पण त्याला हिंमतीने सामोरे जाण्याची तयारी ठेवणारा लेक या बापाला हवा आहे. .स्वतःच्या बदलाची कुठे तरी आतून तीव्र जाणीव होऊ लागली.

                         आता एक बाप नावाची अव्यक्त शक्ती माझ्या भोवतीने पिंगा घालत होती. बाप शरीराने माझ्याजवळ नाही पण त्याचे विचार,संस्कार आजही मला काहीतरी शिकवण देत होते. या गुरफटलेल्या वादळातून बाहेर काढण्यासाठी मनातून उचंबळून बाहेर येत होते. बापाची मनातली प्रतिमा,त्याचे विचार आठवून फक्त एका वाक्याच्या प्रेरणेंने नुकतंच जीवन बदलून टाकणारं एक यशस्वी वळण मी घेतलं होतं. तेच वाक्य मला पुन्हा पुन्हा आठवण करून देत होतं ते वाक्य होतं, "लेका रडायचं नाही आता लढायचं." 

                       आणि कालपर्यंत नकारात्मकतेच्या वादळात सापडलेलं माझं मन पुन्हा लढण्यासाठी सज्ज होऊ लागलं. मनातलं भिरभिरणार वादळ आता कुठे शांत होत होतं. शेवटी हेच खरं मनातल्या नकारात्मकतेला मनातून उलथून टाकण्याची तयारी मनातच करावी लागते. बाहेरून केलेल्या उपचारांचा परिणाम हा तत्काळ असू शकतो. आता अंधार नाहीसा होऊन नुकताच पहाटेचा उगम झालेला, चारी दिशा उजळलेल्या होत्या. अंधाऱ्यारात्रीनंतरचा उष:काल हा नकारात्मक अंधारानंतर निपजणारा सकारात्मक प्रकाश या बदलाच्या सत्याला दुजोरा देत होता. ज्या अशांत मनाने घराबाहेर पडलो त्याचं शांत प्रसन्न मनाने आता मी घराकडे परतत होतो.

                 आज शाळेत  दिवसभर करावयाच्या अध्यापनाची तयारी  म्हणून अभ्यासाला बसलो. प्रथम दहावीचंच पुस्तक हातात घेतलं. नियोजनाप्रमाणे आज युनिट 3.1 मधील If ही कविता मुलांना शिकवायची होती. आणि ती अभ्यासताना हा काय दुर्मिळ योगायोग म्हणायचा ?  अभ्यास करताना लक्षात आले की, युनायटेड किंगमडमधील नोबेल परिषोतिक विजेता महान लेखक,तत्वज्ञ रुडीयार्ड किपलिंग यांची If ही कविता म्हणजे एका बापाने आपल्या मुलाला कसं जगावं यासाठी केलेला बोध आहे. मी अगदी भारावून ती कविता अभ्यासत होतो. पहाटेचा प्रसंग आणि आताची ही कविता. ह्या विलक्षण योगायोगाने अक्षरशः मी थक्क झालो. या कवितेचा थोडक्यात संदर्भ असा. या कवितेच्या माध्यमातून बाप आपल्या मुलाला सांगतो आहे....

                      'जेव्हा तुझ्यावर सर्वजण रागावतील, तुला दोष देतील तेंव्हा तू तुझे डोके शांत ठेव. सर्वजण तुझ्यावर अविश्वास दाखवतील त्यावेळी तुझा तुझ्यावर विश्वास असला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत वाट पहा. आणि वाट पाहताना थकून जाऊ नकोस.संयम राखून ठेव,तुझ्याविषयी कोणी असत्य बोललं,तुझ्याविषयी गैरसमज पसरवले  तरी तू शांत रहा. कुणी तुझा तिरस्कार करतील,अपमान करतील त्याचा तुझ्या मनावर नकारात्मक परिणाम होऊ देऊ नकोस, आनंदाने हुरळून जाऊ नको अथवा दुःखाने खचून जाऊ नको. स्थितप्रज्ञ रहा, तू कष्टाने मेहनतीने मिळालेली एखादी गोष्ट नष्ट झाली तरी तुझ्या क्षमतेनुसार तू त्याला नवीन आकार दे, ती गोष्ट नव्याने निर्माण कर. शत्रू असो अथवा तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारे लोक कुणीही तुला दुखावले तर त्यांना समान वागणूक दे.वेळेचं मूल्य लक्षात घेऊन येणाऱ्या प्रत्येक क्षणांचा तू जर सदुउपयोग केलास तर आणि तरंच हे जग तुझे असेल आणि इथली प्रत्येक वस्तू तुझी असेल. शेवटी तुला एक उत्तम आणि परिपूर्ण माणूस बनायचं आहे लक्षात असू दे. असा एका बापाकडून आपल्या मुलाला सकारात्मक महान संदेश देणारी ही कविता.'

            

                 पहाटेच्या अंधारात बापाच्या आठवणीतील सखोल चिंतनात मिळालेला सार जणू या कवितेतून प्रकट होत होता. खरंच मी आतून भारावून गेलो होतो.  ही कविता वर्गात मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवली. एका बापाचा संदेश मुलांपर्यंत पोहोचवणारा मी दुवा झालो. चार भिंतीच्या आत रुडीयार्ड किपलिंग यांची कविता मुलांना मी शिकवताना जीवनाचा आणि शिक्षणाचा कसा मेळ घातला गेला आहे हे माझ्याच अनुभवातून सिद्ध झाले होते. शिक्षण म्हणजे जीवनाचे प्रतिबिंब असते ते खरेच. शाळेबाहेरच्या जगात एक माणूस म्हणून मी जे काही अनुभवतोय,मी ज्या समस्यांना तोंड देत आहे.त्या समस्येचं निराकरण मला करून पुढे जावं लागतं. पण भविष्यात अशाच प्रसंगांना आपल्या विद्यार्थ्यांनाही तोंड द्यावे लागणार आहे त्यावेळी तो आपली समस्या सोडवण्यासाठी समर्थ असला पाहिजे त्याची पूर्वतयारी म्हणून आपले शिक्षण हे आपल्या जीवनाच्या पैलूंना जोडले आहे याचे समाधान वाटले. किपलिंग जे ज्ञान कवितेच्या माध्यमातून मुलांना सांगू पाहतात अगदी याच ज्ञानाचा साक्षात्कार  भल्या पहाटे माझ्या बापाच्या प्रत्यक्ष जगण्याच्या स्मरणातून मला झालेला होता. यातला योगायोगाचा भाग सोडला तर आपले जीवन,समस्या,प्रश्न आणि त्याला मिळणारं उत्तर हे सारखंच असतं हे कळून येतं.

                           एकीकडे मला सोडून गेलेला शिक्षणाचा कसलाही गंध नसलेला माझा बाप. आणि दुसरीकडे नोबेल पारितोषिक प्राप्त महान लेखक रुडीयार्ड किपलिंग यांची if ही कविता. जेव्हा एका लेकाच्या भूमिकेतून मी ज्यावेळी या दोन्ही गोष्टींच्याकडे पाहतो त्यावेळी माझा बाप आणि रुडीयार्ड किपलिंग यांची ही कविता मला एकाच ठायी दिसते. दोघांच्यातील जगण्याचं तत्वज्ञान सारखंच होतं. फक्त फरक एवढाच की, किपलिंगने बापाचं सांगणं कवितेतून मांडलं आणि माझ्या बापानं ते स्वतःच्या जगण्यातून सांगितलं होतं. म्हणजे बापाच्या प्रत्यक्ष जगण्यातून मला ते कळालं होतं. शेवटी शिक्षण म्हणजे तरी काय.?  जगण्याला अर्थ प्राप्त करून देणारी अशी विद्या की जी, कुठल्या ग्रंथातून, कवितेतून व्यक्त होते तर कुणाच्या जगण्याच्या अनुभवातून. अशी जीवन जगण्याची विद्या आपल्या मुलाला सांगणारा प्रत्येक बाप हा आपल्या मुलांसाठी जितेजागते विद्यापीठ असतो शेवटी हेच खरं..!


- किरण सुभाष चव्हाण.

मोबा - ८८०६७३७५२८







'आपल्याला या लेखाविषयी काय वाटते खालील कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया जरूर लिहा.'

मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०२२

आर्दाळ शाळेत शिक्षक-पालक मेळावा उत्साहात संपन्न.



आर्दाळ शिक्षक-पालक मेळावा उत्साहात संपन्न.


                       माध्यमिक विद्यालय आर्दाळ शाळेत शिक्षक-पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. सरस्वती प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.शाळेचे मुख्याध्यापक यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्राथमिक शिक्षक डॉ.मारुती डेळेकर यांचा कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.त्याचसोबत एन.एम.एम.एस व सारथी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक शरद पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले. शाळेचे माजी मुख्याध्यापक शंकर पावले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे डॉ.मारुती डेळेकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक व पालकांची भूमिका कशी असायला हवी याबद्दल आपले विचार व्यक्त केले. यानंतर शिक्षक व पालक यांच्यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती,अभ्यास, स्वयंअध्ययन याबाबत चर्चा झाली.  कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक दशरथ अस्वले यांनी शिक्षक-पालक मेळाव्यास मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण लोहार यांनी केले तर सुहास कोंडुसकर यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...