फॉलोअर

गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२

माझिया जातीचे मज भेटो कोणी...जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..




 आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री.शरद पाटील सर यांचा आज जन्मदिन त्यानिमित्त...


माझिया जातीचे मज भेटो कोणी...

            

              शाळा म्हणजे दुसरं कुटुंब असतं आणि या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख असतात ते म्हणजे मुख्याध्यापक. खरं तर मुख्याध्यापक हे वडीलकीची भूमिका निभावत असतो. त्यांच्यावर शाळा-विद्यार्थी, शिक्षक-कर्मचारी यांची जबाबदारी असते. अर्थात या सर्वांच्या बाप हृदयाची जागा त्याला घ्यावी लागते. त्यांची काळजी वहावी लागते. खरं तर अशा सर्वांच्या बापपणाचं दुसऱ्यांदा भाग्य मिळणारा मुख्याध्यापक हा जसा भाग्यवान माणूस असतो.तसा बाप मायेच्या हृदयाचा मुख्याध्यापक लाभणंहे त्या शाळेचं भाग्य असतं. आणि असाच आमच्या शाळेचे बाप हृदयाचे कुटुंबप्रमुख मुख्याध्यापक म्हणजे आमचे श्री. शरद पाटील सर.

                अगदी जून महिन्यात मी बदली होऊन या शाळेत दाखल झालो. तसा सुरुवातीपासूनचं सरांचा आणि माझा परिचय होता अनेकदा संवाद व्हायचा. पण प्रत्यक्षात ज्यावेळी सर मुख्याध्यापक म्हणून लाभले त्यावेळी माझिया 'जातीचे' मज भेटो कोणी ही माझ्या मनाची आस पूर्ण झाली. इथे आल्यानंतर काही कालावधीतचं सरांनी मला आपल्या कुटुंबात  मिळून मिसळून घेत आपलंसं केलं. 

                प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आणि मनासारखं काम करण्याचा आनंद मिळू लागला. दडपणविरहित मनमोकळेपणाने काम करण्याचे समाधान मिळते आहे. सरांचे सूक्ष्म निरीक्षण असते. ही गोष्ट मला प्रामुख्याने जाणवली. शाळेच्या लिहिलेल्या एखाद्या बातमीतील शब्दापासून, टाचणवहितील नोंदी आणि हजेरीपटावरील सरासरी पर्यंत सर सुधारणा लक्षात आणून देतात. आजपर्यंत आम्हीं जे काही उपक्रम राबवित आहोत कार्यक्रम घेत आहोत याच्या मागे मुख्याध्यापक सरांची आम्हांला प्रेरणा मिळत असते. कोणताही कार्यक्रम,उपक्रम घेण्याला सरांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतो. किंबहुना स्वतःहुन शालेय उपक्रम घेण्यास प्रेरणा देत असतात. एक आठवण अशी की, फलकलेखन करताना बाजूला उभा राहून ते पहात होते. आणि आपल्या जुन्या आठवणी सांगताना त्यांनी सांगितले "सर लोहार सर, आम्हीं पडेल ते काम केलं विद्यार्थ्यांसंगे विद्यार्थी झालो, कोणत्याही कामाला मागे सरलो नाही." यातून त्यांना हेच सांगायचे होते की कोणत्याही कामाला नाही म्हणायचे नाही.

                   एकदा मी एका शाळेत व्याख्यानाला गेलो होतो त्या सायंकाळी सरांचा फोन आला सरांनी फोनवरून विचारले " सर व्याख्यान कसे झाले.?" म्हणजे एवढी आपली दखल घेतली जाणं  ही त्या कार्याला दिलेली प्रेरणा असते. कालचाच एक प्रसंग असा एका छोट्या व्हिडीओबद्दल सरांनी प्रतिक्रिया नोंदवली ' सर खूप छान झालाय व्हिडीओ' . असे कौतुकाचे ते दोन शब्द. पण त्याचा अर्थ असा होता की अशा छोट्या छोट्या कृतीतून प्रेरणा देणं पुरेसं असतं जेणेकरून त्या कामाचे सार्थक झाल्यासारखे वाटते.मोठ्या व्यक्तीकडून आपलं कौतुक होणं तो आनंद निराळाच असतो. आणि असा उत्साह भरण्याचे काम जाणीवपूर्वक सर करतात. 

                   नवीन प्रार्थना,गाणी, शालेय उपक्रम विद्यार्थ्यांकरिता ज्या काही ऍक्टिवीटी आहेत ते घेण्यास सर नेहमी आग्रही असतात. त्यामुळे आपल्याही मनातील संकल्पना त्यांच्यासमोर मनमोकळेपणाने मांडता येतात. विद्यार्थ्यांचे अध्ययन,अभ्यास,शिक्षकांचे अध्यापन आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या कामाकडे सरांचे काटेकोर लक्ष असते. सरांचा स्वभाव हा फणसासारखा आहे. वरून काटेरी पण आतून रसाळ तसे क्वचित कठोर व्हावे लागते पण त्याचा उद्देश हा गोड असतो. सर्वांशी संवाद साधणं,आपुलकीनं विचारपूस करणं,एखाद्या निर्णयामध्ये सर्वांचे विचार, मत जाणून घेणं सर्वांना मार्गदर्शन करणं, योग्य निर्णय घेणं, कोणी चुकलं माकलं तर संभाळून घेणं शाळेत एक सकारात्मक आणि मनमोकळं वातावरण ठेवणं. आणि सर्वांची प्रगती साधणारे पोषक वातावरण ठेवणं अशी सरांची कार्यपद्धती आहे.

                        अशा प्रेमळ, सहृदयी, संवेदनशील कुटुंबप्रमुख्याच्या मायेत आमच्या शाळेचं कुटूंब गुण्यागोविंदाने नांदत आहे.  प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. आणि सरांच्या प्रेरणा, मार्गदर्शनाच्या बळावर शाळा- विद्यार्थी यांचे भविष्य उज्वल होईलच..! त्यासाठी काम करण्याची प्रेरणाही आम्हाला अखंड मिळत राहील असा विश्वास आहे. मुख्याध्यापक श्री. शरद पाटील सरांना..जन्मदिनाच्या अनंत शुभेच्छा... उदंड निरोगी, निरामय दीर्घायुरारोग्य लाभो हीच शाळा विद्यार्थी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावतीने प्रार्थना...!!


जय हो मंगल हो..!!

           

       - किरण सुभाष चव्हाण.

मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२

आजऱ्यातील रामतीर्थ म्हणजे आत्मिक शांती,सुखा समाधानाचे तीर्थ.









 आजऱ्यातील रामतीर्थ म्हणजे आत्मिक शांती,सुखा समाधानाचे तीर्थ.


                                आजरा तहसिल कार्यालयाच्या सभागृहातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रशिक्षण संपवून मी आणि आमचे लोहार सर सहजच एका कँटीनमध्ये शिरलो. खुर्चीवर बसताना भिंतीवरच्या एका भल्या मोठ्या डिजिटल फोटोने मन वेधून घेतले. 


तो फोटो होता रामतीर्थ धबधब्याचा. त्या सुंदर धबधब्याचा फोटो न्याहाळत मी लोहार सरांना सहजच म्हणालो. "किती सुंदर वाटतो हो धबधबा आणि हे ठिकाण..मी आजवर कधीच गेलो नाही इथे..." तसे लागलीच सर किंचितसे आश्चर्याने म्हणाले, "गेलात नाही अजून...? इथून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे.जाता जाता जाऊ आपण."  आम्ही कॅन्टीनमधून बाहेर पडलो. मुख्य रस्त्याला लागल्यानंतर अगदी थोड्याच अंतरावर लागलीच डाव्या बाजूला रामतीर्थाकडे जाणारा अरुंद पण दोन्हीं बाजुंनी झाडांनी वेढलेला रस्ता लागला. रस्त्याच्या दोन्हीं काठानी विस्तारलेली वडाची झाडे. जटाधारी ऋषिमुनी आपल्या जटा मोकळ्या सोडून ध्यानस्थ बसावेत तसे जागोजागी शांत उभी असलेली वडाची झाडे आणि त्यांच्या लोंबकळत्या जाडजूड पारंब्या. उजव्या काठाने वाहणारी हिरण्यकेशी नदी.काठाने उभा असलेला गर्द झाडाझुडपांचा गोतावळा.  आत  शिरताना तनाला आणि मनालाही गारवा जाणवत होता. एखाद्या वळवणावर विसाव्याचे ठिकाण लागावे तसे ते ठिकाण नजरेत भरू लागले. नुकत्याच जन्मलेल्या बाळानं पहिलं वहिलं पाऊल ठेवावं आणि कुतूहलाने भवताल न्याहाळावा तशी  झालेली ती माझी अवस्था. त्या पवित्र पावन भूमीत माझ्या जीवनातलं पहिलं वहिलं पाऊल मी ठेवत होतो आणि तोंडून पहिलीच प्रतिक्रिया उमटली "जीवनातल्या सुखद, अविस्मरणीय क्षणांच्या आठवणीत भर घालणारं हे ठिकाण आहे. "

                              सुरुवातीला महादेव मंदिर लागले. मंदिरात आम्हीं प्रवेश केला.आतील प्राचीन रचना डोळ्यात भरू लागली. सभामंडपातल्या जुन्या पुराण्या मूर्तींचे दर्शन घेऊन पुढच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. पाय दुमडून बसलेल्या अवस्थेतला कातळ पाषाणाचा ऐटीत बसलेला महादेवाचा भला मोठा नंदी पाहिला.जीव ओतून केलेल्या त्या कोरीवकलाकुसरीने पाषाणातल्या नंदीला  जिवंतपणा आणला होता. अंगकांतीवर कोरलेली गोंड्याची माळ आणि गळ्यातली गोलाकार घडीव घंटा. ती निश्चल स्थितप्रज्ञ अवस्था मन वेधून घेत होती. त्याच्या सामोरी गाभाऱ्यातील पवित्र पावन महादेवाची पिंडी. कलशातून घडोघडी पिंडीवर होणारा जलाभिषेक..सभोवती ठेवलेली साजूक फुलं... ओम नमः शिवाय असा कर्णमधुर मंगल ध्वनी गाभाऱ्यात घुमत होता. त्या पवित्र मनोहारी रूपाचे मनोभावे दर्शन घेतले. त्या पवित्र स्थळाचा सहवास मनाला किती हवाहवासा वाटत होता. नुकतीच मावळतीला कललेल्या सोनेरी किरणांत त्या गाभाऱ्याकडे पाहताना ते दृश्य मनाच्या कोंदणात सुखाचे गडद रंग भरत होते. महादेव मंदिरातून बाहेर पडून पुढे गेलो. 

                      कोसळणाऱ्या धबधब्याचा कानांवर आवाज आदळत होता. मनात रंगवलेल्या धबधब्याचे चित्र वास्तवात आता पाहणार होतो. पुढे जाताच कातळ काळ्या दगडांवरून  वाहणाऱ्या नितळगार पाण्याचे पुढे खाली कोसळणाऱ्या धबधब्याचे शुभ्र कांती रूप साक्षात पाहताना मन अगदी सुखावले. दुपारच्या ढळलेल्या कोमल किरणांच्या सानिध्यात तो मनमोहक परिसर न्याहाळताना मन हरखून गेले. नदीच्या दोन्हीं काठानी घनघोर दाटलेली झाडी. नदीच्या त्या पल्याड झाडीझुडपांचं गोकुळचं नांदत होतं.  काठावरच्या झुकलेल्या झावळ्यांच्या दाट सावलीत विसावलेली दगडांची दाटीवाटी. काळ्या कातळांची ती आडवी मांडणी दगडांचे कप्पे पाषाणाचे एक अनोखे रूप नजरेत भरत होते. तसेच माघारी वळून पुन्हा आम्ही पूर्वेस तोंड असलेल्या काठावरच्या राम मंदिरात गेलो. वनवासात असताना श्री राम विसाव्यासाठी येथे थांबले होते अशी आख्यायिका आहे. त्यामुळे इथल्या भूमीला विशेष महत्त्व आहे.श्री रामांच्या चरणस्पर्शाने पुणीत झालेली अशी ही भूमी. आणि पवित्र पावन असे मंदिर. गाभाऱ्यातील राम सीता आणि त्यांच्या सामोरी असलेला पवनपुत्र गदाधारी हनुमान अशा पवित्र रूपाचे दर्शन घेताना मन धन्य धन्य झाले. 

                     मंदिराच्या डाव्या बाजूला असलेलं छोटेखानी मारुतीचं मंदिर. त्याच्या वरील बाजूस आणखीन एक पुरातन मंदिर त्या मंदिरातील गाभाऱ्यात कासवमूर्ती होती. त्यानंतर मंदिराच्या पुढे आल्यानंतर निळ्यासावळ्या रूपाची ध्यानस्थ बसलेली शंकराची भली मोठी मूर्ती. त्या शंकरांच्या मुर्तीच्या पुढ्यात पाण्याच्या छोटेखानी कुंडात कमळपर्णाची दाटीवाटी. बाजूला चौकोनी समाधीस्थळ. असा सारा देखावा डोळ्यांत साठवत पुन्हा नदीच्या पात्रातील दगडावरून पाण्याच्या निकट आम्हीं जाऊ लागलो. नदीच्या मावळतीच्या काठाला एक वटलेलं चाफ्याचं झाड होतं. त्याच्या समोरील दगडाची जागा किती स्वच्छ सुंदर केली होती.जणू ती पर्यटकांच्या बसकणीची जागा होती. त्या सपय निर्मळ जागेवर निवांत ऐसपैस बसावं असं वाटतं होतं.. जिकडे तिकडे नदीतले ते कातळ काळे पाषाण, नदीच्या पाण्याने त्यांना आकार,उकार दिलेला होता. कुठे जागोजागी गोलाकार खोबण्या तयार झाल्या होत्या.  आतून कठीण कठोर असलेले कातळ वरून किती गुळगुळीत मुलायम दिसत होते. एकावर एक रचावेत एकाला एक बिलगून बसावेत अशी त्या नदीपात्रात आसनस्थ असंलेल्या कातळांची मांदियाळी. ओळीत कप्याकप्यानी विसावलेली तर कुठे आपला माथा वर काढून एका जागी स्थिरावलेली त्यांची ती अवस्था. कुठल्याही एका दगडावर आसनस्थ होऊन निवांत बसावं. संध्यासमयीच्या ऊबदार सोनेरी किरणांची मऊ शाल पाठीवर लेऊन समोरच्या निळ्याशार पाण्याकडं एकसारखं निरखत ते निवांतपण अनुभवावं. खरंच त्या काठावरची ती बैठक आत्मिक समाधानातून मनाच्या समाधी अवस्थेकडे नेते. त्या पाषाणाची स्थितप्रज्ञ अवस्था आपल्यालाही प्राप्त होते.सुख म्हणजे काय असतं हो..? कुठं भेटतं ते..? या प्रश्नांची उत्तरं किती सहजपणे सापडत होती त्या काठावर.खऱ्या शाश्वत सुखाची अनुभूती आणखीन कुठे मिळणार..?. घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरणारे तन आणि अनेक विषयांत गुंतलेले मन विसावा घेईल ती हीच जागा. एक दीर्घ मोकळा श्वास घ्यावा तो या तीर्थावरचं.

                        आम्हीं बसलो होतो त्या समोरचं एक प्रौढ जोडपे काठाने फिरत होते.तो प्रौढ माणूस हातात दगडांच्या जीबल्या घेऊन त्या पाण्यावर फेकत होता. त्या पाण्यावरुन अलगद या काठावरून त्या काठावरून जात होत्या. त्या माणसाच्या चेहऱ्यावर तो बालपणीचा आनंद पुन्हा नव्याने फुलून येत होता. आपलं बालपण पुन्हा नव्याने मिरवावं ते या काठावरच. त्या काठावर बसून भूतकाळाच्या पोटात शिरून बालपण आठवावं. स्वतःमध्ये हरवून जावावं. मी आणि आमचे लोहार सर एका दगडावर निवांत बसलो होतो. मनातील भाव प्रकट करण्याला तसाच एक शांत मनाचा सोबती मला मिळाला होता. त्यामुळे मोकळेपणाने मनातील भावना प्रकट होत होत्या. काही क्षण का असेना ते निवांतपणीचे क्षण कणाकणाने आम्हीं पदरात पाडून घेतले. ती आत्मिक ऊर्जा घेऊन आम्हीं एकदासे उठलो. खळखळत्या पाण्याची कोसळती उतरण पाहत त्याच्या काठावरून पश्चिमेच्या राम मंदिरांचे पुन्हा एकदा डोळे भरून दर्शन घेतले. मंदिरांच्या कळसावर भगवी पताका डौलाने फडकत होती. तो भोवताल पुन्हा एकदा नजरेत साठवत आम्हीं माघारी वळण्यासाठी निघालो. सूर्यनारायणही आता कललेला. झाडाझुडपांच्या आच्छालेल्या फांद्यातून निसटलेली मावळतीची किरणं महादेव राऊळाच्या कळसाला भेटून अस्ताला जात होती. त्या सायंकाळच्या वेळेस शांत,निर्मळ, निवलेल्या मनाने आम्हीं बाहेर पडलो. सायंकाळ धरून रामतीर्थ स्थळाला सहजच दिलेल्या त्या भेटीने जीवनातल्या रम्य आठवणींच्या शिदोरीत अविस्मरणीय क्षणांची ओंजळ भरून घातली. खूप समाधान वाटत होते.खरंच रामतीर्थ म्हणजे आत्मिक शांती,सुखा समाधानाचे असे एक तीर्थ आहे जिथे मनाला आराम आणि जगण्यातला राम भेटतो.


               - किरण सुभाष चव्हाण.

              मोबा - ८८०६७३७५२८.































माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...