आजऱ्यातील रामतीर्थ म्हणजे आत्मिक शांती,सुखा समाधानाचे तीर्थ.
आजरा तहसिल कार्यालयाच्या सभागृहातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रशिक्षण संपवून मी आणि आमचे लोहार सर सहजच एका कँटीनमध्ये शिरलो. खुर्चीवर बसताना भिंतीवरच्या एका भल्या मोठ्या डिजिटल फोटोने मन वेधून घेतले.
तो फोटो होता रामतीर्थ धबधब्याचा. त्या सुंदर धबधब्याचा फोटो न्याहाळत मी लोहार सरांना सहजच म्हणालो. "किती सुंदर वाटतो हो धबधबा आणि हे ठिकाण..मी आजवर कधीच गेलो नाही इथे..." तसे लागलीच सर किंचितसे आश्चर्याने म्हणाले, "गेलात नाही अजून...? इथून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे.जाता जाता जाऊ आपण." आम्ही कॅन्टीनमधून बाहेर पडलो. मुख्य रस्त्याला लागल्यानंतर अगदी थोड्याच अंतरावर लागलीच डाव्या बाजूला रामतीर्थाकडे जाणारा अरुंद पण दोन्हीं बाजुंनी झाडांनी वेढलेला रस्ता लागला. रस्त्याच्या दोन्हीं काठानी विस्तारलेली वडाची झाडे. जटाधारी ऋषिमुनी आपल्या जटा मोकळ्या सोडून ध्यानस्थ बसावेत तसे जागोजागी शांत उभी असलेली वडाची झाडे आणि त्यांच्या लोंबकळत्या जाडजूड पारंब्या. उजव्या काठाने वाहणारी हिरण्यकेशी नदी.काठाने उभा असलेला गर्द झाडाझुडपांचा गोतावळा. आत शिरताना तनाला आणि मनालाही गारवा जाणवत होता. एखाद्या वळवणावर विसाव्याचे ठिकाण लागावे तसे ते ठिकाण नजरेत भरू लागले. नुकत्याच जन्मलेल्या बाळानं पहिलं वहिलं पाऊल ठेवावं आणि कुतूहलाने भवताल न्याहाळावा तशी झालेली ती माझी अवस्था. त्या पवित्र पावन भूमीत माझ्या जीवनातलं पहिलं वहिलं पाऊल मी ठेवत होतो आणि तोंडून पहिलीच प्रतिक्रिया उमटली "जीवनातल्या सुखद, अविस्मरणीय क्षणांच्या आठवणीत भर घालणारं हे ठिकाण आहे. "
सुरुवातीला महादेव मंदिर लागले. मंदिरात आम्हीं प्रवेश केला.आतील प्राचीन रचना डोळ्यात भरू लागली. सभामंडपातल्या जुन्या पुराण्या मूर्तींचे दर्शन घेऊन पुढच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. पाय दुमडून बसलेल्या अवस्थेतला कातळ पाषाणाचा ऐटीत बसलेला महादेवाचा भला मोठा नंदी पाहिला.जीव ओतून केलेल्या त्या कोरीवकलाकुसरीने पाषाणातल्या नंदीला जिवंतपणा आणला होता. अंगकांतीवर कोरलेली गोंड्याची माळ आणि गळ्यातली गोलाकार घडीव घंटा. ती निश्चल स्थितप्रज्ञ अवस्था मन वेधून घेत होती. त्याच्या सामोरी गाभाऱ्यातील पवित्र पावन महादेवाची पिंडी. कलशातून घडोघडी पिंडीवर होणारा जलाभिषेक..सभोवती ठेवलेली साजूक फुलं... ओम नमः शिवाय असा कर्णमधुर मंगल ध्वनी गाभाऱ्यात घुमत होता. त्या पवित्र मनोहारी रूपाचे मनोभावे दर्शन घेतले. त्या पवित्र स्थळाचा सहवास मनाला किती हवाहवासा वाटत होता. नुकतीच मावळतीला कललेल्या सोनेरी किरणांत त्या गाभाऱ्याकडे पाहताना ते दृश्य मनाच्या कोंदणात सुखाचे गडद रंग भरत होते. महादेव मंदिरातून बाहेर पडून पुढे गेलो.
कोसळणाऱ्या धबधब्याचा कानांवर आवाज आदळत होता. मनात रंगवलेल्या धबधब्याचे चित्र वास्तवात आता पाहणार होतो. पुढे जाताच कातळ काळ्या दगडांवरून वाहणाऱ्या नितळगार पाण्याचे पुढे खाली कोसळणाऱ्या धबधब्याचे शुभ्र कांती रूप साक्षात पाहताना मन अगदी सुखावले. दुपारच्या ढळलेल्या कोमल किरणांच्या सानिध्यात तो मनमोहक परिसर न्याहाळताना मन हरखून गेले. नदीच्या दोन्हीं काठानी घनघोर दाटलेली झाडी. नदीच्या त्या पल्याड झाडीझुडपांचं गोकुळचं नांदत होतं. काठावरच्या झुकलेल्या झावळ्यांच्या दाट सावलीत विसावलेली दगडांची दाटीवाटी. काळ्या कातळांची ती आडवी मांडणी दगडांचे कप्पे पाषाणाचे एक अनोखे रूप नजरेत भरत होते. तसेच माघारी वळून पुन्हा आम्ही पूर्वेस तोंड असलेल्या काठावरच्या राम मंदिरात गेलो. वनवासात असताना श्री राम विसाव्यासाठी येथे थांबले होते अशी आख्यायिका आहे. त्यामुळे इथल्या भूमीला विशेष महत्त्व आहे.श्री रामांच्या चरणस्पर्शाने पुणीत झालेली अशी ही भूमी. आणि पवित्र पावन असे मंदिर. गाभाऱ्यातील राम सीता आणि त्यांच्या सामोरी असलेला पवनपुत्र गदाधारी हनुमान अशा पवित्र रूपाचे दर्शन घेताना मन धन्य धन्य झाले.
मंदिराच्या डाव्या बाजूला असलेलं छोटेखानी मारुतीचं मंदिर. त्याच्या वरील बाजूस आणखीन एक पुरातन मंदिर त्या मंदिरातील गाभाऱ्यात कासवमूर्ती होती. त्यानंतर मंदिराच्या पुढे आल्यानंतर निळ्यासावळ्या रूपाची ध्यानस्थ बसलेली शंकराची भली मोठी मूर्ती. त्या शंकरांच्या मुर्तीच्या पुढ्यात पाण्याच्या छोटेखानी कुंडात कमळपर्णाची दाटीवाटी. बाजूला चौकोनी समाधीस्थळ. असा सारा देखावा डोळ्यांत साठवत पुन्हा नदीच्या पात्रातील दगडावरून पाण्याच्या निकट आम्हीं जाऊ लागलो. नदीच्या मावळतीच्या काठाला एक वटलेलं चाफ्याचं झाड होतं. त्याच्या समोरील दगडाची जागा किती स्वच्छ सुंदर केली होती.जणू ती पर्यटकांच्या बसकणीची जागा होती. त्या सपय निर्मळ जागेवर निवांत ऐसपैस बसावं असं वाटतं होतं.. जिकडे तिकडे नदीतले ते कातळ काळे पाषाण, नदीच्या पाण्याने त्यांना आकार,उकार दिलेला होता. कुठे जागोजागी गोलाकार खोबण्या तयार झाल्या होत्या. आतून कठीण कठोर असलेले कातळ वरून किती गुळगुळीत मुलायम दिसत होते. एकावर एक रचावेत एकाला एक बिलगून बसावेत अशी त्या नदीपात्रात आसनस्थ असंलेल्या कातळांची मांदियाळी. ओळीत कप्याकप्यानी विसावलेली तर कुठे आपला माथा वर काढून एका जागी स्थिरावलेली त्यांची ती अवस्था. कुठल्याही एका दगडावर आसनस्थ होऊन निवांत बसावं. संध्यासमयीच्या ऊबदार सोनेरी किरणांची मऊ शाल पाठीवर लेऊन समोरच्या निळ्याशार पाण्याकडं एकसारखं निरखत ते निवांतपण अनुभवावं. खरंच त्या काठावरची ती बैठक आत्मिक समाधानातून मनाच्या समाधी अवस्थेकडे नेते. त्या पाषाणाची स्थितप्रज्ञ अवस्था आपल्यालाही प्राप्त होते.सुख म्हणजे काय असतं हो..? कुठं भेटतं ते..? या प्रश्नांची उत्तरं किती सहजपणे सापडत होती त्या काठावर.खऱ्या शाश्वत सुखाची अनुभूती आणखीन कुठे मिळणार..?. घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरणारे तन आणि अनेक विषयांत गुंतलेले मन विसावा घेईल ती हीच जागा. एक दीर्घ मोकळा श्वास घ्यावा तो या तीर्थावरचं.
आम्हीं बसलो होतो त्या समोरचं एक प्रौढ जोडपे काठाने फिरत होते.तो प्रौढ माणूस हातात दगडांच्या जीबल्या घेऊन त्या पाण्यावर फेकत होता. त्या पाण्यावरुन अलगद या काठावरून त्या काठावरून जात होत्या. त्या माणसाच्या चेहऱ्यावर तो बालपणीचा आनंद पुन्हा नव्याने फुलून येत होता. आपलं बालपण पुन्हा नव्याने मिरवावं ते या काठावरच. त्या काठावर बसून भूतकाळाच्या पोटात शिरून बालपण आठवावं. स्वतःमध्ये हरवून जावावं. मी आणि आमचे लोहार सर एका दगडावर निवांत बसलो होतो. मनातील भाव प्रकट करण्याला तसाच एक शांत मनाचा सोबती मला मिळाला होता. त्यामुळे मोकळेपणाने मनातील भावना प्रकट होत होत्या. काही क्षण का असेना ते निवांतपणीचे क्षण कणाकणाने आम्हीं पदरात पाडून घेतले. ती आत्मिक ऊर्जा घेऊन आम्हीं एकदासे उठलो. खळखळत्या पाण्याची कोसळती उतरण पाहत त्याच्या काठावरून पश्चिमेच्या राम मंदिरांचे पुन्हा एकदा डोळे भरून दर्शन घेतले. मंदिरांच्या कळसावर भगवी पताका डौलाने फडकत होती. तो भोवताल पुन्हा एकदा नजरेत साठवत आम्हीं माघारी वळण्यासाठी निघालो. सूर्यनारायणही आता कललेला. झाडाझुडपांच्या आच्छालेल्या फांद्यातून निसटलेली मावळतीची किरणं महादेव राऊळाच्या कळसाला भेटून अस्ताला जात होती. त्या सायंकाळच्या वेळेस शांत,निर्मळ, निवलेल्या मनाने आम्हीं बाहेर पडलो. सायंकाळ धरून रामतीर्थ स्थळाला सहजच दिलेल्या त्या भेटीने जीवनातल्या रम्य आठवणींच्या शिदोरीत अविस्मरणीय क्षणांची ओंजळ भरून घातली. खूप समाधान वाटत होते.खरंच रामतीर्थ म्हणजे आत्मिक शांती,सुखा समाधानाचे असे एक तीर्थ आहे जिथे मनाला आराम आणि जगण्यातला राम भेटतो.
- किरण सुभाष चव्हाण.
मोबा - ८८०६७३७५२८.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा