कोरोना...कोरोना...कोरोना... ऐकावं...पहावं...बोलावं असं सर्वकाही व्यापून ठेवलं आहे कोरोनानं...आज संपूर्ण जगभरात या विषाणूनं थैमान घातलय... अखंड मानवजातीला हैराण करून सोडलंय..एखाद्या दुरदेशात ज्याची उत्पत्ती व्हावी आणि बघता बघता आपला देश.. राज्य...शहर..गाव आणि घरापर्यंत मजल मारावी..याचाचं अर्थ आज त्यानं कोणत्याच सीमा मागे ठेवलेल्या नाहीत.. मानवी शरीर हे त्याचं आश्रयस्थान.. माणूस हा त्याचा वाहक.. माणसाकडून माणसाकडे संक्रमण करीत सुरू असलेला त्याचा सर्वव्यापी प्रवास...माणसामाणसांची शृंखला जोडून त्याने आज जगभर आपलं जाळं विणलय.संपूर्ण जग व्यापलंय. आणि कोरोना नावाच्या या अदृश्य विषाणूने जणू माणसांविरुद्ध युद्ध छेडलंय..दिवसेंदिवस अधिकच तो आपल्या जाळ्यात माणसाला ओढत चाललाय.
कोरोनापासून सुटका करून घेण्यासाठी जेवढे काही करता येईल तेवढे प्रयत्न युद्धपातळीवर सुरूच आहे.संपूर्ण जग आज या कोरोनाशी सामना करीत आहे.आपले शासन प्रशासन डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सफाई कामगार,आशा अंगणवाडी सेविका,शिक्षक कोरोना योद्धा म्हणून या अदृश्य शत्रूशी प्राणाची बाजी लावून लढत आहेत.तसे तर आपण सगळेजणचं त्याच्याशी सामना करतोय..पण २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर विज्ञानाच्या बळावर अपूर्व प्रगती साधलेल्या मानवाला,आज हा कोरोना आव्हान देतो आहे.नेमकेपणाने त्याच्यावर कशी पूर्णपणाने मात करावी याचे उत्तर सध्या तरी मानवाकडे नाही..एका बाजूला कोरोना आपले साम्राज्य विस्तारत चालला आहे तर दुसरीकडे मानव आपल्या अस्तित्वासाठी निकराची झुंज देतो आहे.आपल्या हातात जेवढं आहे तेवढा जोरकसपणे त्याच्या विरोधात लढा सुरूच आहे. पण परिस्थिती अजूनही आटोक्यात नाही.आजतागायत देशभरासह जगभरात लाखो करोडो मानवी जीवांचा बळी या कोरोनाने घेतला आहे..आणि दिवसेंदिवस आपल्यावरील कोरोना महामारीच्या संकटाचे सावट घनदाट होत आहे.
त्यातच आणखीन एक चिंतेचा विषय म्हणजे कोरोना फक्त शरीरावरचं नाही तर मनावर देखील आक्रमण करू लागलाय.कोरोना महामारीमुळे आज कित्येक जीव धास्तावलेत,चिंतेच्या गर्तेत सापडलेत...कोरोना फोबिया आजाराचे बळी ठरलेत..मानसिक समतोल ढासळून नैराश्यग्रस्त झालेत..कोरोनामुळे जगण्याची व जीवनाची घडी विस्कटून गेलेले जीव कुठे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडतायेत.तर कुठे कोण टोकाला जाऊन जीवनाचा शेवट करून घेतो आहे...त्यात भरीस भर म्हणजे 'आजची धक्कादायक बातमी' असं म्हणून गेली आठ महिने धक्क्यावर धक्के देणाऱ्या बातम्या रोज आपल्या कानांमनावर आदळतायेत..आधीच कोरोनाच्या चिंतेने ग्रासलेल्या मनाला माध्यमातून येणाऱ्या रोजच्या कोरोनाच्या ब्रेकींग बातम्या..अधिकच चिंतेत टाकत आहेत..
सुरुवातीला ज्याला आपण लांबून ऐकलं होतं तो आता आपल्याला अनुभवायला मिळेल की काय याची कुठे तरी प्रत्येक मनांत दाट शंका आहे..कोरोना अजून आपल्या शरीरावर आक्रमण करायचा बाकी आहे तोपर्यंत अगोदरच तो आपल्या मनावर आक्रमण करीत आहे.. वरून जरी सगळं सुरळीत आहे असं वाटलं तरी मनात कुठेतरी कोरोना विषाणूने प्रचंड दहशत माजवली आहे..नेहमीसारखा साधा सर्दी,खोकला, ताप आला तरी मला कोरोनाचं झाला..आता संपलं सगळं म्हणून लोक गर्भगळीत होतायेत..त्यांच्या मनाचा समतोल ढासळतोय. वास्तविक कोरोना झाला नसेल तरी मला कोरोना झाला आहे असे लोक स्वतःला समजताहेत म्हणजेच कोरोना फोबियासारख्या आजाराला बळी पडताहेत..कोणी कोरोनाच्या धास्तीने या जगाला हाकनाक पारखे होतायेत. तर काही कोरोनाच्या भीतीमुळे किंवा कोरोनामुळे आलेल्या आर्थिक अडचणींमुळे वा झालेल्या नुकसानीमुळे आपल्या जीवनाचा शेवट करून घेतायेत..आणि हे वास्तव कोरोनापेक्षाही भयंकर आहे....पण आपल्या हे कसं ध्यानात येत नाही की कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या संख्येपेक्षा कोरोनावर मात करून बरे होण्याची संख्या किती तरी पटीने अधिक आहे..
म्हणजे कोरोनाची मुळात धास्ती घ्यायची ती केवढी..? आपण त्या पळणाऱ्या हरणाचे उदाहरण वाचले असेल ताशी ८० कि. मी वेग असूनही ताशी ६० कि.मी वेग असणाऱ्या वाघाच्या कचाट्यात ते सापडते का तर आपण सापडणार या भीतीने..आपलेही असेच होतेय का..?आपणही असे कोरोनाच्या भीतीने ग्रासले जाऊ..गर्भगळीत होऊ, आत्महत्या करीत असू तर मला म्हणायचं आहे...आपण त्या हरणापेक्षादेखील कचदिल निघालो.. कारण शत्रू मागे असताना ते हरीण आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न तरी करते पण इथे केवळ कोरोनाच्या धास्तीने आपण कोणताही प्रतिकार न करता जीवाला मुकतो आहोत...
लक्षात घ्या कोणतंही युद्ध असो त्याचा मुकाबला करायच्या अगोदर आपण शरीराने आणि महत्वाचे म्हणजे मनाने सज्ज असलो पाहीजे...मला अखेरच्या श्वासापर्यंत लढायचं आहे हा मनाचा खंबीर निर्धार आताच्या काळात आपल्याला तारू शकतो.पण होतंय काय इथेच आपली फार मोठी फसगत होतेय...आपण स्वतःला एकदा प्रश्न विचारा की या कोरोनाच्या शत्रूविरोधात लढण्यासाठी आपण मनाने खरंच सज्ज आहोत का..? आणि वेळ पडलीच तर कोरोनाशी प्रत्यक्ष लढताना आपल्या शरीराला मनाची खंबीर साथ मिळणार आहे का..? नाही तर आपल्या मनाची तयारीचं नसायची मग एकट्या शरीराचा शत्रूविरोधात कसा निभाव लागेल..? साधं उदाहरण आहे कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तिची पूर्वतयारी म्हणून अभ्यास करणे हा अपरिहार्य आहे.. मग ही कोरोनाची लढाई आपण आपल्या तयारीविना कशी जिंकू आणि ती जर जिंकायची असेल तर त्याला परिपूर्ण तयारीनिशी आपल्याला सामोरे जावे लागेल.आज आपण बाह्य सज्जता घेतोय म्हणजे मास्क वापरणे,सानिटायजरचा वापर डिस्टनसिंगचे पालन करणे हे नियम आपण पाळत असू तशी जनजागृतीही केली जातेय पण आपल्या आंतरिक सज्जतेचं काय..? उद्या आपल्याला कोरोनाशी प्रत्यक्ष सामना करताना काही काळ एकांतवास स्वीकारायची.काही काळ आपल्या कुटुंबापासून ,आपल्या माणसांपासून दूर राहण्याची वेळ आलीचं तर आपण आपल्या मनाची मानसिकता तयार केली आहे काय..?आणि म्हणून बाह्यसज्जतेबरोबरचं आंतरिक सज्जताही खूप महत्वाची आहे.. आणि ती आपली आपल्याचं करावी लागेल.
आणि त्यासाठी आपले विचार व कृती यांचा मेळ आपल्याला घालावा लागेल. आणि त्या दृष्टीने आपण कसे प्रयत्न करू शकतो..? पहिल्यांदा मनातून नकारात्मक विचार बाजूला सारा.नेहमी सकारात्मक रहा..सकारात्मक विचार करा..खाण्यापिण्याकडे लक्ष द्या..उत्तम आहार घ्या.शरीराला आणि मनाला समतोल साधायचा असेल तर नित्यनेमाने योगासने करा ...ध्यानधारणा करा.मनाची एकाग्रता वाढवा.जे जे मनाला उर्जादायी ठरेल ते ते करा..आपले छद जोपासा..कोणाला वाचनाची आवड असेल तर मनाला बळकटी देणारी पुस्तके वाचा..लिखाणाची आवड असेल तर एखादं छानसं पुस्तक लिहून पूर्ण करा..कुणाला चित्रकलेची कुणाला संगीताची आवड असेल किंबहुना ज्या गोष्टीमध्ये आपल्याला रस आहे त्यामध्ये मन गुंतवा..संतसाहित्यांचा अभ्यास करा..अध्यात्माशी नातं जोडा...आपल्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा.. त्यांच्या आवडीनिवडी जोपासा,आपल्या जीवनातील प्रिय व्यक्तींशी मनमुराद सुखसंवाद साधा..ज्या व्यक्तींकडून आपल्याला प्रेरणा मिळते त्यांच्याशी संवाद साधत रहा..प्रेरणादायी व्यक्तींच्या सहवासात रहा.मनात कोणत्याही प्रकारचे साचलेपण ठेऊ नका...आपले मन नेहमी प्रवाही ठेवा..निखळ बोलत रहा आपल्याकडे हक्काचे मुक्तव्यासपीठ आहे व्हाट्सएप,फेसबुक अशा समाजमाध्यमावर व्यक्त होत रहा.कोणी जर या आजाराची मुकाबला करीत असेल तर त्याला शब्दांचा आधार द्या...आपल्यावर जर ही वेळ आली आले तर शब्दांचा आधार घ्या...एकमेकांना आधार देत आपण पुढे जायचे आहे.लक्षात घ्या माणसांमाणसातलं अंतर वाढलंय पण आपल्याला माणुसकीतलं अंतर कमी करून ते नातं अधिक घट्ट करायचंय.कोणत्याही परिस्थितीत तुमच्या मनातील भीती,चिंता,नैराश्य, 'हे आपले शत्रू कोरोनाला साथ देणार नाहीत याची काळजी घ्या.त्यांना मनात जराही थारा देऊ नका उलट संयम,धाडस आणि शांतता याच्या जोरावर आपल्याला हे आक्रमण परतवून लावायचे आहे.आज आपणच नाही सारं जग किंबहुना आपला देश या कोरोनाशी लढतो आहे.युद्धपातळीवर डॉक्टर, परिचारिका, पोलीस हरेकजण आपला जीव धोक्यात घालून लढतो आहे.जगभरातले संशोधक कोरोनवरची लस शोधण्यासाठी अहोरात्र जुटले आहेत..मग आपल्यालाही संयम ठेवावाच लागेल कोरोनाशी धैर्याने मुकाबला करावाचं लागेल..नक्कीच आजचा काळ सर्वांसाठी खूप कठीण काळ आहे पण विश्वास ठेवा हे पण दिवस जातील.'..आजच्या काळरात्रीनंतर उद्याचा उषःकाल ठरलेला आहे...गरज आहे ती शांततापूर्ण धैर्य ठेऊन वाट पाहण्याची.
मृत्यूला कदापीही घाबरू नका...मरणाला घाबरण्याची इथं परंपरा नाही.. तर मरणाला तळहातावर घेऊन लढण्याची झुंजण्याची इथं परंपरा आहे...हे आपल्याला सांगायला लागू नये...आपल्या जगण्याची प्रेरणा आहेत छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज.आजच्या कठीण काळात त्यांचे अखंड स्मरण करीत रहा.एकदा शिवचरित्र आणि छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र ग्रंथ वाचा. वाचलं असेल तरी पुन्हा वाचा.आपल्या अस्तित्वासाठीच्या संघर्षाचं याहून मोठं उदाहरण मानवी इतिहासात नाही.आणि हीच प्रेरणा आजच्या काळात आपल्या जगण्याला पुरेशी आहे.ज्यांनी स्वराज्याच्या अस्तित्वासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला...आपल्या मावळ्यांनी स्वराज्याकरीता मरणाला पाठीवर बांधून निधड्या छातीने निकराची झुंज दिली...ते स्वराज्यासाठी लढले आपल्याला आज स्वतःसाठी लढायचं आहे...प्रसंगी एकवेळ कोरोनाशी झुंजताना मरण आलं तर बेहत्तर पण गर्भगळीत होऊन हे रणांगण सोडून परागंदा होत असाल, प्राणाला मुकत असाल तर खबरदार...! इथे शत्रूला घाबरण्याचा नाही शत्रूशी दोन हात करून लढण्याचा इतिहास आहे. आणि म्हणून या मातीच्या कुशीत आणि मुशीत जन्मलेली आम्हीं लेकरं आहोत..त्या मावळमनाला खऱ्या अर्थाने जागृत करण्याची ही वेळ आहे. स्वतःच्या अस्तित्वासाठी प्रबळ इच्छाशक्तीने ही लढाई आपल्याला लढायची आहे आणि जिंकायचीसुद्धा आहे.
'जगावे तर असे जगावे की आपल्या जगण्याकडे पाहून इतरांनाही जगण्याचे बळ मिळावे'...असे जगुया.आपण प्रत्येकाने कोरोनाच्या विरोधातली ही लढाई दृढ आत्मविश्वासाने लढूया कोरोनाला हरवुया...आपण जिंकूया आणि येणाऱ्या काळात इतिहासाचं एक पान आपल्या नावाने राखून ठेवूया..
जय हो मंगल हो..!!
हे वाचा...