ऊसतोड कामगार मायबापाचा लेक झाला शेकडों अनाथ लेकरांचा माय-बाप...
...असा अनाथांचा नाथ संतोष गर्जे.
एक दुर्दैवी अघटीत घटना आयुष्यात घडली. ज्याने हृदयावर असा काही आघात केला की,ती ठसठसणारी वेदना संवेदना होऊन गेली. आपल्यासारख्या अनेकांच्या वेदनेंशी ती नातं जोडत गेली.. तो अशाच वेदना घेऊन जगणाऱ्या, मायेच्या नात्यांना पोरकं झालेल्यांना हृदयाशी जोडत राहिला.. विस्कटलेल्या.. उध्वस्त झालेल्या.. निरागस निष्पाप कोमजेलेल्या मुलांच्या मायेचा तो धागा झाला... तो होतो त्यांचा तारणहार... ज्यांची माय गेली त्यांची माय झाला... ज्यांचा बाप गेला त्यांचा बाप झाला...आणि ज्याचं सर्वस्व गेलं... त्यांचं तो सर्वस्वचं झाला... ज्याला कोणी नाही त्याला तो आहे आणि असा तो अनाथांचा नाथ... माय-बाप संतोष नारायण गर्जे.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पाटसरा हे छोटसं गांव.. या गावात वडील नारायण गर्जे व आई छबुबाई नारायण गर्जे यांच्या पोटी २७ ऑगस्ट १९८५ साली संतोषजींचा जन्म झाला. तीन भाऊ-तीन बहिणी अशी एकूण सहा भावंड.. आईवडील शेतमजूर,ऊसतोड कामगार... हातावरचं पोट त्यामध्ये खाणारी तोंडं आठ... हाताला जेंव्हा काम तेंव्हाच कुठे हातातोंडाची पडणारी गाठ... गरिबी तर पाचवीलाच पुजलेली.पूर्णपणे हलाखीची परिस्थिती.माय-बाप ऊसतोड असल्याने कामाच्या निमित्ताने परमुलखाला जायचे..सहा- सहा महिने त्यांची भेट व्हायची नाही.जिथं खायचे वांदे तिथं शिक्षणाचं काय..? त्यामुळं शिक्षणाची ही ऐसीतैसीचं. मुली उपवर झाल्या तशा लगीन लावून दिल्या... त्यात संतोषजींचं भाग्य एवढंच की, सगळ्या भावंडात त्यांना कॉलेजपर्यंत शिक्षण मिळत गेलं.. संतोषजी १२ वीला असताना ती दुर्दैवी घटना घडली... त्यांची मोठी ताई लगीन होऊन सासरी नांदत होती...तिच्या पोटाला पहिली साडेतीन वर्षांची नेणती पोरं.. आणि ती पुन्हा सात महिन्यांची गरोदर होती... घरात भांड्याला भांड लागतं तसं संसारात नवरा बायकोचं भांडण हे ठरलेलचं. पण एकेदिवशी जोराचा वाद झाला नवऱ्याला राग अनावर झाला... डोळं नसतातचं रागाला ते खरंच... रागाच्या भरात त्याने मारली जोराची लाथ त्या नाजूक पोटावर...अन ती धाडकन कोसळली जमिनीवर... तळमळली... तडफडली... जीवानिशी कळवळली... नाही तो आघात तिला सहन झाला.. नी शेवटी सोडला तिने प्राण पोटातल्या नेणत्या जिवासह... दोन जीवांचा अंत झाला..हे अमानुष पातक घडल्यावर त्यावेळी इकडे संतोषजींच्या आईवडिलांना निरोप आला तुमची मुलगी आजारी आहे बघायला या.जातात तर काय..? तिथे उरला होता फक्त तिचा निर्जीव देह.
एक सुंदर निरागस उमलत्या कोवळ्या कळीची माय या जगातून कायमची निघून गेली.. कळी पोरकी झाली.

काय चूक होती हो तिची..? तिच्या मायेचं छत्र हरवलं... आता तिला आईची माया कशी मिळणार..? बाप असूनही बाप राहिला नाही.. असा निष्ठुर बाप... बाप होऊ शकतो...? नाही. तिची माय गेली आणि बापही... आता कोण देणार या नकळत्या लेकराला मायबापाचं प्रेम ?... संतोषचे आईवडील त्या नकळत्या निरागस लेकराला घरी घेऊन आले..संतोषजींच्या संपूर्ण घरासाठी हा मोठा धक्का होता... कसं सावरायचं यातून..? आईवडिलांचं छत्र हरपण हे जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख... तिचं हे दुःख कोण निवारील..? आता होता येईल का कोणाला तिचा मायबाप...? आणि असाच तिचा मायबाप होऊन विचार करत होता तो... तो म्हणजे संतोष... आणि ठरलं.मऊ मातीवर वळीव पावसाचे थेंब झडावेत आणि फुटावा रुजल्या बीजाला नवांकुर... तसं या प्रसंगाने संतोषजींच्या संवेदनशील मनातून एक विचारांकुर फुटला.या निष्पाप निरागस जीवाचा आपण झालो तर मायबाप..? होय आपण व्हायचं मायबाप.. पण या एकाच जीवाच्या नाही तर अनेकांच्या... ज्याची माय नाही त्याची माय आणि ज्याचा बाप नाही त्याचा बाप व्हायचं... जसा अनेक फुलांना गुंफणारा धागा तसा पोरक्या मुलांच्या मायेचा धागा व्हायचं... त्यांचं हरवलेलं बालपण पुन्हां त्यांना द्यायचं. वय तर काय होतं ते... केवळ १८ वर्षांचं कोवळं वय.. नुकत्याच ओठावर उगवणाऱ्या कोवळ्या मिशा... कॉलेजकुमार होऊन ऐटीत रूबाबात फिरायचं.. गुलाबी स्वप्नं रंगवायचं... मित्रांच्या संगतीत भान हरपून जगायचं... बेभान व्हायचं..? कळतनकळत कुणाच्या प्रेमात पडायचं... पण हे हे सगळं सोडून त्याला हे काय नवीनच सुचत होतं..? आईबापाचं प्रेम द्यायचं.. अनाथ मुलांचा मायबाप व्हायचं... आणि सुरू झाला प्रवास...

आता ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायची म्हणजे धडपड केली पाहिजे... हातात पैसा पाहिजे... पैसा पाहिजे म्हटल्यावर हाताला काम पाहिजे आणि म्हणून मग गांव सोडलं आणि कामाच्या शोधात पावलं वळाली शहराकडे.. औरंगाबाद शहरामध्ये मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली. इथे दोन महिने तर तिथे तीन महिने मिळेल तिथे काम करायचं. मिळेल ते म्हणजे एका घरात कामाला असताना तेथील दर चार दिवसाने तुंबलेल्या चेंबरमधील मानवी मैला उपसून काढायचंसुद्धा काम केलं... पडेल ते काम करायची तयारी होती... पोटापूरता पैसा हाती येत होता.. दिवस असेच जात होते. पण एका क्षणाला मनाला जाणवलं की, हे असं कुठपर्यंत असे दिवस काढायचे..? चार पैसे कमवण्यातच जर असे दिवस जात असतील तर मग आपल्या उद्दिष्टासाठी आपण प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी करायची...? मनाची अस्वस्थता वाढत गेली... आणि पुन्हा मनाने आपल्या ध्येयाप्रत उचल खाल्ली.
अनाथ लेकरांच्यासाठी काहीतरी करायचं आणि मग औरंगाबाद सोडून गेवराई तालुका गाठला... अनाथाश्रम सुरू करण्यासाठी गेवराई तालुका निवडला... त्यापाठीमागे कारणंही तशी होती... गेवराई तालुक्यात मागासवर्गीय समाज जास्त आहे, बंजारा समाज असल्यामुळे ऊसतोडणीसाठी स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते, लालबत्ती परिसर (रेड लाईट एरिया), शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बालविवाहाचे प्रमाण इथं सर्वात जास्त आहे. त्यामुळे अशा कारणामुळे हाच परिसर निवडला. एका मित्राची गेवराई ही सासरवाडी. पण तिथे त्याचे सासुसासरे राहत नव्हते.. म्हणून तिथली ती जागा वापरण्याची परवानगी मिळाली... जागेचा तरी प्रश्न सुटला पण अजून खूप प्रश्नं समोर उभे होते... आता मुख्य म्हणजे मुलांची जमवाजमव करायची. शेजारच्या गावात फिरून चौकशी केली.. लोकांना सांगायला सुरुवात केली. मी अनाथाश्रम सुरू करतो आहे.. अनाथ गरजू मुले कुठे असतील तर पाठवून द्या. पण कुणाशी ओळख ना पाळख.. त्या भागात अगदी नवखा गडी कोण प्रतिसाद देणार...?अशातच पंधरा दिवस गेले काहीच मेळ लागत नव्हता.. म्हणून थांबून चालणार नव्हते. दुकानदारांच्याकडे जाऊन चार-आठ दिवसांच्या वायद्यावर प्रथम काही साहित्य खरेदी केलं.. पत्रे, चौकटी, फरशी, खिळामोळा इ सुरुवातीला एकूण ७५ पत्रे लागले वरती पंधरा आणि खाली साठ असे तीन खोल्यांचा पत्र्यांचा निवारा तयार केला..आणि अशाप्रकारे २००४ साली कसेतरी पहिले अनाथालय उभा राहीले.ह.भ.प नामदेव शास्त्री महाराज यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

हे करत असताना संतोषजीं हे काम मी स्वतः करत आहे हे लोकांना जाणवू न देता औरंगाबादमध्ये मोठा साहेब आहे त्यांच्या सांगण्यावरून हे काम चालू आहे,मी फक्त कामगार आहे असे लोकांना भासवत होते. कारण एवढंच की, लोकांनी हे ऐकून तरी मुलं पाठवावीत नाही तरी माझ्यासारख्या अनोळखी माणसांवर कोण विश्वास ठेवणार..? असे त्यांना वाटत होते. अशी एकूण सर्व परिस्थिती... त्यानंतर उदारीवर एक महिन्याचा शिधा, किराणा साहित्य भरून ठेवले आणि मग पुन्हां मुलांचा शोध... वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचं. तांड्यावरती, वाड्यावस्त्यावरती जायचं, केशकर्तनालयाचे दुकान असेल, शाळा, ग्रामपंचायत जिथं तिथं जाऊन लोकांना मनातली संकल्पना पटवून द्यायची.. पण लोकांचा विश्वास बसत नव्हता... त्यात भरीस भर म्हणजे एक अशी अफवा पसरली होती की, पोरंधरीवाले पोरं धरून इमारती, तलावाच्या पायात घालण्यासाठी नेतात.. त्या पोरंधरी माणसांच्या सारखाचं त्यावेळी काहीसा मिळता-जुळता अवतार.. मग काय..? सगळीचं पंचायत.. तरीही प्रयत्न सोडले नाहीत... शेवटी प्रयत्न फळाला आले अथक सायासातून सात मुलं गाठीशी पडली... प्रत्यक्ष कार्याला सुरुवात झाली... लेकरं निवाऱ्याला आली...
मनात एक पूर्वीपासून स्वप्नं होतंच की, जे आपल्याला मिळालं नाही... पाठीवरचं दप्तर असेल... शाळेचा गणवेष, वह्या, कंपास... पायातली चप्पल. पहिल्यांदा हे सारं या लेकरांना द्यायचं... म्हणून हे सर्व साहित्य सुरुवातीला दुकानदाराकडून उधारीवर उपलब्ध करून घेतलं आणि मुलांना आवश्यक ते शैक्षणिक साहित्य व शालेय गणवेष.,चप्पल इ वस्तू घेऊन दिल्या.. आगोदरच महिनाभराचं राशन किराणा माल सुद्धा उधारीवरच भरला होता. आता हे झालं पण जेवण बनवायचं कुणी..?. स्वयंपाकीन आणायची कुठून..? त्यामुळे स्वतःच स्वयंपाक बनवायचा. पण जेवण कुणाला बनवायला येतं होतं म्हणून सुरुवातीला पोहे, खिचडी, शिरा याच्यावरच जोर दिला आणि महिनाभरातच सगळा माल संपून गेला... बरं मुलं आता रमली होती तसे त्यांचे दाखले आणले त्यांना शाळेत दाखल केलं.मुलं शाळेलाही जाऊ लागली... पण मुख्य म्हणजे त्यांच्या पोटाला घातलं पाहिजे... थांबून चालणार नव्हतं. मग उत्पन्नाचा मार्ग कुठला..? तर मग मोठे बंगले... इमारती.. मोठी दुकाने इथं काही मिळेल या आशेने मागायला जायचं.. बरं त्यासाठी स्वतःजवळ ठोस पुरावा नाही.. एका साध्या लेटरपॅडवरती या अनाथाश्रमाविषयीच्या चार पाच ओळी प्रिंट केलेल्या बस एवढीच काय ती आपल्या कार्याची ओळख लोकांना दाखवायची... मोडक्या तोडक्या शब्दांत त्यांच्यासमोर मांडायची... त्यावेळी कुठे कोण दहा-पाच रुपये द्यायचे.. कोण नानाविध प्रश्न विचारायचे.. तर काहीजण अक्षरशः हाकलून लावायचे... हे करत असताना मनाला कुठं तरी शरमिंदापणा वाटायचा...
खरंच खूप कठीण होतं हे काम...दुरूनच डोंगर चांगले दिसतात ते खरंच... इथं तर दिवसेंदिवस अडचणींचा डोंगर उभा होता.पण घेतला वसा टाकायचा कसा..? उमेद हरून चालणार नव्हती. गावोगावी, घरोघरी जायचं मोठंमोठी दुकाने, कार्यालये फिरायचं.. आणि जे काही मिळेल पैसे, कपडालत्ता, शिधासाहित्य, मुलांचे शैक्षणीक साहित्य अशा स्वरूपात ते जमा करून या लेकरांसाठी आणायचे...-लोकांनी द्यायचं... आपण मागायचं... आणि या लेकरांची सोय करायची. असाच उद्योग सुरू होता. पण फक्त हेच काम असायचं का..? खूपदा असेही वाईट प्रसंग उभा रहायचे... एकदा अशी घटना घडली... रात्रीची वेळ.. बाहेर रिपरिप गळणार पाऊस.. लाईटची सोय नाही.. आणि त्या रात्रीला एका मुलाला विंचू चावला... ते लहानगं पोरं ओरडायला-बोंबलायला लागलं.. आता काय करायचं..? तसंच त्याला उचलून खांद्यावर घेऊन त्या पावसातून जवळजवळ तीन साडे तीन कि. मी अंतर पार करून तब्बल २ तासांनी दवाखाना गाठला.. डॉक्टरांनी उपचार केले... आणि एक दिवस दवाखान्यातचं थांबावं लागेल असे सांगितले... दुसऱ्या दिवशी सकाळी डिस्चार्ज केला आणि बिल केलं २२०० रु.आता आली का पंचायत.. आता हे लेकरू कुठून आणलं..? आपलं कार्य काय आहे हे त्यांना सांगून का उपयोग आहे..? खिशात एकूण रुपये होते फक्त ६७ रु... त्यात गेवराईत कोणीच ओळखीचं नाही.... आता काय करावं..? त्या मुलाला तिथेच दवाखान्यात ठेवून पुन्हा मागे परतले... जिथे रहायला होते तिथे एक काशीनाथमामा होते त्यांच्याकडून ७ रुपये टक्याने ५००० रु.घेतले आणि मग बिलाची रक्कम भरून त्या मुलाला घेऊन माघारी आपले ठिकाण गाठले... असे एक ना अनेक बरेवाईट प्रसंग अनेकदा यायचे.. येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याशिवाय पर्याय नव्हता... लेकरांच्या खाण्यापिण्याला... दुखण्याखुपण्याला वणवण फिरावं लागायचं... शेतातलं पत्र्याचं शेड सोडून शहरात एक घर भाड्याने घेतलं. गेवराईतल्या त्या राहत्या घराचे भाडे द्यायलाही एकेकदा हातात पैसे नसायचे... अशी दळभद्री अवस्था झाली होती.
कोणत्याही चांगल्या कार्याला फार मोठ्या दिव्यातून जावं लागतं...अर्थातच संतोषजींनाही जावं लागलं.. अनेक विघ्नसंतोषी माणसांनी त्रास दिला...एकाने तर कळसचं केला होता.संतोषजींच्या तारुण्याचा गैरफायदा घेत त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन छळ करून एकूणच चारित्र्य हनन करायचा प्रयत्न केला... पण सत्याला कितीही खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला तर शेवटी खोटंच उघडं पडतं देवदयेने त्या माणसाला कशी काय सुबुद्धी मिळाली आणि कालांतराने ज्या माणसाने हे आरोप केले होते त्यानेच शेवटी संतोषजींची माफी मागितली. याच्याही पुढे एकदा डोक्यात लाकूड घालण्यापर्यंत जीवावरचा प्रसंग ओढवला होता.म्हणजेचं काय कोणतंही चांगलं काम करताना जशी विघ्नसंतोषी माणसं ही वाट्याला येतातचं त्यांची संतोषजींना काही कमी नव्हती..हरेकप्रकारच्या लेकरांचा सांभाळ करताना तारेवरची कसरत करावी लागायची.... हातांत तर पैसे नसायचेच... प्रत्येक वेळेला हाती कटोरा घेऊन लोकांच्यापुढे जावं लागायचं... त्यांनी द्यायचं की नाही त्यांची मर्जी... कधी मदत मिळायची... नाही मिळायची... हेटाळणी तर रोजची ठरलेलीच... वाटेवरचा भिकारी श्रीमंत वाटायचा इतकी दरिद्री अवस्था होती... रोज मागून आणून लेकरांना काय घालायचं हा प्रश्न प्रत्येकक्षणी छळत होता... खायला काय तर बाजरीची भाकरी आणि भाजी... सणावाराला जशी पुरणपोळी करतात त्या पुरणपोळीची किंमत इथं कधी तरी केल्या जाणाऱ्या वरणभाताला होती... हातात नेहमी तुटपुंजा पैसा आडका असायचा... आठवडी बाजार असला की, बाजार संपताना लेकरांच्या हातावर मोजके पैसे ठेऊन बाजार करण्यास पाठवून द्यायचं. किडकं-सडकं जे काही ढिगानं मिळेल ते आणण्यास सांगायचं.
त्यांना न्हाऊ-खाऊ घालण्यापासून त्यांच्या दुखण्याखुपण्यापर्यंत सगळं एकट्याला बघायला लागायचं... त्यांचा सांभाळ... शिक्षण त्यांचं बालपण जपायचं या साऱ्याला एकटा माणूस कुठं कुठं पुरणार... एकेकदा नको वाटायचं हे सगळं... खूप त्रास व्हायचा... चीड चीड व्हायची... रात्ररात्रभर डोळ्याला डोळा लागायचं नाही... उठून रात्रीच्या अंधारात एकटंच भुतासारखं आपल्याच तंद्रीत एका जाग्याला बसून रहायचं... वाटायचं आपण मांडलेला डाव आपणच मोडून टाकावा का..? पण नाही या लेकरांचा भूतकाळ आठवला की, हा त्रागा कुठल्या कुठे निघून जायचा... काय दोष असतो हो या मुलांचा... एकेक मुलाचा भूतकाळ म्हणजे थक्क करणारा...गेवराईतलाचं हा प्रसंग गावापासून दूर गायरानात नवराबायको,लेकरं रहात होती..एकदा नवराबायकोंचं लागलं जोराचं भांडण... दारुडा नवरा गेला कुठे बाहेर...आईने लेकरांना बाहेर पिटाळून लावले आणि घेतले स्वतःला पेटवून...ती लेकरं आईबापाच्या या भांडणाला भिऊन गेली जवळच्या नातलगांकडं आणि नवरा दोन -तीन दिवस बाहेरचं..त्या लेकरांच्या मायेचं प्रेत तीन दिवस जळालेल्या अवस्थेत पडलेलं होतं... सडलेलं होतं... बाप असा दारुडा आणि माय अशी गेली मरून... काय करावं त्या लेकरांनी.त्या अजाणत्या लेकरांवर शेवटी दारोदार भीक मागायची वेळ आलीना..? मग या लेकरांना वाली कोण..?अशा लेकरांना मायेचा आधार देणार कोण..? मी जर ही जबाबदारी नाकारली आणि प्रत्येकांनी जर असं म्हटलं तर ही जबाबदारी मग घेणार कोण .? आज जर मातीमध्ये बियांनी स्वतःला गाडून घेतलं तर उद्या नवीन बीजं तयार होतील ना..... म्हणून तर या लेकरांचं आयुष्य फुलवण्यासाठी संतोषजींनी आपलं आयुष्य रुजवलं.
हे सर्व करत असताना आपण जे काही करतो आहोत ते एक सामाजिक काम आहे याची पुसटशीही कल्पना संतोषजींना नव्हती. पण कालांतराने दोन गोष्टी घडल्या एक म्हणजे संतोषजी एकदा अभय बंग यांच्या शिबिराला औरंगाबाद येथे गेले होते व दुसरी म्हणजे २००९ साली डॉ. बाबा आमटे यांचे निधन झाले त्यावेळी लोकसत्तामध्ये त्यांच्यावर एक अग्रलेख छापून आला होता तो वाचल्यानंतर खऱ्या अर्थाने अनाथाश्रम ही संकल्पना समजायला मदत झाली... मग पुढे कुणीतरी सरकारकडे मदतीसाठी जायला सुचवलं... आणि मग प्रत्येक मुलांच्या माहितीची एक भली मोठी प्रोफाइल तयार केली... आणि मग त्यावेळचे महिला व बालकल्याण मंत्री मा. हर्षवर्धन पाटील यांची इंदापूर येथे भेट घेतली... आपली ओळख त्यांना सांगितली... मुलांच्याविषयीचे कार्य थोडक्यात सांगितले... आणि मग अनुदानाची मागणी केली... तयावेळी मंत्री महोदयांनीही आस्थेने विचारपूस करून पुढच्या कार्याची दिशा सांगितली... अशा कामासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालकल्याण विभाग आहे तिथे या मुलांची माहिती देण्यास सांगितली... आणि मग कार्याच्या निमित्ताने त्या विभागाला गाठीभेटी देण्यास सुरुवात झाली... यातून बरीच माहिती समजत गेली. थोरामोठ्यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळत गेले...काय वेळ असते पहा..या कामाची सुरुवात करताना स्वतःची ओळख लपवून काम करावं लागलं...पण ते करत असताना ते काम एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं की आभाळाएवढ्या उंचीच्या माणसांनी या कामाची दखल घेतली. एकदिवस आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब संतोष गर्जे कोण..?ही ओळख विचारत संताजींच्या अनाथालयात आले.

तर आपल्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती सौ.प्रतिभाताई पाटील यांनी स्वतःहुन पुण्यात बोलावून घेऊन संतोषजीं व त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
संतोषजींनी मुलांचे कायदे... त्याची प्रक्रिया समजून घ्यायला सुरुवात केली. कोणती मुलं घ्यायची त्याच्या अटी व निकष काय..? कायदेशीर बाबी काय आहेत याची माहिती होत गेली... सरकार दरबारी संस्थेची मान्यता... अनुदान मिळण्यासाठी चकरा मारताना नाकेनऊ आलं होतं... किती चकरा मारायच्या त्याला हिशोब नव्हता... भीक नको खरं कुत्रं आवर... अशी तऱ्हा... पैसे मिळवण्यासाठीही पैसे द्यावे लागतात हे त्यावेळी कळालं... कुपंणच जेंव्हा शेत खातं त्यावेळी बोल लावायचा कुणाला..? बिचारा हा माणूस कोणासाठी धडपडतोय आणि आपण कोणाकडे पैसे मागतोय..? याचंही भान या माणसांना नसावं. माणसांत नसलेल्या माणसांची ही अशी नुसती खाऊगिरी... असो पण अखेर अथक प्रयत्नांतून महिला व बालकल्याण विभागाकडून 'आई संस्था संचलित सहारा अनाथालय बालग्राम परिवार' या त्यांच्या संस्थेला शेवटी मान्यता मिळाली.
२०११ साली संतोषजींच्या आयुष्यात प्रीतीजी पत्नी म्हणून आल्या... त्यांच्या लग्नाचाही हा किस्सा मोठा विलक्षण आहे. तो म्हणजे दिनांक ११-११-२०११ साली. घड्याळातील ११ वाजून ११ मिनिटांच्या मोबाईलच्या गजरवर हा अगदी साधासुधा अनोखा विवाह पार पडला... पतीने पत्नीला म्हटले की, 'मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतो' आणि पत्नीने पतीला म्हटले 'मी तुमचा पती म्हणून स्वीकार करते'... बस या परस्पर विश्वासाच्या दोन ओळींनी सहजीवनाचे काव्य रचले...

आजपर्यंत संतोजींच्या रूपातून मुलांना बापाच्या हृदयाची माया मिळत होती... आता प्रीतीताईंच्या रूपातून त्यांना आईच्या मायेचं हृदयही भेटलं आहे.. संतोषजींच्या खांद्याला खांदा लावून प्रीतीताई या मुलांच्या सेवाकार्यात झोकून देऊन काम करू लागल्या... त्यांचं खाऊ-पिऊ-न्हाऊ असू दे दुखणं-खुपणं असू दे सारी निरवानीरव करू लागल्या... संतोजींना आता खुप मोठा आधार मिळाला होता. आतापर्यंत या कार्याचा भार एकट्याने ओढला जात होता... पण त्या कार्यरथाला आता साजेशी दोन चाकं मिळाली होती... खऱ्या अर्थाने आता अधिक ताकदीने काम करायला... मनातलं सगळं बोलायला... दुःखाचा कड हलका करायला कोणीतरी हक्काचं माणूस मिळालं होतं. यानंतर कामाला गती आली..

आतापर्यंत बऱ्यापैकी चांगल्या लोकांच्या ओळखीपाळखी झाल्या होत्या... होतं होत्या लोकांची हळूहळू चांगल्याप्रकारे मदत होऊ लागली... लोकं आपणहून मदत करू लागलीआज समाजाच्या दातृत्वावर खऱ्या अर्थाने संस्थेचं काम चांगल्यापद्धतीने चालू आहे. संस्थेतील तीन लेकरं आज संतोषजींच्या हाताखाली काम करतायेत... समाजातील देणारे मायबाप आणि बालग्राम संस्थेचं एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झाले आहे... दिवसेंदिवस हा स्नेह वृंधीगत होतो आहे... चार दोन दिवसाला कोणी ना कोणी पाहुणे येत असतात या परिवाराला भेटतात,मुलांच्यात रमतात.सहारा अनाथालय बालग्राम परिवार हा एक समाजाचा घटक झाला आहे.
किंबहुना मायेचा हा एक व्यापक परिवार झाला आहे. 'इवलेसे रोप लावीयले दारी त्याचा वेलू गेला उंच गगनावरी' याप्रमाणे इवलाशा अंकुराचं रोपटं झालं आणि आता ते रोपटं आभाळाच्या दिशेनं झेपावूसुद्धा लागलं आहे.अनेक पोरक्या... अनाथ मुलांना साऊली देऊ लागलं...
कधी काळी परक्याच्या आसऱ्याला असणारी 'आई' आज स्वतःच्या जागेत उभी आहे..म्हणजेच आगोदर भाड्याच्या घरात असणारा 'आई संचलित सहारा अनाथालय बालग्राम परिवार' हा परिवार आज स्वतःच्या जागेत उभा आहे. संस्थेची आज तीन एकर जागा आहे...
पक्की इमारत आहे. १७ वर्षांच्या खडतर प्रवासातून आज माय बाप दात्यांच्या उदात्त दातृत्वावर आज या संस्थेची वाटचाल सुरू आहे... सुरुवातीला संतोषजींनी सात मुलांपासून सुरुवात केलेल्या अनाथालय परिवारातून आजतागायत ३०० मुलांना मायेचा निवारा देऊन त्यांचे भरणपोषण करून त्यांना लहानचं मोठं केलं त्यांच्या पायांवर उभं करण्यासाठी त्यांच्या पंखात बळ दिलं..
मुलांच्या शिक्षणाबरोबरच आज या संस्थेत मुलांच्यासाठी वर्षभरात विविध उपक्रम घेतले जातात...बालरंग शिबीर यामाध्यमातून मुलांच्या आवडीनिवडीनुसार त्यांच्या कलेनुसार त्याच्या विकासावर भर द्यायचा...दुसरं म्हणजे भान तरूणाईचे.हे तीन दिवसीय निवासी शिबिर घेतले जाते..परिसरातून व बाहेरून शेकडों शिबिरार्थी या शिबिरात सहभाग घेतात...आदरणीय गुरुवर्य इंद्रजित देशमुख आदी महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत,वक्ते मुलांना मार्गदर्शन करतात.
मुलांच्या विविध कलागुणप्रदर्शनाचा कार्यक्रम.. बाल अविष्कार या कार्यक्रमामध्ये नाटक,गाणी लोकसंस्कृती दर्शन घडवणे अशाप्रकारे मुलांच्या कलागुणांना वाव देऊन मनोरंजनसोबत प्रबोधन करण्याचा हा कार्यक्रम आहे..सध्या याचे पाच प्रयोग झाले असून याला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे... समाजजागृतीचे उद्दिष्ट ठेवून संपूर्ण महाराष्ट्रात हा या कार्यक्रमाचे प्रयोग करण्याचा संकल्प आहे...होळीचा रंग दे बसंती हा कार्यक्रम या कार्यक्रमात देखील बाहेरच्या परिसरातून लहानथोर मंडळी सहभाग घेऊन रंगाची उधळण करून भरपूर आनंद लुटतात.
रक्षाबंधन,भाऊबीज, दिवाळी दसरा असे सर्व सणउत्सव आनंदाने साजरे केले जातात.मुंबई, औरंगाबाद या ठिकाणी जाऊन मुलांनी सहलीचा आनंदही लुटला आहे.
अभ्यासाबतोबरच रांगोळी,चित्रकला,गाणी अशा विविध प्रकारच्या कलेत मुलं रममाण होत असतात.
आज रोजी संस्थेत १०६ मुलं आहेत... अडीच वर्षांच्या बालकापासून २२ वर्षांच्या मुलांपर्यंत ही संस्था त्या अनाथ लेकरांच्या पोरकेपणाला दूर सारून त्यांना आपलंसं करते आहे... त्यांच्या हक्काचं बालपण जपते आहे. त्यांचा मायेनं सांभाळ करुन लहानाचं मोठं करते आहे... आणि शेवटी त्यांना आपल्या पायांवर उभं राहण्याचं बळ सुद्धा देते आहे... आज या संस्थेत राहून मुलं-मुली चांगलं शिक्षण घेत आहेत... मुलं शिकून शहर ठिकाणी इंजिनिअर... तर कोण कंपनीत चांगल्या पदांवर काम करीत आहेत... मुलीही शिकून ब्युटी पार्लर... फॅशन डिझाईन सारखे कोर्स करून आपापल्या आवडीनुसार क्षेत्र निवडता आहेत..
आज संस्थेतील बऱ्याच मुलांमुलींची लग्नं झाली... त्यांना मुलं झाली आणि आता आपापल्या आयुष्यात स्थिरावली आहेत. या घरट्यातून भरारी घेतलेली पाखरं आज उंच उंच झेपावली असली तरी आपल्या घरट्याला बिलकुल विसरलेली नाहीत... आठवण आली की आज ही आपल्या घरट्याला भेट देतात...
संतोषजींच्या प्रखर जिद्दीच्या, कठोर मेहनतीच्या आणि अत्यंत चिकाटीच्या जोरावर हसत्या खेळत्या मुलांचं आज हे नंदनवन साकार झालं आहे.
त्यांच्या या कार्यकर्तृत्वाच्या अनुभवातून या अनाथ मुलांचं जीवन आणखी समृद्ध करण्यासाठी आपल्या समाजानेही आपल्या मानसिकतेत काय बदल केला पाहिजे याविषयी संतोषजी सांगतात... की, "अशा अनाथ लेकरांच्याकडे पाहताना एका विशिष्ट दृष्टीने न पाहता ती ही आपलीचं लेकरं आहेत हा दृष्टिकोन आपल्या दृष्टीत असला पाहिजे... ती मुलं अनाथ झाली त्याला वेगवेगळी कारणं आहेत. पण बऱ्याचदा अश्लीलतेच्या बेवारस कुशीतून जन्माला आलेलं पोर हे जे खापर आपण त्यांच्या डोक्यावर फोडतो त्यावेळी त्या निष्पाप जीवाचा काय दोष याचा गांभीर्याने समाजाने विचार करावा... कुठेतरी हा ही एक सामाजिक दोष आहे... अनाथ मुलांना त्यांच्या हक्काचं बालपण देता आलं... जसं लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा... असं आपल्याला आपलं बालपण हवंहवंसं वाटतं का तर आयुष्यातील तो सर्वात सुखाचा आणि आनंदाचा काळ असतो... आणि असंच सुखाचं आणि आनंदाचा काळ याही मुलांना त्यांच्या बालपणी उपभोगता आला पाहिजे...

एकदा ही मुलं मोठी झाली की, त्यांना आपला बालपणाचा काळ आठवल्यानंतर यातना नको व्हायला आपला बालपणाचा काळ दुःखाचा नको वाटायला... समाजाचं खुप मोठं दातृत्व या मुलांना लाभतंय ही खुपच अभिमानाची गोष्ट आहे... पण इथे एक गोष्ट समाजाच्या लक्षात आणून यायला हवी आहे की, आपण जसे आपल्या घरी जाताना आपल्या मुलांना खाऊ घेऊन जातो... आपण खाऊ घेऊन गेलो याबदल्यात आपण त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवतो का..? मग कुठल्याही अनाथाश्रमातील मुलांना काही देण्यासाठी आलो की, त्यांनी आम्हांला नाचून-गाऊन दाखवावं, नकला, हावभाव करावेत अशी वेगळी अपेक्षा ठेवणारा वर्ग ही आपल्यात आहे हे कमी व्हायला हवं.!पोटच्या लेकरांना काही देताना त्याला झालेला आनंद आपल्याला हवा असतो... बस इथं ही देताना तो आनंद आपण या मुलांच्या चेहऱ्यावर शोधावा... बस इतकी ही सहजसुलभ निरपेक्ष भावना अश्या ठिकाणी अपेक्षित आहे... एकदा का ही मुलं मोठी झाली की, जीवनाची खडतर वाट त्यांना तुडवायची आहे पण त्या आधी हे बालपण त्यांना मनसोक्त आनंदाने उड्या मारू द्या... बालपणाचा प्रत्येक क्षण निखळ स्वछदीपणे जगू द्या... तो अनाथ आहे म्हणून केवळ त्याच्या हक्काच्या बालपणावर अन्याय नको व्हायला... या लेकरांनाही त्यांचं सांगणं आहे... तुम्हीं डॉक्टर, वकील, अधिकारी जे काही व्हायचं ते व्हा... पण त्याच्या आगोदर एक चांगला माणूस होता आलं पाहिजे... आणि पहिल्यांदा तो संस्कार इथं त्यांच्यावर घडवला जातो."

आज मागे वळून पाहताना... या सत्कर्माच्यामागे संतोषजी, पत्नी प्रीतीजी आणि त्यांच्या कुटुंबाचा खुप मोठा त्याग आहे... संतोषजींनी आजपर्यंत खुप मोठा संघर्ष... अनेक आव्हानं आणि धोकेही पेलले आहेत... अशा कार्यात स्वतःला झोकून देताना अर्थातच संतोषजींना स्वतःच्या घरादाराकडे लक्ष देता आलं नाही अर्थातच आता वेगळं असं कुटूंबचं राहिलं नव्हतं... आईबाप अखंड गरिबीशी झगडत राहिले... मुळच्या गरिबीने असह्य चटके दिले होते... आईबाप ऊसतोड कामगार... पोटाची परवड व्हायची... घरात सणवार कधी आनंदात पार पडला असं कधी झालंच नाही... सण साजरा व्हायचा तो दुसऱ्यादिवशी... आई कुणाकडून तरी हातपसा मागून... उसनवारी करून पुरवून पुरवून पोटच्या लेकरांसाठी गोडाधोडाचं करायची... कुणीतरी शेजाऱ्यांनी उरलं-सुरलं दिलं तर तेवढंच रांधायची... बापानं ही खुप कष्टानं संसाराचा गाडा हाकला होता... दोन हातांच्या जीवावर फाटक्या संसाराला ठिगळं लावत लावत सांधला होता... बऱ्यापैकी आकार दिला होता... पण संसाराचे धागे जिथं तिथं उसवतच होतं...
तीन लेकींची लग्नं अजून तीन लेकरं पदरात... त्यांची निरवानीरव... त्यात एक लेक तरुणपणातच सोडून गेली... लेकीच्या नात्याला हळवा असणारा बाप तितच खचला... देहाला अनेक व्याधी जडल्या होत्या... संसारातली जीवघेणी परवड असह्य झाली... सुखदुःखाच्या पलीकडे मनाने धाव घेतली... आणि 'संसाराच्या गाठी... न पडो भेटी इथूनच आता ताटातुटी'... संसारातून निवृत्ती घेतली... मनाची विरक्ती दृढ झाली... एक दिवस बाप गहृत्याग करून परागंदा झाला... आईने कुठं कुठं शोध घेतला... लोकांच्याकडून व्याजावरी पैसे घेऊन दोन वर्षें बापाचा खुप शोध घेतला... कोण म्हणायचं इथं दिसले तिथं दिसले... लगेच तिथं धाव घ्यायची... आणि रिकाम्या हातानं मागं परतायचं... शेवटी बाप गावला नाही तो आजतागायत...
परिस्थितीचे असे असंख्य चटके सहन करत संतोषजी आपले हे दिव्य काम करीतच राहिले. आज संतोषजींच्या कार्याचे योगदान समाजाला पटले आहे विविध स्तरावर याची देखल घेतली जात आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही असे म्हणतात...आजवर खूप संघर्ष केला,त्रास सहन केला,असंख्य अडचणी झेलल्या...असह्य वेदना- यातना भोगल्या...कधी काळी हेटाळणी करणारा हा समाज आज एखाद्या कार्यक्रमाला त्यांना अगदी सन्मानाने प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करतो...आजपर्यंत शेकडों सन्मान सोहळे झाले आता खुद्द मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान सोहळा झाला तरी नवल नको वाटायला.
पुरस्कारांची तरी गिणती कशी करावी..? तरीही 'मा.श्री.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई युवा सामाजिक पुरस्कार-२०१६' अशा प्रतिष्ठित पुरस्कारासह जवळपास ७० च्यावर पुरस्कारांनी त्यांला सन्मानित केलं गेलं आहे..झी टेलिव्हिजन या आघाडीच्या दुर्दशन वाहिनीने २०१८ सालच्या झी युवा गौरव पुरस्काराने त्यांना गौरविले आहे.
तसेच आज टी. व्ही.चॅनेल दूरदर्शन वाहिनीने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली आहे
एका ऊसतोड कामगार मायबापाचा लेक आज शेकडो अनाथ लेकरांचा मायबाप झालाय... धन्य धन्य ते मातापिता ज्यांच्या पोटी असा पुत्र जन्मला 'पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रैलोकी झेंडा.' आज खऱ्या अर्थाने या मायबापाच्या जन्माचे पांग फिटले. आज त्या कष्टकरी माऊलीच्या हृदयात या लेकराबद्दल अपार अभिमान आणि कौतुक आहे... जन्म सुफळ झाला... ऐसा पुत्र पोटी जन्मला... त्या पुण्यवंत आईबापाला वंदन... संतोषजी आपल्या भव्यदिव्य उदात्त कार्यकर्तृत्वाला सलाम... आणि ... मुलांनो..खुप हसा... खुप रुसा... बालपणाचा आनंद खुप खुप लुटा... नात्यांची पोकळी भरून काढा... नाती जोडा... नाती निर्माण करा. खुप शिका... मोठे व्हा... आणि आपल्या घरट्याला कधी विसरू नका... मुलांनो...असंच हसतं खेळतं बालपण तुम्हां मिळो... निखळ आनंदाचे क्षण सदा लाभो. जे जे तुम्हांस हवे ते ते मिळो...
'इवलेसे रोप लावियेलें दरी त्याचा वेलू गेला उंच गनागनावरी.'
संतोषजींच्या हृदयात रुजलेल्या त्या विचारांच्या बीजांकुराचं त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोराने कायाकल्प केला आहे.त्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालंय.त्याच्या निवाऱ्यात कित्येक गोडगोजिरी फुलं उमलताहेत... फुलताहेत...आनंदानं झुलताहेत..त्या माळावर आज हसऱ्या-खेळऱ्या निरागस कोवळ्या मुलांच्या फुलांचं नंदनवनचं फुलंलय...असं आनंदाचं भरलं गोकुळ बघायला...आपण या सारेजण या...इथलं सुख पहा...आनंदानुभव घ्या...त्यांच्या सुखदुःखात सामील व्हा...मिळा...मिसळा...इथल्या बालचमुच कोड कौतुक करा...तुमच्याशिवाय ते कोण करणार..? तुमच्याशिवाय आहेच कोण त्यांना...तुमच्या प्रेमाची..आधाराची आणि दातृत्वाची आज सहारा अनाथालय बालग्राम परिवारास गरज आहे.
"हरवले आभाळ ज्या चिमुकल्या जीवांचे,
ओस पडल्या घरट्यात त्या कोणी ना तयांचे.
आभाळ होऊ आम्हीं आपुल्या पंखाखाली घेऊ.
धरुनी हृदयाशी या पिल्लांना जगण्याचे बळ देऊ."
'जय हो..! मंगल हो..!!'
श्री.संतोष गर्जे यांचा आपल्याला संदेश : "समाजातील संवेदनशील माणसाने अश्या संस्थेच्या पाठिशी उभे राहून पाठबळ दिलं पाहिजे, भेटलं पाहिजे तिथल्या लेकरांचं कोडकौतुक केलं जावं... स्वतःच्या आयुष्याकडे एका नव्या उमेदीने बघण्यासाठी आपण बालग्राम (सहारा अनाथालय) परिवारास भेट द्यावी ही मनिच्छा व्यक्त करतो. "
सहारा अनाथालय परिवारा बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण www.aaifaundation.org या संकेतस्थळाला एकदा अवश्य भेट द्या.
सहारा अनाथालय बालग्राम परिवाराचा हा व्हिडीओ पहा खालील व्हिडीओवर क्लिक करा.
श्री.संतोष गर्जे यांच्याशी बोलण्यासाठी संपर्क क्रमांक: मोबा - 9763031020.
-------------------------------------------------------
- किरण चव्हाण.
मोबा- ८८०६७३७५२८.