फॉलोअर

रविवार, ३० ऑगस्ट, २०२०

कविता तिन्हींसांजेच्या - तिन्हींसांजेचे सुख...किरण चव्हाण.

     

                      'तिन्हींसांजेचे सुख...'



लावलीस...देव्हाऱ्यात लामण दिव्याची सांजवात.

आता बस बघू अशी माझ्या पुढ्यात..

काय निरखतेयस अशी एकसारखी.

बघ तुझ्या डोळ्यांतही तिन्हींसांज दाटून आलीय.

तिथेही एक लामनदिवा जळतोय सांजेचा.

तेवतोय तळ पापणींच्या खाचेतल्या नितळ पाण्यावर.

नको पापण्यांची उसंत काढून घेऊ.

नको नको हलकीशीही पापणी ढळू देऊ नकोस.

नाही तर मिटल्या पापण्यात दडेल ना तो...विझेलही...

कसा तेवतोय बघ हळुवार 

तुझ्या नितळ पवित्र ओल्या डोळ्यांत.

कडकोपरा उजळवलाय काजळ काळ्या काठांवरही ओसडंलाय.

ती वात तान्ह्या अंगाने  कशी शहारतेय बघ..सोसवेना का तिला सांजवाऱ्याचा झोत.

कसे गं तुझे पुरातन राऊळासारखे हे निरामय नेत्ररूप.

जुनेपुराणे देखणेपणाचे मनमोहक प्रसन्न पवित्र तीर्थस्थळच.


दोन नयनपात्रांच्या काठांवर  विसावलेत अलगद समाधिस्त दोन पानमोती.

त्या मोतीयांच्या नितळकाचेतून  सळसळणाऱ्या सोनसळी किरणांचे सोनेरी कवडसे..

हळुवार बिलगतायेत माझ्या नेत्रकटाक्षी.

माजघरातील सांदकोपऱ्यात

घुटमळणारी अवघी शांतता विसावलीय तुझ्या डोळ्यांच्या कानाकोपऱ्यात.

त्या घनदाट काळोखाची चाहूल लागलीसे वाटते  तुझ्या डोळ्यातील उपजल्या नजरेला.

तरीच सावरलीय ती भिडल्या कटाक्षातून.

झाली का पापण्यांच्या पाखरांची लगबग सुरू..

एवढी का कुठे परतीची सांज सरलीय अजून..     

नको ना इतक्यात सुरू करू पापण्यांची पाखडणी.

नाही तर उगीच मनाला लागून राहते ती रुखरुख..

मला अगदी डोळे भरून पाहू दे...डोळेभरुन...

तुझ्या नयनगाभाऱ्यातील माझे तिन्हींसांजेचे सुख.




                                    - किरण चव्हाण.

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

'स्वप्नंही मरतात...' - किरण चव्हाण.

 


                        'स्वप्नंही मरतात...'


                     माणसं मरतातच....
                     पण माहिती आहे 
                     स्वप्नंही मरतात.
                     ..नाही माहिती
                     स्वतःचा गळा घोटून 
                     स्वप्नं आत्महत्याही करतात.
                     हे तर खूपच मामुली..

                    स्वप्नांच्यावर अन्याय,अत्याचार                           होतो.

                   स्वप्नांच्या पाठीतही निर्दयपणे
                   खंजीर खुपसला जातो..
                  .... स्वप्नांचाही खून केला जातो.
                  त्यांचीही खांडोळी केली जाते.
                     स्वप्नं...
                     तुडवली जातात..
                     कुस्करली जातात..
                     भरडली जातात..
                     चिरडली जातात...
                     गाडली जातात...
                     जाळली जातात..
                     मनाच्या स्मशानात 

                       स्वप्नांचीही राख होते...
                     आणि मग शेवटी 

                    मागे उरतात फक्त..
                      मेलेल्या स्वप्नांचे स्मारक

                  म्हणून माणसांचे जिवंत सांगाडे.






बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

शाळेतील प्रसंगानुभव...चित्र पुसलं आणि-किरण चव्हाण.

शाळेतील प्रसंगानुभव...



                                  चित्र पुसलं आणि...


                      चारची लहान सुट्टी संपली मुलं वर्गात येण्याची घंटा वाजली.मैदानावरची सैरावैरा पावलं वर्गाकडे वळाली.घामेजून गेलेली मुलं दम खात एकदाशी आपल्या जागेवर स्थिरावली.पाचवी वर्गावर माझा चित्रकलेचा तास.वर्गप्रवेश करताच हातवारे करून सगळ्या मुलांचा  एकच गिल्ला...

"सर सर..आता चित्रकलेचा तास.." ही अशी मला आठवण करून देणं आणि दुसऱ्याचं क्षणी ..."चित्रं... चित्रं.... चित्रं." अशी एकच 'री' ओढली.

"अरे हो हो...विचित्र मुलांनो तुम्हांला काही दमधीर आहे का नाही...अरे वर्गात तरी नीट येऊ द्याल काय लागलाय ओरडायला नुसतं चित्रं चित्रं..." असं बोलून त्यांच्या सुराला लगाम घालायचा प्रयत्न केला.

 काय सांगायचं या मुलांना इतर विषयांच्या वेळी यांची दमछाक होते आणि या विषयाला मात्र  हे आमची दमछाक करतात..विचार केला कोणतं चित्रं काढावं बरं.?.आणि लक्षात आलं एक चित्रं पाहिलं होतं पाहताच क्षणी आवडलं होतं चला तेच चित्रं फळ्यावर रेखाटूया..ते चित्र होतं एका सुंदरशा बाहुलीचं... काळ्याभोर केसांचे टोपडे मधून माळलेला फुलांचा गजरा..डोक्यावर छानसा तुरा, गोबऱ्या गालाची मिटल्या डोळ्याची निरागस बाहुलीराणी.फळ्यावर मधोमध चित्र रेखाटायला सुरुवात केली...इथे एक मुलं आमचं वाक्य वाचवतात ते म्हणजे मुलांना सांगावं लागत नाही की,वही पेन्सिल काढा म्हणून.न सांगताच त्यांनी वरती काढून ठेवलेले असतात. इकडं फळ्यावर जसं चित्रं रेखाटायचा तशी तिकडं मुलांची ते चित्र उतरून काढायची आपली धडपड सुरू झालेली.चिमुकल्या बोटांतली पेन्सिल फळ्यावरची रेघनं रेघ टिपून घेत होती. अगदी सुटसुटीत असणारा बाहुलीचा फक्त तोंडावळा फळ्यावर रेखाटला रंगीत खडूनीं ओझरत्या काही जागा रंगवल्या...आणि आश्चर्य अगदी कमी वेळात सहजगत्या सुंदर कलाकृती फळ्यावर साकारली गेली...याची जाणीव मला मागून मुलांच्या आलेल्या प्रतिक्रियेतून झाली..."सर लई भारी चित्र आलंय बघा..आवडलं आम्हास्नी.." जगाच्या पाठीवर अशी उस्फुर्त निखळ प्रतिक्रिया ऐकावी तरी कोणाकडून..? मुलांच्या त्या प्रतिक्रियेचं जे काय सुख ते माझ्या मनालाच ठावं.

                                                          मुलं म्हणतायेत चांगलं आलंय चित्रं म्हटल्यावर शेवटचाचं हात फिरवला आणि थोडं लांबून चित्र निरखलं.मुलं म्हणतात तस छान आलं होतं चित्रं..चित्रातली बाहुली अगदी हुबेहूब देखणी वाटत होती.आता या चित्राचं प्रतिबिंब मी मुलांच्या वहीत पाहू लागलो... फळ्यावरचं चित्र पाहून मुलं जीव ओतून आपल्या वहीत चित्र रेखाटत होती..आपल्या चिमुकल्या कुंचल्यातून चित्र साकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होती...कुणाचे अर्धे,कुणाचे पूर्ण चित्र मोठ्या कौतुकाने एकेक करून मुलं चित्र दाखवायची..जे त्यांनी काढलं होतं ते त्यांच्यापरीनं चांगलंच होतं. मी थोडाफार बदल सांगून त्याच्या पाठीवर भरपूर शाबासकी देत होतो...सारी मुलं अशी चित्रं काढण्यात दंगून गेली असताना.अखेर शाळा सुटण्याची घंटा वाजली.ज्यांचे चित्र अर्धवट होते त्यांचा ओझरता हिरमुसलेपणा माझ्या लक्षात आला आणि मग मी म्हटलं "काही हरकत नाही मुलांनो ज्यांचं चित्रं अर्धवट राहिलय त्यांनी उद्या पूर्ण करा, चला आता आवरा पाहू.." वंदे मातरमने आजच्या दिवसाची सांगता झाली आणि वर्गातून बाहेर पडताना काही मुली म्हणाल्या..." सर चित्रं छान आलंय हं, तुमच्या मोबाईलमध्ये  त्याचा फोटो काढून ठेवा सर.." अरे हे मला सुचलच नाही की, "हो हो.."म्हणत मी जाता जाता माझ्या मोबाइलमध्ये त्या चित्राची छबी टिपली. 

                                      दुसऱ्या दिवशी पहिल्याच तासाला आमचे सुतार सर पाचवीच्या वर्गावर गेले आणि हातात डस्टर घेताचं मुलांनी एकच गोंधळ सुरू केला. "सर आमचं चित्र पुसायचं नाही अजून आम्हीं चित्र वहीत काढायचं पण आहे." सर्वचं मुलांनी काहीशा अधिकारवाणीने केलेला तो निरागस हट्ट सरांनाही मोडवेना. नाईलाजाने फळ्याच्या मधोमध असलेलं ते चित्र तसेच ठेवून उरलेल्या बाजूच्या जागेत सरांनी गणिताची मांडणी केली.असाच पहिला, दुसरा,तिसरा तास झाला तरी काही मुलांनी येणाऱ्या सरांना चित्र पुसू दिले नाही.दुपारी जेवणाची मोठी सुट्टी झाली..तरी फळ्यावर अजून चित्र तसेच.मी व्हरांड्यातून एक फेरफटका मारला आणि माझ्या पाचवीच्या वर्गात शेवटच्या बेंच वर जाऊन बसलो.बाजूलाचं काही मुलं जेवण्यात गुंग होती.काही फळ्यासमोर उभा राहून त्या चित्राच्या बगलेला त्याची प्रतिकृती चिमुकल्या हाताने मनसोक्तपणे रेखाटत होती. बाकीच्या वर्गातीलही मुलं कुतूहलाने या वर्गात येऊन ते चित्र पाहून जात होती.

                                काल रेखाटलेलं चित्र आता माझ्या डोळ्यासमोर होतं..आणि असच त्याच्याकडे एकटक पहात असताना विचारांच्या तंद्रीत हरवलो..मनात एक विचारांचं चित्र हळूहळू स्पष्ट होत होतं.किती साधं चित्र अगदी सहजपणे रेखाटलेलं पण का कुणास ठाऊक मुलांना आणि मलाही त्याची इतकी ओढ लागावी..? आता हे चित्र पुसलं जाईल कुंचल्यातून निर्मिलेली एक न एक रेघ क्षणभरात लुप्त होईल ती पुन्ह्यांदा कधी न दिसण्यासाठी. जशी माणसं काळाच्या पडद्याआड निघून जातात कायमची ती पुन्हा कधीच दिसत नाहीत.तसच याही चित्राचं होईलह. याच्यापेक्षाही सुंदर चित्र रेखाटता येतील ना..? मग काय हरकत आहे ते पुसलं तर ?  पण प्रत्येक कलाकृतीची एक वेगळी ओळख असते...ती कलाकृती निर्माण करताना त्यात भाव ओतलेला असतो..त्या प्रत्येक कलाकृतीशी कलाकाराचं अजोड नातं जोडलं गेलेलं असतं... म्हणून दुसरी कोणतीही कलाकृती कितीही सरस असली तरी तीची जागा नाही घेऊ शकत...प्रत्येकाचं स्थान वेगळं जसं माणसांचं असतं तसंच या चित्राचंसुद्धा...त्याचं स्थान मुलांच्याच काय माझ्याही हृदयात स्थिरावलंय म्हणूनच जे मुलांना वाटतं ते मलाही की, हे चित्र कधीच पुसू नये. एकाएकी घंटेचे टोल कानांवर पडले आणि माझी ही विचारशृंखला मध्येच खाळकन तुटली..एकदाशी माझी ती विचारमग्न समाधी भंगली.

                                                          मोठ्या सुट्टीनंतर इ सहावी व सातवीवर माझी तासिका झाल्या.आणि पुन्हा चारच्या सुट्टीनंतर मी माझ्या पाचवीच्या वर्गावर आलो.आपसूकच नजर फळ्यावर गेली. आता फळ्यावर ते चित्र नव्हतं.पुसलं गेलेलं.सहाजिकच पुसलं तर जाणारच.मी असो किंवा कोणीही त्याला पुसावं लागणारच होतं. मी त्या चित्राच्या बाजूला लिहिलेलं होतं 'मी बाहुली राणी झाले उदासवाणी म्हणजे ती पुसली जाणार होती म्हणून की काय उदास होती...असो. मी माझ्या शिकवणीला सुरवात करणार पण आता समोरचे गंभीर वातावरण लक्षात यायला मला वेळ लागला नाही. काल तर हीच मुलं किती आनंदाने चित्र काढा म्हणत होती...मग आता काय झालं..? त्यातल्या त्यात काही मुली तर मला फार उदासवाण्या दिसत होत्या.पण मुलांनी शेवटी तोंड उघडले..."सर मुली सरांना चित्र पुसुच देत नव्हत्या...आणि सरांनी चित्र पुसल्यानंतर म्हणून त्या रडकुंडीला आल्यात.." अस आहे तर आता खरी परिस्थिती ध्यानात आली.

                                                           चित्र काढल्यापासून मुलं त्या चित्रात गुंतलीचं होती इतकी की,त्यांना वाईट वाटणारचं हे मी समजून गेलो होतो. समोरच्या बाकावरील तर दोन मुली अगदीच काकुळतीलाचं आलेल्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या.आता काय करावे बरं.?.चला काही शिकवण्या अगोदर  त्यांची नाराजगी दूर करूया..साऱ्यांना हसते करूया म्हणून मी माझ्या ठेवणीतलं पान काढलं...म्हणजे आमचा 'श्री'.आमचा श्री म्हणजे कलंदर विद्यार्थी... त्याची एक गाणं  म्हणायची पद्धत काही औरंच. म्हणजे अशी की मुळ गाण्यात आपलेच शब्द घुसडून चांगल्या गाण्याची अशी वाट लावायचा ,हसून हसून पोटात दुखेल ऐकणाऱ्याच्या. मग काय श्री ने आपली केली सरळ सुरुवात आणि शिरला एकदासा वाकड्यात..सगळा वर्ग लागला ना खो खो हसायला...लढवली शक्कल कामी आली पण दोन मुली सोडून...सगळा वर्ग हसला पण या बया हसायलाच तयार नाही...रुसून फुगून टम्म....बरं श्री चं गाणं सगळ्या वर्गाला लागू पडलं आता प्रश्न या दोघींचा होता..हत्ती गेलं आणि शेपूट राहिलं तशातली गत आता दोघींना कसं हसवायचं...चला शेवटचं पान मीच हाती घेतलं... सलील कुलकर्णी यांनी गायलेलं 'चिमुकल्या चोचीमध्ये आभाळाचे गाणे' हे गाणं मुलांना सांगून गाऊन घेतलं...आणि शेवटी गणपती स्रोताने शेवट केला माझ्या एकूण प्रयासातून मृणाल नावाची मुलगी शेवटी गाण्यात रमली कारण तिला मुळात गाण्याची आवड असल्याने शेवटी ती रुळली पण श्रावणी नावाची मुलगी काही आपला हेका सोडायला तयारच नाही..'.यानें की हमे सिर्फ एक कामियाबी हासील हुई.' अखेर शाळा सुटण्याची घंटा वाजली..वंदे मातरमनंतर मुले वर्गातून बाहेर पडू लागली.जाता जाता पुन्हां एकदा श्रावणीला समजावण्याचा प्रयत्न केला तो ही वाया गेला. आता बाकीच्या मुली मला म्हणायला लागल्या. "सर आता ती तुमच्याशी बोलणारच नाही..रुसलीच आहे तुमच्यावर.."

                                                               आता माझ्यावर रुसून काय करणार बिचारी. चला एकदाका घरी गेली की,विसरून जाईल सर्व म्हणून मी काढता पाय घेतला आणि वर्गातून  सरळ ऑफिसच्या दिशेने जाऊ लागलो...व्हरांड्याच्या दगडी पायऱ्या उतरून पुढे दहा पाऊलेही टाकली नसतील तोच मुली मागून ओरडून सांगू लागल्या..."सर...सर...मागे या..मागे..या..श्रावणी काही घरी जात नाही इथंच थांबून राहिलीय" झाली का पंचायत. काय करणार वळलो माघारी.तिच्या जवळ गेलो तर आदीच तिच्याभोवती तिच्या मैत्रिणींचा गराडा पडला होता "आता ती हुंदक्याने दाटून आली होती... अश्रू अनावर झाले होते...डोळ्यांना मुठी लावत अक्षरशः ती अश्रू ढाळत होती.कसं समजवावं या पोरीला.. मी आणि माझ्याबरोबर आमचे गुरव सर दोघेजण तिची समजूत घालू लागलो होतो तिच्या काही मैत्रिणीही जाणतेपणाने तिला समजावीत होत्या आणि मलाही सांगत होत्या "सर आता उद्या या बाहेरच्या फळ्यावर चित्र काढा आणि त्याच्या खाली लिहा सुद्धा हे चित्र कोणी पुसू नये म्हणजे कोणी पुसणार नाही." किती एकीकडे  हा मुलींचा सामंजस्यपणा आणि  दुसरीकडे श्रावणीचा हा हट्टीपणा..मुली खरंच समजूतदार होत्या त्यांच्या त्या जाणतेपणाची केवढी ही समज म्हणायची आम्हाला जे सुचत नव्हतं ते त्या बोलून अगदी शिताफीने तिची समजूत काढत होत्या आणि मग कुणास ठाऊक कसं माझ्या लक्षात आलं तसं मी तिला म्हणालो..." श्रावणी चित्र कुठंही गेलेलं नाही मी त्या चित्राचे फोटो मोबाईल मध्ये काढले आहेत बघ हवे तर..तुला हवे तेंव्हा पहा मग तर झालं." आणि मग काय सांगायचं,अखेर ही शेवटची मात्रा मात्र लागू पडली.हुश$$.शेवटी काही का असेना नकळत हास्याची एक ओझरती लहर तिच्या चेहऱ्यावर दाटली...आणि मैत्रिणीच्या गरड्यातून ती घराच्या वाटेला लागली आणि मी ऑफिसच्या...

                                        आता पुन्हा मनात मगाची ती दुभंगलेली माझी विचारशृंखला सांधली जाऊ लागली मी त्या विचारशृंखलेत विचारांचे एकेक मणी ओवू लागलो...एक साधसंच चित्र रेखाटलं आणि काय प्रसंग उभा राहिला...उगाच वाटून राहिलं त्याच वेळी पुसलं असतं तर बरं झालं असतं या मुलांना त्या चित्राचा लळा तरी लागला नसता....पण शेवटी मुलंचं ती निर्जिवत्वमध्ये जिवंतपणा शोधणारी.पण लळा लागावा तो कशाचा एका चित्राचा. जे काही क्षणांनंतर पुसलं जाणार आहे.मला ही ते चित्र पुसलं जाण्याची कुठे तरी मनात हूरहूर लागलीच होती की...माझ्या त्या अव्यक्त विचारशृंखलेचं व्यक्त रूप मुलांच्या त्या डोळ्यांत दिसलं होतं..एकीकडे माझ्या मनातील ते विचार आणि दुसरीकडे त्या बाल मनातील भावना यांच्याशृंखलेतील सुवर्णमध्य विचारमोती अंती गवसला तो हाच की, बाळांनो इथं काहीच चिरंतन नाही जे आकाराला आलं ते कधी ना कधी निराकार होणारच...फळ्यावरच्या त्या एका चित्राचं काय घेऊन बसलात जगाच्या पाटीवरील माणसं पुसली जातात बाळांनो, मग त्यांच्यासाठी कोणी थांबतं का..? नाही ना..पुन्हा नवी माणसं.. नवी नाती...जशी पाने गळल्या फांदीला नवीन पालवी फुटते...तस आपण नव्याच्या शोधत असलं पाहिजे... एकाच गोष्टीत गुंतून नको पडायला.. नवनिर्मिती करीत राहिलं पाहिजे...जुनेपणाला मागे सारून नव्याचा आंनद घेता आला पाहिजे..  या एका चित्राचं काय..?.चला मुलांनो पुन्हा नव्याने अशी नवी चित्रं काढुया...पुन्हा पुसुया...पुन्हा काढुया...काढत राहूया...



नाळ कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात पुस्तकातील सहभागी लेखक सन्मान सोहळ्यात माझ्या 'चित्र पुसलं आणि...' कथेबद्दल महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री मा. सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्याहस्ते सन्मान स्वीकारताना, व्यासपीठावर  प्रा.जी.पी.माळी सर,किसनराव कुऱ्हाडे सर,आप्पासाहेब खोत, विस्तार अधिकारी श्री.विश्वास सुतार साहेब उपस्थित साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर.


                                      साहित्यिकांची मांदियाळी



मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२०

आठवणींचा सांदीखोपडा#१ - 'गणक्यांची बैलगाडी'- किरण चव्हाण.

आठवणींचा सांदीखोपडा#१

आज बैलपोळा त्यानिमित्त...


                       'गणक्यांची बैलगाडी.'

                                   कुडाण्यातनं पिंजार उपसून आणलं की त्या पिंजराच्या भाऱ्यात लांबसडक कडब्याच्या पेंडीचा बिंडा असायचा.गोठयात न्हाय तर शेड्यावर भारा टाकला की, भलत्याच आनंदात माझी पावलं त्या भाऱ्याकडं झेपावायची...त्या भाऱ्यात घबाड असल्यागत मन हारखून जायाचं. पिंजाराच्या भाऱ्यात तुरा खवल्यागत कडब्याच्या धाटांचं बाहेर आल्याल शेंडं दिसायचं...त्या सरळसोट धाटांच्या वरती दोन इत लांब पांढुर पिवळ्या रंगाचं  गणकं असायचं.ते वरचं गुळगुळीत गणकं कटाकदिश्यान मोडून घ्यायचं...या गणक्यांचं माझ्या बालमनाला किती अप्रूप..? दहा बारा गणक्यांचा मेळ करून घ्यायचा.दोन मुठीतला तो जुडगा एक करून रवी घुसळावा तसं घुसळत घराकडं पळायचं..ते गुळगुळीत गणकं एकमेकांवर घस्टून सळकून निस्टांयचं आणि कातर कातर आवाज यायचा...लई मज्जा वाटायची... घरात आलं की, गणकं घेऊन बाबांकडं जायचं..त्यांच्या हातात ते दित  मग एकच रट लावायची.

" बाबा मला गणक्यांची बैलगाडी करून पायजे."

"आता न्हाय मगश्यानं करू ." बाबा हातात गणकं घ्यायचे पण उलट मला परत करत बोलायचे.

.."नाही आताच्या आता पायजे.." हा माझा त्यावेळचा हट्टच असायचा.

                                       पण बाबा कुठल्या तरी कामाच्या धबडक्यात अडकून असायचे..त्यामुळे माझा नाईलाज व्हायचा..पण सारखा लकडा सुरूच हं.  हातातली कामं निपटून बाबांनी हे काम हातात घ्यायला तिन्हीसांज व्हायला आल्याली असायची.मग मी ते दिवसभर हातातनं घेऊन फिरलेलो गणकं शेवटी बाबांच्या हवाली करायचो. एखाद्या शेतकऱ्यानं बैलगाडी करण्यासाठी लागणारा लाकूडफाटा सुताराकडं जमा करावा तसं. बाहेरच्या सोप्यात आमच्या बापलेकाची बैठक बसायची...आता माझे बाबा सुतारमामा होऊन गणक्यांची बैलगाडी करण्याच्या कारागीरीला सुरुवात करायचे. मी बाबांच्या पुढ्यात बसून सगळं ध्यान देऊन बघत असायचो.

गणका

                               बारीक मोठ्या मापाचं गणकं हातात घेऊन बाबा.त्याच्यातलं चांगलचं पाच-सहा  गणकं निवडून घ्यायचे...बाकीचं राहिल्यालं  मी माझ्याजवळ ठेवून घायचो..कणसं छाटल्यालं तिरप्या धारेचं शेंडं... त्यो टोकदार गोचका..चरचरीत धारेचा.दिसतोय साधाच पण कधी कसा घात करील कळायचंही नाही..अंगाला नुसता वरनं छाटून जरी गेला तरी रक्ताची रेषा उमटेल..बाबा तो गणका उभा धरून वरच्या गोचक्याच्या काठास्न केळाची साल सोलतात तसं चिमटीनं लांबसडक धडपेची एकेक चिमकी सोलून काढत.भोवतीभोरनं अशा चिमक्या काढायच्या.मग शेवटाला उरायचा तो मधला  पांढऱ्या बळूसारखा गन्ना (मधला गाभा).. 

अंगावरचं वस्त्रहरण झाल्यासारखी त्याची अवस्था...अंग सोलटलेला सरळसोट लांब मऊ गुबगुबीत तो गन्ना..त्याच्यासारखीचं अजून दोन तीन गणक्यांची तऱ्हा व्हायची...आणि मग बैलगाडी करायला खरी सुरवात व्हायची...सुतार जशी खरीखुरी बैलगाडी करतो तशी आमचे बाबा गणक्यांची बैलगाडी करायचे..लेकरासाठी बापाला काय काय करावं लागतं...हे बाप झाल्यावरच समजू शकतं नाही.. मी मन लावून ते बघत असे....

                                 एका बाजूला पायाजवळ काढलेल्या त्या लांबड्या चिमकाट्या.त्यातली एकेक चिमकी उचलून त्या,कमी जास्त मापाच्या मोडून गण्यात टवायच्या...दोन्हीं बाजूला खाली वर गन्ना त्याच्या मधोमध  चिमक्या टवून दोन्हीं बाजूची शिडी बनवायची..त्याला पुन्हा आडवा गन्ना जोडून एकसारख्या चिमक्या त्यात टवून मग बसाययचा हौदा तयार व्हायचा...मधला आडवा कणा.तसंच चिमक्या वाकवून केलेली गाडीवान बसायची जागा कातरी..आणि मागून सरळ पुढं एक ढोबळा गणका जोडून शेंड्याला खाली नकाडा गणक्याचा तुकडा जोडून  पुढची बाजू टेकवायचा तयार केलेला  घोडा .....त्याला आडवा जु...आता हे सगळं झाल्यावर या बैलगाडीला खाली चाकं जोडायची...मग ती कशाची..? तर लांबलचक दोन चिमक्या घेऊन त्या वाकवून अर्धगोल करायच्या...त्याचं एक टोक पुढं आणि दुसरं टोक मागं टवायचं असंच दुसऱ्या बाजूला...म्हणजे फिरणारी चाकं नसायची तर त्या अर्धगोल वाकलेल्या चिमक्या हीच बैलगाडीची इंटरनॅशनल चाकं.जमिनीला घस्टत पुढं पुढं सरकणारी.. ..झाली एकदाशी नाजूक साजूक,हलकी फुलकी इवलीशी गणक्यांची बैलगाडी तयार..आणि मग उरलेल्या गणक्यांतून बाकीची अवजारं नांगर,कुळव,फाटं इ.



 ती गणक्यांची बैलगाडी हातात घेऊन आनंदानं नुसता मिरवायचोचं..आता बैलगाडी तर तयार झाली..पण बैलं कुठं हाईत गाडीला..?  मग मी वळायचो आईकडं.. आईला विचारायचो."आई...माझी  बैलं कुठायत..? मला माझी बैलं पायजेत." म्हणजे बैलगाडी बाबांच्याकडूनं आणि बैलं आईकडून घ्यायची असा माझा आगळावेगळा सौदा असायचा.

          
बेंदराला देव्हाऱ्यात चिकलाची बैलं पुजायची.आणि पुजून झाल्यावर मग ती शेवटी माझ्याच सोध्यानं.मीच त्यांचा मालक. पण त्यावेळेस आई म्हणायची "दोन दिवस तरी ऱ्हावू द्यात देवाऱ्यात.. मग घे म्हणस...एकदा खेळाय घेतलास म्हंजी मोडूनचं टाकतोस" मला कधी एकदा ते दोन दिवस पूर्ण होतील याची घाई असायची...तस तर बेंदूर सणाची मी वाटचं बघत असायचो,चिकलाची बैलं खेळायला मिळायची म्हणून.एक वर्षी तर बेंदूर सण झाल्यानंतर देवाऱ्यातली बैलं मी देवऱ्यातच एका देवाच्या फोटोमागं किती दिवस लपवून ठेवली होती..त्यांच्यासंग खेळण्यापेक्षा त्यास्नी जपून ठेवण्यातचं मला कसला आनंद मिळत होता कुणास ठाऊक..? दररोज त्या फोटोच्या माग हात घालून बाहेर काढून बघायचो आणि पुन्हा त्या जाग्याला ठेवायचो...

                  

                      बऱ्याचवर्षी असं व्हायचं बैलं नवीन नवीन असताना घरातील लोक बैलांच्या गळ्यात पदराकाठाची नाडी नाही तर सुतळीचा तोडा बांधून मला खेळायला द्यायचे आणि मग मी त्या बैलांस्नी माझ्या मागणं नुसतं टरारा वडत खेळायचो..कधी हातानच धरून भुईला घासत फिरवायचो... मग काय एका बैलाचा कान मोडायचा तर दुसऱ्याचा पाय मोडायचा. वरचं शिंग तर मोडायचं नाही तर मागची डीकवल्याली शेपूटचं गायब झाल्याली असायची...कधी कधी एखादा डोळा तरी निकळून पडायचा तर कधी बगलेचा कानच तुटायचा हमखास.अशी काही ना काही दुखापत त्या बैलांना झालेली असायचीच...तेवढा रगडाच करायचोचं ना मी त्यांचा..तसं मी कष्टच करून घ्यायचो  त्यांच्याकडून त्यामुळं...

                                   हा खेळ नंतर नंतर विसरलो की माझ्या माघारी आई कुठल्या तरी दिवळीत ती बैलं ठेवून द्यायची..असो तर आईकडं बैलं मागितल्यावर...आई आपलं काम माग ठेवून वळखीच्या ठिकाणी ठेवलेल्या दिवळीत हात घालून ती बैलं काढून माझ्या हातात ठेवायची... आता दोन्हीं हातात दोन बैलं पकडून मी धावायचोचं.

                            शेतकरी वेसण घालून सापत्या हातात धरून बैलास्नी नेतो पण इथं मी त्यांच्या बकोटीला पकडून उचलून मी पुन्हा बाबांच्याकडे यायचो..मग बाबा त्या बैलांच्या मानंवर त्यो हलका फुलका जु ठेवून तो कुठं निसटू नये म्हणून नकाड्या चिंधुकीनं  बैलांच्या गळ्याला बांधायचे आणि मग शेवटी ती बैलगाडी माझ्या हवाली करायचे..


                            आता माझा खेळ सुरू...मी ते राहिल्यालं गणकं, गणक्यांचा नांगर, कुळव,फाटं त्या बैलगाडीत भरायचो आणि...मग माझी गणक्यांची बैलगाडी दौडायची खोट्या खोट्या शेताकडं ...मी छोटासा गाडीवानदादा... माझी चिकलाची बैलं आणि गणक्यांची बैलगाडी..


                                          - किरण चव्हाण.



(प्रिय वाचकहो....

              सदर लेखासाठी  'गणक्यांच्या गाडीचे 'चित्रं हवे होते...गुगलवर खुप शोध घेतला पण नाही सापडले..पण जे गुगलला जमलं नाही ते यांनी केलं..

श्री. यशवंत गुरव.

हरहुन्नरी कलाकार आणि माझे गुरुबंधू श्री. यशवंत गुरव,बंधूप्रिय प्रविण आराध्येआणि दयानंद लोहार यांनी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून ही दुर्मिळ झालेली गणक्यांची बैलगाडी पुन्हां प्रत्यक्षात साकारली...केवळ आपल्या प्रिय वाचकांच्यासाठी..तरी त्यांचे मनःपूर्वक आभार..)

रविवार, १६ ऑगस्ट, २०२०

कविता - सरकारीच पाहिजे. - किरण चव्हाण.

                     आजच्या काळात जेंव्हा मुलगा मुलगी पहायला जातो तेंव्हा सहाजीकच मुलगीच्या घरच्या अपेक्षा वाढलेल्या दिसून येतात... आणि त्यामध्ये एक अपेक्षा असतेचं असते ती म्हणजे मुलगा सरकारी नोकरीला असला पाहिजे...ही अपेक्षा असणं वाईट नाही पण याचा अर्थ असाही नाही नोकरीलाचं प्राधान्य देताना  की तो मुलगा कसा आहे..? याला आपण दुय्यम स्थान द्यावं...त्यावर आधारित ही रचना...


.... सरकारीच पाहिजे.


आवं पावणं पोरगं निरोगी,निर्व्यसनी हाय.

चांगलं धट्टा-कट्टा,धडपडी,हरहुन्नरी हाय....


पावणं ते काय न्हाय...

पोरगं सरकारीच पायजे हाय.


पावणं...पोरगं चांगलं शिकल्यालं हाय,सुशिक्षितबी हाय..

पण एवढंच काय,जरा खाजगी नोकरीला हाय.


पावणं ते काय न्हाय...

पोरगं सरकारीचं पायजे हाय.


प्रामाणिक हाय हं...पोरगं. 

चांगल्या विचारांचं हाय.

लई चांगल्या गुणांचं, माणुसकीला धरून हाय.


पावणं ते काय न्हाय...

पोरगं सरकारीचं पायजे हाय.


बरं... पोरगं उद्योगी हाय..चांगला पैसा कमावणारा हाय...

घरदार बघितला तर सगळं जिथल्या तिथं हाय.


पावणं ते काय न्हाय...

पोरगं सरकारीचं पायजे हाय.


पावणं चार एकर शेती हाय, पोरगा उत्तम शेती करतो..

कायबी कमी न्हाय गुण्यागोविंदाने राहतो.


पावणं ते काय न्हाय...

पोरगं सरकारीचं पायजे हाय.


पोरगा माप शिकलाय पण 

व्यवसाय करायचा म्हणतोय,

लाथ मारील तिथं पाणी काढल..

आसं खणखणीत नाणं हाय.


पावणं ते काय न्हाय...

पोरगं सरकारीचं पायजे हाय.


स्वभावानं पोरगं बघा,एक नंबरी हाय..

आई-बाच्या शब्दाबाहीर जरासुद्धा न्हाय.

पैसा आडका धन दौलत काय कमी न्हाय

खाऊनपिऊन सगळं कसं सुखामधी हाय..


पावणं ते काय न्हाय...

पोरगं सरकारीचं पायजे हाय.


सरकारी...सरकारी...सरकारी.


बरं पावणं हाय एक पोरगं आसं.

तुम्हीं म्हणताय तसं..


वरून दिसायला माप चांगलं पण गुणानं चांगलं नाय...

व्यसनीबी हाय आणि जरा रोगीबी हाय.

नोकरी हाय म्हणायची सरकारी,

पण कसं वागायचं कळत नाय..

लाचारासारखा वागतो, थोडा भ्रष्टाचारही करतो..

प्रमाणिक तर नाही,

ना कुणाशी देणं-घेणं.

सदा आपल्याच तोऱ्यामोऱ्यात.

नाही विचार करून वागणं.

पगार माप चांगला हाय खरं वागण्याची अक्कल नाय.

पण एवढं मात्र नक्की पोरगं सरकारीचं हाय...


मग काय पावणं...? याच्यापुढं तुमचा इचार तरी काय..?


पावणं ते काय बी आसू दे..

पोरगं नक्की सरकारीच नवं हाय...

याच्यापुढं कसलाच इचार पाचार न्हाय.


             - किरण चव्हाण.

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

'अनाथांचा नाथ...मायबाप संतोष गर्जे'.- किरण चव्हाण.

 


ऊसतोड कामगार मायबापाचा लेक झाला शेकडों अनाथ लेकरांचा माय-बाप...

            ...असा अनाथांचा नाथ संतोष गर्जे.


                                             एक दुर्दैवी अघटीत घटना आयुष्यात घडली. ज्याने हृदयावर असा काही आघात केला की,ती ठसठसणारी वेदना संवेदना होऊन गेली. आपल्यासारख्या अनेकांच्या वेदनेंशी ती नातं जोडत गेली.. तो अशाच वेदना घेऊन जगणाऱ्या, मायेच्या नात्यांना पोरकं झालेल्यांना हृदयाशी जोडत राहिला.. विस्कटलेल्या.. उध्वस्त झालेल्या.. निरागस निष्पाप कोमजेलेल्या मुलांच्या मायेचा तो धागा झाला... तो होतो त्यांचा तारणहार... ज्यांची माय गेली त्यांची माय झाला... ज्यांचा बाप गेला त्यांचा बाप झाला...आणि ज्याचं सर्वस्व गेलं... त्यांचं तो सर्वस्वचं झाला... ज्याला कोणी नाही त्याला तो आहे आणि असा तो अनाथांचा नाथ... माय-बाप संतोष नारायण गर्जे.

                                            बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पाटसरा हे छोटसं गांव.. या गावात वडील नारायण गर्जे व आई छबुबाई नारायण गर्जे यांच्या पोटी २७ ऑगस्ट १९८५ साली संतोषजींचा जन्म झाला. तीन भाऊ-तीन बहिणी अशी एकूण सहा भावंड.. आईवडील शेतमजूर,ऊसतोड कामगार... हातावरचं पोट त्यामध्ये खाणारी तोंडं आठ... हाताला जेंव्हा काम तेंव्हाच कुठे हातातोंडाची पडणारी गाठ... गरिबी तर पाचवीलाच पुजलेली.पूर्णपणे हलाखीची परिस्थिती.माय-बाप ऊसतोड असल्याने कामाच्या निमित्ताने परमुलखाला जायचे..सहा- सहा महिने त्यांची भेट व्हायची नाही.जिथं खायचे वांदे तिथं शिक्षणाचं काय..? त्यामुळं  शिक्षणाची ही ऐसीतैसीचं. मुली उपवर झाल्या तशा लगीन लावून दिल्या... त्यात संतोषजींचं भाग्य एवढंच की, सगळ्या भावंडात त्यांना कॉलेजपर्यंत शिक्षण मिळत गेलं.. संतोषजी १२ वीला असताना ती दुर्दैवी घटना घडली... त्यांची मोठी ताई लगीन होऊन सासरी नांदत होती...तिच्या पोटाला पहिली साडेतीन वर्षांची नेणती पोरं.. आणि ती पुन्हा सात महिन्यांची गरोदर होती... घरात भांड्याला भांड लागतं तसं संसारात नवरा बायकोचं भांडण हे ठरलेलचं. पण एकेदिवशी जोराचा वाद झाला नवऱ्याला राग अनावर झाला... डोळं नसतातचं रागाला ते खरंच... रागाच्या भरात त्याने मारली जोराची लाथ त्या नाजूक पोटावर...अन ती धाडकन कोसळली जमिनीवर... तळमळली... तडफडली... जीवानिशी कळवळली...  नाही तो आघात तिला सहन झाला.. नी शेवटी सोडला तिने प्राण पोटातल्या नेणत्या जिवासह... दोन जीवांचा अंत झाला..हे अमानुष पातक घडल्यावर त्यावेळी इकडे संतोषजींच्या आईवडिलांना निरोप आला तुमची मुलगी आजारी आहे बघायला या.जातात तर काय..? तिथे उरला होता फक्त तिचा निर्जीव देह.                  

                       एक सुंदर निरागस उमलत्या कोवळ्या कळीची माय या जगातून कायमची निघून गेली.. कळी पोरकी झाली. 


काय चूक होती हो तिची..? तिच्या मायेचं छत्र हरवलं... आता तिला आईची माया कशी मिळणार..? बाप असूनही बाप राहिला नाही.. असा निष्ठुर बाप... बाप होऊ शकतो...? नाही. तिची माय गेली आणि बापही... आता कोण देणार या नकळत्या लेकराला मायबापाचं प्रेम ?... संतोषचे आईवडील त्या नकळत्या निरागस लेकराला घरी घेऊन आले..संतोषजींच्या संपूर्ण घरासाठी हा मोठा धक्का होता... कसं सावरायचं यातून..? आईवडिलांचं छत्र हरपण हे जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख... तिचं हे दुःख कोण निवारील..? आता होता येईल का कोणाला तिचा मायबाप...?  आणि असाच तिचा मायबाप होऊन विचार करत होता तो... तो म्हणजे संतोष... आणि ठरलं.मऊ मातीवर वळीव पावसाचे थेंब झडावेत आणि फुटावा रुजल्या बीजाला नवांकुर... तसं या प्रसंगाने संतोषजींच्या संवेदनशील मनातून एक विचारांकुर फुटला.या निष्पाप निरागस जीवाचा आपण झालो तर मायबाप..? होय आपण व्हायचं मायबाप.. पण या एकाच जीवाच्या नाही तर अनेकांच्या... ज्याची माय नाही त्याची माय आणि ज्याचा बाप नाही त्याचा बाप व्हायचं... जसा अनेक फुलांना गुंफणारा धागा तसा पोरक्या मुलांच्या मायेचा धागा व्हायचं... त्यांचं हरवलेलं बालपण पुन्हां त्यांना द्यायचं. वय तर काय होतं ते... केवळ १८ वर्षांचं कोवळं वय.. नुकत्याच ओठावर उगवणाऱ्या कोवळ्या मिशा... कॉलेजकुमार होऊन ऐटीत रूबाबात फिरायचं.. गुलाबी स्वप्नं रंगवायचं...  मित्रांच्या संगतीत भान हरपून जगायचं...  बेभान व्हायचं..? कळतनकळत कुणाच्या प्रेमात पडायचं... पण हे हे सगळं सोडून त्याला हे काय नवीनच सुचत होतं..?  आईबापाचं प्रेम द्यायचं.. अनाथ मुलांचा मायबाप व्हायचं... आणि सुरू झाला प्रवास...


                           आता ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायची म्हणजे धडपड केली पाहिजे... हातात पैसा पाहिजे... पैसा पाहिजे म्हटल्यावर हाताला काम पाहिजे आणि म्हणून मग गांव सोडलं आणि कामाच्या शोधात पावलं वळाली शहराकडे.. औरंगाबाद शहरामध्ये मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली. इथे दोन महिने तर तिथे तीन महिने मिळेल तिथे  काम करायचं. मिळेल ते म्हणजे एका घरात कामाला असताना तेथील दर चार दिवसाने तुंबलेल्या चेंबरमधील मानवी मैला उपसून काढायचंसुद्धा काम केलं... पडेल ते काम करायची तयारी होती... पोटापूरता पैसा हाती येत होता.. दिवस असेच जात होते. पण एका क्षणाला मनाला जाणवलं की, हे असं कुठपर्यंत असे दिवस काढायचे..? चार पैसे कमवण्यातच जर असे दिवस जात असतील तर मग आपल्या उद्दिष्टासाठी आपण प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी करायची...? मनाची अस्वस्थता वाढत गेली... आणि पुन्हा मनाने आपल्या ध्येयाप्रत उचल खाल्ली.

                         अनाथ लेकरांच्यासाठी काहीतरी करायचं  आणि मग औरंगाबाद सोडून गेवराई तालुका गाठला... अनाथाश्रम सुरू करण्यासाठी गेवराई तालुका निवडला... त्यापाठीमागे कारणंही तशी होती...  गेवराई तालुक्यात मागासवर्गीय समाज जास्त आहे, बंजारा समाज असल्यामुळे ऊसतोडणीसाठी स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते, लालबत्ती परिसर (रेड लाईट एरिया), शेतकऱ्यांच्या आत्महत्या,  बालविवाहाचे प्रमाण इथं सर्वात जास्त आहे. त्यामुळे अशा कारणामुळे हाच परिसर निवडला. एका मित्राची गेवराई ही सासरवाडी. पण तिथे त्याचे सासुसासरे राहत नव्हते.. म्हणून तिथली ती जागा वापरण्याची परवानगी मिळाली... जागेचा तरी प्रश्न सुटला पण अजून खूप प्रश्नं समोर उभे होते... आता मुख्य म्हणजे मुलांची जमवाजमव करायची. शेजारच्या गावात फिरून चौकशी केली.. लोकांना सांगायला सुरुवात केली. मी अनाथाश्रम सुरू करतो आहे.. अनाथ गरजू मुले कुठे असतील तर पाठवून द्या. पण कुणाशी ओळख ना पाळख.. त्या भागात अगदी नवखा गडी कोण प्रतिसाद देणार...?अशातच पंधरा दिवस गेले काहीच मेळ लागत नव्हता.. म्हणून थांबून चालणार नव्हते. दुकानदारांच्याकडे जाऊन चार-आठ दिवसांच्या वायद्यावर प्रथम काही साहित्य खरेदी केलं.. पत्रे, चौकटी, फरशी, खिळामोळा इ सुरुवातीला एकूण ७५ पत्रे लागले वरती पंधरा आणि खाली साठ असे तीन खोल्यांचा पत्र्यांचा निवारा तयार केला..आणि अशाप्रकारे २००४ साली कसेतरी पहिले अनाथालय उभा राहीले.ह.भ.प नामदेव शास्त्री महाराज यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.


हे करत असताना संतोषजीं हे काम मी स्वतः करत आहे हे लोकांना जाणवू न देता औरंगाबादमध्ये मोठा साहेब आहे त्यांच्या सांगण्यावरून हे काम चालू आहे,मी फक्त कामगार आहे असे लोकांना भासवत होते. कारण एवढंच की, लोकांनी हे ऐकून तरी मुलं पाठवावीत नाही तरी  माझ्यासारख्या अनोळखी माणसांवर कोण विश्वास ठेवणार..? असे त्यांना वाटत होते. अशी एकूण सर्व परिस्थिती...  त्यानंतर उदारीवर एक महिन्याचा शिधा, किराणा साहित्य भरून ठेवले आणि मग पुन्हां मुलांचा शोध... वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचं. तांड्यावरती,  वाड्यावस्त्यावरती जायचं, केशकर्तनालयाचे दुकान असेल, शाळा, ग्रामपंचायत जिथं तिथं जाऊन लोकांना मनातली संकल्पना पटवून द्यायची.. पण लोकांचा विश्वास बसत नव्हता... त्यात भरीस भर म्हणजे एक अशी अफवा पसरली होती की, पोरंधरीवाले पोरं धरून इमारती, तलावाच्या पायात घालण्यासाठी नेतात.. त्या पोरंधरी माणसांच्या सारखाचं त्यावेळी काहीसा  मिळता-जुळता अवतार.. मग काय..? सगळीचं पंचायत.. तरीही प्रयत्न सोडले नाहीत... शेवटी प्रयत्न फळाला आले अथक सायासातून सात मुलं गाठीशी पडली... प्रत्यक्ष कार्याला सुरुवात झाली... लेकरं निवाऱ्याला आली...

                                        मनात एक पूर्वीपासून स्वप्नं होतंच की, जे आपल्याला मिळालं नाही... पाठीवरचं दप्तर असेल... शाळेचा गणवेष, वह्या, कंपास... पायातली चप्पल. पहिल्यांदा हे सारं या लेकरांना द्यायचं... म्हणून हे सर्व साहित्य सुरुवातीला दुकानदाराकडून उधारीवर उपलब्ध करून घेतलं आणि मुलांना आवश्यक ते शैक्षणिक साहित्य व शालेय गणवेष.,चप्पल इ वस्तू घेऊन दिल्या.. आगोदरच महिनाभराचं राशन किराणा माल सुद्धा उधारीवरच भरला होता. आता हे झालं पण जेवण बनवायचं कुणी..?. स्वयंपाकीन आणायची कुठून..? त्यामुळे स्वतःच स्वयंपाक बनवायचा. पण जेवण कुणाला बनवायला येतं होतं म्हणून सुरुवातीला पोहे, खिचडी, शिरा याच्यावरच जोर दिला आणि महिनाभरातच सगळा माल संपून गेला... बरं मुलं आता रमली होती तसे त्यांचे दाखले आणले त्यांना शाळेत दाखल केलं.मुलं शाळेलाही जाऊ लागली... पण मुख्य म्हणजे त्यांच्या पोटाला घातलं पाहिजे... थांबून चालणार नव्हतं. मग उत्पन्नाचा मार्ग कुठला..? तर मग मोठे बंगले... इमारती.. मोठी दुकाने इथं काही  मिळेल या आशेने मागायला जायचं.. बरं त्यासाठी स्वतःजवळ ठोस पुरावा नाही.. एका साध्या लेटरपॅडवरती या अनाथाश्रमाविषयीच्या चार पाच ओळी प्रिंट केलेल्या बस एवढीच काय ती आपल्या कार्याची ओळख लोकांना दाखवायची... मोडक्या तोडक्या शब्दांत त्यांच्यासमोर मांडायची... त्यावेळी कुठे कोण दहा-पाच रुपये द्यायचे.. कोण नानाविध प्रश्न विचारायचे.. तर काहीजण अक्षरशः हाकलून लावायचे... हे करत असताना मनाला कुठं तरी शरमिंदापणा वाटायचा...

                                             खरंच खूप कठीण होतं हे काम...दुरूनच डोंगर चांगले दिसतात ते खरंच... इथं तर दिवसेंदिवस अडचणींचा डोंगर उभा होता.पण घेतला वसा टाकायचा कसा..? उमेद हरून चालणार नव्हती. गावोगावी,  घरोघरी जायचं मोठंमोठी दुकाने, कार्यालये फिरायचं.. आणि जे काही मिळेल पैसे, कपडालत्ता, शिधासाहित्य, मुलांचे शैक्षणीक साहित्य अशा स्वरूपात ते जमा करून या लेकरांसाठी आणायचे...-लोकांनी द्यायचं... आपण  मागायचं... आणि या लेकरांची सोय करायची. असाच उद्योग सुरू होता. पण फक्त हेच काम असायचं का..? खूपदा असेही वाईट प्रसंग उभा रहायचे... एकदा अशी घटना घडली... रात्रीची वेळ.. बाहेर रिपरिप गळणार पाऊस.. लाईटची सोय नाही.. आणि त्या रात्रीला एका मुलाला विंचू चावला... ते लहानगं पोरं ओरडायला-बोंबलायला लागलं.. आता काय करायचं..? तसंच त्याला उचलून खांद्यावर घेऊन त्या पावसातून जवळजवळ तीन साडे तीन कि. मी अंतर पार करून तब्बल २ तासांनी दवाखाना गाठला.. डॉक्टरांनी उपचार केले... आणि एक दिवस दवाखान्यातचं थांबावं लागेल असे सांगितले... दुसऱ्या दिवशी सकाळी डिस्चार्ज केला आणि बिल केलं २२०० रु.आता आली का पंचायत.. आता हे लेकरू कुठून आणलं..? आपलं कार्य काय आहे हे त्यांना सांगून का उपयोग आहे..? खिशात एकूण रुपये होते फक्त ६७ रु... त्यात गेवराईत कोणीच ओळखीचं नाही.... आता काय करावं..? त्या मुलाला तिथेच दवाखान्यात ठेवून पुन्हा मागे परतले... जिथे रहायला होते तिथे एक काशीनाथमामा होते त्यांच्याकडून ७ रुपये टक्याने ५००० रु.घेतले आणि मग बिलाची रक्कम भरून त्या मुलाला घेऊन माघारी आपले ठिकाण गाठले... असे एक ना अनेक बरेवाईट प्रसंग अनेकदा यायचे.. येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याशिवाय पर्याय नव्हता... लेकरांच्या खाण्यापिण्याला... दुखण्याखुपण्याला वणवण फिरावं लागायचं... शेतातलं पत्र्याचं शेड सोडून शहरात एक घर भाड्याने घेतलं. गेवराईतल्या त्या राहत्या घराचे भाडे द्यायलाही एकेकदा हातात पैसे नसायचे... अशी दळभद्री अवस्था झाली होती.

                                         कोणत्याही चांगल्या कार्याला फार मोठ्या दिव्यातून जावं लागतं...अर्थातच संतोषजींनाही जावं लागलं.. अनेक विघ्नसंतोषी माणसांनी त्रास दिला...एकाने तर कळसचं केला होता.संतोषजींच्या तारुण्याचा गैरफायदा घेत त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन छळ करून एकूणच चारित्र्य हनन करायचा प्रयत्न केला... पण सत्याला कितीही खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला तर शेवटी खोटंच उघडं पडतं देवदयेने त्या माणसाला कशी काय सुबुद्धी मिळाली आणि कालांतराने ज्या माणसाने हे आरोप केले होते त्यानेच शेवटी संतोषजींची माफी मागितली. याच्याही पुढे एकदा डोक्यात लाकूड घालण्यापर्यंत जीवावरचा प्रसंग ओढवला होता.म्हणजेचं काय कोणतंही चांगलं काम करताना जशी विघ्नसंतोषी माणसं ही वाट्याला येतातचं त्यांची संतोषजींना काही कमी नव्हती..हरेकप्रकारच्या लेकरांचा सांभाळ करताना तारेवरची कसरत करावी लागायची.... हातांत तर पैसे नसायचेच... प्रत्येक वेळेला हाती कटोरा घेऊन लोकांच्यापुढे जावं लागायचं... त्यांनी द्यायचं की नाही त्यांची मर्जी... कधी मदत मिळायची... नाही मिळायची... हेटाळणी तर रोजची ठरलेलीच... वाटेवरचा भिकारी श्रीमंत वाटायचा इतकी दरिद्री अवस्था होती... रोज मागून आणून लेकरांना काय घालायचं हा प्रश्न प्रत्येकक्षणी छळत होता... खायला काय तर बाजरीची भाकरी आणि भाजी... सणावाराला जशी पुरणपोळी करतात त्या पुरणपोळीची किंमत  इथं कधी तरी केल्या जाणाऱ्या वरणभाताला होती... हातात नेहमी तुटपुंजा पैसा आडका असायचा... आठवडी बाजार असला की, बाजार संपताना लेकरांच्या हातावर मोजके पैसे ठेऊन बाजार करण्यास पाठवून द्यायचं. किडकं-सडकं जे काही ढिगानं मिळेल ते आणण्यास सांगायचं.

                          त्यांना न्हाऊ-खाऊ घालण्यापासून त्यांच्या दुखण्याखुपण्यापर्यंत सगळं एकट्याला बघायला लागायचं... त्यांचा सांभाळ... शिक्षण त्यांचं बालपण जपायचं या साऱ्याला एकटा माणूस कुठं कुठं पुरणार... एकेकदा नको वाटायचं हे सगळं... खूप त्रास व्हायचा... चीड चीड व्हायची... रात्ररात्रभर डोळ्याला डोळा लागायचं नाही... उठून रात्रीच्या अंधारात एकटंच भुतासारखं आपल्याच तंद्रीत  एका जाग्याला बसून रहायचं... वाटायचं आपण मांडलेला डाव आपणच मोडून टाकावा का..? पण नाही या लेकरांचा भूतकाळ आठवला की, हा त्रागा कुठल्या कुठे निघून जायचा... काय दोष असतो हो या मुलांचा... एकेक मुलाचा भूतकाळ म्हणजे थक्क करणारा...गेवराईतलाचं हा प्रसंग गावापासून दूर गायरानात नवराबायको,लेकरं रहात होती..एकदा नवराबायकोंचं लागलं जोराचं भांडण... दारुडा नवरा गेला कुठे बाहेर...आईने लेकरांना बाहेर पिटाळून लावले आणि घेतले स्वतःला पेटवून...ती लेकरं आईबापाच्या या भांडणाला भिऊन गेली जवळच्या नातलगांकडं आणि नवरा दोन -तीन दिवस बाहेरचं..त्या लेकरांच्या मायेचं प्रेत तीन दिवस जळालेल्या अवस्थेत पडलेलं होतं... सडलेलं होतं... बाप असा दारुडा आणि माय अशी गेली मरून... काय करावं त्या लेकरांनी.त्या अजाणत्या लेकरांवर शेवटी दारोदार भीक मागायची वेळ आलीना..? मग या लेकरांना वाली कोण..?अशा लेकरांना मायेचा आधार देणार कोण..? मी जर ही जबाबदारी नाकारली आणि प्रत्येकांनी जर असं म्हटलं तर ही जबाबदारी मग घेणार कोण .? आज जर मातीमध्ये बियांनी स्वतःला गाडून घेतलं तर उद्या नवीन बीजं तयार होतील ना..... म्हणून तर या लेकरांचं आयुष्य फुलवण्यासाठी संतोषजींनी आपलं आयुष्य रुजवलं.

                                          हे सर्व करत असताना आपण जे काही करतो आहोत ते एक सामाजिक काम आहे याची पुसटशीही कल्पना संतोषजींना नव्हती. पण  कालांतराने दोन गोष्टी घडल्या एक म्हणजे संतोषजी एकदा अभय बंग यांच्या शिबिराला औरंगाबाद येथे गेले होते व दुसरी म्हणजे २००९ साली डॉ. बाबा आमटे यांचे निधन झाले त्यावेळी लोकसत्तामध्ये त्यांच्यावर एक अग्रलेख छापून आला होता तो वाचल्यानंतर खऱ्या अर्थाने अनाथाश्रम ही संकल्पना समजायला मदत झाली... मग पुढे कुणीतरी सरकारकडे मदतीसाठी जायला सुचवलं... आणि मग प्रत्येक  मुलांच्या माहितीची एक भली मोठी प्रोफाइल तयार केली... आणि मग त्यावेळचे महिला व बालकल्याण मंत्री मा. हर्षवर्धन पाटील यांची इंदापूर येथे भेट घेतली... आपली ओळख त्यांना  सांगितली... मुलांच्याविषयीचे कार्य थोडक्यात सांगितले... आणि मग अनुदानाची मागणी केली... तयावेळी मंत्री महोदयांनीही आस्थेने विचारपूस करून पुढच्या कार्याची दिशा सांगितली... अशा कामासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालकल्याण विभाग आहे तिथे या मुलांची माहिती देण्यास सांगितली... आणि मग कार्याच्या निमित्ताने त्या विभागाला गाठीभेटी देण्यास सुरुवात झाली...  यातून बरीच माहिती समजत गेली. थोरामोठ्यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळत गेले...काय वेळ असते पहा..या कामाची सुरुवात करताना स्वतःची ओळख लपवून काम करावं लागलं...पण ते करत असताना ते काम एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं की आभाळाएवढ्या उंचीच्या माणसांनी या कामाची दखल घेतली. एकदिवस आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब संतोष गर्जे कोण..?ही ओळख विचारत संताजींच्या अनाथालयात आले.

 तर आपल्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती सौ.प्रतिभाताई पाटील यांनी स्वतःहुन पुण्यात बोलावून घेऊन संतोषजीं व त्यांच्या कार्याचे कौतुक केले.         


संतोषजींनी  मुलांचे कायदे... त्याची प्रक्रिया समजून घ्यायला सुरुवात केली.  कोणती मुलं घ्यायची त्याच्या अटी व निकष काय..? कायदेशीर बाबी काय आहेत याची माहिती होत गेली... सरकार दरबारी संस्थेची मान्यता... अनुदान मिळण्यासाठी चकरा मारताना नाकेनऊ आलं होतं... किती चकरा मारायच्या त्याला हिशोब नव्हता... भीक नको खरं कुत्रं आवर... अशी तऱ्हा... पैसे मिळवण्यासाठीही पैसे द्यावे लागतात हे त्यावेळी कळालं... कुपंणच जेंव्हा शेत खातं त्यावेळी बोल लावायचा कुणाला..? बिचारा हा माणूस कोणासाठी धडपडतोय आणि आपण कोणाकडे पैसे मागतोय..? याचंही भान या माणसांना नसावं.  माणसांत नसलेल्या माणसांची ही अशी नुसती खाऊगिरी... असो पण अखेर अथक प्रयत्नांतून महिला व बालकल्याण विभागाकडून 'आई संस्था संचलित सहारा अनाथालय बालग्राम परिवार' या त्यांच्या संस्थेला शेवटी मान्यता मिळाली.

           २०११ साली संतोषजींच्या आयुष्यात प्रीतीजी पत्नी म्हणून आल्या... त्यांच्या लग्नाचाही हा किस्सा मोठा विलक्षण आहे. तो म्हणजे दिनांक ११-११-२०११ साली. घड्याळातील ११ वाजून ११ मिनिटांच्या मोबाईलच्या गजरवर हा अगदी साधासुधा अनोखा विवाह पार पडला...  पतीने पत्नीला म्हटले की, 'मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतो' आणि पत्नीने पतीला म्हटले 'मी तुमचा पती म्हणून स्वीकार करते'... बस या परस्पर विश्वासाच्या दोन ओळींनी सहजीवनाचे काव्य रचले...

आजपर्यंत संतोजींच्या रूपातून मुलांना बापाच्या हृदयाची माया मिळत होती... आता प्रीतीताईंच्या रूपातून त्यांना आईच्या मायेचं हृदयही भेटलं आहे.. संतोषजींच्या खांद्याला खांदा लावून प्रीतीताई या मुलांच्या सेवाकार्यात झोकून देऊन काम करू लागल्या... त्यांचं खाऊ-पिऊ-न्हाऊ असू दे दुखणं-खुपणं असू दे सारी निरवानीरव करू लागल्या... संतोजींना आता खुप मोठा आधार मिळाला होता. आतापर्यंत या कार्याचा भार एकट्याने ओढला जात होता... पण त्या कार्यरथाला आता साजेशी दोन चाकं मिळाली होती... खऱ्या अर्थाने आता अधिक ताकदीने काम करायला... मनातलं सगळं बोलायला... दुःखाचा कड हलका करायला कोणीतरी हक्काचं माणूस मिळालं होतं. यानंतर कामाला गती आली..


                           आतापर्यंत  बऱ्यापैकी चांगल्या लोकांच्या ओळखीपाळखी झाल्या होत्या... होतं होत्या लोकांची हळूहळू चांगल्याप्रकारे मदत होऊ लागली... लोकं आपणहून मदत करू लागलीआज समाजाच्या दातृत्वावर खऱ्या अर्थाने संस्थेचं काम चांगल्यापद्धतीने चालू आहे. संस्थेतील तीन लेकरं आज संतोषजींच्या हाताखाली काम करतायेत... समाजातील देणारे मायबाप आणि बालग्राम संस्थेचं एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झाले आहे... दिवसेंदिवस हा स्नेह वृंधीगत होतो आहे... चार दोन दिवसाला कोणी ना कोणी पाहुणे येत असतात या परिवाराला भेटतात,मुलांच्यात रमतात.सहारा अनाथालय बालग्राम परिवार हा एक समाजाचा घटक झाला आहे.


किंबहुना मायेचा हा एक व्यापक परिवार झाला आहे. 'इवलेसे रोप लावीयले दारी त्याचा वेलू गेला उंच गगनावरी' याप्रमाणे इवलाशा अंकुराचं रोपटं झालं आणि आता ते रोपटं आभाळाच्या दिशेनं झेपावूसुद्धा लागलं आहे.अनेक पोरक्या... अनाथ मुलांना साऊली देऊ लागलं... 

कधी काळी परक्याच्या आसऱ्याला असणारी 'आई' आज स्वतःच्या जागेत उभी आहे..म्हणजेच आगोदर भाड्याच्या घरात असणारा 'आई संचलित सहारा अनाथालय बालग्राम परिवार' हा परिवार  आज स्वतःच्या जागेत उभा आहे. संस्थेची आज तीन एकर जागा आहे... 



पक्की इमारत आहे. १७ वर्षांच्या खडतर प्रवासातून आज माय बाप दात्यांच्या उदात्त दातृत्वावर आज या संस्थेची वाटचाल सुरू आहे... सुरुवातीला संतोषजींनी सात मुलांपासून सुरुवात केलेल्या अनाथालय परिवारातून आजतागायत ३०० मुलांना मायेचा निवारा देऊन त्यांचे भरणपोषण करून त्यांना लहानचं मोठं केलं त्यांच्या पायांवर उभं करण्यासाठी त्यांच्या पंखात बळ दिलं..

मुलांच्या शिक्षणाबरोबरच आज या संस्थेत मुलांच्यासाठी वर्षभरात विविध उपक्रम घेतले जातात...बालरंग शिबीर यामाध्यमातून मुलांच्या आवडीनिवडीनुसार त्यांच्या कलेनुसार त्याच्या विकासावर भर द्यायचा...दुसरं म्हणजे भान तरूणाईचे.हे तीन दिवसीय निवासी शिबिर घेतले जाते..परिसरातून व बाहेरून शेकडों शिबिरार्थी या शिबिरात सहभाग घेतात...आदरणीय गुरुवर्य इंद्रजित देशमुख आदी महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत,वक्ते मुलांना मार्गदर्शन करतात.



मुलांच्या विविध कलागुणप्रदर्शनाचा कार्यक्रम.. बाल अविष्कार या कार्यक्रमामध्ये नाटक,गाणी लोकसंस्कृती दर्शन घडवणे  अशाप्रकारे मुलांच्या कलागुणांना वाव देऊन मनोरंजनसोबत प्रबोधन करण्याचा हा कार्यक्रम आहे..सध्या याचे पाच प्रयोग झाले असून याला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे... समाजजागृतीचे उद्दिष्ट ठेवून संपूर्ण महाराष्ट्रात हा या कार्यक्रमाचे प्रयोग करण्याचा संकल्प आहे...होळीचा रंग दे बसंती हा कार्यक्रम या कार्यक्रमात देखील बाहेरच्या परिसरातून लहानथोर मंडळी सहभाग घेऊन रंगाची उधळण करून भरपूर आनंद लुटतात.



रक्षाबंधन,भाऊबीज, दिवाळी दसरा असे सर्व सणउत्सव आनंदाने साजरे केले जातात.मुंबई, औरंगाबाद या ठिकाणी जाऊन मुलांनी सहलीचा आनंदही लुटला आहे.


 अभ्यासाबतोबरच रांगोळी,चित्रकला,गाणी अशा विविध प्रकारच्या कलेत मुलं रममाण होत असतात.





                     आज रोजी संस्थेत १०६ मुलं आहेत... अडीच वर्षांच्या बालकापासून २२ वर्षांच्या मुलांपर्यंत ही संस्था त्या अनाथ लेकरांच्या पोरकेपणाला दूर सारून त्यांना आपलंसं करते आहे... त्यांच्या हक्काचं बालपण जपते आहे. त्यांचा मायेनं सांभाळ करुन लहानाचं मोठं करते आहे... आणि शेवटी त्यांना आपल्या पायांवर उभं राहण्याचं बळ सुद्धा देते आहे... आज या संस्थेत राहून मुलं-मुली चांगलं शिक्षण घेत आहेत... मुलं शिकून शहर ठिकाणी इंजिनिअर... तर कोण कंपनीत चांगल्या पदांवर काम करीत आहेत... मुलीही शिकून ब्युटी पार्लर... फॅशन डिझाईन सारखे कोर्स करून आपापल्या आवडीनुसार क्षेत्र निवडता आहेत..




आज संस्थेतील बऱ्याच मुलांमुलींची लग्नं झाली... त्यांना मुलं झाली आणि आता आपापल्या आयुष्यात स्थिरावली आहेत. या घरट्यातून भरारी घेतलेली पाखरं आज उंच उंच झेपावली असली तरी आपल्या घरट्याला बिलकुल विसरलेली नाहीत... आठवण आली की आज ही आपल्या घरट्याला भेट देतात...               

                    संतोषजींच्या प्रखर जिद्दीच्या, कठोर मेहनतीच्या आणि अत्यंत चिकाटीच्या जोरावर हसत्या खेळत्या मुलांचं आज हे नंदनवन साकार झालं आहे. 

त्यांच्या या कार्यकर्तृत्वाच्या अनुभवातून या अनाथ मुलांचं जीवन आणखी समृद्ध करण्यासाठी आपल्या समाजानेही आपल्या मानसिकतेत काय बदल केला पाहिजे याविषयी संतोषजी सांगतात... की, "अशा अनाथ लेकरांच्याकडे पाहताना एका विशिष्ट दृष्टीने न पाहता ती ही आपलीचं लेकरं आहेत हा दृष्टिकोन आपल्या दृष्टीत असला पाहिजे... ती मुलं अनाथ झाली त्याला वेगवेगळी कारणं आहेत. पण बऱ्याचदा अश्लीलतेच्या बेवारस कुशीतून जन्माला आलेलं पोर हे जे खापर आपण त्यांच्या डोक्यावर फोडतो त्यावेळी त्या निष्पाप जीवाचा काय दोष याचा गांभीर्याने समाजाने विचार करावा... कुठेतरी हा ही एक सामाजिक दोष आहे... अनाथ मुलांना त्यांच्या हक्काचं बालपण देता आलं... जसं लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा... असं आपल्याला आपलं बालपण हवंहवंसं वाटतं का तर आयुष्यातील तो सर्वात सुखाचा आणि आनंदाचा काळ असतो...  आणि असंच सुखाचं आणि आनंदाचा काळ याही मुलांना त्यांच्या बालपणी उपभोगता आला पाहिजे...

                              एकदा ही मुलं मोठी झाली की, त्यांना आपला बालपणाचा काळ आठवल्यानंतर यातना नको व्हायला आपला बालपणाचा काळ दुःखाचा नको वाटायला... समाजाचं खुप मोठं दातृत्व या मुलांना लाभतंय ही खुपच अभिमानाची गोष्ट आहे... पण इथे एक गोष्ट समाजाच्या लक्षात आणून यायला हवी आहे की, आपण जसे आपल्या घरी जाताना आपल्या मुलांना खाऊ घेऊन जातो... आपण खाऊ घेऊन गेलो याबदल्यात आपण त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवतो का..? मग कुठल्याही अनाथाश्रमातील मुलांना काही देण्यासाठी आलो की, त्यांनी आम्हांला नाचून-गाऊन दाखवावं, नकला, हावभाव करावेत अशी वेगळी अपेक्षा ठेवणारा वर्ग ही आपल्यात आहे हे कमी व्हायला हवं.!पोटच्या लेकरांना काही देताना त्याला झालेला आनंद आपल्याला हवा असतो... बस इथं ही देताना तो आनंद आपण या मुलांच्या चेहऱ्यावर शोधावा... बस इतकी ही सहजसुलभ निरपेक्ष भावना अश्या ठिकाणी अपेक्षित आहे... एकदा का ही मुलं मोठी झाली की, जीवनाची खडतर वाट त्यांना तुडवायची आहे पण त्या आधी हे बालपण त्यांना मनसोक्त आनंदाने उड्या मारू द्या... बालपणाचा प्रत्येक क्षण निखळ स्वछदीपणे जगू द्या... तो अनाथ आहे म्हणून केवळ त्याच्या हक्काच्या बालपणावर अन्याय नको व्हायला... या लेकरांनाही त्यांचं सांगणं आहे... तुम्हीं डॉक्टर, वकील, अधिकारी जे काही व्हायचं ते व्हा... पण त्याच्या आगोदर एक चांगला माणूस होता आलं पाहिजे... आणि पहिल्यांदा तो संस्कार इथं त्यांच्यावर घडवला जातो."

                            आज मागे वळून पाहताना... या सत्कर्माच्यामागे संतोषजी, पत्नी प्रीतीजी आणि त्यांच्या कुटुंबाचा खुप मोठा त्याग आहे... संतोषजींनी आजपर्यंत खुप मोठा संघर्ष... अनेक आव्हानं आणि धोकेही पेलले आहेत... अशा कार्यात स्वतःला झोकून देताना अर्थातच संतोषजींना स्वतःच्या घरादाराकडे लक्ष देता आलं नाही अर्थातच आता वेगळं असं कुटूंबचं राहिलं नव्हतं... आईबाप अखंड गरिबीशी झगडत राहिले... मुळच्या गरिबीने असह्य चटके दिले होते... आईबाप ऊसतोड कामगार... पोटाची परवड व्हायची... घरात सणवार कधी आनंदात पार पडला असं कधी झालंच नाही... सण साजरा व्हायचा तो दुसऱ्यादिवशी... आई कुणाकडून तरी हातपसा मागून... उसनवारी करून पुरवून पुरवून पोटच्या लेकरांसाठी गोडाधोडाचं करायची... कुणीतरी शेजाऱ्यांनी उरलं-सुरलं दिलं तर तेवढंच रांधायची... बापानं ही खुप कष्टानं संसाराचा गाडा हाकला होता... दोन हातांच्या जीवावर  फाटक्या संसाराला ठिगळं लावत लावत सांधला होता... बऱ्यापैकी आकार दिला होता... पण संसाराचे धागे जिथं तिथं उसवतच होतं...

                             तीन लेकींची लग्नं अजून तीन लेकरं पदरात... त्यांची निरवानीरव... त्यात एक लेक तरुणपणातच सोडून गेली... लेकीच्या नात्याला हळवा असणारा बाप तितच खचला... देहाला अनेक व्याधी जडल्या होत्या... संसारातली जीवघेणी परवड असह्य झाली... सुखदुःखाच्या पलीकडे मनाने धाव घेतली... आणि 'संसाराच्या गाठी... न पडो भेटी इथूनच आता ताटातुटी'... संसारातून निवृत्ती घेतली... मनाची विरक्ती दृढ झाली... एक दिवस बाप गहृत्याग करून परागंदा झाला... आईने कुठं कुठं शोध घेतला... लोकांच्याकडून व्याजावरी पैसे घेऊन दोन वर्षें बापाचा खुप शोध घेतला...  कोण म्हणायचं इथं दिसले तिथं दिसले... लगेच तिथं धाव घ्यायची... आणि रिकाम्या हातानं मागं परतायचं... शेवटी बाप गावला नाही तो आजतागायत... 

                      परिस्थितीचे असे असंख्य चटके सहन करत संतोषजी आपले हे दिव्य काम करीतच राहिले. आज संतोषजींच्या कार्याचे योगदान समाजाला पटले आहे विविध स्तरावर याची देखल घेतली जात आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही असे म्हणतात...आजवर खूप संघर्ष केला,त्रास सहन केला,असंख्य अडचणी झेलल्या...असह्य वेदना- यातना भोगल्या...कधी काळी हेटाळणी करणारा हा समाज आज एखाद्या कार्यक्रमाला त्यांना अगदी सन्मानाने प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करतो...आजपर्यंत शेकडों सन्मान सोहळे झाले आता खुद्द मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान सोहळा झाला तरी नवल नको वाटायला.


पुरस्कारांची तरी गिणती कशी करावी..? तरीही 'मा.श्री.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई युवा सामाजिक पुरस्कार-२०१६' अशा प्रतिष्ठित पुरस्कारासह जवळपास ७० च्यावर पुरस्कारांनी त्यांला सन्मानित केलं गेलं आहे..झी टेलिव्हिजन या आघाडीच्या दुर्दशन वाहिनीने २०१८ सालच्या झी युवा गौरव पुरस्काराने त्यांना गौरविले आहे. 


तसेच आज टी. व्ही.चॅनेल दूरदर्शन वाहिनीने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली आहे




               एका ऊसतोड कामगार मायबापाचा लेक आज शेकडो अनाथ लेकरांचा मायबाप झालाय... धन्य धन्य ते मातापिता ज्यांच्या पोटी असा पुत्र जन्मला 'पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रैलोकी झेंडा.'   आज खऱ्या अर्थाने या मायबापाच्या जन्माचे पांग फिटले. आज त्या कष्टकरी माऊलीच्या हृदयात या लेकराबद्दल अपार अभिमान आणि कौतुक आहे... जन्म सुफळ झाला... ऐसा पुत्र पोटी जन्मला... त्या पुण्यवंत आईबापाला वंदन... संतोषजी आपल्या भव्यदिव्य उदात्त कार्यकर्तृत्वाला सलाम... आणि ... मुलांनो..खुप हसा... खुप रुसा...  बालपणाचा आनंद खुप खुप लुटा... नात्यांची पोकळी भरून काढा... नाती जोडा... नाती निर्माण करा. खुप शिका... मोठे व्हा... आणि आपल्या घरट्याला कधी विसरू नका... मुलांनो...असंच हसतं खेळतं बालपण तुम्हां मिळो... निखळ आनंदाचे क्षण सदा लाभो.  जे जे तुम्हांस हवे ते ते मिळो...

                   


   

'इवलेसे रोप लावियेलें दरी त्याचा वेलू गेला उंच गनागनावरी.'

संतोषजींच्या हृदयात रुजलेल्या त्या विचारांच्या बीजांकुराचं त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोराने कायाकल्प केला आहे.त्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालंय.त्याच्या निवाऱ्यात कित्येक गोडगोजिरी फुलं उमलताहेत... फुलताहेत...आनंदानं झुलताहेत..त्या माळावर आज हसऱ्या-खेळऱ्या निरागस कोवळ्या मुलांच्या फुलांचं नंदनवनचं फुलंलय...असं आनंदाचं भरलं गोकुळ बघायला...आपण  या सारेजण या...इथलं सुख पहा...आनंदानुभव घ्या...त्यांच्या सुखदुःखात सामील व्हा...मिळा...मिसळा...इथल्या बालचमुच कोड कौतुक करा...तुमच्याशिवाय ते कोण करणार..? तुमच्याशिवाय आहेच कोण त्यांना...तुमच्या प्रेमाची..आधाराची आणि दातृत्वाची आज सहारा अनाथालय बालग्राम परिवारास गरज आहे.


"हरवले आभाळ ज्या चिमुकल्या जीवांचे,

ओस पडल्या घरट्यात त्या कोणी ना तयांचे.

आभाळ होऊ आम्हीं आपुल्या पंखाखाली घेऊ.

धरुनी हृदयाशी या पिल्लांना जगण्याचे बळ देऊ."

                  'जय हो..! मंगल हो..!!'


श्री.संतोष गर्जे यांचा आपल्याला संदेश :                                    "समाजातील संवेदनशील माणसाने अश्या संस्थेच्या पाठिशी उभे राहून पाठबळ दिलं पाहिजे, भेटलं पाहिजे तिथल्या लेकरांचं कोडकौतुक केलं जावं... स्वतःच्या आयुष्याकडे एका नव्या उमेदीने बघण्यासाठी आपण बालग्राम (सहारा अनाथालय) परिवारास भेट द्यावी ही मनिच्छा व्यक्त करतो. "

सहारा अनाथालय परिवारा बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण www.aaifaundation.org या संकेतस्थळाला एकदा अवश्य भेट द्या.

सहारा अनाथालय बालग्राम परिवाराचा हा व्हिडीओ पहा खालील व्हिडीओवर क्लिक करा.


श्री.संतोष गर्जे यांच्याशी बोलण्यासाठी संपर्क क्रमांक: मोबा - 9763031020.

-------------------------------------------------------

                                - किरण चव्हाण.

                                 मोबा- ८८०६७३७५२८.





माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...