'बहिरेवाडी गावच्या योगदानाचा, शहीद वीर जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या बलिदानाचा देशाला सार्थ अभिमान आहे'.
भारतीय सीमेवर पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतमातेच्या रक्षणासाठी सीमेवर खडे ठाकलेले वीर जवान कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी या गावचे वीर सुपुत्र ऋषीकेश रामचंद्र जोंधळे यांना वीरमरण प्राप्त झाले.शेतकरी कुटुंबातला ऋषिकेश (जन्म ४ जून २०००) .वडील रामचंद्र जोंधळे आणि आई कविता रामचंद्र जोंधळे...बहीण कल्याणी असं हसतखेळत छोटसं सुखी कुटूंब.ऋषिकेशचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावच्या भैरवनाथ हायस्कूल शाळेत झालं.तर पुढील शिक्षण शिवराज कॉलेज गडहिंग्लज येथे झालं.उपजतच हुशार आणि विशेषतः अंगात खिळाडूवृत्ती. डॉजबॉल या खेळप्रकारात विशेष कौशल्य होते.अनेक क्रीडा स्पर्धेत त्याने आपली निपुनता दाखवून दिली, पदके पटकावली.तेलंगणा येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले होते.अंगी खिळाडूवृत्ती होती तसेच मनात एक जिद्द होती की,भारतीय सैन्यदलात भरती होऊन प्राणपणाने आपल्या देशाची सेवा करायची. वडिलांचा औषध विक्रीचा व्यवसाय असल्याने हा व्यवसाय ऋषिकेशने सांभाळावा अशी वडिलांची अपेक्षा होती.त्यातच एकुलता एक मुलगा म्हटल्यावर कुठल्या बापाचा धीर होईल आपल्या लेकराने एवढी मोठी जोखीम पत्करावी म्हणून.पण देशसेवेच्या ध्येयाने झपाटलेल्या या ध्येयवेड्या पोराला कोणी थांबवू शकलं नाही आणि अखेर २०१८ ला ऋषिकेश सैन्यात भरती झाला.
मराठा लाईफ बटालियन इन्फट्रीमधून देशसेवेच्या कार्यात रुजू झाला.उरातल एक दिव्या स्वप्न साकार झालं होतं.आईवडिलांनाही एकीकडे आनंद आणि अभिमान वाटत होता.या आनंदाप्रित्यर्थ जोंधळे परिराने आपल्या गावाला स्नेहभोजन घातले होते.सगळं कसं सुरळीत चालू होतं.
कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे ऋषिकेश गावाकडेचं अडकून पडला होता. पण आपल्या कर्तव्याची जाणीव त्याला स्वस्त बसू देत नव्हती.आणि म्हणून मग जून महिन्यातच ऋषिकेश पुन्हां आपल्या कर्तव्यावर रुजू झाला.आपल्या भारतमातेच्या रक्षणासाठी नव्या जोमाने उभा ठाकला.पण आपल्या समोरचा शत्रू जो कधी सुधारत नाही आणि कधी सुधारणारही नाही..ज्याची खुल्या रणांगणात आमच्याशी बरोबरी करण्याची कधी हिंमतचं होत नाही.म्हणून वारंवार पाठीवर वार करणारा भ्याड शत्रू. ज्याला शत्रू म्हणवून घेण्याचीही लाज वाटते असा पाकिस्तान. या दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला जम्मू काश्मीरमधील गुरेज सेक्टरजवळील सीमेवर पाकिस्तानने भ्याड हल्ला केला पण आमच्या हिंमतबाज भारतीय सैनिकांनीही जोरदार प्रतिहल्ला करून पाकिस्तानचे ११ सैनिक अनेक चौक्या,बंकर उध्वस्त केले.आजवरचे सर्वात मोठे नुकसान केले.इकडे दिवाळीची धामधूम सुरू असताना तिकडे आमचे हे वीर जवान शत्रूवर गोळीबारांचा धुमधडाका करीत होते.प्राणाची बाजी लावून होळी खेळत होते.पण दुर्दैवाने आमचे चार सैनिक या चकमकीत शहीद झाले.महाराष्ट्रातील काटोलचे सुपुत्र नायक भूषण रमेश सतई व कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी गावचा आमचा थोर सुपुत्र ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण आले.जिथे चकमक झाली तो इलाका पहाडी व किर्रर्र जंगलाचा होता.दोन अडीच तास चाललेल्या या चकमकीत शुक्रवारी दुपारी १:१५ दरम्यान ऋषिकेशला विरणमरण प्राप्त झाले.
दिवाळी सणाची लगबग सुरू असतानाच अवघा बहिरेवाडी गाव शोकसागरात बुडाला..दिवाळीचा एवढा भरला सण...पण गावात एकाही दारात पणत्यांची आरास सजली नाही..आकाशकंदील पेटला नाही की दारात रांगोळीचा सडा घातला गेला नाही.
'पणत्या मुक्या झाल्या
आकाशकंदील विझले
कशी करावी साजरी दिवाळी
आमच्यासाठी लेकरू प्राणाला मुकले.:
आज तीन दिवस झाले बहिरेवाडी गाव आणि आख्खी पंचक्रोशी आपल्या या लाडक्या वीर सुपुत्राच्या पार्थिव देहाची शोकमग्न अवस्थेत डोळ्यांत प्राण आणून वाट पहात होता.आणि अखेर आज पहाटेला तिरंग्यात लपेटलेला पार्थिव देह फुलांच्या माळांनी सजलेल्या बंद पेटीतून आपल्या मायेच्या गोतावळ्यात दाखल झाला. देशापायी कामी आलेल्या आपल्या एकुलत्या एक लेकराचा पेटीबंद असलेला निपचित देह पाहून त्या आईवडीलांनी ,पाठच्या बहिणीने फोडलेला हंबरडा.जिवाच्या आकांताने केलेला आक्रोश..उपस्थितांचे मन पिळवटून टाकत होता.आपल्या लाडक्या वीर जवानाला अंतिम निरोप देण्यासाठी बहिरेवाडी गावी आज अवघा जनसागर लोटला होता.माणसांच्या दर्याला जणू भरतीच आली होती.जागोजागी शहीद जवानाला श्रद्धांजली अर्पण करणारे किती तरी मोठं मोठे होर्डिंग्ज दिसत होते.ट्रॅक्टर ट्रॉलीत पार्थिव देह असलेली पेटी ठेवलेली.फुलांच्या माळांनी सजली होती.. फुलांची आरास थाटली होती.ज्या गल्लीतून ज्या गावातून ऋषिकेश लहानपणापासून बागडला...दौडलेला होता..त्या वाटेवरून शहीद ऋषिकेशची अंतिम मिरवणूक काढण्यात येत होती.गल्लीतून लोक दाटीवाटीन डचमळत पार्थिवाचे दर्शन घेत पुढे सरकत होते.घरादारासमोर आयाबाया भरल्या डोळ्याने अखेरचे दर्शन घेत होत्या.इवलासा जीव सुद्धा ती अंत्ययात्रा पाहून हुंदके देत होता. तरुण वर्गाची उपस्थित लक्षणीय होती..आजूबाजूच्या पंचक्रोशीतून तरुण वर्ग या अंत्ययात्रेत सामील झाला होता...अवघे वातावरण ऋषीमय झाले होते.
'अमर रहे अमर रहे ऋषिकेश जोंधळे अमर रहे.'
'जब तक सूरज चांद रहेगा ऋषिकेश तेरा नाम रहेगा.'
'भारत माता की जय'
अशा घोषणांनी अवघा परिसर निनादत होता.अवघे आबालवृद्ध आपल्या लाडक्या वीर जवानाला निरोप देण्यासाठी आले होते.एखादी माऊली कडेवर नकळतं लेकरू घेऊन या अंत्ययात्रेत सामील झाली होती.
भैरवनाथ हायस्कूलच्या प्रशस्त पटांगणात शहीद जवानाच्या अंत्यसंस्काराची तयारी केली होती.अवघी अलोट गर्दी पटांगणात सामावली.जिल्ह्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.सर्व मान्यवर आणि आजी माजी सैनिक संघटनेकडून पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.ज्या पटांगणात ऋषिकेश खेळला त्याच्यातला खेळाडू घडला.आपल्या दौडत्या पायाने जी माती चौखूर उधळली तिच्या उरावरचं ऋषिकेशच्या अंत्यसंस्कारासाठी चबुतरा बांधलेला होता.त्या चबुतऱ्यावर रचलेल्या सरणावर तो निपचित देह ठेवला.आणि मग ऋषिकेशचा परिवार अंतिम मुखदर्शन घेऊ लागला पोटच्या गोळ्याला डोळ्यांत मनात किती किती भरून घ्यावं...आता केवळ ते गोजिरवाण निपचित रुपडं मनात साठवून ठेवावं...आता माझा ऋषिकेश पुन्हां कधी डोळेभरून दिसायचा नाही.आता ही शेवटचीचं छबी हृदयाच्या कुपीत जपून ठेवावी आयुष्याच्या हयातभर तिला रोज मनात आठवावी.आईबापानं लेकराकडं घेतलेली ती झेप..दुःखान घायाळ झालेली बहीण सर्वांचा आक्रोश. साऱ्यांच्या नेत्रकडा ओल्या करीत होती...अवघी माणसांची गर्दी सदगदीत होत होती.
आज भाऊबीज आणि या शुभदिवशी असा दुर्दैवी क्षण एका बहिणीच्या वाट्याला यावा...सरणावरती निपचित पडलेल्या आपल्या भावाच्या पार्थिव देहाला अश्रूंचा अभिषेक घालून दुखऱ्या घायाळ अंतकरणाने बहिणीने हातात निरांजनेचं ताट घेऊन ओवाळणी करावी...
ओवाळणी म्हणून काय मागावं तिनं आपल्या लाडक्या भावाकडं..?.आजच्या भाऊबीजेला आपल्या जिवाभावाच्या लाडक्या दादुचा जीव कोणी परत आणून देईल का तिलाओवाळणी म्हणून..?.आजच्या दिवशीचा तो कठोर कटू प्रसंग म्हणजे बहीण भावाच्या ताटातूटीचा न बघवणारा सर्वात मोठा दुःखी प्रसंग...बघणारे डोळे पाणावून गेले.. अवघी हृदये दुखवेगाने डचमळून गेली.दाटलेल्या कित्येक हुडक्यांना कंठ फुटले...आपल्या लाडक्या दीदीचं लग्न ठरलं होतं.. साखरपुडा झाला होता..थाटामाटात लग्नं पार पडायचं होतं.घरादाराला खुप आनंद झाला होता. पण ऋषिकेशच्या अशा जाण्यानं साऱ्या आनंदावर विरजण पडलं...आता आपल्या लाडक्या दिदीच्या लग्नात भाऊ म्हणून कोण मिरवेल.. पुढं होऊन सगळं कोण लगबगीनं पार पाडेल...? माहेरपणाचा भरभक्कम आधार म्हणून तिनं कोणकडं बघावं..? मनात येणाऱ्या अशा विचारांनी मन तीळ तीळ तुटतं तिथं त्या बहिणीच्या मनाची अवस्था काय होत असेल.?
पोलीस दल व भारतीय सैन्य दलातर्फे हवेत फैरी झाडून आपल्या देशवासियांच्या तर्फे अखेरची मानवंदना ऋषिकेशला देण्यात आली.
आणि अखेर लालबुंद ज्वाळानी आमच्या लाडक्या जवानाला कवेत घेतले...गर्दीच्या डोळ्याला पान्हा फुटला..जे लेकरू जिच्या छायेत मायेत वाढलं जिच्या अंगणी खेळलं बागडलं शिकलं सवरलं.. आणि आज देशाच्या कामी आलं ती ऋषिकेशची शाळा मूकपणे आपल्या लेकराचा अंतिम दर्शन घेत ते अंत्यसंस्कार भरल्या अंतःकरणाने पाहत होती...तिचाही उर आज अभिमानाने भरून आलं असेल..पण मूकपणे ती ही आतल्या आत रडत होती..
कुठून येते एवढी जिगर.अवघ वीस वर्षांचं कोवळं वय..ज्या वयात जीवनाची मजा लुटायची..eat,drink and be happy 'ये दिल मांगे मोर खाओ पीओ मजा करो...' अशा दळभद्री जगण्याला ठोकर देऊन आपल्या देशासाठी अवघ जीवन वाहणारी अशी लेकरं जन्माला येणं..हे खऱ्या अर्थाने त्या आईवडिलांचं आणि त्या देशाचं खुप मोठं भाग्य आहे...धन्य धन्य ते मातापिता असा जिगरबाज कर्तृत्ववान पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आला...'पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रैलोकी झेंडा'
बहिरेवाडी सारख्या मातीत जन्मलेला हा शूर वीर सीमेवर जाऊन शत्रूशी दोन हात करता करता धारातीर्थी पडला. भारतमातेला आपला रक्ताभिषेक करून आपल्या मातीची..गावची आईवडिलांची..देशाची आण बाण शान राखून जीव बहाल करून गेला...मरणार तर आपण सगळेच आहोत..पण डोक्याला कफन बांधून निधड्या छातीने देशासाठी लढणारे आणि लढता लढता असं मरण वाट्याला येणारे खरे भाग्यवान तेच असतात..आणि त्यांच्याच वाट्याला असा मरणाचा देखणा सोहळा लाभतो.ज्याला देशासाठी मरण आलं पण ते कधीच मरत नसतात..ते तर त्या दिवसापासून अमर होतात.
मायबापा आपला लेक कुठंही गेला नाही तो आज अवघ्या देशवासियांच्या हृदयी विराजित झाला आहे...तो कळीकाळालाही पुरून उरणारा आहे..
सरणावरती जळती जरी आज आमुचे प्रेते
या राखेतून जन्म घेतील उद्याचे भावी नेते
आपल्या ऋषीकेशच्या पराक्रमाची गाथा इथे प्रत्येक माणूस गाईल..त्याच्या विंरमरणाची.प्रेरणा घेऊन इथल्या प्रत्येक घरांत घरात असा ऋषिकेश जन्माला येईल जो देशसेवेच्या कार्याला वाहून घेईल..आणि कल्याणीदीदी तुझा भाऊ कुठेही गेला नाही तो तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयात आहे..तू कधीही दादा म्हणून हाक मार...अवघा महाराष्ट्र भाऊ या नात्याने तुला प्रतिसाद देईल..भाऊ म्हणून तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल.आमच्या शूर वीर ऋषिकेशचे बलिदान वाया जाणार नाही..सीमेवर असणारा माझा प्रत्येक सैनिक त्या कडेकपारीत ओघळलेल्या ऋषिकेशच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेईल...
सरफरोशी की तमन्ना
अब हमारे दिल में है !
देखना है जोर कितना,
बाजु ए कातिल में है ?
या देशाच्या उभारणीत बहिरेवाडी गावाने खुप मोठे योगदान दिले आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणतज्ज्ञ डॉ.जे.पी.नाईक सारखे रत्न देशाला दिले..तसेच वीर जवान प्रवीण जानबा येलकर आणि आता शहीद ऋषिकेश जोंधळे यांसारखे वीर सुपुत्र या गावाने देशाला सुपूर्द केले. देशकार्यात बहिरेवाडी गावचे असलेलं हे योगदान कोणीही विसरू शकणार नाही..बहिरेवाडी गावचा आम्हांला सार्थ अभिमान वाटतो.
शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांना भावपूर्ण आदरांजली...
वीर जवान तुझे सलाम
जय हिंद जय भारत..
Khupch sundhar likhan.....Angatil rakt sancharle
उत्तर द्याहटवाखुप छान शब्दात व्यक्त केलात सर खुप धन्यवाद
उत्तर द्याहटवाजय हिंद....🇮🇳
उत्तर द्याहटवा