फॉलोअर

रविवार, ६ डिसेंबर, २०२०

बलुतेदार परीट समाजाविषयी..- किरण चव्हाण.

 

'एक वेध परीट समाजाचा : भूतकाळापासून वर्तमानकाळपर्यंतचा.'

                                           गावगाड्यातील बारा बलुतेदारांपैकी परीट हा एक महत्वाचा आणि प्रामाणिक असणारा मेहनती समाज.महाराष्ट्रात तो परीट तर इतर राज्यांत 'धोबी' या नावाने ओळखला जातो.२०११ च्या जनगणनेनुसार देशात परीट समाजाची लोकसंख्या ८,२२,००,००० इतकी आहे.संपूर्ण राज्यात तो कमी अधिक प्रमाणात विखुरला गेला आहे.या परीट समाजात मादीवाला,अगसार, पारित, रजक, एकली,चकली, राजाकुला,वेलूतदार,सेठी,मरेठीए अशा जाती-प्रजाती आहेत.संत गाडगेबाबांशी या समाजाचं जिव्हाळ्याचं नातं.आपल्या परंपरागत व्यवसायातून कित्येक वर्षे हा  समाज आपल्या गावच्या सेवेत रुजू आहे.अशा या परीट समाजाचा भूतकाळापासून आज वर्तमानकाळपर्यंत घेतलेला हा वेध..

                                       आमच्या गावाच्या वरल्या आळीला एका कडन वसल्याली सताट घरं हाइत..काही जुनीपाणी साध्या खापरीची तर काही अलीकडं बांधल्याली कौलारू छपराची.. काही दगडा मातीची, विटांची..साधी सुधी पण निटनेटकी तर सगळ्यात कडला एक चांगला नजरत भरल असा बंगलाटाईप. असा एका रांगत परटांच्या घरांचा हा गोतावळा...याच रांगतल सरमधलं घर.वरती हिरवा आणि खाली गुलाबी रंगांचा पट्टा.. बाहेर शेड्यावर जाडजूड आखीव रेखीव दगडांची कट्टी.त्या कट्टीच्या खालच्या कचात लोखंडी सळीच्या..दोन तीन ठिकाणी आडी कल्याला गोल रिंगा,आत खाली लग आणि दोन पायऱ्या वर चढून मग सोपा...सोप्यावर आडवी बांधल्याली मेसकाटीची आडवी दांडी..तिच्यावर एका वळीन लादल्याली धडूती..मधल्या भीतीला बडोद्याच्या खायनं एका रांगत देवाधर्माचं फोटो..त्यात सगळ्यात कडला एक फोटू आपसूकच लक्ष वेधून घित होता...तसं त्यो कुणाचाबी घेईल...कुणाचा होता तो..? त्यो होता स्वच्छतेचा मंत्र देणाऱ्या संत गाडगेबाबा महाराजांचा.अणुकीचीदार नक्षीकाम केलेल्या चौकटी...तसाच खालचा हुंबरा..गरीबाचा वाडाच म्हणायचा त्यो हे घर म्हणजे सातू परटाचं.आणि याच मधल्या सोप्याला एका बगलला घोंगड्यावर सातू परटाची बैठक..सातूआज्जा म्हणजे सगळ्यांचा तात्यामा. सानथोर सारी मंडळी 'तात्यामा' म्हणूनच हाक मारत्यात.. रंगानं काळासावता,लांबसडक टोकदार नाक..वठावर पिकलेल्या पांढऱ्या मिशांचा खंगोल...गालाच्या दोन्ही पाकळ्यास्नी सुरकुत्या पडल्याल्या. 

                                           तरीबी ऐंशीपतोर वयाची गाठ पडायला आल्याली. परटांच्या सगळ्या भाऊबंदकीत जुनाजाणता माणूस..तात्यामाचं एक वेगळेपण सांगायचं म्हणजे तात्यामा पयल्याकाळी सगळीकडं फिरल्याला...बारा गावचं बारा घरचं पाणी पिल्याला माणूस..आपल्या पावण्यारावळ्यात पार मुंबई-पुण्यापतोर जाऊन आल्याला.इकदा कुठल्या नातलगाकडं पुण्याला गेलता...पुण्याला म्हणं नदीच्या काठाला घाट बांधल्यात तिथं परिट धुणं धुत्यात त्येंच्याकडन वरसाला तीन रुपया कर घेत्यात. ही तर गोष्ट तात्यामा कुणासंग बोलताना हमखास सांगायचा म्हणजे सांगायचाचं.जिथं जाईल तिथला हालहवाला आपल्या माणस्नी सांगायची सवय..बारा गावच्या बारा भानगडी...आणि सतरा घडामोडी ऐकाव्या तर त्ये तात्यामाकडनं.गावच्या परटाच्या समाजात थोराड माणूस ह्यो एवढाच.परटाचीच नव्ह गावात कुणाचंबी लगीनसराई असू दे नाही तर कंचाबी कार्यक्रम... तात्यामा जातीनं हजर असणार...भाऊबंदातबी मिळूनमिसळून काय करायचं,कुठं जायाचं असू दे तात्यामाला इचारूनचं सगळं करायचं...कुणाचा भांडणतंटा-तिड्याचा वाद त्यो सोडवायला तात्यामाकडंच.दुखणंपाखणं असू दे गल्लीत कुणाच्या घरात महीत व्हवू दे तात्यामाचा लई आधार वाटायचा लोकास्नी... आन तशी तात्यामालासुद्धा माणसांची दांडगी मया..साधं. वाटन जाणारं वाटसरू असू दे,तात्यामा मुद्दाम हाळी मारणार..ख्यालीखुशाली इचारणार...तात्यामाचं एक वाक्य तोंड पाठ केल्यासारं त्याच्या तोंडात ठरल्यालं असायचं..."चांगलं बोलून चालून-ऱ्हायाचं बघ..जातानं काय घिऊन जायचं हाय व्हय" तात्यामाचं बोल खरंच व्हतं... त्या साध्या साध्या शब्दात मोठं जीवनाचं तत्वज्ञान व्हतं.. त्याला ते उमगलं व्हतं... नुसता बोलत नव्हता तर तसा वागतबी व्हता..कारण गावातली लोकं त्याला मान द्यायची..वर म्हणायची..तात्यामाचं वागणंचं निराळं...जसं बोलणं गॉड तसं वागणंबी गॉड... 

                                                        एखादा माणूस तात्यामासंग तासघटका बोलत बसायचा त्यो तिथंच मंतरल्यासारखा बसून ऱ्हायाचा..त्याच्या नेहमीच्या गराड्यात गावातली जुनी जाणती म्हातारी माणसं....तात्यामाला आपल्या परटाचा धंदा आपला समाज याविषयी लई अभिमान.. सगळं कसं समोरच्याला पयल्यापासून हारखून सांगायचा..पोपटाच्या चोचीगत सदा लालेलाल रंगीत जीभ...आधीमधी हिरव्याकंच खाऊच्या पानांची उळी दाढत धरून चगळायचा. बसल्या जाग्यास्न उठून दाराम्होर जाऊन लालभडक पिंक मारून पुन्हा आपला जागा धरायचा.तात्यामाच्या पोटाला तीन ल्याक आणि दोन लेकी...एक मास्तर म्हणून शहरात नोकरीला आणि दोघ गावाकडं शेतीधंदा करत्यात...लेकी दिल्या घरी चांगल्या हाइत्या.नातरुंडं-पितरूंडं तात्यामाच्या अंगाखांद्यावर खेळात्यात,पुढ्यात दणाणा उड्या मारात्यात,अंगाशी झोंबत्यात.तात्यामाचं घर म्हणजे भरलं गोकुळ..आणि तात्यामा म्हणजे सुखासमाधानानं पावन झालेला माणूस... 

                                                     अशा या तात्यामानं माझ्या मनावरती कधीच भुरळ घातली होती...आणि एकदा मनानं पक्कं केलंच.. आपण आता तात्यामाला भेटायचं..आणि म्हणून  एका सांजवक्ताला निवांतपणे मी तात्यामाजवळ जाऊन बसलो...माझ्यासमोरच तात्यामानं घोंगड्यावर बैठक मारलेली.सुरुवातीलाचं मला माझ्या आज्जा-पंज्यांच्या नावांची उजळणी करावी लागली तवा कुठं तात्यामाला माझी वळख गावली.. मधल्या चौकटीला गुणाआज्जी कौतुकानं माझ्याकडं बघत होती.तिच्या सुरकुत्या पडलेल्या कपाळावर चांगलं बंदा रुपायाएवढं ठसठशीत कुंकू उठून दिसत होतं...हिरव्या काठाचा डुईवरचा पदर.. मांडीवर तान्ह्या नातवाला ती घेऊन बसल्याली..लगश्यान तिनं सूनला चुलीवर चहा ठेवायला सांगितलं.

"मुला काय करतुस कुठं आसतूस..?" असं गुणाआज्जी मायेनं सारं मला विचारलं...

"अलीकडंची पोरं तुम्हीं कशी वळखशीला... आरं बाबा तुझी आज्जी आमच्याकडंचं द्यायची धडूती धुवायला.."

चहाचं कप पुढ्यात आलं.आज्जा- आज्जी एकेक करून मला प्रश्न विचारू लागले.तसा मी चहाचा एकेक घोट घेत त्यांना उत्तरे देऊ लागलो.आज्जा-आज्जी बोलत होते तसं जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता.आमच्या गप्पाला रंगत आली..आणि मात्र मला जे जाणून घ्यायचं होतं.. तात्यामा..त्यांचा परीट व्यवसाय.. त्यांचा समाज त्या अनुषंगाने विचारू लागलो तसं तात्यामानं आपलं एकाबाजूनचं पट्टा सुरू केला पयल्यापासनं बयाजवार सगळं सांगू लागला...त्यो बोलत होता पण त्याचं मन भूतकाळात शिरलं होतं.

                                          "गरिबा घरी गरीबाच्या पोटी उपजल्याली आम्हीं लेकरं...आम्ही एकूण सात भावंडं... चार भाव आणि तीन भणी...आई - बा बिचारी गरीब,दिनवानी...काय सांगायची हालत तवाची....काय सांगू नि कस सांगू..आम्हीं सांगू ने नि कुणी ऐकू ने.ऱ्हायाला एक नकाडं खोपाट व्हतं...नारळाच्या  ढाळ्याचं.. आणि उसाच्या पाल्याचं खोपाट.त्यात आम्हीं एवढी माणसं ऱ्हाईताव..वाडवडलापासून चालत आल्याला आमचा परटाचा धंदा...हातावरचं पॉट..चार हात राबणारी आणि धा तोंडं खाणारी...कुणाला म्हणून पुरायचं...कोंड्याचा मांडा करून खाल्ला बाबा आम्हीं... आई नदीला धुवायला गेली की रानातली कुर्डुची,घोळ्याची भाजी आणायची...तवा भाजीला 'त्याल' बी मिळायचं न्हाई...मिठाचा खडा टाकायचा आणि तशीच तव्यात परतायची.. पोटाच्या आगीला भाकरीच्या तुकड्यासंग आत ढकलायचं..पोटाची भूक लई वंगाळ...काय खाऊ नि काय गिळू व्हायचं...आई- बा तरी जीवाचं रान करायचीत.. पर पोटाला पोटभर आन मिळायचं न्हाई.आई सकाळी लवकर उठली की,हुडदाच माडगं करायची...ताटलीत वतून दिलं की,सरसरून प्यायचं..काय सांगू त्येची चव.निराळीच म्हणायची.आसं कित्येकदा घडलया..नुसत्या पाण्यावर आम्हीं झोपलूया... दाताच पाणी गिळून गप बसायची येळ यायची..अंगावर साधा कपडा चांगला मिळाला न्हाई..आई-बा मुलखाची कापडं-चोपडं धुवायची खरं स्वतःच्या लेकरास्नी धडूता घ्यायला मिळत नव्हता.. तवा पैसा कुठला..रूपाया म्हंजी बैलगाडीच्या चकराएवढा वाटायचा..नुसतं पोटासाठी राबायचं की गां...कुणी तरी मोठ्या घरातलं बाईमाणूस  जुनं-पानं झाल्यालं धडूत आईला द्यायचीत ती आई आम्हांस्नी घेऊन यायची.आसं परक्याचं धडूत कधी आणलं तर आम्हीं हारखून ढया व्हायचो.दुसऱ्याचं कापडं घालून मिरवायचो...

                                                         एका माळचं सात मणी म्हणत्यात तसं आम्हीं सात भावंडं...आई कुणाकुणाचं म्हणून बघणार त्यात माझ्या पाठवरची धाकली भन तानी.तिला तर सारखं बरं नसायचं...आई कुठलं कुठलं दयाव- धराम करायची...लेकीच्या नुसत्या उशाला बसून ती रात रातभर जागायची.माझ्या आयचं तर कुत्रंहाल व्हयाचं... पाटचं येरवाळी उटायचं..घरातली निरवानीरव करायची ती लगोलग गावात पळायचं... समद्या गावांत फिरून धडूती-बिडूती जमा करायची... एक बोचकं डुईवर एक काकत मारून..कुठल्यातरी आयबायांनी भाकरतुकडा दिल्याला असायचा त्यो तसाच वट्यात घालून आम्हां लेकरासाठणी आणायची...घरात आली की आमास्नी पयल्यांदा जेऊ खाऊ घालायची... कुठं खाल्ल कुठं नाही त्ये लगीच धडूती धुवायला नदीला पळायची.संग बा सुद्धा असायचा..दोघ मिळून समद्या गावाची धडूती धुवायची...उन्हाचा कडाका व्हायला म्हणजे आटपून व्हायला पायजे इकडं ध्यान असायचं पण कधी कधी दिस लागायचा...न्हान असताना मी-माझी भावंडं कधी मधी आई-बा संग जायाचो..नदीच्या काठाला नकाड्या पाण्यात मग आमच्या उड्या.. एकमेकांच्या अंगावर पाणी मारायचो...नुसती पाण्यासंग मस्ती करायची...आई मग तितनच वरडायची...

                                                     धुणं धुवून झालं की,बा भरल्या नदीत आत आत जाऊन पवून यायचा..तवा आम्हांला बा चं केवढं कवतिक वाटायचं...आम्हींबी 'बा' कडं आम्हांस्नीबी पवायला शिकीव म्हणून सारखा लकडा लावायचो..मग बा बी एकेकाला नदीत आत घेऊन पोटाखाली हात घालून पाय मारायला सांगून पवायला शिकवायचा.बा न तवा आम्हांस्नी पवायला शिकवलं...म्हणून तर आता कुणीबी सांगावं भरल्या तर  भरल्या नदीत आणि कंच्याबी हिरीत आम्हीं पवायला तयार. शाळा जायाचं वय झालं कशी तरी पयलीपतोर शिकलो बघ शाळा...आमच्यावर तवा योकच गुरुजी व्हता. काळे आडनावाचा गुरुजी..गांधी टोपी.. काळा कोट..पांढर धोतार...आणि हातात जाडशीर लांब काटी...वठावर दोन्हीं बाजूला मिशांचा खंगोल.सदा पानाचा तोबरा भरल्याला.टेबलावर नुसती काटी आपटली की,पोरं निम्मीअर्धी गार व्हायची...लई मारकूटा मास्तर व्हता...शाळला गेलं न्हाई की,लवण्यात झमाझम काट्या मारायचा...पेंढरी बेडकावाणी फुगायची.. सुजायची... कोण जाईल असल्या शाळत.अशा मास्तराच्या माराला भिऊन शाळा दिली सोडून...मग काय गल्लीतला हाणम्या,नामा,दगडू हे आमचं गुराढोरकडलं बालमैतर.. आई-बा कामाला  गेली की आम्हास्नी रान मोकळं..ऊन माहिती न्हाई का तान्ह माहिती न्हाई आम्हीं पोरं पोरं नदी वताडातन(लहान ओढे) मासं,खेकडी पकडायला जायाचं.रानाशिवारातनं कुठं आंबं, जांभळं,करवंदासाठनी दावं नसल्याल्या जनावरांसारखं उंडगं फिरायचं.

                                          आईनं गावातल्या जनाई पाटलीनीकडन आरदलीन शेळी घेतली व्हती..तिचा आता चार पाच करडांचा खांड झालता...पुढं पुढला बा नबी येजाच्या पैशावर दुभती म्हस आणली...कारण आता आम्ही भावंडंबी जरा जाणतं झाल्याल्याव जराकमी कळतं झाल्यालाव... घरातली कामं करत व्हतो...मी शेरडांचा खांड घेऊन डागला (डोंगराला) जायाचो..आता घरात शेरडां- करडांचा,म्हशींचा खटाला झाल्याला.हळूहळू घराला बरकत आली. आई-बा न परटाच्या धंद्यावर..आणि शेरडाकरडांच्या जीवावरघर नवं घर बांधायचं ठरवल्यालं.. आणि मग एकदा कामाला सुरुवातबी केली. त्या येळला आम्हीं भणीभावंडं आई-बा रातंदिन उरापोटी राबलो.. आणि एकदासं चांगलं दगडा-मातीचं नकाड घर उभा राहीलं.आई-बा गावतन धडूती जमा करायची आणि मग आम्हीं सगळीच नदीला धडूती धुवायला जायाचो...आता काम करणार हात वाढल्याल त्यामुळं आई-बालासुधा आधार झाल्याला...पुढं पुढं जशी वयं झाली तशी आमची लग्नं झाली..भणी जिकडं तिकडं दिवून टाकल्या...माझं लगीन त्यायेळला स्वस्ताइत सात रुपयात झालं..आता बघताईसा नवं कशी म्हागाई वाढलीया...आता सात रुपयात कात बी यायचा न्हाई.

                                                   आई-बा नं लग्नं करून दिली जो तो आपापल्या संसाराला लागला.आता आईबाचं वय झाल्यालं. बिचारी खूप राबली आमच्यासाठनी.. खूप कष्ट उपासल.पर आम्हीं भावा भावांनीबी त्येंची जाण राखली..म्हाताऱ्या वयात त्यास्नी चांगलं जपलं..आमच्या चुली येगळ्या पण एकी चांगली..कुठल्याबी भावानं आई-बाला अंतर दिलं न्हाय..शेवटपतोर वाळ्या खारकगत... कसला आजार न्हाई..कसला दवापाणी न्हाई..वय झालं, शरीर थकलं तसं हातरून धरलं..पयला बा मरून गेला आणि मागाहून चार वरसान आई गेली. 

                                                 तसं आम्हीं भावा-भावांनी मिळून ह्यो परटाचा धंदा चालू ठेवला.   गावातल्या लोकांच्याकडनं कापडं-चोपडं जमा करून घ्यायची.बोचकं बांधून घ्यायचं.बोचकी जास्त आसली की,घरातली सगळी जाणती माणसं असायची....बोचकी डुईवर घ्यायची ती सरळ नदी गाठायची. धडूत्यांचा मोठा ढीग सपय खडकावर वाळ्या जाग्यावर ठेवायचा.आणि मग सकाळच्यापारी आमचं काम सुरू.काठावरच्या सरळसोट धोंड्यावर एकेक कापडं धुवायला घ्यायची.आताच्यासारखं त्यायेळला साबणसुबन कुठला..? नदी-वताडाच्या काठानं पांढरी माती असायची जितनी शाडवागत..ती माती घ्यायची तिचा मुटका करायचा.आणि कपड्याला घासायचा...चिवट तेलकट डाग आसू दे न्हाई तर कसली भी मळ असू दे की,मळकी कापडं माती लावली आणि पाण्यात खुदबळून जरा बाहीर काढली की,कशी लख्ख निघायची...एकेक धडुत हातात आलं की कसा चेव चढायचा म्हणतूस...धडुत कशी लख्ख व्हतील इकडं सगळं ध्यान.पर हां... लई घासाघीस करून चालायची न्हाई..कापडं धुताना इकडं कपड्याचा मळबी गेला पाहिजे आणि पहिल्यासारा त्याचा रंगबी राहिला पाहिजे यासाठी जपून धुवाया लागतं. बड्या घरची...परलोकांची कापडं..कुठं फाटलं-उस्तारलं बटाण बिटान तुटलं तर बदमाल नको म्हणून जिकिर असायची.

                                                  मोठ मोठ्या लोकांची कापडं आमच्याकडं धुवायला आसत.गावातल्या बामनं,पाटलाच्या घरची कापडं सर्रास धुवायला आमच्याकडच.ही आमची हक्काची गिऱ्हाईकं म्हणायची.एकेक कापडं धुऊन- पिळून नदीकाठाच्या वाळ्याखड दगडावर ठेवायची आणि सारं धुऊन झाली की, उघड्या पडीवर..कुठं वाळ्या जागी वाळत घालायची.. माणसं जास्त असली की,एकानं धुवायची, एकानं पिळायची आणि एकानं ते सपय जाग्याला वाळत घालायची.चांगली सोकली- वाळली की,मग एकेक करून त्याच्या घड्या घालायच्या.ते एकावर एक येवस्तीर मांडायचं नी फडक्यात बांधून ते बोचकं घेऊन घरला परतायचं.आख्खा दिस याच व्यापात जायाचा.सांच्यापारी ज्येची त्येची कापडं परत द्यायची.जशी घेतली तशी कापडं त्येंच्या सोध्यान करायची.पर कधीमधी कापाडाची हेंच त्येला आन त्येज हेला अशी गफलत व्हायची...पण लोकं कायबी बोलायची न्हाईत...परीटमा हे जरा बदलून आलंय बघ कुणाचं.हे कायआमचं नव्ह बा... तवा मग वळख पटवून ज्येचं त्येला द्यायचं...आता एवढी गावमुलखाची कापडं  म्हटल्यावर कापडांच्या धबडग्यात अशी चूक कंदीतरी व्हायची...चालायचंच. जास्त मळकी डागाबिगाची कापडं लख्ख निघाल्याली बघून एखादी मालकीणबाई खुश व्हायची..."परीटमामा...कापडं चांगली धुतल्याती." आस आनंदाचं दोन शबुद म्हंजी ती आमची  शाबासकी म्हणायची नवं का.? आमच्या कष्टाचं ते चीजच म्हणायचं...तेवढ्यान मन भरायचं आमचं.नाही तरी पयल्या काळी आमच्या या कामाला दाम मिळत नव्हतं.. पोटाला पॉट भरून दोन येळला जेवाण मिळायचं...दोन वक्ताच्या जेवणासाठी गावची कापडं आम्हीं धुवायचो...

                    काळ माग पडला फकस्त पोटच्या भूकंसाठी राबनं परवडना..माझ्या पोटाला पाच लेकरं झाल्याली.घरात एकाची दोन दोनाची चार...खाणारी तोंडं वाढली...गरजा वाढल्या..गरीबीनं म्हणा वा आमच्या नशिबानं म्हणा आम्हांला एक शाळा शिकता आली न्हाई.. पण एक ठाणलं व्हतं काय बी व्हवू दे जमलं तसं पोरास्नी शाळा शिकवायची..आणि मग पोरांस्नी बजावूनच ठिवलं व्हतं पयली शाळा मग बाकीचं काम.या काळात कापडं धुण्याच्या मोबदल्यात लोकांच्याकडणं बैतं (धान्यस्वरूपात मोबदला)घ्यायला सुरुवात झाली.गावातली आयगारी (सुतार,लोहार,चांभार,कुंभार) लोकं जशी कामाच्या मोबदल्यात वर्षाची बिदागी घेत्यात तसं आमच्या समाजातही सुरू झालं.एखाद्या कुटूमांकडं बैतं ठरायचं. मग भात, शेंगा,दाणदुनं असू दे जे चांगलं पिकल ते धान पदरात पडायचं. त्याबदल्यात वरीसभर त्या घराची कापडं चोपडं धुवून द्यायची...एखादी कुळविन (शेतकरीन) आपल्या लेकराचं धडूत चांगलं धुवून देण्याच्या बदल्यात हौसनं घरातल्या बापयमाणसांच्या माघारी सूपभरून धान वाढायची.कुणी आपल्या घरातली जुनीपानी कापडं, जुन्यारं घालायला म्हणून द्यायची.ती आम्हाला, आमच्या  लेकरांच्या उपेगाला पडायची.

                            गावच्या म्हाईला (जत्रेला) आणि दसऱ्याकडं ,कवा आदनमधन वाकळाबी धुवायला घ्यायचो.म्हाताऱ्या माणसाचं पटकं रंगवायला घ्यायचं. गावात  रंगवायची सोय नसायची त्यायेळला तवा कुठं ठिकठिकाणी हे काम करून दित असायचीत तितनं रंगवून आणून गिऱ्हाईकाला पोच करायचं.लगीन घराची कापडं धुवायला आमच्याकडं असायची.आनंदाघरची कापडं असली की बिदागीबी चांगली मिळायची..लगीन मंडपात चांगला मान मिळायचा...तसं तर लगीन कार्यात पाट पुजायचा..तळी मांडायचा मान आमच्याकडंच आसतोय म्हणायचा..उलट आणि नवरा नवरीच्या डोक्यावर चांदवा (चादरी) धरायचा तो आम्हींच..बाळंतीण बाईची-बाळाची धडूतीबी आमच्याकडं धुवायला असायची..अगदी घरच्यावाणी आम्हीं करायचो.कशाची आशा नसायची पण बाळाच्या बारशात आमच्या घरच्या कारभारनीला लोकं हौसनं झंपरपीस- पातळ नेसवायची,चांगला मान दिला जायाचा.

                                    दिवाळीत गवळण्या घालत्यात आणि शेवटाला त्या गवळण्याचा वाडा घातला जातोय...तो वाडा पुजायचा मान आम्हांला मिळतोय.लोकं आम्हांला त्यो वाडा पुजायसाठी घरी बलवत्यात. "दिन दिन दिवाळी गाई म्हैशी ओवाळी गाई म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या.."असं म्हणत त्या वाड्याची पूजा करून आरती म्हणायची...पयल आम्हीं बा संग आस दरवरसी वाडा पुजायला कुरवाड्याच्यात जायाचो..आता आमची लेकरं आमच्यासंग येत्याती.दुःखासुखाला आमचा परीट समाज कधीबी उभा ऱ्हातोय...गावात कंच्याबी घरी कोण वारलं की..त्या सुतकात आकंड घरातली कापडं आमच्याकडं धुवायला...बाराव्याच्या कार्यक्रमापतोर ती कापडं धुवायची... त्येचा मोबदला कधी मिळल...किती मिळल असलं ध्यानीमनी पण नसायचं...आवं आपलं कामच त्ये...केलंच पायजे. कसली आशा नाही पण लोकं लई प्रामाणिक...त्यांचं उग्र-निग्र काढल्यालं.. त्येंच्या ध्यानात असायचं बरं...न चुकता आपुलकीनं बिदागी...मानपान द्यायचीत...याआमचा परीट समाज दांडगा मेहनती..वरीसभर त्याच्या हाताला काम.पर आमच्या काळी जुनी माणसं सांगायची परटाची लोकं कुस्तीतबी भारी हुशार...समोरच्या पैलवानाला कुशालीन चितपट करणार.म्हणूनच म्हण 'धोबीपछाड' ह्यो डाव परटानींच शोधला असं पयली लोकं सांगत व्हती.

                                         भैरोबा आमचं कुळदैवत..तरीबी जोतिबा,खंडोबा,मरीआई,येडाबाई, भवानीदेवी या देवांचीबी पूजा आमच्या समाजात करत्यात.आमच्या इतनं जोतिबा जवळ हाय वरसातनं जोतिबाच्या दर्शनाला जाताव.तसाच आमच्या समाजात एक जिताजागता देव व्हवून गेला..लई थोर माणूस..माणसातला देव..आमचा परमेश्वर संत गाडगेबाबा महाराज...माणसानं कसं ऱ्हावं.. कसं वागावं..बोलावं..आमचं महाराज गाव गाव फिरून किर्तनातन सांगायचं..हातात झाडू घिऊन गांव साफ करायचं...आवं गाडगेबाबा माणसांच्या मनातला मळ घालवायचं तसा आमचा परीट समाज माणसांच्या कपड्यांची मळ घालवतोया...बाबांचं इचार आम्हीं आमच्या मनात जपतोया बघा.बाबांची जयंतीबी आमच्या समाजात साजरी व्हती.कुठं कुठं चांगला कारेकरम करत्यात.

                                           गावच्या देवाची मातूर वस्तरं.. काय आसल त्ये कापडं-चोपडं... आमच्याकडं धुवायला असत्यात... ज्या गावात परीट न्हाई त्या गावच्या देवाची वस्तरं आम्हीं धुऊन देतो...म्हाई... दिवाळी, दसऱ्याला ददेवाच्या दरबारात दिवटी धरायचा मान आम्हाला मान मिळतोय..तर कुठं दुसऱ्या भागात आमच्या समाजाला आबदारी धरायचा मान मिळतोया.पण ही फकस्त सेवा म्हणून करायची...अजून ही तरी चालरीत चालू हाय म्हणायची...पयल्या काळी देवाचा कायबी कारेकरम आसला की तवा भांड्यात भात शिजवायचा आणि तो खाली फडकं हातरून त्यावर वतायचा त्ये फडकं आमच्याकडलं असायचं. त्या फ़डक्याला 'पडद' म्हणायचं. ही पडद आमच्या भाऊबंदकीत दर वरसाला आलटून पालटून यायची. आमच्या काळापतोर तरी सगळं चालू व्हतं पर खरं सांगायचं तर आताच्या काळात ह्या साऱ्या चालीरीती मागं पडत आल्या  म्हणायच्या..आणि तसं तर पयल्यासारं कोण करतंय ह्यो परटाचा धंदा.आता माझंच बघा की माझी दोन पोरं लई काय न्हाई थोडीफार शिकली..धाकटं तरी चांगलंचं शिकलं आणि शहरातल्या शाळत मास्तर म्हणून डसलं. पोरं करती धरती झाली..आमचा परटाचाचं नव्ह हरेक नमुन्याचा उद्योग करत्यात..पोरांनी आता शेतीबी घेतलीया.चार एकर शेती हाय..ऊस करत्याती... बक्कळ पैसा कमवत्यात... आता पयल्यासारं न्हाई ऱ्हायलं.जे बापानं केलं ते लेकानंबी करावं..आता ही आमची म्होरची पिढी  शिकली सवरल्याली हाय...लाथ मारील तिथं पाणी काढणारी हाय ती.आता कुठं कुठं तरीच म्हणायचं आमचा परटाचा धंदा,तर कुठं आपला परटाचा कामधंदा बघत शेती-उद्योगबी करत्यात म्हणायचं.

                                           आता हे काय आमच्या परटाच्या समाजातच बदल झालाय आसं न्हाय. सगळीकडंच ह्यो बदल झालाय..दुनियाच बदललीया म्हणायची.लांबच कशाला जवळचंच बघा की, आमच्या गावांत चांभाराची धा घरं हाइत.पण जुनी माणसं सोडली तर अलीकडच्या एकाबी पोराला चप्पल लावायला इत न्हाई...चांगली शिकून सवरून मोठ्या हुद्द्यावर काम करत्यात.शिक्षणानं सगळीकडं सुधारणा झाली बघा आमचा तर समाज बऱ्यापैकी सुधारलाय.अलीकडची पोरं चांगली शिकूनसवरुन कुठं सरकारी खात्यात...कुठं खाजगीत मोठया हुद्द्यावर काम करत्यात...एकेकाळी फक्त पोटासाठी काम करणारा आमचा समाज आता.कोण शेती,व्यवसाय,नोकरी करून आपापली प्रगती करतोया...पण आपला परटाचा धंदा मागं पडला म्हणायचा...शहरठिकाणी तेवढा जेमतेम सुरू हाय पण इकडं खेडंगावात कुठं कुठं तरी न्हाई तर बंदच पडल्यातच जमा म्हणायचा..

                                             आता ही इस्त्रीची दुकानं थाटल्यात ती बऱ्यापैकी आमच्या समाजातल्या लोकांनी...इस्त्री करत्याती ती डराय किलनिंग का काय ती बी करत्यात..आणि कोण आणखीन कसला कामधंदा करत्यात..बऱ्याचजणांनी रोजीरोटी,नोकरी-व्यवसायाच्या निमित्तान शहरं गाठली...तिथंच स्थायिक झाली.पयलं माणसांकडं कायबी नव्हतं पण एकमेकासाठी येळ व्हता..आज घड्याळाच्या काट्याची गुलाम झालीत ही माणसं..कुणाकडं हाय का कुणासाठी तासघटका येळ...नुसती गरा-गरा घिरट्या घालीत असत्यात पैशाभवती...एकेक काळी नुसती पोटासाठी राबणारी आम्हीं माणसं कुणाला सांगून पटल.. आता पैशाला किती म्हतवं आलं,जो तो पैशाच्या मागनं.आपल्या गावात आता आमची आठ घरं हाइत आता कोण किती आपला धंदा करत्यात..? जेमतेम तेवढं आपलं सुरू हाय..जे इथं ते जगात.आता लोकं कुणावर इसमून नाहीत ऱ्हायली.हल्ली बघताईसा नव्ह माणसांची जागा आता यंत्रातंत्रानं घेतलीया..माणसांची कामं आता मिशीन करत्याती...जशी पीठ दळणारी मिशीन घरात आली तशी कापडं धुणारी मिशीनबी घरात आलीया.शहरातनी मोठं मोठ्या लोकांच्याकडं कापडं धुणारी मिशीन सर्रास असतीया.इकडं कापडं घालायची... तिकडं वाळूनच कापडं बाहीर...सगळं कसं झट की पट.कुठं जायाचं न्हाई...कसला त्रास न्हाई..

माणसाकडं आता सगळं हाय पण एकंच न्हाय... येळ...आवं आता परटाच्या घरात जरी कापडं धुवायची मशीन आली तरी नवल वाटायला नगो."

....तात्यामा बोलत व्हता...बोलतच व्हता...भूतकाळातून आता त्यो वर्तमानात आला व्हता.


               - किरण सुभाष चव्हाण.(पांगिरे)

                ता - भुदरगड, जि-कोल्हापूर.                

                मोबा- ८८०६७३७५२८.

२ टिप्पण्या:

  1. किरण सर आपल्याला मिळालेली ही शब्द मांडणीची देणगी,आणि एखाद्या घटनेकडे साहीत्यीक दृष्टीने पहाणेची लाभलेली दृष्टी वाखाणण्याजोगी आहे.खरंच सर परीट समाजाचा इतिहासच आपण
    "तात्यामां" यांच्या संवादतून सादला आहात.
    छान माहिती----शुभेच्छा साहीत्यरूपही किरण-------- सरांना
    ज.रा.देशमुख

    उत्तर द्याहटवा

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...