'विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकाच्या अनुषंगाने...'
गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी आणि आपापल्या क्षेत्रात उत्तुंग उंची गाठलेली कर्तृत्ववान मंडळी या ग्रुपमध्ये सहभागी आहेत.त्या सर्वांना माझा प्रथमतः नमस्कार. मी आपणा सर्वांचे आभार मानतो की,आपण सर्वजण शिक्षणक्षेत्रातील 'विनाअनुदानित' या विषयावर नजीकच्या काळात येणाऱ्या 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकासाठी सहभागी झाला आहात.या अनुषंगाने हा ग्रुप स्थापित करताना आतापर्यंत ग्रुपवर पुस्तकाची नोंदणी,माहिती व चर्चा होत राहिली..अशा उद्देशासह हा ग्रुप स्थापण्यामागचा मूळ उद्देश प्रामुख्याने आणखीन स्पष्टपणे उघड झाला पाहिजे असं मला वाटतं. गेली दोन महिन्यापासून माझे जिवलग सहकारी बंधू मनापासून पुस्तकाचा उद्देश ,हेतू सर्वांपर्यंत पोहोचावा याकरिता धडपडत आहेत.दरम्यान ही वाटचाल करताना सध्याच्या कोरोना महामारीचेही गडद सावट आहेचं.याची आम्हांला पूर्णपणे जाणीव आहे.ग्रुपचा प्रतिसाद लक्षात घेऊन शिक्षण, साहित्य, कला,सांस्कृतिक, सामाजिक ,प्रशासकीय अशा विविध क्षेत्रातील आणि समाजातील संवेदनशील मान्यवर समाविष्ट होत आहेत.मला मनस्वी आनंद आणि समाधान वाटते की समाजाच्या उदात्त,उन्नत आणि समृद्ध अशा पोषक वातावरणासाठी धडपणारी,चांगुलपणाचा विचार पेरणारी आणि माणूस म्हणून जगताना आपला भोवताल अधिक सुंदर करणाऱ्या माणसांचा गोतावळा यानिमित्ताने एकत्र आला आहे.
आणि म्हणून वेदनेचा संवेदनांशी मेळ घालून आपल्यात एक संवाद घडावा यासाठी ही सारी धडपड आहे. खरं तर मी जरी एक विनाअनुदानित शिक्षक म्हणून असलो तरी जेंव्हा एक माणूस म्हणून मी या प्रश्नाकडे पाहतो. त्यावेळीे मला प्रकर्षाने जाणवतं की, 'विनाअनुदानितचा संघर्ष हा एका विनाअनुदानित शिक्षकाचा संघर्ष नसून या व्यवस्थेकडे माणूस म्हणून जगण्याचा हक्क मागणाऱ्या एका माणसाचा तो संघर्ष आहे.' नेमका काय आहे हा संघर्ष..? काय आहे ही वेदना.? जाणून घेतलं तर निश्चितच इथल्या व्यवस्थेने समाजातील या घटकावर कशाप्रकारे अन्याय केला आहे. त्यांच्या जगण्याचा प्रश्न कसा अधिक बळकट केला आहे हे कळून येतं.
२० वर्षांपासूनचा संघर्ष, ,१६० पेक्षा अधिक आंदोलने,शेकडो विनाअनुदानित शिक्षकांच्या आत्महत्या,विनावेतन निवृत्त झालेले आणि उद्याच्या आशेवर अजूनही उपाशी पोटी अविरतपणे ज्ञानदानाचं काम करणारे शिक्षक. प्रदीर्घ संघर्ष करूनही आज पदरात काय पडलं..? हा प्रश्न अनुत्तरितचं आहे.वर्तमानात कसं जगायचं आणि कसं जगवायचं.या दोन प्रश्नांशी लढत झगडत उद्याचं भविष्य आशेवर सोपवून दिलेलं आहे.
ही वेदना घेऊन जगणारे शिक्षक बंधू भगिनी या ग्रुपमध्ये आहेत.काही उदाहरणं द्यायची झाली तर जळगांवचे किशोर पाटील विनाअनुदानित शिक्षक. गेली १३ वर्षे विनापगार आहेत,मंध्यतरीच्या काळात दोन्हीं किडन्या निकामी झाल्या.जिथे हातातोंडाची गाठ पडायची मुश्किल.अशावेळी उपचाराचा १०-१२ लाख रुपये खर्च कसा करणार.? अक्षरशः त्यांच्या विद्यार्थ्यांनी हातात झोळी घेऊन समाजात भीक मागून आपल्या गुरुसाठी निधी जमा केला.
एक विनाअनुदानित शिक्षक भगिनी भरल्या गळ्याने भावना व्यक्त करताना सांगते.या विनाअनुदानितच्या प्रश्नाने आमच्या पती-पत्नीत घटस्फोट होण्याची वेळ आली.आज विभक्त राहून विनापगार करताना सर आज लेकरांना दुकानातला साधा बिस्किटचा पुडा घेतानाही आम्हांला विचार करावा लागतो, स्वातंत्र्यदिनी एक विनाअनुदानित शिक्षक आत्महत्या करतो तर कुठे एका बापाने तर बिनपगारी शिक्षक लेकाचे हाल बघवेनात म्हणून आत्महत्या केली,अहमदनगरच्या आमच्या राम सोनवणे सरांचे आईवडील लेकाचा पगार कधी सुरू होईल या आशेवर जगताना झुरून मरून गेले. आजही १८ वर्षे झाली हा शिक्षक मुलगा बिनपगारीचं.
सध्याच्या कोरोनाच्या काळात तर या विनाअनुदानित शिक्षकांची झालेली दयनीय अवस्था काय सांगावी...एका कोरोनाने क्षणात कसं होत्याचं नव्हतं झालं हे एका विनाअनुदानित शिक्षकाची पत्नी हुंदके देऊन सांगते..१४ दिवस मृत्युशी झुंज देऊन अखेर कोरोनाने त्यांचे पती गेले.१७ वर्षे विनावेतन काम करून आता कुठे ४०% पगात खात्यावर जमा झाला होता.तो ही या कोरोनाने त्या शिक्षकाला बघू दिला नाही.आता कुठे संसाराला चांगली सुरुवात झाली असताना कोरोनाने अशा परिवाराला दृष्ट लावली.क्षणात होत्याचं नव्हतं झालं. विनाअनुदानितच्या विषयावर ज्यांची अलिखित पी.एचडी झाली म्हणायला हरकत नाही असे सुनील शेंडे सरांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वाला पगारासाठी २० वर्षांचा संघर्ष करावा लागतो.अशा कित्येक ज्ञानवंताची आजपर्यंत परवड व उपेक्षाचं होत राहिली.प्रमोद पाटलांच्या सारखा एक विनाअनुदानित शिक्षक असणारा माणूस म्हणतो "मी भाग्यवान आहे कारण मी विनाअनुदानित शिक्षक आहे." किती वेडा माणूस असेल हा..विनाअनुदानित शिक्षकाच्या कुळीत जन्माला आला हे भाग्य मानतोय..पण याचं खरं कारण काय...तर आज असंख्य विनाअनुदानित शिक्षकांच्या अडीअडचणी धावून जाणं, आपल्याकडून जे होईल ती मदत करणं,त्यांना शाब्दिक,मानसिक आधार देणं...या संघर्षाच्या वादळात विझू पाहणारी एखादी जरी प्राणज्योत आपल्या शब्दांच्या आडोशाने वाचली तरी मी धन्य झालो..ही एक आंतरिक तळमळ...हा माणूस अखंड अश्रू ढाळतोय या आपल्या विनाअनुदानित शिक्षक बंधूभगिनींसाठी.
किती सांगाव्या एकेक वेदना..सगळीकडे अशा वेदनेची बचबच आहे.जखमेचा तर अंत कुठेच लागत नाही..कुठली वेदना पुढे करायची आणि कुठली मागे ठेवायची.कारण विनाअनुदानित संघर्षाच्या वेदनेची व्याप्ती आणि जखमेची खोली इतकी व्यापक आहे की ती अंशरूपानेचं मला पुस्तकात मांडत आली. अजून बरंच काही मांडायचं राहून गेलं हे मला प्रामाणिकपणे कबूल करावे लागेल.मी या प्रश्नाकडे पाहताना आजही मनातून अपुरेपणाच्या भावनेने अस्वस्थ आणि असमाधानी आहे.रोज अशा नव्या कहाण्या पुढे येतात एकापेक्षा एक कहाणी दर्दभऱ्या.
२० वर्षांचा हा अतोनात संघर्ष झेलताना आज या विनाअनुदानित शिक्षकांची मानसिकता कशी असेल हा संशोधनाचा विषय आहे.कारण या खचलेल्या,दुभंगलेल्या मानसिकतेचा मी स्वतः बळी ठरल्याने मला त्याची जाणीव आहे..एकंदरीतचं नैराश्य, उदासीनता, उद्विग्नता,दबलेल्या,खचलेल्या मानसिक स्थितीने ग्रासून गेलेली अवस्था विनाअनुदानित शिक्षकांची आहे.आणि एवढं असूनही त्याचं कर्तव्य हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने वैयक्तिक पातळीवरच्या अडीअडचणी या कर्तव्यात कुठेही आड आणून चालत नाही.भलेही त्याला कुपोषित जगावं लागत असले तरी आपल्या उणिवांचा त्याग करून आपल्या राष्ट्राची भावी पिढी सकस,पोषक आणि सदृढ बनवायची आहे ही जाणीव त्याला पदोपदी ठेवावी लागते.
एकूणच अशा गंभीरतेला गांभीर्याने जाणून घेऊन हा प्रश्न सोडवण्याची भूमिका शासनव्यवस्थेतल्या आजपर्यंतच्या माणसांनी घेतली नाही हे एक दुर्दैवचं. कारण प्रश्नांशी बांधिलकी जपणारी नेतृत्वशीलता काळाच्या ओघात मागे पडत आहे. ज्या प्रश्नांकरिता आपण निवडून देतो ती माणसे आज प्रश्नांपेक्षा स्वतःला मोठी समजायला लागलीत.त्यामुळे आपल्या राजकीय अस्तित्वासाठी त्या प्रश्नांची पूर्णपणे सोडवणूक न करता प्रश्न अनुत्तरित ठेवायचा हा राजकीय स्वार्थ ही याला कारणीभूत आहे.पण आमचे विनाअनुदानित शिक्षक बंधू भगिनी आपली जिद्द न हारता चिकाटीने आजही आपल्या हक्काच्या अनुदानासाठी मैदानावरचा लढा कायम ठेवून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.निर्ढावलेल्या व्यवस्थेला लोकशाहीच्या मार्गाने जाग आणण्याचं काम सुरूच आहे.
हे एकाबाजुला सुरू असताना एकंदरीतचं २० वर्षांपासूनच्या या धगधगत्या संघर्षाची वाटचाल,त्याचे परिणाम यांचा लेखाजोखा पुस्तकरूपाने मांडताना ही विनाअनुदानितची संघर्षगाथा समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पुस्तकरूपाने पोहोचावी.या वेदनेला संवेदनेची जोड मिळावी.दुभंगलेल्या, खचलेल्या मनाला समाजनाचा आधार मिळावा.त्यांचा आकांत,आर्जव या समाजानेही ऐकून घेऊन या नकारात्मकतेवर विविध घटकांतून, क्षेत्रातून एक सकारात्मक संवाद घडावा अशी अपेक्षा आहे.कारण माझा विश्वास आहे की,आपल्या जगण्यासोबत इतरांचं जगणं समृद्ध व्हावं.अधिकाधिक सुंदर व्हावं यासाठी धडपडणारी
दुःखावर फुंकर घालून मोडलेल्या माणसांना उभं करणारी समाजात माणसं आहेत.या चांगुलपणापर्यंत ही वेदना पोहोचली तर नक्कीच विनाअनुदानित संघर्षाच्या, दुःखाच्याप्रती समाजाची सहानुभूती अधिक बळकट होऊन यातून उमटणाऱ्या ज्या क्रिया प्रतिक्रिया आहेत.त्या या प्रश्नाला अधिक धारदार बनवतील आणि अन्यायाच्या विरोधात न्याय देण्यासाठी महत्वाच्या ठरतील. म्हणून मी अधिक आशा ठेवून आहे की समाजातील आपल्यासारख्या चांगुलपणा जपणाऱ्या माणसांची अन्यायाच्या विरोधातली जरब आणि धाक निर्ढावलेल्या व्यवस्थेतील स्वार्थी,असंवेदनशील माणसांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय हे परिवर्तन शक्य नाही.
'गुरुवर्य काकाजी समूहातील सर्वच महनीय,वंदनीय अशा विभूतींच्या ठायी माझी हृदयपूर्वक नम्र विनंती आहे की, २० वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षातून तावूनसुलाखून अजूनही या संघर्षात विनाअनुदानित शिक्षक बंधू-भगिनीं आपल्या परिवारासह होरपळत आहेत.आपल्या शब्दांच्या संवादाचं नातं आपोआपचं त्यांच्या भळभळत्या जखमेची ओळख करून देईल.त्यांच्या अंतःकरणातील असहाय्य अव्यक्त वेदना कुणासमोर तरी मोकळ्या होऊ पाहताहेत. त्यामुळे आपल्यासारख्या प्रज्ञावंतांनी ओजस्वी शब्दांची फुंकर त्यांच्या जखमेवर घालून आपल्या प्रेरणादायी,उर्जादायी विचारांचं बळ त्यांना दिलं तर नव्या जोमाने लढण्याची आणि जगण्याची ऊर्मी त्यांना मिळून जाईल.'
- किरण चव्हाण.
८८०६७३७५२८.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा