फॉलोअर

बुधवार, २८ जुलै, २०२१

"बा मेघराजा...मी एक पूरग्रस्त बोलतोय."


                  "बा मेघराजा...मी एक पूरग्रस्त बोलतोय."


                     आसमानी सरी बरसतात काळ बनून आणि अंदाधुंद तांडव करून जातोस मेघराजा.तुझ्या जीवावर प्रजा सुखात आनंदात नांदते...त्या प्रजेचं अतोनात हाल करून छळून..लुटून जातोस बिचाऱ्या.बा मेघराजा एवढा कसा काय रे निष्ठुर होतोस..? जो प्रेमानं धरणीमायेवर बरसावा तो असा कोपिष्ट होऊन का खवळवतो.बरसायला लागलास की बरसत राहतोस नुसता वेड्यासारखा.. तुझं तुलाही नाही भान रहात.व्यापून टाकतोस धरणीमायेच्या सर्वांगाला.तिच्या लेकरांनी तिच्या कुठल्या कुशीत लपून बसावं रे? जराही ठाव नाहीस देत. काय बोलावं आणि कुणापाशी बोलावं..? तुला वाईट तरी कसं म्हणावं..? तारणारा तूच आणि मारणाराही तूच.एका हातानं देणारा तूच अन दुसऱ्या हातानं असं काढून घेणाराही तूच.

                         तूच आहेस डोळ्यात प्राण आणून ज्याची आंम्ही वाट पाहतो...तू बरसायला लागलास की,आमच्या आनंदाला उधाण येतं.सुखस्वप्नं पहावी ती तुझ्या जीवावर.तुझ्या चांगुलपणावरच हा साऱ्या जीवांचा सुखाचा संसार.पण आज काय म्हणावं तुला..?.तुझ्याकडं आस लावून बसणाऱ्या लेकरांच्या वाट्याला हे कोणतं दुःख घेऊन आलास..वैऱ्यांन डाव साधावा तसा डाव साधतोस.सुखाची रास घेऊन बरसणारा तू अशी एकदम दुःखाची आरास कशी काय मांडून जातोस.                       महापुर येऊन जातो रे पण उर अजूनही भरून वाहतोय...रात्रंदिवस थैमान घालुन,वैऱ्यासारखा आक्रमण करून आमच्या सुखानं नांदणाऱ्या वस्तीत फक्त तांबडया पाण्याचं साम्राज्य पसरवतोस.एकवेळ अशी की,  देव पाण्यात घालून तुझी वाट बघायची,पण आज तूच देवाला पाण्यात घातलंस. देवळाच्या गाभाऱ्यातला आणि घराच्या देव्हाऱ्यातला देव आपल्या मिठीत घेतलास...आमच्या पेटत्या चुलीवरून पाणी फिरवलंस. राहतं घरटं पाण्यानं भरून गेलं.चार भिंतीच्या आत गंगामाई रहायला आली.

                          ऊनवारा,पाऊस पाणी झेलून आम्हांला जपणारी आमच्या कष्टाची घरं.आकंड पाण्यात बुडून मातीमोल होताना उघड्या डोळ्यांनी नाही रे पहावत..तान्ही बाळं, बाईमाणसं, म्हातारी-कोताऱ्या जीवांची होणारी हेळसांड नी हाल सांग फक्त उघड्या डोळ्यानी कशी पहायची रे....नात्यांच्या होणाऱ्या ताटातूटीची पुन्हा भेट घडेलं की नाही ठाऊक होतं.गोठ्यातल्या लेकुरवाळ्या जनांवारांची दावण रिकामी करताना ध्यायी आतल्या आत कितीदा रडते. 

तूच नाहीस अरे गावचा पाठीराखा डोंगरसुद्धा झडप घालतो आमच्या गावांवर.चिरडून टाकतो आपल्या उराखाली आमची माणसं.कुटूंबच्या कुटूंब गाडली जातात.नात्यांच्या आख्या गोतावळ्यावर माती सारली जाते.नेणत्या जीवापासून जाणत्या जिवांचा साऱ्या साऱ्यांचा चिखल होतो.गडप झालेल्या ढिगाऱ्याखालीचं त्यांना कायमची समाधी मिळते.त्या चिखलातुन तान्ह्या लेकराचा निपचित गोळा वर काढताना सांग तुला कस वाटतं.नात्यांची,कष्टाची सारी सारी धनदौलत पाण्यातून वाहून कुठल्या कुठं जाते.

                               समोरच्या कोसळणाऱ्या संकटाकडं फक्त शून्यातून बघण्यापलीकडं हातात काहीच उरत नाही.गळ्यात हुंदका दाटून कितीवेळा तरी डोळ्यांना महापूर येतो.सगळ्याच वाटा खुंटलेल्या...कुणी कुठं जायचं आणि कुठं रहायचं...काय खायचं..पुन्ह्यांदा कसं उभं रहायचं काही काहीच कळत नाही.डोळ्यादेखत गल्ली,गाव,शहरं महापुरान वेढलेल्या पाण्याच्या पोटात.आभाळातन टिपून बघितल तर दिसेल ती पुराच्या लाल पाण्यात बुडालेली आमची सुखानं गजबजून जाणारी नगरी.नेहमी रहदारीनं गजबजून गेलेल्या लांबरुंद वाटा तुडुंब भरलेल्या पाण्याच्या पोटात शिरलेल्या.

                                 वरनं कोसळणार आभाळ किती झेलायचं आणि खाली गळ्याला आलेल्या पाण्यात जगणं कुठं शोधायचं..?जगण्या मरण्याच्या मधल्या तीरावर सोडून जातोस तू मेघराजा.आता होत्याचं नव्हतं झालं...काही नाही उरलं...कष्टानं उभं केलेलं सारं मातीमोल झालं..शेतातलं उभं पीक जमीनदोस्त झालं...पुराच्या पाण्यात वाहून गेलं... नासुन गेलं...कुजून गेलं.पै न पै साठवून ठेवल्यालं सारं सारं काही वाहून गेलं.प्रपंच सारा उघड्यावर आला...राजाचा रंक झाला...घराच्या चारी भिंती चारी बाजूला झाल्या...डोक्यावरचं छप्पर गळून पडलं..आणि काही  उरल्या सुरल्या मोडक्या तोडक्या घरात नुसता चिखल साचून राहिला..तसाच मनाच्या तळाशीही साऱ्या भावनांचा...स्वप्नांचा झालेला चिखल....निव्वळ आक्रोश जगणं हिरावून घेतलेल्या आमच्या दुर्दैवी माणसांचा...दुःखाच्या आघाताने उरातून फुटलेली अनावर किंकाळी...आता ती कुणी कुणाला ऐकवावी आणि कुणी कुणाची ऐकावी.

        पण मेघराजा आज माणूसचं माणसाला वाचवतोय..दुःखातून सावरण्यासाठी इथे माणुसकीचा हात पुढे सरसावतोय...मोडून पडलेल्याना वर उठवून लढण्याचं बळ देतोय.आता मंदिरात देव नाही तो देवच रोज भेटायला येतोय इथे माणसांच्या रूपातून.माणसामधल्या देवाचं इथं रोज दर्शन होतंय..आता आमचं दुःखण,गाऱ्हाणं त्यांच्यासमोरच मांडतोय आम्हीं..बा मेघराजा.. महापूर येतो आणि पुन्हा ओसरतोही.पण लक्षात ठेव इथे माणसातल्या माणुसकीचा आणि प्रेमाचा जो महापूर आहे ना तो अखंड वाहतोय.तो कधीच ओसरत नाही.आणि ओसरणारही नाही.


            - किरण सुभाष चव्हाण. 

८८०६७३७५२८.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...