'मायलेकीसाठी निवारा उभा करूया संकल्पसिद्धीचे साक्षीदार होऊया.'
भुदरगड तालुक्यातील मिणचे बुद्रुक येथे श्रीमती रेखा धोंडीराम परीट व प्रगती धोंडीराम परीट या दोघी मायलेकी राहतात. गल्लीतल्या एका वळणावरच्या कोपऱ्यात विठ्ठल मंदिराच्या उजव्या बाजूला एक छोटेखानी मातीचे घर आहे.घराला कांबटाचं दार.आत जाताना वाकून जावं लागतं.हे घर म्हणजे दाटीवाटीचा खोपडाचं म्हणायचा.दोन चार लोकांना बसायलाही पुरेशी जागा नाही.. घरात पूर्ण अंधार प्रकाशाची सोय नाही.रात्रीचा दिवा लावावा म्हटलं तरी त्या दिव्यात रॉकेल कुठून आणणार..? कारण रॉकेल आणायचं तर रेशन कार्ड पाहिजे.एकंदरीत स्वतःच्या मालकी हक्काची जमीन नाही,राहतं घर ते ही नावावर नाही,मूळ कागदपत्रे नसल्याने रेशनकार्ड,आधारकार्ड (आईचे नाही) सारखी महत्वाची कागदपत्रे उपलब्ध होत नाहीत.त्यामुळे गरिबीची वास्तवता कागदोपत्री सिद्ध होत नसल्याने शासनाच्या सोयीसुविधापासून आज वंचित रहावं लागत आहे..
प्रगती धोंडीराम परीट सध्या दहावी मध्ये शिकते आहे. प्रगतीच्या आईला ऐन तारुण्यात वैधव्य आलं.प्रगतीच्या वडिलांचे निधन झाल्याने घराचा आधारवड हरपला आहे.एक मोठा भाऊ आहे पण गरिबीमुळं त्याला पाहुण्यांच्याकडे शिक्षणासाठी ठेवलेलं आहे.साधी भोळी अशी प्रगतीची आई.परिस्थितीने रंजलेली गांजलेली.पोटाला दोन मुलं पोटाची खळगी भरायची की मुलांचे शिक्षण बघायचं परिस्थितीने पुरती खचून गेली आहे बिचारी.इतकी भीषण गरिबी असून त्यात कमी की काय म्हणून तिला फिट्सचा त्रास आहे.कधीही अचानक तिला फिट्स येते त्यामुळे हतबलतेशीवाय हातात काहीच नाही. यातून रोज दुसऱ्याच्या बांधा जाऊन कशीतरी दोन वेळच्या भुकेची तडजोड करून गुजराण करावीच लागते.शंभर रुपये मजुरीच्या जीवावर रोजच्या जगण्याला लागणाऱ्या गरजांची पूर्तता कशी होणार ? अशा गरिबीमुळे तर पोटचा श्रावणबाळ ह्या माऊलीला दुसऱ्यांच्या हवाली सोपवावा लागला.जिथे रोजच्या जगण्याची मारामार आहे तिथे मुलांच्या शिक्षणाचा भार तिच्याने सोसवणारा नाही.तरीही आज अनंत अडचणीतून प्रगतीने आपले शिक्षण चालू ठेवले आहे.
आज मायलेकी गरिबीशी लढत झगडत कसेतरी जीवन कंठत आहेत.एकवेळ उपाशी पोटी राहून हा लढा त्या लढतीलही.पण मूळ प्रश्न सध्या त्यांच्या निवाऱ्याचा, राहण्याचा आणि मुख्यत्वेकरून संरक्षणाचा आहे.आज छोटेखानी मातीच्या घराचा आसरा आणि रात्रीला त्या नाजूक कांबटाच्या दाराचा आडोसा.ही असुरक्षितता रात्रंदिवस त्यांच्या मनाला खात आहे.प्रत्येक रात्र तर वैऱ्याची असावी अशी परिस्थिती आहे रात्री लेक झोपते तेव्हा माय जागी असते आणि माय झोपते तेव्हा लेक जागी असते.याहून त्यांच्या असुरक्षिततेचं वेगळं उदाहरण द्यायला नको.
आज दिवसाढवळ्या समाजात घडणाऱ्या महिला अत्याचाराची प्रकरणं आता वेगळी राहिली नाहीत.अशा पार्श्वभूमीवर ह्या मायलेकींचं अशा नाजूक घरात राहणं कितपत योग्य आहे ?घर म्हणजे प्रत्येकासाठी भलेही एक स्वप्न असेल पण त्यांच्यासाठी एक सुरक्षितता म्हणून छोटेखानी असेना का एका पक्क्या घराची अत्यंत आवश्यकता आहे. एक असे घर की त्यांना आसरा देईलचं त्याचसोबत त्यांना एक सुरक्षितता देईल किंबहुना रात्रीच्या वेळी त्या दोघींना एकमेकींच्या काळजीपोटी पहारा करावा लागणार नाही.
आणि म्हणून गुरुवर्य इंद्रजित देशमुख काकाजींच्या प्रेरणा आशीर्वादाने शिवम परिवाराने हा संकल्प केला आहे की, ह्या मायलेकींना शक्यतो लवकरात लवकर हक्काचा निवारा उभा करायचा.एक पक्के सुरक्षित असे घर त्यांच्याकरिता सकारायचे आहे. आणि हा संकल्प केवळ समाजातील संवेदनशील दानशूर दातृत्वातूनच सिद्धीस जाणार आहे. आज जसे गावागावांमध्ये देवावरच्या श्रद्धा भक्तीभावापोटी उदार अंतरकरणाने केलेल्या दानातून भव्यदिव्य सुशोभित मंदिरं उभा राहतात.त्याचप्रकारे माणसांवरच्या श्रद्धा, संवेदनशीलतेच्या भावनेतून आज कोलमडलेल्या माणसांची मंदिरं आज आपल्याला उभी करायची आहेत..ह्या उपक्रमाला समाजातील उदार अंतःकरणाच्या दानशूर संवेदनशील माणसांच्या पाठबळाची गरज आहे.खरं तर शिवम परिवाराने मायलेकीसाठी घर उभा करण्याचा संकल्प करून ज्या पवित्र कार्याचा पाया घातला आहे त्याचा कळस आपल्यासारख्या दानशूरवंतांच्या दातृत्वातूनच पूर्ण होणार आहे. तर चला आपापल्यापरीने ह्या उपक्रमास योगदान देऊन या संकल्पसिद्धीचे आपण साक्षीदार होऊया.
मदतीसाठी संपर्क -
सागर गुरव - ९१४६१४८९०४
सोमनाथ येरनाळकर - ९४२१४२३००७
सुहास सोरप - ८३२९९००८६०
सुनिल पाटील - ९४२१२०१४६०
दिगंबर किल्लेदार - ९४२१८२७०७०
राजेंद्र मगदूम - ९४२३२७९७२८.
---------------------------------------------------
किरण चव्हाण.
८८०६७३७५२८.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा