देशाची भावी पिढी घडवणाऱ्या शिक्षकांच्या वाट्याला ही परिस्थिती येणं हे खूप मोठं दुर्दैव. - रुचिता चौधरी (पत्रकार)
आपल्या कामाची पावती एका पुस्तकाच्या पानावर जेव्हा छापून येते त्यापेक्षा अजून कुठला आनंद हवा.. तर असो मुद्दा हा आहे. लेखक किरण जी चव्हाण लिखित" विनाअनुदानितची संघर्षगाथा" हे पुस्तक नुकतेच शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांचे हस्ते प्रकाशित झाले. जे देशाचे भावी आधारस्तंभ घडवितात अशा शिक्षकांची विनाअनुदानितचे लेबल चिकटवून होत असलेली दैना या पुस्तक रुपाने जगासमोर आली. कारण असेच एक विनाअनुदानित शिक्षक किशोर पाटील सर यांचा जीवनपट लेखक किरणजींनी आपल्या संघर्ष गाथेत सविस्तर मांडलाही आहे. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या त्यांची एक विद्यार्थिनी म्हणून पैशा अभावी त्यांच्या मरण यातना मी "ह्याची देही ह्याची डोळा" पाहिल्या आहेत ,अनुभवल्या आहेत.माझ्या जीवाची घालमेल तर तेव्हा झाली जेव्हा विनाअनुदानितच्या नावाखाली दहा वर्ष विनावेतन सेवा देऊन केवळ पैशा अभावी किडनी प्रत्यारोपण होत नसल्याने त्यांच्या पत्नी आपल्या बिनपगारी शिक्षक पतीला व सात वर्षाचा मुलगा पारस आपल्या बापाला क्षणाक्षणाला मरतांना बघत होते. मी मात्र अवाक झाले. माझ्या मनात त्यावेळी एकच विचार वारंवार येत होता की,आपल्या गुरूला वाचवण्यासाठी आपण काही करू शकतो का ? माझे मन मला स्वस्थ बसू देत नव्हते. कारण आव्हान खूप मोठे होते. एकीकडे माझी केविलवाणी धडपड मला स्वस्थ बसू देत नव्हती. मी माझ्या महाविद्यालयातील माझ्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना यासाठी तयार केले आणि दारोदारी, गल्लोगल्ली फिरून आम्ही एक-एक रुपयाची अक्षरशः भीक मागितली. महासत्ता बनू पाहणाऱ्या आपल्या देशात देशाचे भावी आधारस्तंभ घडविणाऱ्या शिक्षकांना उपचाराअभावी मरणाची वेळ येते आणि त्याला वाचविण्यासाठी आम्हा विद्यार्थ्यांना हातात झोळी घेऊन अक्षरशः दारोदारी भिक्षा मागावी लागते यासारखे दुर्दैव दुसरे काय असू शकते.
विनाअनुदानितच्या नावाखाली शासनाने या शिक्षकांना वर्षानुवर्ष वेठबिगारी सारखे राबवून घेतले.त्यांना व त्यांच्या परिवाराला हाल-अपेष्टा व मरण यातना सह वार्यावर सोडले आहे . लेखक किरण जींनी समाजासमोर या पुस्तक रुपाने एक धगधगतं दाहक वास्तव समाजासमोर मांडले आहे. त्यातून विनाअनुदानितच्या नावाखाली वर्षानुवर्ष विनावेतन ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आपल्या परिवारासह खितपत पडलेल्या शिक्षकाची खरी बाजू दाखवली आहे. या आभासी दुनियेत याकडे कुणाचे लक्ष गेले नाही. मी आभारी आहे, कारण आपल्या कामाची पावती जेव्हा एखाद्या पुस्तकाच्या पानावर छापून येते. आमच्या सरांना वाचवण्यासाठी आम्ही जी धडपड केली त्याचे फलश्रुती म्हणून लेखक किरणजींनी माझा उल्लेख या संघर्षगाथेत केलेला आहे. तर असो, निदान आतातरी शासनाला जाग यावी यावी. किशोर पाटील सर यांची नियुक्ती त्यानंतर अॅप्रोवल या साऱ्या गोष्टी सुव्यवस्थित असून केवळ शासनाच्या उदासीनतेमुळे फक्त वेतन निघत नाही.
त्यांनी या बाबतीत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला. पण काही उपयोग आज पर्यंत झाला नाही. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मला नेहमी वाटे की, आपण शिक्षक व्हावं, परंतु मी स्वतः हा सारा थरार अनुभवला असल्यामुळे शिक्षक व्हावे हे डोक्यातून काढून टाकले आहे. आमचे शिक्षक किशोर पाटील सर यांची आज खूप मोठी दुर्दशा झाली आहे. महिन्याकाठी आठ ते दहा हजार रुपयांचा खर्च आणि दुसरीकडे तेरा वर्षापासून विनावेतन अध्यापन. जे बोलायला आणि ऐकायलाही अवघड वाटते त्यांचा प्रत्यक्ष अनुभव विनाअनुदानितच्या नावाखाली राबणारे हे शिक्षक क्षणाक्षणाला घेत आहे.
शेवटी मला शासनाला हेच सांगावेसे वाटते की, अजूनही वेळ गेलेली नाही जर देश खऱ्या अर्थाने बळकट करायचा असेल तर शिक्षकांची व त्यांच्या परिवाराची अवहेलना थांबवा.मी या संघर्षगाथेचे निर्माते किरणजींना धन्यवाद देऊ इच्छिते की, त्यांनी शिक्षकांच्या या व्यथा, वेदनांना शब्दबद्ध करून शिक्षकी पेशातल्या हे दाहक वास्तव जगासमोर आणले.
धन्यवाद…!
कु. रुचिता चौधरी
अमळनेर, जि. जळगांव.
कु.रुचिता चौधरी ही प्राध्यापक किशोर पाटील अमळनेर येथील विनाअनुदानित शिक्षकाची विद्यार्थिनी असून किशोर पाटील यांच्या दोन्हीं किडन्या ज्यावेळी निकामी झाल्या. त्यावेळी या विद्यार्थिनींने आपल्या मित्रपरिवाराच्या मदतीने समाजातून निधी गोळा करून आपल्या गुरूंच्या उपचारासाठी आर्थिक मदत उभा केली. विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकाच्या वाटचालीमध्ये ही त्यांचे योगदान लाभले आहे)
विनाअनुदानितची संघर्षगाथा
पुस्तकासाठी संपर्क :
किरण चव्हाण.
८८०६७३७५२८.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा