आकाशी झेप घे रे पाखरा.
अखेर तो दिवस आलाच. बाळांनो... घालमेल होत असेल ना जीवाची आतल्या आत. होणारच हो सहाजिकच आहे. आई बापाच्या घरात मायेने वाढलेली ,हसरी खेळकर, बागडणारी लेक जशी मोठी झाल्यावर सासरी जाताना, तिचा पाय घराबाहेर निघता निघत नाही. हळव्या क्षणांच्या गोड आठवणीं पायगुंता होऊन पुढे जाऊ देत नाहीत. अगदी तशी तुमच्या मनाची आज अवस्था झाली आहे समजू शकतो बरं आम्हीं. ज्या उंबरठ्याच्या आत तुम्हीं ज्ञान घेण्यासाठी यायचात. तो उंबरठा ओलांडून ते ज्ञान घेऊन बाहेरच्या जगात तुम्हीं चाललात. आज तुम्हीं देहान इथून बाहेर जाल पण मनानं या वर्गातच रेंगाळणार आहात काही दिवस तरी. ज्या बेंचवर बसायचात, प्रत्येकाचा आपापला बेंच आणि सोबती ठरलेला असायचा. कधी कधी माझा बेंच म्हणून हुज्जत घालायचात एकमेकांच्यासोबत. तो बेंच आज तुम्हांला सोडून जावा लागणार. ज्या बेंचवर एकत्र बसायचात ते मित्र उद्या कुठल्या कुठे असतील, उद्या त्यांच्या बसायच्या जागा वेगवेगळ्या असतील..
सकाळची नेहमी प्रार्थनेने सुरुवात व्हायची. तालासुरात ढोलाच्या ठेक्यावर सर्वांच्यासोबत प्रार्थना म्हणायाची. रोज एक वेगवेगळी प्रार्थना. कधी वर्गात तर कधी त्या उघड्या माळावर निलगिरी झाडांच्या मस्तपैकी सावलीत. खाली जमीन वर आकाश किती सुंदर वाटायचं ना..? परिपाठ असला तर काय तारांबळ होई. सुविचार, पंचांग, बोधकथा, बातम्या तयारी करावी लागे. प्रश्न विचारल्यावर उत्तरं देण्यासाठी आता मला उठवतील का सर म्हणून मनावर दडपण येई. आता उद्यापासून नेहमीप्रमाणे घडाळ्यात आकरा वाजतील परंतू हात जोडून प्रार्थना म्हणण्यासाठी आम्हीं एकत्र येणार नाही. ना आम्हाला आता कोणी प्रश्न विचारेल.
वर्गात बसला की फळ्याच्या एका कोपऱ्यात लिहिलेल्या विषयांच्या वेळापत्रकाकडे लक्ष जायचं. विषयानुसार त्या त्या शिक्षकांचे तास. भरकटणारं मन गोळा करून समोरच्या शिक्षकांचं लक्षपूर्वक ऐकायचं. ज्ञान ग्रहन करायचं. दहावीचं वर्षं काळजीपूर्वक लक्ष द्या अभ्यास करा. हे वरचेवर सांगणं झेलायचंच. म्हणे शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धात कमी रक्त सांडावं लागतं.
इथं तर आमचं दररोजचं युद्ध चालू होतं.मनातल्या मनात. घरात गेलं अभ्यास शाळेत गेलं अभ्यास..नुसता अभ्यास नी अभ्यास. कधी सुटका व्हायची या अभ्यासातून. असं कधी कधी वाटायचं. पण आता नीट लक्ष द्या रे,अभ्यास करा रे...असं उद्यापासून कोण म्हणेल दटावून आम्हांला.
दुपारच्या वेळी दोनची मधली बेल कधी होतें याकडे मन आस लावून बसायचं. दोन वाजताचे दोन टोल झाले की, मनात लडू फुटायचे. आईने दिलेला डबा उघडायचा मित्रमैत्रिणीच्या संगे बसून हसत खिदळत खाताना कधी संपून जायचा कळायचं नाही. मग टीवल्या बावल्या चालायच्या हेची कळ काढ, त्याची टर उडव, उगाचच कुणाच्या पाठीत मारून पळ, मग चालू व्हायचा व्हरांड्यातून पाठशिवणीचा खेळ. कुणाचा कुणाला नसायचा मेळ,दंगा-मस्ती उरिपोटी हसणं खिदळणं कसं सगळं मनासारखं. अशी आमची दुपार एकत्र रंगून जायची. आता उद्याच्या दुपारी आम्हीं असू का हो एकत्र. असंचं पुन्हा घडून येईल का सगळं. नेहमीप्रमाणे दुपार होईल. पण कुणाचा कुणाला पत्ता नसेल.
चार वाजल्यानंतर असायचा आमचा एक आवडीचा तास. आमच्या हक्काचा असायचा तो पी.ई चा तास. जर का पी.ई चा तास नाही मिळाला तर आमच्यावर घोर अन्याय केल्यासारखं वाटायचं त्यामुळे शक्यतो असा अन्याय आम्हीं होऊ द्यायचो नाही. आणि मग मुलं कब्बडी खेळायची तर मुली शाळेमागच्या टेकडीवर जाऊन दगडावर बसून छानपैकी मजा करी. पाच वाजता शाळा सुटायची घंटा वाजली की, सगळे वर्ग एकत्र येऊन आम्हीं वंदे मातरम म्हणायचो आणि दिवसाची सांगता व्हायची, आमच्यातील उद्याच्या परिपाठाची काही मुलं मागे राहून फळ्यावर सुविचार,तासिका लिहून उद्याच काम आजच उकरून घ्यायचे.त्यांना घरला जायची घाई नसायची फलकलेखनात ते गुंतून जायचे. मुलींचा नंबर असेल तर खुप छान फुले,वेलीदार नक्षी काढून फळ्याचा कडकोपरा साजिवंत करायचीत. जशी एखादी मुलगी शेणसडा टाकून रांगोळी काढून आपल्या घराचं अंगण कसं देखणं टापटीप बनवते तशा या मुलींना फळा म्हणजे अंगणचं वाटायचं. आपला फळा रंगीबेरंगी खडू वापरून सजवायच्या,धजवायच्या. सुविचार लिहायच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात कुणाचा वाढदिवस असेल त्याचं सुंदर हस्ताक्षरात नांव कोरायचं.
आता उद्या नेहमीप्रमाणे पाच वाजतील आणि आम्हांला शाळेची घंटाचं ऐकू येणार नाही. ना फळ्यावर हे सगळं लिहिण्याची धांदल करावी लागणार. कुणाचा वाढदिवस असला तर प्रार्थनेला सर्व विद्यार्थी शुभेच्छा द्यायचे, बर्थ दे गीत म्हणायचे, कितवा वाढदिवस तितक्या टाळया वाजवून शुभेच्छा द्यायचे..इथून पुढे वाढदिवस होत राहतील पण असा अनोखा वाढदिवस साजरा होईल का पुन्हा..?
या शाळेतील आणखीन एक आमची आवडती व्यक्तिमत्व म्हणजे आमचे गुरव सर मितभाषी, शांत स्वभाव परंतु सर्वांच्यावरती माया करणारे.जिथं कमी तिथं आम्हीं अशा गुरव सरांच्या शिवाय आमची ही शाळा आम्हाला पूर्णच वाटत नसे.
शाळा सुटली की धनाजी काका गाडी घेऊन तयार परगावचे विद्यार्थी गाडीतून यायचे जायचे.. येताना जाताना केलेल्या त्या गंमती जमती सोबतीने केलेला तो रोजचा प्रवास ती वाट ती मागे सरणारी झाडे झुडुपे,गाडीतील वेगळीच मज्जा. आता गाडी रोज दिसेल पण तिच्यात बसून ती छोटीशी सफर करणार कोण..? प्रवास होत राहील पण या प्रवासाची मज्जाच निराळी.
शाळेत विविध कार्यक्रम घेतले जायचे घरात एखादा सण साजरा करावा तसं वातावरण असायचं सगळं,नेत्यांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जायच्या. भाषण व्हायची,पक्षी निरीक्षण, क्षेत्र भेट,सहल असेल किती किती मज्जा केली हो आपण, या तर आठवणीं साठवून मन भरगच्च भरून गेलंय. स्वर्गातला आनंद पृथ्वीवर मिळावा तसं अगदी आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे.असं वाटत राहतं. आता फिरणं होईल कुठेही पण या दिवसांची सर येईल का पुन्हा..
बाळांनो अशाच आठवणींची दाटीवाटी झाली आहे ना मनात..? असा शाळेचा प्रत्येक दिवस डोळ्यासमोर तरळतोय ना तुमच्या..? ही शाळा म्हणजे आपलं कुटूंब. हे गुरुजन आपले आईवडील, इथले कर्मचारी आपले दादा आणि आठवी नववीची ही तुमची छोटी भावंडं. हा नात्याचा आणि मायेचा गोतावळा मागे सोडून तुम्हीं पुढच्या वाटेला निघून जात आहात...काय करूया बाळांनो जावं तर लागणारच. पुढे भविष्याचा वेध आहे आणि मागे अशा आठवणींचा सारीपाट आहे. पण आज तुमची ही आईरूपी शाळा अशा आठवणींची शिदोरी आणि ज्ञानाचं भरलं फळ तुमच्या ओंजळीत भरून पुढच्या वाटचालीसाठी तुमची पाठवणी करीत आहे. 'गुरूने दिला ज्ञानरुपी वसा' याप्रमाणे इथल्या गुरुजनांनी हा ज्ञानाचा वसा तुमच्या पदरी दिला आहे तो ज्ञानाचा वारसा तुम्हाला पुढे चालवायचा आहे. या शाळेनं तुम्हांला काय दिलं बाळांनो.." ज्ञानाचा ,संस्कारांचा वारसा आणि इथल्या रम्य आठवणींचा ठेवा जो तुम्हांला आयुष्यभर पुरेल."
आमची ही चमणी पिल्लं आता मोठी झालीत.त्यांना पंख फुटलेत , त्या पंखात बळ आलंय.. उंच उंच उडण्याचं सामर्थ्य त्यात भरलंय. आता ती उंच उंच झेपावणार आहेत. अवघ अवकाश कवेत घेणार आहेत. हा विश्वास आहे आम्हांला. जा रे माझ्या चिमन्यांनो, जा आपल्या आईवडिलांचं,गुरुजनांचं,शाळेचं,गावाचं नाव रोशन करा,उज्ज्वल करा, अगदी उंच उंच भरारी घ्या.
आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा.
हा सोन्याचा पिंजरा आता सोडा, या आठवणींच्या आणि मोहमायेच्या पिंजऱ्यात अडकून राहू नका. ते बघा अवघ अवकाश तुम्हांला खुणावतय त्या दिशेने झेप घ्या..
जाता जाता एक करा बाळांनो, या घरट्यातून उंच उडावे दिव्य घेऊनि शक्ती नजर असावी ध्येयावरती पण उंबरठ्यावर भक्ती.पुढे जाताना मागे वळून पहायला विसरू नका. ही शाळा,हे शिक्षक दादा लोक तुमचेच आहेत.कधीही या भेटा एखादी माहेरवाशीण येते माहेराला तसं तुमचं माहेर घर समजून थोडा विसावा घेण्यासाठी पुन्हा मागे वळून या आणि ऊर्जा घेऊन पुन्हा पुढे जा..आणि हो रागानं कोणी बोललं असेल,कधी शिक्षा केली असेल तर मनात काही ठेवू नका ते सगळं तुमच्या भल्यासाठी होतं बरं का..?
जा.....
यशवंत व्हा..! जयवंत व्हा..! किर्तीवत व्हा..!
हाच आशीर्वाद असे तुम्हांला...
बाळांनो, तुम्हांला दहावी बोर्ड परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, या परीक्षेत आपणांस उज्ज्वल यश प्राप्त होवो. आपल्या संपूर्ण ईच्छा, आकांक्षा पूर्ण होवो आणि आपली पुढील वाटचाल अशीच समृद्ध होत राहो..
जय हो..! मंगल हो..!
- किरण सुभाष चव्हाण.
मोबा - ८८०६७३७५२८.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा