फॉलोअर

शनिवार, ३ जून, २०२३

बाप गेला आणि...

 



                                        बाप गेला आणि...          

                             आज मी जेंव्हा कधी मुद्दामहून डोळे मिटून, रस्त्याने चालावयाचा प्रयत्न करतो.तेंव्हा दहा पाऊलेही नीट धाडसाने टाकू शकत नाही...मनात भीती वाटते. वाट चुकेल की काय..? मी कुठे भलतीकडेच जाईन का काय..? आणि मग माझे बाबा माझ्या डोळ्यासमोर उभे राहतात..माझा बाबा कसा चालत होता..? माझा बाबा अंधारल्या डोळ्यांनी प्रत्येक पाऊल कसा टाकत होता.?  अंधाऱ्या डोळ्यांनी आयुष्याची लढाई लढणारा माझा बाप खरंच माझ्यासाठी जगातला एक ग्रेट माणूस आहे. ज्या बापाच्या पुढची वाट सदा अंधाराची होती, त्या बापानं मी इवलासा असताना माझं बोट धरून मला शाळेत पाठवलं होतं. कारण त्याला माहित होतं, स्वतःचं आयुष्य जरी अंधारान दाटलं असलं तरी पोराच्या आयुष्यात प्रकाश येईल तो शिक्षणामुळचं. बाबाला माहिती होतं की, पाचवीला पूजलेल्या या गरिबीला उलथून टाकायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही...म्हणून बाप सारखा म्हणायचा "आमचं सगळं पावणपै नोकरदार हाईत..नोकरीच्या जीवावर प्रगती करत्यात."  त्यांनी केलेली प्रगती दाखवण्यासाठी बाप मुद्दामहून लहानपणापासून मला पाहुण्यांच्या घरी घेऊन जायचा...बाप म्हणायचा.."खूप शिकायचं..शिकत राहायचं... नोकरी करायची..

                             शिक्षणाचं महत्व लहानपणापासून माझ्या मनांवर बाबाने बिंबवलं होतं. मला आजही आठवतंय.. मी दुसरी-तिसरीला असताना अंकलपीतली बाराखडी पुढ्यात बसवून बाबा म्हणून घ्यायचा. सातवीत असताना स्कॉलरशिप परीक्षेच्या अभ्यासाला बाबाने मला ओढून नेऊन बसवले होते. बाबा रात्रीच्या वेळी भिंतीला तक्क्या देऊन निवांत बसत व मला जवळ घेऊन म्हणायचे " पुस्तकातला एखादा धडा मला वाचून दाखव बघू " त्यावेळी धडा वाचून दाखवण्यात मला एक प्रकारचा आनंद मिळायचा. त्याकाळात दावं, अडाणी वैगरे बाबांना वाचून दाखवलेले धडे आजही आठवतात. चित्रकला मला आवडायची. त्यामुळे चित्रकलेची वही, स्केचपेन लागेल ते साहित्य मला बाबा आणून देत असे. मला काही हवं आणि ते बाबांनी दिल नाही असं कधी झालं नाही.. खरं तर माझ्या शिकण्याच्या मागे मूळ प्रेरणा ही माझ्या बाबांची होती. त्यांच्यामुळे तर मी मनापासून शिकत गेलो. 

                             माझ्या बाबांना डोळ्यांनी दिसत नव्हतं. बाबांना दिसायचं तरी केवढं..? तर मी एकदा बाबाला विचारलं होतं. "बाबा तुला केवढं दिसतं.." त्यावर बाबांचं हे उत्तर होतं. "उगीच धोतरातनं बघितल्यासारं. जवळच तेवढं पांढरं दिसतंय.. लांबच कायच दिसत नाही." म्हणजे माझ्या बाबाला जवळजवळ ९०% दिसतच नव्हतं. वाटेवर टाकलेलं पहिलं व प्रत्येक पाऊल हे अंदाजानं नी अदमासे टाकलेलं असायचं. आरी, रापी, हस्ती, संदन, चप्पलाचा एखादा जुना जोड अशा सामानाची पिशवी खांद्याला अडकून बाबा लवकरच घराबाहेर पडायचा. रस्त्याच्या एका बाजूनं काठ धरून अंदाजानं चालायचा. कधी खड्ड्यात पाय जायचा, कधी ठेचकाळायचा तर कधी गटारात सुद्धा जायचा.पण बाबा कधी थांबला नाही.  कधी कधी लोक सांगत "आज तुझा बाबा इथं पडला बघ...तिथं धडकला बघ.."   बाबा धडपडत पडत झडत आजूबाजूच्या खेड्यावर लोकांच्या पायातली फाटकी तुटकी चप्पल शिवायला जायचा. कुठल्या गावातल्या वेशीवरच्या झाडाच्या पाराला तर कधी कुठल्या घराच्या भिंतीचा आधार घेऊन बाप ऊन्हातान्हात चप्पलं शिवत असायचा. बाबाचा बोलका स्वभाव होता. त्यामुळे गावातल्या प्रत्येक माणसांशी बोलून चालून असायचा, चेष्टा मस्करीही करायचा. त्यामुळे गावातली काही माणसं तासघटका बाबाजवळ मुद्दाम बोलायला थांबायची. चप्पलाला ठिगळं लावत बाबा समोरच्याला अभिमानाने सांगायचा, " पोराला डी.एड केलंय, माझं पॉर मास्तर व्हणार हाय..." चार खेड्यातनी बाबा अभिमानाने सांगायचा..'माझं पॉर मास्तर व्हणार.' .. सलगीतली लोकं म्हणायची , "सुभासदाचा नाद खुळा.. आंधळा असून बिचाऱ्यानं पोराला चांगलं शिकवलं." आयाबाया म्हणायच्या..".आंधळाच्या गाई परमेश्वर राखी.." बाप जरूर आंधळा होता. त्याच्या डोळ्यांत भर दिवसाही अंधार साचलेला होता..पण लेकाला शिकवायचं.. मोठं करायचं  हा आशेचा प्रकाश किरण त्याच्या डोळ्यातल्या अंधारावर मात करायचा.

                             " आंधळ्याला कोण पोरगी दिल" अशी भावकीतली एक म्हातारी सुरुवातीला म्हणाली होती..म्हणजे लग्न होण्याची शाश्वती नाही..इथूनच माझ्या बापाच्या संसाराची सुरुवात झाली होती. पण बाबा आंधळा असला तरी हिंमतवान ,करारी आणि जिद्दी होता. बापाचा स्वाभिमानी बाणा होता..आपल्याला पटेल तेच करणार.. आपल्या तत्वाला बांधील राहणार..आपण गरीब, डोळ्यांनी दिसत नाही म्हणून कुणाच्या सहानुभूतीला बळी पडून आपला स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्यापैकी माझा बाप मुळीच नव्हता...आणि बाबाच्या अशाच गुणांचं बाळकडू त्यांच्यापासूनच माझ्या अंगी आलं आहे. कोणी काही म्हणो पण बापाचं लग्न झालं, संसार सुरू झाला. तीन मुलं झाली.पाण्यात पडलं की हात पाय मारावेचं लागतात. अशाप्रकारे हातात आरी,रापी असं समान घेऊन  खेड्यावर चप्पल शिवायला बाप जाऊ लागला. पुढं पुढं एक शेळी घेतली नंतर त्या शेळीपासून दहा बारा शेरडांचा खांड झाला, घरभर नुसती शेरडं होती. आरी,रापी, वादी आणि शेरडं यांच्या जीवावर संसार सुरू झाला..यातून पुढे दोन पोरींची लग्न आणि माझं शिक्षण बापानं पूर्ण केलं..मला शिक्षक करायचं बाबांचं स्वप्न होतं..

                   

२०१० साली डी.एड होऊन मी बाहेर पडलो आणि दुर्दैव म्हणजे पुढे शिक्षक भरती बंद झाली. आणि मग मी बेकारीपणाच्या जाळ्यात कसा गुरफटत गेलो फरफटत गेलो माझं मलाही कळाल नाही. मग काय..? इथूनच खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरुवात झाली. शिक्षक होण्याच्या स्वप्नामागे धावताना वाट्याला काय येणार होते माहिती नव्हतं. इथून पुढची वाट कशी असेल याबद्दल अनभिज्ञ होतो. पोरगा आज शिक्षक होईल उद्या होईल या आशेवर बाप पडत झडत खेड्यावर चप्पल शिवायला जायचा. डी. एड करून नोकरी नाही तरी बाबा म्हणायचा आता बी.एड करायचं... मी बाबाला म्हणायचो.." डी. एड करून नोकरी नाही आणि म्हण बी. एड कर...मी अजिबात करणार नाही.." मी असं म्हणताना बाबांनी माझं काही एक ऐकलं नाही.. ते म्हणत.."काही पण होऊ दे शिक्षण थांबवायचं नाही..पुढे शिकत राहायचं...बी. एड करायचंच..." मला बळजबरीने त्यांनी बी.एड ला प्रवेश घ्यायला लावला आणि मग पुढे इंग्रजी विषयातून मी बी. एड पूर्ण केलं.बाबा खेड्यावर ,आई दुसऱ्यांच्या शेतात मजुरीला आणि मी एखादं पुस्तक घेऊन शेरडांच्या मागे डोंगरात जात असे. नाही म्हणायला एखाद्या शाळेत तात्पुरते शिकवायला जायचे व सायंकाळी गावच्या मराठी शाळेच्या वर्गात गावातील मुलांचा क्लास घ्यायचा असे चालले होते. अशीच वर्षे निघून जात होती. मला काही नोकरी लागत नव्हती आणि इकडे आई- बाबांचं राबणं सुरूच होतं..

                बाबांना डोळ्यांनी तर दिसत नव्हतेच पण सततच्या आजारीपणाचा सामना त्यांना दरवेळी करावा लागायचा.  पूर्वीपासून बाबा वरचेवर आजारी पडत..एकदा का आजारी पडले तर त्यातून ते लवकर बरे होत नसत.  मूळचा मूळव्याध्येचा त्रास होता. शुगर होती. पथ्य पाणी काही पाळत नसत. कधी शुगर वाढून आजार बळावायचा तर कधी मूळव्याधाचे दुखणे डोके वर काढायचे. काही ना काही त्रास असायचाचं. दुखणे कमी आले की त्यातून उठून खेड्यावर जायचे..  हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहण्यापलीकडे मी काही करू शकत नव्हतो..हातात कोणतीच नोकरी नव्हती शिक्षक होणे तर दूरच..

                एक वर्षी बाबांना मूळव्याध्येचा त्रास अधिकच उदभवला. बाबांचा हा जुनाट आजार होता. गरिबी आणि  हातावरचं पोट या ओढाताणीत बाबाने पूर्वीपासून या आजाराकडे साफ दुर्लक्ष केले होते. हा आजार इतका भयंकर होता की, रक्ताने एकेकदा चड्डी भिजत असे, जमिनीवर सांडत गेलेली रक्ताची धार किंवा संडासात पडलेले रक्त आम्हीं अनेकदा पाहिले आहे. गुदद्वारातून मुळव्याधेचा गड्डा बाहेर यायचा. त्यावेळी उभ्या उभ्याच मोठ्या मुश्किलीने बाबा तो गड्डा बोटांनी आत सारायचे.. खेड्यावर जाताना बऱ्याच वेळा रस्त्यात थांबून अशाप्रकारे तो गड्डा आत सारून पुढे चालायचे.. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या वेदनेच्या खुणा आजही मला स्पष्टपणे आठवतात. मूळव्याध्येच्या दुखण्याने ते अगदीच त्रस्त झाले होते, कळा असह्य होत होत्या आणि मग बाबांना गारगोटीच्या सरकारी दवाखान्यात ऍडमिट केले. आठ दिवस झाले तरी त्या कळा काही थांबत नव्हत्या. बाबांना थारा होत नव्हता..ती अवस्था बघवण्यासारखी नव्हती. कळा थांबायचे नांव नाही. अखेर एके दिवशी गारगोटीतून थोरली बहिण (आक्का) व प्रवीण यांनी बाबाला ऍबुलन्सने कोल्हापूरला सी. पी.आर मध्ये हलवले. मी एका शाळेत काम करत होतो त्या संस्थापकाच्या दारी दवाखान्यासाठी लागणाऱ्या पैशाकरिता. माझ्या कामाचा चार हजार रुपये पगार घेण्यासाठी त्यांच्या दारी कित्येक तास ताटकळत आशेने उभा होतो. आणि मग ते केवळ चार हजार सोबत घेऊन मी कोल्हापूर गाठले. तेंव्हा रात्र झाली होती. 

          बाबांना सी.पी.आर मध्ये आणले त्या रात्री आक्का, मी बाबांना मिणतवाऱ्या केल्या पण एक घास देखील त्यांनी खाल्ला नाही. रात्री दहा वाजेपर्यंत बाबांना घेऊन वार्डमध्ये मी फिरत होतो. धड बसता येत नव्हतं ना उभारता येत होतं. उपचार लवकर मिळत नव्हते. डॉक्टरांचा प्रतिसाद मिळत नव्हता. त्या रात्री बाबा उपाशी झोपले. पहाटे चारला जाग आली. मी त्यांना लघवीला नेऊन आणलं व बेडवर बसवलं.. आक्का म्हणाली, "रात्री काहीच खाल्लं नाही निदान नकाडा शिरा तरी खातोय का बघूया" म्हणून बाबाला बोलवलं तरी काहीच प्रतिसाद नाही...नुसते शांतपणे बेडवर बसले होते. आम्हीं किती बोलावण्याचा प्रयत्न केला पण प्रतिसाद शून्य.बधिर झाल्यासारखी अवस्था..ऐकायला गेलं नसल्यासारखे करून.काहीच बोलत नव्हते,  आम्हीं घाबरलो.. मी तर डॉक्टरांना बोलवण्यासाठी अक्षरशः पळत सुटलो...शिकाऊ डॉक्टर होते ते आले त्यांनी तपासले व उलट आम्हांलाचं  ते म्हणाले "त्यांचीचं बोलायची ईच्छा नाही..तुम्ही सारखे त्यांना बोलावू नका" पण या उत्तराने आमचे समाधान झाले नाही...अशा अवस्थेत बाबांना इथं जास्त वेळ ठेवणं शक्य नव्हतं. त्यामुळे बाबांना खाजगी दवाखान्यात हलवण्याचा निर्णय घेतला आणि मग सरस्वती ऍपल मल्टीस्पेशालिटी दवाखान्यात ऍडमिट केलं. तिथे ऍडमिट केल्यावर निदान कळाले की, मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिणीत रक्ताची गुठळी झाली आहे. त्यामुळे त्यांची वाचा गेली आणि अर्धांगवायूचा झटका आला होता.  शरीराचा अर्धा भाग दुबळा झाला होता. आमच्यासाठी हा फार मोठा धक्का होता. काय करावे सुचत नव्हते. आय.सी.यु मध्ये असणारी त्यांची अवस्था पाहवत नव्हती. मनातल्या मनात मी देवाला प्रार्थना करत होती की, बाबा यातून सुखरूप बाहेर पडोत. 

                              कोल्हापूरातील हा अगदी मोठा दवाखाना या दवाखान्याचा खर्च आमच्याने पेलवणारा नव्हता. त्यावेळी माझ्या खिशात फक्त  चार हजार रुपयेचं होते. पण अशा कठीण वेळी ज्या ज्या लोकांना मी मदतीची हाक दिली ते लोक अगदी देवासारखे धावून आले..माझ्यासाठी ते माणसातलेचं देव होते. हृदयात कोरलेल्या त्या प्रत्येकाचं नांव इथं पानांवर मांडणं शक्य नाही...पण माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात त्यांचं स्थान परमेश्वरासमान आहे.खऱ्या अर्थाने त्यांच्या मदतीवर तर बाबांचा दवाखाना आम्ही करू शकलो. बाबा जगण्या मरण्याच्या मधली झुंज देत होते. सर्वांना वाटत होतं की, बाबा आता यातून वर उठणार नाहीत. उपचारांलाही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता.  मला एवढही सांगण्यात आलं होतं की, "बाबांना आता दवाखान्यातून घरी नेऊयात. घरी जी काही सेवा करता येईल ती करू..". इतकी बाबांची प्रकृती त्यावेळी खालावलेली होती. अशी एक वेळ आली होती की, सर्वांनी माझ्यावरच हा निर्णय सोपवला होता..की "किरण ऐक आमचं, बाबांच्यात आता सुधारणा होणार नाही... आपण घरी घेऊन जाऊयात..." माझ्या आक्काचेही म्हणणे तेच होते...      

                           त्यावेळी मी एकटाच बाजूला जाऊन एका खुर्चीत बसलो होतो.. डोळे उघडले काय आणि बंद केले काय माझ्या डोळ्यासमोर सगळा अंधार दाटला होता. काय करावे ? घरी न्यावे की नको ? नाही तरी बाबांच्या प्रकृतीत सुधारणा काहीच नव्हती.. काय घ्यावा निर्णय..? पण एका क्षणी मी ठाम निर्णय घेतला...तो क्षण फार महत्वाचा होता.  मी निर्णय घेतला की,काहीही होवो बाबांना घरी न्यायचं नाही...इथंच काय बरे वाईट व्हायचे ते होवो..शेवटी आपल्या हातात काय आहे..? तर फक्त प्रयत्न... शेवटपर्यंत तेच करायचे.आणि मग काही का असेना शेवटी प्रयत्न फळास आले म्हणायचे. बाबांच्या तब्येतीत थोडीशी सुधारणा होऊ लागली. आणि आमचा जीव भांड्यात पडला. जवळपास पंधरा दिवस दवाखान्यात ठेवून अखेर डिस्चार्ज मिळाला. लागलीच त्यांना कर्नाटकातल्या नागरमनोळीला लकव्यावरचे औषध द्यायला नेले. व तिथून मग घरी आणले.  घरी आणल्यानंतर आई,बहिणी व मी सगळ्यांनीचं बाबांची चांगली  सेवा केली. चार महिने सकाळ - संध्याकाळ मालिश करून बाबांना अंघोळ घालत असू. जेवण भरवायला लागायचं. नारळपाणी, फळं असं खायला देत असू . हळूहळू बाबांना बरं वाटू लागलं. तब्येतीत सुधारणा होऊ लागली. घरात हळूहळू हिंडू फिरू लागले पण बोलायला येत नव्हतं.. काही बोलायला बघायचे पण शब्द फुटत नव्हते. बोलायचा किंवा काही सांगायचा किती प्रयत्न करायचे पण निष्फळ...."बाबा" एवढाचं शब्द स्पष्ट बोलायचे तेवढंच एक नांव त्यांच्या ओठावर उरलं होतं.... आणि प्रयत्न करूनही मनातलं काही सांगता नाही आलं की..उद्विग्नपणे म्हणायचे..."काय करायचं बाबा.."

                     दरम्यान कोल्हापूरतल्या एका विनाअनुदानित शाळेची मुलाखत मी सकाळ पेपरमध्ये वाचली. पण त्या दिवशी कोल्हापूरला जायला माझ्याकडे पैसे नव्हते.. माझे चुलते वारून सहा दिवस झाले होते अशा वाईट प्रसंगात चुलत भाऊ सागरकडून दोनशे रुपये घेण्याची वेळ माझ्यावर आली आणि मुलाखतीला गेलो. तिथे जाऊन एका वडापावच्या गाड्यावर थांबून कसातरी गडबडीत अर्ज लिहिला .आणि शाळेत पोहोचलो. त्यावेळी शेवटची मुलाखत देणारा उमेदवार मीच होतो. मुलखातीमधून शेवटी माझी निवड झाली. संस्थेचे सचिव सदानंद पुंडपाळ सर हा एक देव माणूस भेटला म्हणायचा की, ज्यांनी आपल्या संस्थेत घेऊन माझं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.. पण शाळा होती विनाअनुदानित..अनुदान येईपर्यंत पगार काही मिळणार नव्हता. भविष्यात पगार सुरू होईल या आशेवर काम करावे लागणार होते. तरी संस्था चांगली होती इतर संस्थेसारखे पैसे वैगेरे भरावयाचे नव्हते. शेवटी मी निर्णय घेतला बिनपगारी असेना का नोकरी स्वीकारायची. बघू पुढचे पुढे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नोकरी लागल्याचे बाबांनाही तेवढेचं  समाधान. मग एक दिवस आईबाबांचा आशीर्वाद घेऊन मी कोल्हापूर गाठले. शिक्षक म्हणून रुजू  झालो..पण बिनपगारी.  शिक्षक झालो याचा एकीकडे आनंद तर पगार नाही केंव्हा सुरू होईल? याची दुसरीकडे चिंता होती. सुरुवातीला दिवसभर शाळा करत असे आणि रात्री एखाद्या हॉटेल मध्ये काम करायचो म्हणजे राहण्याचा आणि खाण्याचा प्रश्न मिटायचा. पण सकाळच्या जेवणाची अडचण व्हायची कारण हॉटेलमध्ये फक्त रात्रीचे जेवण मिळायचे. मग सकाळचे जेवण दुपारी शाळेत शालेय पोषण आहारावेळी जेवायचो. 

                पण कुठे तरी परमेश्वर पाठीशी होता म्हणायचा आणि मग कोल्हापूरमध्ये आल्यापासून माझ्या शाळेतील सहकारी रमेश गुरव सर यांना माझी परिस्थिती माहिती झालेली होती. कठीण काळात त्यांनी व त्यांच्या कुटुंबाने मला खूप मोठा आधार दिला. त्यांचे माझ्या व माझ्या कुटुंबावर थोर उपकार आहेत. एकदा असेच मी शाळेत असताना चारच्या दरम्यान घरून फोन आला "बाबांना जास्त झालं आहे लवकर घरी ये.".मी अचानक बाहेर पडणार पण खिशात काहीच पैसे नव्हते.. याच विवचंनेत शाळेतून बाहेर पडत असताना गुरव सरांनी विचारले, "सर असे अचानक का चाललात..? मी त्यांना घटना सांगितली तोच त्यांनी मी न मागताच खिशातून दोनशे रुपये काढून माझ्या खिशात कोंबले...मला ती घटना आठवली की आजही अचंबा वाटतो की, या माणसाला माझी अडचण न सांगताही कशी कळाली असावी.? शब्दावाचून भावना,वेदना ओळखणारी ही माणसं माझ्या त्या काळात परमेश्वरासारखी माझ्या पाठीशी होती.. दुसरे कुटूंब म्हणजे सौ.जयश्री अमित पाटील यांचे. पाटील मॅडम सध्या ए. पी. आय. आहेत त्यांचा मुलगा प्रेम याचे मी होम ट्युशन घेत असे. कोल्हापुरात गेल्यापासून शेवटपर्यंत प्रेमचा मी क्लास घेत होतो. या होम ट्युशनमधून महिना मला तीन हजार मिळत.  त्या तीन हजार मध्ये माझी सगळी गुजराण होत असे. काहीं वेळा अडीअडचणीला पैशाची मदत ते करत.  

                   मार्चपासून सकाळच्या शाळा सुरू झाल्या की, मी दुपारी एम. आय.डी. सी. मध्ये ४ ते १२ शिफ्टला कामाला जायचो तेथे हेल्परचे काम करायला लागे. एखाद्या वेळेस ओव्हर टाईम करायचो. माझा  उदरनिर्वाह, बाबांचा दवाखाना आणि औषध गोळ्यांचा खर्च यासाठी या काळात तारेवरची कसरत करावी लागली. मागे आई मजुरीला जायची ते पैसे साठवून माझ्या माघारी बाबांच्या गोळ्या औषध घेत असे. तरी सुद्धा अधेमध्ये बाबांची तब्येत जास्त खालावत व आईची नुसती ओढाताण होई..बोलता येत नसल्याने बाबांची आतल्या आत घुसमट होत होती.त्यामुळे ते सारखी चिडचिड करीत...कधी घरातून बाहेर पडून जात. आईला त्रास देत, एकेक वेळा आई रडकुंडीला येई.हतबल होई. पण या काळात पाठचा भाऊ पण  साथ देणार नाही अशी साथ मला मिळाली ती आमच्या प्रवीणची...हा माणूस म्हणजे जणू माझी सावलीच आहे. माझ्या माघारी बाबांच्या दुखण्याखुपण्याला तोच धावून जाई. 

           दिवस असेच जात होते.. शनिवारी रविवार आणि सणावाराला मी घरी जात असे.. शनिवार जवळ आला की बाबा नुसते माझ्या वाटेकडे डोळे लावून असायचे. कधी एकदा माझा ल्योक घरी येतोय असं त्यांना व्हायचं. फोन वर फोन करायचे.  फोनवर बोलता येत नव्हतं तरी मोठ्या मुश्किलीने "बरा हाईस..."  हे एवढेचं शब्द कसे तरी बोलायचे . पण ते ही उच्चारायला देखील बाबाला मोठे कष्ट पडायचे... घरी आलो की हरखून जायचे... त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सगळं काही सांगून जायचा...कोल्हापूरातून गावी गेल्यावर मी बाबांना एकदा घट्ट मिठी मारलेली आज मला आवर्जून आठवते आणि आता खंत वाटते की दर वेळच्या भेटीत बाबांना अशी मिठी का मारू शकलो नाही...मायेच्या स्पर्शाचं सुख बाबाला का देऊ शकलो नाही..? गावी गेलो की बाबांचा एक प्रश्न ठरलेला असायचा. पगार कधी सुरू होणार..? आता दोन वर्षे  म्हणता म्हणता चार वर्षे झाली तरी पगार सुरू झाला नव्हता.. आणि आता नेहमी एकच प्रश्न माझा पिच्छा सोडत नव्हता..तो म्हणजे पगार कधी सुरू होणार.  ? या प्रश्नावर मी निरुत्तर असायचो...काय उत्तर द्यायचे..?. बाबांना रेडिओ ऐकण्याची सवय होती. मनोरंजनाचे काय ते तेवढेच साधन. अधिवेशन काळात शाळेच्या अनुदानाच्या बातम्या रेडिओला लागायच्या... तेव्हा मी कोल्हापूरहुन कधी घरी आलो की, बाबा तोडक्या मोडक्या शब्दात ती बातमी सांगायचे.  मी ओळखून जाई... माझ्या पगाराची बाबांना किती आस लागली होती.. बाबांना आता नुसता ध्यास होता तो माझा पगार आणि दुसरे म्हणजे माझं लग्न.. कारण आता लग्नाचं वय उलटून जात होतं.... लग्नाचं पोर घरात असलं की आईबापाला जी चिंता जाळत असते.. त्याच चिंतेत सतत बाप असायचा..त्यात ही अशी सगळी परिस्थिती..

                             बाबा मला म्हणायचे "आता लग्नं करूया की," त्यावेळी मी कधी कधी चेष्टेने म्हणत असे "मला अण्णा हजारेंच्यासारखं राहायचं आहे..लग्न करणार नाही मी. "  तेंव्हा बाप मनमुराद हसायचा... आणि पुन्हा कधी लग्नाचा विषय काढला की मी म्हणायचो... "आता लग्न करायचं म्हणजे बापानं पुढं होऊन सगळं करावं लागतं.....तुम्हीं बघा की पोरगी मग मी लग्न करतो.." .एकप्रकारे मी असं बोलून त्यांच्या जखमेवर मीठ चोळायचो. यावर बाबा उदास व्हायचा त्याला माहिती होतं.. मी बाप आहे..पण मनात असूनही आज पोरासाठी काही करू शकत नाही ही सल त्यांच्या उरात दाटायची आणि शेवटी बाप म्हणायचा...."काय करायचा बाबा..?"

                         "बाबा.." आणि ..."काय करायचं बाबा.." एवढंच बाप बोलू शकत होता. यापलीकडे काही बोलण्यासाठी त्यांची जिभचं वळत नसे....बोलायचं खूप असे, मनातलं सांगावंसं वाटत असे पण सगळं मनातच राही...आणि मग आतल्या आत बाप घुसमटत राही..

                      माझ्या माघारी बाबा अक्षता टाकण्याची मूठ दाखवून कळवळून तळतळून आक्काला सांगत असे "माझं आता काही खरं नाही पोराला मी हाय तोपर्यंत लगीन करायला सांग.." माझ्या बापाला लग्नाची हौस साजरी करायची होती..तेवढीचं काय ती ईच्छा मागे उरलेली आता तब्येत साथ देत नव्हती. तब्येत वरचेवर खालावत होती..

                   आणखीन एक वर्षी बापाची लघवी तटली.. पुन्हा कोल्हापूरला हलवलं. पुन्हा पहिल्यासारखा प्रवास. पहिल्यासारखीच परिस्थिती...ते दवाखाने ..उपचार. दोन तीन दवाखाने बदलावे लागले.  नाना तऱ्हेचे आजार उद्धवत होते... बाबांचं शरीर म्हणजे रोगाचं माहेरघर झालं होतं जणू...कोल्हापूरहून जवळपास महिनाभराने घरी आणलं आणि पुन्हा जास्त झालं तेंव्हा मग गारगोटीतील एम. डी डॉक्टर गोंजारे यांच्या दवाखान्यात आठ दहा दिवस एडमीट केलं आणि यावेळीही बाबा पुन्हा एकदा मरणाच्या दारातून परत आले. बाबांचा दवाखाना काय आमची पाठ सोडत नव्हता..तो आता नित्याचाच झालेला.

                    एक तर पगार नाही. जवळ पैसे नाहीत त्यात हा दवाखाना. लोकांच्याकडून पैसे घ्यायचे तरी किती..पण या कठीण काळात माझ्या माणसांनी वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला. सर्व बाजुंनी संकट यावीत असा हा काळ होता. अशावेळी मला एक संधी खुणावत होती. आणि या संधीमुळे मी या परिस्थितीवर मात करू शकणार होतो.  ती म्हणजे आमच्याच संस्थेतल्या अनुदानित शाळेवर इंग्रजी विषयाची जागा रिक्त झाली होती. आणि विनाअनुदानित वरून अनुदानित वर बदली या शासन निर्णयानुसार मला त्या जागी जाता येत होते.. माझ्यासाठी हीच खरी सुवर्णसंधी होती..ज्या विनाअनुदानित शाळेवर काम करत होतो. त्या शाळेला अनुदान कधी मिळेल याची शाश्वती नव्हती ...एक तर बाबांची तब्येत खालावत जात होती...लग्नाचे वय मागे सरत होते अशावेळी मला जर ही संधी मिळाली तर माझे हे प्रश्न सुटणार होते.म्हणून मी संस्थेकडे मागणी सुरू केली. बदलीसाठी जोरकसपणे प्रयत्न करत होतो...घरात ही आता माहिती झाले होते की, माझी बदली झाली तर सगळं मार्गी लागेल. म्हणून त्यांनाही माझ्या बदलीचे आता वेध लागले होते. घरात बाबांच्या समाधानासाठी मी सांगत असे बदली झाली की, पगार सुरू होईल मग लग्न पण करू. अशी आशा त्यांना दाखवत होतो...पण माझं दुर्दैव की, वर्षामागून वर्षे निघून जात होती पण माझ्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश मिळत नव्हते.. आईने तर देवाला साकडेचं घातले होते, तिचे उपास तपास तर सुरूच होते.. माझ्या आक्काने तर एकही देव सोडला नाही..जाईल त्या ठिकाणी नवस बोलायची.. "पोराची बदली होऊ दे आणि पगार सुरू होऊ दे.". मी सुद्धा देवाकडे हेच मागणे मागी. 

                              एकदा गणपतीच्या मंदिरात जाऊन मी आराधना केली होती की, माझी बदली होऊ दे...आणि नमस्कार करून झाल्यावर तिथल्या पुजाऱ्याने आपसूकच मला एक नारळ दिला..मला वाटले खरंच देवाचा आशीर्वाद मिळाला. ते देवाचे फळ म्हणून आजही देव्हाऱ्यात पुजला आहे.. रोज देवाला प्रार्थना असायचीच.तो क्षण आठवला की,आत्मविश्वास वाटायचा.माझ्या प्रयत्नांना एक दिवस नक्की यश मिळेल असे वाटत राहायचे.. पण मला ठाऊक होतं जोपर्यंत माणसातला देव प्रसन्न होणार नाही, तोपर्यंत देवळातला देव ही काही करू शकणार नाही.. कारण माझी बदली करणं एका माणसातल्या देवाच्या हाती होतं... या बदलीच्या कामी गुरुवर्य सुनीलकुमार लवटे सर,इंद्रजित देशमुख काकाजी, डी.एस.पोवार साहेब, विश्वास सुतार साहेब, नामदेव पाटील सर,आर.के.पाटील सर अशी थोर मंडळी ही माझ्यासोबत होती...माझ्यासाठी त्यांनीही त्यांच्यापरीने होईल ते कष्ट उचलले. रात्रंदिवस मी बदलीच्या विचारात असे...कारण त्याशिवाय आता आयुष्य संपूर्ण अंधकारमय आहे असं वाटत होतं. त्यामुळे काहीही करायचे पण बाबांच्या हयातीत बदली करून एकदासा पगार सुरू होईल व लग्नही करता येईल... या अपेक्षेने मी जंग जंग पछाडले होते...जळी स्थळी फक्त बदली....एवढाच विचार माझ्या डोक्यात होता..जणू मला आता वेडंच लागायचे बाकी राहिले होते. या विचाराने दोन वेळा मी डिप्रेशनमध्ये सुद्धा गेलो होतो. पण परमेश्वर माझ्या संयमाची, माझ्या सहनशीलतेची प्रयत्नांची कसोटी पहात होता म्हणायचा..

                        दरम्यान कोरोनाचा काळ आला.जिथं जगच थांबलं तिथं.सगळंच थांबलं..तो काळ तसा निघून गेला..दुसऱ्या वर्षी कोरोनाची दुसरी लाट आली. या वर्षी तर बाबांचं दुखणं जास्त वाढत गेलं. त्या वर्षीच्या सुरुवातीपासून बाबा सारखे अंथरुणाला खिळून होते. गुढीपाडव्याच्या सणावाराच्या दिवशी देखील बाबा झोपूनचं होते..तशी आता वारंवार तब्येत खालावायची..आणि आता हे नित्याचं झालं होतं. त्यामुळे विशेष काही वाटत नव्हतं. घरीच औषध पाणी सुरू होतं. मे महिना आला. शाळेला सुट्टी होतीच. मी घरी जाण्यासाठी मुख्याध्यापकांना विचारले असता, कोरोनाचा काळ सुरू असल्यामुळे मुख्यालयी राहण्याचे आदेश आहेत असे त्यांनी सांगितले. मला पुढे जावे की मागे रहावे तेच कळेना. इकडे तर बाबांची तब्येत जास्त खालावत चालली होती. बाबा झोपूनच होते. अंथरुणातंच लघवी वैगरे व्हायची आई ते अंथरून रोज धुवायची.. जेवण सोडूनच दिलेले. एखाद्या वेळेस पहाटे चार-  पाच वाजता उठायचे  त्यावेळी आई बळेच्याने तरवणी पाजायची...शेवटी मी धाडस करून घरी येण्याचा निर्णय घेतला.  

             त्या दिवशी कोल्हापूरहुन गारगोटीत आलो. कोरोना सेंटर मध्ये जाऊन तपासणी करून घेतली आणि लागलीच घरी न जाता खबरदारी म्हणून अक्काच्या गावी आडोलीला येऊन राहिलो. दहा बारा दिवसाने मी व आक्का घरी गेलो त्यावेळी फारचं उशीर झाला होता.  बाबा अंथरुणाला खिळलेले होते.. अंगाचा सापळा झाला होता. तरीही आक्काने खायला घातले की खायचे...भिंतीला तक्या देऊन बसवले की बसायचे. पण तब्येत फारच अशक्त झाली होती. घरच्या घरी जे खाईल ते घालत होतो.. आता या वातावरणात बाहेर दवाखान्यात कुठे न्यायचे हा प्रश्न होता...पण घरात तर ती अवस्था बघवत नव्हती शेवटी काय व्हायचे ते होवो.  एकदा डॉक्टरांना दाखवायचे या ठाम निर्णयनाने एका सायंकाळी बाबांना घरातून बाहेर काढले. गारगोटीतल्या गोंजारे दवाखान्यात आणले..जवळ पैसे नव्हते. सांगलीचे प्रमोद पाटील सर यांनी उपचारासाठी पैसे पाठवून दिले.. सर्व तपासण्या झाल्यावर डॉक्टरांनी सांगितले की, पेशींचे प्रमाण कमी झाले आहे. औषधोपचार केल्यानंतर कमी येईल.. आम्हांला हायसे वाटले... ऍडमिट काही करून घेतले नाही.

               दवाखान्यात पुन्हा दाखवण्यासाठी जवळ अंतर पडेल म्हणून माझी दुसरी बहिण जयश्रीच्या घरी बाबांना घेऊन गेलो. तिथे बाबांना ठेवले.. सकाळ संध्याकाळ आई आणि मी बाबांना जेवण भरवायचो.काही वेळा जबरदस्तीने भरवावे लागे. मी तोंडात बोट घालून दात स्वच्छ करायचो आणि मग आई नी मी अंघोळ घालायचो. असे दोन तीन दिवस गेले. एके सकाळी अंघोळ घालण्यासाठी बाबांना वर उचलले आणि कंबरेतला करदोरा गळून 

खाली पडला. हे कशाचे सूचक होते..?  तसेच उचलून बाहेर नेऊन बाबांना अंघोळ घातली. जेवायला घालून गोळ्या दिल्या. भिंतीला तक्क्या देऊन बसत असायचे.. सर्व काही ठीक चालले होते. म्हणून मी औषध गोळ्या कसे द्यायच्या हे बहिणीला समजून देऊन गावी आलो.. त्या संध्याकाळी बहिणीचा फोन आला बाबांना ताप आला होता.  मी सांगितल्याप्रमाणे तिने गोळ्या दिल्या. यात काही विशेष वाटले नाही कारण वरचेवर असा ताप येई...

            दुसऱ्या दिवशी मला जायचेच होते. तोपर्यंत नऊ साडेनऊ वाजल्यापासून फोन यायला सुरुवात झाली बाबांना जास्त झालंय लवकर ये.. मी गडबडीने बाहेर पडलो. दरम्यान मला आठवतेय या मनःस्थितीतही माझ्या बदलीच्या अनुषंगाने एका सरांशी मी चर्चा करीत होतो. कारण मला एक आशा होती की, यदाकदाचित बदलीचे काय झाले तर बाबांना तेवढेचं समाधान. पण आता पुढे काय वाढून ठेवले आहे तोपर्यंत तरी मला कल्पना नव्हती. लागलीच प्रवीणला घेऊन गारगोटीत पोहोचलो. सारखे फोन येत होते आणि मग मनात कुठे तरी शंकेची पाल चुकचुकली की, काहीतरी अघटित घडलंय.  किंबहुना वाईट घटनेची माणसाला आपोआपच जाणीव होते की काय ..? असा तो क्षण मी त्यावेळी अनुभवला. पण मनाची मी तयारी केली. काहीही घडो आपण ठाम राहायचं... कारण माझ्या डोळ्यासमोर आई, दोन बहिणी दिसत होत्या. मनाला कणखर करूनच मग पुढची वाट धरली. 

बहिणीच्या घराजवळ जायला रडारड ऐकायला आली. सरळच आत गेलो.. बाबांना निजवलेलं वर चादर टाकलेली, बाजूला आई रडत होती, पायाशी बहीण आक्रोश मांडत होती. मी बाबांच्या जवळ गेलो चादर मागे ओढली. अर्धउघडे असलेले डोळे आणि निष्प्राण चेहरा पाहून मी स्तब्ध झालो..पहिल्यांदाचं असा निपचित पडलेला बाप पाहात होतो. बापाचे ते निर्जीव अचेतन मुख पाहताना माझ्या मनाची झालेली अवस्था शब्दांत नाही व्यक्त करता येणार. वेदनेने ठसठसणाऱ्या कुडीतून बापानं सुटका करून घेतली होती. आम्हांला पोरकं करून बापानं कुठल्या कुठं पलांग मारली होती. आई आकांत मांडत बोलत होती.. "देवानं तोंडं काढून घेतलं काही बोलला नाही.. मनातलं सांगता आलं नाही.."

पायस्थ्याशी बहीण .".मला बाबा पाहिजे...मला माझा बाबा आणून दे.." म्हणत टाचा घासत होती. एका बाजूला आई...दुसऱ्या बाजूला बहीण... आणि खाली बाप निपचित पडलेला...माझी अवस्था मी कुणाला सांगायची..? मला अश्रू ढाळण्याचा अधिकार नव्हता...बापपणाची जबाबदारी माझ्या खांद्यावर सोपवून बाप निघून गेला होता.  एकदा आईला जवळ घेत होतो तर एकदा बहिणीला जवळ घेत होतो... कसा बसा आधार देत होतो.  पुढ्यात आमच्या आधाराचा वड खाली कोसळला होता.

         बाप गेला शेवटपर्यंत..बोलता आलं नाही..मनातलं काही सांगता आलं नाही...मनातलं सगळं मनात राहून गेलं... मनातली घुसमट मनातचं ठेवून बाप गेला...पण बापाच्या मनातल्या दोन अपूर्ण ईच्छा होत्या त्या बाप मागे ठेऊन गेला होता..एक माझा पगार आणि दुसरं लग्न...ज्या लेकासाठी संपूर्ण हयात बापानं कष्टत घालवली.. डोळ्यांनी दिसत नसताना लोकांच्या पायातली चप्पलं शिवून मला शाळा शिकविली..अंधारलेल्या डोळ्यांत बापानं मी शिक्षक होण्याचं  स्वप्न सजवलं..ते डोळ्यांतचं मुजलं.. ती नियती तरी इतकी क्रूर कशी.?.ज्या बापाच्या वाट्याला सुरुवातीपासून आंधळेपणा आला...डोळ्यांनी हे जग नीट धड पाहू शकला नाही..त्या बापाची अखेर वाचाही काढून घेतली.. शेवटपर्यंत माझा बाप बोलू शकला नाही....नीट ऐकू शकला नाही.. एवढा कसला भोग माझ्या बापाच्या वाट्याला नियतीनं दिला....जो बाप पंढरीचा वारकरी होता, धडपडत वारी करायचा..शेवटी त्या पांडुरंगालाही माझ्या बापाची दया आली नाही...मला आजही प्रश्न पडतो जर परमेश्वर असेलच या जगात तर माझ्या भोळ्याभाबड्या ,दीनदुबळ्या गरीब, प्रामाणिक कष्टकरी बापाच्या वाट्याला इतकी घोर विटंबना,यातना,वेदना का दिली असावी..?

                   बाप गेला.... माझा आधारवडचं गेला...बाप गेल्याचं दुःख उरात ठेवून पंधराव्या दिवसापासून बोडक्या डुईनं मी बाहेर पडलो ते एका निर्धारानं. ते म्हणजे बदली. पुन्हा बदलीच्या प्रयत्नांचा प्रयास सुरू झाला. दिवस मागे पडत होते.  बाप गेल्यानंतरचा काळ तर माझ्यासाठी अधिकच कठीणाईचा होता. मागे आई एकटीच गावी असे. मी इकडे असा. शनिवारी कधी गावी निघालो की आपोआपच डोळे भरून येई.. या अगोदर माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेला बाप होता.. आता बापसारखी वाट कोण बघेल माझी..? माझ्यासाठी घालमेल कोण करून घेईल..? मी खोलीतच रडून मोकळा होई आणि मग घरी जाण्यास बाहेर पडे. 

या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ते माझे गुरुवर्य थोर साहित्यिक सुनीलकुमार लवटे सर. सरांच्या घरी मी वरचेवर जात असे, माझं दुःख मी व्यक्त करीत असे. सरांना माझी सगळी परिस्थिती ठाऊक होती. एकीकडे बाप गेल्याचं दुःख तर दुसरीकडे पोटाच्या भाकरीचा हा संघर्ष. मी पूर्णतः खचून गेलो होतो. आणि या काळात मला सर्वात मोठा आधार होता तो म्हणजे लवटे सरांचा.अखेरच्या काळात लवटे सरांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्यांनाही मर्यादा होत्या. एक दिवस याबाबत चर्चा करताना लवटे सर निर्वाणीचे बोलले, "किरण तू आता काही तरी पर्याय बघ...तुझी बदली होईलच ह्या विश्वासावर थांबू नकोस." सर असे म्हणाले आणि माझं अवसानच गळालं. सर बोलले आणि माझा धीरच चेपला. काय करावं कळत नव्हतं. सगळी सैरभैर अवस्था झालेली.मी त्यांच्या बोलण्यावर विचार केला. सरांचे अगदी बरोबर होते.. आता किती दिवस अधांतरी दिवस काढायचे. आणि मग मी कळंबा परिसरात क्लासेस सुरू करण्याचे ठरविले. त्या दिशेने प्रयत्न सुरू झाले. क्लासेसाठी जागा ही बघितली. पण मूळचा बदलीचा विषय काही मनातून जात नव्हता. वाटायचं आता पर्यंत बदलीसाठी एवढी धडपड केली, एवढे प्रयत्न केले ते असेच सोडून द्यायचे का..? प्रयत्न सोडून देणे मला चुकीचे वाटायचे...आपल्या हातात काय आहे...शेवटी प्रयत्न. मग सगळंच सोडून देण्यापेक्षा आपण तेवढे तरी करू शकतो.. आपली हार निश्चितच दिसत होती.  अशावेळी आणखीन एक पाऊल पुढे टाकायचं मी ठरवलं होतं. आणि मग दोन पर्याय घेऊन प्रयत्न करू लागलो.. एकबाजूला क्लासेसचा विचार आणि दुसऱ्या बाजूला बदलीचा. 

 मी त्या काळात पहाटे पावणेपाचला व्यायामासाठी बाहेर पडत असे. तेव्हां त्या वेळेपासून बदलीच्या विचारांचे चक्र मनात फिरत असे. रणनीती आखीत असे. एकीकडे आठवणीतला बाप आठवत असे आणि दुसरीकडे बदलीचे  विचार सोबत घेऊनचं चालत असे. कळंबा तलावाच्या भिंतीवरून पळत जाताना त्या पहाटेच्या गर्भात बाप मनात जिवंत होई..बाप मला काहीतरी सांगतोय असे वाटे....बाप मला म्हणतोय.."लेका आता रडायचं नाही..लढायचं." आणि हेच वाक्य माझ्या मनात पक्कं ठसलं.. पुन्हा नव्याने लढण्याची मला ऊर्जा मिळे. आणि आता बाप आठवून रडायचं नाही तर आता लढायचं.. बापच माझ्या लढण्याची आता प्रेरणा झाला होता...भलेही मेलेली माणसं बाहेरच्या जगातून जात असतील पण आतल्या जगात ती जिवंत असतात...माझा बाप माझ्या मनात जिवंत होता.. माझ्याशी बोलत होता. मला आधार देत होता. मला लढ म्हणत होता.

  ....शेवटी हारण्याची शक्यता वाटत असताना मी आणखीन एक पाऊल टाकलं होतं.. आणि अखेर अखेरच्या प्रयत्नांनी माझी यशाची वाट मोकळी केली म्हणायला हरकत नाही...यश मिळो अथवा न मिळो शेवटपर्यंत प्रयत्न करणं हे माझ्या हातात होतं.... शेवटी  माझा माझ्या प्रयत्नांवर विश्वास होता आणि शेवटपर्यंत चिकाटी न सोडल्यामुळे यशाची पहिली पायरी मी चढलो.  ज्या क्षणांसाठी दिवस आणि रात्र एक झाली होती. त्या क्षणांची मला चाहूल लागली. बदलीचे संकेत दिसू लागले. यश मला खुणावू लागलं. इतक्या वर्षाच्या संघर्षाला न्याय मिळाला. बदलीच्या हालचालींना वेग आला आणि ३१ मे २०२१ रोजी बाप गेला..त्याच्या बरोबर एक वर्षाने माझी बदली झाली. आणि १ जून २०२२ रोजी मी अनुदानित शाळेत हजर झालो. बाप जाण्याच्या आणि बदली होण्याच्या या घटना किती जवळच्या होत्या. बाप जाताना मला हा आशीर्वाद देऊन गेला....

         एका बापाकडे कसा दूर दृष्टीकोन असतो त्याचे हे उदाहरण...माझा बाबा अडाणी होता तरी माझ्या शिक्षणाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली नाही. डी. एड केल्यानंतर मी बी.एड केल्याचा फायदा म्हणून त्या पदवीच्या आधारावर माझी अनुदानित शाळेत माध्यमिककडे बदली झाली. आज बाप माझा जिवंत नाही पण आज बाप नसताना त्यावेळचा बापाचा तो दृष्टीकोन आज माझ्या जीवनाची दिशा बदलून गेला. मी शिक्षण घेऊनही शिक्षणाचं महत्व ओळखलं नव्हतं. मी बी.एड करायचे नाकारत होतो.. आणि बाप माझा काही शिकलेला नव्हता तरी शिक्षणाचं महत्व ओळखून त्यांनी मला बी एड करायला लावलं...म्हणून तर माझी बदली मला करून घेता आली. याचा अर्थ  बाप नेहमी आपल्या लेकराचा  चार पाऊले पुढे जाऊन विचार करीत असतो. आज माझी बदली झाली माझा पगार सुरू झाला याच्या मुळाशी बापाने त्यावेळी करून ठेवलेला तो विचार होता. 

       माझ्यासाठी मागे सुखाची वाट दाखवून बाप पुढे कष्टत निघून गेला. बाप जिवंत असताना बदलीसाठी खूप धडपड केली पण बाप गेल्यावर ती फळाला आली. माझा पगार बघणं त्याच्या नशिबात नव्हतं माझ्या बदलीच्या अगोदरचं बापाला आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली.. शेवटी हेच प्रारब्ध असावं. 

               बाप धडपडत त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला भेटायला जायचा. बापाच्या अंतसमयी मी त्या पांडुरंगाला फार बोल लावले...अरे विठ्ठला कसला न्याय दिलास माझ्या बापाला.? तुझी माळ गळ्यात घातली. पंढरीचा वारकरी बाप झाला. पडत झडत तुझी वारी केली..तुझ्या त्या भक्ताचा माझ्या बापाचा असा का शेवट केलास...? हाच सवाल मी त्याला आजही विचारतो....पण एकीकडे आता वाटतं. त्यानं एका बापाची पुण्याई एका लेकाच्या वाट्याला दिली असावी... कुणाच्या रूपातून परमेश्वर आपला साक्षात्कार घडवून आणेल कोण जाणे..? कारण माझ्या बदलीच्या काळात असा एक परमेश्वर मला भेटला. पंढरपूरच्या विठ्ठलाने आपल्या आंधळ्या भक्ताच्या लेकरासाठी संत एकनाथाला पाठवून द्यावा तसा एकनाथ आंबोकर साहेबांसारखा सज्जन माणूस शिक्षणाधिकारी म्हणून मला लाभला. 

" माझिया जातीचे मज भेटो कोणी.." या प्रमाणे माझी चिंता हरणारा, दुःख मागे सारणारा , माझ्या संघर्षाला न्याय देणारा माझा सुखकर्ता दुःख हरता माझा म्हणावा असा माणूस मला भेटला. अगदी जिव्हाळ्याने त्यांनी मला समजून उमजून घेतले. माझी परिस्थिती त्यांना ज्ञात झाली. माझा बदली प्रस्ताव दाखल झाला आणि आंबोकर साहेबांच्या स्वाक्षरीने मला मान्यता मिळाली..पण अजूनही काही विघ्ने पार करावयाची होती. बदली मान्यता मिळूनही शालार्थ आय डी मिळण्यासाठी पुन्हा अडचणी उभ्या राहिल्या. संघर्ष काही संपत नव्हता अखेरच्या काळात तर तो माझी सत्वपरिक्षाचं बघत होता. वर्ष सरत आले तरी पगार होत नव्हता. पण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होता असा एक पाठीराखा. तो पाठीराखा म्हणजे आंबोकर साहेब.

एकेकाळी त्या आयाबाया म्हणत होत्या. ते किती खरं होतं.."आंधळ्याच्या गायी परमेश्वर राखी..."हा परमेश्वरचं बापाच्या माघारी एक बाप होऊन पाठराखण करीत होता. शालार्थ आय डी मिळेपर्यंत आंबोकर साहेबांनी वैयक्तिक लक्ष घालून हे काम करवून घेतले...आणि एके दुपारी डी.एस.पोवार साहेबांचा फोन आला. आणि ती आनंदाची सुवार्ता कानी पडली " किरण तुझे शालार्थ आय डी चे काम झाले." मन आनंदून गेले.घरात बातमी सांगताच साऱ्यांना आनंद झाला. सुटकेचा एक दीर्घ निश्वास टाकला. 

               संस्था अध्यक्ष आदरणीय श्री.हरिभाऊ पुंडपळ साहेब, सचिव श्री. सदानंद पुंडपाळ सर,संस्था संचालक श्री. शिवाजीराव पन्हाळकर सर, श्री. दशरथ अस्वले सर तसेच जि. प. कोल्हापूरचे शिक्षणाधिकारी आदरणीय एकनाथ आंबोकर साहेब , शिक्षण उपसंचालक महेश चोथे साहेब, डी.एस.पोवार साहेब आणि शिक्षण निरीक्षक आर. जी. चौगले साहेब,मुख्याध्यापक शरद पाटील सर यांच्या योगदानातून अखेर माझ्या संघर्षगाथेचे यशोगाथेत रूपांतर झाले. 

               मी मागे म्हटलं ना..बाबा जाण्याच्या आणि माझी बदली होण्याच्या घटना किती जवळच्या आहेत. आणखीन एक म्हणजे बदली होऊनही पगार सुरू होण्यास  वर्षभर विलंब लागला आणि बाबा गेल्याच्या एका वर्षाने बदली आणि बरोबर दुसऱ्या वर्षी पगार सुरू होत आहे. 



हा पगार म्हणजे आमच्या सर्वांच्या आयुष्यात बारा वर्षांनी आलेला असा एक यशस्वी क्षण आहे..की डी.एड झाल्यानंतर तब्बल बारा वर्षे म्हणजे एक तप शिक्षक होण्यासाठी झुंज दिली.. माझे बाबा, माझी आई..थोरली बहीण आक्का, जयश्री या सर्वांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण वेचला.आपलं कष्टाचं, त्यागाचं, संघर्षाचं समर्पण दिलं त्याचं फळ म्हणजे हा यशाचा क्षण आहे...आई बाबाने तर माझ्यासाठी आयुष्य वेचलंचं पण माझ्या बहिणीनी देखील माझ्यासाठीही खूप मोठा त्याग केला आहे. माझ्यासाठी लहान वयात हातात खुरप घेऊन अखंड राबणं त्यांच्या वाट्याला आलं.  आज त्यांच्या हातात असलेलं खुरपं ही त्या त्यागाची निशाणी आहे. 

           आज मागे वळून पाहताना मी विचार करतो..बारा वर्षांत भलेही मला चार पैसे नाही कमवता आले, पण या काळात मला माझी म्हणणारी अनेक माणसे भेटली.. एकटा जीव मध्ये दादा कोंडके म्हणतात " मला या जन्मी पैसा, प्रसिद्धी, संपत्ती,प्रतिष्ठा खूप मिळाली पण माझी म्हणणारी माणसं मला मिळाली नाहीत पुढील जन्म मिळाला तर मला काही नको पण माझी म्हणणारी मला माणसं हवीत."  म्हणून पैसा किती कमावला यापेक्षा आपली म्हणणारी माणसं किती मिळाली याला मी नेहमी महत्व देत आलो. या माझ्या कठीण काळात मला माझ्या माणसांनी खूप आधार दिला..मला जपलं.. आणि हीच माझ्या या काळातली खरी कमाई आहे.तीच माझी खरी शाश्वत लाखमोलाची संपत्ती आहे. मी आयुष्यभर त्यांच्या ऋणाईत राहणेच पसंद करेन.

ज्या क्षणासाठी जगण्याचा प्रत्येक क्षण खर्ची घातला तो क्षण आज आला...एका तपाच्या प्रतीक्षेनंतर आणि कठोर संघर्षातून त्या क्षणाने आज आमच्या आयुष्यात पदार्पण केले आहे...ही सुवार्ता मला पहिल्यांदा सांगावीशी वाटेल ती माझ्या बाबाला..

 बाप सारखा विचारायचा कधी सुरू होणार पगार..? कधी सुरू होणार..?

आता ऐकायला येशील का रे..?

    "बाबा....पगार सुरू झाला ."

ऐकतोयस ना..? 

बाबा पगार सुरू झाला...

हेच ऐकायसाठी अधीर झालेला असायचास ना.

पण हे ऐकायच्या अगोदरच निघून गेलास...

बाबा पगार सुरू झाला..म्हणून साद घालून कुणाला रे मी आता आनंदून सांगायचं... 

कुणाच्या मिठीत माझा आनंद साजरा करायचा...

तुझ्या अंधारलेल्या डोळ्यांत मला आज दाटलेले दोन आनंदाश्रू बघायचे होते रे..

तुझ्या तोंडातून माझ्यासाठी दोन कौतुकाचे शब्द ऐकायचे होते.

बाबा आज तुला कडकडून मिठी मारायची होती ..

बाबा...

खूप पोरकं वाटतं रे तू गेल्यापासून... 

तू गेल्यापासून नुसता तुझ्या आठवणींनी दीनवाण्यासारखा फिरतो.

बाबा तुझ्या त्या दोन प्रश्नाची उत्तर तेंव्हा माझ्याकडे नव्हती मी निरुत्तर असायचो.

.. ती आज आहेत...

पण ती उत्तरं ऐकायला तू नाहीस.

गरिबीच्या वैराण वाळवंटात आई बाबा तुम्हीं हे रोपटं लागलात पण त्याच्या सावलीत बासायचं ,त्याची गोड फळं चाखायचं बाबा तुझ्यात भाग्यात नव्हतं.

                  आयुष्याच्या रणांगणावर अंधारल्या डोळ्यांनी काळोखाच्या खाईत स्वतःला लोटून देत शेवटपर्यंत बाप शर्थीने लढला .येणाऱ्या प्रत्येक संकटांना हिंमतीने तोंड देत राहिला. जगण्याची फार मोठी ईच्छाशक्ती मनात होती माझ्या बाबांची.. अजून जगायचं होतं..ही ईच्छा बाबांचे शेवटचे मरण मुख पाहताना मला स्पष्टपणे जाणवत होती. अखेर त्या जर्जर रोगांनी शरीरावर विजय मिळवला खरा..पण खंबीर मनाने, हिमतीने,जिद्दीने ,स्वाभिमानाने आणि कष्टाने आयुष्याशी दिलेली निकराची झुंज. त्या झुंजार बापानेच हा यशाचा पाया रचला.  म्हणून आज आमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आजचा क्षण आला...पगार सुरू झाला पण बाप निघून गेला. गड आला पण माझा सिंहचं निघून गेला..

- किरण सुभाष चव्हाण.

५ टिप्पण्या:

  1. अप्रतिम,
    वडिलांचा संघर्ष आणि त्यांची मुलाला शिकविण्याची जिद्द खरोखर अप्रतिम..
    वडील काय असतात हे आपल्या वडिलांच्या उदाहरणातून दिसून येते..
    वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही केलेला संघर्ष दुर्लक्षित करता येणार नाही...
    तुमच्या पुढील आयुष्यात आमच्या खूप खूप शुभेच्छा...

    उत्तर द्याहटवा
  2. म्हणूनच मला वाटतंय प्रथम आई वडिलांची सेवा हीच खरी सेवा

    उत्तर द्याहटवा
  3. प्रवीण तूझे मनापासून आभार

    उत्तर द्याहटवा

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...