"तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची,पर्वाबी कुणाची..."
नमस्कार मंडळी... आता आपल्या गावची पोरं जातील बघा जिल्ह्याला क्रिकेट खेळाया...तालुकापातळीवर क्रिकेट स्पर्धेमधी आपल्या माध्यमिक विद्यालय आरदाळ शाळेच्या पठ्ठयांनी तालुक्यात पयला नंबर पटकावला नी आपल्या संघाची जिल्ह्यासाठी निवड झाली...माहिती आसलंच नव्ह तुमास्नी.. हे सगळं इथपर्यंत ठीक व्हतं.. पण जिल्ह्याला जायचं म्हंजी...जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा लेदर बॉलवरती आसतीया म्हंत्यात..पण आमची पोरं कवा खेळल्यात लेदर आणि बिदर वरती...आता लेदर बॉलवर खेळायचं म्हंजी सुरक्षेसाठी सगळं सामान लागतंय... डोक्याला हेल्मेट, छातीला पट्ट्या, हातात ग्लोज,पायाला पॅड, हाय फॅड - फाय फॅड...काय काय नवच फॅड आलंय म्हणायचं हे...पायात म्हणं स्टडचं बूट..इथं साधं बूट धड मिळना आणि म्हणं स्टडचं... आता आमच्या पोरास्नी हे फक्त ऐकून आणि बघूनचं माहिती हो.. टी.व्ही मधी वल्डकपच्या आणि आय.पी.एल च्या मॅच बघताना तर आम्हीं हे सगळं बघतोयाच पण कशाला काय म्हंत्यात कुणाला ठावं हाय...? पण हे सगळं लागतंयचं म्हटल्यावर...आता काय करायचं..? कोण म्हणतंय आंगावर गाडाभर वज्ज असल्यावाणीचं हाय ते...ते घालून मैदानात पळायला लागतंय...
आमच्यायेळी काय व्हतं... माळ्यावरची बॅटन काढायची आणि कोयत्यानं तासून बॅट तयार करायची.. बॅटन मधलं 'न' गेलं की आमची बॅट तयार...लागली पोरं गावंदरीच्या वाटंला...गांवरीतलं भात कापल्याल वाफ्फ म्हंजी आमच्या हक्काचं मैदान...तवाची गोष्ट येगळी... आता सांगून चालतंय....तर... आमच्या पोरांनी कधी घालून बघितलय हे असलं किट....आवं गावाकडची पोरं आमची...उघड्या माळावर.. हे$$ दे दणादण मोकळ्या आंगानं हुदोड्या घालणारी वानर सेनाच ती.. आली खेळायची हुक्की की घ्यायची बॅट सांदरीतली...दणाट पळत यायचं माळावर.. (सर्वप्रथम एक्ससाईज) आसली काय भानगड नाही गड्या... हे.. इकडन एक पळतंय, तिकडन एक पळतय...मधीच कुणाच्या मागं लागतंय...कानात वारं शिरल्यागत बेभान होऊन आपुल्याआपण उड्या मारत्यात... दोन टीमची भरती झाली तर ठीक नाही तर मग बॅट उपडी घालून मग मातीवर रेघोट्या काढून नंबर ठरवायचं... तंवर खांद्यावर हात टाकून मैदानावर फेरफटका मारून आपला नंबर पकडायला येत्यात गडी..मग पब्बा.. दुब्बा... तिब्बा...असं नंबर..
मग सुरू..गोठ्यातल्या बडवण्यांनं चापूचोपून बसवलेली माती आणि मस्तपैकी विमानाच्या धावपट्टीगत गुळगुळीत केल्याली मजबूत दणकट धावपट्टी हे आमचं पीच....मागं तीन दांड्या रवायच्या... बॅट हातात घेतली... टकाटक बॉल तर कवा लबरी बॉल.. सुरू झाला बघा आमच्या पोरांचा क्रिकेटचा डाव...हाणत्यातच हाणत्यात.. पळत्यातच पळत्यात....त्या धोनीचा 'हेलिकाप्टर' शॉट फेमस तसा आमच्यात 'गावठी' शॉट फेमस... ये हाणला बघ...बॉल गेला बघ...पार लायटीच्या डांबाची बॉण्डरी वलांडून...इकडं बॉलर काळ तोंड करून....विठ्ठलासारखं कंबरवर दोन्हीं हात ठेवून वरडत आसतंय..."आरं गावतोय काय न्हाई.." .गावतोय कुठला..? बॉल गेला घुसपात त्यो शोधायला निम्मी टीमंचं तिकडं... आणि इकडं मग बॅट्समनच्या चेहऱ्यावर तेंडुलकरचा आविर्भाव..जरा मुद्दामच छाती पुढं काढून बॅट्समन मनातल्या मनात म्हणतंय.. कसा हाणला..!!
आता कसं वाटतंय..??? बॅट्समन जोमात....आणि बॉलर कोमात...त्ये तिकडं मनातल्या मनात तुला दावतोच म्हणून खच्चून दाट व्हट खाईत आसतंय...आमचे फेकी बॉलर तर त्याच्या मुडवर बॉलिंग करणार.. बॉलर चिडला तर सरळ फेकणार डायरेक्ट थ्रो...त्रिफळाच.
"आरं सरळ टाक की,....आरं मग तू सरळ मार की...ये पळ... ये आडीव...बॉल रे$$ कशी आडीवली आणि कशी जिरवली....असं करत... खेळ रंगात... जोश अंगात....तंवर बॉण्डरीवरचं एखादं कार्टून कार्ट नाचतय गवताच्या डंगात....ते आसतय आपल्याच नादात... त्येला वाटत आसतय आपल्याकडं कुणाचबी लक्ष नाही..
पायात बूट हाय काय नाय काय...काय फरक नाही पडत आपल्या पोरास्नी... सुसाट पळत्यात वाऱ्यागत... बॉण्डरीला बॉल जायच्या आदी उपडी पडतंय तेज्यावर... फिल्डींग जबरदस्त...जिकल्यावर तर दंगा बघायला नको...कोण कुणाच्या खांद्यावर... कोण कुणाच्या मानेवर... असा आमच्या पोरांचा माळरानावरचा क्रिकेटचा डाव...
पण पठ्ठ्यांनी तालुक्यात बाजी मारली खरी पण आता जिल्ह्याला जायचं म्हंजी... खर्चाचा खेळ...कसा घालायचा ताळमेळ..आमची गावाकडची पोरं.. त्यास्नी कुठलं हे सगळं साहित्य घ्यायला परवडणार..? बुटाच तळ झिजलं तरी बूट घ्यायला व्हईना...शेताबांधाच्या जीवावर आणि हातावरच्या पोटावर पोसली जाणारी आमची ही सामान्य घरची पोरं... खेळायची ईच्छा माप हाय...अंगात रग हाय...उपजत कौशल्य हाय...आजरा तालुक्यात नाही असं आरदाळ गावाला हमरस्त्याला लागून उघडया माळाचं आगळपगळ मैदान हाय...आरदाळ गावाला क्रिकेटची परंपराबी हाय...हे सगळं हाय बराबर...पण जे लागणार साहित्य हाय ते कुठून आणायचं..? बरं पोरांची ईच्छा मोडून तरी चालतीया...त्या दिवशीचा त्यांचा विजयाचा नूर बघितला, उत्साह बघितला तर बाकी सगळं फीकं पडल...त्यांचा त्यो आंनद काय बी करायला भाग पाडल.... आणि त्येच झालं.. त्यात एक पालक उत्तुरच्या बाजारात गाठ पडला तवा म्हणाला "आमच्या गावच्या इतिहास आमची पोर क्रिकेटसाठी पयल्यांदाच जिल्ह्याला जात्यात बघा." हे वाक्य माझाबी उत्साह वाढवणारं होतं..
पुन्हा त्यात एका रात्री गावच्या गणपती मंडळाची आरती झाल्यावर गावातील युवराज तिप्पे सरांशी या विषयावर चर्चा करताना गावातली काही तरुण मंडळीही या चर्चेत सहभागी झाली...त्यांनी पण प्रोत्साहन दिलं..कारण क्रिकेट खेळ अगोदर पासून त्यांच्याबी अंगात भिनलेला...मंबयकर तरुण वर्ग चुकचुकत म्हणत व्हता "सर आम्हांला जरा अगोदर सांगितला असता तर मुंबईहुन येताना आम्हीं किट आणले असते...पण एकदाशी जाऊ देत आपली पोरं जिल्ह्याला.." यातील युवराज पवार यांनी आपल्याकडचा लेदर बॉल मुलांना देण्याचं आश्वासन देऊन पण टाकलं..
आणि मग मनात विचार पक्का केला..काय नाय गड्या पैशाचा इचार करायचा नाही...देवयानी मालिकेतला तो संग्राम देवयानीला म्हणतोय कसा 'तुमच्यासाठी कायपण.'.. तसं ठरवलं 'पोरांच्यासाठी कायपण...'
एकदा रविवारच्या सुट्टीच्या दिवशी शाळेत येऊन एका वर्गात निवांत वाचत होतो..तोपर्यंत आमच्या दहावीच्या आमच्या मुलींचा घोळका भेटायला आला..आणि बोलता बोलता मुलांच्या क्रिकेटच्या किटचा विषय निघाला.. त्यावेळी आमची एक दिदु म्हणती कशी...चेहऱ्यावर काहीशे काळजीचा भाव...सर तुम्हीं एवढा खर्च करणार..?
खर्चाची गोष्ट असली की, माझ्या आईच्या चेहऱ्यावर पण असाच भाव असतो..माझी आईही घरात असाच प्रश्न करते...तसा खर्चाच्या काळजीचा प्रश्न मायेसारखा मायेनं विचारणारी माझी विद्यार्थीनी..जाणिवा नेणिवा दृढ झालेला तो एक आमच्यामधला भावबंध अगदी घरच्यासारखा....असो..
...दिवस ठरला.. तिप्पे सरांना सांगायचा अवकाश सरांनी आपली ग्रँड i10 बाहेर काढली आणि शुक्रवारच्या प्रसन्न सकाळी मंदार सर,तिप्पे सर, दयानंद सर व विद्याधर सर आमची सवारी निघाली बघा कोल्हापूरच्या दिशेनं...गावाघरात गणपतीचा सणउत्सव आणि आम्हीं चाललो बाहेरच्या गावाला...तासाभरात गांधीनगर गाठलं.. तिथल्या दुकानात तास दिडतास घालून बी योग्य दरात काही किट मिळेना. अखेर कोल्हापूर मधील स्पोर्ट सेंटर गाठलं आणि अगदी तास दीडतास चांगली तपासून, चाचपणी करून, एकेक साहित्य प्रत्येकांनी पारखून आम्ही मनासारखी तीन किट खरेदी केली...आयला लहानपणी २० रुपायाचा बॉल खरेदी करताना जीव खाली वर व्हायचा... एकेक रूपया वर्गणी काढून दुकानातला त्यो BRI बॉल घायचो.... आणि आज २० हजारांच्या घरातलं क्रिकेट किट घेत होतो...ते ही मुलांच्यासाठी. पण त्यावेळच्या घेण्यातल्या पेक्षा आज काही तरी देण्यातला आनंद अर्थातच मोठा होता...मुलांच्यासाठी कमी खर्चातल्या जर्सीची पण येताना जोडणी लावून आलो...जेंव्हा किट हातात घेतलं...तेव्हा काही अंशी विजयाचा भाव सर्वांच्या चेहऱ्यावर उमटला..खूप समाधानाने दुकानाच्या बाहेर पडलो...काचेचा दरवाजा ओलांडून बाहेर येताना हे छाती जाम अभिमानाने फुगली व्हती...बाहेर आल्यावर मंदार सर आपल्या मित्रांना एक वाक्य बोलले..."अरे..लेकांनो...किट असे काय हातात घेता गावठी कुठले...अरे पाठीला अडकवा अरे आता प्रोइफेशनल वाटू दे..."
त्या वाक्याने उरात आणखीन ठासून अभिमान भरला...माळावर विना किटची खेळणारी आमची पोरं...आता मला त्या किट मध्ये दिसू लागली... मला सोबत आलेल्या ह्या ध्येयवेड्या माणसांच्यासाठी दोन शब्द बोलावेसे वाटतात.. अहो एका शब्दावर तिप्पे सर,मंदार सर त्यांचे मित्र दयानंद सर व विद्याधर सर आमच्या मुलांसाठी वेळ काढून आले..नाही तरी हल्ली कुणासाठी कुणाला एवढा वेळ आहे.आख्खा दिवस या लोकांनी खर्ची घातला...खाण्यापिण्याचं भान पण नाही या लोकांना...? काम आटोपल्यावर मी म्हणतोय हां यांना... चला एखादं चांगलं हॉटेल बघून जेऊयात...कुणी तरी म्हणेल का नाही... चला चला यथेच्छ ताव मारुया व्हेज नॉनव्हेज..तांबडा-पांढरा....तर हे लोक म्हणतात कसे "सर नको नको हॉटेल..साठ सत्तर रूपयला राईसप्लेट मिळेल तिथे जाऊ...तुम्हाला उगीच खर्च...इथेच कुठे तरी लाईटली खाऊया..." आणि बिचारे शोधू लागले स्वस्तात मस्त एखादं साधंसुध हॉटेल...साधं हॉटेल शोधणारी मनानं मोठी असणारी ही माणसं म्हणायची..
आपला बहुमोल वेळ देऊन उलट माझे पैसे वाचवणारी ही माणसं...मोठी माणसं कुठे शोधायला जावं लागत नाहीत ही बघा आपल्या आजूबाजूला असतात...एका छानशा हॉटेलमध्ये जाऊन मस्तपैकी जेवण करून सायंकाळी आम्हीं परतलो...
पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता गार वाऱ्यात आरदाळच्या दवबिंदूने भिजलेल्या मऊ माळावर पोरं त्यानंतर मंदार सर हजर काही क्षणांत किट घेऊन तिप्पे सरांची गाडीपण दाखल...क्रिकेट प्रशिक्षकाची जबाबदारी मंदार सरांनी आपल्या खांद्यावर घेतली..मुलांना योग्य गुरू पाहिजे होता तो मंदार सरांच्या रूपाने भेटला...त्यामुळे ती एक चिंता दूर झाली. म्हणजे एका उद्गात्त कार्याला कशी उदात्त मनाची माणसं जोडली जातात पाहा...
रोज सकाळी साडेसहाला येऊन मंदार सर मुलांना मार्गदर्शन करणार आहेत...मंदार सरांची पण शाळा आहे ती सांभाळून वेळ देणार आहेत..
अशाप्रकारे सकाळच्या प्रसन्न वातावरणात मुलांचा बेसिक सराव घेतल्यानंतर ज्याची मुलांना प्रतिक्षा होती.. ते क्रिकेट किट मंदार सर, तिप्पे सरांच्या हस्ते एकदासे मुलांच्या टीमकडे आम्हीं सुपूर्द केले...आणि त्यांचा जो आनंद होता तो मला वाटतं सरळ वरच्या गगनाला जाऊन भिडला होता...त्यांचा उत्साह द्विगुणित झाला..बास.$$ आणखीन काय पाहिजे.. आमच्या मुलांचं हे स्वप्न पूर्ण झालं..शेवटी टीमच्या वतीने आदित्यने सर्वांचे आभार मानले.
मंडळी एवढं सगळं सांगायचा उद्देश एहाच की, आपल्या गावच्या मातीतही टॅलेंट दडलेलं आहे..इरफान खान,मोहम्मद शमी,मोहम्मद सिराज, बुमराह हे खेळाडू काही सोन्याचा चमचा तोंडात घेवून जन्माला आलेली नाहीत... सर्वसामान्य कुटुंबातून आलेली आणि अशाच मातीत घडलेले हे खेळाडू आहेत...आमच्या पोरांनी खेळावं...गावच्या सीमा ओलांडून जावं..तालुका,जिल्हा, राज्य ,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर...मंदार सर आपल्या मनोगतात म्हणाले तसं "यातून आमचा एखादा हिरा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकेल.." .काय माहीत उद्याचा सचिन तेंडुलकर याच मुलांच्यात आज आकाराला घेत असेल...
शेवटी ज्यांनी आपला बहुमोल वेळ दिला व देत आहेत ते युवराज तिप्पे सर, मंदार सर,दयानंद सर व विद्याधर सर यांचा मी खूप खूप आभारी आहे... आमच्या क्रिकेट टीमच्या तयारीसाठी पाहिल्यापासून प्रोत्साहन देणारे शाळेचे मुख्याध्यापक शरद पाटील सर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,संपूर्ण विद्यार्थी, पालक तसेच आरदाळ गावचे ग्रामस्थ आणि विशेष करून क्रिकेटप्रेमी युवा वर्ग,मुंबईकर या सर्वांचे पाठबळ व प्रेरणा आमच्या मुलांना मिळत आहे आणि त्याच बळावर आमची टीम आता जिल्हा पातळीवर खेळायला जाणार आहे..खूप आंनद आहे.
तर चला मंडळी लय बोललो बघा म्या...या समद्या आपल्या लेकरांवर आपला आशीर्वाद असू द्या...आपण त्यांच्या पाठीशी असा.
जाता जाता एवढंच सांगतु
लेकरांच्या पाठीवरती हात ठेवून तेवढं नुसतं लढ म्हणा..
हार हो या जीत हो काय व्हायचं ते होवो लेकरा नुसतं खेळ म्हणा..
"तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची, पर्वाबी कुणाची.."
राम राम मंडळी... धन्यवाद...!
- किरण सुभाष चव्हाण.
८८०६७३७५२८.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा