फॉलोअर

रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

विनाअनुदानित शिक्षकांची नेमकी ऊर्जा तरी काय...? -किरण सुभाष चव्हाण

 


विनाअनुदानित शिक्षकांची नेमकी ऊर्जा तरी काय...?


                           जगाच्या पाठीवर असं कोणतं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये माणूस वीस वर्षांपासून विनापगार काम करतो.महिन्याचा पगार जरी मागे पुढे झाला तरी आपण कासावीस होतो,आपले नियोजन बिघडून जाते.मग इथं तर वीस वीस वर्षे झाली पगार नाही तर ही माणसं कशी रहाताहेत.? कशी काय तग धरून आहेत..? कसा संयम ठेवला..? यामागची मग प्रेरणा काय..? .. आहे की नाही संशोधनाचा विषय..चला शेवटी नियम,कायदे थोडं बाजूला ठेवूया आणि माणूसपणाच्या दृष्टिकोनातून या प्रश्नांकडे आपण बघूया. माणसाला जगण्यासाठी किमान मूलभूत गरजा भागणं गरजेचं आहे ना.याचसाठी तर  त्याला धडपड करावी लागते आणि प्रत्येक जण त्यासाठी धडपडत असतो. पण गेली वीस वर्षे विनावेतन काम करताना या विनाअनुदानित शिक्षकांनी निदान या मूलभूत गरजांची तजवीज कशी केली असेल किंवा करत असतील. पण शेवटी जगण्याच्या लढाईत कारणं सांगून चालत नाहीत.हातपाय हलवावे तर लागतातच. तर या मूलभूत गरजांची तजवीज करण्यासाठी त्याला आज तारेवरची कसरत करावी लागतेय आपणास माहिती आहे की शेवटी शाळेत दिवसभर अध्यापन केल्यानंतर पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्याला कोण कोणती कामे करावी लागतात. मग काही असेही प्रश्न उपस्थित होतात पगारच नाही तर कशाला उगाच अशा शाळेत काम करायचं..? कुणी सांगितलाय एवढा संघर्ष करायला किंवा एखादा व्यवसाय पहायचा दुसरी नोकरी शोधायची..?

                          मला वाटतं हे प्रश्न विचारणे वरून सोपे वाटतात पण हे विचारणं म्हणजे असे की, एखाद्या नांदायला गेलेल्या मुलगीला सासरी प्रतिकूल परिस्थितीत रहावं लागत असेल किंवा सासुरवास आहे म्हणून काडीमोड घ्यायला सांगणं. एका जातिवंत मुलगीसाठी तिला कितीही त्रास असला तरी तिथं नांदणं, आपला संसार जिद्दीनं करून दाखवणं महत्वाचं वाटतं. या विनाअनुदानित शिक्षकांची अवस्था ही अशीच आहे नोकरी करायची असती तर कोणतीही करता आली असती.एखादा व्यवसाय करता आला असता परंतु शिक्षकी पेशा म्हणून जी नोकरी स्वीकारली आहे ती फक्त एक नोकरी नाही तर ते एक स्वप्न आहे. ते एक व्रत आहे, तो एक वसा आहे, आपल्याकडे जे काही चांगलं आहे ते आपल्या विद्यार्थ्यांना द्यायचं,त्यांना घडवायचं एक सक्षम पिढी निर्माण करण्याची महत्वकांक्षा या लोकांच्या मनामध्ये असते आणि म्हणून खऱ्या अर्थाने ते या जिद्दीने काम करत असतात. भलेही आपल्याला पगार असो -नसो, आपल्यावर कितीही वाईट वेळ आलेली असो परंतु समोरच्या विद्यार्थ्यांना घडवून त्यांच्या यशामध्ये आपले यश पाहणं,त्यांना मोठं होताना पाहणं यातलं सुख ते अनुभवत असतात. खरंतर लोकं एक संसार करतात परंतु या लोकांचे दोन संसार असतात एक घरचा आणि दुसरा शाळेचा संसार. आज पगाराविना घरच्या संसाराची फरफट होत असेल परंतु ज्ञानाविना शाळेच्या संसाराची फरपट त्यांनी आजपर्यंत कधीही होऊ दिली नाही. तिकडे घरच्या संसाराच वाळवंट झालं पण शाळेच्या संसारात ज्ञानाचे बीज पेरून हिरवागार बनवलाय.आणि म्हणून जरी आज त्याच्या घरच्या संसारावरती वाईट वेळ आली असेल तरी वीस वर्ष विनावेतन काम करत काहीजण निवृत्तही झाले तरीदेखील या शाळेचा संसार अखंडपणे फुलत राहिलाय,बहरत राहिलाय.                            

                         एक ना एकदिवस पगार सुरू होईल ही आशा आहेच परंतु त्या दिशेने चालण्याची प्रेरणा देतात ते त्यांचे विद्यार्थी.भलेही पगार नसेल पण या विद्यार्थ्यांच्याकरता शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचा आहे आज मला पाया होऊ द्या.परंतु माझ्या यशाचा कळस हे माझे विद्यार्थी आहेत हे त्याचं तत्व आहे.खरंतर कुणीतरी पाया म्हणून स्वतःला गाडून घ्यावे लागते त्याच वेळी त्या इमारतीचा कळस उभा राहतो म्हणून आज ज्ञान,संस्कार, मूल्यांनी भरलेले हे शिक्षक आज पाया आहेत म्हणून तर देशाच्या इमारतीचा कळस आज सक्षमपणे जगामध्ये डोलतो आहे. खरतर आज प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे,त्याच्या कर्तुत्वाच्या मागे त्याचे आई-वडील आणि त्यांचे गुरुचे योगदान असते. माणूस कितीही मोठा झाला तरी तो गुरूच्या पायावर माथा टेकवतात. इतके मोठे त्याला घडवण्यात गुरुचे योगदान असते. हे इतकं सोपं नाही कारण त्यासाठी त्याला पाया व्हावं लागतं तेव्हा तर आभाळाला टेकलेली माणसं देखील या पायावर नतमस्तक होतात.

                                आज सर्वचं क्षेत्रांमध्ये काम करणारी जी कर्तुत्ववान मंडळी आहेत सातासमुद्रापार गेली अंतराळात झेपावली या सर्वांच्या मागे त्यांच्या गुरूंचे योगदान महत्त्वाचे आहे.आणि माणूस कितीही मोठा झाला तरी हे त्याला विसरून चालत नाही.कारण त्यांच्या गुरुने ते स्वप्नं,ते ज्ञान,ते संस्कार,ती जिद्द, ती महत्वकांक्षा त्यांच्या मनामध्ये रुजवलेलं असतं.त्यांना यशाची कर्तुत्वाची भव्यदिव्य वाट दाखवलेली असते. आणि तो गुरूच असतो जो निरपेक्ष भावनेने त्यांच्या मनात ती संस्कार पेरत असतो. आई-वडिलांना आपलं लेकरू मोठं होताना पाहण्याचं स्वप्न मनात असतं तेच स्वप्न ठेवून तो आपल्या विद्यार्थ्यांना घडवत असतो आणि नव्हे नव्हे त्याला घडवावंचं लागतं. तोच त्याचा वसा आहे व्रत आहे. मला पगार नाही म्हणून कोणत्याही शिक्षकांना शिकवण्याचा सोडून दिलं नाही त्याच्या विद्यार्थ्यांच्या संस्कारावर त्याचा कुठला परिणाम होऊ दिला नाही.  त्याचा पगार या विद्यार्थी हिताच्या आड कुठेही आणला नाही. 

                              आई आणि मुलाचं नातं जसं तसं या नात्याचं प्रतिरुप नातं शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं. म्हणजे संसारात कितीही वाईट परिस्थिती असली तरी एखाद्या आईची जगण्याची मूळ प्रेरणा असते तिचं मूल तसं आज कितीही वाईट परिस्थिती असेल,कितीही मोठा संघर्ष असेल तर या शिक्षकांच्या जगण्याचं काम करण्याची मूळ प्रेरणा आहेत त्यांचे विद्यार्थी. विद्यार्थी हा त्यांचा स्पिरीट आहे.आमच्या पाचवीच्या विद्यार्थ्याला कळतं की, आपल्या शिक्षकांना पगार नाही आणि कधीतरी वर्गात ते प्रश्न करतात की, सर तुम्हाला पगार का नाही..? तर दहावी झालेला आमचा ओम कांबळे हा विद्यार्थी सरांना भेटायला म्हणून येतो आणि गंभीर होऊन प्रश्न विचारतो. आम्हाला पाचवीला असल्यापासून तुम्ही शिकवत होता सर झाला का हो तुमचा पगार सुरु..? नाही असं म्हटल्यानंतर तो हिरमुसतो.थोडा वेळ निशब्द होतो. मोठा झालेला आहे आता विचार करण्याची क्षमता वाढलेली आहे. आता तो त्याच्या पुढे जाऊन प्रश्न विचारतो.  सर मग पगार नाही तर घरचा खर्च कसा चालता हो..? आणि आता तर मीच निशब्द होतो..काय द्यायचं या प्रश्नाला उत्तर. आता काय काय करावं लागतं म्हणून सांगायचं.शेवटी मी निरूत्तर. पण समाधान या गोष्टीचं वाटतं की माझ्या हातून घडलेली मुलं ही संवेदनशील विचार करणारी आहेत. आज माझ्या शिक्षकांचा पगार नाही आणि पगार नसतानादेखील त्यांनी मला घडवलेला आहे एवढी तरी संवेदनशीलता या विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली आहे याचं समाधान आहे. कुठलीच मुलं सरांना पगार किती आहे हे विचारत नाहीत. तर सर पगार का नाही तुम्हाला..? हे विचारतात. पगार किती आहे याला महत्व नाही पण पगार आहे का..? हे महत्वाचं वाटतं. पगार आहे म्हणजे याचा अर्थ एक जगण्याचे साधन आहे. खरंतर या चिमुकल्यांच्या त्या निरागस प्रश्नांमध्ये खूप मोठे तत्त्वज्ञान लपलेलं आहे. आणि हे तत्त्वज्ञान आहे संवेदनशीलतेचं. या व्यवस्थेतल्या भल्या भल्या माणसांच्या डोक्यात का येत नसावं. सर पगार आहे का सुरू..? हा वरून जरी साधा प्रश्न वाटत असला तरी पगार सुरू आहे का म्हणजे..?  पगार आहे तर सर तुम्ही व्यवस्थित जगू शकाल,तुमच्या गरजा नीट भागल्या जाऊ शकतील, पैसे असेल तर ठरवलेलं एखादं काम होऊ शकतं. पगार असेल तर मूलभूत गरजा भागू शकतात. या प्रश्नाच्या मागे हे उपजत ज्ञान लपलेलं आहे. हे ज्ञान ते छोटे छोट्या मुलांना आहे. परंतु या व्यवस्थेवर अधिराज्य गाजवणाऱ्या माणसांना या प्रश्नांशी देणेघेणे नाही.  माणसं स्वतःला प्रश्नांपेक्षा मोठी समजायला लागली की समोरचे प्रश्न त्याला छोटे वाटायला लागतात.  

                            जळगाव जिल्ह्यातील किशोर पाटील नावाचे एक प्राध्यापक.दोन्ही किडन्या निकामी झाल्या.उपचारांचा खर्च १३ लाखांचा.  एक रुपये पगार नाही,स्वमालकीचा जमिनीचा तुकडा नाही.काय करणार तो शिक्षक .?  अशावेळी त्यांच्या विद्यार्थ्यांनी हातामध्ये झोळी घेऊन समाजामध्ये भीक मागून त्यांच्या उपचारांचा निधी जमवला. काय आश्चर्य आहे बघा ना एका शिक्षकाला जगवण्यासाठी त्यांचे विद्यार्थी हातामध्ये कटोरा घेतात आणि भीक मागून आपल्या शिक्षकांना जगवतात. जगवण्याचं केवढं मोठं तत्वज्ञान या विद्यार्थ्यांना कळाले आहे. एक शिक्षक स्वतःच्या विद्यार्थ्यांच्या शेतात कामाला जातो,एका विद्यार्थ्याचं शेत त्याच्या जगण्याचा साधन बनतं. जे विद्यार्थी मोठे होतात नोकरीवर जातात त्यावेळी म्हणतात सर तुम्हाला पगार नाही पण आम्हाला पगार सुरू आहे कधीही आपल्याला मदत लागली, कुठेही अडचण आली तर सर हक्काने सांगा. हा पगार तुमचाच आहे असं समजा. काय हव आहे आणखीन यापेक्षा वेगळं. पगारापेक्षा मिळणार हे समाधान एका शिक्षकाला किती तरी पटीने महत्वाचं वाटतं.

            पगार नव्हता, पगार नाही, भविष्यात कधी सुरू होईल माहिती नाही परंतु इतिहास याची नोंद जरूर घेईल की, विनावेतन उपाशीपोटी घडवलेला प्रत्येक विद्यार्थी या विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षाचा एक साक्षीदार आहे, घडवलेला प्रत्येक विद्यार्थी या शिक्षकांच्या संघर्षाचं पान आहे, कष्टाचे योगदान आहे.घडवलेला प्रत्येक विद्यार्थी या शिक्षकांच्या यशाचे उदाहरण आहे... आज पगार नसणारे, पगाराविना निवृत्त झालेले जे शिक्षक आहेत त्यांच्या मनामध्ये एक असेही समाधान आहे की, मी घडवलेला प्रत्येक विद्यार्थी हा आज यशशिखरावर विराजमान आहे.

                        पगार असताना काम करणारे सगळेच आहेत पण पगार नसतानादेखील उद्याची सक्षम पिढी घडवणारे एकमेव मात्र हे विनाअनुदानित शिक्षक आहेत.आणि याची जाणीव कोणी ठेवो अथवा न ठेवो पण त्यांचे विद्यार्थीचं या घटनेची जाणीव अवश्य ठेवतील आणि येणाऱ्या भविष्यामध्ये हे उद्देशून सांगतील की, एकेकाळी आमच्या शिक्षकांना पगार नव्हता तरी देखील त्यांनी आम्हाला घडवलेलं आहे.विनाअनुदानितच्या संघर्षमयी उद्विग्न काळात शिक्षक- विद्यार्थी या नात्याने या शिक्षकांच्या आयुष्यातलं चैतन्य चिरंतन ठेवलं आहे.सध्याच्या कठीण काळात शिक्षक- विद्यार्थी हे नातं एका कसोटीवर उतरलेलं आहे. कारण केवळ पैशांवर जीवन यशस्वी होत नसतं. तर आपल्यासोबत इतरांचं जगणं समृद्ध करणं यातच जीवनाच यश सामावलेलं असतं. .या विनाअनुदानित शिक्षकांनी स्वतःच आयुष्य समृध्द नसताना त्यांनी त्याग,समर्पण,ज्ञान देऊन विद्यार्थी हित जपलं आहे त्यांचं आयुष्य समृद्ध केलं आहे. या तत्त्वज्ञानाने विनावेतन काम करताना त्यांची मूळ प्रेरणा हे त्यांचे विद्यार्थी आहेत.विद्यार्थी ही त्यांच्या जगण्याची ऊर्जा आहे. याचं संशोधन जरुर व्हावं...पगारापुरता हा प्रश्न मर्यादित न करता व्यापक अंगाने या संघर्षाकडे पाहिलं तर अनेक पैलू आपल्यासमोर येतील.यातून एक नवं ज्ञान...जगण्याचं नवं तत्वज्ञान..आपल्यासमोर येईल. गरज आहे ती संवेदनशीलपणाचा चष्मा घालून या प्रश्नाकडे निकोप दृष्टीने बघण्याची. आणि गरज आहे ती विनाअनुदानित शिक्षकांच्या बाबतीत मानवतेच्या दृष्टिकोनातून संशोधन करून माणूसपणाची भूमिका घेण्याची.


- किरण सुभाष चव्हाण.

मोबा - ८८०६७३७५२८


विनाअनुदानित शिक्षकांच्यावर आधारित विनाअनुदानितांची संघर्षगाथा हे पुस्तक जरूर वाचा.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...