फॉलोअर

शनिवार, ३० डिसेंबर, २०२३

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.



 माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.


                         ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली पोरं. शेतीभातीच्या जीवावर संसार करणाऱ्या आईबापाच्या घरात मोठी झाली.कोवळ्यापणीच तिचं नातं शेताबांधाशी, राना-शिवाराशी, गुरा-ढोरांशी जडलं... तिलाही वाटायचं रानपाखरू होऊन स्वछदीपणे रानभर भिरभिरावं, गल्ली घरात हुंदडावं, अंगणात परसात बागडावं.. पण हे सगळं तिला स्वप्नवत होतं.. कारण तिच्या कोवळेपणीच तिच्या शिरावर जबाबदारीचं ओझं लादलं गेलं होतं.. गुरा ढोरांच्या मागे रानोमाळ पालथा घालणारी अशी ती. मातीशी तिचं घट्ट नातं होतंच पण आकाशाची ओढही तिला लागलेली असायची... आकाशातून एखादं विमान गेलं तर मोठ्या कौतुकानं ते बघत आपल्या हाताचे दोन पंख करीत ती आडवी तिडवी रानोमाळ पळायची. तिचं मनपाखरू त्या विमानाचा पाठलाग करून आकाश फिरून यायचं... काही तरी नातं होतं तिचं आकाशाशीही...ती गोठ्यातलं शेण काढायची.. शेणाची बुट्टी डोकीवर घेऊन शेणी वळायची..चुलीत लाकडं कोंबून पेटत्या चुलीवरच्या तव्यावर उबदार धुराचे लोट डोळ्यांत घेऊन भाकरी थापायची..अशा गावखेड्याच्या पसाऱ्यात ती वाढत असताना..एक मुलगी म्हणूनही बंधनाच्या बेड्या करकचून तिच्याभोवती बांधलेल्या... तिला नव्हतं स्वातंत्र्य तिच्या मनासारखं वाढण्याचं... फुलण्याचं ..बहरण्याचं. त्या बंधनापासून सुटका करताना आपल्याच माणसांशी तिला करावा लागला संघर्ष...स्वतःला घडवताना आड आलीत ती आपलीच माणसं होती...स्वतःचा शोध घेताना तिला झुगारून द्यावा लागला विरोध... आणि दिल तिने स्वतःला झोकून त्या अथांग आकाशाच्या दिशेने...तोडून टाकल्या एकेक बेड्या बंधनाच्या...नकारात्मकतेच्या भेदून  भिंती..या मातीतून उडाली एक चिमणी आपल्या पंखाच्या सामर्थ्यावरती..घेतला तिने भोवताल आपल्या कवेत गाठलं तिने आकाश...माती,पंख आकाश अशी बुलंद झेप घेणाऱ्या जिगरबाज तरुणीचा हा आहे जीवनप्रवास अर्थात फुटबॉल क्वीन अंजु तुरंबेकर...

                 कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील बेकनाळ या छोट्याशा गावी वडील शिवाजी तुरंबेकर व आई शकुंतला तुरंबेकर यांच्या पोटी २२ सप्टेंबर १९८८ रोजी शेतकरी कुटुंबात तिचा जन्म झाला. चार भावंडात अंजु हे शेंडे फळ. वडिलांचा परंपरागत शेती व्यवसाय. जोडीला गुराढोरांची संसाराला साथ. तरीही घरची परिस्थिती तशी हालाखीचीचं. शेतकऱ्याची पोर म्हटल्यावर रांग रांगतचं रांगड्या मातीशी तिची नाळ जुळाली. दुडूदुडू पावलं मातीच्या उरावर आणि बांधाच्या पाठीवर दौडू लागली. मायमातीच्या कुशीत अंजु हळूहळू मोठी होऊ लागली. आईवडिलांना शेतीच्या कामात मदत करू लागली. पाठीवर दप्तर घेऊन शाळा जाऊ लागली. शाळेकडून घरी आल्यावर  जनावारं घेऊन रानात जाऊ लागली. घरातही वाटत होतं, 'बरं झालं पोर घरातली -शेतातली सगळी कामं करते आता शाळा शिकून कुठे धन लावणार आहे ?' म्हणून जशी अंजुची चौथी शाळा झाली तसे वडील म्हणाले, "आता शाळा बंद... नाही तरी शेताघरातली कामं कुणी करायची..?" आणि अशाप्रकारे लहान वयाच्या अंजुवर कोवळ्यापणीच घरातील आणि शेतातील जबाबदारी पडली...आपल्याला पुढे शिकवायचा घरच्यांचा विचार नाही हे कळल्यावर तिने आपल्या वडिलांशी हुज्जत घालायला सुरुवात केली..."भावाला शिकवताय मग मला का नाही..? मुलींना गडहिंग्लजला जाण्यासाठी पास मिळतो तरीही मला तुम्हीं शाळेला का पाठवत नाही..? असे सवाल करीत तिने पहिली झुंज दिली ती शिक्षणासाठी आणि ती यशस्वी झाली. मग पुढे अंजु पाचवीला शिवराज विद्यालय गडहिंग्लज येथे जाऊ लागली..सातवीपर्यंतचे शिक्षण  झाले..आणि पुन्हा शिक्षणासाठी घरच्यांचा विरोध होऊ लागला... पण तिथेही तिने मात केली आणि अंजुची शाळा पुढे चालू राहिली. इकडे शाळाही करायची आणि तिकडे शेतातील कामेही करायची. शाळा,अभ्यास या पुरतं तिला स्वातंत्र्य कधीच मिळालं नाही...शाळा शिकते म्हणून तिचं कोडकौतुक कुणाकडून कधी झालं नाही...अभ्यास करत बसले आणि कुणी पाठीवर कौतुकाची थाप दिली असं कधीचं झालं नाही..उलट शाळा शिकायची  असेल तर बाकीची कामं करणं हे तिला बंधनकारक झालं होतं. इवलीशी पोर ती..  पण शेताघरातल्या कामाला तिला जुंपलं जात होतं. गोठ्यातील गुराढोरांची ही देखभाल करावी लागे. धारा काढणं,शेण काढणं..डोकीवर शेणाची पाटी घेऊन शेतात नेऊन टाकणं...उघड्या माळावर शेणी वळणं अशी कामे अंजु करायची. घर,शाळा, शेती, शिवार याभोवती तिचं भावविश्व बालपणाच्या धाग्यांनी विणलं गेलं होतं.   

                अंजुच्या अंगी सुरुवातीपासूनच मैदानी क्रीडाकौशल्य ठासून भरलेलं. त्यामुळे माध्यमिक शिक्षण घेत असताना तिला विविध क्रीडा प्रकारात खेळण्याची संधी मिळाली.अथलेटिक्समध्ये तालुका, जिल्हा,  राज्य पातळीपर्यंत तिने मजल मारली. आणि खेळातून आपल्या अंगभूत कौशल्याची चुणूक तिने दाखवून दिली. अर्थात घरातून शिक्षणासाठी, ना खेळासाठी कोणतंच पाठबळ नव्हतं.. पण तिच्यात असणारी स्वयंस्फूर्ती, अंगभूत कौशल्य हीच तिची अंतःप्रेरणा होती आणि दहावीला असताना एक संधी अवचितपणे तिच्यासाठी चालून आली. एकदा शाळेच्या नोटीस बोर्ड वरती माहिती झळकली की, गडहिंग्लजमध्ये फुटबॉल खेळाचा एक कॅम्प होणार आहे. आणि त्या कॅम्पमध्ये फुटबॉल खेळासाठी मुलींची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक मुलींनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. मग काय ? खेळासाठी अगोदरपासूनच हौशी असणाऱ्या अंजुने ताबडतोब ठरवलं की, आपणही या कॅम्प मध्ये सहभागी व्हायचं. तिने आपल्यासोबत काही मैत्रिणींना या खेळासाठी तयार केले. आणि त्या शाळा सुटल्यानंतर खेळाचा सराव करू लागल्या. सुरुवातीला फुटबॉल कसा खेळतात, हा खेळ कसा असतो याविषयी तिला काहीच माहिती नव्हते..फक्त खेळायचं एवढं खरं. पायात शूज नाहीत तरी अनवाणी पायाने मैदानावर अंजु सराव करायची. मैदानावचे खडे पायाला बोचत, ते अनुकुचिदार खडे तिच्या तळव्यांना रक्तबंबाळ करीत तरी अंजु थांबायची नाही. पण या खेळासाठी तोकडे कपडे घालावे लागतात. लोकं आपल्याला काही तरी म्हणतील. हा संकोच मनात ठेवून काही मुली थांबल्या पण अंजु त्यांच्यापैकी नव्हती. तिच्यात एक वेगळीच उमेद भरलेली  होती. ती थांबली नाही. उलट आपल्यासोबत मुली जरी नसल्या तरी कोणताही संकोच मनात न ठेवता मुलांच्यासोबत तिने सराव सुरू ठेवला.  

                      मैदानावर ती तन्मयतेने खेळत होती.तिची खेळण्याची जिद्द व उर्मी पाहून मास्टर क्लबच्या प्रशिक्षकांनी तिला उत्तेजन दिले. "अंजु तू अशीच खेळत राहिलीस तर एक दिवस खूप पुढे जाशील." हे उदगार तिचा उत्साह आणखीन द्विगुणित करणारे होते.  मैदानावरती फुटबॉलला दिशा देणाऱ्या अंजुच्या आयुष्याला हाच फुटबॉल एक नवी दिशा देणार होता. आयुष्यात नव्या उंचीवर घेऊन जाणार होता. पण त्यासाठी जिद्द, चिकाटी,कठोर मेहनत, संघर्ष आणि संयम याची कसोटी लागणार होती.. आणि अंजु त्याच्यासाठी तयार होती. कारण जीवनातलं ध्येय तिला आता कमी वयातच सापडलं होतं.आपल्याला  कुठे जायचे आहे ,काय करायचे आहे हे ठरलं होतं. त्या दिशेने स्वतःला तिने झोकून दिले.

                    वर्गात असताना कधी एकदा सायंकाळचे चार वाजतात आणि मी मैदानावर जाते असं तिला व्हायचं. अशावेळी ती एकेकदा चारच्या सुट्टीत वर्गातून चक्क पळून जायची अन मैदान गाठायची. चार भिंतीत तिचं मन रमायचे नाही तिला मैदानाचे वेध लागलेले असायचे.. पण हा सराव करून गावी परत येण्यास अंधार पडलेला असायचा. त्यात गावाकडे येणाऱ्या बसेस वेळेत नसायच्या.त्यामुळे घरी यायला रात्रीचा उशीर व्हायचा. तसा तर गावाकडे मुलींच्यासाठी एक अलिखित नियमच असतो. तो म्हणजे मुलींनी 'सातच्या आत घरात' हजर असायलाचं हवं. तेव्हा अंजु उशिराने घरी आली की घरातून प्रश्न उपस्थित व्हायचा, तुला शाळेतून घरी परतण्यासाठी इतका उशीर का लागतो ?.  तेव्हा अंजु  माझे एक्स्ट्रा क्लासेस सुरू आहेत असे काही तरी कारण सांगून वेळ मारून न्यायची. खरं कारण सांगितल असतं तर कदाचित घरच्यांनी या खेळासाठी परवानगी दिली नसती.  पण ही गोष्ट लपवून तरी किती दिवस ठेवणार.? ही मुलगी एक्स्ट्रा क्लासला नव्हे तर फुटबॉल खेळायला जाते, शॉर्ट कपडे घालते, मुलांच्यासोबत खेळते ही खबर एक दिवस घरात लागलीच आणि मग अंजुला धारेवर धरले. रागापोटी वडिलांनी तिला बेदम मारलेसुद्धा. फुटबॉल हा मुलांचा खेळ. मुलींनी तो खेळायचा नाही आणि उलट तू मुलांच्यासोबत खेळतेस, खेळताना तोकडे कपडे घालतेस या कारणांवरून तिच्या खेळाला घरच्यांच्याकडून विरोध होऊ लागला.त्यात समाजातून उमटणाऱ्या उर्मट प्रतिक्रियेची भरीस भर पडायची.  

                   समाजाच्या नजरेतून अंजु ही एक वाह्यात मुलगी आहे, मुलांच्या सोबत तोकड्या कपड्यानिशी खेळते, मुलांच्यासोबत बोलते, रात्री उशिरा घरी येते..हिला कोणतही वळण नाही. असे टोमणे तिला सहन करावे लागत. वडिलांनी बोलून बघितले, मारून बघितले..तरी अंजु बदलली नाही. हवं तर सकाळी लवकर उठून शेतातील कामे करते,गुर ढोर पाहते पण माझा खेळाचा सराव मी चालूच ठेवणार या मतावर ती शेवटपर्यंत ठाम राहिली.  खेळासाठी एकदा तिला इतका मार खावा लागला की एक दिवस अंजुला दवाखान्यात ऍडमिट करावे लागले.पण खेळाप्रतीच्या निष्ठेत बदल झाला नाही. दहावीच्या बोर्ड परीक्षेला तिला घरातून पैसे मिळाले नाहीत शेवटी शिक्षकांनी शेवटच्या दिवशी आपल्या पदरचे पैसे भरून अंजुचा फॉर्म भरला. अशाप्रकारे अंजु एकीकडे आपल्या शिक्षणासाठी आणि दुसरीकडे खेळासाठी संघर्ष आणि संयमाची परीक्षा देत होती.

              माझ्या खेळामुळे घरातील शेतातील कामे खोळंबू नयेत म्हणून अंजु पहाटे चार  वाजता उठून कामाला लागायची.शेतातील, घरातील कामे, गुरुढोरांचे चारापाणी अशी सगळी कामे आटोपून ती शाळेला जायची आणि सायंकाळी पुन्हा मैदानावर फुटबॉलचा सराव करायची. अक्षरशः ती फुटबॉल खेळासाठी इतकी वेडी झाली होती की, जळी,स्थळी,स्वप्नी तिला फुटबॉलचं दिसायचा. त्याच्याशिवाय राहणं तिला मुश्किल झालं होतं, शाळेतून एकेकदा ती पळून जात थेट मैदान गाठत असे. तरुण वयात मुलमुली प्रेमात पडतात पण त्याच वयात अंजु फुटबॉलच्या प्रेमात पडली. आता फुटबॉलचं तिचा सखा,सोबती तिचं विश्व झाला होता. तिची सारी सुख-दुःख,स्वप्नं त्याच्याशी जोडली गेली होती. 

                   आणि अशीच एक दिवस संधी चालून आली. महाराष्ट्रातून १९ वर्षाखालील मुलींची फुटबॉल खेळासाठी मुंबई येथे निवड करण्यात येणार होती आणि अंजूसाठी ही सुवर्णसंधी होती. फुटबॉल खेळासाठी मुंबईला जाण्यासाठी घरातून परवानगी मिळाली नाही. मग पैसे मिळायची तर लांबची गोष्ट. पण अंजूचं ठरलं होतं आपण मुंबईला जायचचं. त्यामुळे असोसिएशनच्या माध्यमातून पैसे उपलब्ध केले आणि घरात न सांगताच अंजु मुंबईला जाण्यासाठी बाहेर पडली. फुटबॉल खेळण्याचे स्वप्न उराशी घेऊन अंजू पहिल्यांदा स्वप्ननगरीत म्हणजे मुंबईत दाखल झाली. उंचच उंच इमारती, गर्दीने भरून गेलेले रस्ते, वाहनांची वर्दळ सर्व काही पहिल्यांदाचं पाहात होती.इथे तर इंग्रजी आणि हिंदीतून लोक संवाद साधत होते. ती तर अशी खेडेगावातून आलेली, तिच्यासाठी हे सगळं नवीनच... त्यामुळे मनावर दडपण होते पण काही असो केवळ फुटबॉलमुळे एक नवीन जग आपण पाहतो आहोत ही जाणीव तिच्या मनात निर्माण झाली. आणि ठरलं Let's Play Football. पण मैदानावर  आल्यानंतर ती आपल्या भिभिरत्या नजरेने समोरच दृश्य टिपत होती.  चांगले फुटबॉलर कसे फुटबॉल खेळतात, मुंबईतील झ्याक -पाक कपड्यातील, शूजमधील मुली खेळत होत्या. त्या इंग्लिशमधून संवाद साधायच्या. आणि मग त्यांच्यात अंजूने स्वतःला पारखून बघितलं..आपल्याला धड इंग्रजी ना धड हिंदी बोलता येते. अनेक आव्हान एकेक करून समोर येत होती. मनात काहूर माजलं होतंच. की आता काय करायचं ?  पण अशावेळी संतोष कश्यप नावाचे एक फुटबॉल प्रशिक्षक अंजुला भेटले. ते अंजुला संभाषण साधण्यात मदत करायचे.. इंग्रजीचे रूपांतर मराठीत करून सांगायचे. आणि त्यांनीच अंजुला प्रेरणा दिली. कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आपल्याला जे ध्येय गाठायचे आहे त्यासाठी आपल्यात असणाऱ्या उणिवा भरून काढून पुन्हा पुढे गेलं पाहिजे. आणि हीच प्रेरणा घेऊन ती मैदानात उतरली. आणि १९ वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल संघात आपला प्रवेश निश्चित केला.  एक गाव खेड्यातून आलेली पोर शहरातल्या मुलींसोबत फुटबॉलला भिडत होती. तिचा गोल आता तिच्या टप्प्यात आलेला होता. इथून पुढे तिची खऱ्या अर्थाने घौडदौड सुरू झाली. पुढे तिने कोल्हापूर संघाचे प्रतिनिधित्व केले व पुढे महाराष्ट्र संघात दाखल होऊन तिने कप्तान पदाची धुरा सांभाळली.              

               तरीही घरच्यांना हे मान्य नव्हतं. तिने घरात, शेतात काम करावं. एखादी नोकरी करून पैसे कमवावे असे घरच्यांना वाटत असे. अंजुने पोलीस भरती व्हावं म्हणून जबरदस्तीने घरच्यांनी तिला पोलीस भरतीला पाठवलं होतं. परंतु त्याचवेळेस अंजुला अहमदाबाद येथे फुटबॉल खेळायला जायचे होते पण घरच्यांच्या इच्छेखातर इकडे ती पोलीस भरतीसाठी गेली. मैदानी परीक्षा दिली आता फक्त लेखी परीक्षा द्यायची होती. पण त्या अगोदरच तेथील लोकांनी तिला सांगितलं की, तू नक्की पोलीस भरती होणार. पण खरं तर तिला भरती व्हायचंच नव्हतं...पण कदाचित मी पोलीस भरती झाले तर माझा फूटबॉल खेळ थांबेल ह्या भीतीपोटी अंजुने निर्णय घेतला की आपण इथूनचं मागे वळायचं..तिने बॅग पॅक केली आणि कुणालाही न सांगता तडक ती बसने पुन्हा बेकनाळ गावी आली.. घरी ही घटना सांगितली तर पुन्हा मार पडेल या भीतीने तिने घरात काही न सांगता  गावातील एक वयस्कर फुटबॉलर होते त्यांच्याकडून तिने एक हजार रुपये घेऊन अहमदाबादची वाट धरली. बेकनाळ ते अहमदाबाद असा तो पहिलावहिला प्रवास ती एकटीने करीत होती. कुठे शहर आहे कसं जायचं आहे काही माहिती नाही पण शेवटी तिने अहमदाबाद गाठलंचं. यावेळी अहमदाबाद येथे नॅशनल चॅम्पियनशिप सुरू होती आणि महाराष्ट्राकडून ती खेळावी असं सर्वांना वाटत होतं.तिने सहभाग घेताच खाली आलेली महाराष्ट्राची टीम थेट दुसऱ्या नंबरवर पोहोचली. अहमदाबादमधील खेळ झाल्यानंतर आता कुठे जायचं हा प्रश्न होता...मागचे दोर कधीच तुटले होते. कारण घरातून ती कुणाला न सांगता पळून आलेली होती. पुन्हा त्यात पोलीस भरती अर्ध्यावर टाकून ही खेळायला गेली म्हटल्यावर वडील तर इतके चिडले असणार की जणू ते जीवानिशी मारतील ही भीती अंजुच्या मनात होती. डोळ्यासमोर सगळा अंधारचं अंधार दाटलेला होता... पुढंच आयुष्य कुठं व कसं काढायचं... पुढंच शिक्षण कसं पुर्ण करायचं त्यासाठी पैसे कुठून आणायचे असे अनेक प्रश्न तिच्याभोवती धिंगाणा घालीत होते..

                  आणि तेंव्हा एका प्रशिक्षकानी अंजुला ऑफर दिली की या सिझनला पुण्यात फूटबॉल खेळू शकशील का..? पण तरीही मनात प्रश्न होतेच. कॉलेज कस होईल ? रहायच कुठे ? असे नाना प्रश्न सतावत होते. मग त्यांनी पेईंग गेस्ट म्हणून राहण्याची सोय करून त्याचे पैसे भरण्याची जबाबदारी स्वीकारली..शिक्षणाचा आणि राहण्याचा प्रश्न मिटला आता फुटबॉल खेळण्यासाठी कुणाच्या शिव्या व मार खावा लागणार नव्हता. खेळाची उर्मी भलेही मनात होती..पण पोटात मात्र भूक होती..त्याचं काय करायचं..कारण पोटासाठी ती स्वतःवर अवलंबून होती... अशावेळी युनिव्हर्सिटीमध्ये अंजु आणि पंजाबची तिची मैत्रीण पुजाराणी ह्या दोघी मिळून खेळाचा सराव करायच्या..तेंव्हा पुजाराणी ही तिच्यासाठी दुपारचा डबा घेऊन यायची. आणि मग दोघी एकत्र जेवायच्या. एक दिवस ती आली नाही तर जेवणाचे वांदे व्हायचे. अशावेळी अंजु पार्ले-जी ची बिस्किटे पाण्यात बुडवून खात असे..पैशांची तंगी होतीच अशावेळी शेजारी एक पेट्रोल पंप होता तिथे ती पार्टटाइम काम करायची. जिथे पेईंग गेस्ट म्हणून राहायची तिथे भांडी घासायची, धुणे धुवायची आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून ती आपला खर्च भागवत असायची.

                    पुण्यातलं आयुष्य अशाप्रकारे खूप खडतर राहिलं. बारावीनंतर घरातून पळून आलेली एक मुलगी. खेड्याच्या वातावरणातून आता शहरामध्ये एकटीने राहणं. कोणी काळजी घेणारं नाही , कोणी आपुलकीने विचारणारं नाही...जे काही चांगलं वाईट घडेल त्याला स्वतःने तोंड द्यायचं. पुन्हा फुटबॉल हा असा खेळ आहे की दररोज मेहनत केलीच पाहिजे..यामध्ये स्वतःला टिकवून ठेवणं हे तितकंस सोपं नाही. त्यामुळे अंजु  येणाऱ्या परिस्थितीशी अशी एकाकी झुंज देत स्वतःच स्वतःचा आधार बनून स्वतःला घडवत होती. 

                        पुण्यात कॉलेज सुरू होतं.. फुटबॉलचे प्रशिक्षण सुद्धा सुरू होतं. पण त्या काळी मुलींच्या फुटबॉल खेळाचा म्हणावा तेवढा विकास झालेला नव्हता. वर्षांतून एक किंवा दोन स्पर्धा असायची. त्यामुळे या खेळातून चार पैसे कमवता येतील अशी संधीही नव्हती म्हणजे एक आवड म्हणूनच खेळायचं अशी एकंदरीत स्थिती होती. आणि अशावेळी २००७ साली सिनिअर नॅशनलच्या ट्रायलसाठी अंजु गेली. तेंव्हा अंजु महाराष्ट्र फुटबॉल संघाची कप्तान होती. तिच्यातली खेळण्याची आणि परिस्थितीविरुद्ध झगडण्याची जिगर पाहून तिथल्या प्रशिक्षकांनी तिला विचारलं.. की तुला जॉब करायला आवडेल का..? तू मुंबईत राहशील..? खेळशील आणि पैसाही कमवशील...अंजुला मुळात पैशाची चणचण भासतच होती.. अशावेळी ही तिच्यासाठी एक संधी होती. आणि विशेष म्हणजे पुण्यापेक्षा मुंबईत फुटबॉल खेळाचा चांगला लौकिक होता... खेळण्याच्या संधी भरपूर होत्या. त्यामुळे खेळासोबत पैसेही कमवता येईल आणि पुढे जाऊन भारतीय फुटबॉल संघात आपली निवड होईल हे स्वप्न उराशी घेऊन अखेर अंजु मुंबईला आली. आणि 'मॅजिक बस' या संस्थेत प्रशिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली.  मॅजिक बस ही अशी एक सामाजिक संस्था आहे जी वंचित गरीब मुलांना फुटबॉल खेळ शिकविण्याचे व जीवन कौशल्य विकसित करण्याचे काम करीत होती. मुळात अंजु अशाच प्रतिकुल परिस्थितीमधून आल्याने तिला ती जाणीव होती आणि तिने आनंदाने अशा गरीब मुलांना फुटबॉल शिकविण्याचे व्रत हाती घेतले... पण मुंबईत राहताना पुन्हा आव्हाने ही होतीच कारण ती पहिल्यांदाचं मुंबईत वास्तव्य करीत होती.. भाषेचा प्रश्न उभा रहायचा.. आर्थिक अडचणी येत होत्या.. कारण जो पगार मिळायचा त्यातला अर्धा पगार राहण्यावर खर्च व्हायचा. इंग्रजी लिहता बोलता येत नव्हतं... अशावेळी जास्तीचा सराव करून इतरांच्याकडून शिकून आपली भाषेची गरज पूर्ण करीत होती. स्वतःचा फुटबॉल सराव, मुलांना शिकवणं, ऑफिस काम बघणं व त्यातून आपला अभ्यास करणं असं तिचं संपूर्ण व्यस्त दिनक्रम राहायचा.. एकंदरीत तारेवरची कसरत करावी लागत होती.

                     पुढे मॅजिक बस मध्येच मुलींना असिस्टंट कोच म्हणून फुटबॉल शिकविण्याचं काम सुरू असताना तिच्यातील नैपुण्य ओळखून तिला Train of the Trainer प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षक म्हणून तिची निवड करण्यात आली.म्हणजे मॅजिक बस मध्ये विविध राज्यातून काम करण्यासाठी जे प्रशिक्षक यायचे त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी 'कर्जत' या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र आहे या ठिकाणी अंजु त्या लोकांना प्रशिक्षण देऊ लागली. आणि मग इतर शासकिय आणि सामाजिक संस्थेतही तिला प्रशिक्षणासाठी काम करण्याची संधी मिळू लागली. मॅजिक बसमध्ये काम करताना, फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण देताना जीवनातील काही गोष्टींचे बारकावे तिलाही शिकता आले..स्वतःचा विकास साधताना दुसऱ्याचाही विकास कसा साधावा हे कौशल्य तिला आत्मसात करायला मिळाले. 

              २०१० साली तिने  नेदरलँडमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल प्रशिक्षण पूर्ण केले. त्यावेळी परदेशातून फुटबॉलचे प्रशिक्षण घेणारी ती पहिली आणि सर्वात लहान भारतीय महिला ठरली. फुटबॉल तंत्रशुद्ध पद्धतीने कसा शिकवायचा याचे ज्ञान आता तिच्याकडे होते. आणि मग इथून पुढे फुटबॉलचे प्रशिक्षण द्यायचे हे ध्येय पक्के झाले. त्यानंतर २०१३ साली कोलकत्ता या ठिकाणी फिफाचा ग्रासरूट कोर्स पूर्ण केला आणि यामधील तिची कामगिरी पाहून ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या ( AIFF ) ग्रासरूट फुटबॉल प्रोग्रामध्ये काम करण्याची संधी तिला मिळाली. आणि २०१३ साली तिने AIFF जॉईन केलं. ही संधी म्हणजे तिच्या आयुष्यातील सुवर्णसंधी होती कारण एकेकाळी फेडरेशनच्या वतीने ती खेळाडू म्हणून फुटबॉल खेळायची. पण आता फेडरेशनच्यावतीने देशासाठी काम करण्याची संधी तिला मिळाली होती. यासाठी तिला दिल्लीला जावं लागणार होतं आणि हे तिच्यासाठी खूप मोठं आव्हान होतं कारण तेथील कामाची जबाबदारी, भारत देशातील पूर्ण राज्यासोबत काम करावे लागणार होते.  त्याप्रमाणे आपले काम करताना आपली भाषा, ज्ञान, आत्मविश्वास आणि एकूणच आपलं व्यक्तिमत्त्व त्या अनुषंगाने परिपूर्ण असायला हवे. पण अंजुने हे आव्हान पेलले. या काळात तिने आपले इंग्रजी लिहिणे, बोलणे आपले व्यक्तीमत्व घडवणं यासाठी दिवसरात्र एक करून तिने खूप मेहनत घेतली. पण कमी वेळेत तिच्यावर एक मोठी जबाबदारी तिच्या वरिष्ठांनी तिच्यावर सोपवली ती म्हणजे ५० लोकांच्यासमोर जाऊन प्रशिक्षण द्यायचे. आणि त्यावेळी ती जेंव्हा ५० लोकांच्या समोर प्रशिक्षण द्यायला उभी राहायची तेव्हां सगळ्यात मोठं आव्हान असायचं ती मुलगी असल्याचं. कारण अंजु तरुण होती. त्यामुळे सगळेच तिच्याशी चांगले वर्तन करायचे असे नाही. तर काहीजण मुलगी आहे अशा दृष्टीने संकुचित मानसिकतेतून बघायचे, काही लोक तिला आदर देत नसत पण ती खचली नाही.  उलट आपल्याशी गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला आपण चांगलीच वागणूक द्यायची, चांगलं प्रशिक्षित करायचं हे एक आपल्या कामाचं ध्येय म्हणून तिने स्वीकारलं होतं. आणि अशा विचित्र परिस्थितीमध्ये अंजुने ह्या लोकांना ज्याप्रकारे हाताळले हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर असेही तिला अनुभव आले की, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही चुकीचं वर्तन करू पाहणाऱ्या व्यक्तींनी अंजुच्या पुढ्यात पश्चातापाचे अश्रू गाळले आहेत. तर अशी सर्व आव्हाने पेलत अंजु प्रशिक्षण देण्यासाठी भारतभर फिरली विविध राज्यातील प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्याची संधी तिला मिळाली.आपले अनुभूव आणि कौशल्याच्या बळावर अनेक फुटबॉल प्रशिक्षकांना तिने घडविले. जवळपास सात वर्षे तिने फेडरेशनचे काम पाहिले. अंजुच्या नेतृत्वाखाली ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने एशियन फुटबॉल कॉन्फट्रीचे अवॉर्ड भारतासाठी जिंकले.         

                     दरम्यान २०१८ साली तिने ए.एफ.सी तर्फे घेण्यात आलेल्या 'ए' लायसन्स परीक्षेत भारतातील सर्वात कमी वयात 'ए' परवाना मिळवणारी पहिली भारतीय तरुण महिला ठरण्याचा विक्रम केला. यानंतर फेडरेशन सोडून २०१९ साली भारतातील सर्वात यशस्वी समजला जाणारा गोव्यातील डेम्पो स्पोर्टस मेन क्लबमध्ये ती तांत्रिक अधिकारी बनली. अशाप्रकारे अंजु ही संपूर्ण आशिया खंडातील पहिली अशी महिला होती जी पुरुषांच्या फुटबॉल क्लबमध्ये टेक्निकल डिरेक्टर म्हणून काम पाहात होती. २०१९ च्या एशियन फुटबॉल कॉन्फिडेन्सलच्या ग्रासरूट डेव्हलपमेंट पॅनेलवर तिची नियुक्ती झाली. आणि इथे पॅनल मेंबर व टेक्निकल एक्सपर्ट म्हणूनही तिने काम पाहिले. भारतात जेंव्हा १७ वर्षे वयोगटाखालील फुटबॉल वर्ल्डकप झाला त्यामध्ये मिशन लेव्हल मिनियम प्रोजेक्ट होता त्याची टेक्निकल हेड म्हणून तिने काम पाहिले. तिच्या नेतृत्वाखाली अनेक स्पर्धेत यश मिळाले यानंतर २०२२ मध्ये तिने एशियन फुटबॉल वुमेन्स क्लब मध्ये टेक्निकल अनोलिस्ट म्हणून देखील काम पाहिले..              

                      आज विविध देशात ती आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण देत आहे.आजपर्यंत तिच्या मार्गदर्शनाखाली हजारो प्रशिक्षक व फुटबॉलपट्टू तयार झाले. आणि केवळ महिलांना नाही तर पुरुषांनाही तिने प्रशिक्षित केले आहे. ज्या एम.आर आणि शिवराज कॉलेजच्या मैदानावर तिने एककेकाळी ज्या प्रशिक्षकांच्याकडून फुटबॉलचे धडे घेतले त्या मैदानावर त्याच प्रशिक्षकांना तंत्रशुद्ध पध्दतीने प्रशिक्षण देण्याचे भाग्य आज अंजुला मिळाले...तिच्या या कार्याचा गौरव म्हणून आजपर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्कारांनी तिला गौरविण्यात आले आहे. नुकताच झी टॉकीजचा उंच माझा झोका हा पुरस्कार मिळाला आहे..

                    म्हणजे मातीतून आकाशापर्यंत तिने आपल्या पंखाच्या सामर्थ्यावर भरारी घेतली...एकेकाळी आकाशातून जाणाऱ्या विमानाकडे पाहून मातीवर धावणारी ती..आज त्याच विमानात बसून जगाची सफर करते आहे....परंतु आकाशातून हिंडणारी अंजु पुन्हा आकाशाकडून आपल्या मातीकडे वळते...पुन्हा अशीच एखादी अंजु घडवण्यासाठी...आज ती ग्रामीण भागातल्या मुलींच्यासाठी समर्पित भावाने एक चांगलं काम उभा करीत आहे...आजही आपल्या गावकुसात प्रतिभावान अंजु उंबरठ्याच्या आत अडकून पडल्या आहेत..त्यांना मैदानावर आणण्याचं, त्यांच्यातील टॅलेंट बाहेर काढण्याचं काम अंजु करीत आहेत. ग्रामीण भागातील मुलामुलींच्यामध्ये फुटबॉल खेळ, नेतृत्व कौशल्य, जीवन कौशल्य विकसित करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी अंजुने आपली एक टीमची बांधणी करून आता ए.टी फाउंडेशन नावाची संस्था अंतर्गत फुटबॉल प्रशिक्षण देणारी अडॅप्ट अकॅडमी सुरू केली. आणि यामध्ये त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून त्याच समर्पित भावनेने काम करणाऱ्या भक्ती पवार या जिगरबाज मुलीची साथ ही अंजुला लाभत आहे. आणि या अकॅडमीच्या माध्यमातून मुलांमुलीसहीत सर्व वयोगटातील लोकांना खेळाचे तंत्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे. गडहिंग्लज, कोल्हापूर व अहमदनगर येथे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे.त्याचसोबत प्रत्येक शाळेत जाऊन मुलामुलींच्यासाठी नेतृत्व कौशल्य कार्यशाळा राबवत आहेत. 

                         तिच्या आतापर्यंतच्या जडणघडणीत आईवडील, शिक्षक, फुटबॉल खेळाच्या निमित्ताने लाभलेले विविध प्रशिक्षक, मित्र परिवार यांचे योगदान तर आहेच पण जीवनामध्ये जे काही चांगलं वाईट घडलं याला ती स्वतःला जबाबदार धरते. मीच माझ्या जीवनाची खरी शिल्पकार आहे...मीचं स्वतःची सर्वोत्तम प्रेरणास्थान आहे असे ती मानते...माझ्या पंखावर माझा विश्वास होता म्हणून तर मी एवढी मोठी झेप घेऊ शकले... मनातलं स्वप्न सत्यात उतरवू शकले असे ती सांगते...एक मुलगी म्हणून हे सर्व करताना तिच्यासाठी सोपं नव्हतं..खेळामध्ये टिकून राहणं, एकटीने हा प्रवास करणं.. पुरुषांच्या बरोबरीने आणि त्यांच्या सोबत काम करताना तर अनेक आव्हानांचा सामना तिला करावा लागला...स्त्रीच्या सौंदर्यात धन्यता मानण्याचा नादात तिच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्षित करणारी संकुचित मानसिकता तिला ठायी ठायी अनुभवायला मिळत होती...पण ती जराही ढळली नाही...मागे सरली नाही..एक मुलगी म्हणून सुद्धा दुसऱ्या बाजूला अशा आव्हानांनाही तोंड देत ती पुढे जात होती. त्यामध्ये तिने स्वतःला टिकवून ठेवलं. प्रवाहाच्या विरोधात जाताना विरोध हा होतंच राहतो पण आपल्याला आपलं ध्येय गाठायचं असतं...आज एवढ्या मोठ्या संघर्ष आणि धडपडीच्या प्रवासातून एका यशस्वी टप्प्यावर ती पोहोचली आहे..आणि म्हणून आजच्या मुलींना नेहमी ती एक संदेश देत असते.. नेहमी स्वप्नं पाहा.. स्वतःवर विश्वास ठेवा...ती स्वप्नं साकारण्यासाठी खूप मेहनत घ्या...प्रत्येक गोष्टीत १००℅ द्या यश तुमचंच आहे..आणि पालकांना उद्देशून ती सांगते..आपली मुलगी चांगले गुण घेऊन जन्माला आलेली आहे..तिला उंच झेपावण्यासाठी तिच्या पंखाना बळ द्या.. तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा.

                    एका अत्यंत छोट्या गावात जन्म घेऊन प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, प्रसंगी घरच्यांचा रोष पत्करून आणि समाजाच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन अंजुने आज आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत भरारी घेतली. आणि पुन्हा एकदा हेच सिद्ध करून दाखवलं की मुलगी कुठेही कमी नाही..कमी आहे ती तिला कमी समजणाऱ्या दुबळ्या मनाच्या मानसिकतेत. दोष तिच्यात नाही तर दोष आहे तो तिला स्वातंत्र्य न देण्याच्या समाजाच्या संकुचित वृत्तीत...मुलगी ही परक्या घरचं धन, घराचा वंश वाढवणारी वेल असा चाकोरीबद्ध विचार करून तिच्या आतल्या कर्तुत्वाला, प्रतिभेला आणि स्वतःला सिद्ध करू पाहणाऱ्या तिच्या स्वातंत्र्याला संकुचित विचारसरणीच्या परंपरागत व्यवस्थेला अंजुने दिलेली ही सणसणीत चपराक आहे....अजूनही तिच्या स्त्री ही स्वतंत्र आहे, तिच्यात आहेत ते धैर्य,धाडस, कर्तृत्व... तिला जर आपण वाव दिला तर ती ही घडू शकते आणि घडवू शकते...पण हा बदल घडायचा असेल तर तो बदल पहिला आईच्या दुसरं म्हणजे समाजाच्या पोटात झाला पाहिजे. कारण मुलगीकडे पाहण्याच्या दूषित दृष्टिमुळे कित्येक अंजु आज आईच्या पोटात खुडल्या जाताहेत.. आणि स्वतःच्या कर्तुत्वाने घडणाऱ्या कित्येक अंजु आज समाजाच्या दबावाला बळी पडून मागे राहताहेत. प्रत्येक मुलगी एकटीने या व्यवस्थेशी नाही झगडू शकत..जर तिला स्वतःला घडवण्यासाठी स्वतःच्याच माणसांशी संघर्ष करावा लागत असेल तर ती मुलगी पुढे कशी येणार..? म्हणून समाजाने आपल्या मानसिकतेत बदल केला पाहिजे... मुलगा मलगी एक समान या घोषणा नुसत्या ओठातून नको आहेत तर तो बदल मुळात पोटातून झाला पाहिजे...आणि हा बदल घडण्यासाठी अंजु तुरंबेकर एक उदाहरण आहे आजच्या समाजासमोर. प्रतिकुलतेमधून अंजुने स्वतःला घडवलं नव्हे तर तिला  स्वतःला घडवावंचं लागलं... कारण आज तिच्याकडे पाहून उद्याच्या कित्येक अंजु घडणार आहेत. आणि म्हणून पुढे जाताना ती मागे वळून पाहते... जसे की,

या घरट्यातून पक्षी उडावे दिव्य घेऊनि शक्ती 

नजर असावी ध्येयावरती उंबरठ्यावर भक्ती.. 

                   पुन्हा ती आपल्या मातीकडे वळते आणि इथल्या चिमण्या पाखरांच्या पंखात बळ भरण्यासाठी स्वतःला झोकून देते. आपल्यासारखी एकेक मुलगी उंच झेपावण्यासाठी..अंजुचे आजचे कार्य म्हणजे जंगलाला लागलेल्या आगीत चोचीतून पाण्याचा एक थेंब आणून आग विझविणाऱ्या त्या चिमणीसारखे महान आहे. भलेही त्याची फारसी किंमत आजच्या समाजाला वाटत नसेल पण जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा संकुचित विचारधारेशी लढून स्वतःला व इतरांना घडवणाऱ्यांच्या यादीत अंजु तुरंबेकर हे नाव अभिमानाने कोरले जाईल. जशी ती यशाची व्याख्या करताना म्हणते, "शेतात बी पेरलं तर त्याच धान्य व्हायला बराच कालावधी जावा लागतो... त्यासाठी वाट पाहावी लागते"  तसं..आज जे कार्य अंजु पेरत आहे ते अंकुरण्यासाठी थोडा कालावधी जाणार आहे पण यशाचं पीक भरघोसपणे बहरून येणार हे मात्र नक्की....माती पासून यशाचा बोध घेऊन त्याच मातीच्या उरावरून पंखाच्या सामर्थ्यावर आकाशापर्यंत घेतलेली ही उत्तुंग भरारी...अनेकांच्या उरात प्रेरणा भरणारी आहे.अभिमानाला स्फुरण चढवणारी आहे..अंजु म्हणजे जिद्द,चिकाटी,सचोटी धाडस, त्याग आणि समर्पणाचं मूर्तिमंत उदाहरण आहे. नक्कीच आजच्या या जिगरबाज अंजुच्या जगण्यातून उद्याच्या असंख्य अंजु घडतील..आणि आकाशाशी नाते सांगतील. माती पंख आणि आकाश असा अंजुचा हा जीवनप्रवास येणाऱ्या कित्येक अंजुसाठी नेहमीच मातीचे आकाशाशी नाते सांगत राहतील...प्रेरणा देत राहतील.....अंजुदीदीच्या उदंड अशा कर्तृत्वाला हृदयापासून सलाम आणि पुढील कार्याला अनमोल शुभेच्छा..!

जय हो...! मंगल हो....!!


- किरण सुभाष चव्हाण.

मोबा -८८०६७३७५२८.





२ टिप्पण्या:

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...