'आयुष्याचे कोडे..'
भंगू दे आयुष्य माझे
जाऊ दे जीवनाला तडे
या जगण्याचे का आता
थोडेच माझ्यावाचूनी अडे..?
माझ्याच आयुष्याचे मजला
सुटे ना कोडे...
कसे जगावयाचे आणि
कुठे जावयाचे अजुनी..?
मला काही ना कळे..
जळो...जळो हे जिणे लाजिरवाणे..
माझ्यावाचूनी का इथे काय उणे..?
माझ्याच आयुष्याचे मजला सुटे ना कोडे...
चुकून का आलो असेन
या माणसांच्या झुंडीत.
माणूस म्हणून जगताना
का मीच सापडलो खिंडीत..
जगण्याची का एखादी
मला वाट ना सापडे..?
माझ्याच आयुष्याचे मजला सुटे ना कोडे...
पोट भरल्या दुनियेचे
नुसते ऐकावे मी ढेकर..
भूक भागल्या पोटाचे
मीे सोंग घ्यावे कुठंवर.
भरले पोट दावितो
पण आतून आतडे कोरडे...
माझ्याच आयुष्याचे मजला सुटे ना कोडे...
खरे आसू लपवितो
आणि खोटे हासू दावितो.
दुःखं भरल्या चेहऱ्यावर मी
आनंदी मुखवटा चढवितो.
प्रसन्न वाटतसे माझे मन
पण आतून किती कितींदा रडे...
माझ्याच आयुष्याचे मजला सुटे ना कोडे...
जगण्यासाठी मला का
इथे कशाची गरज पडे..?
आशेवरती जगणे आता
जराही ना परवडे
म्हणे जगा आणि जगू द्या
गातात माणूसपणाचे पोवाडे
माणूस म्हणून जगण्यासाठी
मग माझेच का वावडे..?
माझ्याच आयुष्याचे मजला सुटे ना कोडे...
भंगू दे आयुष्य माझे
जाऊ दे जीवनाला तडे...
माझ्याच आयुष्याचे मजला
सुटले ना कोडे...
उरलो देहानेच नुसता
माझे काय मागे ना पुढे..
जाऊ दे आता सरणावरती माझे हे मडे...
जाऊ दे आता सरणावरती माझे हे मडे...
- किरण चव्हाण.
खालील लिंकवर क्लिक करून कविता ऐका माझ्या यू ट्यूब चॅनेलवर.
----------------------------------------------------------
'आयुष्याचे कोडे ' या माझ्या कवितेच्या अनुषंगाने...
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे...किंवा असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर...आयुष्य किती सुंदर आणि देखणं आहे हे सांगणाऱ्या या कविता...असं आयुष्य जगायला कोणाला नाही आवडणार...पण जगणे जेव्हा वारंवार छळू लागते...केवळ जगण्यासाठी जगणे शिल्लक राहते...आणि खरे जगायचे राहूनच जाते...तेंव्हा मात्र कडेलोट होतो.
आम्हांलाही जगावस वाटतं म्हणून का जगण्याला असं छळावसं वाटत.तेव्हा जगणं किती सूंदर आहे हे सांगणारी कविता..जगण्यालाही ठणकावून सांगते...'जगण्यानेही छळले होते मरणाने सुटका केली'.
जगण्याचे गोडवे गाणारी कविता..मग निर्वाणीचेही गोडवे गाते...मरणाचे गोडवे गाण्याची तिला भीती नाही वाटत...तिच्या आहे ते सामर्थ्य मृत्यूलाही सुंदर करण्याचं....
कविता नसते कुणालाही बांधील...उगीच नाही कुणाचे गोडवे गात...तिने नाही केवळ 'सूंदर आहे जगणे' सांगण्याचा ठेका घेतलेला...म्हणून तर ती जगण्याच्या विरोधातही बंड करते..
.मनातील व्याकुळ झालेल्या असह्य वेदना...यातना...भावना यांचा उद्रेक ती थंड करते...शब्दांच्या सामर्थ्यावर मनातील अव्यक्त भावनांना बाहेर काढतें ती कविता...निर्वाणीचे रूप घेते आणि ती देते समर्पण...ती जाते पुढे पहिल्यांदा सरणावर..
तेंव्हा कुठे जगास कळते...
नेमके माझ्या मनात काय सुरू होते...जगाला काय वाटेल याचा विचार नसतो कधीच मनात असतो तिचा तो त्याग फक्त नि फक्त मागे मी जिवंत राहण्यासाठी...
मला न सुटलेले आयुष्याचे कोडे अखेर माझी कविताचं सोडवते... ते कोडे अखेर ती सरणावर घालून मोकळी होते..
जगणे किती सूंदर आहे हे सांगणारी जशी कविता असते.
तसेचं खचलेले दुभंगलेले मन मोकळे करून जगायला भाग पडणारी कविता असते जी त्या जगण्यापेक्षाही किती सुंदर वाटते...अशी ही माझी कविता.
- किरण चव्हाण.
सर " आयुष्याचे कोडे "ही जिवनाचे वास्तव मांडणारी कविता वाटली.पण कविमनाने या जिवन प्रवाहात निराश न होता येणा-या प्रत्येक प्रश्नाला खंबीरपणे तोंड देत हे आपल्या वाट्याला आलेले आयुष्य आनंदाने जगण्यासाठी
उत्तर द्याहटवासतत सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करून आपणच हे
आपल्या आयुष्याचे कोडे कसे सुटेल हे पहाणे गरजेचे
वाटते.
कारण या जगात सदासुखी असा कोणी नाही.म्हणून
मिळालेव्या आयुष्यावर प्रेम करून कोडे सोडविण्यासाठी
सदैव तयार रहावे मग निश्चितच माग॔ सापडेल
सध्या कोव्हीड १९ मुळे सर्वाचाच अवस्था कोड्यासारखी आहे .आपली शब्द रचना छान आहे पण जगण्याचा आशावाद शेवटी दिसायला हवा 🙏🙏👍👍
उत्तर द्याहटवाजगण्याचा आशावाद दिसायला हवा हे बरोबर आहे.
उत्तर द्याहटवापण!सर सव॔च आपल्या मनासारख कधी घडत नसते
काही
गोष्टीमथ्ये प्रत्येकालाच तडजोड करावी लागते व आपला
जिवन प्रवास पुढे चालू ठेवावा लागतो.कारण जिवन हे जितके सुंदर आहे.तितकेच ते काटेरी वळणावरचे ठिकाण
आहे.आणास जे आयुष्य लाभले आहे.ते या जिवन प्रवाहातील बोटी सारखे आहे.
महणूनचं या जिवन प्रवासात सुखःदुखःच्या प्रत्येक
हेलकाव्यावर ही जिवनरूपही बोट कायमस्वरुपी स्थिरावली
जाऊ शकत नाही.म्हणून आपल्यालाच या आयुष्याच्या
कोड्याचे उत्तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर निर्माण होणा-या
प्रश्नानुसार शोधावे लागते .म्हणून तर प्रत्येक जीवाची
धडपड चालू असते ती उद्याचा सुखी दिवस आशाळभूत
नजरेने पाहण्यासाठी.
आणि खरंतर आजपर्यंत कोणालाच आपल्या आयुष्याचे
संपूर्ण कोडे सोडविण्यासाठी राजमार्ग सापडला नाही.
म्हणून निराश न होता हे जिवन गाणे तूम्ही आम्ही गात
राहून आयुष्याचे कोडे सोडविण्याचा आपल्यापरीने प्रयत्न
केला पाहिजे आणि तो आपण करूया आणि जगण्याचा
आशावाद शोधू या............
अप्रतिम कविता
उत्तर द्याहटवाआयुष्याचे कोडे सुटणे खरेच कठीण पण आपल्या प्रतिक्रिया माझी जगण्याची उमेद वाढवणाऱ्या आहेत..खूप धन्यवाद... माझे प्रिय वाचक..
उत्तर द्याहटवान सुटणारे कोडे म्हणजे आपलं आयुष्य ... छान रचना आहे सर ..
उत्तर द्याहटवा"कविता " कधी कोणाशी बांधील नसते👍
उत्तर द्याहटवाती चोहोबाजुंनी नजर फिरवून वास्तव मांडणे करिता काव्यरूपात आतून आलेल्या
भावनांना वाट करून देण्यासाठी शब्दरूपांत सुखाचा आनंद आणि दु:खाच्या कळा सोसून जन्माला येते तीला कोणीच काय
आपलं मनही थोपवू शकत नाही.
कारण तीलाही तीचं आयुष्य जगत जगत आपल्या सारख्या
अनेक जणांच्या आयुष्याची कोडी
उलगडावयाची असतात मग तीला कधी सुखी जिवना चे तर
कधी दुःखी कष्टी जिवना चे भाव
मांडावयाचे असतात म्हणूनंच ती
कविच्या मनपरत्वे निसंकोच पणे
जन्म घेते तीला भाव भावना असतात पण कोणताच भेदभाव
नसतो म्हणून ती बांधील नसते
पण स्वाथ॔ न बाळगता आपला हेतू निश्चितपणे तडीस नेण्याचा प्रयत्न करते तो पय॔ंत ती चंचल
असते.
आणि मग त्यातूनच प्रत्येकाला
आयुष्याचे कोडे सोडविण्यासाठी
एक दिशादर्शक म्हणून अगदी
शेवट पर्यंत काय॔रत रहाते ,ती फक्त स्वंताची बांधील की जपण्यासाठी नेहमी स्वतंत्र असते .