'जलतरणामध्ये सुवर्णमयी इतिहास रचणारी भारताची जलतरणपटू जलकन्या कांचनमाला पांडे- देशमुख.'
ती एक लाट बेधुंदपणे पाण्यावर स्वार होऊन यशाचा किनारा गाठणारी. तिचं नी पाण्याचं जिव्हाळ्याचं अतूट घट्ट नातं.तिनं आत्मविश्वासाने झेपावं आणि कवेत घ्यावं पाण्याने तिलाही.पाण्याच्या पाठकुळीवर स्वार होऊन पादाक्रांत केलीत तिने यशाची अनेक शिखरे... रचलाय एक नवा इतिहास.साकारलाय अद्वितीय विजय.स्वतःच्या दृष्टीहीनतेवर मात करत देशाच्या जलतरणाला जागतिक स्तरावर जिने एक नवी दृष्टी दिलीय.मनातल्या स्वप्नांना सत्यात उतरवताना त्या प्रत्येक स्वप्नांना लाभलाय प्रत्येक वेळी यशाचा किनारा...प्रखर जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर तिने पार केलाय भवसिंधु...स्वप्नांच्या मागे पोहताना ती आता पोहोचलीय सातासमुद्रापार. तिला माहितीचं नाहीं कधी थांबणं. आणि तिला कोणी थांबवूही शकत नाही..तिनं गाठलाय आता आयुष्यातला सुवर्णमयीक्षण.येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना झुगारून देत तिने अखेर सिद्ध केलंय स्वतःला.अशा या लाटेने आज गाठलाय सर्वोच्च यशाचा किनारा. जलतरणमध्ये सुवर्णमयी इतिहास रचणारी जलपरी जलपरी भारताची जलतरणपटू सागरकन्या अर्थात कांचनमाला पांडे-देशमुख.
भारताची सागरकन्या म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं,अशा कांचनमालाचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे ३१ डिसेंबर १९९० रोजी झाला.वडील श्री. ज्ञानेश्वर पांडे व आई सौ.हिरुताई पांडे .कांचनमालासह एकूण पाच भावंडे.चौघी बहिणी व एक भाऊ.एकत्र कुटुंबात तिचे लहानपण गेले.नियतीने घोर अन्याय करूनच कांचनमाला व तिच्या आणखीन एका बहिणीला जन्माला घातलं. ते म्हणजे कांचनमालासह एक बहीण जन्मतः अंध आहे.पण या घटनेने तिचे आईवडील जराही डगमगले नाहीत.६ वर्षांची असताना कांचनमालाला अंधमुलांच्या शाळेत घातलं गेलं.सर्वसाधारण मुलांप्रमाणे तिला मैदानात खेळता येणार नव्हते पण म्हणतात ना,' मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.' लहानपणापासून कांचनमालाला पाण्याशी अटॅचमेंट(जवळीकता) होती..हे ओळखूनचं वडिलांनी सुरुवातीला तिच्या शारीरिक व्यायामासाठी वयाच्या १० व्या वर्षी ५ वीत असताना स्विमिंग शिकायला घातले.पण तेंव्हा आजूबाजूच्या लोकांनी कांचनमालाच्या वडिलांना अक्षरशः वेड्यात काढलं. लोक म्हणायचे.."काय मूर्ख आहे हिचा बाप..आंधळ्या मुलगीला स्विमिंग शिकवतोय..आहे केवढीशी ही पोर..? कुठे बुडून मेली तर..?" असतात असे लोक 'ना घेणं ना देणं.:.तिच्या घरच्यांपेक्षा यांनाच तिची जास्त काळजी म्हणायची.पण बाबांनी ते बोलणं मनावर घेतलं नाही.लोक काय म्हणतात यांकडे साफ दुर्लक्ष केलं.आणि जिथे स्विमिंग शिकायला इतरांना महिना लागतो आश्चर्य म्हणजे तिथे फक्त आठच दिवसात कांचनमाला स्विमिंग शिकली.
..मग पुढे माहिती कळत गेली की,स्विमिंग कॉम्पिटेशन असतात.त्यामध्ये सहभागी व्हायचे ठरवले. वयाच्या १० व्या वर्षांपासून तिने स्विमिंग स्पर्धेला सुरुवात केली. प्रथम जिल्हा पातळीवर नॉर्मल (डोळस) मुलांबरोबर स्विमिंग स्पर्धेत भाग घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात कांचनमालाने पहिला क्रमांक पटकावला.इथून जी यशाला सुरुवात झाली त्यानंतर तिने कधीच मागे पाहिलं नाही.त्यानंतर स्टेट लेव्हल ( राज्य पातळीवर) स्विमिंगमध्ये सहभाग घ्यायचे ठरले मात्र तिथे गेल्यानंतर DSO (district sport officer) यांनी या स्पर्धेत कांचनमालाला सहभागी होण्यास नकार दिला.कारण ही अंध मुलगी नॉर्मल मुलांच्यासोबत कशी सहभागी होणार..? एखाद्यावेळी पाण्यात बुडाली म्हणजे..? ही त्यांना भीती.पण बाबांनी त्यांना बऱ्याच विनवण्या केल्या. त्यांना विश्वास दिला की, एकदा तिचा इव्हेंट पहा मग निर्णय घ्या...असे म्हटल्यावर आदल्या दिवशी त्यांनी कांचनमालाचा इव्हेंट पाहिला आणि मगच परवानगी दिली.. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्या स्पर्धेत कांचनमालाने नॉर्मल मुलांबरोबर तिसरा क्रमांक प्राप्त केला.आणि मग खऱ्या अर्थाने इथून स्विमिंग करिअर मधील मोठी स्वप्नं तिला खुणावू लागली..मिळालेल्या यशाने स्वप्नांच्याकडे भरारी घेण्यासाठी आत्मविश्वासाचे बळ दिले.
एका बाजूला अभ्यास तर दुसऱ्या बाजूला स्विमिंग खेळात करिअरची करण्याची ,जिद्द.सकाळी २ तास स्विमिंगचा सराव , त्यानंतर दिवसभर शाळा, शाळेतून घरी आल्यावर पुन्हा संध्याकाळी दोन तासाचा स्विमिंग सराव,शाळेचा अभ्यास आणि मग झोपणे असा दिनक्रम.म्हणजे एकीकडे स्विमिंगचा सराव सुरू असताना दुसरीकडे अभ्यासाकडेही ती तेवढेच लक्ष द्यायची.एकीकडे आपला खेळ तर दुसऱ्या बाजूला आपला अभ्यास या दोन्हीं गोष्टींना कांचनमाला न्याय देत होती.स्विमिंगचा सराव जोरदारपणे सुरू होता.प्रत्येक स्पर्धा ही कांचनमालासाठी घवघवीत यश मिळवून देत होती. जिल्हा..राज्य पातळीवरून आता राष्ट्रीय पातळीवर यशाच्या घौडदौडीने मजल मारलेली.वयाच्या ११ व्या वर्षी राष्ट्रीय पातळीवरील स्विमिंग स्पर्धेत भाग घेऊन तिने पहिलं नॅशनल मेडल घेतलं.राष्ट्रीय पातळीवर हा तिने पहिलाच विजय साकारला होता.त्यामुळे आतापर्यंत मिळालेल्या यशाने मनातील आत्मविश्वास वाढला होता..म्हणून आणखीन एक आव्हान पेलण्याचा, एक भव्य-दिव्य स्वप्न साकार करण्याचा निर्णय घेतला.तो म्हणजे समुद्र जलतरण 'सी स्विमिंग' अरबी समुद्रात पोहायचं.
समुद्रात पोहणं ही खरीच सोपी गोष्ट नव्हती.११ वर्षांचं कोवळं वय.समुद्रात पोहोण्याचा हा पहिलावहिला अनुभव असणार होता.पण मनात प्रखर जिद्द,प्रचंड आत्मविश्वास ठासून भरलेला. मूळचा अंधपणाही कुठे आड येणार नव्हता आणि ठरलं या यशाला गवसणी घालायची. सुरू झाली मेहनत त्या दिशेने.सरावासाठी पहिल्यांदा समुद्रात उतरल्यानंतर खुप भीती वाटायची.कारण या आगोदर तिला कधीच समुद्राच्या पाण्यात पोहण्याचा अनुभव नव्हता.त्यामुळे पहिल्यांदाच कांचनमाला समुद्राच्या पाण्यात उतरली तेंव्हा अक्षरशः ती जोरजोरात ओरडली होती.. कारण समुद्राच्या पाण्यात उतरण्याचा हा पहिलाच अनुभव होता...डोळ्यांनी काही दिसत नसल्यामुळे काहीच कळायचं नाही.पाण्यातील छोटे छोटे मासे.. कचरा अंगाला लागल्यानंतर आणखीनचं भीती वाढायची.. पण स्विमिंग प्रशिक्षक (कोच) आणि बाबां तिला धीर द्यायचे..कोचनी आपल्या हाताने समुद्रातील त्या वस्तू दाखवून तिच्या मनातील भीती कमी करायचा प्रयत्न केला.अशाप्रकारे सराव सुरू झाला.पहिल्यांदा दोन तासांचा सराव त्यानंतर पाच तासांवर आला.नॉनस्टॉप स्विमिंग करायचे होते.जिद्दीने प्रॅक्टिस सुरू होती.रात्री ८ वाजता पाण्यात उतरल्यावर बाहेर येण्यासाठी १२-१ वाजायचे..समुद्रात प्रॅक्टिस करताना पाण्यात मध्येच थांबून पाणी प्यायचा सराव करायचा.त्याचबरोबर सोबत असणारे बाबा आणि कोच लांबून कॅटबरी टाकायचे ती झेलून ते चॉकलेट खायचे..अर्धेअधिक खाली पडायचे. ही प्रॅक्टिस एवढ्यासाठी असायची की,समुद्रात पोहताना तोंड खारे होते.तसेच शरीरातील शुगरचे प्रमाण कमी होते त्यामुळे शरीरातील ग्लुकोजची गरज भरून काढण्यासाठी चॉकलेट खावे लागायचे.
१ मार्च २००२ ची अरबी समुद्रातील ती समुद्र जलतरण (सी-स्विमिंगची) ती स्पर्धा.वयाच्या ११ व्या वर्षी या स्पर्धेत कांचनमालाने सहभाग घेतला..एवढीशी चिमुकली पोर जिंकण्याच्या प्रबळ आत्मविश्वासाच्या जोरावर हे कडवे आव्हान घेऊन त्या अवाढव्य सागरावर स्वार झाली.त्या समुद्राच्या पाण्यावर.उसळत्या उमद्या लाटेसारखी पाण्याशी दोन हात करून ती सरसावू लागली पुढे पुढे.पाण्याची एकेक लाट आव्हान बनून तिच्यासमोर येत होती आणि तिला मागे सारून कांचनमाला पुढे जात होती..आणि अशावेळी संकटं समोर न येतील तरच नवल..अचानक एक संकट शेवटी उभं ठाकलंच..तिची कठोर परीक्षा घेण्यासाठीच एक लाट तिच्या दिशेनं आली. त्या लाटेत कांचनमाला पूर्णपणे अडकली...भिरभिरत्या भोवऱ्यात एखादी नाव अडकावी तस झालं..तिला पुढेही जाता येईना आणि मागेही जात येईना...कितीही हात पाय मारले तरी ती तिथेच तरंगायची आणि हात पाय मारायचे बंद केले की,मागे सरकायची...नाका तोंडात पाणी जात होतं..पाण्यात अंतराळी पाय..त्यामुळे बुडण्याची शक्यता अधिक होती..आता आपण बुडणार.. अशीच सगळी अवस्था.. चारी बाजूने लाटा संकट बनून आलेल्या..धीर खचला..काय करावं..? पाण्यावर तग धरून राहण्यासाठी जीवाचा आटापिटा सुरू झाला.जीव घुटमळला.ती आता रडायला लागली..आता नाही.. मला हे आव्हान पेलण शक्य नाही..मनात विचार आला की, सोडून द्यावं.. तसे तर काही अडचण आल्यास हात वर करण्यास सांगितले होते म्हणजे आपत्कालीन बोट सोबत होतीच..लगेच त्यांनी बोटेत घेतलं असतं...पण खरंच का आपण आता हार मानायची..? पण दुसरा एक सकारात्मक विचार मनात आला की, इथपर्यंत येण्यासाठी आपण किती मेहनत घेतलीय..माझ्या आईवडिलांनी माझ्या कुटुंबाने माझ्यासाठी किती मेहनत घेतलीय..आपण ज्यावेळी स्विमिंगला सुरुवात केली होती तेंव्हा लोक काय म्हणायचे..'एका अंध मुलीला स्विमिंगला घातल्याबद्दल लोकांनी आईवडिलांना मूर्खात काढलं होतं..लोकांची ती नकारात्मक प्रतिक्रिया तिला त्यावेळी आठवली..आणि मनानं पक्कं केलं की काही नाही आपण जर हरलो तर या सर्वांच्यावर पाणी फिरणार आहे पण आपण जर हे अंतर पूर्ण केलं तर असा एक विक्रम होईल की, जो आजपर्यंत कोणीच केला नाही.समुद्रात पोहुन एवढे अंतर पार करणारी आपण भारतातील पहिली महिला ठरू.आणि या विचारगतीने मनाला ऊर्जा मिळाली.सगळी शक्ती पणाला लावून ती पुन्हा नव्या तडफेने त्या उसळत्या सागरावर स्वार झाली.आणि जलदगतीने स्विमिंग करत ५ किलोमीटरचे अंतर १ तास १४ मिनिटांत तिने पूर्ण केले.अवघ्या ११ व्या वर्षी कांचनमलाने एक नवा इतिहास रचला.समुद्रात पोहून सात किलोमीटर अंतर पार करणारी भारतातील ती पहिली महिला ठरली.अवघ्या देशवासियांची हृदये या तिच्या पराक्रमाने भारावून गेली..या विजयाने एक नवी ओळख कांचनमालाला मिळाली..'भारताची जलकन्या.' कांचनमालाने केलेल्या या विक्रमाची लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.
इथून जी कांचनमालाने भरारी घेतली ती भव्यदिव्य अशी गरुड झेपच होती.त्याच्यानंतर कांचनमाला स्विमिंगच्या प्रत्येक कॉम्पिटेशनमध्ये सातत्याने जिंकत गेली.जे लोक सुरुवातीला 'ही आंधळी मुलगी स्विमिंग कशी शिकणार..?' असं म्हणणारे आणि आईवडिलांना मूर्खात काढणारे होते आता तेच तिला डोक्यावर घेत होते.म्हणजे बघा ना..! समाजात लोक कसे असतात,सुरुवातीला नुसत्या उणीवा शोधत राहायचं,आपल्यातल्या कमीपणाला सतत अधोरेखित करायचं पण कांचनमाला आणि तिच्या परिवाराने या लोकांकडे कधीच लक्ष दिले नाही..लक्ष दिलं असतं तर कदाचित त्या लोकांच्या मनासारखं झालं असतं..अशा लोकांकडे कधीच लक्ष द्यायचं नसतं.. आपलं लक्ष फक्त एकच स्वतःला सिद्ध करून दाखवणं... आपलं जे ध्येय ठरले आहे त्याचा पाठलाग करत राहणं.. आणि तेच कांचनमालाने केलं..स्वतःला सिद्ध करून दाखवलं. म्हणून तर काल तिला हिनवणारे लोक आज तिला डोक्यावर घेऊन मिरवायला लागले.तिचा जयजयकार करू लागले...म्हणतात ना.'कुछ किये बिना ही जयजयकार नहीं होती कोशिश करनेवालों की कभी हार नहीं होती'...या ओळींचा आता खऱ्या अर्थाने अनुभव येत होता.स्वतःला हरु न देता शेवटपर्यंत प्रयत्न करीत राहणं त्यातच यशाचं गम्य दडलेलं असतं.आणि हे गम्य तिला सापडलं होतं..एवढ्यावरतीच तिला थांबायचं नव्हतं..आता तिला आणखीन यशाची उंच उंच शिखरे खुणावत होती. त्याला गवसणी घालण्यासाठी प्रथमच कांचनमालाने देशाबाहेर पहिले पाऊल टाकले.
२००६ साली दहावीत असताना ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ गेमसाठी तिची निवड झाली.आणि झालं असं की १० वी ची परीक्षा सुरू होणार त्याच दिवशी ऑस्ट्रेलियाला जाण्याची फ्लाईट होती.पण परीक्षा नंतर देता येईल असा विचार करून ऑस्ट्रेलियाला जाण्याचा निर्णय घेतला.प्रथमच देशाबाहेर जाणार असल्याने आणि वय लहान व अंध असल्याने घरच्या एका व्यक्तीला सोबत जाण्यासाठी परवानगी मागितली पण ती नाकारण्यात आली त्याऐवजी.भारत सरकातर्फे ऑस्ट्रेलियाला जाताना कांचनमालाला लेडी एस्कॉर्ट म्हणजे केअर टेकर देण्यात आली..जी २४ तास तिच्यासोबत राहणार होती.ही पहिली आणि शेवटची लेडी एस्कॉर्ट यानंतर भारताबाहेर जाताना तिला एकटीलाच जावं लागलं.. पण हे तिच्यासाठी वरदान ठरलं.याचा तिला एक असा फायदा झाला की, कुठेही वावरण्याचा एक आत्मविश्वास तिच्यात निर्माण झाला. पहिल्यांदाचं कांचनमालाने यशाला गवसणी घालण्यासाठी भारताबाहेर झेप घेतली..ऑस्ट्रेलियातील मेलबर्न या ठिकाणी खेळल्या जाणाऱ्या कॉमनवेल्थ गेममध्ये भारतातून कांचनमाला ही एकमेव अंध मुलगी म्हणून सहभागी झाली होती.७१ देशांतील स्पर्धकांनी स्विमिंग कॉम्पिटेशनमध्ये सहभाग घेतला होता. सगळे स्पर्धक डोळस होते..फक्त आपल्या भारताची कांचनमाला ही एकटीच अंध मुलगी त्यांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरणार होती.अर्थात अंध असूनही एवढ्या मोठ्या जागतिक पातळीवर स्पर्धेत सहभागी होते आहे याचे तिच्या इतर स्पर्धकांबरोबर अनेकांना अप्रुप वाटत होतं..७१ स्पर्धकांसोबत कांचनमाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी तयार झाली पूर्ण जोमाने स्विमिंग कॉम्पिटेशनमध्ये उतरली. आणि जागतिक क्रमवारीत (world ranking) ६ व्या स्थानी आली.आतापर्यंत यशाची चव चाखली होती पण इथे मात्र अपयशाचा कडवटपणा वाट्याला आला होता..जिंकण्याची एक सवय लागली होती पण पहिल्यांदाच पराभवाने धक्का दिला होता.हे अपयश तिच्या मनाला चांगलेच जिव्हारी लागले. दुःखवेगाने अश्रूही कोसळले..पण अपयशाने खचून न जाता कांचनमालाने या अपयशाला गुरुस्थानी मानले..जीवनात काहीवेळा अपयशही यावं लागतं तेंव्हाच यशाची खरी किंमत कळते..पण या अपयशाने पुढच्या यशासाठी एक नवी ऊर्जा दिली..स्वतःमधील चुका,उणिवा शोधण्याची संधी दिली.आणि कांचनमाला पुन्हा नव्याने उभा राहिली.आणि त्याचवर्षी नोव्हेंबर २००६ साली मलेशियाला पॅराएशियन गेम होत्या त्यामध्ये तिला पुन्हा संधी मिळाली.कॉम्पिटेशनमध्ये कांचनमाला सहभागी झाली तिच्यासोबत चायनीज स्पर्धक होते.या इव्हेंटमध्ये शेवटपर्यंत भारताला एकही पदक मिळाले नव्हते..त्यामुळे साहजिकच तिच्याबद्दल संपूर्ण देशाच्या अपेक्षा उंचावल्या होत्या.देशवासीयांच्या अपेक्षांचं तिने टेन्शन कधीच घेतलं नाही उलट या अपेक्षा तिच्या कामगिरीसाठी तिला सकारात्मक ऊर्जा द्यायच्या...या कॉम्पिटेशनमध्ये भाग घेताना मनात एक विचार पक्का केला होता की, कोणत्याही परिस्थितीत भारताला गोल्ड मेडल जिंकून द्यायचं.. त्यासाठी 'करो या मरो' ची मनात जिद्द ठेवली होती..आदल्या रात्री एका मिनिटासाठीही ती झोपली नव्हती..मनात फक्त एकच ध्यास ही स्पर्धा आपणच जिंकायची...आणि कांचनमालाचा इव्हेंट सुरू झाला. तो इव्हेंट तिने इतका फास्ट मारला की, ज्यावेळी ते अंतर पूर्ण करून कांचनमाला थांबली त्यावेळी तिच्या तळपायातून आग आग होत होती..तिचे शरीर अक्षरशः एवढे थकले होते की,तिथून बाहेर यायचीसुद्धा ताकद तिच्यात राहिली नव्हती..दोन व्यक्तींनी तिला उचलून बाहेर घेतलं...शेवटी याचा परिणाम...? कांचनमालाने आपल्या भारताला स्विमिंगमधलं पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं.अभूतपूर्व यशाचा आणखीन एक इतिहास तिने रचला.
देशाचं प्रतिनिधित्व करताना एक अनुभव असा राहिला की,२००८ ला जर्मनी बर्लिनला ऑलम्पिकसाठी बिल्डप टोनामेंट होत्या.तिथल्या स्विमिंग इव्हेंटमध्ये एका ब्राझीलीयन कोचने कांचनमालाचा परफॉर्मन्स पाहिला आणि ते प्रभावित झाले.त्यांनी कांचनमालाला ऑफर दिली की, "तू आमच्या देशाकडून या खेळाचं प्रतिनिधित्व करशील का..? आम्हीं तुला आमच्या देशाचं नागरिकत्व देऊ..सर्व सोयीसुविधा देऊ.एवढंच नव्हे भारतातून येण्याचा विमानप्रवासाचा खर्चही आम्हीं देऊ.." पण कांचनमालाने ती ऑफर तिथेच नाकारली. काहीही असो पण मी माझ्या देशाकडून खेळणार आहे..मी फक्त माझ्याच देशाचं प्रतिनिधित्व करणार.आहे.म्हणजे एका खेळाडूच्या मनात आपल्या देशाविषयी किती मोठा स्वाभिमान असतो हे कांचनमालाच्या या उदाहरणातून कळते.
२००८ साली डिसेबल लोकांसाठी असणाऱ्या बिझिंग पॅराऑलम्पिकसाठी कांचनमालाची निवड झाली होती.कॉम्पिटेशनमध्ये कॉलीफायही झाली..इथेही या कॉम्पिटेशनमध्ये निवड होणारी ती पहिलीच भारतीय होती.म्हणजे एका अर्थानं कांचनमाला जिथे जिथे यश मिळवत होती तिथे पहिल्यावहिल्या विक्रमाची नोंद होत होती...पॅराऑलम्पिकसाठी निवड झाली इथपर्यंत सर्व ठीक असताना अचानक एका अडथळ्याने आशेची निराशा झाली.ती म्हणजे काही तांत्रिक बाबींमुळे या स्पर्धेत भारताला स्वीमरसाठी कोटाच मिळाला नाही. त्यामुळे भारतातून जलतरणपटू (स्वीमर) या..पॅराऑलम्पिकसाठी जाऊ शकणार नव्हते...अर्थात त्यामुळे कांचनमालाही या टोनामेंटमध्ये सहभागी होऊ शकणार नव्हती... ऑलम्पिक म्हणजे खेळाडूंची पंढरी समजली जाते.एखाद्या खेळाडूच्या दृष्टीने खेळात हार पत्करावी लागली तरी एवढं वाईट वाटत नाही पण आपली पात्रता असताना आपण खेळायला जाण्यासाठी सज्ज झालो असताना आपल्याला तिथे सिद्ध करण्याची संधी मिळू नये याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं..? आणि अशाप्रकारामुळे कांचनमाला मुळातून हादरली. आता पुढे काय करायचं तिला सुचेना..मनाचा समतोल ढासळला..विचारचं खुंटले. आणि ती डिप्रेशनमध्ये गेली.कांचनमालाच्या जीवनातला हा सर्वात वाईट काळ होता.. पॅराऑलम्पिकमध्ये आपण जाऊ शकत नाही..आता संपलं सगळं असंच सतत मनाला वाटू लागलं. ती गर्भगळीत झाली.आणि मनानं एक अविचारी निर्णय घेतला..तो म्हणजे आत्महत्येचा.जीवनच संपवण्याचा.
त्या रात्री आपल्या स्वतंत्र बेडरूममध्ये ती याच विचारात मश्गुल होती..मरायचं आहे तर मग मरण्याचा सोपा मार्ग म्हणून हाताची नस कापून मरायचं अस ठरवलं.त्यासाठी ब्लेडही जवळ घेतलं..ब्रेललिपीमध्ये एक सुसाईड नोट लिहिली.डोळ्यांतल्या कळीकाळाच्या अंधारात तिने कोवळेपणात आपली स्वप्नं रुजवली होती..ती साकारली, आकारालाही आणली होती.. पण कुठल्या एका अपयशाने ती स्वप्नं झाकोळून गेल्यासारखे झाले होते. सबंध जीवनाला काळाच्या पडद्याआड झाकण्याची मनाने तयारी केली होती.स्वयंप्रकाशित काजव्याने विझण्याचे ठरवले होते..? रात्रीचा एक वाजला होता.जीवन संपवून टाकायचं या विचारांच्या घोळात आतून एक सकारात्मक विचार अलगद मनात डोकावला.."अरे आपलं वय काय तर नुसतं १८ वर्षं... आणि आपण मरतोय...? माझ्यासमोर तर माझं अख्खं आयुष्य पडलंय... या ऑलम्पिकमध्ये जाता आलं नाही म्हणून का आपण एवढा टोकाचा निर्णय घ्यायचा..? आणखीन चार वर्षाने ऑलम्पिक येणार आहेचं की....का मग आपण असा निर्णय घ्यावा..? .इथपर्यंत येण्यासाठी माझ्या आईवडिलांनी आपण किती कष्ट घेतले आहे ते एका क्षणात वाया जाऊ द्यायचं का..?" आणि या अशा सकरात्मक विचाराने ती स्वतःला मालवू पाहणारी ती स्वयंप्रकाशित वात पुन्हा नव्या ऊर्जेने प्रकाशित झाली..मनातला काळोख दूर सारला.. निर्णय बदलला..आणि अखेर ती मरणाच्या दारातून वळून मागे आली.जवळची सुसाईड नोट फाडून टाकली..आणि एक ध्यास तिचा एक नवा श्वास बनला. खरं तर कांचनमाला सांगते की या वाईट काळात माझा खेळ माझ्यासोबत होता म्हणून मी वाचले..मी जे ही आहे ते माझ्या खेळामुळेच.. यावरून कळते की खेळाचं स्थान एका खेळाडूच्या आयुष्यात काय असतं.
२००१४ -१६ या काळात कांचनमाला आपल्या स्विमिंग करिअर पासून थोडी दूर राहिली दरम्यान.२०१६ ती विनोद देशमुख यांच्याशी विवाहबद्ध झाली.पण लग्नानंतरही स्वीमिंग प्रॅक्टिस सुरूच ठेवली होती. आणि मग पुन्हा तिने २०१६ ला कमबॅक केलं.२०१७ ला मेक्सिको येथे पॅराऑलम्पिक होणार होती.त्यासाठी ती कॉलिफायही झाली..आणि मग ती सज्ज झाली आणखीन एक नवा इतिहास रचण्यासाठी.. मेक्सिको येथे गेल्यानंतर तिथे श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होतो.तिथे पहिली अडचण आहे ती म्हणजे आपल्याकडील आणि तिकडील वेळेत जवळजवळ १२ तासांचा असणारा फरक . इकडे ज्यावेळी रात्र असते त्यावेळी तिकडे दिवस असतो..अशावेळी शरीरधर्माच्या सवयीप्रमाणे इकडच्यावेळेनुसार ठरलेल्या वेळी तिकडे झोप येत असे.त्यावेळी तिकडे तर दिवस सुरू असायचा...त्यामुळे सुरुवातीला शरीराची ही सवय मोडणे आवश्यक होते.. त्यासाठी कांचनमाला (भारतीय वेळेनुसार मध्यरात्री २ वाजता ) मेक्सिकोमधील वेळेनुसार दुपारी २ ला स्विमिंगच्या प्रॅक्टिससाठी पाण्यात उतरायची. फायनल इव्हेंटच्या आहे चार दिवस अगोदर तिने अशी प्रॅक्टिस केली.उद्या फायनल इव्हेंट आहे म्हटल्यावर ती आदल्या रात्री एका मिनिटांसाठीसुद्धा झोपली नाही..संपूर्ण अवधान फक्त नी फक्त आपल्या खेळावर..कारण संपूर्ण देशाच्या अपेक्षा तिच्यावर असायच्या..देशाच्या अपेक्षांचे कधी ओझे वाटले नाही..अपेक्षांचं कधी टेन्शन घेतलं नाही तर तर ते नेहमी सकारात्मक घेत गेली. उलट या देशवासियांच्या अपेक्षा तिला एक नेहमी सकारात्मक ऊर्जा देत राहिल्या...माझ्या देशाकडून जर माझ्याविषयी एवढ्या अपेक्षा असतील तर मला ही स्पर्धा जिंकलीच पाहिजे हा आत्मविश्वास त्या अपेक्षांमुळेच दुणावायचा.
६ तारखेला सकाळी तो इव्हेंट होता..कोणत्याही परिस्थितीत गोल्ड मेडल भारताला मिळवून द्यायचं त्यासाठी 'करो या मरो' हा निर्धार. हा निर्धार करूनच ती या स्विमिंग कॉम्पिटेशनमध्ये उतरली.सोबतीचे सगळे डोळस स्पर्धक होते. आणि झाली सुरुवात स्पर्धेला..कांचनमालाने प्रखर जिद्दीने सर्व शक्ती पणाला लावून तो इव्हेंट इतक्या ताकदीने मारला की,ज्यावेळी तिने इव्हेंट फिनिश केला.तिला धड श्वास घेता येत नव्हता..शरीरातील.ऑक्सिजन कमी झाला होता..तिला ओमीटिंग होत होत्या..चेहरा पांढरा पडला होता.तिच्या जवळ लगेच तिचे प्रशिक्षक आले..एवढा त्रास होऊनही कांचनमालाने त्यांना विचारले.."सर काय झालं..?" तेव्हा प्रशिक्षक म्हणाले .."तू पहिली नॉर्मल तर हो.." मग नॉर्मल झाल्यानंतर
प्रशिक्षकांनी तिला छातीशी कवटाळलं आणि सांगितलं.
"बेटा तू आपल्या देशाला गोल्ड मेडल दिलंयस.!"
बस..!!. 'याच साठी केला होता अटाहास.' ज्या साठी ही सगळी धडपड चालू होती... .कांचनमालाने भारताला ते पॅराऑलम्पिक जलतरणमधलं सुवर्णपदक मिळवून दिलं होतं.
हे यश झालेला आनंद तिच्यासाठी सर्वकाही होता...पण त्या क्षणाची आणखीन आठवण कांचनमाला सांगते की, इव्हेंट पूर्ण झाल्यानंतर तिच्या अवस्थेकडे पाहून तिचे प्रशिक्षक खूपच भावनिक झाले होते,ते तिला म्हणाले "कांचन तुझा चेहरा पांढरा पडलाय..तुला अगोदरपासूनचं श्वास घेण्यास त्रास होत होता.ऑक्सिजन कमी झाल्यामुळे तू सतत ओमेटिंग करत होतीस...या त्रासाची तुला अगोदर कल्पना होती..?"
"होय सर मला याची कल्पना होती पण मी या त्रासाकडे दुर्लक्ष केलं कारण मी माझ्या देशासाठी खेळते आहे अशावेळी या त्रासापेक्षा मी माझ्या खेळावरती संपूर्ण लक्ष केंद्रित केले..."
स्वतःला होणाऱ्या त्रासापेक्षा आपल्या देशासाठी समर्पित भावेनेनं झोकून देऊन खेळणं हेच खेळाडूंचं पहिलं कर्तव्य असतं. देशाला गोल्ड मेडल मिळाल्यानंतर जो आपल्या देशाचा तिरंगा तिथे उंचावतो..आपल्या राष्ट्रगीताची धून वाजते आणि त्या क्षणाला सर्वजण उभे राहतात तो सुवर्णमयी क्षणच आमच्या खेळाडूंच्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण असतो असे कांचनमाला सांगते.
वयाच्या १० व्या वर्षांपासून स्विमिंग करिअरला सुरुवात आणि आज हा भव्य दिव्य २० वर्षांचा यशस्वी कार्यकिर्दीचा विपुल असा प्रवास..डीस्ट्रिक लेव्हलपासून इंटरनॅशनल लेव्हलपर्यंत कॉमनवेल्थ, ऑलम्पिक, पॅराएशियन,पॅराऑलम्पिक अशा जागतिक पातळीवर स्पर्धामध्ये सहभागी होऊन १०० मीटर फ्री स्टाईल,१०० मीटर बॅक स्ट्रोक,१०० मीटर ब्रेक स्ट्रोक,२०० मीटर इंडिव्हिज्युअल असे परफॉर्मन्स देऊन वर्ल्ड चॅम्पियनचा बहूमान कांचलमानाने मिळविला..आजपर्यंत ऑस्ट्रेलिया, ब्राझील,चायना,जर्कि, डेन्मार्क, मलेशिया, मेक्सिको.अशा एकंदरीत १२ देशामध्ये तिने आपल्या खेळाचं प्रतिनिधित्व करून जळतर स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.आतापर्यंत तब्बल १२४ नॅशनल सुवर्णपदक आणि ११ इंटरनॅशनल सुवर्णपदक आणि ३ रजतपदक असा सुवर्णमयी बहुमान तिने प्राप्त केला आहे.ज्याची गणती करणे अशक्य आहे अशा अनेक पुरस्कारांनी कांचनमालाला सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकलव्य पुरस्कार तर भारत सरकारच्या वतीने उत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने सन्मानित केले आहे.
हे सर्व करत असताना स्विमिंगच्या करिअर सोबत तिने अभ्यासाकडेही तेवढेच लक्ष दिले.१० व १२ ती पहिल्या वर्गाने पास झाली.पदवी शिक्षणानंतर तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि इथेही प्रखर जिद्द,सचोटी आणि महत्वाकांक्षेच्या जोरावर (खेळातील कामगिरीमुळे नव्हे) तर स्पर्धा परीक्षेत यश मिळवून आज ती नागपूर येथील रिझर्व्ह बँकेत असिस्टंट मॅनेजर या पदावर कार्यरत आहे.सकाळी पाच वाजता कांचनमालाचा दिवस सुरू होतो. सकाळी व्यायाम,रोज सकाळी ३ तास स्विमिंग प्रॅक्टिस..त्यानंतर ऑफिस काम पुन्हा संध्याकाळी ३ तास स्विमिंग प्रॅक्टिस असा रोजचा तिचा पूर्ण व्यस्त दिनक्रम असतो आणि यामध्ये पती विनोद देशमुख यांची मोलाची साथ तिला लाभते आहे.
जन्मतः अंधत्व..पण त्या अंधत्वावर मात करून केवढं मोठं उदात्त कर्तृत्व सिद्ध करता येतं हे कांचनमालाने सिद्ध करून दाखवलं.दृष्टी तर सगळ्यांनाच आहे पण आभाळाला गवसणी घालण्याची महत्वाकांक्षा आणि सातासमुद्रापार झेप घेण्याची भरारी घेण्याचा दृष्टिकोन नाही कुणालाही साधता येत.डोळ्यातल्या काळोखाने कधीच तिच्या यशाची वाट रोखली नाही..पण उभारत्या काळात एक अंध मुलगी म्हणून ज्या लोकांनी तिला हिणवलं तिला भक्कम साथ देणाऱ्या बापाला मूर्खात काढलं त्याच लोकांच्या डोळ्यांत तिने आपल्या लखलखत्या यशाने झणझणीत अंजन घातलंय.कावळ्याच्या शापाने कधी गाय मरत नसते शेवटी तेच खरं...खरं तर कांचनमालाच्या या यशामध्ये तिच्या आईवडिलांचा-कुटुंबाचा प्रशिक्षक डॉ.प्रविण लामखेडे यांचा खूप मोठा वाटा आहेच पण खासकरून तिच्या बाबांचा सिहांचा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही.बाबा अगदी समर्थपणे तिच्या पाठीशी उभा राहीले...यशापयशाच्यावेळी जवळचा मित्र होऊन तिला धीर देत राहिले.प्रेरणेच बळ देत राहिले.
घरात पाच भावंडांमध्ये कांचनमाला व तिची अजून एक बहीण जन्मतः अंध निपजली पण कधीच कुणाकडून त्यांना वेगळी वागणूक मिळाली नाही. सर्वसामान्य मुलांप्रमाणे त्यांची जपणूक केली.लहानपणी कांचनमाला खूप खेळकर,खोडकर होती..कधी कधी अशा खोडकरपणामुळे तिने घरच्यांचा मारही खाल्लेला आहे. म्हणजेच काय तर दृष्टिविनाही तिचं लहानपण सर्वसामान्य मुलांप्रमाणे गेलं आहे.त्यामुळे अंधत्वाचा न्यूनगंड कधीच तिच्या मनात निर्माण झाला नाही.. पण समाजाची एक रीतच असते..कुठे तरी कमीपणा शोधायची.. आणि म्हणूनच सुरुवातीला ज्यावेळी कांचनमाला स्विमिंग शिकत होती त्यावेळी तिचं कौतुक करायचं सोडून लोक टीका करू लागले.. आज अंध अपंग लोकांच्यात इतकं टॅलेंट भरलेलं असतानाही समाजाचा अजूनही त्यांच्याकडे बघण्याचा संकुचित दृष्टिकोन बदलत नाही.. पण इथे मान्य करावं लागेल की,दृष्टी नसतानाही कांचनमालाने अशा लोकांचा हा दृष्टिकोन बदलायला भाग पाडलं.पण समाजाने अशा डिसेबल लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे त्यांना प्रेरणा दिली पाहिजे तरच अशा व्यक्ती पुढे येऊ शकतात.चांगल्या माणसांच्या तुलनेत अंध अपंग लोकांना १०% जास्त मेहनत करावी लागते तेंव्हा कुठे अशा यशापर्यंत पोहोचता येते त्यासाठी डिसेबल लोकांना उभं करण्यासाठी समाजाचं पाठबळ मिळणं जरुरीचे आहे असं कांचनमालाचे मत आहे.
एखादी गोष्ट करताना ती अगदी मनापासून केली पाहिजे कांचनमाला म्हणते,ज्या वेळी मी शरीराने पाण्यात असते त्यावेळी मनानेही पाण्यातच असते..म्हणजे आपण जे काम करतो त्या कामाशी आपण मनाने एकरूप असलं पाहिजे. कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही..त्यासाठी अपार मेहनत.. मनामध्ये प्रखर जिद्द ठेवून वाटचाल करावी लागते.एक अशी महत्वाकांक्षा उराशी बाळगावी लागते की, आपल्याकडून काही अभूतपूर्व घडवून आणू शकते.. आणि त्यातूनच मग घडतं एक असं उदंड कर्तृत्व..ज्याची कीर्ती जगभर पसरते...अखंड देशवासियांच्या हृदयात भरला जातो अभिमान..कोरलं जातं इतिहासाचं एक पान ..सुवर्णपदकांनी केला जातो बहुमान...मिळालेल्या आयुष्याचं सार्थक होतं...प्रत्येक क्षणांचं सोनं होतं...जसं आज आपल्या कर्तृत्वाने कांचनमालाने आयुष्याचं सोनं केलं. कांचनमालाचं हे नेत्रदीपक उदात्त उदंड असं कर्तृत्व आपल्यासाठी प्रेरणादायी तर आहेच.पण तिच्याकडून प्रामुख्याने हे शिकायला मिळतं
"हमारी हालतें, हमारी कमियां कोई मायने नहीं रखती ना कुछ कहीए|
कुछ पाना हैं कुछ कर दिखाना हैं तो हमारें हौसले बुलंद होने चाहिए |"
अंधत्वावर मात करत जागतिक पातळीवर गाजवलेल्या कर्तृत्वानं भारतमाताही आज कृत कृतार्थ झाली असेल.अशाच कर्तृत्ववान मुली घराघरांत जन्माला याव्यात. भारतमातेच्या या लाडक्या जलकन्येला मनापासून सलाम..आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा..
जय हो मंगल हो...
- किरण चव्हाण (कोल्हापूर)
८८०६७३७५२८.
जलतरण पटू सागर कन्या कांचन मालाच्या कर्तुत्व यशाचे 'दिव्य'अदुतीय आहे. तो इतिहास नाही, तो भूतकाळ नाही, तो वर्तमान नाही तर, ते एक मोठे भव्य दिव्य आहे. तिच्या यश कर्तुत्वाला कोटी कोटी शुभेच्छा! भारत माता की जय !
उत्तर द्याहटवासंग्रामसिंह मस्कर
जिल्हा उपाध्यक्ष कोल्हापूर
राष्ट्रीय मानवाधिकार रक्षक