फॉलोअर

बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकाच्या अनुषंगाने...


 विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकाच्या अनुषंगाने...

                         आजच्या शिक्षणक्षेत्रातील विदारक सत्य असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दि.२१ ऑक्टोबर २०२१ रोजी शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते पुणे शिक्षक मतदार संघाचे विद्यमान शिक्षक आमदार जयंत आसगावर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पार पडला.



                          आजच्या शिक्षणक्षेत्रातील विदारक सत्य असलेल्या 'विनाअनुदानित' ह्या ज्वलंत विषयावर आणि २० वर्षांपासून हक्काच्या अनुदानासाठी लढणाऱ्या,झगडणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकाच्या अनुषंगाने हा शब्दप्रपंच. खरं तर मी जरी एक विनाअनुदानित शिक्षक असलो तरी जेंव्हा एक माणूस म्हणून मी या प्रश्नाकडे पाहतो. त्यावेळीे मला प्रकर्षाने जाणवतं की, 'विनाअनुदानितचा संघर्ष हा एका विनाअनुदानित शिक्षकाचा संघर्ष नसून या व्यवस्थेकडे माणूस म्हणून जगण्याचा हक्क मागणाऱ्या एका माणसाचा तो संघर्ष आहे.' नेमका काय आहे हा संघर्ष..? काय आहे ही वेदना.? जाणून घेतलं तर निश्चितच इथल्या व्यवस्थेने समाजातील या घटकावर कशाप्रकारे अन्याय केला आहे. त्यांच्या जगण्याचा प्रश्न कसा अनुत्तरित आणि बळकट केला आहे हे कळून येतं.

                            २० वर्षांपासूनचा संघर्ष, ,१७० पेक्षा अधिक आंदोलने,शेकडो विनाअनुदानित शिक्षकांच्या आत्महत्या,विनावेतन निवृत्त झालेले आणि उद्याच्या आशेवर अजूनही उपाशी पोटी अविरतपणे ज्ञानदानाचं काम करणारे शिक्षक. प्रदीर्घ संघर्ष करूनही आज पदरात काय पडलं..? हा प्रश्न अनुत्तरितचं आहे.वर्तमानात कसं जगायचं आणि आपल्या कुटूंबाला कसं जगवायचं.? या दोन प्रश्नांशी लढत झगडत उद्याचं भविष्य आशेवर सोपवून दिलेलं आहे.

                   जळगांवचे किशोर पाटील विनाअनुदानित शिक्षक. गेली १३ वर्षे विनापगार आहेत,मंध्यतरीच्या काळात दोन्हीं किडन्या निकामी झाल्या.जिथे हातातोंडाची गाठ पडायची मुश्किल.अशावेळी उपचाराचा १०-१२ लाख रुपये खर्च कसा करणार.? अक्षरशः त्यांच्या विद्यार्थ्यांनी हातात झोळी घेऊन समाजात भीक मागून आपल्या गुरुसाठी निधी जमा केला.एक विनाअनुदानित शिक्षक भगिनी आहे.विनाअनुदानितच्या प्रश्नाने भरला संसार उध्वस्त होण्याची वेळ आली आहे.त्या दोघा पती-पत्नीत घटस्फोट होऊन आज विभक्त राहतात. विनापगार काम करताना आज लेकरांना दुकानातला साधा बिस्किटचा पुडा घेतानाही आम्हांला विचार करावा लागतो असं त्या म्हणतात. स्वातंत्र्यदिनी एक विनाअनुदानित शिक्षक आत्महत्या करतो तर कुठे बापाने बिनपगारी शिक्षक लेकाचे हाल बघवेनात म्हणून आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत,अहमदनगरच्या प्राध्यापक असलेल्या राम सोनवणे सरांचे आईवडील लेकाचा पगार कधी सुरू होईल या आशेवर जगताना झुरून मरून गेले. आजही १८ वर्षे झाली हा शिक्षक मुलगा  बिनपगारीचं.

                        अलीकडच्या कोरोनाच्या काळात तर या विनाअनुदानित शिक्षकांची झालेली दयनीय अवस्था शब्दांत व्यक्त करणंही कठीण आहे..एका कोरोनाने क्षणात कसं होत्याचं नव्हतं झालं हे एका विनाअनुदानित शिक्षकाची पत्नी हुंदके देऊन सांगते..१४ दिवस मृत्युशी झुंज देऊन अखेर कोरोनाने त्यांचे पती गेले.१७ वर्षे विनावेतन काम करून आता कुठे ४०% पगार खात्यावर जमा झाला होता.तो ही या कोरोनाने त्या शिक्षकाला बघू दिला नाही.आता कुठे संसाराला चांगली सुरुवात झाली असताना कोरोनाने अशा परिवाराला दृष्ट लावली.क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

                      विनाअनुदानित शिक्षक सुनील शेंडे सरांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वाला पगारासाठी २० वर्षांचा संघर्ष करावा लागतो.अशा कित्येक ज्ञानवंताची आजपर्यंत परवड व उपेक्षाचं होत राहिली.प्रमोद पाटलांच्या सारखा एक विनाअनुदानित शिक्षक असणारा माणूस म्हणतो "मी भाग्यवान आहे कारण मी विनाअनुदानित शिक्षक आहे." किती वेडा माणूस असेल हा..विनाअनुदानित शिक्षकाच्या कुळीत जन्माला आला हे भाग्य मानतोय..पण याचं खरं कारण काय ?.तर आज असंख्य विनाअनुदानित शिक्षकांच्या अडीअडचणी धावून जाणं, आपल्याकडून जे होईल ती मदत करणं,त्यांना शाब्दिक,मानसिक आधार देणं...या संघर्षाच्या वादळात विझू पाहणारी एखादी जरी प्राणज्योत आपल्या शब्दांच्या आडोशाने वाचली तरी मी धन्य झालो..ही एक आंतरिक तळमळीने हा माणूस अस म्हणतो.

                          २० वर्षांचा हा अतोनात संघर्ष झेलताना आज या विनाअनुदानित शिक्षकांची मानसिकता कशी असेल हा संशोधनाचा विषय आहे.नैराश्य, उदासीनता, उद्विग्नता,दबलेल्या,खचलेल्या मानसिक स्थितीने ग्रासून गेलेली अवस्था विनाअनुदानित शिक्षकांची आहे.आणि एवढं असूनही त्याचं कर्तव्य हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने वैयक्तिक पातळीवरच्या अडीअडचणी या कर्तव्यात कुठेही आड आणू देत नाही.भलेही त्याला कुपोषित जगावं लागत असले तरी आपल्या समस्यांवर मात करून आपल्या राष्ट्राची भावी पिढी सकस,पोषक आणि सदृढ बनवायची आहे ही जाणीव त्याला पदोपदी ठेवावी लागते.

                         एकूणच अशा गंभीरतेला गांभीर्याने जाणून घेऊन हा प्रश्न सोडवण्याची भूमिका शासनव्यवस्थेतल्या आजपर्यंतच्या माणसांनी घेतली नाही हे एक खूपच मोठं दुर्दैवचं. कारण प्रश्नांशी बांधिलकी जपणारी नेतृत्वशीलता काळाच्या ओघात मागे पडत आहे. ज्या प्रश्नांकरिता आपण निवडून देतो ती माणसे आज प्रश्नांपेक्षा स्वतःला मोठी समजायला लागलीत.त्यामुळे आपल्या राजकीय अस्तित्वासाठी त्या प्रश्नांची पूर्णपणे सोडवणूक न करता  प्रश्न अनुत्तरित ठेवायचा हा राजकीय स्वार्थ ही याला कारणीभूत आहे.पण आमचे विनाअनुदानित शिक्षक बंधू भगिनी आपली जिद्द न हारता चिकाटीने आजही आपल्या हक्काच्या अनुदानासाठी मैदानावरचा लढा कायम ठेवून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.निर्ढावलेल्या व्यवस्थेला लोकशाहीच्या मार्गाने जाग आणण्याचं काम सुरूच आहे.

                विनाअनुदानितच्या ह्या भळभळत्या जखमेला शब्दरूपात मांडताना त्यातील वेदनेचा तळ गाठणं किती कठीण आहे.याची मला वेळोवेळी जाणीव होत गेली.कारण ह्या वेदनेची सखोलताचं इतकी आहे की,त्याचा अंतच लागत नाही.. विनाअनुदानित संघर्षाच्या वेदनेची व्याप्ती आणि जखमेची खोली इतकी व्यापक आहे की त्याच्या शोधात असताना त्याचा काही अंशचं मला शब्दरूपाने पुस्तकात मांडता आला. अजून बरंच काही मांडायचं राहून गेलं हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो.मी या प्रश्नाकडे पाहताना आणि आज पुस्तकारूपाने मांडूनही आज मनातून अपुरेपणाच्या भावनेने अस्वस्थ आणि असमाधानी आहे.

               एकंदरीतचं  २० वर्षांपासूनच्या या धगधगत्या संघर्षाची वाटचाल,त्याचे परिणाम यांचा लेखाजोखा पुस्तकरूपाने मांडताना ही विनाअनुदानितची संघर्षगाथा समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पुस्तकरूपाने पोहोचावी.या वेदनेला समाजाच्या संवेदनेची जोड मिळावी.दुभंगलेल्या, खचलेल्या मनाला समाजनाचा आधार मिळावा.त्यांचा आकांत,आर्जव या समाजानेही ऐकून घेऊन या नकारात्मकतेवर विविध घटकांतून, क्षेत्रातून एक सकारात्मक संवाद घडावा अशी अपेक्षा आहे.कारण माझा विश्वास आहे की,आपल्या जगण्यासोबत इतरांचं जगणं समृद्ध व्हावं.अधिकाधिक सुंदर व्हावं यासाठी धडपडणारी दुःखावर फुंकर घालून मोडलेल्या माणसांना उभं करणारी समाजात माणसं आहेत.या चांगुलपणापर्यंत ही वेदना पोहोचली तर नक्कीच विनाअनुदानित संघर्षाच्या, दुःखाच्याप्रती समाजाची सहानुभूती अधिक बळकट होऊन यातून उमटणाऱ्या ज्या क्रिया प्रतिक्रिया आहेत.त्या या प्रश्नाला अधिक धारदार बनवतील आणि अन्यायाच्या विरोधात न्याय देण्यासाठी महत्वाच्या ठरतील. म्हणून मी अधिक आशा ठेवून आहे की समाजात चांगुलपणा जपणाऱ्या माणसांची अन्यायाच्या विरोधातली जरब आणि धाक निर्ढावलेल्या व्यवस्थेतील स्वार्थी,असंवेदनशील माणसांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय हे परिवर्तन शक्य नाही. विनाअनुदानितचा प्रश्न खरोखरच पूर्णपणे मिटवायचा असेल आणि विनाअनुदानितच्या संघर्षाला पूर्णविराम द्यायचा असेल तर राजकीय इच्छाशक्ती आणि  व्यवस्थेतील माणसांची सकारात्मकता शेवटी महत्वाची आहे.

                 

             - किरण चव्हाण.

               ८८०६७३७५२८.





पुस्तकासाठी संपर्क 

किरण चव्हाण.

मोबा/गुगल/फोन पे - ८८०६७३७५२८.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...