नदीवरचा देव
एखाद्या बाईला कुठला त्रास आसला,लागीर लागलंय,अंगात येतंय असं काही झालं की तिला देवरश्याकडं नेलं जायचं. देवरशी मग त्या बाईला समोर बसवून सगळी चौकशी करायचा, काही प्रश्न विचारायचा. आणि मग अंगात काहीतरी संचारल्यासारखं सांगायचा, "हिच्या म्हायाराकडंनं त्रास हाय बघा.नदीवरचं दाखवतंय.यंदाला नव्या पाण्याला थोरल्या दिवाळीच्या आमावस्याला नदीवरच्या सातीआसरा करायला पायजे.तवा कुठं सरळ लागल." नदीवरच्या सातीआसरा म्हणजे जलदेवता. त्यांना शांत करायचा उपाय देवरशी सांगायचा.
आमच्या गावांतही असं देवरसपण बघणारा एक देवरशी व्हता.गावाच्या दक्षिणेला हमरस्त्याच्या खालच्या बगलला त्याचं घरं. त्यांची एक स्वतंत्र खोली होती.त्या खोलीत अनेक देवांनी गजबजून गेलेला भव्य गाभारा होता. एका कोपऱ्यात मोराची पिसं. त्या देव्हाऱ्याच्या बाजूला बसून देवरशीबुवा येणाऱ्या भक्ताच्या समस्या जाणून घेऊन निर्वाळा करायचे.एकदा असंच मी आमच्या भावकीतल्या दादाबरोबर त्यांच्या घरी गेलो होतो. आणि देवरशी बुवांच्या या खोलीत आलो.तिथं एका बाईला भूत लागलं म्हणून आणलेली.बराच उशीर ती घुमत होती.आणि अचानक ती बाई एकाएकी अशी काय किचाळली की, मी टाणक्यांन उडालोच.! तितनं त्येंची जेवण खोली कधी गाठली ते माझं मलाचं कळालं नाही.डोळ गच्च मिटलेलं.डोळ्यासमोर काळतांबडं दिसाय लागल्यालं..ज्याम घाबरलेलो..तवापासून तिथं जायचं धाडस व्हायचं नाही.
नदीवरच्या सातीआसरा करायच्या याला 'नदीवरचं' किंवा 'अंगावरचं' असा म्हणण्याचा प्रघात गावाकडं आहे.नदीवरचा देव करायचा म्हटलं की म्हायाराकडं येताना बाईसोबत तिचा नवरा नाही तर सासरा येत असे. येताना बाजारातून लागणारा सगळा बाजारहाट घेऊनचं यायचं. एक कोंबडा,काळी तलंग,परडी झुटींगचं सामान,नारळ, केळं,लिंबू खारका,हिरवी काकणं, घोंगड्याचा धडपा गुंडाळलेला टोणा,अगरबत्तीचं झाडं असं कायबाय बारीक मोठा बाजार उरकून पावणा माघारणीला घेऊन उन्हाचा रक व्हायला घरात हजर व्हायचा.आणि मग तिथून पुढं सगळी तयारी सुरू. दुपारच्यालाचं चुल पेटली जात असे.ढणढणीत पेटलेल्या चुलीवर घरात बायकांची जेवण करायची धांदल सुरू होत असे.नदीवरच्या देवाला सात मापट्याचा नाही तर सात चिपट्याचा कट ठरलेला असयचा..सात मापट्याचा कट म्हणजे सात मापटी तांदूळ आणि सात चिपट्याचा म्हणजे साडेतीन मापटी तांदूळ शिजवायचं. गव्हाच्या पिठाच्या सात लाटूऱ्या,सात दिव-मुटकं करायचं. आणि मग गल्ली घरातली जेवढी माणसं सांगितलीत तेवढं चपातीचं कडाप.बाजारातनं आणल्याला पायाला नाडी बांधल्याला कोंबडा तलंग एका बुट्टीखाली झापल्याला असायचा. बारकी पोरं ऱ्हा ऱ्हावुन नुसती त्या बुट्टीच्या जवळ जाऊन उघडून बघायचीत. "आरं ये उघडू नकासा गप बाहेर खेळा जावा की ..." अशी मोठी माणसं दटावायची. पण उघडू नको म्हटलं तरी कार्टी ती उघडून बघायचीचं.
सगळ्या गल्लीला अगोदर सांगितल्याल असायचंच पण सहजच वाटत गाठ पडल त्येला बोलायचं "रात्री जेवायला गा नदीवर..." किणीट पडायला नदीवर जायाची सगळी जोडणी सुरू व्हायची.आता उजेडाला बॅटऱ्या त्येनं हाईत पण त्यायेळला पयलं कंदील आणि मग नंतर बत्ती आली. बत्तीवाल्याला सगळ्यात आदी सांगितलं जायचं. कारण दुसरा कुणीतरी सांगून जायचा म्हणून खास त्याच्या घरला जाऊन सांगायचं "रात्री नदीवर बत्ती आणि जेवायला तुमीबी यायचं " त्याला गेळाभर रॉकेल न्हेउन द्यायला लागायचं.बत्तीत रॉकेल घालून तो बत्ती द्यायचा.बत्ती आणली की, बारक्या पोराला दुकानला पाठवून मेंटल आणायला लावायचं.त्ये शेंबूड वडतचं पळत पळत जायचं आणि एका हातातनं मेंटल घेऊन यायचं..त्यातला हुशार माणूस मग सोप्याला बसून बत्तीला मेंटल लावायचा. तिला पेटवायलाचं बराच वकोत जायचा. बारकी पोरं बत्तीच्या भोवतीनं घुपळा करून भूत बघितल्यासारख तिला कसं पेटवत्यात ते बघायचीत. उभ्या काचेचा गोलाकार कंडा. त्याच्यातल्या दोनचार काचा निघळून पडलेल्या असायच्या.त्यातनं पाखरं आत जायची, जळून मरून पडायची... मेंटल फुलत नाही तोवर बत्तीला हवा मारायची..एकदा का बत्ती सवन पेटली की, मग बाकीची जोडणी करायची.लाकडाच्या भाऱ्यातनं जेवणाला लागत्यात तेवढी लाकडं उपसून लाकडाचा कवळा तुरकाट्या असा बिंडा बांधून ठेवल्याला असायचा.
ज्या बाईच्या अंगावरचं करायचं तिला पूर्वला पुढा करून बसायला लावायची. तिच्या आंगावनं पायल्यांदा भाताची दुरडी उतरायची त्या दुरडीवर चपत्यांची थप्पी लावल्याली असायची.ती उतरून जबाबदार माणसाच्या हातात द्यायची कारण तिला परत खाली ठेवायची नाही. मग कोंबडा आणि तलंग उतरून घ्यायची..कोंबडा तलंग घ्यायला तर एकावरनं एक पोरं पुढं सरसायची. जेवणाची भांडी,रस्याचं डेचकं एकांन घ्यायचं त्या डेचक्यात डाव,वाट्या बारीक भांडी भरल्याली असायची. पाण्याची घागर एकाकडं,लाकडाचा बिंडा घ्यायला सहसा कुणी तयार व्हायचं नाही. मग कोण सांग काम्या हो नाम्या गरीब मनाचा साधा भोळा त्याच्याकडं ते काम..असा सगळा लवाजमा सामानसुमान घेऊन नदीच्या वाटला लागायचा. रात्र नुकतीच अवतरलेली असायची.
बत्तीच्या उजेडात माणसं नदीच्या दिशेनं जायाची. मधी बत्ती आणि भोवतीनं माणसं.कुठल्या तरी एका पोराच्या हातात कोंबड दुसऱ्या पोराच्या हातात तलंग असायची.त्यावेळी आम्हांला कोंबडं नी तलंग घ्यायची लई हौस वाटायची. जाता जाता त्यासनी पोटाशेजारी दाबून धरायचं, त्यांचं आंग ऊबदार लागायचं. ते बी शांत बिलगून बसायचं..उगाचच त्यांच्या पाठीवरन हात फिरवायच लाड करू वाटायचं. मनात यायचं आता नदीवर गेलं की ह्यासनी कापणार मग त्यास्नी कसं व्हईल ?त्यांचा जीव कुठं जाईल ? अस विचार बालमनात यायचं.आणि नंतर त्यांच्यावर ताव मारताना मात्र हे ध्यानात ना मनात.सगळं विसरून गेलेलं असायचं.जाताना थोरली माणसं म्हणायची."पोरा कोंबडं सळ पक्कड नाही तर घोळ व्हईल." एकदा म्हणं असं झालं.... नदीकडं जाताना पोराच्या हातातन एकाएकी कोंबडं सुटलं पायाला बांधल्याली नाडी कवा अगोदरच ढिली झाली व्हती.कोंबड जसं रस्ताला लागलं तसं ते सरळ पळतच सुटलं तेच्या मागणं पाच सहा जण धरायला. आता गावतय व्हय हाताला ? गडयानी खूप आटापिटा केला खरं कोंबड काय तावडीत गावना..या कुपावरनं त्या कुपावर करत करत कोंबडं पार कुठल्या कुठं. झाली का पंचाईत आकिरला गावातल्या एका कोंबड्या विकणाऱ्या बाईकडनं नवीन कोंबडं विकत आणायची पाळी आली.आसला हा सगळा घोळ.
देव करायला आलेल्या माणसांनी नदीच्या दोन्हीं आंगचा काठ फुलून गेल्याला असायचा.काळ्यामिट अंधारात सगळीकडे तांबड्या भडक पेटत्याल्या चुली.चाटचाट जळत्याला,लाकडं फुरफुरत्याला आवाज.भवतीन माणसांची गर्दी नुसती जत्रा भरल्यासारखी वाटायची. नदीवर आलं की गारठा जास्त जाणवायचा. नदीवर गेल की,चुल कुठं मांडायची या अंगाला काय त्या अंगाला इथनं सुरवात..कोण म्हणायचं, "नाही हीतं सपय जागा हीतच मांडुया." तवर कोण म्हणायचं, "आगा तिथं चला तिथंन पाणी आणलाय बरं पडतय.."
सर्वानुमते एकदाशी जागा ठरली की,सगळं सामान सुमान त्या जाग्याला उतरायचं... तीन दगडांची चूल मांडायची आजूबाजूचा पालापाचोळा, नारळाच्या शेंड्या चुलीत कोंबून चूल पेटवायची.चुलीवर डेचकं ठेवायचं.तवर एकजण नदीतन पाणी आणून डेचक्यात वततो. इकडं पाणी हळूहळू तापायला सुरुवात होते. काहीजण मग नदीच्या काठाला जातात.काठावरचं गुंड बघून सात दगड घ्यायचं ते पाण्यानं धुवायचं.एका सपय जाग्याला खाऊची सात पानं मांडून त्यावर ते दगड ठेवायचे.या म्हणायच्या सातीआसरा.आणि त्याच्या बाजूला आठवा निराळा दगड त्यो म्हणायचा झुटींग. या झुटींगसमोर संग आणलेला कोंबडा पहिल्यांदा कापायचा आम्हांला त्यावेळी हे बघायचं औत्सुक्य असायचं. त्यामुळें आम्हीं त्या माणसांच्या मागणचं असायचो..पायात दोन्हीं पखं एक करून त्याच्यावर पाय ठेऊन त्याच्या उघड्या चोचीत थोडं पाणी घालतात आणि सारदिश्यान गळ्यावरनं खुरपं वडलं की धडापासून मुंडकं वेगळं. चोच उघडझाप करत्याल मुंडकं समोर ठेवायचं कोंबड्याची पख फाडफाड व्हईत असायची.मुंडकं नसलेल्या मानंच्या गड्ड्यातनं लालभडक रक्ताच्या चिळकांड्या बाहेर पडायच्या. हळूहळू ते गपगार व्हायचं... नंतर तलंगचीबी तीच तऱ्हा.नदीतलं गोटं ताज्या रक्तानं रंगून जायाचं.रक्तानं शिपल्याल खुरपं एका हातात आणि पायाला धरून उलटं केल्याली कोंबडा नी तलंग मुंडक्यासहित घेऊन लोक वर यायचे.
चुलीवरचं पाण्याचं डेचकं खाली उतरून आता उघड्या जाळावर त्यास्नी भाजायचं.पख जळताना खरपूस चिरमाट वास नाकाला यायचा. नदीच्या काठाला गारठा जोरात जाणवायचा.त्यामुळं जो तो चुलीला ढुंगाण लावून कुठं कांदा चिर..मटण चिर,कोण बाजूच्या काटक्या मोडून चुलीत घाल अशा निमतानं चूल धरायचा. चुलीत कोंबडयाची मुंडकी भाजायला टाकायची. प्रत्येकाची काय ना काय काम ठरलेली असायची. रिकामी हाईत ती जायाची, फिरून यायची. कुठं याच्या चुलीला बस कुठं त्याच्या, तवर कोण आड्यावर जाऊन यायचा.कोण पलीकडच्या कापडयाच्या हॉटेलातलं फुटांण आणून रस्त्याकडला थंडीचं उगच दातांन कडूम कुडुंम करीत खायाचा.कुणाला तोपर्यंत परसाकडंचं व्हायचं. तोपर्यंत कुणाला खेकडी पकडायची लहर यायची. कुणाचं काय तर कुणाचं काय..? पण एक.काम करायला मागं आणि खायाला पुढं अशांची संख्या जास्तच.
परडी भरायचं काम जाणत्या थोरल्या किंवा म्हाताऱ्या माणसांकड असायचं. आमच्या वेळी आमचा किसनुआज्जा सपय जाग्याला बसून साती आसराची परडी भरायचा.परडीत तळाला भात घालून त्येजावर नारळ,नारळावर हिरवी काकणं, हळद कुंकू, भोवतीनं सात गव्हाच्या पिठाच्या लाटूऱ्या,त्यावर दिव-मुटकं,सात केळं,सात लिंबू ,सात खारका हे सगळं घालून झालं की,वाती लावायच्या....एक वर्षी म्हणं अशीचं परडी भरायला पांच जण,पाचीजणांनी दारू पिलेली."आगा नको तुम्ही परडी भरताव आम्हीं." बाकीची लोकं सांगित व्हते हां. पण कुणाचं ऐकतील तर खरं. परडी आम्हींचं भरणार हा त्यांचा हेका.कशीतरी परडी भरून झाली त्यावर दिवमुटक ठेवलं आता वाटी पेटवायच्या. काड्यापेटी घेतली..पण काडी वडली की वाऱ्यानं इजायची.काडी वडली की इजली...मग एकानं म्हणायचं, "आसं पेटवत्यात व्हय आन इकडं." पण त्यानं काडी वडली की इजली...दुसऱ्यानं म्हणायचं, "काय तू शाना काडी पेटवायची कशी आण इकडं दावतो"...त्यानं बी वडली की इजली. मग तिसऱ्यानं म्हणायचं "तुम्हीं दोघबी खूळ हाईसा आणा इकडं." त्यानं वडली की ती पण इजली. असा पाचजणांच्यात ह्यो खेळ सुरू झाला.पाच जणांच्यात फिरून फिरून शेवटी काड्यापेटीचं सपली पण वाती काय पेटल्या नाहीत. शेवटी थंडगार दिव्याची परडी पाच जणांनी उचलली. परडी हालत डुलत चालली नदीकडं.
परडी भरायचं काम किसनुआज्जा बयाजवार करायचा.परडी भरली की,घरच्या मालकानं ती घेऊन नदीत सोडायला जायचं त्यावेळी त्याच्या भवतीन आम्हां पोरांचा घोळका असायचा.परडीतला नारळ कोण घेतंय याच्यासाठी ईर्षा लागायची..थोराड दांडग पोरगं पुढं पुढं करायचं...बारकी चिलीपिली केळं गावतील यासाठी धडपडायची. पाण्यात घुसलं की गार गारगीट पाणी ढेंगतनं वर चढायचं.वळवळ करत एखादा साप वर शिरावा तसं गार पाणी ढेंगतनं वर चड्डीत घुसायचं.थंडीनं काकडून जायला व्हायचं.परडी सोडून हात जोडपर्यंत पोरांना दम निघायचा नाही. परडी सोडायला लागलीच पोरं त्या परडीवर झडप घालायची.पेटत्याल दिव पाण्यात बुडवून इझुन जायाचं.परडीचा पोरांच्या धुमडीत कुस्कुरा व्हायचा. कुणा पोराच्या हाताला मग नारळ,कुणाच्या हाताला केळं तर कुणाच्या हाताला लिंबू गावायचं. त्या गार पाण्यातन सगळं घेऊन बाहेर यायचं. अंगावरच्या कपड्यांचा वल्लाचिखोल झाल्याला असायचा. ज्याला नारळ गावलाय त्याला इतका आनंद व्हायचा की जणू कोळ्यांनी सोडलेला सोन्याचा नारळ गावल्यासारा त्याच्या चेहऱ्यावर आविर्भाव असायचा. एकजागी बसून दगडाने नारळ फोडायचा आणि मग खोबरं पोरांच्यात वाटून खायचं. कुणाला केळं गावल्याली असायची केळं खायची.कुणाला लिंबू गावल्याल असायचं ते चड्डीच्या खिशात कोंबायच.जेवणाच्या वक्ती उपयोगाला यायचं.
तोपर्यंत इकडं चुलीवर रस्याला उकळी आल्याली असायची.खायच्या दमदार जाळानं रस्सा डेचक्यात आतल्याआत गदादा हालायचा.उकळीला टाप यायची.तांबडाभडक रस्सा तयार झालेला असायचा. वाटीत एक चुरा, नकाडा रस्सा घेऊन आचारी घुटका घित चटणी मीठ हाय का व्यवस्थित बघायचा.सगळा मेकप झालाय म्हटल्यावर रस्सा खाली उतरला जायचा. रस्सा तयार झाला की कुणीतरी सांगायचं
"जावा रं निवद दाखवून या जावा.."
तवा निवदाला म्हणून मुंडक्याची आठवण व्हायची. मघाशी इंगळात मुंडकी भाजायला टाकल्याली असायची.ती शोधताना गावायची नाहीत.तिथंच ढुंगण लावून बसलेला इसम उगाच कटकीन इस्तू हालवून म्हणायचा,"आगा इथंच व्हती गेली कुठं..?"
दुसरा म्हणायचं "आता तूच मगाशी भाजत व्हतास जातील कुठं.."
"नाही गा मी इथं मी काढून इथंच ठेवली व्हती दगडावर."
"आसू दे घे आता."
तळं राखील तो पाणी चाखील दुसरं काय..?
घरचा मालक मग कटाची दुरडी घेऊन मगाच्या साती आसरा पूजल्याला जाग्याला येतो आणि मग पुजलेल्या सातीआसऱ्याला शाकाहारी निवद म्हणजे दुरडीचा निवद दाखवायचा.आणि बाजूच्या झुटींगला मांसाहारी निवद म्हणजे मटणाचा निवद.एका इस्तारीवर रस्सा सोडलेला पांढरा भात,बाजूला मटणाच्या ठेवलेल्या दोन चार फोडी,भाजलेली मुंडकी,उकडलेल्यालं अंडं,चिरमुर फुटाणं असा एकंदरीत त्याचा निवद. झुटींगच्यासमोर घोंगड्याचं धडपा जोडलेला खूळ खूळ वाजत्याला टोणा,अगरबत्तीचं झाड ठेवलं जायचं .निवद दावून लोक वर यायची.
निवद दाखवून आलं की मांडीला मांडी घासून पंगत बसायची.यात दोन शाकाहारी माणसं ठरलेली असायची. सगळ्या मांसाहार खाणाऱ्या लोकांत ही दोन माणसं पावण्यागत वाटायची.मांसाहार खाणं नाही काय नाही घरात गपगार जेऊन झोपायचं सोडून असल्या मरणाच्या थंडीत मिळमिळीत भात आमटी खायाला नदीवर यायची यास्नी कसली हौस कुणास ठाऊक. आताच्या सारख्या त्यावेळी प्लॅस्टिक वाट्या, कागदी पत्रावळ्या नव्हत्या. जेवायला बसताना रस्याला कुणी वाटका घ्यायचा,कोणी खोगला तर कोण बेल्ट घेऊन बसायचा.जागा तरी सपय नसायचीच. खायन मांडीला बारीक मोठं खडं बोचायचं. मधी बत्ती ठेवली जायची. सगळयापुढं इस्ताऱ्या मांडल्या जायच्या.मग पयल्यांदा दुरडीतल्या भाताच्या थप्पीला हात घातला जायचा.वाढणारा पाची बोटं त्यात रुतवून हातात जेवढा येईल तेवढा भाताचा गटका इस्तारीवर ठेवायचा.सगळ्याचा जीव मात्र रस्याच्या डेचक्यात आडीकल्याला असायचा. कुणीतरी डावंन मटणाचं दोन दोन चुरं, भाताच्या काठाला ठेवायचं.ते फक्त दोन दोनचं वाटणीला यायचं. माप वाटायचं 'धा' यावं.पण कोंबड्या दोन आणि माणसं वीस. कुणाला म्हणून पुरणार. नंतर वाटीत रस्सा वाढला जायचा..वाफाळलेला तांबडा भडक रस्सा बघून मन हारखून जायचं.
एक वर्षी म्हण आमच्या गल्लीतला देव व्हता. माणसं जेवायला बसली रस्सा वाढला.पायल्यांदा म्हण माग बघून पयला घास टाकायचा. तस आमचा तात्या मागं वळून घास टाकायला पुढं बेडकीन मारली उडी रस्यात. रस्सा इदाळला बेडकी गेली तळाला.तात्या सरळ झाला तवा त्येला संशय आल्याला,काय तरी भानगड झालीय.
त्यो आण्णाला म्हणाला. "आगा आण्णा रस्यात काय तरी पडल्यासारख वाटतंय.तळाला काळबी दिसतंय."
आण्णा म्हणाला "आर काय नाही खा गप..मटणाचा तुकडा आसलं.."
पण इकडं तात्यांचा संशय अधिकच बाळावलेला.. त्यो बारीक नजरेनं निरखून बघत होता. तोपर्यंत बाकीच्याचं झुरक ऐकू येत व्हतं.बाकीच्यांची तोंडाला रस्याच्या वाट्या पण माझ्याच वाट्याला काय म्हणायचं ह्ये. असं मनातल्या मनात तात्या कळवळला . वाटीत अजिबात तुकडा बुडवू वाटना.. तोपर्यंत ताटलेली बेडकी फुगून आली की वरती.रस्यावर मस्तपैकी तरंगायला लागली.तात्याचा संशय खरा ठरला. "रस्सा प्यालो असतो तर..?" यावर तात्या आता विचार करू लागला. बाकीची माणसं रस्यात बुडालेलं दात बाहेर काढून हसत व्हती. असली सगळी गंमत.
रस्सा वाटीत आला की पहिला झुरका मारायचा.आणि मग बाकीची सुरवात..कुणीतरी मधन जेवण बनवणाऱ्याला दाद द्यायचा." एक नंबर..रस्सा लई झ्याक झालाय बघ." दारू पिऊन रस्सा प्यायला बसलेल्यांची तऱ्हा बघण्यासारखी असायची. झिंगत पेंगत रस्सा वढायची. रस्सा पिताना कुणी नाक गाळत..कुणाच्या नाकावर घाम गळत,कुणी टावलानं घाम पुसत..वाटीवर वाटी दणकून रस्सा प्यायचा.रस्याच्या झुरक्याचा फुरफर आवाज कानी पडायचा. रस्सा पिण्यातबी एक ईर्षा असायची. स्वतः कमी प्यायची पण दुसऱ्याला जास्त पिण्यासाठी प्रेरणा द्यायची. जसा सगळीकडं कोल्हापूरी झणझणीत तांबडा पांढरा रस्सा फेमस तसा आमच्याकडं फेमस नदीवरचा हा रस्सा. काय बी म्हणा या रस्याची चव ती न्यारीच.
चपाती खाऊन झाली की,भाताचं आळं करायचं त्यात रस्सा वतायचा. भाताच्या तळातनं रस्सा घसरतीला पळायचा.चुकून कधी कधी शेजाऱ्याच्या मांडीखाली शिरायचा.अगदी यथेच्छ पुरेपूर ताव मारून माणसं एकेक करून उठायची. खरकाट्या हातानं खरकाटी इस्तारी उचलायची आणि शेजारच्या कुपाजवळ नाही तर घुसपाजवळ टाकायची. दोन चार कुत्री त्या इस्ताऱ्यास्नी झटत असायची. एक वर्षी तर आमचा नामुदा त्यावेळी जादाच पिला व्हता.झिंगतचं जेवला पंक्तीतन उठला आणि तसाच खरकाटा हात घेऊन घरला गेला.
वाढणारी माणसं शेवटीला बसायची.मग जेवल्याली माणसं त्यासनी वाढायची.बाकीची इकडं उरल्याली लाकडं चुलीत घालून मोठा धग करायचीत. मागणं पुढणं शेकायचं.कुणी दातात काडी घालून उगाचचं डीवचायचं.चेष्टा मस्करी चालायची.. कोण कसा रस्सा प्यायला,पिल्याला कसा बसून जेवला यावर चर्चा व्हायची..तवर कुणाला बिडी प्यायची तलप यायची. कुणाची हातावर तंबाखुची मळणी सुरू असायची..अशातच माग राहिल्याल्याचं एकदासं जेऊन व्हायचं. उरली सुरली भांडी गोळा करायची. रस्याचं डेचकं,खरकाटी भांडी नदीतन नुसती खदबळून आणायची. यांनी जेवायचं आणि भांडी बायकांनी धुवायची म्हणं. दुरडीत भात उरला आसल तर बाजूलाच उलटायचा.चटणी मीठ उरलं आसल तर तिथंच ठेवायचं उरल्याल काहीच घरला न्यायचं नाही अशी रितभात.सगळं आवरून झालं की चुलीत पाणी वतून चुल इझवायची.चुल थंडगार व्हायची.आणि मग भरल्या पोटानं बेतानं माणसं घरला परतायची.सकाळी नदीच्या काठावर जागोजागी काळठिक्कर पडलेल्या तीन दगडाच्या चुली दिसायच्या.रात्री नदीवर देव जेवायला आल्याल्या खाणाखुणा दिसायच्या.बाजूला उरलेल्या चटणी मिठाच्या पिशव्या पडलेल्या असायच्या.आमचा मांगाचा मारुतीमा येरवाळीचं नदीवर फेरफटका मारून त्या चटणी मिठाच्या पिशव्या गोळा करून घरला घेऊन यायचा.
- किरण सुभाष चव्हाण (पांगिरे)
८८०६७३७५२८.
काळाच्या पडद्याआड गेलेली माणसं.
 |
कतई पटकेवाला आमचा किसनुआज्जा |