'हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही.' असा आशावाद निर्माण करणारे पुस्तक.
आदरणीय किरण चव्हाण सरांचे विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तक वाचले आणि ...
एखाद्या बसस्थानकावरती प्रवासी गावाला जाण्यासाठी सुरुवातीला बसची वाट एकटक नजरेने पहात उभी असतात. इतक्यात काही क्षणात बस फलाटवरती येऊन थांबते. बसच्या दरवाज्याजवळ गर्दी करून प्रवासी आत जाण्याचा प्रयत्न करतात. किंबहुना आतही जातात काही बसतात,काही उभे राहतात. बस एकदम प्रवाशांनी भरते आणि सर्व प्रवाशांच्या तोंडून एकच वाक्य निघत असते.'ड्रायव्हरसाहेब' अर्थात या बसचा चालक कधी येऊन बस सुरु करतो आणि बस कधी एकदा मार्गस्थ होते.थोडक्यात बसचा चालक सुव्यवस्थित असेल त्याचसोबत सर्व काही सुरळीत आणि योग्य प्रमाणात असेल तर तो निश्चितच बस मार्गस्थ करतो. प्रवाशांना योग्य त्या ठिकाणी पोहोवतो आणि मोकळीक घेतो. आमच्या शिक्षण क्षेत्रांमध्येसुद्धा असेच आहे. विविध शाळांमध्ये अनेक विद्यार्थी उद्याच्या आकांक्षावरती चांगल्या प्रकारचे शिक्षण घेत आहेत. पण चालकाची भूमिका निभावणाऱ्या या शिक्षकांची व्यथा मात्र वेगळीच आहे.
आज अनेक ठिकाणी अनेक प्रश्नासाठी आंदोलने होतात, मोर्चे निघतात परंतु या सर्व गोष्टींचे रूपांतर आश्वासनांच्यामध्ये होते. परिणामी निष्कर्ष थोड्या अवधीनंतर निघतात. आज 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' हे पुस्तक केवळ पुस्तक नसून संपूर्ण राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांच्या व्यथा संग्रहित करून संघर्षाच्या लढ्याला बळ देण्याचा प्रयत्न हा आहे. तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. कारण काहींची उभी हयात या क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थ्यांना तयार करण्यात गेली तो शिक्षक आजही पोटभर जेवू शकत नाही, तो उपाशी आहे हे पाहिल्यानंतर कळते.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी वाचन,लेखन,श्रवण,भाषण कौशल्य या चौफेर कौशल्यांचा विकास झाला की सर्वांगीण विकास झाला असे संबोधले जाते. पण याच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणाऱ्या या विनाअनुदानित शिक्षकांचा मात्र केव्हा विकास होणार..? हा प्रश्न निरुत्तरितचं आहे. आज अनेक डीएड, बीएड धारक उराशी अनेक स्वप्नं बाळगून ऐन तारुण्यात या पदव्या घेतात. आज ना उद्या आपल्याला नवी आशा दिसेल, आणि आपण उभारी घेऊ या समजुती पोटी कार्याला सुरुवात करतात. परंतु आजतागायत निराशा शिवाय काहीचं मिळालं नाही.
हे पुस्तक वाचताना बरेच प्रसंग वेदनामय आहेत हे जाणवून येते.शाळा सुटल्यानंतर इतरत्र अन्य कामे करणारे प्रसंग जर वाचले तर निश्चितच डोळ्यात पाणी येते. आणि यावरून निश्चितच सुदृढ पिढी निर्माण करणाऱ्या शिक्षकांची काय व्यथा म्हणायची. फक्त एक आशा..? 'हेही दिवस जातील' या उक्तीवर भरवसा ठेवून हे सर्व शिक्षक कार्यरत आहेत.
पुस्तकरूपाने ज्या करुणामय वेदना एकत्रित करून लढा देण्याचा आपला जो मानस आहे, तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. कारण अनेक ठिकाणी विनाअनुदानितांची आंदोलने होतात, मोर्चे निघतात,निवेदने देतात परंतु हे संग्रहित वेदनामय दुःखच आपल्याला अनुदान मिळण्यासाठी एक मोठे भांडवल ठरणार आहे.त्याचसोबत भविष्यात अनुदान मिळाल्यानंतर ते कसे मिळाले सांगण्यासाठी हे कृतियुक्त पुस्तकाची आपल्याकडून निर्मिती झालेली आहे. त्याबद्दल सर्व विनाअनुदान तत्त्वावर कार्यरत असलेल्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी,प्रशासकीय कर्मचारी यांचे वतीने आपले मनःपूर्वक आभार मानतो. कारण बऱ्याच गोष्टी माणूस बोलून जातो व समोरच्या ऐकणाऱ्या माणसांच्या सर्वच काही लक्षात राहते असे नाही, कारण विस्मरण हे निश्चितच असते. परंतु एखाद्याची व्यथा सांगण्यासाठी,त्यांच्या भावना इतरत्र पोहोचवण्यासाठी आपण पुस्तक रुपाने लेखनाची गाथा तयार करून जे सहअध्यायी यांचे प्रसंग मांडलेला आहात यावरून निश्चित या संघर्षातूनच अनुदान मिळण्यासाठी फारसा कालावधी लागणार नाही याची खात्री वाटते. कारण यामध्ये प्रसंग काय..? हे फक्त तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील नसून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील,काही राज्याबाहेरील सुद्धा प्रसंग आहेत. त्यामुळे आदर्शवत विचार घेऊन या विनाअनुदानित घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या पुस्तकाद्वारे झालेला आहे.
या पुस्तकातील अनेक लोकांनी सांगितलेले अनुभव, आई-वडिलांच्या आशा-अपेक्षा या सर्व गोष्टींचा विचार, ओवाळणीसाठी बहिणीकडे जाणारा भाऊ या सर्व कौटुंबिक नात्यांचा विचार केला तर इतर लोक कोठे आहेत आपण कोठे आहोत. वर्षानुवर्षे कार्यरत राहणाऱ्या लोकांना धडे पुढे जाता येत नाही आणि धड मागेही जाता येत नाही. दुसरा मार्गही निवडता येत नाही अशी सारी अवस्था आहे. शेवटी काय करावे..? हा प्रश्न निरुत्तरचं आहे पण सुरेश भटांच्या कवितेप्रमाणे...'हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही.' म्हणजे आज जरी आपली वाईट परिस्थिती असली तरी भविष्यात असे असणार नाही काव्यपंक्तीचा असा अर्थ आपल्या जगण्यात उतरेल हा आशावाद निर्माण करणारे हे पुस्तक आहे आणि म्हणून निश्चितपणे उद्याचा सूर्य आपल्यासाठीचं उगवेल ही खात्री बाळगूया. या लेखक किरण चव्हाण यांच्या या पुस्तकाच्यारूपाने निश्चितच वेळ बदलेल,नवीन आशा निर्माण होईल व चांगले दिवस येतील हा आशावाद मनाशी बाळगून सर्वजण कार्यरत राहूया. लवकरच या पुस्तकाची दुसरी आवृत्ती तयार होते आहे ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. आज अनेक सुधारित तंत्रज्ञानामध्ये वाचन संस्कृती जोपासून ही संघर्षगाथा पुन्हा दुसऱ्या आवृत्तीसाठी छपाई करण्यास प्रवृत्त करणाऱ्या वाचकांचे, सर्वांचे मनस्वी आभार मानून मी या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी शुभेच्छा देतो व थांबतो.
धन्यवाद...!
अध्यापक - श्री राजेंद्र पुंडलिक बामणे.मु.पो.अकोळ. ता.निपाणी. जि.बेळगांव. पिन कोड - ५९१२११ मोबा -०९७४१९४९५९२
विनाअनुदानितची संघर्षगाथा
पुस्तकासाठी संपर्क :
किरण चव्हाण.
८८०६७३७५२८.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा