'दुःखाच्या गळ्यात किंकाळीचा ढोल.'
लेखक मा.श्री किरण चव्हाण सर लिखीत 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' हे पुस्तक वाचले आणि शासकीय धोरणांचे,निष्काळजीपणाचे काळेकुट्ट आभाळ भेदणारी दुःखाची किंकाळी कानात शिरून मेंदूला,हृदयाला छेद देवून गेली.इतकी विदारकता या पुस्तकाच्या पानापानांवर अश्रू गाळतांना दिसली. पुस्तकाचे प्रत्येक पान फडफडून आपल्या न्याय हक्कासाठी आक्रोश करत होते. आत्म्याच्या तळातून आलेला हा आक्रोश संबधित प्रशासकिय व्यवस्थेच्या काळजात कधीच शिरणार नाही, कारण विनाअनुदानित शिक्षक बांधवांच्या बाबतीत ही व्यवस्था नेहमीच सावत्र आईची भूमिका बजावत आलेली आहे.,तिला पान्हा फुटावा ही अपेक्षा तरी कशी बाळगावी...? एक वाक्य वाचनात आलं होत ," आपण अशा देशात राहतो जिथे दारूची दुकाने सरकारमान्य आहेत आणि शाळा विनाअनुदानित..." हे वाक्य शंभर टक्के खरं आहे...आपल्याला पुन्हा एकदा चिंतन करावे लागेल की देशाला, राष्ट्राला खरी गरज कशाची आहे. व्यसनाधीन तरूणाईची की उच्चशिक्षित संस्कारक्षम पिढीची. याचे उत्तर जर 'उच्चशिक्षित संस्कारक्षम पिढी ' असे असेल तर आपल्याला ती पिढी घडवणारा ' शिक्षक ' नावाचा घटक उपवाशी ठेवून चालणार नाही. आणि हे जेव्हा माय बाप सरकारच्या लक्षात येईल ( ? )तो सुदिन म्हणावा लागेल...!
पुस्तक वाचतांना असे जाणवले की, गेली वीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या या विनाअनुदानितच्या प्रश्नासाठी अनेक आंदोलने झाली, मोर्चे निघाले,लोटांगणं घातली पण सारे अयशस्वी झाले. याचे कारण माझे शिक्षक बांधव कुठे कमी पडले असे नाही तर, सत्तेवर असलेल्या कुठल्याच सरकारने आश्वासनापलिकडे त्यांच्या पदरी कांहीच टाकले नाही. फक्त आणि फक्त वेळकाढूपणा केल्याने ते यशस्वी होवू शकले नाहीत इतकचं...!
'शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा ' हा मुलमंत्र विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला. संविधानाच्या माध्यमातून समता व बंधूता प्रस्थापित करून या महामानवाने लोकशाहीचं, लोकहिताचं, सर्वधर्म समभावाचं गणराज्य आपल्या हाती सुपूर्त केलं... शिक्षक बांधव शिकले, संघटीत झाले, टोकाचा संघर्षही केला. सत्याग्रहाने, संविधानिक मार्गाने आपल्या हक्कासाठी पदरही पसरला.,पण निर्ढावलेल्या सत्येपुढे सारे व्यर्थ गेले...बाबासाहेब, खरंच आज तुम्ही देहाने आमच्यात नाही हे बरेच झाले, असता तर इथली प्रशासकिय अवस्था पाहून तुमचेही डोळे नक्कीच पाणावले असते..!
या पुस्तकाचे लेखक किरण चव्हाण सर हे स्वतः गेल्या अनेक वर्षापासून एक विनाअनुदानित शिक्षक आहेत.त्यांनी गेली सहा वर्ष विनाअनुदानितच्या प्रश्नावर दिवस रात्र चिंतन मनन केले.अनेक समदुःखी शिक्षक बांधवांशी सखोल चर्चा केली. प्रत्येकाचीच आर्थिक, कौटुंबिक परिस्थिती फारच वेदनादायक आणि विदारक होती.किरण चव्हाण सरांसारखा हळवा तितकाच संवेदनशील माणूस अंतर्बाह्य हेलावून व्याकुळ झाला. त्यांना पक्कं ठाऊक होतं, गेंड्डयाची कातडी पांघरून झोपेचे सोंग घेतलेल्या या प्रशासनाला संविधानिक पण वेगळ्या मार्गाने जागं केलं पाहीजे., कारण आतापर्यंत व्यवस्थेशी लढण्याची सर्व हत्यारे वापरून झाली होती.आता वेळ आली होती लेखणीची ताकद दाखविण्याची...
दोन -तीन वर्षाच्या आर्थिक भुर्दंडासह अथक कष्टानंतर दुःखाची किंकाळी 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' या पुस्तक रूपाने बाहेर पडली. चव्हाण सरांनी या पुस्तकात शिक्षण मंत्र्यांपासून ते शिक्षण क्षेत्राशी निघडीत अशा सर्व घटकांची मते मांडली आहेत.विनाअनुदानित शिक्षक बांधवांच्या,भगिनींच्या वेदना प्रत्येक पानावर अश्रू गाळतांना दिसतात...या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणावर सविस्तर लिहायचं झाल्यास दुसरं एक पुस्तक तयार होईल. इतकी मुद्देसुद मांडणी,क्रमबधता, सनावळ्या, ओघवती भाषाशैली, सहजता आणि मुख्य म्हणजे विचार करण्यास परावृत्त करणारे ज्वलंत प्रश्न घेवून हे पुस्तक व्यवस्थेविरूध्द बंड करून न्याय हक्कासाठी लढण्यास सज्ज झाले आहे...
माझे जिवलग मित्रबंधू मा.किरण चव्हाण सर माझ्यापेक्षा वयाने लहान व ज्ञानाने, प्रतिभेने मोठे. असं असूनही पुस्तक बांधणीवेळी ते माझ्याशी वेळोवेळी चर्चा करायचे. आपल्यासारख्याच समदुःखी शिक्षक बांधवांच्या, भगिनींच्या व्यथा, पगाराविना होणारी फरफट, उध्वस्त झालेले संसार, नैराश्यग्रस्त बांधवांनी केलेल्या आत्महत्या,त्यांच्यासह कुटुंबातील आजारपणांना तोंड देणे... अशा एक ना अनेक हृदय हेलावून टाकणाऱ्या विदारक घटना ते माझ्याशी मोठा भाऊ समजून सांगायचे. हक्काने आपले मन मोकळे करायचे...याच कालावधीत नोकरीत अस्थिर असलेल्या मुलग्याचं दुःख काळजात साठवून किरण सरांचे वडील देवाघरी निघून गेले. काय वेदना झाल्या असतील त्यांच्या आत्म्याला याची आपण कल्पनाही करू शकत नाही. ज्या एकूलत्या मुलाला मोलमजुरी करून उच्चशिक्षित केलं, त्याला शिक्षक झालेलं स्वप्न पाहीलं, कष्टाचे चिज होवून आपला मुलगा आपले पांग फेडील, नशिबातील अठराविश्व दारिद्रयाच्या दलदलीतून बाहेर काढून म्हातारपणी सुखाचे चार दिवस दाखवील अशी अशा बाळगणं एक वडील म्हणून चुक होतं का..?
जन्मदाता दारिद्रयातच देवाघरी गेला. ही खंत किरण सरांना काळजात सुईसारखी बोचू लागली. कांही कालावधीसाठी मुळातून खचूनही गेले, निराशेच्या गर्तेत बुडाले आणि स्वतःच सावरलेही, कारण आपल्या दुःखापेक्षाही इतर शिक्षक बांधवांची दुःखं मोठी आहेत याची त्यांना पुरेपुर जाणीव होती. या प्रगल्भ जाणिवेतूनच स्क्रिन फुटक्या जुन्या मोबाईलमध्ये 'विनाअनुधानितची संघर्षगाथा ' या नावाची चळवळ जन्म घेत होती....
मित्रहो, ही चळवळ किरण चव्हाण या नावाच्या एका व्यक्तीची नसुन ती संपूर्ण महाराष्ट्रातील विनाअनुदानित बंधू-भगिनींची आहे...तिला अधिक व्यापक करणं ही आपली जबाबदारी आहे... किरण सरांनी दिशा दिली आहेच,आता एकीचे बळही दिसू द्या,कारण विनाअनुदानित शिक्षक वगळून जगाच्या पाठीवर असं कोणतही क्षेत्र नाही जिथं प्रामाणिकपणे काम केल्यास मोबदला मिळत नाही...
'विनाअनुदानितची संघर्षगाथा ' हे केवळ पुस्तक नसून विनाअनुदानितची गेल्या वीस वर्षापासूनची भळभळती जखम आहे... शासनानं केलेल्या पापाचा हिशोब आहे...वाचकांनी हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून किरण चव्हाण सरांनी उभ्या केलेल्या चळवळीला अधिक बळ देवून व्यापक स्वरूप द्यावं.आशा करतो शासन दरबारी या पुस्तकाचा गांभिर्याने विचार होवून उपाशी शिक्षक बंधू भगिनींना त्यांच्या हक्काची भाकरी मिळेल...
धन्यवाद !
- नंदू साळोखे
९५४५६९१५४१
ग्रामीण लेखक नंदू साळोखे |
माझे गुरुबंधू आणि लेखक आदरणीय नंदू साळोखे .अकाली आलेल्या अपंगत्वामुळे गेली २४ वर्षे अंथरूणाला खिळून आहेत. शारीरिक वेदना असतानाही त्या सहन करत पुस्तक वाचून विनाअनुदानितच्या वेदनेवर आपल्या लेखणीतून फुंकर घालून मला व समस्त विनाअनुदानित शिक्षक बंधू-भगिनींना प्रेरणा देण्याचे काम केले आहे. त्यांनी पुस्तकावर दिलेल्या अनमोल अशा प्रतिक्रियेबद्दल मी हृदयपूर्वक त्यांचा आभारी आहे.
.
विनाअनुदानितची संघर्षगाथा
पुस्तकासाठी संपर्क :
किरण चव्हाण.
८८०६७३७५२८.
👌
उत्तर द्याहटवा