फॉलोअर

बुधवार, २ मार्च, २०२२

'वर्णन करून प्रश्न बदलणार नाही वर्तन करायला हवं.'- ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे.

 


'वर्णन करून प्रश्न बदलणार नाही वर्तन करायला हवं.' - ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे.

                  

                                       किरण चव्हाण लिखित विनाअनुदानितची संघर्षगाथा हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. विनाअनुदानित हा विषय ग्रंथरूपाने समोर आला आहे प्रथम मला हे आवडलं. पण आता त्याच्यापुढे अजून कशाप्रकारे या प्रश्नाकडे पाहता येईल याचादेखील विचार करायला पाहिजे. कारण आता हा न संपणारा प्रश्न तयार झाला आहे. खूप लोक या प्रश्नाशी जोडले गेलेले आहेत.मग याच्यापुढे काय करायचं ? नवीन आर्थिक व्यवस्था, नवीन खाजगीकरण आणि त्याच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त समाज जोडला गेलेला आहे.आणखीन दहा वर्षाने सगळा समाजच जोडला जाईल.खाजगीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली की जीवनाच्या सगळ्या अंगामध्ये असे लोक दिसतील.कॉन्ट्रॅक्ट, प्रायव्हेट, नॉनग्रँट हे आता परवलीचे शब्द होणार आहेत. म्हणून याचा मूलभूत विचार करण्याची वेळ आलेली आहे.काय झाल्यानंतर हे दूर होणार आहे,कोणी काय करायला पाहिजे,कोणता नवा विचार मांडायला पाहिजे.अशाप्रकारे या अंगाने आता जावे लागणार आहे. 

                             मी पहिलं पुस्तक लिहिलं. 'जागतिकीकरण आणि दलितांचे प्रश्न', दूसरं लिहिलं सामाजिक न्यायावर 'जागतिकी झोत'. हा सगळा  नवीन ट्रेंड आलेला तो मी कव्हर करत होतो. मग 'श्रमिकांचे जग काल,आज आणि उद्या' याच्यावरही चारशे पानांचं पुस्तक आहे.जो राबणारा वर्ग आहे संघटीत,असंघटीत,सरकारी, बिनसरकारी,अनुदानित, विनाअनुदानित, शेतकरी, मजूर,स्त्रिया हा जो सगळा श्रम करणारा वर्ग आहे, यांचं पुढे काय होणार आहे याच्यावर पुस्तक लिहिलं आहे. जागतिकीकरणात संस्कृतीचं काय होणार आहे ? धर्माचं काय होणार आहे ? आणि जागतिकीकरणाने कोणती आव्हाने आपल्यासमोर उभी केलेली आहेत.या विषयावर अशी ही पुस्तकं लिहिलेली आहेत.माझी अशी इच्छा होती की, याला बळी पडलेले लोक तरी ते वाचतील,समजून घेतील, विचार करतील.पण आपल्याकडे एकूणच वाचन कमी झालंय. त्यामुळे न वाचता, न विचार करता लोक काही करायला जातात आणि त्याला यश येत नाही.हे का तयार होतं ? कारण शिक्षणक्षेत्रातल्या विनाअनुदानित संस्था या व्यवस्थेमधला एक खूप छोटा भाग आहेत. आता जगामध्ये तुरुंगाचं खाजगीकरण होतंय, रस्त्याचं ,शिक्षणाचं,आरोग्याचं, जहाजांचं,रेल्वेचं होतय असं कोणतं अंग राहिलंय.की जिथं विनाअनुदानित धोरण आलं नाही.मग त्या व्यवस्थेत आपण कुठे आहोत..? आपलं काय होणार आहे ? आपण आपल्या सर्वांचे यातून कोणते मार्ग काढायला पाहिजेत ? म्हणजे रोज उठून कुणाला तरी शिव्या देऊन हा प्रश्न सुटणार आहेत का ? तर या नव्या व्यवस्थेने जगण्याची लढाई सर्वांच्यावर लादलेली आहे. आणि ही नवीन व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे.  विनाअनुदानितकडे आपण गेलो की नाही नोकरीला.. मग का गेलो आपण ? तर नोकरी नव्हती, जगण्याचे साधन नव्हते,एवढं शिकून घरी बसून काय करायचं ?  पुढे काय तरी होईल.. अशा सगळ्या गोष्टीतून आपण ती व्यवस्था स्वीकारलेली आहे. आणि आपण ती स्वीकारली म्हणूनच ती व्यवस्था तयार झाली.विनाअनुदानितकडे नोकरीला लोक येणार आहेत, विद्यार्थी तिथे येणार आहेत याची खात्री जेंव्हा व्यवस्थेला झाली. तेंव्हाच विनाअनुदानित हा प्रकार चालू झाला..गिऱ्हाईक असल्याशिवाय कोणतंही उत्पादन बाजारात येत नाही.आगोदर गिऱ्हाईकाचा अभ्यास करतात मग उत्पादन काढतात.

                                        अनेक आंदोलनांची तुमच्यासमोर उदाहरण आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे काय झाले. शेतकरी एक वर्षे आंदोलनाला बसतात.गिरणी कामगारांचा संप अडीच वर्षे चालला. आदिवासी लोक नाशिकवरून मुंबईला पाचशे किलोमीटरचा प्रवास करून चालत गेले,टाचा फुटल्या. ते सगळे कॅमेरासमोर आले.आणि मग खाडकन सरकार जागं झालं. आणि मग सरकारनेही ठरवलं की वनजमिनीचे पट्टे यांच्या नावावर करावेत. अशी लढाई आपल्या हातून होणार आहे का याचा आपण विचार केला पाहिजे.  

                      विनाअनुदानितवरचा स्टाफ,क्लेरिकल स्टाफ,विद्यार्थी यांनी  एक दिवस जरी ठरवलं की आम्हीं एक महिना संपावर जाणार आहोत. पण आमचं असं का होत नाही.आमच्या शिक्षकांच्याबरोबर विद्यार्थी का नाही उभा रहात.आमच्या गुरुजींना पगार नसेल तर तिथे आम्हीं येणार नाही. असं विद्यार्थ्यांनी एक आठ दिवस बंड केलं तर..? माझ्या काळामध्ये साधारण १९८० च्या अगोदर. विद्यार्थी आणि शिक्षक यांचं  एक दृढ नातं होतं. मला आठवतं कोल्हापूरच्या गोखले कॉलेजच्या प्राध्यापकांचा संप.हा देशातला सगळ्यात लांब काळ चाललेला म्हणजे दीड वर्षे चाललेला संप होता.शिक्षकांना पगारच नव्हता  मग त्यांनी ठरवलं की,आपण संपावर जाऊ. संपावर गेले शिक्षक.मग आमची विद्यार्थ्यांची जबाबदारी काय..? या संपाला समाजातून पाठिंबा कसा मिळवायचा ? ज्यांना पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी बिंदू चौकात येऊन एक दिवस उपोषण करायचं. प्राध्यापकांच्या संपाला पाठिंबा असा बोर्ड लावायचा. मग आम्हीं कुणा कुणाचा पाठिंबा मिळवला.? कॉ.गोविंद पानसरे यांना भेटून रिक्षावाल्यांचा पाठिंबा मिळवला. रिक्षावाल्यांनी एक दिवस उपोषण केलं. स्टॅन्ड समोरच्या हातगाडीवाल्यांचा मिळवला त्यांनी एक दिवस उपोषण केले.या सर्वांनी उपोषणाला यायचं आणि संपाला आपल्याकडे जे काय असेल ते आर्थिक मदत करायची. कारण हे प्राध्यापक जगणार कसे ? जर शंभर रुपये जमले तर यांनी दहा-दहा रुपये वाटून घ्यायचे आणि चूल पेटवायची.बँक कर्मचाऱ्यांचा पाठिंबा मिळवला त्यानंतर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा पाठिंबा मिळवला , स्त्रियांचा मिळवला. विद्यार्थी तर आम्ही संपातच होतो आणि शेवटचा पाठिंबा मिळवला तो आम्ही डोंबारवाड्यातल्या वेश्यांचा. त्यांनी शंभर दीडशे रुपये संपाला मदत म्हणून जमवून दिले. शेतकरी आले आमची पोरं आहे तिकडे आहेत म्हणून. कलेक्टर कचेरीतल्या लोकांनी येऊन पाठिंबा दिला. आणि मग शिक्षण खात्यावर असा एक दबाव आला की, त्यांनी गोखले कॉलेजचं ते मंडळ बरखास्त केलं आणि तिथे नवा प्रशासक नेमला आणि मग त्या प्रशासकांनी त्यांचे पगार सुरू करून दिले. 

                             आपल्याकडे लढायला कोणी नाही.आपण सुटे सुटे लढायला लागलो आहोत. १९७५ पर्यंत प्राध्यापकांची एकच स्वतंत्र संघटना असायची. ती कम्युनिस्ट पक्षाशी ,काँगेसशी जोडलेली असायची.असंच प्राथमिक शिक्षकांचं होतं. सरकारला जेंव्हा कळालं यांची एकजूट खूप आहे.हे कधी पण सरकारवर दबाव आणून आपल्याला पाहिजे ते मागण्या मान्य करून घेतात. मग हे मिटवायचं असेल तर काय करायला पाहिजे तर यांच्या संघटना वाढल्या पाहिजेत. मग संघटना वाढवायच्या असतील तर कायद्यात बदल केला पाहिजे.पूर्वी एका क्षेत्रात एकच संघटना होती त्यानंतर कायद्यात बदल केला अनेक संघटनांना मान्यता दिली. परिणाम काय झाला..? तर राज्य पातळीवर ज्या संघटना तयार झाल्या. त्यात प्रदेश,जात,धर्म ,आपला वीरपुरुष, आपली डिग्री अशा जवळपास चाळीस संघटना आहेत.शेवटी संघटनामध्ये आपण विभागलो गेलोच ना. आपल्या एकीमध्ये फूट पडली.मग आपण प्रयत्न करतच नाही ना एकीसाठी. या क्षणाला सगळ्यांचे प्रश्न समान आहेत,सगळ्यांची दुःख समान असतील, सगळ्यांच रक्त लाल असेल तर काय केलं पाहिजे आपल्याला..?  

                             आता काय करतात ही लोकं की, प्रत्येकजण आपापल्या दुःखाचं वर्णन करायला लागला आहे. कोण पोवाडा लिहितो, कोण कविता लिहितो, कोण पुस्तक लिहितो.हे सगळं आवश्यकचं आहे वर्णन करणं .कारण तुम्ही कोण आहात हे कळतं. पण याच्या पुढे मुद्दा काय तयार होतो केवळ वर्णन करून जगातला कोणताही प्रश्न सुटत नाही.  मी असा आहे,मला आज पगार नाही,उद्या पण मिळणार नाही,कर्ज झालं,पत्नी सोडून गेली,पोरं सोडून गेली हे वर्णन आहे.पण हे करण्याबरोबरच मार्क्स काय म्हणतो, तर हे जग वर्तन करून बदलतं, वर्णन करून बदलत नाही.वर्णन करून ते कळतं.पण  बदलायचं असेल तर वर्तन करावं लागतं.त्यामुळे आपल्याला आता वर्तन करायला हवे.

                           शिक्षकाकडे सगळ्यात मोठी ताकद असते ते म्हणजे त्याचं चारित्र्य. चारित्र्यवान शिक्षकाला समाज आदर देत असतो, त्यालाचं समाज घाबरत असतो.तुमची लढाई तुमच्या चारित्र्यावर असते. मग प्रश्न असा आहे की, हे चारित्र्य शिक्षकांनी का गमावलं ?  त्यांनी स्वतःहून गमावलं का..? की तशी परिस्थिती निर्माण झाली. की कुणी तयार केली.याचं उत्तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दिलेलं आहे. की पहिल्यांदा शिक्षक हा मिशनरी होता.नंतर त्याचा कामगार झाला. शिक्षक मिशनरी असताना शिकवण्यासाठीच फक्त त्याचा जन्म झाला होता.तो २४ तास शिकवायचा,स्वतःला घडवायचा. त्याच्या काही मागण्या नव्हत्या.त्याची मागणी काय..? तर पोटापाण्याला मिळालं.कुटूंब चालेल एवढं मिळालं की तो खुश व्हायचा.त्याला गांव धान्य द्यायचं, मंदिरात जागा द्यायची, त्याला गावंच घर द्यायचं.जिथे नोकरी असेल तर तिथेच तो शिक्षक रहायचा.पण नंतरच्या काळात शिक्षकाला कामगार कायदा लागू झाला. आता सगळ्या शिक्षकांना कामगार कायदा लागू आहे. त्यामुळे व्यवस्थेमध्ये शिक्षक हा असा एक घटक होता ज्याचा कामगार झाला. म्हणून त्याचे कामगारासारखे प्रश्न आहेत. मग ते सोडवायचे कुणी..? 

                                      तर असं कुणी तरी लिहिलं पाहिजे. कुणी आत्मचरित्र लिहितं, कुणी अनुभव लिहितं की,शिक्षक मजूर झाले,शिक्षक वेटर झाले, शिक्षक भिक मागायला लागले ही जी दृश्य तयार झाली आहेत त्याच्यात आपण नुसते रंग भरतोय.त्याची फोटोग्राफी करतोय . शहाणा माणूस काय करेल? हे दृश्य कसे आहे ते सांगणार नाही तर हे दृश्य का तयार झालं ते सांगेल.विनाअनुदानितची माणसं जन्माला घालणाऱ्या गर्भाशयात सुधारणा केली पाहिजे की, जन्माला आलेल्या माणसांच्यात केली पाहिजे. तेंव्हा आपण शांतपणे याचा विचार केला पाहिजे. याचं मुळ शोधणं गरजेचं आहे. फांद्यांचं, फुलांचं वर्णन करून आता उपयोग नाही तर ज्या मुळापासून हे तयार होतं त्या मुळांचा अभ्यास केला पाहिजे.


                                                                     -  उत्तम कांबळे.

 ◾ऐकू शकता ;

विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकाच्या अनुषंगाने ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्याशी साधलेला सखोल संवाद

https://youtu.be/Y9x6guTdN1o


विनाअनुदानितची संघर्षगाथा

पुस्तकासाठी संपर्क :

किरण चव्हाण.

८८०६७३७५२८.






विनाअनुदानितची संघर्षगाथा 

1 टिप्पणी:

  1. अतिशय सुंदर मार्गदर्शन। कर्ते, कार्यकर्ते होण्याची आवश्यकता आहे।

    उत्तर द्याहटवा

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...