डॉ.नरेंद्र दाभोलकर आठव आणि जागर हे मनात विवेकशीलता निर्माण करणारे पुस्तक.
एका बैठकीत वाचून होण्याएवढं हे पुस्तक आहे. ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ.सुनीलकुमार लवटे सरांनी संपादित केलेले डॉ.नरेंद्र दाभोलकर आठव आणि जागर हे पुस्तक वाचलं.हे पुस्तक म्हणजे दि.२० ऑगस्ट २०१३ रोजी पुणे येथे अज्ञात मारेकऱ्यांकडून डॉ.नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली. त्यानंतर काहीच महिन्यात मासिक स्मृती जागर व्याखान उपक्रम राबविण्यात येऊ लागला, त्या उपक्रमातील पाच व्याख्यानांचा संग्रह म्हणजे प्रस्तुत पुस्तक आहे.यामध्ये सुरेश द्वादशीवार,डॉ.सुनीलकुमार लवटे,लक्ष्मीकांत देशमुख, डॉ.सदानंद मोरे, संजय जोशी अशा डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या विचार कृतीशी व चळवळीशी प्रत्यक्ष जोडलेल्या व त्यांच्या सोबत कार्य केलेल्या महनीय व्यक्तींच्या विचारांचा सार आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतो. डॉ.दाभोलकर यांच्या कार्याचे योगदान, वैचारिकता, व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडताना दाभोलकर एक व्यक्ती नसून तो एक विचार आहे.आणि त्यांच्या विचारांचा प्रवाह नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारी ही सर्व मंडळी वैचारिक दूत म्हणून सामाजिक स्तरावर काम करीत आहेत हे प्रकर्षाने जाणवते.
डॉ. नरेंद्र दाभोलकर कार्य त्या कार्यापुढील आव्हाने,आठवणीत राहिलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व, साहित्य प्रातांत ही आपल्या कार्याने लिलया यश संपादन करतात. सुरेश भट,कुसुमाग्रज अशा दिग्गज कवींच्या कविता मुखोद्गत असणारे दाभोलकर म्हणजे संघटन,चळवळीत सक्रिय राहून देखील साहित्याचे ज्ञान व भान जपणारे चोखंदळ रसिक व संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते हे कळते, साधना मासिकाच्या उतरत्या काळात त्यांनी संपादकाची भूमिका घेतली त्यावेळी अखेरचा मारलेला खिळा अशी त्यांच्यावर टीका होऊ लागली पण त्यांनी खऱ्या अर्थाने साधना मासिकाला उर्जितावस्था प्राप्त करून प्रचंड खपाचे एकमेव मासिक अशी ओळख निर्माण करून दिली. कोणत्याही क्षेत्रात आपल्या चिकाटी सचोटीच्या बळावर आपण कशी उंची गाठू शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवले.
देशातील मार्क्सवादी, गांधीवादी,हिंदुत्ववादी,आंबेडकरवादी अशा विचारधारेचे मतप्रवाह आहेत.काळाच्या प्रवाहात ते कसे प्रभावीपणे प्रवाहित होतायत.याची सखोल चिकित्सा याठिकाणी वाचायला मिळते.धर्म,धर्माचा इतिहास याचा लेखाजोखा मांडताना युरोपियन,सिंगापूर इथली संस्कृती आणि आपल्या देशातील संस्कृती यांतील कालपरत्वे झालेले बदल,परदेशात श्रद्धेची स्थान असणारी चर्च आता सांस्कृतिक केंद्रे बनत आहेत आणि हा बदल आजपासून ३० वर्षामागे सुरू झाला. आणि आपल्याकडे आजही समाजपरिवर्तनांची केंद्र असलेल्या शाळा वाढण्याऐवजी अलीकडील काळात वाढलेली देवळांची संख्या हा आपल्या चिंतनाचा विषय का होऊ शकत नाही हा प्रश्न वाचताना उपस्थित होतो.
मानवी जीवनातील श्रद्धा,अंधश्रद्धा ,प्रथा, परंपरा याला छेद देऊन विवेकवादी जीवनाचा,विज्ञानाचा स्वीकार करून सत्याच्या कसोटीवर जीवनमूल्यांचा स्वीकार करणे,समाजविघातक अंधश्रद्धा टाळून त्यांचे निर्मूलन करून विवेकशील, वैचारिक आणि विज्ञाननिष्ठ समाजरचना तयार झाली पाहिजे त्यासाठी समाजाला जागरूक करून येणाऱ्या नव्या पिढीच्या मनात नरेंद्र दाभोलकरांच्या विवेकशील वैचारिकतेच्या जाणीवा व नेणिवा रुजविण्याचे कार्य आता त्यांच्या मागे राहिलेल्या जुन्या जाणत्या सुजाण विचारशील माणसांच्या हाती आहे. आणि खऱ्या अर्थाने या पुस्तकातील महनीय व्यक्तींनी मांडलेले विचार डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या विचारांचा वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी आत्मीयतेने विचारांचा जागर मांडत आहेत.
एकंदरीतच डॉ.नरेंद्र दाभोलकर आठव आणि जागर हे पुस्तक वाचताना जगण्याची मूल्ये काय असावीत,ध्येय काय असावं, तत्व काय असावीत या अनुषंगाने विचार करायला भाग पाडतं. आणि सुप्त अवस्थेतील विवेकशीलता मनात निर्माण करतं.
- किरण चव्हाण. ८८०६७३७५२८.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा