फॉलोअर

गुरुवार, १० नोव्हेंबर, २०२२

पाठीमागचा बेंच,ती दुपार आणि केंगार सरांचे बोल...किरण चव्हाण.


 पाठीमागचा बेंच, ती दुपार आणि  केंगार सरांचे ते बोल...


                  २००६ साली दहावी उत्तीर्ण होऊन श्री.लक्ष्मी विद्यालय ज्युनिअर कॉलेज हसुर येथे मी ११ वी ला प्रवेश घेतला. कॉलेज जीवनाच्या वयात नुकतेच पदार्पण केलेले. पण माझा स्वभाव हा थोडा लाजरा बुजरा असल्याने सुरुवातीला मी शेवटच्या बेंचवर बसायला लागलो. अर्थातच शेवटचा बेंच म्हणजे मागे बसून दंगामस्ती करण्याऱ्या मुलांचा अड्डाचं. शेवटच्या बेंचवर  बसून मुलं हुल्लडबाजी गोंधळ करायची. मी ही त्या मुलांच्यात मिसळलो होतो पण माझा गोंधळ वगैरे करण्याचा कोणताच उद्देश नव्हता. आणि  मला असा गोंधळ वैगरे घालणं कधी जमलंही नसतं. आमच्या वर्गावर केंगार सर मराठी विषय शिकवायचे.एकदा  वर्गात सर शिकवताना मागे पोरांची चुळबुळ सुरू होती. सर अचानक आमच्या दिशेने आले. आणि सरळच मला म्हणाले ,  "किरण तू उद्या पासून पुढच्या बेंचवर बसायचं. तुला १२ वी ला ७५ % गुण मिळवायचे आहेत. आणि तुला डी.एड करून शिक्षक व्हायचंय एवढं लक्षात ठेव." या वाक्यानं मी चमकूनचं गेलो. माझ्या आतापर्यंत हे कधी डोक्यातच नव्हतं. १० वी नंतर ११ वी १२ करायची एवढचं माहिती. शिक्षक होण्याचं ध्येय वगैरे असलं काहीच माझ्या ध्यानात ना मनात. पण मला एक प्रश्न पडला, सरांनी मलाच का उठवावं आणि मलाच असं का सांगावं बरं..? या प्रश्नांच्या शोधात मी माझ्यातच हरवत गेलो.सर मला असं बोलले याचा अर्थ नक्कीच माझ्यात काही तरी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी गरिब परिस्थिती, वडिलांचा संघर्ष सरांना जवळून माहिती होता. सरांचं ते बोलणं मी मनावर घेतलं  आणि दुसऱ्याच दिवसापासून पुढच्या दुसऱ्या क्रमांकाच्या बेंचवर बसायला लागलो. ते शेवटी १२ वी पूर्ण होईपर्यंत. 

                     बाबांनी माझ्याविषयी बघितलेलं शिक्षक होण्याचं स्वप्न खऱ्या अर्थाने  केंगार सरांनी माझ्या हृदयात घट्ट रुजवलं. अधिक मजबूत केलं. तेव्हापासून केंगार सरांच्या विषयी माझ्या मनात एकप्रकारचा जिव्हाळा निर्माण होत गेला. त्या दिवसापासून मी ठरवलं की, जे शिकायचं ते मनापासून शिकायचं. वर्गात शिक्षक जे काही शिकवतील ते मन लावून शिकू लागलो. गांभीर्याने अभ्यास करू लागलो. केंगार सरांच्या त्या वाक्याने मी पूर्णतः बदलून गेलो होतो. बारावीला तर सरांनी न सांगता माझा मीच विषयाच्या प्रश्नपत्रिका सोडवून तपासायला सरांच्याकडे द्यायचो. काही वेळा भर वर्गात केंगार सर माझी उदाहरणे सर्व विद्यार्थ्यांना द्यायचे. त्यावेळी आतून खूपच प्रेरणा मिळायची.  काही दिवसांत मी एक अभ्यासू शांत विद्यार्थी म्हणून शिक्षकांच्यासह माझ्या मित्रपरिवारात परिचयाचा झालो. केंगार सर मराठी विषय इतक्या आंतरिक तळमळीने शिकवायचे की संपुर्ण वर्ग चिडीचूप शांतता असायची. त्यांनी शिकवलेला शंकर पाटील यांचा 'छलांग' हा पाठ अजूनही माझ्या मनात रेंगाळतोय. दहावीला असताना देखील केंगार सरांनी असाच एक पाठ शिकवला होता 'लाल चिखल' नावाचा. आज ही टोमॅटो पाहिले की ती लालेलाल घटना डोळ्यासमोर तरळत राहते. इतकी जादू त्यांच्या शिकवण्यात होती. मराठी कथा,कविता शिकवण्यात सरांचा हातखंडाचं होता. कविता शिकवायला लागले की अनेक कवितांचा संदर्भ द्यायचे. कवी नारायण सुर्वे यांची 'दोन दिवस..' ही कविता तर अंगात रोमांच फुलवायची. त्या कवितांचे सरांनी केलेले रसभरीत वर्णन थेट हृदयाला भिडायचे. 

                          सर एखादा पाठ शिकवताना अनेक लेखक, कवी यांच्या पुस्तकांचा परिचय करून देत असायचे.  त्यावेळी दया पवार यांचं बलुतं, किशोर शांताबाई काळे यांचं कोल्हाट्याचं पोर, आनंद यादव यांची झोंबी,उचल्या,उपरा या कादंबऱ्या वारंवार वाचण्यास सांगायचे म्हणून तर पुढील काळात या साऱ्या  कादंबऱ्या मी वाचून काढल्या. सरांच्या अशा साहित्यिकविषयक अध्यापनाचा माझ्यावर असा परिणाम झाला की,   मी ही कॉलेजला असताना लिहायला लागलो. मोडक्या तोडक्या कविता रचू लागलो. या वयात लेखनीचं बाळकडू सरांच्याकडून मिळालं म्हणायला हरकत नाही. पुढे बारावी झाल्यानंतर मी जी पहिली कादंबरी लिहली 'नवसाचं पॉर' ही कादंबरी मी पहिल्या प्रथम केंगार सरांना वाचावयास दिली होती. सरांनीही ती आत्मीयतेने वाचून माझं कौतुक करत त्याबाबतीत काही सूचना मार्गदर्शन  केले. त्यानंतर जिथं तिथं माझा विद्यार्थी किरण याने कादंबरी लिहिली आहे असं अभिमानाने सर्वांना सर सांगायचे.सरांच्या अशा प्रेरणेने पुढे लिहू लागलो. बारावी झाल्यानंतर निपाणीला  डी. एड ला प्रवेश घेतला. निपाणीला येण्या जाण्याच्या  नेहमीच्या वाटेवर माझे ज्युनिअर कॉलेज लागायचे. त्यावेळी न चुकता माझ्या कॉलेजला मी वंदन करायचो. आणि त्यावेळी केंगार सरांची आवर्जून आठवण व्हायची.  एखाद्या माहेरवाशीणीला सासरी गेल्यानंतर क्षणाक्षणाला माहेराची आठवण व्हावी तशी पुढच्या शिक्षणाची वाट धरल्यानंतर मला माझ्या मागच्या ज्युनिअर कॉलेजची आठवण होत रहायची आणि जशी माहेरातली माय तसे कॉलेजमधील माझे केंगार सर यांच्या आठवणीने मी अस्वस्थ व्हायचो. आमचं नातंच असं मायलेकरांच्यासारखं झालं होतं. सरांना ही माझी उणीव भासत असत, कॉलेज सोडून गेल्यानंतरही सर माझी वरचेवर आठवण काढायचे हे माझ्या गावातील कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून मला समजायचे. मला ते विद्यार्थी म्हणायचे की, "किरणदादा आज वर्गात केंगार सरांनी आम्हांला तुझं उदाहरण सांगितले."  ते ऐकूनच माझं मन भरून यायचं.

                  आणखीन एक गुपित एवढ्या वर्षानंतर मी उघड करतोय. कारण हीचं ती वेळ आहे असं मला आज मनोमनी वाटतंय. ज्यावेळी मी ११- १२ वी ला होतो त्यावेळी कॉलेज सुटल्यानंतर दुपारच्या वेळेत रानात शेळ्या चारायला घेऊन जायचो. त्यावेळी  सोबत पुस्तक,वही, पेन आखीव ताव असं काही असायचंच.ती दुपार मला आज जशीच्या तशी आठवतेय. त्या काटेरी बाभळीच्या झाडाखाली का कुणास ठाऊक त्या दुपारी उगाचंच मी पानांवर काही तरी मांडण्याचा प्रयत्न करत होतो...

हीच ती बाभळ आज ही त्या ठिकाणी उभी आहे.

             कुणाबद्दल..? तर केंगार सरांच्याबद्दल...मी का लिहीत होतो..? मला कुणी लिहायला सांगितलं होतं..?  बरं जे लिहिणार ते सर वाचणार होते का..? काही काहीही माहिती नाही. फक्त लिहायचं एवढं खरं ते फक्त आपल्या केंगार सरांच्याबद्दल... कारण नसताना एखाद्या प्रियकराने हृदयाच्या देठापासून ओल्या अंतकरणाने आपल्या प्रेयसीला प्रेमपत्र लिहावं.तसा तो भाव त्यावेळी त्या पत्रात होता का..? होय तोच शुद्ध, निर्मळ निरागस मनाचा भाव होता.म्हणजे ऐन तारुण्यात पोरं पोरींना प्रेमपत्र लिहितात. पण मी मात्र आमच्या सरांना प्रेमपत्र लिहीत होतो. पण त्या मुक्या भावनेला नेमक्या शब्दांची गाठ पडत नव्हती. तरीसुद्धा कशी तरी अक्षरं त्या पानांवर उमटत होती. पण त्यावेळच्या हृदयाच्या गाभऱ्यातून  मुक्या भावनांचं  वेडंवाकडं पत्र सरांच्यापर्यंत कधीच पोहोचलं नाही. सरांना आज हे वाचताना आश्चर्य वाटेल. 'ये हृदयीचे ते हृदयी' या हृदयातून उमटलेल्या  निरागस भावना सर आपल्या हृदयापर्यंत पोहोचायला आज एक तप उलटून गेलं आणि तो क्षण साक्षात आज आला आहे. 

                      त्या वेळचा आणखीन एक प्रसंग मला आठवतो. रात्रीची वेळ होती. लाईट गेली होती आणि त्या अंधारात माझी आई घरातचं शेळीचं दावं पायात आडवं आल्यानं पडली आणि आईचा हात दुखावला. त्या रात्री त्या हाताला खूप सूज आली आणि वेदना ही फार होत होत्या. तिला दुसऱ्या दिवशी गडहिंग्लजला खाजगी दवाखान्यात दाखल केलं. तेंव्हा डॉक्टरांनी सांगितले की, हाताचं ऑपरेशन करावं लागेल. त्यावेळी तेवढे पैसे भरण्याची आमची परिस्थिती नव्हती. काय करायचे मला सुचत नव्हते. या कठीण प्रसंगात मला एकाच व्यक्तीची  आठवण होत होती ते म्हणजे माझे केंगार सर. लागलीचं मी गावाकडे आलो. सर कॉलेजमध्ये भेटतील म्हणून त्यांच्या आधाराच्या ओढीने मी माझ्या पांगिरे गावापासून धावतच माझं कॉलेज गाठलं आणि सरांना सर्व हकीकत सांगितली. मी हतबल होतो,पुढे काय करायचं काहीच सुचत नव्हतं. पण सरांनी माझ्या पाठीवर हात ठेवत मला धीर दिला आणि त्यावेळस पैशाचीही मदत केली.

                 शिक्षणाच्या निमित्ताने जरी मी बाहेर पडलो तरी सरांशी असलेला घट्ट ऋणानुबंध नेहमी दृढ होत राहिला. डी.एड नंतर खऱ्या अर्थाने नोकरीसाठीचा माझा संघर्ष सुरू झाला. त्यावेळी सरांनी वर्गात सांगितलेल्या नारायण सुर्वे यांच्या 'दोन दिवस' या कवितेची मला तीव्रतेने आठवण व्हायची. मध्यंतरीची वर्षे पालापाचोळ्यासारखी उडून गेली. नोकरी लागेपर्यंत खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. त्या काळात केंगार सर मला वेळोवेळी कठीण प्रसंगात आर्थिक मदत करत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यानंतर मी एका विनाअनुदानित शाळेत नोकरीला लागलो.  विनाअनुदानितच्या काळात ते आजपर्यंत सर मला वडीलकीच्या नात्याने मला धीर,आधार देत आले. मी जिथे शाळेत नोकरी करत होतो त्या ठिकाणीही सरांनी वेळ काढून एकदा माझ्या शाळेला भेट दिली होती.

                        गुरुचे आशीर्वाद गुरुचे बोल किती खरे ठरतात. याचा एक साक्षात्कार मी सांगेन. ज्या वेळी मी नोकरीमध्ये नव्हतो, त्यावेळी सर एकदा मॅडमांच्यासह माझ्या घरी अचानकच आले. त्यावेळी माझ्या घरची,माझी अवस्था बघून मॅडम हळहळल्या. अजून नोकरी नाही,ही अशी गरिबी परिस्थिती पुढे लग्न वगैरे कसं व्हायचं..? मॅडम माझ्याविषयी फारच चिंतीत झाल्या होत्या. त्यावेळी सर मला एक वाक्य बोलले, " किरण...तुझं चांगलंचं होणार काळजी करू नकोस, तू मुलगी बघायला कुठंही जायचं नाहीस, उलट एक दिवस मुलगीवाले तुझ्या घराकडं येतील." सर असे बोलून गेले आणि आज सरांचे हे बोल खरे ठरताना मी अनुभवतोय. आज आईवडिलांच्या,गुरूंच्या आशीर्वादाने माझी  विनाअनुदानितवरून  १००% अनुदानित शाळेवर बदली झाली. आणि आता...

बदल गयी है दशा बदल गयी है दिशा 

अब हवा का मोड भी बदल जाएगा | 

               कोणती नवीन पुस्तकं वाचायची, कोणत्या विषयावर लिहायचं, साहित्य कथा कविता यावर आजही सरांची आणि माझ्यात चर्चा होत असते.सरांच्याकडून मला मार्गदर्शन मिळत असते. वर्गातले ज्ञान आज वर्गाबाहेरही मला मिळते त्यामुळे माझ्यासारखा मीच भाग्यवान..!  सरांचे माझ्यावर पुत्रवत प्रेम आहे आणि माझ्याही हृदयस्थानी केंगार सरांचे स्थान हे आईवडिलांच्यासमान आहे. सरांच्या कुटुंबाशी ही माझे तितकेच घरोब्याचे संबंध आहेत. माझ्या वाटचालीत सरांचे नेहमीच मार्गदर्शन होत आले आणि याही पुढे होत राहील हा माझा विश्वास आहे. एका पाठीमागच्या बेंचवर बसलेल्या विद्यार्थ्याला पुढं आणून आपल्या प्रेरणेतून शिक्षक होण्याचं स्वप्न दाखवून दारिद्र्यरेषेच्या वर आणणारा असा शिक्षक लाभण हे त्या विद्यार्थ्याचं भाग्य म्हणायचं. नाही तर पाठीमागचा विद्यार्थी पाठीमागेचं राहिला असता अशा शिक्षकांच्यामुळे तर आज मी हे सन्मानाचे दिवस पाहतोय...

                     केंगार सर आज २९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. एकीकडे आनंद तर दुसरीकडे दुःख अशा संमिश्र भावना मनात दाटलेल्या आहेत.आनंद यासाठी की, सर आता निवृत्तीनंतरचे जीवन मुक्तपणे स्वतःसाठी जगू शकतील आणि दुःख यासाठी की एक हाडाचा शिक्षक चार भिंतीच्या वर्गात शिकवण्यासाठी इथून पुढच्या विद्यार्थ्यांना दररोज लाभणार नाही. पण केंगार सरांच्या सारखे शिक्षक हे वर्गापुरते सीमित नाहीत तर  बाहेरच्या दुनियेच्या शाळेत पाठीमागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना सदैव पुढं आणण्याचं काम ते अखंडीत करत राहतील. हे मी माझ्या अनुभवारून ठामपणे सांगतो...आणि मी विराम घेतो...शेवटी एवढेच सांगेन..

सर तुम्ही शिकवलेत धडे जीवनाचे 

त्या धड्यातून जीवन घडवत राहू...

सर तुम्ही शिकवल्यात कविता अनेक

त्या कवितांचा अर्थ जगण्याला देत राहू...

सरांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखा,समाधानाचे आनंदाचे आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!

जय हो..!  मंगल हो..!!


 किरण सुभाष चव्हाण

८८०६७३७५२८.

1 टिप्पणी:

  1. खूप साधा सरळ माणूस...
    निवृत्तीनंतरच्या निरोगी जगण्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🌷

    उत्तर द्याहटवा

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...