फॉलोअर

सोमवार, २० एप्रिल, २०२०

'गावकुसातील कथा' -'इस्वासघात' - किरण चव्हाण. (पांगिरे)

           

'इस्वासघात'

                                सात वरसाची आसल तवा गळ्यात माळ पडली.एक सवतर भण आदीच या घरात दिली व्हती.आणि आता दोघी सख्खा भणी सख्या जावा म्हणून अशा मिळून तिघी भणी एकाच घरात नांदणार व्हत्या.आडमुठ्या तिघी एकाच घरात कशा द्यायच्या...? पानोठ्यावरनं तिघीनी पाणी कसं आणायचं..? म्हणून.. दोघा पाहुण्यांस्नी कोडं पडलं.मग काय नवरीच्या बापानं मंडपात गायच आणली आणि एक आगुदरच दिल्याली लेक, आता दोघी सख्या भणी आणि चवथी गाय अशी तडजोड करून घर भरणी करून दिली. सखू आणि शारु सख्या भणी आणि मालू सवतर भण सख्या जावा म्हणून नांदायला लागल्या...सखु रंगानं काळी आणि शारु तिच्यापरास उजवी व्हती,रंगानं पण गोरी.साताप्पा मुंबईत कामाला.. त्यामुळं राहणीमान जरा शहरी..थोरला भाऊ गावाकडं शेतीभाती बघायचा. धाकटा साताप्पा नवरा म्हणून एकटाच नवऱ्या बघायला आला..थोरला आलाच नाही त्यानं सांगूनच टाकल्यालं "आप्पा तू एकटाच जा पोरगी बघायला..मी आदीच एकदा बघितल्यात ती काळी हाय ती थोरली मी करून घेतो..नी धाकटी गोरी हाय ती तू करून घे.." अशी सगळी गंमत आणि मग सख्या बहिणीला बघायला एकच नवरदेव आला...
                          शारु कवळी पोर सात वरसाची.साताप्पा कवळ्या मिसरूटाचा सतरा आठरा वरसाचा.संसार सुरू झाला.नव्याच नऊ दिस सरलं आणि नव्याकोऱ्या कवळ्या नवरीला मागं ठेऊन साताप्पा पोटासाठी मुंबईला आला.पिल्यास्टीकच्या पिशव्या तयार करण्याऱ्या कारखान्यात काम करत व्हता.खेळकर पोरसवदा वयाची शारू.गळ्यात काळ्यामण्याचं दोरलं आलं. कपाळाला कुकू ल्याचं.अंगणात परसात खेळायचं बागडायचं,जेवणापाण्यानं खेळायचं वय पर चुलीम्होरं बसून जेवाण करायचं.. थोरल्या माणसानी वाढायचं.. आणि मग शेवटाला नकाड्या पोटाच्या मोठ्या भुकंला चार घास पोटात ढकलायचं.चिमुरड्या हातात लुगडी मावायची नाहीत खरं ती चोळायची धुवायची.अगदी धाकल्या वयात ही प्रपंचाची जबाबदारी तिच्यावर आली.तरी थोरली जाऊ म्हणून सवतर भण नी तिच्या पाठीवरची सखी भण व्हती म्हणून जरा त्या दोघीजणी सांभाळून घ्यायच्या...पर एकीन नांदनं जास्त काळ टिकलं न्हाई.
                        पुढं पुढं भावाभावांनी येगळं घेतलं..आणि आता तिच्या एकटीवर सगळी जबाबदारी  पडली.त्यात नवरा जवळ न्हाई..मुंबईला घेऊन जायाचं जायाचं म्हणता खरं किती दिस झालं. म्हणं तिथं त्येजाचं मेळ लागत नव्हता..तवा बायको आणल्यावर खोलीभाडं.. भांडीकुंडी.. प्रपंचाला काय एक लागतंय मुंबईसारख्या नगरीत आता नवीन संसार उभा करायचा एवढं सोपं हाय का..?...त्यात पगार तुटपुंजा. म्हणून त्यो टाळत व्हता...पर इकडं शारूचा जीव लई तळमळायचा.. आपल्या माणसासंग असल्यालं कसं..? इथं कितीबी केलं तरी सख्या भणी असल्या म्हणून काय झालं..?  त्येंच्या त्यासनी प्रपंचा हायच की,किती म्हणून त्या ध्यान देणार तरीबी अडीनडीला त्येंचाच आधार.जवा कवा नवरा यायचा तवा तिला डोंगराएवढा आधार वाटायचा.
                              अशीच वरसं मागं सरली.नेणती शालू आता जाणती झाली.डुईवर पदर आला.आता साऱ्याचा अंदाज गावला हुता,प्रपंचात सराईत झाली व्हती.नवरा यायचा मुंबईसनं धा-पंधरा दिस ऱ्हायचा.येताना पेटीतनं कायबाय आणायचा...नवी जुनी कापडं चोपडं एखादं अंगरखा-पॅन्ट गल्लीतल्या सातुमाला...भैरूमाला हौसनं द्याचा..या घडीला आला ते काय येगळच घिवून. हेच्या पेटीत दारूचं मोठं दोन-तीन तुंबं.शारूनं ते बघितलंबी,म्हंजी आता नवऱ्याला दारूची लत लागली म्हणायची..थोरल्या भावांच्या माघारी चोरूमारून प्यायचा..हे बघून शारू थिजून जायची.काय बोलावं नी कुणाला सांगावं आपलंच दात नी आपलंच व्हट.. मुकाट्यानं ती सगळं बघत व्हती.बहिणी जिच्या तिच्या संसारात चांगल्या गुतल्या व्हत्या..त्येंच्या पोटाला दोन तीन लेकरं व्हती...शारूलाबी दिस गेल्यालं पहिल्यानं गरवार व्हती.पर देवाच्या मनात काय व्हतं कुणास ठाऊक..? तोंडाचा घास मुखापतोर यावा आणि तो काढून घ्यावा तसं झालं.नुकताच जलामल्याला बाळराजा देवानं काढून घेतला.बाळंतपणात मुल दगावलं.नऊ महिनं पोटात जीवापाड जपल्याला गोळा मातीआड करताना तिज तिला काय झालं आसल इचारच न केल्याला बरा.नशिबाचा भोग म्हणायचा पहिल्यानं एवढं साजरं पॉर पोटाला  जलामलं खरं व्हट्यातन काढून घेतलं.जमोलभर काळजाला डाग पडला.
                               काळजाचा तुकडा गेला जखम तशीच वली व्हती एक वरीस झालं नी दुसऱ्या डाव ऱ्हायलं. या येळला तिनं लई नवासपाणी केलं.जिथं तिथं मागून घेतलं.लेकरू सहीसलामत जलमू दे.. जगू दे.आणि तसंच झालं...साजरी लेक जलामली...बाळ तरी ठणठणीत निपाजलं.तरी त्याला लई काळीजमाया करून तळहाताच्या फोडागत जीवापाड जपलं.जवा दुसरं मुलं जलामल तवा कुठं पयल्या वल्या जखमवर खपली धरली...या बाळाच्या उसाभरीत त्ये दुःख इसरून गेली...आता तिच्या जीवाला आनंद झाला..पर त्या आनंदाला विरझान लागावं ,भरल्या दुधात मिठाचा खडा पडावा जितनी तसं...आता कुठं सगळं जितल्या तिथं सगळं बेस चालल्यालं.पर तिच्या आदीची भन सखु..तिला कसला आजार झाला त्यो मागं हटायचं नावच न्हाई.आजार लईच बळावत गेला.जगती का ऱ्हाती अशी तिची गत झाली.म्हणं डाक्टर म्हणत व्हतं..'कॅन्सर का काय तसला आजार तिला झालाय आता ती यातन टिकणार न्हाय.' आणि खरंचबी धाकलं पॉर आम्याला व्हतं आणि बापडीन पलांग मारली.तीन नकानकाडी पोरं मागं ठेऊन बिचारी गेली.शारूचाबी आधार गेला.धाकली भन म्हणून तिनं लई सांभाळ करून घेतला.जाऊ असून कधी कुठल्या गोष्टीवरनं भांडलीझडली न्हाई..थोरली सवतर भन व्हती..किती केलं तरी सवतरच ती सवतीसारखीच वागायची पण या आक्काची गोष्टचं न्यारी व्हती...आईइना पोरं पोरकी झाली.खरं म्हणत्यात नवं 'माय मरो नी मावशी उरो.' भणीची लेकरं ती आपलीच समजून सांभाळ करू लागली.भणीला पहिली लेक व्हती तरीबी धा वरसाची  जरा जाणतीच व्हती शारुन तिला चुलीम्होरं बसताना जवळ घेऊन बसायची जेवणातली एकेक गोष्ट शिकवायची .पोरभी चुणचुणीत लागलीच मावशीच्या हाताखाली सारं तिनं शिकून घेतलं..आता ती सवत्या चुलीवर जेवाणबी करू लागली. घरातली भांड्यांची मांडामांड करू लागली.तरी मावशीची सारखी नदार असायचीच.कमीजादाला ती जातीनं ध्यान द्यायची. पोरबी हुशार घरातली पडल ती काम हौसनं करायची...तसं तिला मावशीनं मडवलंच व्हतं.माय माघारी पोरीनं सगळी जबाबदारी शिरावर घेतली. शारुचा टांगणीला लागल्याला जीव जरा हलका झाला.
                              निदान दोन चार महिन्यातन साताप्पाची एकादंरी फेरी गावाकडं व्हायची.पर अलीकडं गडी वरसातनं इकदाचं यायचा.एकुलती एक पोर खरं आपरुबाईनं मिठाईचा पुडा कपडालत्ता आणील म्हटलं तर ह्येच्या पेटीत आता नुसतं दारूचं तुंबं. गडी एकदम बिघडल्यासाराच झालता...बायकोसंग सळ बोलायचं न्हाई..का कुणासंग बोलायचं न्हाई..आपल्याचं नादात.पोरीलाबी गोडीन जवळ घिऊन आपरुवाई करायचा न्हाई...आता ह्येच्या वागण्याला कुणी काय बोलावं नी कुणी समजून सांगावं..मुंबईसारख्या शरसिटीला ऱ्हाणारा माणूस..चांगल्याचुंगल्या माणसात वावरणारा..आता इकडच्या अडाणी माणसांनी काय सांगावं.?..शारुन तरी डोक्याला हातच लावला.बाई आतल्या आत खचून गेली.आता कुठं संसाराला खरी सुरुवात झाल्याली खरं ह्यो माणूस काय धड वागत नव्हता.कसं व्हायचं म्होरं..? आता साताप्पा गावाकडं इल त्या येळला अशीच गत...आता बायकोवर हातबी उगरायचा,मारझोड करायचा..गावाकडं आल्यावर ह्येला पैसं दे त्येला पैसं दे आसं करत पैसं उधळून परत जातावक्ती ह्येज्या खिशात एक रुपयबी ऱ्हायाचा न्हाई.. शेवटाला बायकोनं लोकाच्यात मजुरीला जाऊन शेपाचशे घेऊन ह्येच्या हातात ठेवायचं आणि मग त्या पैशांवर त्यानं मुंबई गाठायची...बोलण्या चालण्याला चांगला वागणारा शांत गडी असा कसा काय एकाएकी उधाळला.. वाकडं वागाय लागला याचं कोडं सगळ्यास्नी पडलं व्हतं.. आता ते कसं उमजायचं..?
                             साताप्पा ज्या पिशव्यांच्या कारखान्यात कामाला व्हता.तिथंच एक बाई कामाला व्हती.दोघजण एकाच ठिकाणी कामाला..बोलता बोलता वळखीन वळख वाढत गेली...हळूहळू जोडी जुळत गेली..एकमेकांसंग खाणं-फिरणं वाढतच गेलं.. त्या बाईबरोबर साताप्पाचं सुत जुळालं.. आणि एकदिस गोष्टी लग्नापतोर येऊन ठेपल्या...एक दिस बाईनं ईचारलंच..."तुमचं लगीन झालं न्हाई नवं तर आपुन लगीन करूया."  गड्यानं काय उत्तर द्यावं..? लग्नाची एक बाई घरात असताना एवढंच नवं पोटाला एक पोरगीबी असताना गडी एकदम साफ खोटं बोलला..."न्हाई.. न्हाई..माझं लगीन झालं न्हाई.." तशी बाईन चांगली दमदाटीत सांगितलं "बघा हं नंतर खोटं ठरशीला मी घरात सांगून सवरून तुमच्याशी लगीन करणार हाय...खोटंबिटं ठरलं तर माझं भाऊ लई वांड हायती." पर रुपाला भाळल्याला गडी...वाघाला सावज आणि बापयाला बाईचा ऐवज बघून मन आवरतंय व्हय..ते तयारीतच आसतय हेरायला..साताप्पानं बिलकुल मागचा म्होरचा इचार केला न्हाई..आणि लगीन झालंच न्हाई म्हणून सपशेल थाप मारली.एकदासं लगीन करून घेतलं. लगीन केलं त्ये गड्याचं गावाकडं यायचं नांव न्हाई.बायको मुलाची याद न्हाई..की मागच्या गोतावळ्याचं भान न्हाई.का कसला निरोप मागारी न्हाई.इकडं शारूचा जीव मातूर नवऱ्यासाठी खाली वर व्हयाचा,जीवाला बोचणी लागून ऱ्हायल्याली...कुणाकुणाकडणं किती येळला निरोप धाडलं.. पर मागं उत्तर काय न्हाई...पर पाण्यात हागल्यालं कधी ना कधी वर येतंयच...आणि एकदिस मागं कळालं साताप्पानं दुसरं लगीन करून घेतलं.शारूच्या काळजालाच घरं पडली..ध्यायीदिशा रडली...नशिबाचा भोग म्हणून मागं सारून पुढं चालली..जवापासून तिला नवऱ्याचं ह्यो कारनामा समजला तवापासून मग तिनं त्येची आशा सोडून दिली.
                                गडी बाईच्या शहरी रुपाला भाळला तिच्याबरोबर संसार थाटला  नी गावाकडच्या गरीब साध्याभोळ्या भाबड्या बाईच्या संसाराचा डाव अर्ध्यावर सोडला.साताप्पा आता आपल्या संसारात रंगला..खर इकडं शारूच्या संसाराचा बेरंग झाला.ती मातूर पोरीकडं बघून ती दिस काढू लागली..एक शेळी व्हती दुसऱ्याच्या बांधला जाऊन मोलमजुरी करून खावू लागली..कुठली अवदसा सुचली आणि सोन्यासारख्या संसाराची या बापयानं वाट लावली..सोन्याची सूरी चांगली दिसती म्हणून पोटात खवुन घ्यायची काय..? मांडवावरचा चढता येल आपल्याच हातानं मोडायची काय गरज व्हती..? अशीच काही वरसं मागं सरली आणि एक दिस साताप्पा गावाकडं आला.या येळला गडी आला खरं त्याचा रंग न्याराच व्हता.वागण्यात लई मऊपणा व्हता.जेवढ्याला तेवढंच कुणासंगबी बोलायचं.नाही तरी संबंध दिसभर आपल्याच नादात..दारू तेवढी हु म्हणून ढोसायचा…कधी घरात एकटाच असला की,डोळ्यांतन टीपं गाळायचा... काय झालं हुतं त्याज त्याला माहित...बायकोच्या नजरला नजर द्यायलाबी लाजायचा...रातीच्याला दारू पिला की,सारखा नुसता रडत असायचा..बायकोनबी राचं झोपतावक्ती खूपदा ताडलं...
"काय झालं वं.. का डोळ्यात पाणी आणताईसा सारखं." पर एका शब्दानं त्याला उत्तर देता आलं न्हाई..
महिना झालं उद्या जायचं करत करत म्होरं चार दिस ढकललं..जायाला मनच हुईना आता उद्या मुबंईला जायचं तरी जाऊ वाटना... तरी जड अंतःकरणानं आणि भरल्या डोळ्यानं गडी बाहेर पडला...
                            हातचं सोडून पळत्याच्या मागं लागलं की आसच हुयाचं.रूपावर भाळला..लगीन केला.. पोटाला तीन पोरं झाली..आता संसारालाबी कित्येक वरसं झाली.खोटं जास्त दिस न्हाई लपून ऱ्हाईत.दुसऱ्या लग्नाचा खोटेपणा त्या साध्याभोळ्या बायकोपाशी पचला खरा म्हणून का या बायकोपाशी पचतोय..जवापासून बायकोला त्याच्या मागच्या बायकोमुलाचा सुगावा लागला व्हता तवापासून ही सोन्याची सुरी पोटात रुतत व्हती..प्रपंचात सन्यादान नव्हतं. हरेक येळला खटका उडायचा.सारखी घालून पाडून बोलायची.. आपल्या भावांची धमकी द्यायची.आता बोलायची सोय नव्हती...गावाकडंची बायको मुंबईला येताशेवटी गाडीउताऱ्याला कामाची मजुरी हातात द्यायची आणि हिथ राबराब राबून महिन्याशेवटी या बाईच्या हातात मजुरी द्यायची पाळी यायची..जिथं किंमत व्हती तिथं किंमत दिली न्हाई,आणि जिथं किंमत द्यायला गेला तिथं किंमत ऱ्हायली न्हाई..आता समदं खरं खोटं त्येला कळाल्यालं...पण उपेग नव्हता...
                            गावची माती...माणसं.. बायको-लेकीची वढ मनाला लागायची पर इथल्या बायकोम्होर काय चालायचं न्हाई..गावाकडचं नाव जरी काढलं तरी बायको जळायची... गडी बैलासारखा खाल मान घालून गप बसायचा...गावाकडं जायाला मन उचल खायाचं बायकोपुढं इलाज चालायचा न्हाई..फार कुचंबना व्हायची...आता त्येला आठवत व्हतं तसं डोळ्याला गळती लागायची..कवळ्या कपाळावर कुकू लिवून शारु बायको म्हणून आली..आणि प्रपंचाला सुरुवात झाली..नवरा मुंबईला हाय म्हणून कसली आशा दावली न्हाई का कसला जिगरहाट केला न्हाई..चारचौघ्या पोरीतनी खेळायचं वय पर कवळ्यापणात चुल फुकायची.नी..प्रपंचाची जबाबदारी शिरावर आली.मागं हटली न्हाई..नवऱ्यामागारी जिद्दीनं संसार केला...पर नवऱ्याला ही आसली आवदसा सुचली.बाईनं पतीव्रता म्हणून ऱ्हायाचं आणि बापयानं मुलखात शेण खायचं ही कसली रित म्हणायची...बायकोपोरीला आस उघड्यावर टाकून नवीन संसार थाटला...त्यांचा काय गुन्हा व्हता..? पण खोट्यानं वागणं न्हाई जास्त दिस टिगत..या जन्मात पाप करायचं आणि पुढच्या जन्मी फेडायचं आता आसं ऱ्हायलं न्हाई.. इथंच पाप करायचं आणि इथंच फेडायचं.
                                        साताप्पाला कळून चुकलं त्यानं गावाकडच्या सोन्यासारख्या सध्याभोळ्या बायकोचा इस्वासघात केला तिचा कसलाच इचार न करता दुसरं लगीन केलं...त्या निष्पाप मायलेकीच्या भवितव्याचं काय..?आता त्याचं डोळं उघडल्याल.पण येळ निघून गेल्याली.मातूर अशा इचारांनी त्यानं कच खाली...जीवाला लावून घेतलं.दारूच्या बाटलीत सगळं दुःख बुडीवलं.निवळ दारून दारू अंगात भिनली.एक दिसबी नशेला आराम न्हाई..आणि शेवटी चालता बोलता गडी हातरुणाला आडवा झाला...अंगाचा लोळागोळा व्हवून पडला...खाणंपिणं कमी झालं...तरवणी पाण्यावर जीवाचा हवाला...आकिरला वाचा गेली...तीन महिनं झालं...अजिबात बोलता ईत नव्हतं जे काय बोलायचं ते कागदावर ल्यायचं नी दावायचं...त्या दिशी एक कागुद बायकोच्या हातावर ठेवला..त्यात लिल्याली शेवटची ईच्छा व्हती..गावाकडच्या गोतावळ्याला बलवून घ्या पर त्यात गावाकडच्या बायकोचा उल्लेख नव्हता...आता कुठल्या तोंडानं तिला बलवायची...मनाला लाज वाटून ऱ्हायली व्हती...पश्चातापानं डोळं भरून उलटत व्हतं...आता जे केलं ते नजरला दिसत व्हतं.गुन्हा केला आता त्याचं फळ मिळालं व्हतं. .'इस्वासघात केला' ऱ्हा ऱ्हावून आतल्या आत मनाला खाईत व्हतं...पर मनातलं वठावर इल कुठलं..?आकिरला अपराधीपणानं त्यानं डोळं मिटलं.

----------------------------------------------
- किरण सुभाष चव्हाण.(पांगिरे)
मोबा-८८०६७३७५२८.

५ टिप्पण्या:

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...