'आमच्या गावाला जाऊ द्या.'
आसला कसला त्यो कुठंन कुरुना आला.
जिंदगीचा साऱ्या खेळ खडूंबा झाला.
पोटासाठी आम्हीं माणसं परमुलखातून आलो.
पॉट तर उपाशीच वर भिकारी झालो.
दिनरात दगडा मातीसंग झट्ट दियाचं.
तवा कुठं पोटाला पोटभर खायाचं.
आता सगळंच बंद झालया हाताला मिळना काम.
काम न्हाई तर आम्हांला कोण बरं दिल दाम..
रेड्यासारखं गडी आमचं,हातावर हात बांधून बसलं.
बायांनी शिजवायचं काय आणायचं तरी कुठलं.?
पोटाची भूक ती आम्हीं कशी तरी आवरू.
पर कसं ऱ्हाईल वं उपाशी आमचं नकाडं लेकरू.
रक्ताच्या नात्यातली घरची दोन माणसं मेली.
नाही जाता आलं गावाला गोतावळ्या माघारीच नेली.
कायली व्हती नुसती जीवाची कायबी कळना.
डोळ्याची धार आता तुटता तुटना.
आणि काय वाट्याला यायचं हुतं लई भोग भोगलं.
असं जिण्यापरीस वाटतं मराण लई चांगलं.
गावाकडं जायाचं कसं वाट गवसना.
आणि किती दिस सोसायचं आता राहवना.
कुरुनामुळ आलं एकदासं मराण तरी येऊ द्या.
पर पयल आम्हांस्नी आमच्या गावाला जाऊ द्या..
----------------------------------------------
- किरण सुभाष चव्हाण.(पांगिरे)
मोबा-८८०६७३७५२८.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा