फॉलोअर

बुधवार, २७ मे, २०२०

'मृत्युंजया..कोमल गोडसे पवार.'



'मृत्यूशी कडवी झुंज देऊन मृत्यूवर मात करणारी मृत्युंजया..कोमल गोडसे पवार.'

                                एक प्राणज्योत...तेवतेय आपल्या नादात.स्वयंस्फूर्तीने उजळवतेय आपला भोवताल.पण अचानक तिच्या अवतीभोवती घोंगावू लागतं ते काळवाऱ्याचं वादळ...ती थरारते.. बिथरते...तिचा अस्तित्वासाठी संघर्ष सुरू होतो त्या वादळाशी...ते वादळ तिला मालवू पहात होतं... पण ती मात्र विझायला तयार नव्हती...पण भयाण काळवाऱ्याच्या वादळात अडकलेली ती ज्योत...हळूहळू क्षीण होत होती.तिच्याभोवतीचा काळोख अधिकच दाट होत होता.पुढचं अंधकार भविष्य कसं लख्ख दिसू लागलं होतं..तो निष्ठुर काळ तिला झुंजवत..छळत होता तिच्या प्राणांसाठी आतुरला होता..प्राण तिच्या कंठाशी आले होते.त्याने पुरता कब्जा केलाच होता. पण आता तिचाही संयम ढळत होता...तिला ही आता स्वतःहून विझू वाटत होतं...पण मुळात ती एकटी नव्हती जीवलगांचे अनेक हात  तिला विझण्यापासून वाचवत होते.त्यांच्यामुळेच तर  विझता विझता सावरून ती पुन्हा उभी ठाकत होती..प्रत्येक श्वासागणिक तिचा संघर्ष ठरलेला.हळूहळू प्रत्येक श्वास अपुरा पडत होता.अपुऱ्या श्वासांविना तिची तडफड होत होती...तरीही जीवाचा आकांत पुकारत होता..."मला जगायचंय...मला माझ्या हक्काचा पुरेपूर श्वास घ्यायचाय"..अखेरपर्यंत झुंजत राहिली...ही झुंज साधीसुधी नव्हती तर ती होती प्रत्यक्ष मृत्यूशी.मृत्यू सतत तिच्या भोवती घोंगावत होता.. पण ती ही प्राणपणाने लढली...आणि अखेर तिने मात केलीच त्याच्यावर.तो तिचा विजय काही साधासुधा नव्हता तर तो होता मृत्युंजय....
आणि जीवनमरणाच्या रंगणागणातील ती विजयी वीरांगना होती अर्थातच कोमल गोडसे-पवार...

                     साताऱ्यातील एका मध्यमवर्गीय कुटूंबात २८ डिसेंबर १९९० रोजी कोमलचा जन्म झाला.वडील बजाज कंपनीत नोकरीला होते तर आई साताऱ्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून.एक मोठा भाऊ.असं चौघांचं छोटेखानी सुखी कुटूंब.तशी परिस्थिती बेताचीच.कोमल एक हसरी खेळकर आईबाबाची लाडकी अशी गोड मुलगी.बोलक्या स्वभावाची,चुणचुणीत आणि हुशारही.शालेय शिक्षण निर्मला कान्व्हेंट स्कुल येथे पूर्ण केलं.त्यानंतर रयत शिक्षण संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली तसेच पुणे विद्यापीठातून एम.ई. सिव्हिल ही पदवी प्राप्त केली.मुळातच तिला  देखण्या रुपाचं वरदान लाभल्यामुळं महाविद्यालयीन काळात आपला अभ्यास सुरू ठेवत तिने विविध सौंदर्य स्पर्धेत भाग घेऊन यश मिळविले.


२०१३ ते २०१५ या काळात मिस कराड,मिसेस सातारा आणि मिस पुणे असे सौंदर्य स्पर्धेतील मानाचे किताब जिंकले.नुकतीच यशाची अशी गोडी चाखत असताना एक कडू घास लागला.तो म्हणजे ३० जून २०१३ साली हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आईचं अचानक निधन झालं.हा कोमलसह कुटूंबाला खूप मोठा धक्का होता.


उमलती लेकरं आणि भरला संसार अर्ध्यावर टाकून ती माय निघून गेली.एकीकडे मायेचं छत्र हरपलं त्यात नोकरीतून निवृत्त झालेले वडील,एक भाऊ तो ही शिकत होता अशातच घराची संपूर्ण जबाबदारी कोमलवर आली.
                                    कुटूंबाची आर्थिक घडी सावरणे महत्वाचे होते.त्यामुळं आईच्या दुःखातून सावरत तिने आपलं मन खंबीर केलं आणि सातारा येथील यशदा टेक्निकल कॅम्पसमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून अध्यापन सुरू केले.आईवडिलांनी कष्टातून दिलेलं ज्ञान अशा अडचणींच्या काळात फळाला आलं.आर्थिक भार सगळा तिच्यावर असल्याने सकाळी ९ ते ६ वाजेपर्यंत सहा.अध्यापक म्हणून काम करून पुन्हा खाजगी शिकवण्या घ्यायच्या..अत्यंत चिकाटीने परिस्थितीचा सामना करत आर्थिक गणिते जुळवण्याची कष्टप्रद वाटचाल सुरू झाली होती...कुटूंबाची करती धरती झालेल्या कोमलने मोठ्या जिद्दीने आईच्या माघारी आपले घर सावरले...त्या बापलेकाची ती जणू मायच झाली होती. आपल्या पित्याला आणि भावाला आधार देत येणारी सगळी आव्हाने ती आता समर्थपणे पेलत होती.
                                   तारुण्याच्या उंबरठ्यावर असणारं वय..कॉलेज जीवनातील स्वप्नवत सोनेरी क्षण बेधुंदपणे लुटायचे पण त्याच वयात ती प्रत्येक क्षण आपल्या कुटूंबासाठी वेचत राहिली.  मुलगी उपवर झाली की बापाचं मन काळजीनं आतल्या आत झुरतं.आपल्या घरासाठी जीवाचं रान करणारी लेक.पण तिच्या घराचं काय..? आता तिने लग्न करायचा नवीन संसार थाटायचा..पण हा विचार तिच्या मनात येतच नव्हता...तिने फक्त आपल्या कर्तव्याला वाहून घेतलं होतं.पण बापमन स्वस्थ कसे बसेल...?त्यांनी तिच्या लग्नासाठी तयारी सुरू केली...पण तिला अजून बरंच काही करायचं होतं त्यांच्यासाठी...
                   पण वडिलांच्या आणि नातलगांच्या आग्रहाखातर ती बोहल्यावर चढली.१४ मे २०१५ साली उच्चशिक्षित असणाऱ्या फलटणच्या धीरज गोडसे यांच्याशी ती विवाहबद्ध झाली.

सासरचीही सगळी मंडळी अतिशय प्रेमळ..मनासारखी माणस मिळाली होती.एका नव्या सहजीवनाला सुरुवात झाली.अनेक सुखस्वप्ने खुणावू लागली...संसाराची ती कोवळी वेल नाजूक क्षणांनी नटून थटून नव्या नवलाईने सजलीधजली होती..नवीन घर नवीन माणसं..तोरणा दारी नवी स्वप्नं...नवी आशा...आकांक्षाची झुबर आनंदाने झुलत होती... नुकतीच सहजीवनाच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली होती.कसे तरी चार पाच महिने उलटले नव्याकोऱ्या  संसाराला,हसत्या खेळत्या जीवनाला दृष्ट लागावी तसं झालं.चार महिन्यानंतर अचानक धाप लागायला सुरुवात झाली,बोलताना चालताना धाप लागायची,चक्कर यायची,थकवा जाणवायचा.जेवण जायचं नाही..सुरुवातीला याची कल्पना घरी दिली परंतु नवीन लग्न झालंय असं व्हायचंच, असे मानसिक, शारीरिक बदल होतच असतात अशी त्यांची समजूत झाली होती.तरीसुद्धा उपचारासाठी साताऱ्यातील मोरे नर्सिंग होममध्ये कॅल्शियम, आयर्न रक्त वाढीचे उपचार सुरू केले.आतापर्यंत वयाच्या २५ वर्षापर्यंत कसलाच त्रास नाही,धाप नाही कधी दवाखान्यात ऍडमिट झाली नाही..इतकी शरीरानं धडधाकट.. तब्येतीनं ठणठणीत असणारी मुलगी त्यामुळे अचानक सुरू झालेल्या या त्रास कुणी फारसा मनावर घेतला नाही.त्यात  किडनी स्टोनचा त्रास सुरू झाला.त्यामुळे उलट्या व्हायच्या.उपचारांनंतर हा त्रास कमी झाला.पुन्हा कॉलेजला जाणं सुरू झालं.पण एक दिवस कॉलेजमध्ये लेक्चर घेत असतानाच तिला रक्ताची उलटी झाली....लागलीच दवाखान्यात ऍडमिट केलं गेलं.

काही तपासण्याअंती कोमलला 'हाय प्रेशर लंग्ज' म्हणजे फुफ्फुसामध्ये संसर्ग झाल्याचे निदान झाले.आणि साऱ्यांनाच धक्का बसला.तब्येत अधिकच खालावल्याने तिला साताऱ्याहुन पुण्याला रुबी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं.तिथे डॉ.जगदीश हिरेमठ यांनी उपचार सुरू केले..कोमलच्या साऱ्या तपासण्या केल्या आणि शेवटी आजाराचं निदान झालं..'प्रायमरी पल्पनरी हायपर टेन्शन.'.म्हणजे  फुफ्फुसाचा आजार यामध्ये फुप्फुस निकामी होते.ऑक्सिजन वहनाची क्षमता कमी होते आणि ती व्यक्ती कृत्रिम ऑक्सिजनवर अवलंबून राहते...कोमलला कृत्रिम ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं...आता धाप खूप वाढली होती..डॉक्टरांनी धीरज यांना सांगितलं की,"कोमल आता काहीच दिवस जगू शकणार आहे..म्हणजे जेमतेम सहा महिने."खरं तर हे न पटणारं होतं.हसतमुख असणारी कोमल क्षणात दुर्धर आजाराने बेडवर आली होती आणि आता काहीच दिवसांची ती सोबतीन होती.पण धीरज यांनी धीर सोडला नाही.या दुर्धर आजारावर मेडिसिन उपलब्ध नव्हती म्हणून ट्रायल मेडिसीनवर ठेवण्यात आले होते. परंतु दिवसेंदिवस तब्येत अधिकच खालावत होती.



                         ५६ किलोचे वजन झपाट्याने २० किलोने कमी झाले होते.असह्य वेदना होत होत्या..दिवसरात्र रक्ताच्या उलट्या..कफिंग व्हायचं...रात्रीचं अंग काळं-निळं पडायचं..२४ तास ऑक्सिजन लागत होता..तहानलेला जीव जसा पाण्यासाठी व्याकुळ होतो तसं ऑक्सिजनसाठी जीव व्याकुळ व्हायचा..ऑक्सिजन द्या म्हणून ती आकांडतांडव करायची...पाण्याबाहेर काढलेल्या माशाची पाण्याविना तडफड व्हावी तशी ऑक्सिजनशिवाय तिच्या जीवाची तडफड होत होती...तारुण्याच्या उमलत्या वयात आई गेली आणि लागोपाठ आता या असाध्य व्याधीनं ग्रासलं...अशावेळी मनात प्रश्न पडायचा...हे माझ्याच नशिबी का..?  यासाठी मीच का..? पण आता तरी या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे नव्हती..एकबाजूला धीरजजींचे पराकोटीचे प्रयत्न सुरू होते.आयुर्वेदिक, होमिओपॅथी जे काही पर्याय असतील ते सर्व केले जात होते...पण यश येत नव्हतं..


                    आजाराला आता दीड वर्ष होत आलेलं. जगण्याची कोणतीच आशा आता तरी वाटत नव्हती..आशेचा एकही किरण गवसत नव्हता..प्राणांतिक तळमळ असह्य होत होती..जसं या आजारानं शरीराला ग्रासलं तसं आता नैराश्याने  मनाला ग्रासलं होतं...जगण्याची आशा धूसर वाटत होती..मृत्यू अगदी समीप दिसत होता...अशावेळी मृत्यूने आपल्याला कवटाळण्या पेक्षा आपणच त्याला कवटाळूया म्हणून कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचललं, सगळी औषधं एकादमात खाऊन टाकली...त्यामुळे तर तब्येत आणखीनच खालावली...परिस्थिती अत्यंत अत्यवस्थ झाली..दुर्दैवाने मृत्यूच्या सापळ्यात आपणहून जीव अडकायचा पण सुदैवाने तसं काही झालं नाही..अशा कठीण प्रसंगात धीरजींनी तिला सांगितलं..."तू एवढी शिकली सवरलेली मुलगी आहेस..तू आजारपणाला कंटाळून आत्महत्या करू नकोस, तर उलट त्या आजाराचा प्रतिकार कर..तू त्याच्याविरुद्ध लढत रहा."... आणि धीरजजींचे ते धीराचे  बोल ऐकून खऱ्या अर्थाने तिला धीर मिळाला.ते बोल मात्र नंतर तीने कायम जपले..तिला लढण्याची हिंमत मिळाली आणि पुन्हा तिने मनाला सावरलं..आपली हार मानली नाही..पण मृत्यूही मागे हटायला तयार नव्हता.
                                         ३ मे २०१७ ला प्रकृती चिंताजनक झाली...

२४ तास ऑक्सिजन सुरू होता.ऑक्सिजनची गरज १ लिटरवरून ११ लिटरवर गेली.डॉक्टरांनी सांगितलं..."परिस्थिती इतकी नाजूक आहे की,आता ती एक दिवसही पुढे जाऊ शकणार नाही. तुमच्या हातात फक्त १% टक्का आहे."...याचा अर्थ मृत्यूने९९% विजय मिळवलाच होता.धीरज यांनी आशा सोडली नाही त्यांनी डॉक्टरांना विचारलं १ टक्क्यासाठी आपल्याकडे कोणता पर्याय असू शकतो...?  त्यावर डॉक्टरांनी यावरती एकच पर्याय सांगितला..तो म्हणजे 'हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण.'आणि अशाप्रकारे जगण्याच्या आशेचा १ टक्का घेऊन ९९ टक्के विजय काबीज केलेल्या मृत्यूशी खऱ्या अर्थाने अखेरचा मुकाबला सुरू झाला.

                         पुढील प्रत्यारोपणाच्या उपचाराकरिता कोमलला एअर एम्ब्युलन्सने चेन्नई येथे आणण्यात आले. ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.प्रकृती गंभीर होतीच..जवळपास दीड-दोन वर्षे या आजाराशी झुंज सुरू होती.आता वजन फक्त २० किलो झालं होतं.दररोज ११ लिटर ऑक्सिजन लागत होता. शरीराच्या सर्व हालचाली मंदावल्या होत्या...एकेक अवयव क्षीण होत चाललेले.आणि अशी ही आव्हानात्मक केस तेथील डॉ.संदीप आतावर यांच्या टीमने स्वीकारली.खरं तर हे मोठं आव्हान होतं. मरणाच्या दारात गेलेला जीव परतवून आणायचा होता.पुन्हा सगळ्या तपासण्या केल्या.आणि आणखीन एक धक्कादायक निदान समजलं की,फुप्फुस निकामी झाल्यामुळे हृदय ही निकामी झालं आहे.पण या ही अवस्थेत आशा न सोडता डॉक्टरांनी विश्वासात घेऊन कुटुंबाला सांगितलं की,"आपण आशा ठेवूयात. आपण फुफ्फुस व हृदय अशी एकाचवेळी अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरू करूया..so we go to the transplant."त्यासाठी कोमलची मानसिकता तयार करण्यासाठी समुपदेशन करण्यात आलं डॉ. संदीप आत्तावर सरांनी कोमलला सांगितलं.."कोमल या आजारावर मात करण्यासाठी ९०% तुझी ईच्छाशक्ती काम करणार आहे आणि बाकीचे १०% मेडिसिन तेंव्हा तुझी जगण्याची इच्छाशक्ती बुलंद ठेव."

आणि कोमलनेही अगदी तशीच मनाची तयारी केली आणि मग सर्जरीचा पुढील प्रवास सुरु झाला...
                                                      पण हे सर्व करत असताना या उपचारासाठी तब्बल पन्नास लाख इतका खर्च येणार होता.आगोदरच इतक्या संकटाचा,दुःखाचा डोंगर त्यात एवढ्या पैशाचा डोंगर उभा करावा लागणार होता.आतापर्यंतच्या उपचारासाठी जवळपास १० लाखापर्यंत खर्च झाला होता.मग एवढे पैसे कसे उभे करायचे...? पण थांबून चालणार नव्हते..वर्तमानपत्र.. सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करण्यात आलं.साताऱ्याने तर आपल्या या लेकीची केस उचलून धरली..साताऱ्यातील सर्व कॉलेज यासाठी पुढे सरसावले...घरच्यांनी क्राऊड फडिंग संकल्पना राबवली..आणि बघता बघता या लेकीसाठी अवघा महाराष्ट्र एकवटला.कानाकोपऱ्यातून मदत जमा होऊ लागली..दानशूरवतांचे हात मदतीला धावले .आणि अवघ्या पंधरा दिवसांत पन्नास लाखाची मदत गोळा झाली.कोमलच्या जगण्याला बळ मिळण्यासाठी पैशांबरोबर आशीर्वादही मिळाले.एक आव्हान तरी पूर्ण झालं होतं आता आणखीन एक सर्वात मोठं आव्हान होतं ते अवयवदाता म्हणजे मॅचिंग डोनर भेटणं.डॉक्टरांची टीम पूर्णपणे या कामाला लागली होती पण अजूनही मॅचिंग डोनर भेटत नव्हता...कारण वीस किलो वजन झाल्यामुळे कोमलला आता पिडॅट्रिक डोनर हवा होता. 'पिडॅट्रिक डोनर म्हणजे अवयवदात्याच वय हे २० वर्षांच्या आतील असलेल्या लहान वयाचा डोनर हवा होता.'कारण कोमलचं वजन आता फक्त २० किलो झाले होते..त्यामुळे त्या शरीराला जुळतील असे अवयव हवे होते. अजूनतरी यश मिळत नव्हतं... त्यामुळे हे सारं असह्य होऊन २७ मे च्या दिवशी तिने ठरवलं की,जर मला जर आता नवा श्वास नाही मिळाला तर हा उरलासुरला श्वास ही मी रोखणार आहे, आता हे जीवनच संपवणार आहे..ती पुन्हा ठाम झाली होती...पण सुदैवाने योगायोग असा की त्याच रात्री कळालं.. की केरळमध्ये असा एक तिला मॅचिंग डोनर भेटला आहे
                                        रस्ते अपघातात एका सोळा वर्षांच्या मुलाचे ब्रेनडेड झाले होते आणि त्याच्या आईवडिलांनी अवयव दानाचा निर्णय घेतला होता...त्यांचा तो एक निर्णय कोमलच्या जीवनमरणाचा प्रश्न सोडवणारा होता.आणि तसंच झालं.स्वतःचं मुल गमावलं परंतु त्याचे अवयव दान करून दुसऱ्या एका जीवाला जीवदान देण्याचा त्या आईवडीलांचा संकल्प सिद्धीस आला..कारण ते हृदय आणि फुप्फुस दोन्हीं अवयव कोमलला मॅच झाले...आणि एवढ्या सगळ्या प्रयत्नांती २८ मे २०१७  ला  जवळजवळ ३० डॉक्टरांच्या टीमने १६ तासांची सर्जरी यशस्वीपणे पूर्ण केली.कोमलला तीन दिवस पूर्णपणे डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवलं.आणि चौथ्या दिवशी तिला त्या प्रदीर्घ काळझोपेतून उठवलं..तिने डोळे उघडले..तिच्या आजूबाजूला ते सर्वजण होते ज्यांच्यामुळे आज ती त्यांना डोळेभरुन पहात होती... तिला सांगत होते.."कोमल श्वास घे...आता तुझ्या हक्काचा तू श्वास घे.." आणि कोमलने मोठ्या सायासाने तो नवा कोरा श्वास घेतला... त्या श्वासाने तिला पुनर्जन्म दिला.'काळरात्र होता होता तिच्या आयुष्यात उषकाल झाला होता.' तिची त्या मृत्यूच्या कचाट्यातून सुटका झाली होती... तिने अखेर त्याच्यावर मात केली. जगण्याच्या बुलंद
ईच्छाशक्तीच्या बळावर तिने अखेरपर्यंत कडवी झुंज दिली आणि ती ठरली मृत्यूवर विजय मिळवणारी मृत्यूजंया..


                  जी कोमल स्वतःचा श्वास घेऊ शकत नव्हती.. ती आता स्वतःचा श्वास घेऊ लागली,जी दोन वर्षे बेडवरून खाली उतरू शकत नव्हती..उठून चालू शकत नव्हती.. जी चार भिंतीच्या आत कोंडली गेली होती.तिच्या नजरेला वरचा फक्त फिरणारा सिलिंग फॅन दिसत होता.त्या तुरुंगातून तिची सुटका झाली होती ती आता स्वतः चौफेर फिरण्यास सज्ज झाली होती.. अशी ही कोमल पुढे जाऊन तिने आत स्वतःच वजन वाढवलं, फिजियो थेरपी,जिम, डाएट करून आपली प्रकृतीमध्ये उत्तमप्रकारे सुधारणा केली आणि महाराष्ट्राची लेक सहीसलामत सुखरूपणें महाराष्ट्रात परतली.


                     एकाचवेळी हृदय व फुप्फुस प्रत्यारोपणाची  महाराष्ट्रातील ही यशस्वी झालेली पहिलीच केस होती.पण असे असले तरी महाराष्ट्रात आजही अशा अनेक कोमल आहेत..जे अजूनही उपचारविना या आजाराने खितपत पडले होते मृत्यूशी झुंज देताना अपयशी ठरत होते...कोमलला जे स्वतःला प्रश्न पडत होते..मीच का..?आणि मलाच का..? पण ती अशा आजाराशी लढणारी एकटी नव्हती..असे असंख्यजण होते....म्हणून त्या प्रश्नांची उत्तरे तिला आता  खऱ्या अर्थाने सापडली होती.. कारण ती त्यांच्यातली अशी एकटी होती की जिने या आजारावर यशस्वीपणे मात करून आपण या दुर्मिळ आजारातून कसे बाहेर पडू शकतो हे दाखवून दिले होते...ती आता त्यांच्या जगण्याचा एक आशेचा किरण झाली होती."मृत्यू जिंकणार नाही कारण जोपर्यंत मी हारणार नाही." अशा तिच्या जगण्याच्या प्रबळ ईच्छाशक्तीच्या संजीवनीमुळे तिला हे नवजीवन मिळाले होते.


                  मरणाच्या दारातून आपल्या पतीचा प्राण आणणाऱ्या सत्यवानाला जशी पतीनिष्ठ सावित्री पत्नी म्हणून लाभली तशी कोमलसारख्या पत्नीचा जीव मरणाच्या दारातून परत आणणारा आजच्या काळातील हा पत्नीनिष्ठ सत्यवान पती म्हणायचा.कठीण समयात अजिबात धीर सोडला नाही असा धीरजसारखा पती तीला  लाभला हेच तिचे सर्वात मोठे भाग्य.कोमलने हे सारं असह्य झाल्याने आतापर्यंत तीनवेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे पुन्हा असे कधी टोकाचे पाऊल उचलू नये म्हणून तो सतत तिला डोळ्यासमोर ठेवत होता.रात्री झोपताना तिच्या हाताला दोरी बांधून ती आपल्या हाताला बांधून झोपी जाणारा खरा जीवाचा सखासोबती.


                     आईवडीलाप्रमाणे प्रेमाची साऊली देऊन भक्कमपणे पाठीशी उभे राहणारे सासूसासरे असा एकूणच सर्व परिवार,नातलग मंडळी.ज्या आईवडिलांनी आपल्या मुलाचे अवयवदान करून या लेकीचे प्राण परत आणले...ते तिला पुनर्जन्म
देणारे  तिचे दुसरे आईवडिलच.डॉक्टरांनी तर अक्षरशः तिच्या शरीरात प्राण फुंकले ते तर तिच्या आयुष्यातील जीवदान देणारे देवदूतच.

अवघ्या महाराष्ट्राने या लेकीसाठी भरभरून मदत केली..प्रत्येकांनी शुभकामना,आशीर्वाद दिले...खऱ्या अर्थाने माणुसकी जपली...या सर्वांमुळे आज ती हे दिवस पाहते आहे त्या सर्वांच्या योगदानाच्या जाणीवेतून त्या ऋणाईतले कर्तव्य म्हणून कोमलने पहिलेवहिले पाऊल उचलले ते म्हणजे  प्रथम आपल्यासारखे या आजाराने पीडित असणाऱ्या रुग्णांना या उपचाराची माहिती नाही त्यांना प्रत्यारोपणाविषयी माहिती देणे,त्यांना आपल्या वेदना अवस्था सांगून उपचार घेण्यासाठी प्रवृत्त करणे... प्रत्यारोपणासाठी प्रोत्साहित करणे,त्यांना समुपदेशन करणे,आपल्या पातळीवर जनजागृती करणे.   
                            आणि त्यानंतर कोमलने जशी मोठ्या जिद्दीने आलेल्या संकटावर मात केली तशी दुसऱ्यांनाही ते बळ मिळावे यासाठी कोमलने २८ डिसेंबर २०१७ साली कोमल न्यू लाईफ फाउंडेशनची स्थापना केली..

ज्यांचे आयुष्य मृत्यूच्या काळोखाने वेढले आहे त्यांच्यासाठी ही कोमल आता जीवनज्योत बनली...आज तिच्याकडे पाहून असे दुर्धर आजारग्रस्त असलेले २९० रुग्ण पुन्हा नव्याने जगताहेत म्हणजे त्यांची ती जीवनप्रेरणा बनली.या फाउंडेशनच्या माध्यमातून आज हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपणाच्या रुग्णांना मार्गदर्शन करणे,या उपचारासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करणे,प्री पोस्ट वर्कअप देणे..या उपचारासाठी कुठे जायचं, कोणता दवाखाना चांगला आहे.महत्वाचे म्हणजे लोकांना अवयवदानासाठी प्रोत्साहित करणे इ कार्य या फाउंडेशनच्या माध्यमातून चालत आहे.या कार्यात पती धीरज व कुटुंबीयांची समर्थ साथ कोमलला लाभत आहे.सध्या  महाराष्ट्राबरोबर इतर राज्य, भारतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान,दुबई,इराण, युक्रेन अशा परदेशातील रुग्णांना या उपचारासाठी मार्गदर्शन केले जात आहे.संस्थेच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात ५०० च्यावर रुग्णांना या गंभीर आजाराच्या उपचाराची माहिती व मार्गदर्शन करण्यात आले आहे.

                                       कोमल स्वतः अवयव प्रत्यारोपण रुग्ण असल्याने प्रत्यारोपनासाठी इतर रुग्णांना धाडस मिळावे,त्यांच्यात जगण्याची आशा व उमेद निर्माण व्हावी या उद्देशाने अनेक मरोथॉन, ट्रेकिंग,पॅराग्लायडिंग यामध्ये सहभागी होऊन आपली शारीरिक क्षमता सिद्ध करून आपण कशात कमी नाही आहोत हे दाखवून देत आहे. अनेक प्रसार माध्यमांतून वेळोवेळी अवयवदानाचे महत्व ती पटवून देत असते.मग त्यामध्ये आकाशवाणी,माय मेडिकल मंत्रा,मुबंईसारख्या ठिकाणी घेतल्या जाणाऱ्या मुलाखती,कॉलेजची नियतकालिके, कंपनी मॅगझीन ,दिवाळी अंक,वृत्तत्रांतून लेख लिहून तसेच आतापर्यंत महाराष्ट्रातील जवळपास शेकडो ठिकाणी जाऊन व्याख्यानाच्या निमित्ताने आपला संघर्षमय जीवनप्रवास उलघडून आपल्या ओघवत्या वाणीने अव्यवदानाचे महत्व पटवून देत असते.आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये सहभागी होऊन तिने आपल्या राज्याचेच नव्हे तर देशाचे नाव अधोरेखित केले आहे.
                                फिनिक्स पक्षाने राखेतून उठून जशी उंच भरारी घ्यावी तशी मरणाच्या दारातून परतून पुन्हा जगण्याच्या दिशेने सुरू झालेला प्रवास.माऊली गाथा फिल्म यांनी तिच्या या संघर्षमय जीवनप्रवासावर आधारित रिबर्थ (पुनर्जन्म) नावाची फिल्म तयार केली आहे.आज कोमल आपल्या कोमल न्यू लाईफ फाउंडेशनची अध्यक्षा आहे.तसेच तिला महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. शारदा सन्मान महाराष्ट्र पुरस्कार, रोटरी इंटरनॅशनल पुरस्कार, प्रेरणास्रोत व्यक्तिमत्त्व पुरस्कार, महीलारत्न पुरस्कार, आदर्श नारी पुरस्कार, झाशीची राणी पुरस्कार, जैन सामाजिक पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी तिच्या जगण्याच्या लढाईचा गौरव केला आहे.


                          आजही तिला दररोज २० गोळ्या घ्याव्या लागतात..इथून पुढेही कायम घ्याव्या लागतील.बाहेरचा एकही पदार्थ खाण्याची किंवा बाहेरील पाणी पिण्याची तिला परवानगी नाही..खाण्यापिण्याची ही पथ्ये पाळावीच लागणार आहेत त्याचबरोबर दर महिन्याला रक्ताची चाचणी करून प्रत्यारोपण केलेले हृदय व फुप्फुस यांचे कार्य नीट सुरू आहे का ते पहावे लागते. जगण्याच्या आशा मावळलेल्या असताना१टक्क्याच्या भरवशावर जगण्याच्या प्रबळ ईच्छाशक्तीमुळे आज पूर्ण १००% जगते आहे... इतरांनाही जगण्यास प्रवृत्त करते आहे.
                             माहिती आहे आपल्याला सगळ्यात मोठी संपत्ती कोणती..? हिरे-माणके,सोने-नाणे नव्हे तर ती अनमोल संपत्ती म्हणजे आपली शरीरसंपदा.पण येनकेन कारणाने आपलं आपल्याच शरीराकडे दुर्लक्ष होतं. शरीराच्या एखाद्या अवयवाचं मोल हे अनमोल आहे.निसर्गानं दिलेली ही सर्वात सुदंर अशी भेट आहे.पण किती जणांना याचे महत्व आहे..?.आजच्या धावपळीच्या जीवनात पैशाच्या मागे लागून आपण शरीराकडे दुर्लक्ष करतो...रस्त्याने बेफिकिरीने सुसाट वाहन चालवतो..अपघातास कारण ठरतो...विनाकारण नको त्या व्यसनांच्या आहारी जातो...आणि अशाप्रकारे आपल्याला फुकटात मिळालेल्या या शरीर संपत्तीचे आपण नुकसान करून घेतो...दोन पायाची किंमत काय आहे ती पाय नसलेल्या अपंग व्यक्तीला विचारा.. दोन हातांची किंमत हात नसलेल्या व्यक्तीला विचारा...दोन डोळ्यांची किंमत अंध असणाऱ्या व्यक्तीला विचारा...आणि हृदयाची व फुप्फुसाची किंमत काय असते ती आता नव्या हृदयाने...नव्या फुफ्फुसाने.. नवा श्वास घेणाऱ्या कोमलदिदीला विचारा.छोट्या छोट्या कारणावरून आपण जगण्याची लढाईत हार पत्करतो...नव्हे तर संघर्ष करायला विसरतो...मागचा पुढचा विचार न करता भावनेच्या भरात टोकाचं पाऊल उचलतो...आत्महत्या करतो...मरण किती सोपं वाटतं ना आपल्याला...मरण जवळ करायला उशीर लागत नाही पण दाराशी आलेलं मरण दूर ढकलायला किती पराकोटीचा संघर्ष करावा लागतो..श्वास रोखायला कष्ट पडत नाहीत पण ते श्वास घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते...अशावेळी कोमलदिदीने जगण्यासाठीचा जो संघर्ष केला तो बरंच काही शिकवून जातो.


                               एक व्यक्ती आपल्या अव्यवदानातून आठ जणांना जीवदान देऊ शकते...का नाही आपण आपल्या मरणानंतर कुणाला जीवदान देऊ शकणार..? मरणानंतरही आपण या अवयवदानातून जिवंत राहू शकू.आज आपल्या समाजात असे हजारो बांधव आहेत..कुणाला हृदय..कुणाला फुप्फुस... किडनी हवीय...पण जर आपल्यातून अवयव दात्ता जर पुढे आले तर याच आपल्या बांधवांना पुनर्जन्म मिळू शकतो... अशा अवयवदानातून माणसांमाणसातील माणुसकीच्या नात्याची वीण अधिक घट्ट करू शकतो. तर चला आपणही असा अवयवदानाचा निर्णय घेऊया आणि कुणाच्या तरी आयुष्याचं सोनं करूया ..जसं आज कोमल दिदीच्या आयुष्याचं सोनं झालं.
                  जय हो..! मंगल हो..!!

               'अवयवदान सर्वश्रेष्ठ दान'
     


खालील व्हिडीओवर क्लिक करा प्रत्यक्ष पहा.
                        
   
                

  ◆ संपर्क-सौ.कोमल गोडसे-पवार         +919503883404

'कोमल न्यू लाईफ फाउंडेशनच्या या लिंकला अवश्य भेट द्या.'
https://www.youtube.com/channel/UCR8zXmTQoiw-_QcB7BkBArQ

 कोमल दिदीने स्वतः बनवलेला वाचक प्रतिक्रिया व्हिडीओ पहा खालील व्हिडीओवर क्लिक करा.




मंगळवार दि.१ सप्टेंबर २०२० रोजी या अद्वितीय संघर्षमय कहाणीचा अस्त झाला.कोमलदीदी आपल्याला सोडून गेली.


                  'मृत्युंजया कोमल दीदी...'

काल तर आमच्यात होतीस आणि आज अशी अचानक आम्हांला सोडून गेलीस.?
नाही अजूनही विश्वास बसत..
वादळवाऱ्याशी झुंजणारी पणती अखेर विझली..?
कालपर्यंत तेवत होती...उजळवत होती आपला भोवताल...
किती निखळ, निरागस, स्वछंदीपणे लखाखत होती...
मृत्यूच्या काळ्या छायेत दडलेल्या..चाचपडणाऱ्या जीवाला जगण्याचा प्रकाश दाखवत होती...
किती छळलं ना तुला...किती यातना.. वेदना दिल्या..तरी सहन करीत राहिलीस.
कधी हार मानली नाहीस डगमगली नाहीस.. 
लढत राहिलीस धीरोदात्तपणे.
जगण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीने अखेर मृत्यूवर मात केलीस आणि तू झालीस मृत्युंजया..
जगता जगता अनेकांना  जगण्याची प्रेरणा देत राहिलीस..जीवनप्रेरणा बनून गेलीस.
किती भरभरून जीवन जगत होतीस.
प्रत्येक क्षणांचा आनंद लुटत होतीस.
ज्याने तुला अवयवदान केले...
ज्यांच्यामुळे तुला जीवदान मिळाले.
त्यांना क्षणाक्षणाला धन्यवाद देत राहिलीस..
अवयवदानाचे कार्य हे तर तुझ्या जीवनाचे ध्येय बनून गेले.
झपाटून कार्य करत दुर्धरांना मुक्त करणे हेच जीवितकार्य ठरले.
पण माहीती होतं तुला...?
मृत्यू मागून तुझा पाठलाग करतोय..?
मग काय म्हणायचं तुला.
हे दुःख लपवून तु हसत खेळत आनंदाने जगत होतीस.
...अखेर आज त्याने तुला गाठलेच.
आमच्यापासून मृत्यूने दिदी तुला हिरावून घेतले...पण देहाने.
दिदी तुझे विचार...कार्य...प्रेरणा...ऊर्जा कशी हिरावून घेईल तो आमच्यापासून...
दीदी तु कुठेही गेली नाहीस
तु सदैव आमच्या हृदयात जिवंत आहेस आणि पुढेही  राहिशील...चिरंतन.
दिदी तुझे अवयवदानाचे व्रत आम्ही कायम सुरू ठेऊ.
तुझे कार्य प्राणप्रणाने आम्हीं पुढे घेऊन जाऊ...
दीदी...


"कोमलदिदीचा आपल्याला संदेश..."


           "अवयवदान करा...जीव वाचवा."

--------------------------------------------------------
                       
"मी माझा अवयवदानाचा संकल्प केला आहे कोमलदिदीने स्वतः हे अवयवदानाचे प्रमाणपत्र मला सुपूर्द केले आहे...आपणही अवयवदानाचा संकल्प करा."


  
                                    - किरण सुभाष चव्हाण.
                                      मोबा- ८८०६७३७५२८

८ टिप्पण्या:

  1. कोमल दिदींचा लढवय्या प्रवास अतिशय उत्तम पध्द्तीने आपण मांडला आहे...
    वाचताना प्रत्यक्ष डोळयांसमोर त्यांचा जीवन प्रवास उभा राहतो
    तुमच्या लिखाणाला सलाम...
    निश्चितच यातून आम्ही यातून प्रेरणा घेत आहोत.....
    बरेच दिवस झाले अवयव दानाचा संकल्प करण्याची इच्छा मनात आहे...
    कोमल दिदींचा लढवय्या प्रवास वाचून त्या इच्छेचा ठाम निर्णय झाला आहे...
    या वर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने अवयव दानाचा संकल्प पूर्णत्वास जाईल अशी खात्री आहे...
    जय हो....💐

    उत्तर द्याहटवा
  2. Hats of komal tai for you are unbelievable conflict.....🙏🙏
    And no words sir for you are unequable writing....🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  3. This is very nice and inspiration true story.....
    Really sir you expressed it very greatly....
    Thank you so much sir for this....

    उत्तर द्याहटवा
  4. दोन वर्षापूर्वी माझी बायको पण फुफुसाच्या आजाराने च पुण्याला ससून मधे नेत असताना माझ्या समोरच एम्बुलेंस मधे तड़फडून मरण पावली.तुमची त्यावेळी माहीती असती तर खुप बर झाल असत ती पण फाइटिंग स्पिरिट ची होती पण दुर्दैवाने मृत्युने तिच्यावर विजय मिळवला....

    उत्तर द्याहटवा
  5. Komal tuza sarv pravas vachatana kharach dolyatun pani alyashivay rahat nahi g pn tyach barobar tuzyatala ani dhiraj yanchyatala khanbirpana manala bhalaun jato kahihi mhan, tu jiddine yasarvavar mat kelis khari pn dhiraj siranchya sathilahi tod nahi apan jya purush pradhan samajat rahato tithe as udaharan pahayala milan mhanaje amachya sarakhyanch bhagyach hatts off you and dhiraj heart touching love story

    उत्तर द्याहटवा
  6. कोमल ताईंच्या या संघर्षमय प्रवासावरून हे समजून येते की माणसामध्ये इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे आणि जर ती असेल तर मृत्यूवरही विजय मिळवता येतो. आणि आपल्यावर आलेल्या संकट लक्षात घेता दुसऱ्या कोणावर येऊ नये यासाठी जे komal new life foundation उभा केले त्यासाठी त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत आणि आता मला तुमचा निधनानंतर असे वाटते की तुम्ही त्यावेळी मृत्यूवर विजय यासाठी मिळवला होता की हे समाजकार्य तुमच्या हातून हकने बाकी होते...सलाम तुमच्या संघर्षाला आणि सामाजिक कार्याला...जरी तुम्ही आमच्या सोबत नसलात तरी तुमचे विचार आणि प्रेरणा आमच्या सोबत आहेत...��������

    उत्तर द्याहटवा

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...