फॉलोअर

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

कोरोना योध्या रणरागिणी आशा व अंगणवाडी सेविका....- किरण चव्हाण.


कोरोना योध्या रणरागिणी आशा व अंगणवाडी सेविका....


"मामा...मावशी...दादा...ताई कोण आहे का घरात.?."

"या बाहेर...या..."

"चला हात पुढं करा...थोडे लांब उभे रहा..."

"मावशी...ऑक्सिजन चांगला दाखवतोय तुमचा ..टेम्प्रेचरही चांगलं आहे.."

"आज्जीबाई तुमचं ऑक्सिजन कमी दाखवतोय..".

"काय त्रास होतोय..?"

"कुणाला काही.. बी.पी..शुगरचा त्रास..?

"घरात कोणाला थंडी- ताप, सर्दी-खोकला..."

"कुणाला काही त्रास..असेल तर सांगा...दवाखान्यात दाखवून स्वॅब तपासून घ्या."

"घराबाहेर पडताना नेहमी मास्कचा वापर करायचा.."

"वरचेवर साबणाने हात धुवायचे किंवा सॅनिटायजर वापरायचे... कारण नसताना घराबाहेर पडायचं नाही....अशक्तपणा वाटत असेल तर लिंबूपाणी प्यायचे.."

"आणि हो कोरोनाला घाबरायचं नाही पण काळजी घ्यायची आपली व आपल्या माणसांची...कळलं का...?"


हे काळजीवाहू बोल आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ऐकायला मिळतील...प्रत्येक गाव,शहर गल्लीबोळ, अगदी सांदीखोपड्यातल्या प्रत्येक घरासमोर जाऊन कोविड सर्वेक्षण करणाऱ्या या आहेत आपल्या आशा व अंगणवाडी सेविका..महाराष्ट्र शासनाने नुकतेच 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हा उपक्रम सुरू आहे त्यामुळे यां उपक्रमांतर्गत आशा व अंगणवाडी सेविकेंच्यासोबत शिक्षकवृंदही सहभागी झाले आहेत..त्यामुळे मलाही या मोहिमेत सहभागी होता आले..अगदी जोरदारपणे सगळीकडे  ही मोहीम राबवली जाते आहे.. आमच्या टीममध्ये शिक्षक म्हणून मी,आमच्या भगिनींवंद्य आशा सौ.ज्योती मॅडम,सुनीता मॅडम ,भाग्यश्री मॅडम आणि अंगणवाडी सेविका छाया मॅडम असे आम्हीं पाचजण आहोत.. 

कळंबा गावचे सरपंच श्री सागर भोगम (दादा) आणि आरोग्यसेविका सौ.नयन सरनाईक मॅडम यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली आमची ही कोविड सर्वेक्षणाची टीम कात्यायनी गाव व परिसरातील घरांचे सर्वेक्षण करण्याचे काम करीत आहे...दररोज किमान ५० घरांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट आहे...सकाळी ९:३० वाजता सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात होते.प्रत्येक घरासमोर जाऊन घरातील प्रत्येक माणसांची माहिती नोंद करून घ्यायची..बोटाला ऑक्सीमीटर लावून ऑक्सिजन तर कपाळासमोर थर्मल धरून टेम्प्रेचर तपासायचे..


कुणाला बी.पी,शुगर आणखीन काही आजार...ताप थंडी,खोकला,सर्दी अशी काही लक्षणे आहेत का.? याची विचारणा करायची...लक्षणे असलीच तर स्वॅब तपासायला सांगायचे...मास्क वापरा,वरचेवर हात धुवा,सॅनिरायझरचा वापर करा शक्यतो गर्दीत जाणे टाळा असे एकंदरीत कोरोनाच्या संदर्भात घ्यावयाची दक्षता याचे लोकशिक्षण देऊन पुन्हा पुढील घर गाठायचे...ग्रामीण भागात विरळ लोकवस्ती तर एक घर या टोकाला तर दुसरे त्या टोकाला...तर काही घरे रानात वसलेली... तर कुठे अगदीच आडरानात एखादे घर अशावेळी पायी चालत जावे लागते.कच्चा खाचखळग्यांचा रस्ता,कुठे राडीचिखलातून तर कुठे गवतातून असलेल्या पायवाटेने जावे लागते.....घर.. मंदिर...शेतात..बांधावर जाऊन तर कुठे रस्त्याच्या काठाला जिथे कुठे माणसे भेटतील तिथे लोकांची तपासणी करीत पुढे सरकायचे...हा सर्व्हे करताना एकंदरीत लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे...त्याचबरोबर

काही अपवाद वगळता खुप सुखद अनुभव अनुभवायला मिळत आहेत.  

                         दोन अनुभव मात्र मनाला अत्यंत वेदना देऊन गेले. ते असे की, त्या दिवशी कडकडीत  उन्हांत आम्हीं एका घरासमोर गेलो...घरातील लहान मुलांनी तपासणी करून घेतली..मोठ्या लोकांना बोलावण्यास सांगितलं मुलं म्हणाली बाबा झोपलेत...उठवायला सांगितलं...मुलं आत गेली थोड्याच वेळात मुलांचे वडील आतून चडफड करीतच बाहेर आले.आणि अशोभनीय भाषेत आम्हांला बोलू लागले..

 "चला चला इथून... आम्हांला काही तपासणी करून घ्यायची न्हाई..."

 "अहो काका,शासनाचं काम आहे आपल्यासाठीचं आह हे सगळं."  थोडं समजावण्याच्या प्रयत्नात सांगू लागलो

 तर उलट आम्हांलाचं ते  शिकवू लागले..

"काय सांगतंय ते शासन कसली तपासणी करता..चार महिने झालं लोकडाऊन केलं..कोरोना कमी न्हाई त्यो न्हाईचं नआणि आता म्हण तपासणी करत्यात." आम्हीं जाणलं होतं त्यांची  झोपमोड झाल्याचा हा सगळा त्रागा आहे त्यांनी आमचा चांगलाच अपमान करून तो आमच्यावर खपवला होता.

वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटलं की, उन्हातान्हात उपातपाशी पायपीट करत आम्हीं या लोकांच्यासाठी फिरतो आणि ही लोकं दारी आलेल्या आम्हां लोकांचा वाटेल तसा अपमान करतात..

या गोष्टीवरून सिद्ध होते की,या कोरोनाच्या काळात सर्व्हे करताना या आशा व अंगणवाडी सेविकांना असा त्रास सहन करावा लागतोय  त्यांचा अपमान केला जातोय तर कुठे मारहाण करण्यापर्यंत मजल जातेय समाजातील अशा विकृतीला म्हणावं तरी काय..?

 दुसरा अनुभव असा एका बंगल्यासमोर गेलो  बाहेरुन गेटला कुलूप आतून एक व्यक्ती सांगत होती...आम्हीं आमची काळजी घेतोय...आम्हीं सुरक्षित आहोत...आत येण्यास कोणालाही परवानगी देत नाही...शेवटी त्यांनी काय आम्हांला आत घेतलेचं नाही  तपासणी तर दूरच. अशाचंप्रकारे काही घरांतून आम्हांला नकारात्मक प्रतिसाद मिळाला... म्हणजे हे असं झालं बाहेर आक्रमण सुरू असताना आपण काचेच्या घरांत राहून आम्हीं सुरक्षित असण्याचा कांगावा करायचा.

                                  कळंबा परिसरात सर्व्हे करताना करवीर तालुका तहसीलदारसो आदरणीय सौ. शितल भामरे-मुळे मॅडम,कळंबा गावचे सरपंच श्री सागर भोगम दादा,ग्रामपंचायत सदस्य,आरोग्यसेविका सौ.नयन सरनाईक यांनी आमच्या सर्वेक्षण टीमला भेट देऊन अधिक माहिती जाणून घेतली..एका कुटूंबाशीही त्यांनी संवाद केला..तहसीलदार मॅडमांनी आपुलकीने सर्वांची चौकशी करून अगदी मोलाचे असे अल्पशा मार्गदर्शन केले..ही भेट आमच्या कार्याला खुप ऊर्जा देऊन गेली.




सर्व्हे करताना हळूहळू उन्हाचा कडाका वाढतो. वरून उन्ह आणि आत रिकाम्या पोटात भुकेने व्याकुळ कावळे ओरडायला लागतात...उपातपाशी वणवण फिरत एकन एक घराचा सर्व्हे करत पुर्ण पन्नास  घरांचा सर्व्हे करून घरी परतायला अडीच तीन वाजतात..

                            सर्व्हेच्या अनुषंगाने  प्रत्येक घरासमोरच्या प्रत्येक माणसांचे अनुभव खूप चांगले होते म्हणायला हरकत नाही..काही गोड मनाला सुखावणारे..जिकडे तिकडे नुसती कोरोनाचीचं चर्चा....एखाद्या घरासमोर गेले की माणसं आपुलकीने आपली माहिती देतात..तपासणी करून घेतात.कुणाची तपासणी राहून गेली तर स्वतःहुन पुढे येतात..आमचा आदर करतात....मॅडम या बसा.. चहा करूया हे प्रेमळ वाक्य ठरलेलेचं.म्हणजे अतिथी देवो भव ही संस्कृती या कोरोनाच्या काळातही प्रत्येक घरांत नांदत असलेली दिसून येत होती. .एखादी मावशी आपुलकीने अंगणातील  पेरवीच्या झाडावरच पेरू देते... एखादा मामा हौसेने आपल्या दरातल्या वेलीवरचा दुधी भोपळा देतो...तर आणखीन एक माऊली आपल्या शेतातल्या भुईमुगाच्या शेंगा खायला देते..


तर कोट्याधीश असणारे पाशासाहेब सारखी माणसे आग्रहाने आम्हांला चहा देतात...खरं तर ही माणसं म्हणजे आमच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी जिवंत हृदयाची माणसं .म्हणजे यावरूनचं कळते की समाजात कुठे तरीच वाईट माणसं आहेत पण चांगल्या माणसांची संख्या खूप जास्त आहे. जरी कुठे आमचा अपमान झाला असेल तरी त्याहून आमचा सन्मान करणारी माणसं ही कितीतरी पटीने जास्त होती...  

                    खरं तर या सर्व्हेच्या निमित्ताने आशा व अंगणवाडी सेविकां यांचे समाजसेवारूपी कार्य जवळून बघता आले..त्यांना येणारे  बरे वाईट अनुभव याची देही याची डोळा अनुभवता आले.. गेली सहा महिने या आशा व अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन कोविड सर्वेक्षण करण्याचे काम करीत आहेत.. हे काम करताना एकही घर सुटता कामा नये याची काळजी घ्यावी लागते.शहरठिकाणी एक ठीक आहे पण ग्रामीण भागात सर्व्हे करताना अनेक अडचणींचा सामना या सेविकांना करावा लागतोय..प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेचं पाहिजे...त्यामुळे जिथे कुठे घरे वसली असतील तिथे जावेच लागते...मग काही घरे गाव सोडून वाड्यावस्त्यांवर..काही एकदोन शिवारात...तर एखादे घर लांब कुठे निबिड रानात  असते ..या सर्व घरांना भेटी देऊन तेथील लोकांची माहिती गोळा करावी लागते.आज आमच्यासारखे शिक्षक सोबत आहेत म्हणून नाही तर इतर वेळेस या आशा  व अंगणवाडी सेविकांना जीव धोक्यात घालून मोठी जोखीम पत्करून या आडरानातून त्या घरापर्यंत भेटी द्याव्याचं लागतात.


                              आज कोविड महामारीच्या काळात आपले सर्वस्व पणाला लावून या आशा व अंगणवाडी सेविका कोविड योद्धा म्हणून आपले समाजसेवेचे व्रत अगदी चोखपणे बजावत आहेत.खरं तर ही समाजाची दाई आहे जी आई होऊन आज आपल्या घरासमोर येते प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करतें काळजी घेण्यास सांगते..हा समाज म्हणजे तिचा कुटूंब आहे..हा समाजरूपी कुटूंब सुरक्षित रहावा म्हणून ती आज आपल्या दारी येतेय...पण तरीही आपल्या समाजात कुठे तरी वाईट अनुभवांचा सामना या भगिनींना करावा लागतोय..काही अपमानास्पद घडलेल्या वाईट बातम्या आपण वर्तमानपत्रातून वाचतोयही.आज मी जवळून पाहतोय की, हे काम या समाजसेविका प्रामाणिकपणे करीत आहेत आपल्या जीवनातला सर्वात जास्त वेळ त्या समाजासाठी खर्च करीत आहेत.आज बाहेर फिरणं किती धोक्याचं असताना तो जीवावरचा धोका पत्करून या भगिनी तुमच्या आमच्यासाठी आपले कर्तव्य प्राणपणाने बजावत आहे...दुर्दैवाने हे काम करत असताना काही आशा  कोरोना संक्रमणाच्या शिकार झाल्या..काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे एवढं जीवावर उदार होऊन काम करीत असताना  शासनस्तरावरून त्यांना मानधन किती मिळते..? महिन्याकाठी फक्त १००० रु. आणि सर्व्हे करताना कोरोनामुळे काही बरे वाईट घडले तर पन्नास लाखाचे विमा कवच आहे...म्हणजे इथे जिवंत असण्याचे मोल नाही पण मृत्यू पश्चात मात्र लाखोंरुपयांचे मोल आहे..मुळात ७८ प्रकारची कामे या आशा सेविकेंना करावी लागतात...आणि त्यांच्या एकूण कामावर मानधन दिले जाते ते ही तुटपुंजे आहे..खरं तर स्थानिक पातळीवर अत्यंत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या या लेकीकडे शासनाने बापपणाच्या भूमिकेतून दखल घेऊन त्यांच्या कामाचा योग्य मोबदला देणे आवश्यक आहे...खरं तर आताच्या सर्वेक्षणाचे मानधन भरभक्कम दिले पाहिजे...म्हणजे माझ्या या भगिनीची गाडी पेट्रोल संपल्यामुले कुठे अर्ध्या रस्त्यात बंद नाही पडणार..?.अहो तुमच्या त्या १००० च्या मानधनात महिन्याचा प्रवास खर्चही भागत नाही..


                                 जसे सीमेवर बाहेच्या शत्रूसंगे आमचे सैनिक लढत आहेत तसे इथे या कोरोनाच्या अदृश्य शत्रूविरोधात डॉक्टर, पोलीस,परिचारिका यांच्या बरोबरीने या आशा व अंगणवाडी सेविका लढत आहेत. आताच्या कोविड महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या  आशा व अंगणवाडी सेविका म्हणजे आमच्या रणरागिणी समाजसेविका आहेत...आता आपली किंबहुना  समाजाची एक जबाबदारी बनते की या कोविड योध्यां रणरागिणीच्या पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणण्याची.... जेंव्हा या रणरागिणी आपल्या दारापुढे येतील जेंव्हा कुठे भेटतील तेंव्हा त्यांचा योग्य आदर करा...त्यांना सन्मान द्या...आणि म्हणा..."ताईनों तुमच्या कार्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो...आपणही काळजी घ्या." शासनाकडून त्यांना भरभक्कम मानधन मिळेल न मिळेल पण मंडळी तुमच्याकडून मिळणाऱ्या  मानाचं धन हे त्यांच्यासाठी लाखमोलाचं आहे..बघा त्यांच्या कार्याला किती पटीने ऊर्जा मिळते...

                     सर्वांनीच काळजी घेऊया माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला उदंड प्रतिसाद देऊया..आपल्याला व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवूया...आणि कोरोनाला हरवूया....सर्वांनीच घेऊया ही खबरदारी.. माझे कुटूंब माझी जबाबदारी..

पुनश्या कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या या आशा व अंगणवाडी सेविकांच्या कार्याला सलाम...सुरक्षित रहा...काळजी घ्या..


तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो

सकळांचे लक्ष तुजकडे वळो

मानवतेचे तेज झळझळो

विश्वामाजी या योगी


जय हो मंगल हो..!!


आमच्या कोविड सर्वेक्षण टीमचा व्हिडीओ पहा खालील व्हिडीओवर क्लिक करा.






                                   - किरण सुभाष चव्हाण.
                                      ८८०६७३७५२८

२ टिप्पण्या:

  1. मीही एक अंगणवाडी सेविका आहे ,आमच्या कार्याला अश्या स्वरूपात मांडल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏 खरंच ह्या अटीतटीच्या काळात अंगणवाडी सेविका व आशा यांचं संपूर्ण जनतेला मोलाचं सहकार्य होत आहे,आम्ही अंगणवाडी सेविकांना दुहेरी भूमिकेतून जात आहे.icds विभागच काम आणि हे covid 19 चा सर्वे ..खरंच खूप त्रास होत आहे माझ्या भगिनींना,माझ्या आशा भगिनी व माझ्या अंगणवाडी सेविका भगिनी यांना माझा मानाचा मुजरा 🙏🙏💐💐.

    उत्तर द्याहटवा
  2. सर्वेक्षण करताना वाईटापेक्षा चांगले अनुभव जतन करत जाणे महत्त्वाचे असते.
    शेवटी समाज म्हटलं की दोन्ही अनुभव येतात.
    आपल्या कार्यास यश येवो.

    उत्तर द्याहटवा

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...