जीवनाच्या खडतर संघर्षातून सकारात्मक वाटचालीकडे घेतलेलं 'वळण.'
उसाच्या कांडक्यांनं पाठीमार मार देत आईनं शाळेला घातलं. पाठीवरच्या मारानं लेखकाचं पाटीवरचं शिक्षण सुरू झालं. अक्षरांच्या वळणापासून जीवनाच्या खऱ्या वळणाला इथूनच सुरुवात होते. घरचं आठरविश्व दारिद्र्य. बाप काहीसा विरक्ती वृत्तीचा. बापाला कोणतंही व्यसन नसताना देखील संसारात लक्ष कमीच. त्यामुळे संसाराचा जास्त करून भार आईच्या खांद्यावरच. भौतिक सुखाच्या लोभापायी घर दुभंगणारी कोत्या वृत्तीची आत्ती आतून किती निष्ठूर असते, यावरून नाती जशी भासतात तशी असतातचं असे नाही, याचा प्रत्यय येतो. शेती-घराच्या वाटणीवरून भाऊबंदकीतला तिडा आणि मग वाटणीवरून सतत एकमेकाला भिडा. त्यातून हाणामारीपर्यंत उद्भवणारा तंटाबखेडा हा भाऊबंदकीतला कडवटपणा म्हणजे कुठंही जावे पळसाला पानं तीनंच, हे इथंही प्रकर्षाने दिसून येतं. गावात प्राथमिक शिक्षण सुरू असताना सकाळ संध्याकाळ शेरड-गुरं राखत शाळा शिकायची. लेखकाचे बालपण अगदी माती, नदीनाला, रानाशिवारात, झाडाझुडुपांच्या संगतीत गेले आहे. बालपणाच्या लहरी स्वभावामुळं विचलित होऊन शाळेकडे लक्ष कमी होतं. आणि मग सवंगड्यांसोबत दिवसभर हुंदडायचं, कुत्रं पळायचं, असा सारा उद्योग. परंतु वेळीच शिक्षकांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे व मार्गदर्शनामुळे नव्याने शाळेची सुरुवात होते. सुरुवातीच्या काळात शिक्षकांनी पाठ करून घेतलेली कुसुमाग्रजांची ‘कणाʼ ही कविता. खरंतर हीच कविता पुढे लेखकाच्या आयुष्याचा ‘कणाʼ होते. या कवितेपासूनच वक्तृत्व कलेचा पाया घातला जातो. बालपणापासून संघर्षाच्या तीव्र झळांचे चटके लेखकाला पदोपदी सहन करावे लागतात. शाळा शिकत पोटासाठी पडेल ती मोलमजुरीची कामे करावी लागतात.
दहावीला जेमतेम गुणांनी पास झाल्यानंतर गरिबीमुळे पुन्हा शिक्षणात खंड पडतो आणि मग MIDC मध्ये हेल्पर म्हणून तुटपुंज्या पगाराची नोकरी करावी लागते. पण यावेळी एक अनपेक्षितपणे अपघात होतो. आणि यात गुडघ्याला झालेली दुखापत. इथे कहाणी एक वेगळं वळण घेते. वाईटातून एकेकदा चांगलं घडतं त्या पद्धतीने या प्रसंगातून पुन्हा एकदा शिक्षण सुरू होतं. शिक्षण घेण्याच्या इच्छेला गावच्या काही प्रतिष्ठितांनी सांगितलेल्या सल्ल्याचं बळ मिळतं. मावळलेला उत्साह पुन्हा जागृत होतो. आणि पुढील शिक्षण कोल्हापूर येथील कॉलेजमध्ये सुरू होतं. गरिबीतून आलेला व शिक्षणात जेमतेम असलेला एक मुलगा इथे आल्यानंतर त्याच्यात झालेले बदल मात्र वाचकाला अवाक् करतात. लेखकाला अवगत असलेली मूळची भाषणकला या ठिकाणी चांगली बहरते. लेखकाला एक वेगळी ओळख निर्माण करून देते. कॉलेजमधील चांगले मित्र-मैत्रिणी, विद्यार्थी प्रिय शिक्षक यांच्या सकारात्मक सहवासामुळे लेखकाच्या स्वभावात विलक्षण फरक पडतो. अभ्यास आणि मित्रपरिवार यांमध्ये लेखक रममाण होतो. अकरावीत असताना सुमन नावाच्या मुलीशी मैत्रीचे बंध जुळतात, पण यात प्रेमासारख्या भावनेला थारा न देता आईवडिलांच्या विश्वासास पात्र ठरण्याची आकांक्षा बाळगलेली सुमन मैत्रीतील पारदर्शीपणा राखते, हे प्रत्येक नितांतसुंदर मैत्रीसाठी आदर्श ठरणारा किस्सा आहे. पुढे बारावीत संज्ञा नावाच्या मुलीशी मैत्रीचे नाते जपत असताना अखेर लेखकाच्या प्रेमाची संज्ञा स्पष्ट होते आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते व हळूहळू दोघेजण एकमेकांत गुंतत जातात. पण हे प्रेम निस्वार्थी, निकोप आणि विश्वासूपणाच्या आधारावर वास्तवाचे भान असणारे होते. त्यामुळे प्रेमाच्या भरात असतानाही दोघांचे अभ्यासाकडे मात्र बिलकुलही दुर्लक्ष होत नाही. कॉलेजमध्ये सेक्रेटरी पदाची झालेली निवडणूक आणि त्यात एका मताने झालेला पराभव. परंतु विजय झालेल्या मित्राने आपल्या विजयापेक्षा आपल्या मित्राच्या पराभवाने रडू कोसळावे, हे निरपेक्ष व जिंदादिल मित्राचे उदाहरण वेधक ठरते. रात्रीचा दिवस करून घेतलेल्या अभ्यासाच्या मेहनतीवर लेखक संरक्षणशास्त्र विषयात ९८ गुण घेऊन ७२% गुणांनी बारावीत उत्तीर्ण होतो. आणि एवढेच नाही तर एक सामान्य विद्यार्थी म्हणून आलेला विद्यार्थी मेन राजाराम कॉलेजचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्राप्त करतो. लेखकाच्या यशाचा हा चढता आलेख प्रेरणादायी तसाच सुखावणारा वाटतो. दरम्यानच्या काळात वक्तृत्व कलेतून विविध स्पर्धेत घवघवीत यश मिळत जाते. आणि अत्यंत अभिमान वाटावा असा प्रसंग म्हणजे जेंव्हा राजस्थान येथे एका कार्यक्रमात युवा वक्ता म्हणून हिंदीतून भाषण करण्याचा सुवर्णक्षण लेखकाच्या आयुष्यात येतो.
शिक्षक होण्याचं स्वप्न बाळगून डी.एड करण्याचं ठरतं, पण पहिल्या प्रवेश यादीत नसणारे नाव यामुळे पदरी आलेली निराशा आणि शेवटी मग निश्चित झालेला प्रवेश यामुळे झालेला आनंद. दरम्यानच्या काळातली हुरहूरता, अस्थिरता आणि दुःखावेग मनात काहूर माजवतो. पण शेवटी सुख आणि दुःख अशा भावनेच्या दोन भिन्न टोकांचं दर्शन होतं. डी.एड ला प्रवेश मिळवण्याचं पूर्ण केलेलं वचन संज्ञाला सांगण्यासाठी लेखकासह चौघे मित्र सायकल ट्रेकिंगचा बहाणा करून शेकडो किलोमीटरचा प्रवास करत आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी जातात. तो प्रसंग थक्क करतो. तिथे संज्ञाच्या घरच्या लोकांच्याकडून घरात एक व बाहेर दुसरीच मिळालेली वागणूक ही अनपेक्षित असते व तिथेच दोघांच्या प्रेमाच्या नात्याचा अंत होतो, ते दोघांच्या प्रेमभंगाचे दुःख मनाला असह्य करते. पुढे मात्र लेखकाच्या आयुष्यात वेगळेच वळण येते. संघर्ष आणखी बिकट बनतो. वडिलांना कुष्ठरोगाचे निदान होते व त्यानंतरची एकूणच परिस्थिती थक्क करणारी आहे. वडिलांचा हट्टी स्वभाव असल्याने बरी होणारी जखम वडिलांच्या बेजबाबदार वागण्यानं पुन्हा बळावणं, किंबहुना त्या जखमेतून अक्षरशः जंतू बाहेर पडतात, एकूणच तो प्रसंग वाचताना अंगावर सर्रकन काटा येतो. आणि मग नाईलाजाने कुष्ठरोग्यांच्या दवाखान्यात त्यांना दाखल करावे लागतं. या रोगामुळे वडिलांची झालेली सैरभैर अवस्था, नातेवाईक लोकांच्याकडून वडिलांचा झालेला अपमान- उपहास मनाला विदीर्ण करतो. परंतु या काळात लेखकाने व आईने वडिलांची केलेली शुश्रूषा, घेतलेली काळजी, दिलेला आधार हे मुलग्याच्या कर्तव्यपालनाचं आदर्श उदाहरण वाटतं. हा रोग बरा होऊन शेवटी वडील त्या दवाखान्यातील कुष्ठरोग्यांची शुश्रूषा करण्यात रमतात, हे वाचून समाधान वाटते.
मित्राचे औदार्य काय असू शकते, याचे एक अप्रतिम उदाहरण म्हणजे आधुनिक कृष्ण-सुदामा मैत्री. आजूबाजूच्या घरांत कालानुरूप बदल झाला आहे, जुनी कात टाकून नवीन घरं उभी राहिली आहेत. केवळ लेखकाचे वगळता. अशा वेळी उदय नावाचा मित्र घरी येतो आणि सरोज मी तुझं घर बांधून देणार आहे, ही प्रबळ इच्छा बोलून दाखवतो. अट एकच की शेवटपर्यंत याची वाच्यता कुठेही करायची नाही. मित्राचे हे वेडं धाडस होतं. याला कितीही विरोध केला तरी मित्र आपल्या निर्णयावर ठाम आणि काहीच दिवसांत या मित्राच्या धडपडीमुळे नवं घर उभा राहतं. शेवटी लेखक आपल्या मित्राचे पैसे परत करतो हा भाग वेगळा; पण एक मित्र आपल्या मित्रासाठी काय करू शकतो. मित्रत्वाची भावना किती उदात्त असते, हे यावरून कळते. हे वाचत असताना अशा मित्राला मनोमन सलाम करावासा वाटतो.
डी.एड चे शिक्षण करतानाच लेखक ग्रामीण पत्रकारितासुद्धा पूर्ण करतो. याचा पुढे खूप फायदा होतो. सकाळकडे बातमीदार म्हणून काम करू लागतो. समाजात घडणाऱ्या नानाविध चांगल्या वाईट घडामोडींचा वेध लेखक घेतो. अतिशय तळमळीने प्रामाणिकपणे आणि परखडपणे केलेल्या वार्तांकनांमुळे अल्पावधीतच एक नवी ओळख निर्माण होते. अंधारातलं वास्तव सत्य प्रकाशात आणण्याचा लेखक आटोकाट प्रयत्न करत असतो आणि त्यात तो यशस्वी होत जातो. यातून लोकांशी बरेवाईट संबध तयार होतात. लोकसंग्रह वाढतो. मोठ्या लोकांचा जवळून सबंध येतो. अन्याय, भ्रष्टाचार, अविवेकीपणा विरुद्ध लेखकाचे विचार बंड करतात व आपल्या लेखणीतून ते प्रकट करतात. कामाच्या वाढलेला विस्ताराचा परिणाम म्हणजे डी.एड ला कमी गुण पडतात. कमी गुणांमुळे सरकारी शिक्षक भरतीतील संधी हुकते. त्यामुळे मग शेवटी नाईलाजाने विनाअनुदानित शाळेत अल्पमानधनावावर शिक्षकाची नोकरी स्वीकारावी लागते. अशाप्रकारे शिक्षक व बातमीदार असा दुहेरी प्रवास सुरू होतो. परिस्थितीशी झुंज सुरू असतेच. मनात नसतानाही घरच्यांच्या आग्रहावरून लग्न होतं आणि सुसंस्कृत, गुणी व सामंजस्य ‘शिल्पाʼ पत्नी म्हणून लेखकाच्या आयुष्यात येते. येथेच लेखकाच्या आयुष्याला एक आशादायी शिल्पकार वळण मिळते. विनाअनुदानित तत्वावरील अधांतरी नोकरीची शाश्वती न धरता स्पर्धा परीक्षा देण्याची महत्त्वाकांक्षा लेखकाच्या मनात बळावते. पण मुळात गणित विषय कच्चा. ही मुख्य अडसर. पण नेमकी गणित विषयात पत्नी वरचढ. त्यामुळे संसाराची गणितं जुळवताना गणित विषय पत्नीकडून शिकून घेऊन पक्का केला जातो. म्हणजे पत्नीसुद्धा आपली कशी गुरू होऊ शकते, याचे उदाहरण येथे पाहावयास मिळते. पत्नीच्या खंबीर साथीने लेखक पुन्हा आव्हाने पेलण्यास सिद्ध होतो. आर्थिक परिस्थितीवरून होणाऱ्या सामाजिक-मानसिक अवहेलनेकडे दुर्लक्ष करत दोघेही आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहतात. बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी पती-पत्नी कोचिंग क्लास सुरू करतात. पण इकडे स्थिर नोकरीची आस लेखकाला लागून राहिलेली असते. त्यामुळे नोकरीच्या संधीची वाट पाहात असतो. आणि एक दिवस ती संधी येते. नोकरी संदर्भ वाचत असताना विश्वकोश निर्मिती मंडळामध्ये नोकरभरतीची जाहीरात वाचण्यात येते. आणि सर्वशक्तीनिशी या पदासाठी लेखक प्रयत्न करतो. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीसाठी विशेष कष्ट घेतो. आणि नोकरीचं एक दिव्य कष्टाच्या बळावर पूर्ण करतो. २०११ साली मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मधील नोकरीत लेखक रुजू होतो. संघर्षाची नवनवीन वळणे घेत सध्या इथपर्यंतच्या वळणावर लेखकाचं जीवन स्थिरावलेलं आहे.
हा एकंदरीत प्रवास वाचत असताना आपण लेखकाच्या भूमिकेत जातो. घडणाऱ्या प्रसंगांशी एकरूप होतो. लेखकाचे शब्दांकित अनुभव वाचकाच्या मनाचा ताबा घेतात. अस्वस्थ करतात. वाचन करताना मनात भावनांचे आंदोलनं सुरू होते. काही प्रसंग अगदीच थक्क करणारे, मनाला भिडणारे किंबहूना वडिलांच्या अपमानाचे प्रसंग तर जिव्हारी लागणारे आहेत.
आयुष्याच्या खडतर प्रवासात टाळता न येणारी वळणे असतात आणि त्या वळणावर आपल्याला स्वतःहून वळण घ्यावं लागतं. वळण घेताना नव्या वळणाला सामोरं जावं लागतं. प्रत्येक वळणावर संघर्ष हा ठरलेला असतो. काट्याकुट्याने वाट भरलेली असते. ऊन, वारा, पाऊस झेलावा लागतो, अनपेक्षित वादळ येत असतात. एकप्रकारे परिस्थितीला आपण कसे तोंड देतो .जीवनाच्या या परीक्षेत आपण कसे उत्तीर्ण होतो, याला महत्व असते. जीवन-मरणाच्या मधल्या वाटेत लागणारं वळणच जीवन घडवत असतं. अशाच वळणांवर आधारित हे पुस्तक आहे. जीवनाच्या वाटेवरील चढउतार स्वीकारत सकारात्मकतेकडे जाणारे हे वळण आहे. अपयशाचं, अपमानाचं, संघर्षाचं यशात रूपांतर करणारं हे वळण आहे. वि.स.खांडेकरांच्या अमृतवेल पुस्तकात सांगितल्याप्रमाणे " एखादं स्वप्नं पाहणं, फुलवणं, ते सत्यात उतरवण्यासाठी धडपणं, पण दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावलं तर भग्न स्वप्नांच्या तुकड्यांरून रक्ताळलेल्या पावलांनी पुढे जात एखादं स्वप्नं पुन्हा पाहणं, फुलवणं व वास्तवात उतरवणं यामुळे मानवी जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो." या ओळी लेखक खऱ्या अर्थाने जगला आहे. जीवनातील प्रखर संघर्षामुळे आणि कष्टप्रद वळणाने शेवटी लेखकाच्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त झाला आहे. ज्या आईने उसाच्या कांडक्याने पाठीवर मार देत शिक्षणाच्या प्रवाहात आणून सोडलं त्या माउलीला हे पुस्तक वाचल्यानंतर कोणीही अभिमानाने सांगेल "माउली तुझं हे पोर चांगल्या वळणाला लागलं बरं का."
हे पुस्तक वाचून कुठे तरी वळचणीला धडपणारी पोरं खऱ्या अर्थाने वळणाला लागतील. फक्त एकदा त्यांनी हे पुस्तक हातात धरलं पाहिजे. मनापासून वाचलं पाहिजे. खरंतर आत्मचरित्र म्हटलं की, वयाच्या उत्तरार्धात पूर्वार्धापासून मांडलेला लेखाजोखा. असा प्रकार सर्वश्रुत आहे. पण असे कोणतेही बंध या पुस्तकाला लागू नाहीत. लेखकाने अगदी तरुण वयातचं आपल्या पूर्वार्धाच्या अस्वस्थ संघर्षाला वाचा फोडून साहित्यक्षेत्रात वळणच्या रूपाने एक अनोखी देण दिली आहे. तरुण, युवा, शिक्षित पिढीला संघर्षातून आपली वाट निर्माण करण्यासाठी नक्कीच हे पुस्तक मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरणारे आहे. खासकरून राज्यातील अनेकवर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांनी हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे. कारण पगाराच्या आशेवर दिवस न कंठता नवीन वळण घेऊन आपली एक स्वतंत्र वेगळी वाट निर्माण करण्याचं उदाहरण हे पुस्तक घालून देतं. जीवनाच्या वाटेवर अडखळलेल्या पावलांना, हतबल झालेल्या जीवांना योग्य दिशा, ऊर्जा देणारे असे हे महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ.सुनीलकुमार लवटे सरांच्या प्रस्तावनेतून लेखकाच्या पुस्तकाच्या अंतरंगाचे प्रतिबिंबित्व उमटलेले आहेच. तर मलपृष्ठावरील डॉ. राजा दीक्षित (अध्यक्ष, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ) यांचा पुस्तकाविषयीचा सारांशरूपी अभिप्राय वाचकांस वाचनासाठी अभिप्रेत करतो. जीवनाच्या वाटेवरची अनपेक्षित वळणं समजून घ्यायची असतील, तर सरोजकुमार सदाशिव मिठारी यांचे वळण हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे.
- किरण सुभाष चव्हाण.(कोल्हापूर)
मोबा- ८८०६७३७५२८.
पुस्तकासाठी संपर्क :
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा