फॉलोअर

रविवार, २५ सप्टेंबर, २०२२

वर्गातील गरमागरम भाकरीची गोष्ट....किरण चव्हाण


 वर्गातील गरमागरम भाकरीची गोष्ट....


                       रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस परंतु  रविवारी आमच्या शाळेत ८ वी विद्यार्थ्यांचा सकाळी ८ ते १० या वेळेत NMMS चा तास ठेवला होता. माझ्या गावापासून शाळेचे अंतर १५-१६ कि.मी चे अंतर असल्याने सकाळी लवकरच घरातून बाहेर पडावे लागले. सकाळच्या प्रसन्न वातावरणात तासाला सुरुवात झाली. पुढ्यात एकूण सात विद्यार्थींनी होत्या. बुद्धिमत्ता हा विषय शिकवण्यास सुरू केला. एकेक संकल्पना सोडवत असताना वेळ कधी सरला कळला नाही. विद्यार्थ्यांनीही समरस होऊन बुद्धिमत्तेची उदाहरणे सोडवत होती. अशातच जवळपास साडे दहा वाजायला आले. मुलींना बाहेर सोडले. थोड्या वेळाने आत आल्या. तास संपण्याची वेळ संपून गेली होती. पण बुद्धीमतेची उदाहरणे सोडवण्याच्या उत्साहाने त्यांना कंटाळा आला नव्हता. आता घरी सोडायचं की पुढे तास घ्यायचा यावर आमची चर्चा सुरू झाली. त्यामध्येचं आमचा दत्तराज नावाचा सातवीचा विद्यार्थी तो आपला अभ्यास करण्यासाठी वर्गात येऊन बसला होता. तो आठवीच्या विद्यार्थीनींना चिडवण्याच्या हेतूने बोलला,


 "सर आता तुम्हीं एवढ्या लांबुन आलाय घ्या की,अजून दोन तास ज्यादा. बघुया या मुली थांबत्यात का..? " दत्तराज आणि मुलींचं मुळातच पटत नव्हतं. एकमेकांच्या कळी काढण्यात दोघेही माहीर. आता मुलीही चिरडीला पडल्या आणि म्हणाल्या, 

"सर अजून दोन तास घ्यायचेच. पण आम्हांला आता घरी सोडा आम्हांला भुका लागल्यात. आम्हीं जेवून येतो. मग पुढचं शिकवा."

मला ही कौतुक वाटलं. एरव्ही मुलांना रविवारीची सुट्टी म्हणजे आपल्या हक्काचा आणि मुक्तपणे बागडण्याचा दिवस. असं असतानाही ही मुलं अभ्यासाला प्राधान्य देत होती.मुलींना जेवायला घरी सोडले. पण जाता जाता त्या प्रश्न करीत होत्या. 

"सर तुम्हीं कुठे जेवणार..?" 

तुम्हीं या जेवून माझं मी बघतो. असं म्हंटल्यावर सगळ्याजणी घरी गेल्या. मधल्या वेळेत पुढच्या घटकाची मी तयारी करू लागलो. तासभर असाच गेला. पुन्हा मुलींचा गलका बोलत चालत वर्गात हजर झाला. मात्र आल्या आल्या सगळ्याजणींचा एकच प्रश्न,

" सर तुम्हीं जेवलात का..? आणि कुठे जेवलात..? मी म्हणालो "माझा विचार तुम्हीं करू नका. चला पुढे आपण उदाहरणे सोडवायला सुरू करू " पण त्यावर मुलींचे काही समाधान झाले नाही. त्यात दत्तराजने अधिकच भर टाकली.

"सर तुम्हांला इथेच ठेऊन ह्या जेवून आल्यात . सर आता  तुम्हीं चला माझ्या घरी जेवायला." 

दत्तराज तर त्यांना चिडवण्याची एकही संधी सोडत नव्हता. आता तर त्याने वर्मावर बोट ठेवले होते. 

ये तू गप्प बस तिथे ते आमचं आम्हीं बघून घेतो " सगळ्या मुलीं दत्तराजवर तुटुन पडत होत्या. मला त्यांची गंमत वाटत होती.

"सर तुम्हीं जेवला की नाही आम्हांला अगोदर सांगा..." मुलींचा एकच प्रश्न. आता काय बोलायचे पण मी ही गंमत करायची म्हणून सहजपणे बोलून गेलो. "अरे तुम्हीं जेवलात म्हणजे माझं पोट भरलं...आणि हो मला आता भूक नाही. मी घरी जाऊन जेवेण चला आपण पुढच्या घटकाला सुरवात करूया."

                  आणि फळ्यावर घटकाचे नाव लिहिले. पण मुली जास्तच अस्वस्थ झाल्या होत्या. शिकण्यात त्यांचे मन नव्हते. मी त्यांना खुप समजावून सांगितले पण ऐकतील त्या मुली कुठल्या. त्याची अस्वस्थता अधिकच वाढत होती. त्यात शेवटीला बसलेली प्रीती तर अधिकचं अस्वस्थ आणि हिरमुसलेली दिसत होती. मुली नाईलाजाने शेवटी म्हणाल्या "निदान  सर आम्हीं दुकानातून तरी काही  आणतो." असा त्यांचा हट्ट. पण मी नाकारले. हा विषय बाजूला ठेवून अभ्यासाकडे लक्ष द्या हा माझा आग्रह पण त्या अस्वस्थतेतून मुलींचा शेवटी एक निग्रह ठरलाचं. काहीं तरी ठरवून अचानक प्रीती आणि कस्तुरी उठल्या आणि म्हणाल्या "सर आम्हीं काही मिनिटातचं बाहेर जाऊन येतो." 

मला माहिती होते मी अंदाज केला की, दुकानातून काही तरी आणण्याच्या उद्देशाने त्या म्हणत असाव्यात म्हणून मी सुरुवातीला नाहीचं म्हणालो. पण शेवटी मला त्यांचा हट्ट मोडवेना.  परवानगी देताच त्या बाहेर गेल्या. मी पुन्हा पुढच्या उदाहरणाकडे वळलो. किमान अर्धा पाऊनतास उलटला तरी यांचा पत्ता नाही. त्यांच्या अनुपस्थित पुढची उदाहरणे घ्यावी लागली.शेवटी दोघीही एकदम आल्या ते हातात एक पिशवी घेऊनचं. पिशवीत काय होते..? तर डबा. मी पुढे काय बोलणार..? सर आधी जेवून घ्या आणि मग शिकवा.


शेवटी मुलींनी आपले म्हणणे खरे केलेच. आता मला त्यांचं ऐकणंचं भाग होतं. शेवटी तिथेच बसलो. पिशवीत दोन डबे होते.डबे काढून टेबलवर ठेवले. डबा उघडला. एका डब्यात भाकरी व दुसऱ्यात भाजी. डब्यातली भाकरी तर अगदी गरमागरम. जणू नुकतीच तव्यातून काढली असावी अशी. भाकरीचा तुकडा मोडता मोडताचं मी प्रीतीला विचारलं. 

"प्रीती भाकरी गरम आहे. आता नुकतीच केलीय का.?" तिने हो म्हटले... 

मी न राहवून विचारलं "छान मऊसूत भाकरी आहे. कुणी बनवलीय भाकरी. ?" 

" सर मीच बनवली भाकरी." तिने उच्चारलेले हे वाक्य ऐकून मी निशब्दचं झालो. एवढी मऊसूत भाकरी एवढ्या लहान मुलीने बनवावी. एवढ्या लहान वयात मुलींना भाकरी करता येते याचं एकीकडे कौतुक होतं तर दुसरीकडे त्यांच्या निरागस संवेदनशीलपणाबद्दल समाधानही वाटत होते.

आम्हीं जेवलोय पण आमचे सर उपाशी आहेत म्हटल्यांवर माझ्या विद्यार्थींनीचं ते कासावीस होणं.  माझ्या लहानग्या विद्यार्थीनीनं घरी जाऊन, घाईगडबडीने चिमुकल्या हातांनी भाकरी थापून गरमागरम भाकरी माझ्यासाठी घेऊन येणं.माझ्यासाठी हा अविस्मरणीय अनुभव होता. किती निर्मळ निरागस प्रेम म्हणायचं हे. काय बोलावे मी भारावून गेलो.खरंच त्यावेळी  त्या चिमुकल्यांच्यासमोर जे उरात दाटलं ते शब्दांत व्यक्त करता नाही आलं. 

किती काळजी,प्रेम वाहतात  ना मुलं..? हे भाग्य एका शिक्षकाच्याचं नशिबी असू शकतं. खरंच मला आतून वाटलं यालाच म्हणायचं भाग्य. ज्याचा मी वाटेकरी होतो. एक रुचकर चवीच्या भाकरीचा ढेकर देऊन मी तृप्त तर झालोच. पण माझ्या विद्यार्थ्यांची काळजी,प्रेम पाहून मी अंतःकरणातूनही तृप्त झालो. आता त्या अवीट गोडीच्या गरमागरम भाकरीची गोष्ट चिरंतन माझ्या समरणात राहील.


- किरण सुभाष चव्हाण.

८८०६७३७५२८.

1 टिप्पणी:

  1. आपल्या लिखाणा मधील वास्तवावरती टाकलेला प्रकाश झोत हा मला सर्वात आवडता भाग वाटतो
    लिखाणाची पद्धत अगदी सहज सोपी आहे कोणताही बडे जाऊ अथवा अतिशयोक्ती नाही
    एक चांगलेलेखक म्हणून तुम्ही नक्कीच उदयाला आलेला आहात असेच लिहिते राहा

    शिवम साधक - नितीन कुंभार सर

    उत्तर द्याहटवा

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...