फॉलोअर

मंगळवार, १२ एप्रिल, २०२२

पुस्तक परीक्षण -अशी घडली राजस्विनी - विजयालक्ष्मी देवगोजी.


 'अशी घडली राजस्विनी' हे सौ.विजयालक्ष्मी विजय देवगोजी यांचे पुस्तक म्हणजे संस्कारशील पत्रप्रपंचाचा ठेवा आहे.


                                  लहान वयात नवोदय शिक्षणाच्या निमित्ताने राजस्थान येथे गेलेल्या आणि अभ्यासाच्या जोरावर आईवडिलांच्या संस्कारावर यु.पी.एस.सी.मधून Indian Revenue Service (आय.आर.एस) पदाला गवसणी घातलेल्या आपल्या लाडक्या परीला  (राजस्विनीला) लहान असताना तिच्या आईवडिल,भाऊ,आजी-आजोबा व मामांनी लिहिलेल्या पत्रांचा समुच्चय प्रस्तुत पुस्तकात आहे. पहिल्या विभागात आईने आपल्या लेकीला प्रिय मधूल्यास या नावाने लिहिलेली पत्रं आहेत.व्याकुळ मायेनं ओतप्रोत भरलेल्या साद घातलेल्या मधूल्या शब्दांपासून पुढचा सगळा मायेच्या भावनेने ओथंबलेला शब्द प्रवास सुरू होतो. मधूलीकाच्या गोतावळ्यातील मायेचं,संस्कारांचं,मार्गदर्शनाचं शब्दरूपी प्रवासाचं सारथ्य पत्रांनी पार पाडलं आहे. आपल्या जिव्हाळ्याचं माणूस आपल्या पासून कितीही दूर असो दोन जीवांच्या अंतरास जोडण्याचं काम शब्द करतात. आईनं आपल्या लाडक्या लेकीला लिहीलेल्या पत्रात काय आहे..? आख्या जीवनाचं सार,तत्वज्ञान त्यात दडलेलं आहे.मायेनं,विरहाने,काळजीनं लेकीसाठी आसुसलेली ओथंबलेली आई पत्रातील प्रत्येक शब्दागणिक जाणवते. लेकीच्या अनुपस्थितीत तिचं सगळं भावविश्व मनात घेऊन जगते ती.आणि तेच ती पत्रात मांडत राहते.आठवड्यातून एक पत्र न चुकता पाठविणे हा तिचा शिरस्ता आहे.आणि यात ती कधीच खंड पाडत नाही.


                                       लांजा जि-रत्नागिरी येथून आई पत्र लिहिते.कोकणातील निसर्ग पाऊस,माती,परह्याचं पाणी,झाडं-वारा हे सारं पत्रातून राजस्थानला आपल्या लेकीला पाठवते.जे ती जगते, पाहते,वाचते अनुभवते ते ते सारं पत्रात मांडत राहते.घरात घडणारे प्रसंग,घडामोडी,कुठे गेले, काय केले नवीन काय आणले,सणवार, ऋतुमान जेवढं म्हणून काही सांगता येईल ते क्षण शब्दकणांतून मांडण्याचा आईचा यत्न असतो. मनकोपऱ्यातला एक नी एक भाव ती पत्रात टिपते. असा पत्राचा आरंभ करता करता पत्राचा मूळ गाभा हा संस्कारणाचा आहे. आणि पत्राचा उद्देश हा मधूलिकाला उच्चध्येयप्राप्तीची जाणीव करून देण्याचा आहे. तिच्या मनातील ध्येय दृढ करताना आई नरेंद्र जाधवांच्या आमचा बाप आणि आम्हीं पुस्तकातील बापाचं वाक्य संदर्भ म्हणून देते.आपण ज्या क्षेत्रात जायचं त्यात सगळ्यात सर्वोच्च उंचीला जायचं. म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे मधूलीकाचे उपजत गुण,बुद्धिमत्ता,निर्णयक्षमता,निग्रह वृत्ती हे पाहून तिचं ध्येय ठरलेलं आहे.ते म्हणजे आय.ए.एस व्हायचं. आणि त्या अनुषंगाने तिची जडणघडण करण्याचा ध्यास तिच्या आईवडिलांचा आणि साऱ्याच नातलगांचा आहे. 

                                    आणि म्हणून ती शिक्षणाच्या निमित्ताने जरी दूर असली तरी तिला तिच्या ध्येयाच्या वाटचालीत दिशा देण्याचे काम पत्रांच्या माध्यमातून केले आहे. एकीकडे मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी रामस्रोत व अथर्वशीर्ष पठण करण्याचे उपदेश पुन्हा पुन्हा करताना दुसरीकडे ज्ञानाचा विस्तार वाढवण्यासाठी सामान्य ज्ञानाचे प्रश्नोत्तरे पत्रातून आई पाठवते. सायंकाळच्या शुभंकरोतीचे महत्व पटवून देणारी अशी आई आता दुर्मिळच. पत्रातून सामान्य ज्ञानाचे प्रश्न पाठवणे हे एक या पत्रांतील विशेषत्व आहे. एखादी अर्थपूर्ण कविता,सारांश लेख पाठवणे,वाचलेल्या पुस्तकांचे संदर्भ देऊन कोणती पुस्तकं वाचायची याची यादी आई सुचवते, तिच्या भेटीत तिला कोणती पुस्तके द्यावयाची ते ठरवते आणि मुळात मधूलीकाला अवांतर वाचनाची,कवितेची गोडी आहे.हा एका साहित्यिक आईचा लेकीवरील संस्काराचा प्रभावचं म्हणायचा.भाषाज्ञानाचे संस्कार करताना मायबोली मराठीचे महत्व ती सांगतेचं आणि इंग्रजीवरसुद्धा प्रभुत्व कसं मिळवावं,इंग्रजी बोलावं, लिहावं यासाठी आई उद्युक्त करते, गावाकडील डॉक्टरकाका,शिक्षक किंवा नातेवाईक मधूलीकाचे कौतुक कसे करतात,ती यशस्वी कर्तबगार मुलगी कशी होणार हे बोल आई जाणीवपूर्वक पत्रात नमूद करते यावरून लेकीचा उत्साह व आत्मविश्वास वाढीस लावण्याचा उद्देश आई सहजगत्या साधत असते. त्याचसोबत आपल्या नातेवाईकांना मैत्रिणींना सुद्धा पत्र लिहिण्यास सांगते यावरून नाती कशी जोडावीत, ती कशी जपावीत हा संस्कारदेखील आई नकळत आपल्या लेकीवर करत असते. अशा प्रत्येक संस्कारातून स्व ची ओळख घडवून का जगावं आणि कशासाठी जगावं..? हा वस्तुपाठ आई पत्रांतून घालून देते. इतरांहून आपलं वेगळं अस्तित्व, व्यक्तिमत्त्व निर्माण करून आपलं जगणं समृद्ध करता करता इतरांचं जगणं समृद्ध करण्याचा परमोच्च संस्कार पुस्तकातील सर्व पत्रांचा केंद्रबिंदू आहे.

                                  केसांपासून नखापर्यंतची काळजी आईला नाही तर मग कुणाला..? दूर कोसावरच्या लेकीची वेनीफणी,केसांची निगराणी कशी राखावी हे आईनंचं सांगावं,खाणंपिणं-झोपणं-उठणं साऱ्याची काळजी आई प्रत्येक शब्दांतून वाहते.पत्राचा शेवट करताना पप्पा,आई आबा,मोती , सायकल सगळे बरे आहेत.हे न विसरता नमूद करत असते म्हणजे आईला आपल्या मुलांच्या आवडीच्या वस्तूची ही काळजी असते हे कळते. तिची ख्यालीखुशाली कळण्यासाठी पत्रोत्तर दे अशी  टिपण्णी असतेच असते. पण हे सर्व करत असताना ती एक आई आहे. आईपणाच्या मोहमायेचा त्याग करून शिक्षणासाठी पोटच्या गोळ्याला  तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी दूर लोटावं लागलेलं आहे.अशावेळी  एक आई म्हणून दूरच्या लेकीसाठी काय असेल त्या आई मनाची अवस्था ? लेकीविना आई अपुरी आहे.तिचं आयुष्यं सूनं सूनं आहे. ती क्षणाक्षणाने आणि कणाकणाने लेकीच्या आठवणी मनात जागवते आहे.केवळ ती शरीराने जगते आणि तिचा संपूर्ण जीव लेकीपाशी आहे. लेकीच्या आठवणींनी आई व्याकुळ होतेय,झुरतेय रडतेय कासावीस होतेय एकेकदा लेकीचा विरह तिला सहन नाही होत एखाद्यावेळी लेकीचं पत्रोत्तर आलं नाही तर ती लटकेच रागावते,काहीशी चिडते पुन्हा पुढच्या पत्रात पत्रोत्तर देण्याची आठवण करून देते.या साऱ्यावरून आईच्या प्रेमाची काळजीची आणि अंतर्मनाची कल्पना कुणालाही येऊ शकते.पत्राचा आधार घेऊन तिच्या व्याकुळ जीवाचा पक्षी शब्दरूपाने झेप घेत लेकीकडे धाव घेतो लेकीचा ठाव घेतो.

                               मधूलिकाला पप्पाची पत्रे या विभागात बापानं आपल्या लेकीला लिहिलेली पत्रे आहेत.पप्पाची लाडकी चिमणी घरट्यातून दूर प्रदेशात शिक्षणासाठी गेलीय.जळी स्थळी नुसती लेकीची आठवण हृदयात भरून राहते. बाबा एके ठिकाणी म्हणतात आताच्या निरसवाण्या आयुष्यात तुम्ही दोन लेकरं आमच्या चैतन्याचा झरा आहात.आमच्या आयुष्याचं ध्येय तुम्हां दोघांना मोठं करणं त्यासाठी सर्वस्व पणाला लावणं यातच आहे. निकोप स्पर्धा कशी करावी, कृतज्ञता कशी जपावी मैत्री कशी निभवावी,चूक कशी सुधारावी अशा सर्वांगीण मूल्य संस्करांचा वस्तुपाठ बाप लेकीला पत्रातून घालून देतो. लेकीच्या पत्राला उत्तर देताना तिचं कोडकौतुक करतो.माझी लेक किती समजूतदार,शहाणी,गुणी आहे असा बाप लेकीला बोलून दाखवतो.तिच्यावरचा विश्वास वृद्धिंगत करत राहतो. बाप दूर असलेल्या आपल्या लाडक्या लेकीला मधूली,चिमणी,पिल्ल्या अशी अनिवार मायाळू साद पत्रातून घालतो.तिच्या हुशारपणाचं कौतुक करताना माझी लेक म्हणजे माझा ज्ञानाचा कृष्णचं आहेस असा बाप म्हणतो. कुठल्याही परिस्थितीत आय.ए. एस व्हायचचं हे ध्येय लेकीच्या ठायी घट्ट रुजवतो. कितीही केलं तरी बाप सुद्धा लेकीसाठी आतून घायाळ असतो.म्हणून लेकीच्या पत्रोत्तरासाठी आतुर असणारा बाप कामावरून सांजवेळी घरी परतल्यानंतर चौकशी करतो.माझ्या लेकीचं पत्ररुपी सांजपक्षी आलाय का हो..? अशी आर्त विचारणा करतो. पत्र आलं नसेल तर हिरमुसतो आणि आलं असेल तर आनंदाने वावरतो. लेकीचं येणार पत्र म्हणजे उदासवण्या दुःखावर उत्साही आनंदाचे होणारे सिंचनचं होय.

                              भावाने बहिणीस लिहिलेली पत्रे देखील अशीच संस्कारसंपन्न अशी आहेत.पत्रातील शब्दांनी भाऊ बहिणीच्या नात्यातील स्नेह किती घट्ट,दाट व मधाळ आहे हे उमगते. कोणतेही संकट येऊ दे हा तुझा भाऊ खंबीरपणे तुझ्या पाठीशी आहे.हा थोर आधार भाऊ देत असतो. बहिणीला विसरला का रे..? यावर भावाचे उत्तर हे जगातली सर्वात अशक्य गोष्ट असेल असे आहे. अभ्यासाबरोबरच आपल्या परिस्थितीचे,आईवडिलांच्या कष्टाचे भान करून देत असतो.भावामध्ये एक चांगला मित्र आहे.म्हणून आकर्षण या प्रकरणात  वाढत्या वयाच्या नैसर्गिक भावनेबद्दल मनमोकळेपणाने बोलणारा असा भाऊ क्वचितच असावा. बहीण भावांचं घट्ट प्रेम पत्रांतून व्यक्त होताना दिसतं.बहिणीच्या ध्येयप्रतीच्या वाटचालीत भावाने पत्ररूपाने  केलेलं मार्गदर्शनही मोलाचे आहे.

            अशीच आजी आजोबांनी, मामाने लिहिलेली पत्रं समृद्ध संपन्न अशीच आहेत.मधूलिकाने पत्रोत्तर लिहलेली पत्रे ही मनाचा वेध घेतात. लहानग्या वयाची मधूलिका आई भेटीला येताना हे आण ते आण म्हणून पत्रातून सांगते. अशी 'आणाआणीची' यादी वाचताना हसू येतं. आपण ही त्या वयाचे असताना हेच बोललो असतो हे प्रकर्षाने जाणवतं. तिच्या पत्रातून तो निरागसपणा,स्वच्छदीपणा बालमातून अवतीर्ण झालेल्या अर्थपूर्ण शब्दांची मांदियाळी मनाला भावते. पैशाची काटकसर,बचत आणि चुकून अनाठायी खर्च झालेल्या पैशाबद्दलची व्यक्त केलेली अपराधीपणाची भावना,प्रामाणिकपणे आपल्या चुकीची कबुली देऊन मोकळे होणे.अगदी कमी वयातला तिच्यातील शहाणपणा,समजूतदारपणा पत्रांतील शब्दागणिक समजून येतो. अभ्यासातली प्रगती,निबंधलेखनातील यश,शिक्षकांचे कौतुक जो ध्यास घेऊन मधूलिका तेथे गेली होती अगदी त्यात किंचितही ती कमी पडत नाही. शिक्षणातील तिची होणारी भरभराट तिचा आत्मविश्वास जिद्द चिकाटी निग्रह ठाम निर्णयक्षमता याचे दर्शन तिने लिहिलेल्या पत्रप्रपंचातुन होते.

                अशाप्रकारे प्रस्तुत पुस्तकातील पत्रांनी पुढे जाऊन जो खऱ्या अर्थाने इतिहास रचला तो म्हणजे हे यातील संस्कारांचे फळ आहे.आईबाबा,शिक्षक,भाऊ,आजीआजोबा, मामा यांनी मधूलीकाला दिलेल्या शिस्त,संस्कार ,आधार आणि तिच्या अभ्यासाच्या जोरावर यु.पी.एस.सी परीक्षा देऊन २०१९ साली आय.आर.एस पदावर आरूढ होते. अशाप्रकारे मधूलीकाची अशी ही राजस्विनी घडते. धन्य धन्य ते मातापिता ज्यांच्या पोटी अशी रत्न जन्माला येतात. म्हणूनचं म्हटलं जातं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. त्याचेच हे उदाहरण आहे. लहानग्या मधूलिकापासून आजच्या राजस्वनीपर्यंतच्या प्रवासातील,

यशाच्या वाटचालीत ही संस्कारशील पत्रं हे खरे साक्षीदार आहेत. म्हणजे पत्रं काय किमया करतात. आज सर्वोच्च यशाच्या शिखरावर विराजमान झालेल्या मधूलिकाच्या जडणघडणीत पत्रांची भूमिका किती महत्वाची होती.हे या पुस्तकातून कळून येते. 


                    आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात पत्रं हा प्रकारचं मागे पडला. आज व्हाट्सएप, फेसबुक, ट्विटर अशा अनेक सोशल माध्यमातून वरून एका क्लिक वरून आपण जोडले जातोय. एक कृत्रिम भावनेचं जग दिवसेंदिवस विस्तारत चाललंय.जिथं फक्त बोलणं होतं पण संवाद नाही होत.जिथं शब्द पोहोचतात पण अर्थ पोहोचलेच असं नाही. एकमेकांना जोडणारी,व्यक्त होणारी ही उथळ माध्यमं आहेत.आज ज्ञानाचा प्रचंड खजिना मोबाईल,व्हाट्सएप युनिव्हर्सिटीवर उपलब्ध आहे. पण काय घ्यायचं,किती घ्यायचं व कसं घ्यायचं हे कळत नाही. मोबाईलचा अतिवापर हा आपल्याच नाशास कारणीभूत ठरतो आहे.  याउलट पत्रातून नैसर्गिक भावना व्यक्त होतात. पोटातलं बोटांतून अलगद पानांवर उतरतं. काय म्हणायचं ते नेमकेपणाने व्यक्त होता येते. पत्रं हा दोन जीवांना,नात्यांना जोडणारा धागा होता. आणि आजच्या सोशल मीडियाच्या काळात पत्रं काय करू शकतात हे पुस्तक दाखवून देतं. 

                      या पुस्तकातून देवगोजी कुटुंबाचा एक आदर्श कुटूंब,नात्यातील प्रेम,सर्वांच्यातील सुसंवाद, सुसंस्कार,एकोपा  हा साऱ्यांनी घेण्यासारखा आहे. आज घरातल्या माणसांतील संवाद नाहीसा होतोय या पार्श्वभूमीवर दूरच्या नातेवाईकांशी देखील पत्रांतून कसा संवाद साधला जातो या पुस्तकातील हा पत्रव्यवहार अंतर्मुख करतो.सर्वच व्यक्तींनी लिहिलेली पत्रांतील भाषा ही साधी सोपी व ओघवती आहे.मुळात विजयालक्ष्मी देवगोजी या ज्येष्ठ साहित्यिका असल्याने त्यांच्या साहित्यिक लेखनाची छाप शब्दांतून कळते. पत्रांची मांडणी,विचार भावना, यांची गुंफण,भाषाशैली, ओघवतेपणा वाचकाला खिळवून ठेवतो. प्रत्येक पत्र वाचताना वाचक त्या भूमिकेत शिरतो.आईबाबा ,भाऊ किंवा आजी आजोबा मामां यांनी पत्रात व्यक्त केलेल्या भावनेशी समरस व्हायला होते.भावनेच्या तरंग लहरीवर वाचक स्वार होऊन आपणही हेलकावे घेतो. यातली सर्वच पत्रं इतकी भावपूर्ण, अर्थपूर्ण आणि संस्कारशील आहेत की,वाचकाच्या मनाचे देखील नकळत संस्करण झाल्याशिवाय राहत नाही.मायेची ओढ घनदाट असते विरहाचे क्षण मनाला किती सतावतात हे वाचताना आपले मन सुद्धा बैचेन होते,द्रवते.जणू वाटते आपल्याच मायेचं एखादं माणूस दूर आहे असं वाटत राहतं. कधी मन भरून येते.डोळे अश्रूंनी ओथंबतात. 

                      खरंच या पत्रांतील व्यक्त झालेल्या भावना या प्रत्येक आईवडिलांच्या मनातल्या भावना आहेत.खरं तर मधूलिकाच्या आईवडिलांनी साऱ्याच आईवडिलांच्या मनातील भावभावनेला इथं व्यक्तरुप दिलंय. कारण माझ्या आईवडिलांना जर लिहिता वाचता आलं असतं तर त्यांनी हेच मला सांगितलं असतं. आज प्रत्येक आईवडिलांची अशी अवस्था आहे तोंड असून बोलता येत नाही आणि हात असुन लिहिता येत नाही.आणि आपलं लेकरू आपल्या पुढ्यात असुन त्याला जे सांगायचं आहे ते सांगता येत नाही. म्हणजे मनातील भाव नेमकेपणाने त्याच्या मनात उतरवता येत नाही. अशा आईवडिलांनी आवर्जून हे पुस्तक वाचलं पाहिजे.किंबहुना मुलांना पुढ्यात घेऊन वाचून दाखवलं पाहिजे.शिक्षकांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे विद्यार्थ्यांना वाचावयास दिलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी व मुलांनी देखील हे पुस्तक म्हणजे माझ्याच आईवडिलांनी माझ्यासाठी लिहिलं आहे.या पत्रातील भावना या माझ्यासाठीच आहेत असं समजून वाचलं पाहिजे. त्याच्यातील विचार संस्कार आचरणात आणला पाहिजे. ही पत्रं वाचून जर कालची एक लहानगी मधूलिका आज आय.आर. एस या पदापर्यंत झेप घेत असेल तर ही पत्रं वाचून आपण ही अशी का नाही झेप घेऊ शकणार..? म्हणून प्रत्येक आईवडिलांनी मुलांनी संवेदनशील वाचकांनी वाचावेचं आणि संग्रही ठेवावे असे हे एक महत्त्वाचे मोलाचे संस्कारशील पुस्तक आहे.

मामा-भाचरे

मधूलिका देवगोजी-कदम अक्षय कदम


- किरण सुभाष चव्हाण.(कोल्हापूर)

  ८८०६७३७५२८.






पुस्तक : अशी घडली राजस्विनी
पृष्ठे :२१७
पुस्तक मूल्य : १६०/-

पुस्तकासाठी संपर्क - 
सौ.विजयालक्ष्मी विजय देवगोजी.
मोबा- 84463 75251

२ टिप्पण्या:

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...