'एक होती आज्जी'.
एक छोटंसं गाव.गावच्या पोटात शिरणाऱ्या हमरस्त्याच्या वेशीलगत एका बगलेवर आटोपत्या फांद्यांचं वडाच जुनाट झाड.त्याच्यापुढं उत्तरेला पुढा करून भैरवनाथाचं मंदीर. या मंदिरांच्या मागच्या खोलीत मराठी शाळा भरायची.तिथून जरा मावळत्या अंगाला दोन घरांच्या मधी दोन गुंठे होईल एवढी मोकळी जागा आणि जागेच्या एका कोपऱ्यात उत्तरेला दार असलेलं दगडा मातीचं साधारण पुरुषभर उंचीचं झोपडीवजा नकाड घर.शेणामातीन सारवलेलं कांबटाचं दार.शेणानं सारवलेला मातीचा गुळगुळीत ओटा.वरती साधी कौलं. घर असं म्हणता येणार नाही अशा त्या झोपडीत माझी आज्जी एकटीच रहायची.उभ्या नाकाची,मातकट रंगाची ,अंगाला सुरूकत्या पडलेल्या.कंबरेत वाकून चालायची.सदा न कदा दाराम्होरं दोन्हीं हात गुडघ्यावर टेकून हातांची बोटं एकमेकांत अडकून बसलेली.जाता येता माणसं म्हणायची,
"म्हातारे काय जाग्याची राखण करीत बसलीस व्हय." तसच वाटायचं. हमचौक मोकळा जागा सगळा आजीच्या नावावर.त्यामुळं या जाग्याबद्दल तिच्या मनात लई लगाव होता.ती घर-जागा धरून असायची.दोन्हीं टोकाच्या दोन्हीं घरासंग आजीचं सन्यादान नव्हतं.जाग्यावरनं बऱ्याचदा भांडणं व्हायची.कधी तिच्या जागेत शेळी बांधली,पालापाचोळा पडला,केरकचरा टाकला अशी काही कारणं त्यामागं होती.
आज्जी एकटीच रहायची याच्यामागे तिची पूर्व कहाणी ही खूप रहस्यमय आहे.कुठल्यातरी परमुलखातून लेकीला(माझ्या आईला) काखेत मारून ती इथं आली.गावच्या वळचणीला राहू लागली.कसलाच आसरा नाही.गावच्या आयबायाकडन भाकरी तुकडा मागून पॉट भरू लागली.रेणुका मातेची परडी हातात घेऊन जोगवा मागून खाऊ लागली,लेकीला पोसू लागली.एकटीदुकटी बाई संग तान्हं लेकरू.उघड्या भुईवर कशी राहायची.पण गांव भल्या विचाराचा.गावांन एका बगलला नकाडी जागा दिली.मग आज्जीने मोलमजुरीच्या पैशांतून दगडामातीचं नकाड घर उभा केलं... तसं तर हे कोडं मला आजही सुटलं नाही की,आज्जीला म्हणे पाच मुले होती आणि शेवटची माझी आई..पण नवऱ्याला आणि त्या पाच मुलांना सोडून आज्जी या गावात येऊन राहिली.आज्जीचा शेवटचा मुलगा म्हणजे माझा मामा म्हणे शिक्षक आहे..तो कधी मधी सायकलवरून भेटायला यायचा तो ही रात्रीचा आणि पहाटेलाचं बाहेर पडून जायचा...आणि ही खात्रीशीर माहिती मला माझ्या थोरल्या बहिणीकडूनही ऐकायला मिळाली होती.लहान असताना ती ज्यावेळी आज्जीकडे गेली होती अगदी त्याच रात्री तो मामा आला होता...ही फुलाची मुलगी का..? असं आज्जीला तो म्हणाला होता आणि पहाटेला तो निघून गेला.हे आजही आक्काला ओझरतं आठवतं..
एवढा मोठा कुटूंबकबीला सोडून आज्जी एवढ्या दूरच्या मुलखाला येऊन का राहिली..? पोटच्या पाच मुलांना तिच्यातल्या आईपणाला कसं सोडावसं वाटलं...? नकळत्या लहानग्या लेकीला संग घेऊन एकटी दुकटी बाई कशी या पारगावात अनोळखी माणसांत राहिली...? फक्त तो शिक्षक असणारा मामाच का तिला असं रात्रीअपरात्री भेटायला यायचा..? आईला भेटाताना त्याला कसली भीती वाटायची..? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजही माझ्या मनात अनुत्तरितच आहेत.मी कधी कधी आईला विचारतो पण तिच्याकडेही ती नाहीत.ती ही खुद्द कधी या भावांना भेटली नाही.असा एकंदरीत आज्जीचा रहस्यमय भूतकाळ.
आईच्या या म्हायारगावाला जायचं म्हटलं की,मला खूप आनंद व्हायचा.आई म्हायारला जाताना मलाच संग न्यायची.माझ्यापेक्षा मोठ्या दोन बहिणी कधी आईसोबत तिच्या गावाला गेल्याचं आजपर्यंत मला आठवत नाही.खाली बसून बराच वेळ केसांवर फणी फिरवायची,दरपणात बघून कपाळावर बंदा रुपायाच्याआकाराचा कुंकवाचा मळवट भरून हिरवं लुगडं नेसून तयार व्हायची.आणि चापूचोपून माझ्याबी डोक्याला तेल लावायची. तेलाचं बॉट तोंडावर फिरवून,हाता-पायाला पुसायची.एका पिशवीत कायबाय भरून घ्यायची.आणि मग आम्हीं मायलेकरं आजीच्या गावाला जायला बाहेर पडायचो.आई पिशवी डोक्यावर घ्यायची मी आईचा एक हात धरून तर कधी मागून चालायचो.उगावता पुढा करून असलेल्या दत्त मंदिराच्या पुढणं जाताना पायातलं चप्पल काढायची आणि डोक्यावर पिशवी तशीच हात जोडून रस्त्यावरनच पाया पडायची.मग मीबी पडायचो.नदीपलीकडच्या कापड्याच्या हाटीलात बसून बराच उशीर गाडीची वाट बघायला लागायची.ठरल्या वेळलाच गाडी.कधी कधी खूपच उशीर व्हायचा.मी तिथं इकडं तिकडं रेंगाळायचो... भिंतीला लागून बसायला एक कट्टी...त्या कट्टीवर आईलगत बसून ताटकळत गाडीची वाट बघायला लागायची.बऱ्यास वेळानं कुई कुई..आवाज करत गाडी थांबायची नी मग आमचा प्रवास सुरू. सीटवर उभा राहून खिडकीतनं मी मोठ्या आगतिकीन माग सरणारी झाडं-घरं न्याहाळायचो.
आम्हाला दारात बघून आज्जीला खूप आनंद व्हायचा.मला जवळ घिऊन आज्जी आंजरायची-गोंजारायची.
तिच्या जुन्या थोरल्या कुशीतली ती माया माझ्यावर ओसंडून वहायची. खूप आनंदून जायची.या भेटीन पावन व्हायची ती.नेहमी लेक-नातवाच्या वाटेकडे डोळे लावून बसणाऱ्या आज्जीला सर्वस्व मिळाल्याचा तो आनंद.मग तिच्या पुढ्यात आम्हीं माय लेक बसायचो..आज्जी नी आई बराच वेळ कायबाय बोलत असायच्या.मी थोडावेळ बसलो की मग उठून चुलीच्या वरच्या त्या खोपड्यात शिरून काहीतरी शोधत असायचो.कोण जाणे माझ्या बालमनाला ती एक सवयच होती की मी कधीही आज्जीकडे आलो की असेच काही तरी शोधायची. त्या तिथे मला आज्जीने साठवून ठेवलेल्या कितीतरी मोकळ्या काड्यापेट्या मिळायच्या किंवा खेळण्यायोग्य अशी कुठली तरी छोटीशी वस्तू.मला खूप आनंद व्हायचा..मला आठवतंय एकदा फुटक्या दर्पणाचा चौकोनी लाकडी साचा होता त्याची गाडी करून मी बाहेर ओट्यावर खेळत होतो...आज्जीने साठवलेल्या भरपूर काड्यापेट्या मला मिळायच्या (कारण आज्जीच्या घरात लाईट नव्हती म्हणून चिमणी पेटवण्यासाठी आणणाऱ्या काड्यापेट्या ती जमा करून ठेवायची) त्याचा एक वेगळा आनंद असायचा..या कड्यापेट्या घरी आणून दिवाळीत किल्ले बनवताना पायऱ्या करण्यासाठी त्यांना उपयोगात आणायचो..आई नी मी शेजारच्या घरात बसायला जायचो..तिथे एक आज्जी आजोबा होते, त्यांचे माझ्या आईवर लेकीसारखे प्रेम. जणू ती आपली लेकच मानतात.अगदी जिव्हाळ्याचा घरोबा.. पण आज्जीचे त्यांच्यासोबत पटत नव्हते..खरं तर आज्जीच पटवून घेत नव्हती.या घराचा आईला खूप मोठा आधार.
रात्रीचे जेवण आज्जीच बनवायची.
आज्जीच्या हाताला चव होती.चवदार जेवण बनवायची.आमटीला ती कोरड्यास म्हणायची विशेषतः ते कोरड्यास तर मला लई आवडायचं.अप्रुवाईने मला खायला घालायची.जेवणं आटोपली की,आज्जी चुलीवर मोठ्या भांड्यात पाणी तापवायला ठेवायची.आणि झोपण्याच्या वक्ताला आई दाराम्होरं चिमणीच्या उजेडात अंघोळ उरकून घ्यायची...हे ठरल्यालच असायचं..कधीही आई इकडे आली की या वक्तालाच अंघोळ करायची...याचं कारण म्हणजे आज्जीच्या त्या नकाड्या झोपड्यात न्हाणी नव्हती...मधल्या कुडाच्या आतल्या अंगाला दोघी मायलेकींच्या मधी मी झोपी जायचो...
घराच्या अंगणात उजव्या अंगाला एक सपय गोलाकार दगड होता त्यावर आई मला अंघोळ घालायची. समोर उगवत्या बाजूला मंदिराच्या मागे शाळेची मुलं एका रांगेत उभा राहून प्रार्थना चालू असायची.अंघोळ करत असताना ते पाहणं माझ्यासाठी मोठी गंमत असायची.या शाळेतील मुले दुपारच्या सुट्टीत आज्जीकडे पाणी प्यायला यायचीत.आज्जीही त्यांना कधी नाही म्हणायची नाही.
दुसऱ्यादिवशी आई नी मी माघारी वळायच्या आधी हुंबऱ्यालगत मायलेकी बसायच्या आई आज्जीच्या डोक्यातील ऊवा-लिका बघायची.मग तिथंच बसून आई कपाळाला कुंकू लिवायची,पुन्हा एकदा तेलाचं बॉट माझ्या केसाला पुसायची. आणि कायबाय भरलेली पिशवी घेऊन आज्जीचा निरोप घेऊन मग आम्हीं मायलेकरं वाटला लागायचो.
लहान असताना आज्जीकडे मी एकटाच राहिलो होतो ते दोन प्रसंग आठवतात.पावसाळ्याचे दिवस होते.पाऊस पडण्याअगोदर आज्जी मला घेऊन शेजारच्या लुगड्याच्या घरात घेऊन बसली होती.मी आज्जीला बिलगून बसलो होतो..बाहेर बेफाम पाऊस कोसळत होता...हुंबऱ्याच्या बाहेरून लाल पाण्याचा मुसंडा वाहत होता.आणि एकदा शाळेला सुट्टी पडल्यानंतर मी आज्जीकडे राहिलो होतो.कसे तरी दोन दिवस राहिलो असेन कारण मला खूपच एकटं वाटत होतं..अजिबात रमतगमत नव्हतं.
माझ्यासोबत खेळायला माझ्या बरोबरीची तिथं मुलं आजूबाजूला नव्हती.खूप एकटं वाटायला लागलं..करमेनासे झाले...दुपारचं झोपून उठलो..की आईबाबांची आठवण व्हायची नी मला रडू कोसळायचं.. मग मी आज्जीचा पदर धरून रडायचोच..आज्जी जवळ घेऊन उगी उगी करायची..समजूत काढायची.आणि मग दुसऱ्याच दिवशी आज्जी मला घेऊन माझ्या गावी आली.
आज्जी आमच्या गावी कधी आली की आठ- पंधरा दिवस ऱ्हायची.एकदा ती अशीच तिच्या गावावरून आली नी स्टँडवरून सरळ माझ्या शाळेसमोर येऊन बसली.मला बोलवायला आत निरोप धाडला.तसा मी वर्गातून बाहेर आलो तर आज्जी समोरच बसली होती.तिला बघून मला खूप आनंद झाला आणि ती ही सुखावली.मला जवळ घेतलं.कुरवाळलं. गालाचं मुक्कं घेतलं नी मगच घरकडं वळाली.आज्जी आमच्याकडं असायची त्यावेळी बरं वाटायचं.आईलाही तेवढीच मदत करायची,विशेष म्हणजे दुपारच्या वेळेत बाहेरच्या सोप्यात आज्जी वाकाळ शिवायची.
त्या वाकळत आम्हा मुलांची धुमडी चालायची.ती वाकाळ अंगावर घेऊन दडून बसायची हौस वाटायची.एवढा आम्हीं गोंधळ घालायचो पण कधीच आज्जी आमच्यावर रागवायची न्हाई.एकदा घरात शेळीच भरपूर दूध काढून ठेवलं होतं.आज्जी नी मी दोघचं घरी होतो.तर आज्जीने ते तापवून त्याच्यावरील साय मला खायला दिली आणि नंतर दूधही प्यायला दिलं. माझ्या खाण्यापिण्याची काळजी करायची.आज्जी नी माझ्या बाबांचं कधीच पटत नव्हतं दोघेजण एकमेकांशी जास्त बोलत नसत..एकदा अशीच कशावरून तरी त्या दोघांचं भांडण झालं झालं ते अगदीच कडाक्याचं.कधी आमच्या डोळ्यामाघारी निघून गेली काहीच माहिती पडलं नाही...नंतर मग सगळीकडे शोधाशोध... मी आणि आक्का(थोरली बहीण) गावात जाऊन शोधून आलो पण कुठेच पत्ता लागला नाही.. शेवटी कळालं की,आज्जी तिच्या घरला गेली.
आज्जी कधी आजारी पडली-झडली तर कुणाकडून तरी सांगावा धाडायची. आईच्या माहेरची गावात असणारी कांबळ्याची द्रौपदा मावशी नाही तर घराच्या माग रहायला असणाऱ्या मोरबाळ्या च्या मावशीकडन काय ना काय सांगावा असायचा.नाही तरी आईच्या माहेरचे एक शिक्षक आमच्या घरासमोरून वरच्या गावात शिकवायला जायचे त्यांच्याकडूनतरी असायचा.आई एकेकदा त्यांच्याकडून आजीला रॉकेल द्यायची.आमच्या आनंदाचा दिवस होता तो शनिवारचा.कारण माझ्या थोरल्या बहिणीला म्हणजे आक्काला मुलगा झाला होता. घरी आनंदाचं वातावरण होतं.. आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी दुपारी आज्जीच्या गावावरून खुद्द एक माणूस निरोप घेऊन आला..खूप घाईगडबडीत होता...कुणाचा होता तो निरोप आज्जीचा..? सांगत होता म्हातारीला लई बरं न्हाई आताच्या आता चला.काय तरी विपरीत नक्कीच होतं. मी त्यावेळी आठवीला होतो.दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली म्हणून घरला येत असताना आई-बाबा दोघेजण गडबडीत जाताना दिसली.मी विचारलं तर आज्जीकडे जातोय असे बोलले..मला आश्चर्य वाटलं ते या गोष्टीचं की,कधी न जाणारे बाबा आईबरोबर कसे काय चालले.पण घरात आल्यानंतर सगळी परिस्थिती समजली.
आई-बाबा पोचले आणि सायंकाळी तिथून त्यांनी उलट इकडे एका घरात फोन केला.(त्यावेळी मोबाईलचा वापर जास्त नव्हता) भावकीतल्या जाणत्या माणसांना बोलावून घेतले.थोरला बाबा, बाजीराव आण्णा, संभाजी आण्णा अशी माणसे गेली..नक्कीच काहीतरी वाईट घडले होते पण आम्हांला काही कळायला मार्ग नव्हता..कुणीच काही सांगत नव्हते.आम्हीं घाबरून गेलो होतो घरात बाळंतीण असणारी आक्का,त्यांनतरची बहीण आणि मी असे एकटे पडलो होतो. आक्का आम्हाला धीर देत होती.ती रात्री आम्हीं भीतीच्या छायेखाली झोपी गेलो.अपरात्रीच कधी ही सगळी मंडळी आईच्या माहेरवरून पंधरा-वीस किलोमीटरचे अंतर चालत घरी आले होते..
उठलो तर घरात रडारडीनेच सकाळची सुरवात झाली होती..आई आज्जीच्या नावाने रडत होती गल्लीतल्या आयबाया जमल्या होत्या..आणि मग समजलं की,आजीने आमचा निरोप घेतला होता.माझंही रडू त्यांच्या रडण्यात मिसळलं.
आज्जीच्या तीनविला मी ही गेलो होतो,आई त्या पोरक्या घरात एकटीच रडत होती बाकी आयबाया तिची समजूत घालत होत्या..... "आईनं मला व्हट्यातन मागून आणून जतान केली" आई रडताना सांगत होती ते हे वाक्य माझ्या मनावर त्यावेळी कायमचं कोरलं गेलं.आज्जी गेली..आईचा मागचा उरला सुरला आधार गेला.. तिचं माहेर तुटलं.. ती आईविना पोरकी झाली.
त्या दिवशी आज्जीने बाहेरून दिलेला कसलातरी भात खाल्ला होता...लगेच तिला उलट्या सुरू झाल्या...जीवाची कायली व्हायला लागली...पानंदिला परसाकडं गेली आणि तिथंच चक्कर येऊन पडली.कुणीतरी तिला उचलून घरात आणून झोपवलं तशी ती तिथंच कायमची झोपली...
आज्जीचे सोपस्कार पार पाडले..एव्हाना आता बाबांना आज्जीच्या जागेविषयी समजलं होतं त्या वेळी त्यांनी याचा जाब त्या इसमाला विचारला तेंव्हा त्याने बळजबरी करत उलट बाबांनाच धमकावले...काय करणार आता इलाज नव्हता..कोर्टकचेऱ्यांची पायरी चढण्याची आमची तरी ऐपत नव्हती...खरं-खोटं करण्यासाठी पैशाची चवडी आमच्याकडे नव्हती.. शेवटी आम्हांलाच नमतं घ्यावं लागलं..आजही मला आज्जी आठवते ती या सर्व प्रश्नांसह.माझ्यावर अमाप माया करणारी माझ्या आज्जीच्या आठवणींना त्या अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांची किनार आहे...तिने एकटीने सोसलेल्या-भोगलेल्या जगण्याचंय अंतसमयाला छेडलेल्या अन्यायीपणाचा इतिहास आहे.माझ्या मनातल्या तिच्या हळव्या गोड आठवणींसोबत त्या कटू कठोर क्षणांचा भरलेला उद्रेक आहे.तिच्या असंतुष्टपणाचा मुखडा सतत माझ्या डोळ्यासमोर तरळतोय.माझ्या मनात जशी ती एकबाजूला आठवणींच्या तशीच दुसऱ्याबाजूला अस्वस्थतेच्या रूपातून जिवंत आहे.माझ्या एका डोळ्यातून तिच्या आठवणी तर दुसऱ्या डोळ्यातून अस्वस्थता ढळतेय.ती अस्वस्थता मला त्या प्रश्नांच्या मुळाशी शिरून उत्तरं शोधण्यास भाग पाडते आहे.
------------------------------------------------------
किरण सुभाष चव्हाण.(पांगिरे)
मोबा- ८८०६७३७५२८.