'आयुष्याच्या संध्याकाळी हवाय एक निवारा... मायेचा उबारा..समाधानाचा किनारा.'
"पांडुरंगा...दुख सांगायचं तर कुणाला सांगायचं...म्या तुझा माळकरी.२२ वरसं झाली तुझी माळ गळ्यात हाय.नेमानं तुझ्या पंढरीची वारी करतू…म्या पंढरीचा वारकरी..
"संसार पंढरी आम्हीं वारकरी... आगा पांडुरंगा सुखी ठेव सारी.."
असा अभंगाचा सूर कधी भजनात आळीवायचो...तुझ्या हरिनामात दंग व्हवून जायाचो...पण तुझ्या पंढरीच्या वाटचा हा वारकरी कधी भिकारी झाला कळालंच न्हाई बघ...कुणाला माझं दुख सांगायचं...आता हाय का माझं तुझ्याबिगार कुणी...? कोण ऐकून घिल माझ्या येड्यागबाळ्याचं...आन ऐकून घ्यायला कुणी जवळ तर यायला पायजे नवं... कोण ईल माझ्याजवळ आता...मी तर एक म्हारोगी..."
हे आहेत श्री.सदाशिव रावबा सुतार भुदरगड तालुक्यातील हेदवडे हे गांव.वार्धक्याकडे झुकलेलं अंदाजे ८० पर्यंत वय.पत्नीनं अर्ध्यावर साथ सोडली. पोटाला एक मुलगा.कष्टकरी जीवन...सुतारकाम करण्यात उभी हयात गेली...टीचभर पोटासाठी आजही उतारवयात कष्ट सुरूच होतं...पण नियतीला हे मान्य नव्हतं.चार पाच वर्षांपासून थकलेल्या शरीराला कसला आजार जडला...हातापायाला जखमा झाल्या... हळूहळू चिघळल्या...रक्तस्राव
होऊ लागला...हाताची बोटे सडली...
आणि झडलीसुद्धा.तळपायाला झालेल्या मोठ्या जखमेतून रक्त-पू गळत असायचा काही काळानंतर त्यामध्ये जंतू तयार झाले...आणि निदान झालं ही सगळी लक्षणे म्हणजे हाच तो दुर्धर रोग म्हणजे कुष्ठरोग...
कुष्ठरोग होणं म्हणजे मोठं पाप...समाजाला ताप...यावर त्याला एकच शाप.. वाळीत टाकणं.अशी या रोगाच्या गैरसमजुतीची पाळमुळं अजूनही घट्ट आहेत आपल्या समाजात म्हटल्यावर.अशा अवस्थेत कोण त्यांची काळजी वाहणार..? कोण त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करणार..? कोण शुश्रुषा करणार..? उलट जे व्हायचं तेच सुरू झालं.वाळीत टाकणं आलं...समाजाची हेटाळणी आली..बघण्याचा नकारात्मक दृष्टीकोन...आणि सुरू झाली थकल्या भागल्या खंगलेल्या देहाची अवहेलना..आणि.कुडीतल्या उरल्या सुरल्या जीवाची कुचंबना...म्हणतात ना 'जन हे दिल्या घेतल्यांचे अंत काळीचे कोणी नाही...' उभ्या हयातीत कष्ट उपसलं... पण आता कोणी जवळ करेनात.कुठल्या वळचणीला आसरा घ्यायची मुश्किल झाली. पाच वर्षे झाली या रोगाशी लढताना शेवटी जगण्याची ही सुरू असलेली विटंबना मुकाटपणे सहन करत जगताहेत बिचारे बाबा.
पण सामाजिक कार्यकर्ते शिवम
साधक श्री.सागर गुरव यांच्या धडपडीमुळे C.P.R रुग्णालयामधून उपचार झालेत. चांगल्या उपचारांमुळे आज त्यांच्या जखमा बऱ्या झाल्या आहेत.तब्येतीत बरीच सुधारणा झाली आहे.सागर गुरवच गेली वर्षभर त्यांना पोटगी देत आहेत. आज या बाबांनी काळम्मावाडी मराठी शाळेच्या व्हरांड्यात पावसापाण्याचा तात्पुरता आसरा घेतलाय...
बाहेरच्या ठिकाणी तीन दगडांची चूल मांडायची आणि डाळ भात रांधायची.तिथंच तीन दगडांच्या चुलीच्या उबीला फटकुरावर दिवसभर कलंडायचं आणि पुन्हा रात्री झोपण्यासाठी गावातील मारुती मंदिरातल्या एका बगलेवर थंडगार फरशीवर जुनीपाणी वळकटी अंथरून झोपी जायचं.
ना घर ना दार...कुणी घर देता का घर...?ही याचना राहू द्या...कोणी वळचणीलाही राहू देईना...आणि राहिलं तरी हेटाळणी...आणि जिथून तिथून पिटाळणी..अशी वेळ आलीय.आम्हीं त्यांना भेटलो सागरजींनी तर त्यांना मिठीच मारली..त्यांच्या जवळ बसून विचारपूस केली नंतर त्यांना बोलतं केलं त्यावेळी त्यांचे पाणावलेले डोळेचं अधिक बोलके भासत होते..प्रत्येक शब्दागणिक उचंबळून येत होतं त्यांना..सारा इतिहास जमा होत होता त्यांच्या नजरेसमोर...अश्रूंची वाट अडवण मुश्किल झालं होतं.
२२ वर्षे न चुकता पंढरीची वारी..पंढरीचा वारकरी...गळ्यात तुळशीची माळ...माळकरी..भजनाची आवड..पेटी वाजवण्यात वस्ताद.रात्रंदिवस हरिनामाचा जागर मांडला.शेजारील दोन तीन गावातील पोरांना पेटी वाजवण्यात पारंगत केलं..हरीनामाच्या सेवेत राहूनही शेवटी ही वेळ...वाईट तर खूप वाटतं... शिवम साधक सागर गुरव त्यांच्यासाठी खूप धडपडताहेत...काळजी घेताहेत..जणू तोच त्यांच्या पोटचा गोळा. त्यांच्या निवाऱ्यासाठी येणाजाणाऱ्याला...पोटतिडकीन सांगत आहेत."नुसती हातपाय पसरण्यापुरती गावालगत जागा द्या हो...पाऊसवाऱ्याचं नकाडं झोपडं उभा करतों"
पण ती साद नुसती कानापर्यंत पोहोचते त्यांच्या...अजूनतरी हृदयापर्यंत नाही पोहोचली.
बरोबर आहे देवळातला देव कधी सांगतही नाही आम्हांला तरी गावोगावी कोटींची मंदिरं बांधतोय आम्हीं... स्वखुशीने लाखो रुपये देणग्या देतोय.. देवावरती आपली किती अढळ श्रद्धा आहे ना आपली.पण माणसातल्याच एका देवाला हातपाय पसरण्यापूरती झोपडी पाहीजे...पण आपण नाही देऊ शकत..कारण माणसांवर कुठे श्रद्धा आहे आपली..?
पंढरीला विठ्ठलाच्या भेटीला जाणारे आम्हीं पण गावपंढरीतल्या जित्याजागत्या विठ्ठलाला ओळखायलाच तयार नाही...पाषाणमूर्तीमध्ये देव शोधणारे आम्हीं माणसाच्या रूपातून भेटणारा देव कधी ओळखलाच नाही..'जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा'...असं म्हणतात...मग कुणी कुणी त्या बाबांच्यातला देव जाणला..? कुष्ठरोग्यांची सेवा करायला एकट्या बाबा आमटेनांच का जन्म घ्यावा लागणार इथे...? का नाही आपल्यामध्ये असे एक बाबा आमटे निर्माण होत..? महारोग्यांना वेगळं आनंदवनच निर्माण करावं का..?.एका कुष्ठरोग्यासाठी आपलं गांव नाही का आनंदवन होऊ शकत..? आयुष्याच्या संध्याकाळी तो जीव जिवंतपणी मरणयातना भोगतोय...त्यानं आणखीन असंच भोगायच कां..? की उरले-सुरले दिवस सुखाने जगायचं...मंडळी हे आपल्या संवेदनशील समाजाच्या ईच्छाशक्तीवर अवलंबून आहे...आपलं दातृत्व घालू शकतं त्यांच्या दुःखावर फुंकर...देऊ शकतं... एक निवारा...मायेचा उबारा...दुःखाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या गलबताला मिळू दे ना पैलतीर समाधानाचा किनारा...आयुष्याच्या संध्याकाळी.
प्रत्यक्ष पहा अवस्था खालील व्हिडीओवर क्लिक करा.
मदतीसाठी संपर्क : शिवम साधक.
श्री. सागर गुरव - 9146148904
आकाश पाटील - 9158469301
-------------------------------------------
- किरण सुभाष चव्हाण.(पांगिरे)
मोबा - ८८०६७३७५२८.