'गावंदरीतलं जुळं'
तरीबी या गोष्टीला बारा वरसं गुदरली आसतील.. सुगी नुकतीच मागं सरल्याली.भातकापणी झाल्याली मुंडरी वावरं सगळीकडं दिसत व्हती.भवतीनं जुंधळ्याच्या धाटांचं सड आणि डुई भादरल्यासारं भाताचं मुठ मूठभर गड्ड.सारा शिवार कस मोकळा ढाकळा. आमच्या गल्लीच्या खायल्या आंगची गावंदरबी आता रिकामी झालती.बिचारीला आता सकाळ दुपार संध्याकाळ एकेक पाहुणा अवचित भेट द्यायचाचं.रस्त्याच्या खायच्या बाजूला उतरणीला चार लांबसडक टपणी.तिसऱ्या टपण्याच्या बांधाच्या तळाला चार हात रूंद अशी लांबसडक चिरुटी व्हती त्यानंतर चौथं टपण वलाडंल की,मधी आडवा थोरला बांध..बांधावर मोजून दोनच झाडं एक काट्या बाभळीचं आणि दुसरं लिंबाचं.त्याच्याखाली उरलीसुरली टपणी.थोरली जाणती लोकं या बांधाच्या खाली परसाकडं जायाची. तवा घरा घरात संडास कुठलं...?गावंदर म्हणजे त्यायेळला मोकळं व्हायचं हक्काचं ठिकाण.
भर उन्हाची दुपार झालती.उन्हाचा नुसता चटका मारत व्हता.आणि आसल्या वक्ती सातूतात्या टमरॅलाचा गळा पाची बोटांत पकडून आपला दाबात गावंदरीच्या दिशेनं जात व्हता. दोन टपणी वलांडून तिसऱ्या टपण्याच्या काठाला गेला आणि समोर बघून भर दिवसा त्येजा डोळ्यासमोर चांदण्या चमचमल्या.तिथंच टमरॅल भिरकावून सातूतात्या दणाट मागं....
आताचं तर डोळ्याम्होरनं गेल्याला गडी लगीच मागं परातला..म्हटल्यावर पानाची उळी दाढत धरून उगाच चघळत शेड्यावर बसलेल्या शिवामानं म्होरं व्हवून विचारलं...
"आरं... सातबा काय झालं रं... आसं घाबराघुबरा का झालाईस..?"..
आता सातूतात्या काय बोलणार, त्याची पाकच बोबडी वळाल्याली.. तवर आणि चार पाचजण तेज्याभवती जमली...सातूतात्याला भर उन्हाची थंडी वाजून आल्यासारा हुडहूडा भरून आल्याला..आगुदरच भित्राभागु.नक्कीच काय तरी भानगड हाय..लोकांनी आपलं हेरलं...
"आरं बोललास तर कळल नव्ह आम्हांला...काय झालं...बोल की झाटदिश्यान.."
....आंग सारं घामेजून गेल्यालं. थरथरत्या हातानं कपाळाचा घाम पुसत सातूतात्या बोलू लागला.
"आंगा.. बोलण्यासारं काय न्हाई...खाली जाऊन बघा जावा केवढं मोठं जनावार.. लोळाय लागलंय त्ये.."
"काय बोलतुयास..कसलं जनावरं आणि कुठं.." सातूतात्यानं खायल्या बाजूला पुढा केला तसा शिवामानं एक लालभडक पिंक चिकाच्या कुपावर मारत...खायल्या अंगावर नदार टाकली.
सातूतात्यानं खूण दावली तशी समद्यानी खाली धाव घेतली.आणि तिसऱ्या टपण्याच्या टोकाला यायला सगळ्याचं पाय जागच्या जागी थांबलं.बघत्यात तर काय.?मधल्या चिरुटीत चांगलं धा फूट लांबसडक.अशी एकाला दोन सापांचं जुळं....एकमेकात येटोळ घालून आपल्याच नादात दंग व्हती....पायाच्या पेंढरी एवढं जाड.लोदाच्या लोदा..आंगाला तांबट काळसर रंग, तळाला पसरट आणि टापला निमुळता होत गेलेला त्रिकोणी आकार.. मधशीर उठून दिसावी अशी भांगलनीच्या खुरप्यासारी खरबुड धार...असं सरसरून कंबरजोगतं उभा ऱ्हायाचं... एकमेकांच्या आंगाला पीळ द्यायचं...काय हालत हुतं... डुलत व्हतं..डोळ्याचं पारणं फिटावं असं दिसतं व्हतं.
"आरं बाबा...बाबा...सातू म्हंतोय ते खरंच की...दांडगंच हाय की गां ह्ये..."
"आसलं तसलं न्हाई..बघ तरी फडीवर आकडा हाय.."
"आशील नाग आणि नागीण हाय ती..."
"बाप रे...बाप" नाम्याला स्वर्गातला बाप आठीवला.
तवर गल्लीतलं येणारं जाणारं माणसांचं भिरंच्या भिरं गावंदरीत बघायला जमा झालं..नाक गळकी शेंबडी पोरंबी टाचा उच करून बघायला लागली.तसं शिवामानं त्यासनी हाकलून लावायचा..
"ये..ये...कार्ट्यानों जाताईसा का तिकडं...इथं काय नाचगाणं चाललंय व्हय रं पळताईसा इथनं.."
तशी पोरं बांध चढून रस्त्याला जायची परत नजर चुकवून खाली यायची.घोळका करून एकमेकाला हळूच म्हणायची "केवढा मोठा साप हाय बाबान्या" आणि बोलून आबदार दातानं जीभ चावायची.
केरुनाना मध्येच बोलला..."आगा शिवूदा एवढं मोठं जनावार कधी जलमात बघितलं नसल बघ.."
"व्हय की एवढ्या माणसांच्या वस्तीकाठाला कुठून आलं आसल बघ की ब्येनं...."
"ते पण हाय...आन आसं जुळं कधी बघायला मिळतंय व्हय..."
" लोकं म्हणत्यात म्हण आसं जुळं कधी बघायचं नसतंय घरादाराला वाईट आसतय म्हण त्ये..आपशकून व्हतोय म्हंत्यांत"...दत्तबा धीरगंभीर बोलला...
"मग रं आता...काय करायचं...?" .
तसा शिवामा पुढं बोलला..."मी ऐकल्यालं आसं जुळं कधी दिसलं तर तेजावर लाल फडकं तरी टाकायचं येक, न्हाई तर..."
"न्हाई तर काय..?"
"न्हाई तर दोघास्नीबी जीतं सोडायचं न्हाई.."
"आरं मग इचार कसला करताईसा...त्यात आमची पोरटारं इथं गावंदरीतच खेळत्यात नवं..." केरुनाना जरा जोर लावूनच बोलला.
तसा मागचा पुढचा इचार न करता
"घ्या...घ्या...काठी घ्या...हाणा मारा.."
लोकांच्या गर्दीतनं एकच सूर उमटला आणि सगळा गोंधळ उडाला...तसा शिवामा हळूच दमात बोलला..
"आरं आरं दमा...कालवा करू नगसा जनावार बुजल की.."
पण कोण ऐकून घेतोय आणि कुणाच्या छातीत एवढा दम व्हता पुढं जायाचा..जो तो बोलायचा भले धा हात मागं सरकून...माणसं नुसती बोलायची आणि तिथंच वळवळायची..
तितक्यात शिवामा बोलला..."आता एकच गडी हाय... हे काम करावं तर म्हारतुमानच.."
तसा गर्दीनं एकादमात होकार भरला...
"व्हय व्हय त्येलाच बलवायला पायजे.."
"संप्या पळ लवकर म्हारतुमा घरातच आसल बघ लवकर ये म्हणावं आणि येताना हातातनं टोणा घेऊनचं ये म्हणावं.."
शिवामान त्याला पिटाळून लावला...एवढ्या साऱ्या गर्दीच्या गोंधळानं त्ये मुकजनावार बिथरलं असावं खायच्या चिरुटीत कवाधरनं एकमेकाला बिलगल्याली ती जोडी फुटली...त्यातला एक साप लोकांच्या नजरंसमोरच चपळाईन सळसळत त्याच टपण्याच्या कोनाड्यात असलेल्या बेटाच्या बुडक्याच्या बिळात शिरला...पण दुसरा मात्र भला दांडगा साप तिथंच जाग्याला वळवळत व्हता...सोताच आंग जड झाल्यागत त्येला पुढं सरकायलाच इना झालंतं.डोळं पांढरंफिट दिसत व्हतं.
"चांगलंचं कातीला आलंय"
गर्दीतनं आसं माणसं कायबाय बोलत व्हती.
पयल्या बॉनीची ढोसून आडभीतीला चांगला तनगा लावल्याला म्हारतुमा उठून सदा हातात बाळीगत्याला नेटका टोणका घेऊन हालत डुलत आला.ह्यो म्हारुतमा म्हंजी जगावेगळा माणूस दगडाच्या काळजाचा..एकदा गल्लीत एक पाळीव कुत्रं पिसाळल्यालं कुत्र्याच्या मालकांनं म्हारतुमाला दारूला पैसं दिलं आणि कुत्र्याची वाटाघाट लावायला सांगितली...म्हारतुमानं धिटाईन कुत्र्याच्या गळ्यात दोरी आडीकली आणि अंधार पडायला कुत्र्याला वडत वयल्या डागला नेलं आणि त्याच्या डोक्यात सोटका घालून त्येला ठार मारलं...कधी कधी शिवारात धनगराच्या कळपातलं बकरं मान मुरगाळून गप करायचा आणि कवा बिनपत्या घरला आणायचा.. आसला हा म्हारतुमा...
आला साऱ्या गर्दीच्या तोंडाला आला... पुढ्यात वाट आडवावी तसं ते जनावार जागच्या जाग्याला पडून व्हतं..
गर्दीतन कुणीतरी म्हारमाला उकसावलं.
"म्हारतुमा हाण... बरोबर कात्रीत सापडलंय बघ."
तसा त्येलाबी चेव चढला..म्हारतुमा वावंभर पुढं झाला. हातातला टोण्याचा मागं पाठीला वळंबा केला...मुठी आवळल्या आणि वाऱ्याच्या वेगानं पयलाच पेट टाकला तो सरळ सरळ पाठीच्या कनोट्यातच...तो मुका जीव कळवळला..एकदा डाव्या एकदा उजव्या बाजूला हेलकावं देऊ लागला...भाकरीएवढी फडी काढली...काय वाटलं आसल त्या मुक्या जीवाला आतल्या आत... एवढ्या उन्हाच्या रकात...पाठीवर रगात फुटायजोगता घाव बसल्याला..
लोकं म्हणायची बिळात शिरल्याली ती नागीन आणि ह्यो नाग...बेटाच्या बुडक्यातल्या बिळातन जिभल्या चाटत ती हळूच मुंडकं काढून बघत व्हती...
समोरच तिच्या प्रियकराला ही लोकं आस्मान दाखवत व्हती.
तवर मधी कुणी शानपती केलीच..
."आगा म्हारतुमा...मधी कुठं... डोक्यात हाण की एका दमातच कसा जीव सोडतंय बघ..."
तसा कुठंतरी अंगावर येणाऱ्या शत्रूवर तलवारबाजी करावी तसं रागानं फडी काढलेल्या त्याच्या डोक्यावर पेटात पेट टोण्याचं तीन चार तडाख हाणलं...तसं त्या भुईवर त्याचं डोकं चिंदाललं..जिवाच्या आकांतानं कळवला.. कळवला तो बिचारा मुका जीव...पार अंगाची त्यानं तिरपिट केली...जाग्यालाच दोन तीन पलट्या खाल्या.मगाशी जड झाल्यालं आंग आता कसंच काय हालवालतं... उसाचं चिपाड व्हावं तशी तोंडाची गत झाल्याली...लालभडक रक्ताचा सडा तापलेल्या मातीवर भोवतीभर शिपल्याला..म्हारतुमाच्या हातातल्या टोण्याचा शेंडा ताज्या ताज्या रगतानं पाघळत व्हता..शेपटीत तेवढा जीव व्हता कायसा...नुसती इकडं तिकडं घोळसत व्हती...ती बी हळूहळू शांत झाली...मुका जीव निपचित पडला.गतप्राण झाला. तसा इकडं माणसांच्या गर्दीला विजयाचा आनंद झाला.
'है शाबास...' गर्दीतला प्रत्येकजण म्हारतुमाला शाबासकी दित व्हता...बुडक्याच्या सांदरीतल्या बिळातनं जिभल्या चाटत ती नागीण अजूनबी डोकावत व्हतीच...जिवंत असताना धा फुटावरनं बघणारी गर्दी आता गपघार झाल्याल्या त्या नागाभवती जमून तोंडात बोटं घालून अगदी जवळून निरखत व्हती..
नाग मारला आता राहिली नागीण..लिंबाच्या सोबतीला असल्यालं त्ये मेसकाटींचं बेट... दहा बारा मेसकाटींचा त्यो बुडका..लिंबाच्या अन मेसकाटीच्या वाळ्या पानांचा खच अवतीभवती पडल्याला.. तळाला दोन तीन बिळं व्हती. आता लोकांचा मोर्चा म्हारतुमाला पुढं करून या बुडक्याकडं वळाला.पण एकदा का ती बिळातली नागीण आत कुठं सराकली ती पुन्ह्यांदा तिनं तोंड दाखवलंच न्हाई...काय काय खटपटी केल्या खरं ती काय बाहीर आलीच न्हाई...कुणी हातात लांब लोखंडी तारनं घेऊन आत खोचकायचा कुणी रकेल बिळाच्या तोंडातनं आत वतायचा.. तर कोण बिळाच्या तोंडाला डिवळायचा...सगळं उपाय करून बघितलं खरं आतली नागीण काय बाहीर यायला तयारच न्हाई...मारायचं तर दोघास्नीबी मारायचं ठरल्यालं...पण आता काय करायचं...प्रश्न पडला..तसा शिवामा बोलला "आरं ये पोरांनू तुम्हीं इथं थांबू नगसा जावा आणि गल्लीतन एकदोन एकदोन शिणी गोळा करा जावा त्या मुडत्या सापाला आगीन तरी देऊया.."
दोघबी तडाख्याला गावतील वाटल्यालं पण...
सगळ्यांचा हिरमुस झाला त्यात मनात नवीनच शंका इत व्हती ती येगळीच..
पोरांनी आपलं काम चोख पार पाडलं चांगलं डालगंभर शेणी जमा केल्या....जाणत्या माणसांनी वयल्या टपण्यात माणसाचं सराण रचत्यात तशा शेणी रचल्या त्यावर त्या मेलेल्या सापाचा लोळागोळा घातला इकडच्या तिकडच्या काटक्याकुटक्या गोळा करून घातल्या आणि कलत्या उन्हाला इकडं दहीन दिली..शेवटचा एक डाव म्हणून चार पाच शेणीची पेटती खांडं त्या बेटाच्या बुडक्याला टाकून धुमी केली पण शेवटी काय बिळातली नागीण बाहीर आली न्हाई...ह्यो सगळा कारभार आटोपायला सांजवकोत झाला.
सगळी माणसं वर येऊन शिवामाच्या घरासमोर जमली...सगळ्यांच्या मनात एकच पाल चुकचुकत व्हती... आपण जोडी फोडली...एकाला मारलं नि एक वाचलं...मारल्याला नाग हाय आणि वाचल्याली नागीण...आता ती काय गप बसणार न्हाई...ती आपला माग काढून बदला घेणार...म्हणून सगळ्या माणसांनी हे पातक एकट्या म्हारतुमावर ढकललं... माणसांनी आपापसांत एक निर्णय घेतला आणि म्हारतुमाला पुढ्यात घेऊन साऱ्यांच्यावतीनं शिवामा बोलू लागला..."म्हारतुमा...घडलं ते इपरितच घडलं म्हणायचं.आम्हांला वाटलं दोन्हींबी गावतील तावडीला पण एक गावलं नि एक निसाटलं...झालं ते बराबर न्हाय...नागाला मारलं की म्हण नागीण डुख धरतीया..जीवच घेतीया..तवा बरंवाईट काय नगो तु आपलं आता असं कर...आम्ही सगळ्यानी मिळून ठरवलंय.तुला आम्ही पैसं काढून देतो तु आताच्या आता वाघापूर गाठायचं..देवाचा भंडारा ल्यायचा... चुकी झाली म्हणायची आणि देवळातच वस्ती करायची...म्हंजी मग जीवाला घोर न्हाई.."
"व्हय व्हय...शिवा म्हतोय ते खरं हाय...म्हारतुमा तु आपला आताच्या आता निघ बघू.." बोलतच केरुनानानं बंडीच्या आत हात घातला आणि धा ची नोट काढून म्हारतुमाच्या हातावर ठिवली. तसं सगळ्यांनीच धा-पाच..धा-पाच रुपये म्हारतुमाच्या हातावर ठेवलं...निष्पाप जीवाचा बळी घेतल्याली ती सुपारीचं जणू प्रत्येकजण त्याच्या हातावर ठेवत होता...घडल्या पापाचं खापर त्याच्या डोक्यावर फोडून जो तो हात झटकून मोकळा होत होता.
म्हारतुमापण काय कमी हुशार नव्हता...अंधाराची गाठ पडायला म्हारतुमा चालला.आणि गल्लीन निःश्वास सोडला.म्हारतुमा चांगल्या खुशीत झपाझप पाऊल टाकीत व्हता.कधी नव्ह ती पैशांची एवढी बेजमी झाली व्हती. खिशाला कधी एवढ्या पैशांची सवय नव्हती पावलागणिक नुसता खिसा खुळखुळत व्हता.बायकोसंग हुज्जत घालून कवातरी एखादी पाच ची नोट हातात पडायची त्येबी ती शिव्यांनी वसूल करून घ्यायची.दुधाची तान ताकावर भागायची..पर आता जिथं तान भागायची तिथपर्यंतच म्हारतुमानं धाव घेतली.दारूच्या गुत्त्याबशी पावलं आपोआपच थबकली...तिथनच देवाला नमस्कार केला..आणि गड्यानं वाट वाकडी केली...दारूच्या गुत्त्याची वाट धरली...आज म्हारतुमाची चंगळच व्हती..पायजेल तेवढी दारू प्यायची मनानं पक्कंच केल्यालं.आज म्हणायची खरी हाऊस फिटली..मनाजोगती दारूची तलप भागली...बराच वकोत म्हारतुमा दारू ढोसत बसला.आणि सारी गल्ली सामसूम झाल्यावं मध्यान रातीला घरात येऊन निजला.दुसऱ्या दिवशी गल्लीला माहिती पडलं.म्हारतुमा वाघापूरला गेलाच न्हाई...तवा ज्येला त्येला वाटू लागलं आता म्हारतुमाचं काय खरं न्हाई.
पण आज बारा वरसं गुदरली या गोष्टीला.म्हारतुमाच्या घरात ना दारात ती नागीण राहू द्या साधं साप-किरडूबी नजरला पडलं न्हाई.म्हारतुमा रानाशिवारातनं नदीवताडातनं कुठं कुठं फिरला पण साधा इचु चावल्याला आजतागायत माहिती न्हाई.गल्लीला वाटत व्हतं..माग राहिल्याली नागीण बदला घिल...हातात टोणा घेऊन जीव घेणारा म्हारतुमा जसा दोषी व्हता तसा हाणा मारा..म्हणणारा तिथला प्रत्येकजण दोषी व्हता जो की स्वतःला निर्दोषचं समजत व्हता..खरं तर व्हायचं असतं तर कुणाचंबी बरं वाईट झालं असतं... पण तसं काय झालं न्हाई...नुसती लोकं म्हत्यांत म्हणं..पण ती कुठली लोकं... ती काय कुणाला आजून ठाव झाली नाहीत...आणि कधी व्हणारबी न्हाईत...पण एक खरं हाय...त्ये बिचारं मुकं जनावार कुणाच्या वाटला जाईत न्हाई याचा इस्वास पटला खरा पर अशा माणसाचा इस्वास कसा धरायचा..? देवळात मुर्तीचा...नागपंचमीला मातीचा नाग पूजायचा आणि इकडं मातूर जिवंत नाग दिसला रं दिसला की ठेचायचा...'जुळं दिसलं की आपशकुन व्हतोय...साप म्हणं डुख धरतोय आणि बदला घेतोय असं लोकं म्हंत्यात म्हणं.' माणसाच्या मनातला ह्यो आंधळा इस्वास कधी जायाचा कधी सुधारायची माणसं..? आवं ते मुक जनावार कधी आपल्या वाटला आलं नव्हतं आणि येणारबी नव्हतं पण त्याच्या वाटला जाऊन त्याचीच यांनी वाट लावली.. जिवाभावाची जोडी फोडली...कायमची ताटातुटी केली...मुक्या जीवाचा हाकनाक बळी दिला.. त्या लोकांच्या निंदनीय करामतीची ती मुकी गावंदर आजही साक्ष देते..गल्ली खायच्या गावंदरीत पाय ठेवला की सगळं कसं ध्यानी मनी येतं आणि आपसूकच गावंदरीतलं ते जुळं नजरला उभं राहतं.
----------------------------------------------------------
- किरण सुभाष चव्हाण.
८८०६७३७५२८.