प्रयोगशील शेतीमधून आधुनिक पद्धतीने मिळविले जाते भरघोस उत्पादन.
श्री.ज्ञानदेव दशरथ येलकर मूळ गाव-बेगवडे एक धरणग्रस्त... परंतु शासनाकडून पुनर्वसनातून बामणे सरहद्दीत त्यांना ६६ गुंठे जमीन मिळाली.पेशाने प्राथमिक शिक्षक पण त्यांच्यात दडला आहे एक कुशल शेतकरी.आणि त्यांच्यातल्या शेतकऱ्याने अगदी नियोजन पध्दतीने या जमिनीत नंदनवन साकारले आहे..६६ गुंठ्यापैकी ४५ गुंठ्यांत ऊसाची लागवड केली आहे.आणि उरलेल्या २० गुंठ्याच्या एका सरळ पट्टीमध्ये शतावरी पीक घेण्याच्या उद्देशाने ३ फूट अंतरावर सऱ्या काढल्या आहेत.शतावरी औषधी वनस्पतीच्या पीकाचा कालावधी साधारण दीड वर्षाचा आहे. त्याच्या मुळकांड्या सरासरी २०० रु किलो दराने विकल्या जातात.पण शतावरी पिकाची लागवड करण्याच्या अगोदर त्यांनी वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे २९ जानेवारीला आंतरपीक म्हणून TAG-24 (फुले-२४) हे उन्हाळी भुईमुगाचे पीक घेतले.तीन फूट अंतरावर असलेल्या बोदावर दोन फूट अंतरावर फक्त दोन दाण्यांची टोकणनी केली. एकूण २० गुंठ्यांसाठी ४ किलो भुईमूगाचे दाणे लागले.त्यानंतर मध्ये २ मार्चला त्या भुईमुगाच्या दोन टोकणणीच्यामध्ये शतावरीची लागवड केली.
या शतावरी औषधी वनस्पतींची रोपे खास उत्तरप्रदेशमधील गाझियाबाद येथील 'औषधीय खेती विकास संस्थान' या संस्थेमधून ५००० रोपे मागवली पैकी ४५०० रोपे लावली या शतावरी पिकामधून दीड वर्षांनंतर चार लाख रुपये इतक्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.संपूर्ण पिकांसाठी ते आपल्या शेतात ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देतात.
भुईमुगाच्या पिकासाठी ४ दिवसांच्या अंतराने २ तास पाणी दिले गेले... खत म्हणाल तर कोणत्याही रासायनिक खतांचा वापर नाही...तर सेंद्रिय व जिवाणू खतांचा वापर केला. आणि बघता बघता चार महिन्यांत भुईमूगाच्या एकेका जाळीने आपल्या भोवतालचा तीन फूट जागा व्यापून घेतला इतकी त्याची भरघोस वाढ झाली.
बोदाच्या टापेपासून तळापर्यंत पसरलेल्या हिरव्याकंच जाळ्या आणि जमिनीला जखडून ठेवलेले ताने...संपूर्ण २० गुंठ्याचा प्लॉट हिरव्यागार भुईमुगाने आच्छादून घेतला.
आपल्या सामान्य भुईमुगाच्या तीन चार जाळ्या समान ती एकच जाळी...४ महिन्याच्या कालावधीत काढनीला येणारे हे पीक सरांनी २५ मे ला या भुईमुगाची काढणी केली..
तर काय आश्चर्य..? एका जाळीला सरासरी १८० ते २५० च्या दरम्यान लगडलेल्या भुईमुगाच्या शेंगा.हिरवीगार वजनदार टपोर शेंगांचे घोसच्या घोस असणारी एकेक जाळी.
अशा २० गुंठ्यांतून तब्बल १२ पोती शेंगांचे उत्पन्न झाले आहे. ४ किलो बियाण्यांतून १२ पोती शेंगा. म्हणजे १ किलो बियाण्यां मागे ३ पोती शेंगा असा या पिकाचा उतारा पडला आहे.
यासाठी एकूण खर्चाचा विचार केला तर १३५ रु प्रमाणे ४ किलो बियाण्यांचे ५४० अधिक जिवाणू खत एकूण साधारण १००० रु खर्च आला. आणि यातून उत्पन्न म्हणाल तर १ क्विंटल शेंगाचा दर ५,५०० एकूण चार क्विंटल शेंगा झाल्या म्हणजे २२००० रु.उत्पन्न फक्त चार महिन्यात मिळाले
ते ही मुख्यपिकातून नव्हे आंतरपीक घेऊन.
एवढेच नाही तर शेजारी असणारी ऊसाची चार महिन्याची लावण सुद्धा तरारून आली आहे.
त्याचबरोबर शेताच्या सभोवती हापूस आंब्याची सहा,नारळाची सहा,सीताफळ एक अशी झाडे आहेत या झाडांच्या मोहराकडे मधमाशा आकर्षिल्या जाऊन नैसर्गिक अधिवास मिळाल्यामुळे पोळे बनवतात व शेतात राहतात
या मधमाश्यांनी भुईमुग,कारले,काकडी यांच्यावरील विविध फुलांचे नैसर्गिक परागीभवन केल्यामुळे भुईमूग पिकाबरोबर भाजीपाल्या मधूनही जवळपास पाच हजार रुपये चे इतर उत्पादन मिळाले आहे असे येलकर सरांचे म्हणणे आहे.
श्री.येलकर सरांना यासाठी धामणे गावचे श्री.प्रकाश रावण सरांचे शेतीविषयक मार्गदर्शन लाभले.या यशाचे सर गमक सांगतात की,आपल्या शेतकरी बांधवांनी योग्य मार्गदर्शन घेऊन ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला पाहिजे तसेच अधिकाधिक रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे.एकूणच काय तर योग्य मार्गदर्शन... नियोजन,ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा, रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय व जीवाणू खतांचा वापर करून आपण कमी खर्चात कमी कालावधीत चांगले पीक घेऊन चांगला नफा घेऊ शकतो...
खालील व्हिडीओवर क्लीक करा आणि प्रत्यक्ष पहा.
अधिक माहितीसाठी संपर्क : श्री.ज्ञानदेव दशरथ येलकर.
मोबा - +917038868508