फॉलोअर

लेखक-नंदू साळोखे बेलेवाडी हुबळगी कोल्हापूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लेखक-नंदू साळोखे बेलेवाडी हुबळगी कोल्हापूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०

लेखक नंदू साळोखे (बेलेवाडी हु||) यांचा जीवन व लेखनप्रवास.




       '...आणि जगण्याला शब्दांचं बळ मिळालं.'

                  आजरा तालुक्यातील बेलेवाडी हुबळगी हे छोटेसं खेडेगाव.या गावातील सखाराम केरबा साळोखे व आक्काताई सखाराम साळोखेे यांच्या पोटी राम- लक्ष्मणागत दोन लेकरं जन्माला आली. थोरला मुलगा प्रकाश उर्फ नंदू आणि धाकटा सागर. एक छोटेसं शेतकरी कुटुंब.शेती हा प्रमुख व्यवसाय. या कुटुंबात २५ ऑगस्ट १९७८ रोजी नंदूजींचा जन्म झाला. एक चुणचुणीत गोरागोमटा पोर.गावच्या शाळेत जाऊ लागला, आपल्या सवंगड्यांसोबत गावाच्या मातीत खेळू- बागडू लागला. रान शिवारी सख्यासोबत्यांच्या संगतीने हिंडू फिरू लागला.गल्ली गावात दुडदुडत्या चालीने दौडू लागला. असे हे स्वच्छंदी बालपणाचे दिवस, भिंतीवरच्या कॅलेंडरच्या पानांनी कूस बदलावी तसे  मागे पडत गेले.दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं.लहानगा नंदू आता जाणता झाला.  शेताघरातल्या कामात लक्ष घालु लागला. सळसळत्या तारुण्याचं उमदं वय. कोणतंही काम करण्याचा उरात भरलेला
जोश.पण एकीकडे या उमलत्या तारुण्यावर घाव घालण्यासाठी नियती दबा धरून बसलेली.
                 ते साल होतं १ जानेवारी १९९८. अंगात तारुण्याची रग होती.त्या दिवशी नंदूजींनी उत्साहाच्या भरात,एक मण भाताचं पोतं डोक्यावर घेतलं नी तसेच घराच्या दिशेनं चालू लागले. आणि काही कळायच्या आत डोक्यावरच्या पोत्यासह नंदूजी खाली कोसळले.पोत्याखाली दबले गेले.मोठा अनर्थ घडला.नियतीने आपला डाव साधला.दुर्देवी वेळेनं मोठा घात केला,पाठीच्या कण्याला जबर मार लागला,गंभीर दुखापत झाली.त्यानंतर उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण नंदूजींचे अर्धे शरीर गारद झाले होते. त्याला जिवंत करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले.तीन महिने उपचार सुरू होते पण इलाज चालला नाही. मेंदूपासून खाली पायापर्यंत रक्तपुरवठा करणाऱ्या संवेदनशील नसा दबल्या गेल्याने कमरेखालचा भाग संवेदनाहीन झाला. शेवटी डॉक्टरांनी घोषित केले की,नंदूजी आता इथून पुढे कधी स्वतःच्या पायावर चालू शकणार नाहीत.

किती मोठा धक्का नंदूजीसह साऱ्या कुटुंबाला होता.हसत्या खेळत्या उमलत्या आयुष्यालाच त्या घटनेने सुरुंग लावला.जिवलगांच्या काळजाला भेगा पडल्या. नंदूजींच्या मनावर तर नकारात्मक विचारांनी कब्जाच केला. टोकाचे विचार सतत  मनाला टोकरू लागले. तिथून पुढे नवी मुंबई वाशी येथील 'शरण अपंग पुनर्वसन केंद्र' येथे भरती केलं गेलं.आता आयुष्य एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलं होतं.
                     शालेय जीवनापासून वाचनाची थोडी गोडी होती,ती कामाला आली. हळू हळू पुस्तकांची जवळीक वाटू लागली. या घटनेनंतर वाचनाची गती वाढू लागली.

पायांनी तर आता चौफेर उधळता येणार नव्हतं. पण मनाचा मात्र वारू शब्दांच्या सहवासात चौखूर उधळत होता. आणि जगण्याचं एक तत्व गवसलं.'शरीरानं अपंग झालो तरी, आपण मनानं कधीच अपंग नसतो.' शब्दांच्या पाठीवर स्वार होऊन आपण चहूमुलखाची सफर करू शकतो.आणि मग मनाला शब्दांची साथसंगत मिळत गेली. शब्द इतके घनिष्ट झाले की, या अपंग पुनर्वसन केंद्रात असताना शांत समयी शब्दांना अर्थाच्या धाग्यात ओवून  कवितेच्या एकेक  माळा बनवण्याचा मनाला छंद जडत गेला.
                         तब्बल बारा वर्षे म्हणजे एक तप संत साहित्याचे वाचन केले.वाचनाच्या विस्तीर्ण प्रदेशात धुंडाळताना विविधांगी वाचनाची आवड जोपासली. कथा,कविता,कादंबऱ्या मनाला भुरळ पाडत गेल्या. किती वाचू नि किती नको.आता फक्त बेभान होऊन वाचत राहणं.आधाश्यासारं मन पुस्तकांच्या पानापानावर रुंजी घालत होतं.आणि खरंतर उद्ध्वस्त जगण्याला दुरुस्त करण्याचं, मोडून पडलेल्या आयुष्याला पुन्हा उभा राहण्याचं,मरण्यासाठी विष मागणाऱ्या मनाला जगण्याचं बळ देण्याचं काम या शब्दांनी केलं,पुस्तकांनी केलं.
                              आता ''शब्दची आमुच्या जीवाचे जीवन" हे शब्द नंदूजींच्या जीवाचे जीवन झाले. हळूहळू विविधांगी वाचनातून लिखाणाची गोडी लागली. आणि नंदूजी म्हणतात तसं 'संत महंतांच्या पंक्तीतल्या उष्ट्यावर आमच्या शब्दांच्या पंक्ती झडतात.'वाचनाने प्रगल्भता लाभली आणि त्या ओघात त्यांची लेखणी प्रसवली. पानांवरचे शब्द वाचायची सवय होती आता  पानांवर शब्द उमटवायची सवय जडली.सुरुवातीला लेखणीस प्रारंभ झाला.सुरुवातीला कविता त्यानंतर कथा,कादंबऱ्या,लेख असे विविधांगी लेखन स्फुरत गेले.धामणे गावचे ज्येष्ठ साहित्यिक शि. गो.पाटील या गुरूंचे बोट धरून या शिष्याने लेखनप्रवासातले पहिले पुस्तक साकारले. यासाठी डॉ. संभाजी जगताप साहेबांची प्रेरणा मिळाली.आणि पहिल्यांदा २०१५ साली ग्रामीण ढंगातलाहा पहिला वहिला 'लुगडं'कथासंग्रह नावेद मुश्रीफ यांच्या हस्ते प्रकाशित झाला.

कोहिनूर फाउंडेशन मुंबईचा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट साहित्य वाङमयीन पुरस्कार या पुस्तकाला मिळाला.त्यानंतर ग्रामीण समकालीन जीवन कवेत घेणारा 'जांभळीखालचा झरा'  हा दुसरा कथासंग्रह श्री. पावले सर यांच्या सहकार्याने २०१६ साली प्रकाशित झाला.दक्षिण महाराष्ट्र साहित्य  सभेचा उत्कृष्ट वाङमयीन पुरस्कारही या पुस्तकाला मिळाला. तसेच साने गुरुजी वाचनालय झुलपेवाडी यांचे समारंभपूर्वक गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले.या दोन कथासंग्रह नंतर २०१८ साली 'केतकी' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. 


अशा साहित्य क्षेत्रातील यशस्वी वाटचालीबद्दल साप्ताहिक कोल्हापूर व लोकशाहीर द. ना. गव्हाणकर साहित्यभूषण पुरस्कार २०१९ या पुरस्काराने गौरविण्यात आले. गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकांची सुंदर प्रस्तावना लाभलेली 'इपळाप' ही 'कादंबरी आता लवकरच प्रकाशित होत आहे. 

तर 'आठवणीतील साठवण' व 'काळोखाला सूर्य बिलगला'(दोन्हीं आत्मचरित्रात्मक पुस्तके) या कादंबऱ्या तर 'बिवाळा' व्यक्तीचित्रणात्मक पुस्तक आगामी प्रकाशाच्या वाटेवर आहेत.अनेक मासिक,दिवाळी अंक ,वृत्तपत्रे यातून सातत्याने लेखन चालूच असते.
                      जीवन प्रवासात एका क्षणी नियतीने दगा दिला अर्ध शरीर जायबंदी केलं.आज २२ वर्षे झालीत हे अपंगत्व येऊन. शरीर अंथरुणाला खिळलं आहे,मातीत धडपडणारे पाय आज गादीवर निर्जीव होऊन निपचित पडलेले असतात. खूप त्रास होतो,वेदना अव्याहतपणे साथ देत असतात. कधी पाठीला जखमा होतात ,पचनक्रिया बिघडते, मूत्राशयाचा संसर्ग हा तर ठरलेलाच. कधी तापानं अंग फणणतं. कधी अवघ्या अंगाला कापरा भरतो.शत्रूसारखे एकेक आजार या शरीरावर विजय मिळवण्यासाठी टपून बसलेले असतात. काही लिहायचे म्हटले तरी हात कापतात.नीट बसता येत नाही,एका कुशीवर होऊन लेखन करावे लागते.  पण हार मानणारे ते नंदूजी कसले..? त्यांनी सर्वांवर  कधीच मात केलीय. अशा आजारपणात धावून येतो,तो एक माणसातला देव तो देव म्हणजे डॉक्टर संभाजी जगताप. नंदूजींच्या कसल्याही आजारपणात ते एकेकदा घरी येऊन उपचार करतात. सतत त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असतात.नंदूजींचे प्रकृती स्वास्थ्य उत्तम ठेवण्यात त्यांचा खूप मोठा आधार आहे. शारीरिक पातळीवरचा हा संघर्ष खूपदा मानसिक स्वास्थ्याला आव्हान देत असतो.सुरुवातीला चिडचिडेपणा व्हायचा, राग अनावर व्हायचा. सगळ्यांचा त्रागा वाटायचा. पण वेदनांच्या या नानाकळांची अनुभूती आता सर्वांगाला झाली होती.आणि म्हणून या अनुभूतीला मनाच्या सहानुभूतीची जोड मिळत गेली.आजतागायत असहाय वेदना शरीरानं झेलल्या अन मनानं सोसल्या पण आता अशा सहनशीलतेतून मनाला शांती नी संयमाची स्थिती प्राप्त झाली. आता मनाच्या शांतीत सारं काही विरून जातं.
                                    आई-वडिल या पोटच्या गोळ्याला आजही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपताहेत. लेकराचं उभं आयुष्य असं अपंगत्वाच्या तावडीत सापडलं हा त्यांच्या काळजावर पडलेला घाव कधी न भरून येण्यासारखा आहे. तो घाव इतका वर्मी होता की, उभ्या आयुष्यभराचं दुःख पदरात घातलं.आजही या कष्टाळू आई-बापाचे हिरमुसलेले चेहरे हृदयातल्या त्या ओल्या जखमांची साक्ष देतात.
१४ वर्षे वनवास भोगणाऱ्या  रामाला जशी लक्ष्मणाची अखंड साथ लाभली. तशी आज २२ वर्षे हा अपंगत्वाचा वनवास भोगणाऱ्या भावाला लक्ष्मणागत साथ मिळते आहे ती आपल्या पाठच्या भावाची म्हणजेच सागरजी यांची.नावाप्रमाणेच मायेचा हा सागर आहे.आजच्या कलियुगामध्ये दुर्मिळ अशी ही  राम लक्ष्मणागत भावांची जोडी आहे.

आपल्या थोरल्या बंधूची सेवा अखंडपणे हा भाऊ करत आला आणि आजही करतो आहे.घरातील ऊठ-बस किंवा बाहेरचा प्रवास असू दे ,चाकाच्या खुर्ची मधून दोन हातावरती अंतराळी घेऊन एखाद्या ठिकाणी बसवायचं नी पुन्हा चाकाच्या खुर्चीत ठेवायचं अशी सगळी मायेची उठाठेव  बंधू सागरजी करतात. अतिशय प्रेमळ,जिव्हाळा असणाऱ्या भावाची आणि त्यांच्या पत्नीची साथ नंदूजींना मिळते आहे.
                         सागरजींच्या संसाररुपी वेलीवर फुललेली दोन फुले केतकी आणि स्वरा. यांचा तर नदूजींना विशेष लळा.या फुलांच्या सहवासात त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने सुगंध आला आहे. शब्दांनी जगण्याची हिंमत दिली, पुस्तकांच्या सहवासात जगणे साध्य झाले,वाचनातून समृद्धता आली.समृद्ध व प्रगल्भ ज्ञानातून लेखणीचा उगम होत राहिला आणि या शब्दांच्या प्रवाहामध्ये अनेक संवेदनशील मनांची नाती जुळत गेली. जीवंत हृदयाची माणसे भेटत गेली. आज सभोवार संत सज्जनांचा जीवलगांचा गोतावळा निर्माण झाला आहे. संतरुपी गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी सारख्या गुरुभेटीने तर नंदूजींचे अवघे जीवन धन्य धन्य झाले आहे.

                            आज काय गमावलं नी काय कमावलं..? याचा हिशोब मांडताना...काय गमावलं. तर नियतीने दोन पायच हिरावून घेतले ना..? पण याच्या उलट आज नदूजींच्या एका हाकेवर धावून येणारे असंख्य पाय हे त्यांचे झालेत.शरीर जरी एका ठिकाणी स्तब्ध असलं तरी मनानं मात्र उंच भरारी घेतलीय,शब्दांच्या जगात भटकंती करताना स्वतःमधला एक उत्तम संवेदनशील लेखक गवसला.त्यांच्या शब्द सामर्थ्यामधून वाचकांची नाळ त्यांच्या लेखणीला जोडली गेली.माणसातला एक वेगळा माणूस म्हणून ओळख निर्माण झाली.समाजातील मान,सन्मान,प्रतिष्ठा चालत त्यांच्याकडे आली.

जगण्याच्या वाटेवर अडखळलेल्या पावलांना आज नदुजींच्याकडे पाहून पुढे चालण्याची प्रेरणा मिळते... आज हे नदुजींनी कमावलं.नंदूजी आपली पाऊले कधीही थांबली नाहीत तर तर धडपडले आजपर्यंत तुमच्या आईवडिलांच्या पावलांच्या रूपातून,आज धडपडताहेत भाऊ सागरजींच्या रूपातून आणि इथून पुढे सदैव धडपडत राहतील तुमच्या लाडक्या लेकी केतकी आणि स्वरा यांच्या पावलांच्या रूपातून.

               'जय हो...मंगल हो..!!'

               
                  - किरण सुभाष चव्हाण (पांगिरे)
                    मोबा - ८८०६७३७५२८.

ग्रामीण लेखक नंदू साळोखे यांची क्षणचित्रे अवश्य पहा खालील लिंकवर.

https://youtu.be/ztOP6VYdiXY

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...