फॉलोअर

शाळेतील प्रसंगानुभव कथा - चित्र पुसलं आणि लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शाळेतील प्रसंगानुभव कथा - चित्र पुसलं आणि लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

शाळेतील प्रसंगानुभव...चित्र पुसलं आणि-किरण चव्हाण.

शाळेतील प्रसंगानुभव...



                                  चित्र पुसलं आणि...


                      चारची लहान सुट्टी संपली मुलं वर्गात येण्याची घंटा वाजली.मैदानावरची सैरावैरा पावलं वर्गाकडे वळाली.घामेजून गेलेली मुलं दम खात एकदाशी आपल्या जागेवर स्थिरावली.पाचवी वर्गावर माझा चित्रकलेचा तास.वर्गप्रवेश करताच हातवारे करून सगळ्या मुलांचा  एकच गिल्ला...

"सर सर..आता चित्रकलेचा तास.." ही अशी मला आठवण करून देणं आणि दुसऱ्याचं क्षणी ..."चित्रं... चित्रं.... चित्रं." अशी एकच 'री' ओढली.

"अरे हो हो...विचित्र मुलांनो तुम्हांला काही दमधीर आहे का नाही...अरे वर्गात तरी नीट येऊ द्याल काय लागलाय ओरडायला नुसतं चित्रं चित्रं..." असं बोलून त्यांच्या सुराला लगाम घालायचा प्रयत्न केला.

 काय सांगायचं या मुलांना इतर विषयांच्या वेळी यांची दमछाक होते आणि या विषयाला मात्र  हे आमची दमछाक करतात..विचार केला कोणतं चित्रं काढावं बरं.?.आणि लक्षात आलं एक चित्रं पाहिलं होतं पाहताच क्षणी आवडलं होतं चला तेच चित्रं फळ्यावर रेखाटूया..ते चित्र होतं एका सुंदरशा बाहुलीचं... काळ्याभोर केसांचे टोपडे मधून माळलेला फुलांचा गजरा..डोक्यावर छानसा तुरा, गोबऱ्या गालाची मिटल्या डोळ्याची निरागस बाहुलीराणी.फळ्यावर मधोमध चित्र रेखाटायला सुरुवात केली...इथे एक मुलं आमचं वाक्य वाचवतात ते म्हणजे मुलांना सांगावं लागत नाही की,वही पेन्सिल काढा म्हणून.न सांगताच त्यांनी वरती काढून ठेवलेले असतात. इकडं फळ्यावर जसं चित्रं रेखाटायचा तशी तिकडं मुलांची ते चित्र उतरून काढायची आपली धडपड सुरू झालेली.चिमुकल्या बोटांतली पेन्सिल फळ्यावरची रेघनं रेघ टिपून घेत होती. अगदी सुटसुटीत असणारा बाहुलीचा फक्त तोंडावळा फळ्यावर रेखाटला रंगीत खडूनीं ओझरत्या काही जागा रंगवल्या...आणि आश्चर्य अगदी कमी वेळात सहजगत्या सुंदर कलाकृती फळ्यावर साकारली गेली...याची जाणीव मला मागून मुलांच्या आलेल्या प्रतिक्रियेतून झाली..."सर लई भारी चित्र आलंय बघा..आवडलं आम्हास्नी.." जगाच्या पाठीवर अशी उस्फुर्त निखळ प्रतिक्रिया ऐकावी तरी कोणाकडून..? मुलांच्या त्या प्रतिक्रियेचं जे काय सुख ते माझ्या मनालाच ठावं.

                                                          मुलं म्हणतायेत चांगलं आलंय चित्रं म्हटल्यावर शेवटचाचं हात फिरवला आणि थोडं लांबून चित्र निरखलं.मुलं म्हणतात तस छान आलं होतं चित्रं..चित्रातली बाहुली अगदी हुबेहूब देखणी वाटत होती.आता या चित्राचं प्रतिबिंब मी मुलांच्या वहीत पाहू लागलो... फळ्यावरचं चित्र पाहून मुलं जीव ओतून आपल्या वहीत चित्र रेखाटत होती..आपल्या चिमुकल्या कुंचल्यातून चित्र साकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होती...कुणाचे अर्धे,कुणाचे पूर्ण चित्र मोठ्या कौतुकाने एकेक करून मुलं चित्र दाखवायची..जे त्यांनी काढलं होतं ते त्यांच्यापरीनं चांगलंच होतं. मी थोडाफार बदल सांगून त्याच्या पाठीवर भरपूर शाबासकी देत होतो...सारी मुलं अशी चित्रं काढण्यात दंगून गेली असताना.अखेर शाळा सुटण्याची घंटा वाजली.ज्यांचे चित्र अर्धवट होते त्यांचा ओझरता हिरमुसलेपणा माझ्या लक्षात आला आणि मग मी म्हटलं "काही हरकत नाही मुलांनो ज्यांचं चित्रं अर्धवट राहिलय त्यांनी उद्या पूर्ण करा, चला आता आवरा पाहू.." वंदे मातरमने आजच्या दिवसाची सांगता झाली आणि वर्गातून बाहेर पडताना काही मुली म्हणाल्या..." सर चित्रं छान आलंय हं, तुमच्या मोबाईलमध्ये  त्याचा फोटो काढून ठेवा सर.." अरे हे मला सुचलच नाही की, "हो हो.."म्हणत मी जाता जाता माझ्या मोबाइलमध्ये त्या चित्राची छबी टिपली. 

                                      दुसऱ्या दिवशी पहिल्याच तासाला आमचे सुतार सर पाचवीच्या वर्गावर गेले आणि हातात डस्टर घेताचं मुलांनी एकच गोंधळ सुरू केला. "सर आमचं चित्र पुसायचं नाही अजून आम्हीं चित्र वहीत काढायचं पण आहे." सर्वचं मुलांनी काहीशा अधिकारवाणीने केलेला तो निरागस हट्ट सरांनाही मोडवेना. नाईलाजाने फळ्याच्या मधोमध असलेलं ते चित्र तसेच ठेवून उरलेल्या बाजूच्या जागेत सरांनी गणिताची मांडणी केली.असाच पहिला, दुसरा,तिसरा तास झाला तरी काही मुलांनी येणाऱ्या सरांना चित्र पुसू दिले नाही.दुपारी जेवणाची मोठी सुट्टी झाली..तरी फळ्यावर अजून चित्र तसेच.मी व्हरांड्यातून एक फेरफटका मारला आणि माझ्या पाचवीच्या वर्गात शेवटच्या बेंच वर जाऊन बसलो.बाजूलाचं काही मुलं जेवण्यात गुंग होती.काही फळ्यासमोर उभा राहून त्या चित्राच्या बगलेला त्याची प्रतिकृती चिमुकल्या हाताने मनसोक्तपणे रेखाटत होती. बाकीच्या वर्गातीलही मुलं कुतूहलाने या वर्गात येऊन ते चित्र पाहून जात होती.

                                काल रेखाटलेलं चित्र आता माझ्या डोळ्यासमोर होतं..आणि असच त्याच्याकडे एकटक पहात असताना विचारांच्या तंद्रीत हरवलो..मनात एक विचारांचं चित्र हळूहळू स्पष्ट होत होतं.किती साधं चित्र अगदी सहजपणे रेखाटलेलं पण का कुणास ठाऊक मुलांना आणि मलाही त्याची इतकी ओढ लागावी..? आता हे चित्र पुसलं जाईल कुंचल्यातून निर्मिलेली एक न एक रेघ क्षणभरात लुप्त होईल ती पुन्ह्यांदा कधी न दिसण्यासाठी. जशी माणसं काळाच्या पडद्याआड निघून जातात कायमची ती पुन्हा कधीच दिसत नाहीत.तसच याही चित्राचं होईलह. याच्यापेक्षाही सुंदर चित्र रेखाटता येतील ना..? मग काय हरकत आहे ते पुसलं तर ?  पण प्रत्येक कलाकृतीची एक वेगळी ओळख असते...ती कलाकृती निर्माण करताना त्यात भाव ओतलेला असतो..त्या प्रत्येक कलाकृतीशी कलाकाराचं अजोड नातं जोडलं गेलेलं असतं... म्हणून दुसरी कोणतीही कलाकृती कितीही सरस असली तरी तीची जागा नाही घेऊ शकत...प्रत्येकाचं स्थान वेगळं जसं माणसांचं असतं तसंच या चित्राचंसुद्धा...त्याचं स्थान मुलांच्याच काय माझ्याही हृदयात स्थिरावलंय म्हणूनच जे मुलांना वाटतं ते मलाही की, हे चित्र कधीच पुसू नये. एकाएकी घंटेचे टोल कानांवर पडले आणि माझी ही विचारशृंखला मध्येच खाळकन तुटली..एकदाशी माझी ती विचारमग्न समाधी भंगली.

                                                          मोठ्या सुट्टीनंतर इ सहावी व सातवीवर माझी तासिका झाल्या.आणि पुन्हा चारच्या सुट्टीनंतर मी माझ्या पाचवीच्या वर्गावर आलो.आपसूकच नजर फळ्यावर गेली. आता फळ्यावर ते चित्र नव्हतं.पुसलं गेलेलं.सहाजिकच पुसलं तर जाणारच.मी असो किंवा कोणीही त्याला पुसावं लागणारच होतं. मी त्या चित्राच्या बाजूला लिहिलेलं होतं 'मी बाहुली राणी झाले उदासवाणी म्हणजे ती पुसली जाणार होती म्हणून की काय उदास होती...असो. मी माझ्या शिकवणीला सुरवात करणार पण आता समोरचे गंभीर वातावरण लक्षात यायला मला वेळ लागला नाही. काल तर हीच मुलं किती आनंदाने चित्र काढा म्हणत होती...मग आता काय झालं..? त्यातल्या त्यात काही मुली तर मला फार उदासवाण्या दिसत होत्या.पण मुलांनी शेवटी तोंड उघडले..."सर मुली सरांना चित्र पुसुच देत नव्हत्या...आणि सरांनी चित्र पुसल्यानंतर म्हणून त्या रडकुंडीला आल्यात.." अस आहे तर आता खरी परिस्थिती ध्यानात आली.

                                                           चित्र काढल्यापासून मुलं त्या चित्रात गुंतलीचं होती इतकी की,त्यांना वाईट वाटणारचं हे मी समजून गेलो होतो. समोरच्या बाकावरील तर दोन मुली अगदीच काकुळतीलाचं आलेल्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या.आता काय करावे बरं.?.चला काही शिकवण्या अगोदर  त्यांची नाराजगी दूर करूया..साऱ्यांना हसते करूया म्हणून मी माझ्या ठेवणीतलं पान काढलं...म्हणजे आमचा 'श्री'.आमचा श्री म्हणजे कलंदर विद्यार्थी... त्याची एक गाणं  म्हणायची पद्धत काही औरंच. म्हणजे अशी की मुळ गाण्यात आपलेच शब्द घुसडून चांगल्या गाण्याची अशी वाट लावायचा ,हसून हसून पोटात दुखेल ऐकणाऱ्याच्या. मग काय श्री ने आपली केली सरळ सुरुवात आणि शिरला एकदासा वाकड्यात..सगळा वर्ग लागला ना खो खो हसायला...लढवली शक्कल कामी आली पण दोन मुली सोडून...सगळा वर्ग हसला पण या बया हसायलाच तयार नाही...रुसून फुगून टम्म....बरं श्री चं गाणं सगळ्या वर्गाला लागू पडलं आता प्रश्न या दोघींचा होता..हत्ती गेलं आणि शेपूट राहिलं तशातली गत आता दोघींना कसं हसवायचं...चला शेवटचं पान मीच हाती घेतलं... सलील कुलकर्णी यांनी गायलेलं 'चिमुकल्या चोचीमध्ये आभाळाचे गाणे' हे गाणं मुलांना सांगून गाऊन घेतलं...आणि शेवटी गणपती स्रोताने शेवट केला माझ्या एकूण प्रयासातून मृणाल नावाची मुलगी शेवटी गाण्यात रमली कारण तिला मुळात गाण्याची आवड असल्याने शेवटी ती रुळली पण श्रावणी नावाची मुलगी काही आपला हेका सोडायला तयारच नाही..'.यानें की हमे सिर्फ एक कामियाबी हासील हुई.' अखेर शाळा सुटण्याची घंटा वाजली..वंदे मातरमनंतर मुले वर्गातून बाहेर पडू लागली.जाता जाता पुन्हां एकदा श्रावणीला समजावण्याचा प्रयत्न केला तो ही वाया गेला. आता बाकीच्या मुली मला म्हणायला लागल्या. "सर आता ती तुमच्याशी बोलणारच नाही..रुसलीच आहे तुमच्यावर.."

                                                               आता माझ्यावर रुसून काय करणार बिचारी. चला एकदाका घरी गेली की,विसरून जाईल सर्व म्हणून मी काढता पाय घेतला आणि वर्गातून  सरळ ऑफिसच्या दिशेने जाऊ लागलो...व्हरांड्याच्या दगडी पायऱ्या उतरून पुढे दहा पाऊलेही टाकली नसतील तोच मुली मागून ओरडून सांगू लागल्या..."सर...सर...मागे या..मागे..या..श्रावणी काही घरी जात नाही इथंच थांबून राहिलीय" झाली का पंचायत. काय करणार वळलो माघारी.तिच्या जवळ गेलो तर आदीच तिच्याभोवती तिच्या मैत्रिणींचा गराडा पडला होता "आता ती हुंदक्याने दाटून आली होती... अश्रू अनावर झाले होते...डोळ्यांना मुठी लावत अक्षरशः ती अश्रू ढाळत होती.कसं समजवावं या पोरीला.. मी आणि माझ्याबरोबर आमचे गुरव सर दोघेजण तिची समजूत घालू लागलो होतो तिच्या काही मैत्रिणीही जाणतेपणाने तिला समजावीत होत्या आणि मलाही सांगत होत्या "सर आता उद्या या बाहेरच्या फळ्यावर चित्र काढा आणि त्याच्या खाली लिहा सुद्धा हे चित्र कोणी पुसू नये म्हणजे कोणी पुसणार नाही." किती एकीकडे  हा मुलींचा सामंजस्यपणा आणि  दुसरीकडे श्रावणीचा हा हट्टीपणा..मुली खरंच समजूतदार होत्या त्यांच्या त्या जाणतेपणाची केवढी ही समज म्हणायची आम्हाला जे सुचत नव्हतं ते त्या बोलून अगदी शिताफीने तिची समजूत काढत होत्या आणि मग कुणास ठाऊक कसं माझ्या लक्षात आलं तसं मी तिला म्हणालो..." श्रावणी चित्र कुठंही गेलेलं नाही मी त्या चित्राचे फोटो मोबाईल मध्ये काढले आहेत बघ हवे तर..तुला हवे तेंव्हा पहा मग तर झालं." आणि मग काय सांगायचं,अखेर ही शेवटची मात्रा मात्र लागू पडली.हुश$$.शेवटी काही का असेना नकळत हास्याची एक ओझरती लहर तिच्या चेहऱ्यावर दाटली...आणि मैत्रिणीच्या गरड्यातून ती घराच्या वाटेला लागली आणि मी ऑफिसच्या...

                                        आता पुन्हा मनात मगाची ती दुभंगलेली माझी विचारशृंखला सांधली जाऊ लागली मी त्या विचारशृंखलेत विचारांचे एकेक मणी ओवू लागलो...एक साधसंच चित्र रेखाटलं आणि काय प्रसंग उभा राहिला...उगाच वाटून राहिलं त्याच वेळी पुसलं असतं तर बरं झालं असतं या मुलांना त्या चित्राचा लळा तरी लागला नसता....पण शेवटी मुलंचं ती निर्जिवत्वमध्ये जिवंतपणा शोधणारी.पण लळा लागावा तो कशाचा एका चित्राचा. जे काही क्षणांनंतर पुसलं जाणार आहे.मला ही ते चित्र पुसलं जाण्याची कुठे तरी मनात हूरहूर लागलीच होती की...माझ्या त्या अव्यक्त विचारशृंखलेचं व्यक्त रूप मुलांच्या त्या डोळ्यांत दिसलं होतं..एकीकडे माझ्या मनातील ते विचार आणि दुसरीकडे त्या बाल मनातील भावना यांच्याशृंखलेतील सुवर्णमध्य विचारमोती अंती गवसला तो हाच की, बाळांनो इथं काहीच चिरंतन नाही जे आकाराला आलं ते कधी ना कधी निराकार होणारच...फळ्यावरच्या त्या एका चित्राचं काय घेऊन बसलात जगाच्या पाटीवरील माणसं पुसली जातात बाळांनो, मग त्यांच्यासाठी कोणी थांबतं का..? नाही ना..पुन्हा नवी माणसं.. नवी नाती...जशी पाने गळल्या फांदीला नवीन पालवी फुटते...तस आपण नव्याच्या शोधत असलं पाहिजे... एकाच गोष्टीत गुंतून नको पडायला.. नवनिर्मिती करीत राहिलं पाहिजे...जुनेपणाला मागे सारून नव्याचा आंनद घेता आला पाहिजे..  या एका चित्राचं काय..?.चला मुलांनो पुन्हा नव्याने अशी नवी चित्रं काढुया...पुन्हा पुसुया...पुन्हा काढुया...काढत राहूया...



नाळ कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात पुस्तकातील सहभागी लेखक सन्मान सोहळ्यात माझ्या 'चित्र पुसलं आणि...' कथेबद्दल महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री मा. सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्याहस्ते सन्मान स्वीकारताना, व्यासपीठावर  प्रा.जी.पी.माळी सर,किसनराव कुऱ्हाडे सर,आप्पासाहेब खोत, विस्तार अधिकारी श्री.विश्वास सुतार साहेब उपस्थित साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर.


                                      साहित्यिकांची मांदियाळी



माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...