'प्रांताधिकारी डॉ.संपत खिलारी प्रशासनातले कर्तव्यदक्ष, दमदार व कसदार अधिकारी.'
पुणे जिल्ह्यातील आणि जुन्नर तालुक्यातील मंगळूर हे एक छोटंसं खेडेगाव.या छोटयाशा गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात डॉ.संपत कोंडाजी खिलारी यांचा ५ सप्टेंबर १९७५ साली जन्म झाला.आई वडील दोघेही अशिक्षित.पण म्हणतात ना
'शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी.' तसे आपल्या तीन भावंडांमध्ये हे शेंडेफळ.घरामध्ये वारकरी संप्रदायाचा वारसा.त्यामुळे अध्यात्माचे संस्कार लहानापासून मनावर बिंबलेले.प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मंगळूर या शाळेत झाले.उपजत हुशारपणा आणि कुशाग्र बुद्धिमता असल्यामुळे.इ ७ वी स्कॉलरशिप परीक्षेत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत १८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.आणि इथेच पुढच्या यशस्वी कार्यकिर्तीचा पाया रचला गेला.पुढचे माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी हायस्कुल पारगाव येथे झाले.व त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण मेनन कॉलेज भांडुप मुंबई येथे पूर्ण केले.त्याचबरोबर मुंबई येथे राहूनच मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात एम.व्ही. एससी.(पशुपोषण) शास्त्रात आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले.आणि पुढील दोन वर्षे जनावरांचे डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस सुरू राहिली.पण मनात याहून काहीतरी वेगळे करण्याची उमेद होती प्रशासकीय सेवेत जाऊन अधिकारी होण्याचे स्वप्न मनात होते.आणि त्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली.अंगभूत कुशाग्र बुद्धिमत्तेला जिद्द,चिकाटी महत्वकांक्षेची जोड मिळाली.दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवेच्या परीक्षेतून २५ नोव्हेंबर २००२ रोजी पुणे महसूल विभागात परिविक्षाधीन तहसीलदार या पदावर रुजू झाले.२००२ पासून २००५ या कालावधीमध्ये ते या पदावर कार्यरत राहिले...इथून त्यांच्या कार्याचा व पदांचा चढता आलेख सुरू झाला.२००५ ते २००८ या कालावधीत मावळ जि- पुणे येथे तहसीलदार..२००८ ते २००९ पर्यंत तहसीलदार, संजय गांधी, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे.त्यानंतर २००९ ते २०११ तहसीलदार कागल,जि- कोल्हापूर.२०११ ते २०१२ तहसीलदार शिरोळ,जि-कोल्हापूर.असा तहसीलदार पदाचा कार्यकाळ सुरू असताना. १ ऑगस्ट २०१२ रोजी उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती प्राप्त झाली.आणि मग ऑगस्ट २०१२ ते जून २०१३ उपजिल्हाधिकारी म्हणून भूसंपादन अमरावती. त्यानंतर जून २०१३ ते ऑगस्ट २०१४ कुलसचिव,महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ(माफसू)नागपूर येथे कार्यरत.सप्टेंबर २०१४ ते जानेवारी २०१७ पर्यंत उपविभागीय अधिकारी महसूल भंडारा जि- भंडारा.आणि सध्या जून २०१७ ते आजअखेर उपविभागीय अधिकारी, आजरा-भुदरगड, उपविभाग गारगोटी, जि-कोल्हापूर येथे कार्यरत आहेत.
अशा एकूण प्रशासकीय सेवेच्या कारकिर्दीत अतिशय महत्वपूर्ण उपयुक्त असे निर्णय घेऊन ते अंमलात आणले.
१)कागल येथे तहसीलदार असताना tahsildarkagal.com व शिरोळ येथे तहसीलदार असताना tahsildarshirol.com या वेबसाईटची निर्मिती केली.आपल्या कार्यात्मक पद्धतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन राज्यातला पहिलाच एक अभिनव उपक्रम साकारला.
२) शिरोळ तालुक्यात तहसीलदार पदावर कार्यरत असताना तहसीलदार कार्यालय,शिरोळ यास आय.एस.ओ. 9001-2008 मानांकन प्राप्त करून देण्यास महत्वाची भूमिका बजावली.तत्कालीन मुख्यमंत्री मा.पृथ्वीराज चव्हाण व महसुलमंत्री मा.ना.बाळासाहेब थोरात महाराष्ट्र राज्य. यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
३) मावळ तालुक्यातील आदिवासी भागातील १८०० पेक्षा अधिक आदिवासी कुटुंबाना व आजरा-भुदरगड तालुक्यातील ३५० धनगर कुटुंबाना जात प्रमाणपत्रांचे शिबिराद्वारा वाटप केले गेले.म्हणजे अडथळ्यांची किती शर्यत पार करून वैयक्तिक जातीचे प्रमाणपत्र काढत असताना करावी लागणारी पराकाष्ठा ओळखून डोंगराळ व जंगल भागात राहणाऱ्या या गरीब,गरजू वंचित लोकांना एकाच छताखाली शिबिराद्वारे जात प्रमाणत्रांचे वाटप केले.
४)सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत राज्यस्तरावर स्वीकृत कोल्हापूर जिल्ह्यातील उपक्रम 'ई चावडी योजना' व चावडी वाचन योजना या योजनांची निर्मिती व यशस्वीपणे अंमलबजावणीमध्ये महत्वपुर्ण योगदान दिले.
४) माफसू अंतर्गत कार्यरत पशुवैद्यकीय, मत्स्य व दुग्ध तंत्रज्ञान शाखा अंतर्गत महाविद्यालयांकरीता शासनस्तरावरून एकूण २९५ नवीन पदनिर्मिती मंजूर करून घेणेकामी महत्वपूर्ण सहभाग राहिला आहे.
५) सन २००८ पासून प्रलंबित दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय,उदगीर जि-लातूर करिता नवीन ५५ पदनिर्मिती व रु.५७.५८ कोटी इतका निधी शासन स्तरावरून मंजूर करून घेणेकामी महत्वपुर्ण सहभाग राहिला आहे.
एकंदरीत असा प्रभावीपणे कार्य करण्याचा धडाका आणि शासनाच्या विविध योजनांमध्ये महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल अनेक संस्था व शासन स्तरावरून पुरस्कार देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला आहे...
प्राप्त पुरस्कार-
१) मावळ वार्ता वृत्तवाहिनीतर्फे"कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी"म्हणून सन २००६ चा पुरस्कार.
२) सन २०१०-११ या वर्षाकरिता "उत्कृष्ट तहसीलदार" म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांचेकडून विभागीय स्तरावर शिफारस.
३) महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा "उत्तम कार्यकर्ता प्रशासकीय अधिकारी" २०१२ चा पुरस्कार मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री मा.अजित पवार महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
४)ज्येष्ठ पशुवैद्यकीय प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य तर्फे जागतिक पशुवैद्यकीय दिनी २०१३ रोजी पशुवैद्यकीय व प्रशासकीय क्षेत्रातील कामकाजाच्या अनुषंगाने सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
५) सन २०१८-२०१९ या वर्षाकरिता "उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी"म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांचेकडून विभागीय स्तरावर शिफारस.
६) २०१८ चा अनुलोम संस्थेचा अनुलोम संमित्र पुरस्कार मिळाला.
७) नुकताच २०१९ चा आपल्या मंगळूर गावचा मंगळूर भूषण पुरस्कार मिळाला.
एका छोट्याशा खेडेगावात सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात अशिक्षित आईबापाच्या पोटी जन्म घेतलेला मुलगा मोठा साहेब झाला.प्रशासनातला उच्चपदस्त अधिकारी बनला.घरामध्ये वारकरी संप्रदायाचे वातावरणात, अध्यात्माचा प्रभाव यामुळे "बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे."
असा अवघ्यांच्या कळवळ्याचा,संवेदनशीलतेचा संस्कार लहानवयात कोवळया मनावर कोरला गेला होता..त्यामुळे उपजतच समाजसेवेच्या कार्याची ओढ मनात होती...म्हणून प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून आपल्याला समाजातील अनेक घटकांविषयी चांगले कल्याणकारी काम करता येईल ही महत्वकांक्षा ठेवून एक वर्ष जनावरांचे डॉक्टरची प्रॅक्टिस तिथून तहसीलदार व सध्या उपजिल्हाधिकारी पदापर्यंतची यशस्वी वाटचाल सुरू राहिली. लोकाभिमुख काम हीच त्यांची ओळख.सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांशी त्यांच्या कार्याची नाळ जोडली गेली आहे.प्रशासनामधला स्वच्छ व पारदर्शी,प्रामाणिक कर्तबगार अधिकारी म्हणून त्यांचा दबदबा सर्वपरिचित आहे.प्रशासनाचे काम हे लोकाभिमुख असते पण त्याची अंमलबजावणी करणे हे सर्वस्वी अधिकाऱ्यांवर अवलंबून असते.म्हणून हा असा लोकाभिमुख अधिकारी आहे की जो लोकहितासाठी आपली प्रशासकीय सेवा प्रभावीपणे राबविण्याचे काम अत्यंत प्रामाणिक व तळमळीने करत असतो.कोणत्याही कामाचे जर स्पष्टपणे उद्दिष्ट ठरले असेल तर ते काम नेटाने व अधिक जोमाने होत असते.आणि म्हणूनच खिलारी साहेबांच्या सेवेचे उद्दिष्टचं ठरलेले आहे...लोकाभिमुख काम...तळागाळातील लोकांपासून सर्वसामान्य घटकापर्यंत जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं चांगलं करत रहायचं...आणि म्हणून त्यांच्या चांगुलपणाची ओळख समाजात अशी निर्माण झाली आहे की,डॉ.संपत खिलारी साहेब म्हटलं बांधावरच्या शेतकऱ्यांपासून ते नोकरवर्ग, सर्वसामान्य लोक आदराने व आपुलकीने त्यांचे नाव घेत असतात.प्रशासनात त्यांच्या अखत्यारीत ज्या स्नेहीवर्गाने काम केले त्यांच्यामध्येसुद्धा ते बदलून जरी गेले तरी त्यांच्याविषयी एक आपुलकी,आदर व काम करत राहण्याची प्रचंड प्रेरणा त्यांच्याकडून मिळते अशी भावना ऐकायला मिळते.पुढे जाताना मागे आपल्या नावाचं एक प्रेरणादायी अस्तित्व निर्माण करणं...आणि चांगल्या कार्याशी ते नांव जोडलं जाणं हे उत्तम कार्यकर्त्या कर्तव्यदक्ष अधिकाराच्याचं लक्षण समजलं जातं आणि म्हणून
अधिकारी कसा असावा..? तर तो असा असावा ही त्यांच्याविषयीची भावना प्रत्येकाच्या मनात आहे.
प्रशासकीय सेवा बजावताना हळुवार समाजाच्या कुशीत शिरून दुःखीतांच्या दुःखाशी समरस होऊन ते निवारण्याचे काम करत राहणं हे त्यांच्यातल्या समाजसेवकाचे दर्शन घडवतात.या त्यांच्या चांगुपणाचा एक प्रत्यय म्हणजे मागील वर्षी आजरा तालुक्यातील किटवडे धनगरवाड्यातील पांढरंमिसे कुटुंबातील सहा मुली ज्यांचं पितृछत्र हरपलेलं.उपविभागीय अधिकारी डॉ संपत खिलारी साहेबांच्या पुढाकाराने आजरा महसूल विभागाने प्रत्येकी दहा हजार अशी एकूण ६०००० रु रक्कम या सहा मुलींच्या नावे पोस्टाच्या बचत खात्यात ठेव म्हणून ठेवली.
तसेच याच किटवडे धनगरवाड्यात शाळेसाठी इमारत नाही..शाळा एका गोठ्यात खाजगी जागेत भरते हे लक्षात आल्यावर प्रांताधिकारी म्हणून विशेष लक्ष घालून योगायोगाने ५ सप्टेंबर २०१९ रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त शिक्षकदिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकाऱ्यांच्या भूसंपादनाच्या आदेशाचे पत्र त्यांनी तहसीलदार व विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत शिक्षक व ग्रामस्थ यांच्याकडे सुपूर्द केले.धनगरवाडा शाळेला शिक्षकदिनी हक्काची जागा मिळवून देऊन खरा न्याय दिला.
"जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले.." या अपलेपणाच्या वृत्तीने समाजातील दिनदुबळ्या, वंचीत,निराधार ज्यांच्या आईवडिलांचे छत्र हरपले आहे अशा लहानसहान मुलांना आपलेसे करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य पुरवणे यासाठी स्वतः योगदान देत समाजातील दानशूरवतांची मांदियाळी एकत्र आणून देण्याचे आवाहन करण्याचे काम अधिकारी रूपातला त्यांच्यातला माणूस करत असतो.
तर कोणत्याही प्रसंगात त्यांच्यातला एक अधिकारी कर्तव्याशी कसा एकनिष्ठ राहतो याचा प्रत्यय या एका उदाहरणावरून येतो.नुकत्याच उदभवलेल्या पूरपरिस्थितीच्या दरम्यान कोल्हापूर येथे जन्मदाता बाप दवाखान्यात उपचारासाठी ऍडमिट होता.पण दवाखान्यात न जाता त्यांचा मुलगा इकडे गारगोटी येथे वास्तव्यास राहून आपले कर्तव्य बजावत होता.बापाची काळजी काळजात होतीच पण पुराच्या संकटात अडकलेल्या असंख्य मायबापांची काळजी घेणं त्याहून त्यांना अधिक महत्वाचं वाटलं.
"पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रैलोकी झेंडा..
कन्या देई ऐसी संत मीराबाई,जनाबाई जैसी" अशी ही पोटाला आलेली चारी भावंडे आहेत.वारकरी संप्रदायाच्या वातावरणात घडलेली...काळ्या मातीच्या जीवावर पोसलेली.
जशी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान,मुक्ताई जन्मले तशी कोंडाजी व निरक्षर पण त्यांनी संस्कारांनी साक्षर केलेली दांपत्याच्या पोटी ही साजेशी ज्ञानवंत,प्रज्ञावंत लेकरं जन्माला आली...आणि ती आपापल्या क्षेत्रात यशस्वी होऊन सर्वोच्च पदाला पोहीचली.
"इवलेसे रोप लावीयले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी"
या लेकरांनी आपल्या कर्तृत्वाने गगनाला गवसणी घातली आहे.जमिनीवर राहून अवघे आकाश कवेत घेतले आहे.ज्या आईवडिलांनी अंगाखांद्यावर मिरवलं,ज्या मातीवर त्यांची इवलीशी पावलं धडपडली त्या लेकरांनी त्या आईवडिलांचं आणि मातीचं पांग फेडलं. आईवडिलांचे मनात आणि तिथल्या मातीच्या प्रत्येक कणात त्यांच्याविषयीचा अभिमान भरून उरला आहे.
खिलारी साहेब ज्यावेळी गावी जातात.त्यावेळी आपल्या माणसांशी एकरूप होतात.. आजही ते शेतात जातात...काम करतात..त्या मातीत मिसळतात...कारण त्या मातीतच हा पिंड घडला आहे...घरात वारकरी संप्रदायाचा वारसा तेवढ्याच भावभक्तीने त्यांनी सुरू ठेवला आहे.गावच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करणे, आषाढी वारीकाळात परिसरातील दिंड्याना सहकार्य करणे...अशा कार्यातून भगवंतांची सेवा करण्याचा वसा व वारसा आजही ते आपल्या व्यापातून जोपासत असतात.
आमचे गुरुवर्य आदरणीय इंद्रजीत देशमुख काकाजी अधिकारी व प्रशासकीय सेवेविषयी सांगतात...अधिकाऱ्यांचे प्रकार चार आहेत.पहिला प्रकार सुस्त,दुसरा त्रस्त,तिसरा व्यस्त आणि चौथा मस्त जो चौथा प्रकार आहे तो परिपक्व अधिकाऱ्याचे लक्षण आहे.कारण माहिती,ज्ञान आणि शहाणपणा यांच्या अनुषंगाने आलेली परिपक्वता ही चौथ्या प्रकारात मोडते. जीवन जगण्याचा प्रक्रियेत व्यक्ती,परिस्थिती, घटना यांच्या सहयोगातून ही परिपक्वता आयुष्यात येत असते.आणि म्हणून उपजतच समाजीकतेचा वसा घेऊन आलेले.जो स्वतःसाठी जगतो तो कधीच मेलेला असतो आणि जो दुसऱ्यासाठी जगतो तोच खऱ्या अर्थाने जगतो..असे खऱ्या अर्थाचे जीवन जगणारा आणि परिपक्व असा जबरदस्त अधिकारी म्हणजे आमचे डॉ. संपत खिलारी साहेब.
प्रशासनात दोन PR महत्वाचे असतात.एक म्हणजे public relations आणि दुसरे person relation अंतर वैयक्तिक संबंध आज समाजाशी संबंध आणि हे संबंध त्याचीच ताकदीची होतात ज्याच्याकडे दोन सद्गुण आहेत.एक म्हणजे निर्भयता आणि दुसरी नम्रता.आणि या सद्गुणांनी समृद्ध असे आपले व्यक्तिमत्त्व आहेच.आणि म्हणून तर समाजाच्या तळागाळापर्यंत आपल्या संवेदनांची नाळ जोडणारा कसदार अधिकारी अशी आपली ओळख आहे.
प्रशासनाचा नेमका अर्थ आहे कल्याणकारी राज्य निर्माण करणं आपल्या अस्तित्वानं,सामर्थ्यानं समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत त्याच्या आयुष्यात आनंदात जगण्याच्या लायकीची पात्रता निर्माण करणं...आणि ती आपण कराल असा आम्हांला विश्वास आहे.आपली ही यशस्वी वाटचाल अशीच चालू राहो.आणि लवकरच जिल्हाधिकारी रूपातला अधिकारी आपल्यातून पहायला मिळो...हीच परमेश्वर चरणी प्रार्थना...
राम कृष्ण हरी.!!
जय हो..!मंगल हो..!!
किरण सुभाष चव्हाण.
८८०६७३७५२८.