'मायबोलीचा टक्का का घसरला.?'
"माझा मराठाची बोलू कवतिके परी अमृतातेही पैजा जिंके"
ज्या माय मराठीच्या लेकरांनं अवघ्या १६ व्या वर्षी असा मराठी भाषेचा गौरव करत... ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहून या मराठी भाषेला समृद्ध केले. त्याआपल्या मराठी भाषेच्या प्रांतात मायबोलीचा टक्का का घसरला..?असा प्रश्न तिच्या लेकरांना स्वतः आपल्यालाच करावा लागतोय हे किती मोठं दुर्दैव आहे.एकेकाळी वैभवशाली समृद्धसंपन्नतेच्या शिखरावर असलेली मराठी भाषेची आज एवढी घसरण का झाली? म्हणून का हा प्रश्न आपल्याला करावा लागतोय.मायबोलीचा टक्का का घसरला..?.या प्रश्नाच्या शोधात कुठे खोलवर जाण्याची गरज नाही. कारण ती उत्तर आपल्या रोजच्या जगण्याच्या व्यवहारात सहज आपल्याला सापडू शकतात.
आपलं जगणं आणि आपला भोवताल समृद्ध करते ती म्हणजे भाषा.रोजच्या व्यवहारातल्या वापरावर भाषेचं बरंच अस्तित्व अवलंबून असतं.आपल्या लेखणी,वाणी,कथनीतून भाषेच्या अस्तित्वाचा प्रवाह अखंड वाहत असतो.पण आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, व्यवहारातल्या स्पर्धेत टिकायचं असेल तर ज्या भाषेला महत्व आलं आहे त्या भाषेकडे आपला ओढा वाढत चालला आहे.आणि म्हणून केवळ आज २१ व्या शतकात विज्ञान तंत्रज्ञानाच्या जगतात ज्या भाषेचे बोट धरून आपण यशाच्या टोकाला पोहोचू शकतो...असा विश्वास ज्या भाषेने प्राप्त करून घेतला आहे आणि आपणही असा विश्वास जिच्यावर ठेवला आहे अर्थातच ती भाषा म्हणजे इंग्रजी भाषा.
आणि हेच मूळ कारण आपल्या मायबोलीच्या मुळावर उठले आहे. सध्याच्या स्पर्धेत टिकायचं असेल तर इंग्रजी भाषा आलीच पाहिजे हा इथला नियमच झाला आहे.आणि मग या इंग्रजीबाईच्या बेगडी प्रेमात पडून आपल्या माय मराठीच्या प्रेमाला इथला मराठी माणूस दिवसेंदिवस दुरावतो आहे... आणि म्हणून 'लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी' असे अभिमानाने आपल्या भाषेचे गोडवे गाणारे आम्हीं...
"लादले आम्हांवरी आम्हीं बोलतो इंग्रजी,जाहलो खरेच धन्य ऐकतो इंग्रजी.
लिहितो इंग्रजी आम्हीं, वाचतो इंग्रजी,
रोजच्या व्यवहारात आम्ही वापरतो इंग्रजी.
आमच्या लहानग्यात, आमच्या मुलामुलात,
आमच्या मनामनात आमच्या घराघरात वाढते इंग्रजी.
आमच्या जगण्यात आणि वागण्यात आता फक्त इंग्रजी".
असे आमचे हळूहळू इंग्रजीकरण होत आहे.आणि यास्तव आज आपल्याला टिकायचं असेल नी आपल्या पुढच्या पिढीला टिकवायचं असेल तर फक्त इंग्रजी भाषा ही अनिवार्य आहे अशी आपण ठाम समजूत करून घेतली आहे.आज इंग्रजी माध्यमाच्या शाळेंचे सर्वत्र फुटलेले पेव हे एक असे चित्र निर्माण करते आहे की,इथून पुढच्या जगण्याला प्रगतीची दिशा देणारे एकमेव माध्यम म्हणजे इंग्रजी भाषा.म्हणून अशा धारणेतून या इंग्रजी माध्यमाच्या शाळा कशा फोफावत आहेत याचा अंदाज फक्त या एका उदाहरणावरून आपल्याला येईल.. एका गावातील एका मराठी शाळेच्या एका वर्गाची संख्या एकेकाळी १२० पटापर्यंत होती..आता पूर्ण शाळेची मिळून एतकी संख्या भरते आहे.त्याच गावात आज रोजी दोन इंग्रजी माध्यमाच्या शाळा उभ्या राहिल्या आणखीन आजूबाजूच्या परिसरातील निर्माण झालेल्या वेगळ्याच..आज माय मराठी भाषेच्या प्रांतात अशा इंग्रजी ज्ञानाची मंदिरे दिवसेंदिवस वाढत आहेत... आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मराठी भाषेच्या विद्येची मंदिरे मात्र ओस पडत चालली आहेत. एकीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळेचं पेव फुटत असताना दुसऱ्या बाजूला झपाट्याने डबघाईला येत असलेल्या मराठी शाळा अशा ओसाड पडत चालल्या आहेत तर मग तिथं मायबोलीचं बीज पेरायचं तरी कसं आणि अशा ओसाडवाण्या परिस्थितीत मायबोलीचं पीकं उगवणार तरी कसं.? ... आज आपल्याच मराठी विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेल्या इंग्रजी शाळांना सुगीचे दिवस आलेत.शाळा सुरू करणारा मराठी...ती चालवणारा मराठी...शिकवणारा मराठी...शिकणाराही मराठी...स्वतःच्या मराठी प्रांतात इंग्रजी बाई रुबाबात आणि आमची मराठी आई दिनवाणी झाल्यासारखी अवस्था आहे मग आमच्या मायबोलीचा टक्का घसरणार नाही तर काय होणार...?
मायबोलीचा टक्का का घसरला याचे उत्तर शोधताना आपण आपल्यापासूनचं शोधुया ना. या इंग्रजीकरणाचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपण ही गुलाम झालो आहोत हे ही कारण पुष्कळस जबाबदार आहे..कधी तर विचार करा आपल्या तोंडवळणी पडलेले साधेसे असणारे शब्द मग (कप,टेबल,टीव्ही) यांसारखे असे बरेच.हळूहळू अशा साध्या शब्दांपासून तिने आपल्या भाषेवर कधीच कब्जा सुरू केला आहे.अहो जिथे घरातल्या आई नावाच्या व्यापक शब्दाची जागा 'मम्मी' आणि बाबा या नावाची जागा 'पप्पा'या इंग्रजी शब्दाने घेतली तिथे बाकी शब्दांचं काय घेऊन बसलात...आज इंग्रजी शब्दसंपदा वाढावी म्हणून इंग्रजी अर्थाची डिक्शनरी प्रत्येक घरात असेल पण मराठी शब्दसंपदा वाढावी म्हणून मराठी शब्दकोष कुठल्या घरात असेल का ?ते शोधावे लागेल.अशी विरोधात्मक परिस्थिती आहे.बघा मोबाईलवरून बोलताना आपण सर्वजण कुठल्या शब्दाने आपल्या बोलण्याची सुरुवात करतो.आपल्या मोबाईलमध्ये आपण भाषेचे कोणते माध्यम वापरतो..? व्हाट्सएप,फेसबुक,ट्विटर अशा सोशल माध्यमांवर एकमेकांशी चॅटिंग करताना जास्तीत जास्त कोणत्या भाषेचा आपण वापर करतो आहोत.? .आपल्या गाडीच्या नंबरप्लेटवर कोणत्या भाषेतील अंक आहेत..? बाहेरील बोर्ड असो नाही तरी आतील मेनू कार्ड असो...जिथे तिथे इंग्रजी भाषेचं अस्तित्व ठळकपणे आपल्या लक्षात येईल...पण आपण गांभीर्याने याचा विचारच कधी केला नाही आणि करणारही नाही अशा गांभीर्याचे आपल्याला गांभीर्यच नाही हे एक गंभीर कारण नाही का..? नाही इथे कुठल्या भाषेला विरोध नाही..कोणतीही भाषा आपण शिकली पाहिजे...कोणतीही भाषा आत्मसात केली पाहिजे पण हे करत असताना एका भाषेचं अस्तित्व दुसऱ्या भाषेच्या अस्तित्वाच्या नाशाला कारणीभूत ठरू नये याची काळजी नको का घ्यायला..?.कुसुमाग्रज म्हणतात तसं..
"परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी
माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका
भाषा मरता देश ही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे
गुलाम भाषक होऊनि आपुल्या प्रगतीचे शीर कापू नका"
या शिक्षणाच्या बाजारीकरणामध्ये इंग्रजीच्या नादाने आपल्या प्रगतीच्या दिशेने आपण पाऊल टाकताना मराठी भाषेच्या अधोगतीचे काय..? इथे कुठल्याही परभाषेवर बंधन नाही..पण इतकी वर्षे जी आपली मराठी भाषा संस्कृतीचा ठेवा जोपासत आली...जगण्याची प्रेरणा आणि.लढण्याची चेतना देत आली...आज तिच्या अस्तित्वाचा कधी तरी आपण गंभीरपणे विचार करतो का..?आपण आपल्या सोयीनुसार आपल्या अस्तित्वाच्या शोधात आपल्या मायबोलीच्या अस्तित्वाचा आपल्याला विसर पडतो आहे...आणि म्हणून मायबोलीच्या अवस्थेला आपल्या सोयीच्या भाषेची व्यवस्था कारणीभूत ठरते आहे. आज इंग्रजी शाळांच्या अभ्यासक्रमात शासनाला सक्तीने मराठी विषय अनिवार्य करावा लागतो...यावरून आमच्या लेखी तिचे महत्व हे सक्तीचे झाले आहे असेच म्हणावे लागेल.
एखादं लेकरू इंग्रजीतून एखादं वाक्य अस्सलिखितपणे बोललं तर आईला किती आनंद होतो...त्या लेकरांचं किती कोडकौतुक ती करते...पण मराठीतील एखादं सुभाषित...एखादा अभंग...सायंकाळची शुभंकरोती आपल्या लेकरांनं म्हणावी म्हणून किती हट्टाहास ही माऊली धरते..लेकरांनं इंग्रजी जरूर शिकावं पण आपल्या मराठीच्या संस्कृतीचा संस्कार आपण जाणीवपूर्वक त्याच्या कोवळ्या मनावर करतो आहोत का...?हा खरा प्रश्न आहे.इथे एक गोष्ट सर्वांनी ध्यानात घेणं गरजेचं आहे.आपलं मुलं इंग्रजी शाळेत शिकावं....त्यानं इंग्रजी अस्संलिखित बोलावं...म्हणून इंग्रजी भाषेचा ध्यास घेणारे आम्हीं...जरूर इंग्रजीविषयीचा ध्यास धरूया पण आपल्या मुलांनं मराठी भाषेत ही पारंगत व्हावं अशी आस त्याच्या मनात आपण कधी निर्माण करणार आहोत का..?..कारण आज ही मुलं इंग्रजी ज्ञानाच्या जीवावर कदाचित स्पर्धेच्या युगात टिकतीलही पण मराठी भाषेशिवाय ती ज्ञानान इतकी समृद्ध होणार नाहीत...की जी आपल्याबरोबर इतरांनाही समृद्ध करतील... इंग्रजी भाषा अवश्य तुम्हांला जगवेल. पण मराठी भाषेचा आजपर्यंतचा इतिहास आहे...ती जगवते आणि स्वतःबरोबर दुसऱ्यालाही जगवायला शिकवते..आठशे वर्षांपूर्वीचा आमचा ज्ञानोबा, संत नामदेव,संत एकनाथ,तुकोबा मराठी भाषेला समृद्ध करणारी ही माय मराठीची लेकरं आज कळीकाळावर राज्य करताहेत...तुम्हांला आहे असा आत्मविश्वास..? की केवळ इंग्रजी भाषेतून शिकणारी आपलं लेकरं अशाप्रकारे ज्ञानान समृद्ध होऊन करेल काळावर राज्य..?.काय आपला हेतू फक्त एवढाच की,त्यानं शिकावं आणि आताच्या काळापुरतं फक्त टीकावं...? त्याच्या जगण्याच्या क्षमता जर एवढ्या पुरत्या मर्यादित असतील तर काही हरकत नाही...पण जर आपलं लेकरू ज्ञानान समृद्ध व्हायचं असेल..उत्तुंग व्हायचं असेल ते त्याला इतकं समृद्ध सामर्थ्यशाली करायचं असेल की, येणाऱ्या कित्येक कळीकाळावर त्याच्या कर्तृत्वाचं राज्य असलं पाहिजे आणि म्हणून...त्याला खऱ्या मराठी मायेच्या अमृतरुपी संस्कारांचा दुग्धचिरा त्याला प्यावयास दिला पाहिजे.
"आकंठ प्यालो हिचे दूध
अंगी पहा या रोमारोमातुनी खुणा
तोडा चिरा दुग्ध धाराच येती
न हे रक्त वाहे शरीरातूनी
माझी मराठी मराठाच मी ही
असे शब्द येतील हो त्यातुनी"
अहो म्हणून तर ते माय मराठीचं ते लेकरू आहे पहिल्यांदा त्याला तिचंच दूध पाजलं पाहिजे...नंतर मग त्याला कुठल्या भाषेचे लाड पुरवायचे ते पुरवा...कारण येणारी पिढी ही वारसदार आहे ती मराठी भाषेच्या अस्तित्वाची तिच्या अस्मितेची...
आमच्या ज्ञानोबा, तुकोबांनी आपल्या समृद्धसंपन्न ज्ञानाने श्रीमंत केलेल्या या मायबोली मराठी भाषेची श्रीमंती अखंडित राखणं ही आपली जबाबदारी आहे...आणि म्हणून या जबाबदारीचं भान ज्यांना आहे त्यांनी आपल्या मायबोलीचा टक्का का घसरला..?या प्रश्नाचे उत्तर स्वतःपासून शोधायला सुरुवात केली तर आपण त्या उत्तरापर्यंत नक्की पोहोचू असा मला विश्वास आहे.
- किरण सुभाष चव्हाण.
-पांगिरे, ता-भुदरगड,जि- कोल्हापूर .
मोबा- ८८०६७३७५२८.