फॉलोअर

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०

लेखक नंदू साळोखे (बेलेवाडी हु||) यांचा जीवन व लेखनप्रवास.




       '...आणि जगण्याला शब्दांचं बळ मिळालं.'

                  आजरा तालुक्यातील बेलेवाडी हुबळगी हे छोटेसं खेडेगाव.या गावातील सखाराम केरबा साळोखे व आक्काताई सखाराम साळोखेे यांच्या पोटी राम- लक्ष्मणागत दोन लेकरं जन्माला आली. थोरला मुलगा प्रकाश उर्फ नंदू आणि धाकटा सागर. एक छोटेसं शेतकरी कुटुंब.शेती हा प्रमुख व्यवसाय. या कुटुंबात २५ ऑगस्ट १९७८ रोजी नंदूजींचा जन्म झाला. एक चुणचुणीत गोरागोमटा पोर.गावच्या शाळेत जाऊ लागला, आपल्या सवंगड्यांसोबत गावाच्या मातीत खेळू- बागडू लागला. रान शिवारी सख्यासोबत्यांच्या संगतीने हिंडू फिरू लागला.गल्ली गावात दुडदुडत्या चालीने दौडू लागला. असे हे स्वच्छंदी बालपणाचे दिवस, भिंतीवरच्या कॅलेंडरच्या पानांनी कूस बदलावी तसे  मागे पडत गेले.दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं.लहानगा नंदू आता जाणता झाला.  शेताघरातल्या कामात लक्ष घालु लागला. सळसळत्या तारुण्याचं उमदं वय. कोणतंही काम करण्याचा उरात भरलेला
जोश.पण एकीकडे या उमलत्या तारुण्यावर घाव घालण्यासाठी नियती दबा धरून बसलेली.
                 ते साल होतं १ जानेवारी १९९८. अंगात तारुण्याची रग होती.त्या दिवशी नंदूजींनी उत्साहाच्या भरात,एक मण भाताचं पोतं डोक्यावर घेतलं नी तसेच घराच्या दिशेनं चालू लागले. आणि काही कळायच्या आत डोक्यावरच्या पोत्यासह नंदूजी खाली कोसळले.पोत्याखाली दबले गेले.मोठा अनर्थ घडला.नियतीने आपला डाव साधला.दुर्देवी वेळेनं मोठा घात केला,पाठीच्या कण्याला जबर मार लागला,गंभीर दुखापत झाली.त्यानंतर उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण नंदूजींचे अर्धे शरीर गारद झाले होते. त्याला जिवंत करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले.तीन महिने उपचार सुरू होते पण इलाज चालला नाही. मेंदूपासून खाली पायापर्यंत रक्तपुरवठा करणाऱ्या संवेदनशील नसा दबल्या गेल्याने कमरेखालचा भाग संवेदनाहीन झाला. शेवटी डॉक्टरांनी घोषित केले की,नंदूजी आता इथून पुढे कधी स्वतःच्या पायावर चालू शकणार नाहीत.

किती मोठा धक्का नंदूजीसह साऱ्या कुटुंबाला होता.हसत्या खेळत्या उमलत्या आयुष्यालाच त्या घटनेने सुरुंग लावला.जिवलगांच्या काळजाला भेगा पडल्या. नंदूजींच्या मनावर तर नकारात्मक विचारांनी कब्जाच केला. टोकाचे विचार सतत  मनाला टोकरू लागले. तिथून पुढे नवी मुंबई वाशी येथील 'शरण अपंग पुनर्वसन केंद्र' येथे भरती केलं गेलं.आता आयुष्य एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलं होतं.
                     शालेय जीवनापासून वाचनाची थोडी गोडी होती,ती कामाला आली. हळू हळू पुस्तकांची जवळीक वाटू लागली. या घटनेनंतर वाचनाची गती वाढू लागली.

पायांनी तर आता चौफेर उधळता येणार नव्हतं. पण मनाचा मात्र वारू शब्दांच्या सहवासात चौखूर उधळत होता. आणि जगण्याचं एक तत्व गवसलं.'शरीरानं अपंग झालो तरी, आपण मनानं कधीच अपंग नसतो.' शब्दांच्या पाठीवर स्वार होऊन आपण चहूमुलखाची सफर करू शकतो.आणि मग मनाला शब्दांची साथसंगत मिळत गेली. शब्द इतके घनिष्ट झाले की, या अपंग पुनर्वसन केंद्रात असताना शांत समयी शब्दांना अर्थाच्या धाग्यात ओवून  कवितेच्या एकेक  माळा बनवण्याचा मनाला छंद जडत गेला.
                         तब्बल बारा वर्षे म्हणजे एक तप संत साहित्याचे वाचन केले.वाचनाच्या विस्तीर्ण प्रदेशात धुंडाळताना विविधांगी वाचनाची आवड जोपासली. कथा,कविता,कादंबऱ्या मनाला भुरळ पाडत गेल्या. किती वाचू नि किती नको.आता फक्त बेभान होऊन वाचत राहणं.आधाश्यासारं मन पुस्तकांच्या पानापानावर रुंजी घालत होतं.आणि खरंतर उद्ध्वस्त जगण्याला दुरुस्त करण्याचं, मोडून पडलेल्या आयुष्याला पुन्हा उभा राहण्याचं,मरण्यासाठी विष मागणाऱ्या मनाला जगण्याचं बळ देण्याचं काम या शब्दांनी केलं,पुस्तकांनी केलं.
                              आता ''शब्दची आमुच्या जीवाचे जीवन" हे शब्द नंदूजींच्या जीवाचे जीवन झाले. हळूहळू विविधांगी वाचनातून लिखाणाची गोडी लागली. आणि नंदूजी म्हणतात तसं 'संत महंतांच्या पंक्तीतल्या उष्ट्यावर आमच्या शब्दांच्या पंक्ती झडतात.'वाचनाने प्रगल्भता लाभली आणि त्या ओघात त्यांची लेखणी प्रसवली. पानांवरचे शब्द वाचायची सवय होती आता  पानांवर शब्द उमटवायची सवय जडली.सुरुवातीला लेखणीस प्रारंभ झाला.सुरुवातीला कविता त्यानंतर कथा,कादंबऱ्या,लेख असे विविधांगी लेखन स्फुरत गेले.धामणे गावचे ज्येष्ठ साहित्यिक शि. गो.पाटील या गुरूंचे बोट धरून या शिष्याने लेखनप्रवासातले पहिले पुस्तक साकारले. यासाठी डॉ. संभाजी जगताप साहेबांची प्रेरणा मिळाली.आणि पहिल्यांदा २०१५ साली ग्रामीण ढंगातलाहा पहिला वहिला 'लुगडं'कथासंग्रह नावेद मुश्रीफ यांच्या हस्ते प्रकाशित झाला.

कोहिनूर फाउंडेशन मुंबईचा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट साहित्य वाङमयीन पुरस्कार या पुस्तकाला मिळाला.त्यानंतर ग्रामीण समकालीन जीवन कवेत घेणारा 'जांभळीखालचा झरा'  हा दुसरा कथासंग्रह श्री. पावले सर यांच्या सहकार्याने २०१६ साली प्रकाशित झाला.दक्षिण महाराष्ट्र साहित्य  सभेचा उत्कृष्ट वाङमयीन पुरस्कारही या पुस्तकाला मिळाला. तसेच साने गुरुजी वाचनालय झुलपेवाडी यांचे समारंभपूर्वक गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले.या दोन कथासंग्रह नंतर २०१८ साली 'केतकी' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. 


अशा साहित्य क्षेत्रातील यशस्वी वाटचालीबद्दल साप्ताहिक कोल्हापूर व लोकशाहीर द. ना. गव्हाणकर साहित्यभूषण पुरस्कार २०१९ या पुरस्काराने गौरविण्यात आले. गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकांची सुंदर प्रस्तावना लाभलेली 'इपळाप' ही 'कादंबरी आता लवकरच प्रकाशित होत आहे. 

तर 'आठवणीतील साठवण' व 'काळोखाला सूर्य बिलगला'(दोन्हीं आत्मचरित्रात्मक पुस्तके) या कादंबऱ्या तर 'बिवाळा' व्यक्तीचित्रणात्मक पुस्तक आगामी प्रकाशाच्या वाटेवर आहेत.अनेक मासिक,दिवाळी अंक ,वृत्तपत्रे यातून सातत्याने लेखन चालूच असते.
                      जीवन प्रवासात एका क्षणी नियतीने दगा दिला अर्ध शरीर जायबंदी केलं.आज २२ वर्षे झालीत हे अपंगत्व येऊन. शरीर अंथरुणाला खिळलं आहे,मातीत धडपडणारे पाय आज गादीवर निर्जीव होऊन निपचित पडलेले असतात. खूप त्रास होतो,वेदना अव्याहतपणे साथ देत असतात. कधी पाठीला जखमा होतात ,पचनक्रिया बिघडते, मूत्राशयाचा संसर्ग हा तर ठरलेलाच. कधी तापानं अंग फणणतं. कधी अवघ्या अंगाला कापरा भरतो.शत्रूसारखे एकेक आजार या शरीरावर विजय मिळवण्यासाठी टपून बसलेले असतात. काही लिहायचे म्हटले तरी हात कापतात.नीट बसता येत नाही,एका कुशीवर होऊन लेखन करावे लागते.  पण हार मानणारे ते नंदूजी कसले..? त्यांनी सर्वांवर  कधीच मात केलीय. अशा आजारपणात धावून येतो,तो एक माणसातला देव तो देव म्हणजे डॉक्टर संभाजी जगताप. नंदूजींच्या कसल्याही आजारपणात ते एकेकदा घरी येऊन उपचार करतात. सतत त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असतात.नंदूजींचे प्रकृती स्वास्थ्य उत्तम ठेवण्यात त्यांचा खूप मोठा आधार आहे. शारीरिक पातळीवरचा हा संघर्ष खूपदा मानसिक स्वास्थ्याला आव्हान देत असतो.सुरुवातीला चिडचिडेपणा व्हायचा, राग अनावर व्हायचा. सगळ्यांचा त्रागा वाटायचा. पण वेदनांच्या या नानाकळांची अनुभूती आता सर्वांगाला झाली होती.आणि म्हणून या अनुभूतीला मनाच्या सहानुभूतीची जोड मिळत गेली.आजतागायत असहाय वेदना शरीरानं झेलल्या अन मनानं सोसल्या पण आता अशा सहनशीलतेतून मनाला शांती नी संयमाची स्थिती प्राप्त झाली. आता मनाच्या शांतीत सारं काही विरून जातं.
                                    आई-वडिल या पोटच्या गोळ्याला आजही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपताहेत. लेकराचं उभं आयुष्य असं अपंगत्वाच्या तावडीत सापडलं हा त्यांच्या काळजावर पडलेला घाव कधी न भरून येण्यासारखा आहे. तो घाव इतका वर्मी होता की, उभ्या आयुष्यभराचं दुःख पदरात घातलं.आजही या कष्टाळू आई-बापाचे हिरमुसलेले चेहरे हृदयातल्या त्या ओल्या जखमांची साक्ष देतात.
१४ वर्षे वनवास भोगणाऱ्या  रामाला जशी लक्ष्मणाची अखंड साथ लाभली. तशी आज २२ वर्षे हा अपंगत्वाचा वनवास भोगणाऱ्या भावाला लक्ष्मणागत साथ मिळते आहे ती आपल्या पाठच्या भावाची म्हणजेच सागरजी यांची.नावाप्रमाणेच मायेचा हा सागर आहे.आजच्या कलियुगामध्ये दुर्मिळ अशी ही  राम लक्ष्मणागत भावांची जोडी आहे.

आपल्या थोरल्या बंधूची सेवा अखंडपणे हा भाऊ करत आला आणि आजही करतो आहे.घरातील ऊठ-बस किंवा बाहेरचा प्रवास असू दे ,चाकाच्या खुर्ची मधून दोन हातावरती अंतराळी घेऊन एखाद्या ठिकाणी बसवायचं नी पुन्हा चाकाच्या खुर्चीत ठेवायचं अशी सगळी मायेची उठाठेव  बंधू सागरजी करतात. अतिशय प्रेमळ,जिव्हाळा असणाऱ्या भावाची आणि त्यांच्या पत्नीची साथ नंदूजींना मिळते आहे.
                         सागरजींच्या संसाररुपी वेलीवर फुललेली दोन फुले केतकी आणि स्वरा. यांचा तर नदूजींना विशेष लळा.या फुलांच्या सहवासात त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने सुगंध आला आहे. शब्दांनी जगण्याची हिंमत दिली, पुस्तकांच्या सहवासात जगणे साध्य झाले,वाचनातून समृद्धता आली.समृद्ध व प्रगल्भ ज्ञानातून लेखणीचा उगम होत राहिला आणि या शब्दांच्या प्रवाहामध्ये अनेक संवेदनशील मनांची नाती जुळत गेली. जीवंत हृदयाची माणसे भेटत गेली. आज सभोवार संत सज्जनांचा जीवलगांचा गोतावळा निर्माण झाला आहे. संतरुपी गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी सारख्या गुरुभेटीने तर नंदूजींचे अवघे जीवन धन्य धन्य झाले आहे.

                            आज काय गमावलं नी काय कमावलं..? याचा हिशोब मांडताना...काय गमावलं. तर नियतीने दोन पायच हिरावून घेतले ना..? पण याच्या उलट आज नदूजींच्या एका हाकेवर धावून येणारे असंख्य पाय हे त्यांचे झालेत.शरीर जरी एका ठिकाणी स्तब्ध असलं तरी मनानं मात्र उंच भरारी घेतलीय,शब्दांच्या जगात भटकंती करताना स्वतःमधला एक उत्तम संवेदनशील लेखक गवसला.त्यांच्या शब्द सामर्थ्यामधून वाचकांची नाळ त्यांच्या लेखणीला जोडली गेली.माणसातला एक वेगळा माणूस म्हणून ओळख निर्माण झाली.समाजातील मान,सन्मान,प्रतिष्ठा चालत त्यांच्याकडे आली.

जगण्याच्या वाटेवर अडखळलेल्या पावलांना आज नदुजींच्याकडे पाहून पुढे चालण्याची प्रेरणा मिळते... आज हे नदुजींनी कमावलं.नंदूजी आपली पाऊले कधीही थांबली नाहीत तर तर धडपडले आजपर्यंत तुमच्या आईवडिलांच्या पावलांच्या रूपातून,आज धडपडताहेत भाऊ सागरजींच्या रूपातून आणि इथून पुढे सदैव धडपडत राहतील तुमच्या लाडक्या लेकी केतकी आणि स्वरा यांच्या पावलांच्या रूपातून.

               'जय हो...मंगल हो..!!'

               
                  - किरण सुभाष चव्हाण (पांगिरे)
                    मोबा - ८८०६७३७५२८.

ग्रामीण लेखक नंदू साळोखे यांची क्षणचित्रे अवश्य पहा खालील लिंकवर.

https://youtu.be/ztOP6VYdiXY

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०

मराठी वाचुया,मराठी लिहुया,मराठी जगुया.






       
       
           'मायबोलीचा टक्का का घसरला.?'
                               
 "माझा मराठाची बोलू कवतिके परी अमृतातेही पैजा जिंके"
                  ज्या माय मराठीच्या लेकरांनं अवघ्या १६ व्या वर्षी असा मराठी भाषेचा गौरव करत... ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहून या मराठी भाषेला समृद्ध केले. त्याआपल्या मराठी भाषेच्या प्रांतात मायबोलीचा टक्का का घसरला..?असा प्रश्न तिच्या  लेकरांना स्वतः आपल्यालाच करावा लागतोय हे किती मोठं दुर्दैव आहे.एकेकाळी वैभवशाली समृद्धसंपन्नतेच्या शिखरावर असलेली मराठी भाषेची आज एवढी घसरण का झाली? म्हणून का  हा प्रश्न आपल्याला करावा लागतोय.मायबोलीचा टक्का का घसरला..?.या प्रश्नाच्या शोधात कुठे खोलवर जाण्याची गरज नाही. कारण ती उत्तर आपल्या रोजच्या जगण्याच्या व्यवहारात सहज आपल्याला सापडू शकतात.
                                       आपलं जगणं आणि आपला भोवताल समृद्ध करते ती म्हणजे भाषा.रोजच्या व्यवहारातल्या वापरावर भाषेचं बरंच अस्तित्व अवलंबून असतं.आपल्या लेखणी,वाणी,कथनीतून भाषेच्या अस्तित्वाचा प्रवाह अखंड वाहत असतो.पण आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, व्यवहारातल्या स्पर्धेत टिकायचं असेल तर ज्या भाषेला महत्व आलं आहे त्या भाषेकडे आपला ओढा वाढत चालला आहे.आणि म्हणून केवळ आज २१ व्या शतकात विज्ञान तंत्रज्ञानाच्या जगतात ज्या भाषेचे बोट धरून आपण यशाच्या टोकाला पोहोचू शकतो...असा विश्वास ज्या भाषेने प्राप्त करून घेतला आहे आणि आपणही असा विश्वास जिच्यावर ठेवला आहे अर्थातच ती भाषा म्हणजे इंग्रजी भाषा.
                                      आणि हेच मूळ कारण आपल्या मायबोलीच्या मुळावर उठले आहे. सध्याच्या स्पर्धेत टिकायचं असेल तर इंग्रजी भाषा आलीच पाहिजे हा इथला नियमच झाला आहे.आणि मग या इंग्रजीबाईच्या बेगडी प्रेमात पडून आपल्या माय मराठीच्या प्रेमाला इथला मराठी माणूस दिवसेंदिवस दुरावतो आहे...  आणि म्हणून 'लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी' असे अभिमानाने आपल्या भाषेचे गोडवे गाणारे आम्हीं...
"लादले आम्हांवरी आम्हीं बोलतो इंग्रजी,जाहलो खरेच धन्य ऐकतो इंग्रजी.
लिहितो इंग्रजी आम्हीं, वाचतो इंग्रजी,
रोजच्या व्यवहारात आम्ही वापरतो इंग्रजी.
आमच्या लहानग्यात, आमच्या मुलामुलात,
आमच्या मनामनात आमच्या घराघरात वाढते इंग्रजी.
आमच्या जगण्यात आणि वागण्यात आता फक्त इंग्रजी".
असे आमचे हळूहळू इंग्रजीकरण होत आहे.आणि यास्तव आज आपल्याला टिकायचं असेल नी आपल्या पुढच्या पिढीला टिकवायचं असेल तर फक्त इंग्रजी भाषा ही अनिवार्य आहे अशी आपण ठाम समजूत करून घेतली आहे.आज इंग्रजी माध्यमाच्या शाळेंचे  सर्वत्र फुटलेले पेव हे एक असे चित्र निर्माण करते आहे की,इथून पुढच्या जगण्याला प्रगतीची दिशा देणारे एकमेव माध्यम म्हणजे इंग्रजी भाषा.म्हणून अशा धारणेतून या इंग्रजी माध्यमाच्या शाळा कशा फोफावत आहेत याचा अंदाज फक्त या एका उदाहरणावरून आपल्याला येईल.. एका गावातील एका मराठी शाळेच्या एका वर्गाची संख्या एकेकाळी १२० पटापर्यंत होती..आता पूर्ण शाळेची मिळून एतकी संख्या भरते आहे.त्याच गावात आज रोजी दोन इंग्रजी माध्यमाच्या शाळा उभ्या राहिल्या आणखीन आजूबाजूच्या परिसरातील निर्माण झालेल्या वेगळ्याच..आज माय मराठी भाषेच्या प्रांतात अशा इंग्रजी ज्ञानाची मंदिरे दिवसेंदिवस वाढत आहेत... आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मराठी भाषेच्या विद्येची मंदिरे मात्र ओस पडत चालली आहेत. एकीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळेचं पेव फुटत असताना दुसऱ्या बाजूला झपाट्याने डबघाईला येत असलेल्या मराठी शाळा अशा ओसाड पडत चालल्या आहेत तर मग तिथं मायबोलीचं बीज पेरायचं तरी कसं आणि अशा ओसाडवाण्या परिस्थितीत मायबोलीचं पीकं उगवणार तरी कसं.?  ... आज आपल्याच मराठी विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेल्या इंग्रजी शाळांना सुगीचे दिवस आलेत.शाळा सुरू करणारा मराठी...ती चालवणारा मराठी...शिकवणारा मराठी...शिकणाराही मराठी...स्वतःच्या मराठी प्रांतात इंग्रजी बाई रुबाबात आणि आमची मराठी आई दिनवाणी झाल्यासारखी अवस्था आहे मग आमच्या मायबोलीचा टक्का घसरणार नाही तर काय होणार...?
                      मायबोलीचा टक्का का घसरला याचे उत्तर शोधताना आपण आपल्यापासूनचं शोधुया ना. या इंग्रजीकरणाचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपण ही गुलाम झालो आहोत हे ही कारण पुष्कळस जबाबदार आहे..कधी तर विचार करा आपल्या तोंडवळणी पडलेले साधेसे असणारे शब्द मग (कप,टेबल,टीव्ही) यांसारखे असे बरेच.हळूहळू अशा साध्या शब्दांपासून तिने आपल्या भाषेवर कधीच कब्जा सुरू केला आहे.अहो जिथे घरातल्या आई नावाच्या व्यापक शब्दाची जागा 'मम्मी' आणि बाबा या नावाची जागा 'पप्पा'या इंग्रजी शब्दाने घेतली तिथे बाकी शब्दांचं काय घेऊन बसलात...आज इंग्रजी शब्दसंपदा वाढावी म्हणून इंग्रजी अर्थाची डिक्शनरी प्रत्येक घरात असेल पण मराठी शब्दसंपदा वाढावी म्हणून मराठी शब्दकोष कुठल्या घरात असेल का ?ते शोधावे लागेल.अशी विरोधात्मक परिस्थिती आहे.बघा मोबाईलवरून बोलताना आपण सर्वजण कुठल्या शब्दाने आपल्या बोलण्याची सुरुवात करतो.आपल्या मोबाईलमध्ये आपण भाषेचे कोणते माध्यम वापरतो..? व्हाट्सएप,फेसबुक,ट्विटर अशा सोशल माध्यमांवर एकमेकांशी चॅटिंग करताना जास्तीत जास्त कोणत्या भाषेचा आपण वापर करतो आहोत.? .आपल्या गाडीच्या नंबरप्लेटवर कोणत्या भाषेतील अंक आहेत..? बाहेरील बोर्ड असो नाही तरी आतील मेनू कार्ड असो...जिथे तिथे इंग्रजी भाषेचं अस्तित्व ठळकपणे आपल्या लक्षात येईल...पण  आपण गांभीर्याने याचा विचारच कधी केला नाही आणि करणारही नाही अशा गांभीर्याचे आपल्याला गांभीर्यच नाही हे एक गंभीर कारण नाही का..? नाही इथे कुठल्या भाषेला विरोध नाही..कोणतीही भाषा आपण शिकली पाहिजे...कोणतीही भाषा आत्मसात केली पाहिजे पण हे करत असताना एका भाषेचं अस्तित्व दुसऱ्या भाषेच्या अस्तित्वाच्या नाशाला कारणीभूत ठरू नये याची काळजी नको का घ्यायला..?.कुसुमाग्रज म्हणतात तसं..
"परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी
माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका
भाषा मरता देश ही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे
गुलाम भाषक होऊनि आपुल्या प्रगतीचे शीर कापू नका"
              या शिक्षणाच्या बाजारीकरणामध्ये इंग्रजीच्या नादाने आपल्या प्रगतीच्या दिशेने आपण पाऊल टाकताना मराठी भाषेच्या अधोगतीचे काय..? इथे कुठल्याही परभाषेवर बंधन नाही..पण इतकी वर्षे जी आपली मराठी भाषा संस्कृतीचा ठेवा जोपासत आली...जगण्याची प्रेरणा आणि.लढण्याची चेतना देत आली...आज तिच्या अस्तित्वाचा कधी तरी आपण गंभीरपणे विचार करतो का..?आपण आपल्या सोयीनुसार  आपल्या अस्तित्वाच्या शोधात आपल्या मायबोलीच्या अस्तित्वाचा आपल्याला विसर पडतो आहे...आणि म्हणून मायबोलीच्या अवस्थेला आपल्या सोयीच्या भाषेची व्यवस्था कारणीभूत ठरते आहे. आज इंग्रजी शाळांच्या अभ्यासक्रमात शासनाला सक्तीने मराठी विषय अनिवार्य करावा लागतो...यावरून आमच्या लेखी तिचे महत्व हे सक्तीचे झाले आहे असेच म्हणावे लागेल.
                       एखादं लेकरू इंग्रजीतून एखादं वाक्य अस्सलिखितपणे बोललं तर आईला किती आनंद होतो...त्या लेकरांचं किती कोडकौतुक ती करते...पण मराठीतील एखादं सुभाषित...एखादा अभंग...सायंकाळची शुभंकरोती आपल्या लेकरांनं म्हणावी म्हणून किती हट्टाहास ही माऊली धरते..लेकरांनं इंग्रजी जरूर शिकावं पण आपल्या मराठीच्या संस्कृतीचा संस्कार आपण जाणीवपूर्वक त्याच्या कोवळ्या मनावर करतो आहोत का...?हा खरा प्रश्न आहे.इथे एक गोष्ट सर्वांनी ध्यानात घेणं गरजेचं आहे.आपलं मुलं इंग्रजी शाळेत शिकावं....त्यानं इंग्रजी अस्संलिखित बोलावं...म्हणून इंग्रजी भाषेचा ध्यास घेणारे आम्हीं...जरूर इंग्रजीविषयीचा ध्यास धरूया पण आपल्या मुलांनं मराठी भाषेत ही पारंगत व्हावं अशी आस त्याच्या मनात आपण कधी निर्माण करणार आहोत का..?..कारण आज ही मुलं इंग्रजी ज्ञानाच्या जीवावर कदाचित स्पर्धेच्या युगात टिकतीलही पण मराठी भाषेशिवाय ती ज्ञानान इतकी समृद्ध होणार नाहीत...की जी आपल्याबरोबर इतरांनाही समृद्ध करतील... इंग्रजी भाषा अवश्य तुम्हांला जगवेल. पण मराठी भाषेचा आजपर्यंतचा इतिहास आहे...ती जगवते आणि स्वतःबरोबर दुसऱ्यालाही जगवायला शिकवते..आठशे वर्षांपूर्वीचा आमचा ज्ञानोबा, संत नामदेव,संत एकनाथ,तुकोबा मराठी भाषेला समृद्ध करणारी ही माय मराठीची लेकरं आज कळीकाळावर राज्य करताहेत...तुम्हांला आहे असा आत्मविश्वास..? की केवळ इंग्रजी भाषेतून शिकणारी आपलं लेकरं अशाप्रकारे ज्ञानान समृद्ध होऊन करेल काळावर राज्य..?.काय आपला हेतू फक्त एवढाच की,त्यानं शिकावं आणि आताच्या काळापुरतं फक्त टीकावं...? त्याच्या जगण्याच्या क्षमता जर एवढ्या पुरत्या मर्यादित असतील तर काही हरकत नाही...पण जर आपलं लेकरू ज्ञानान समृद्ध व्हायचं असेल..उत्तुंग व्हायचं असेल ते त्याला इतकं समृद्ध सामर्थ्यशाली करायचं असेल की, येणाऱ्या कित्येक कळीकाळावर त्याच्या कर्तृत्वाचं राज्य असलं पाहिजे आणि म्हणून...त्याला खऱ्या मराठी मायेच्या अमृतरुपी संस्कारांचा दुग्धचिरा त्याला प्यावयास दिला पाहिजे.
"आकंठ प्यालो हिचे दूध
अंगी पहा या रोमारोमातुनी खुणा
तोडा चिरा दुग्ध धाराच येती
न हे रक्त वाहे शरीरातूनी
माझी मराठी मराठाच मी ही
असे शब्द येतील हो त्यातुनी"
 अहो म्हणून तर ते माय मराठीचं ते लेकरू आहे पहिल्यांदा त्याला तिचंच दूध पाजलं पाहिजे...नंतर मग त्याला कुठल्या भाषेचे लाड पुरवायचे ते पुरवा...कारण येणारी पिढी ही वारसदार आहे ती मराठी भाषेच्या अस्तित्वाची तिच्या अस्मितेची...
                  आमच्या ज्ञानोबा, तुकोबांनी आपल्या समृद्धसंपन्न ज्ञानाने श्रीमंत केलेल्या या मायबोली मराठी भाषेची श्रीमंती अखंडित राखणं ही आपली जबाबदारी आहे...आणि म्हणून या जबाबदारीचं भान ज्यांना आहे त्यांनी आपल्या मायबोलीचा टक्का का घसरला..?या प्रश्नाचे उत्तर स्वतःपासून शोधायला सुरुवात केली तर आपण त्या उत्तरापर्यंत नक्की पोहोचू असा मला विश्वास आहे.
                       - किरण सुभाष चव्हाण.
                        -पांगिरे, ता-भुदरगड,जि-                                  कोल्हापूर .
                         मोबा- ८८०६७३७५२८.



सोमवार, १० फेब्रुवारी, २०२०

'अजून अशा किती निर्भया..? - किरण चव्हाण.


          
'उत्तरप्रदेशातील हाथरसमध्ये आज पुन्हा माणुसकीला काळीमा फासणारी  घटना घडली...? राक्षसांनी पुन्हा एकदा डाव साधला...वासनांध भुकेने आणखीन एका निष्पाप जीवाचा घास घेतला...'


                  'अजून अशा किती निर्भया..?'

परवा दिल्ली,काल कोपर्डी, प्रियांका रेड्डी,हिंगणघाट आणि आता हाथरस...
'अजून अशा किती निर्भया..?'
नाही ना थांबला हा अत्याचार.. आपल्या समाजातील नाही ना बदलल हे चित्र....
अजूनही घडतायेत राजरोसपणे बलात्कारी घटनांचे सत्र...
दिल्लीत घडल्या त्या घटनेने गल्लीपर्यंत हादरलो होतो आपण..
आणि मग गल्लीपासून दिल्लीपर्यंत किती केली होती आंदोलने आपण..?
किती पेटल्या मेणबत्त्या श्रद्धांजलीसाठी...?
किती केला आकांडतांडव..? त्यावेळी...आजही...अजूनही करतोय आम्हीं.
पण नाही थांबवू शकत...नाही संपवू शकत... समाजातील ही वृत्ती अघोरी..
निर्भयासारखीच पुनरावृत्ती घडतेय आमच्या डोळ्यामाघारी..
सोसणाऱ्या अशा किती निर्भया जगताहेत मरणयातना घेऊन भयाप्रमाणे...
आणि भोगणारे मात्र निर्लज्ज नराधम फिरताहेत उजळ माथ्याने आणि जगताहेत निर्भयपणे...
सोसणाऱ्यांना निखळ श्वास आपण देऊ नाही शकत..
आणि भोगणाऱ्यांचे श्वास आपण घेऊ नाही शकत..
वासनांध राक्षस विझवून टाकताहेत आमची एकेक पणती..
आणि मग काय उरतं आमच्या हातात..?
तिच्याच श्रद्धांजलीची एक मेणबत्ती...?
उरावरचा राक्षस झेलताना आठवला असेल ना तिला आपला बाप ...आई...भाऊ...बहीण..
घातली असेल ना साद एखाद्या माणूसपणाला..
जिवाच्या आकांताने फोडली असेल ना आभाळभरून किंकाळी तिने..?
वेदनेची ती किंकाळी कुणाच्याही कानात शिरली नसेल का.?
 .....त्या नराधम राक्षसांना हे पाप करताना वाटलं नसेल का अशीच एक मागे.....
माझी आई आहे,माझी बहीण आहे..अशीच पोटची लेक आहे..
वाटली नसेल का थोडी तरी लाज..?
अखेर तळमळणाऱ्या शरीरातील प्राण घेऊनच त्यांनी तिची सुटका केली.
हीच पद्धत आहे अशा नालायकांची...निष्पापाचा बळी देऊन शेवटी वासनेची भूक भागवायची.
अरे एकट्या नारीवरती तुम्हीं वासनेचं बंड केला.
अरे तिथेच तुम्ही तुमच्यातला षंढ पुरुषार्थ सिद्ध केला.
नराधमांनो...
               तुमच्या नरडीचा घोट घेणारा दोर...
तुमच्या गळ्याभोवती जोपर्यंत आवळणार नाही...तोपर्यंत त्या निष्पाप जीवांचा आत्मा...
आणि आमच्या उरातील आग थंड होणार नाही...
कायद्याने हात बांधलेत म्हणून...
 नाही तर...
इथे टकमक टोकाचा...आणि कलम करण्याचा इतिहास आहे...
खबरदार...

-------------------------------------------------------
खालील लिंकवर क्लिक करून ऐका...



बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२०

कर्तव्यदक्ष, दमदार व कसदार अधिकारी.' प्रांताधिकारी डॉ.संपत खिलारी साहेब .




'प्रांताधिकारी डॉ.संपत खिलारी प्रशासनातले कर्तव्यदक्ष, दमदार व कसदार अधिकारी.'



            पुणे जिल्ह्यातील आणि जुन्नर तालुक्यातील मंगळूर हे एक छोटंसं खेडेगाव.या छोटयाशा गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात डॉ.संपत कोंडाजी खिलारी यांचा ५ सप्टेंबर १९७५ साली जन्म झाला.आई वडील दोघेही अशिक्षित.पण म्हणतात ना
'शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी.' तसे  आपल्या तीन भावंडांमध्ये हे शेंडेफळ.घरामध्ये वारकरी संप्रदायाचा वारसा.त्यामुळे अध्यात्माचे संस्कार लहानापासून मनावर बिंबलेले.प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मंगळूर या शाळेत झाले.उपजत हुशारपणा आणि कुशाग्र बुद्धिमता असल्यामुळे.इ ७ वी स्कॉलरशिप परीक्षेत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत १८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.आणि इथेच पुढच्या यशस्वी कार्यकिर्तीचा पाया रचला गेला.पुढचे माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी हायस्कुल पारगाव येथे झाले.व त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण मेनन कॉलेज भांडुप मुंबई येथे पूर्ण केले.त्याचबरोबर मुंबई येथे राहूनच मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात एम.व्ही. एससी.(पशुपोषण) शास्त्रात आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले.आणि पुढील दोन वर्षे जनावरांचे डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस सुरू राहिली.पण मनात याहून काहीतरी वेगळे करण्याची उमेद होती प्रशासकीय सेवेत जाऊन अधिकारी होण्याचे स्वप्न मनात होते.आणि त्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली.अंगभूत कुशाग्र बुद्धिमत्तेला जिद्द,चिकाटी महत्वकांक्षेची जोड मिळाली.दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवेच्या परीक्षेतून २५ नोव्हेंबर २००२ रोजी पुणे  महसूल विभागात परिविक्षाधीन तहसीलदार या पदावर रुजू झाले.२००२ पासून २००५ या कालावधीमध्ये ते या पदावर कार्यरत राहिले...इथून त्यांच्या कार्याचा व पदांचा चढता आलेख सुरू झाला.२००५ ते २००८ या कालावधीत मावळ जि- पुणे येथे तहसीलदार..२००८ ते २००९ पर्यंत तहसीलदार, संजय गांधी, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे.त्यानंतर २००९ ते २०११ तहसीलदार कागल,जि- कोल्हापूर.२०११ ते २०१२ तहसीलदार शिरोळ,जि-कोल्हापूर.असा तहसीलदार पदाचा कार्यकाळ सुरू असताना. १ ऑगस्ट २०१२ रोजी उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती प्राप्त झाली.आणि मग ऑगस्ट २०१२ ते जून २०१३ उपजिल्हाधिकारी म्हणून भूसंपादन अमरावती. त्यानंतर जून २०१३ ते ऑगस्ट २०१४ कुलसचिव,महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ(माफसू)नागपूर येथे कार्यरत.सप्टेंबर २०१४ ते जानेवारी २०१७ पर्यंत उपविभागीय अधिकारी महसूल भंडारा जि- भंडारा.आणि सध्या जून २०१७ ते आजअखेर उपविभागीय अधिकारी, आजरा-भुदरगड, उपविभाग गारगोटी, जि-कोल्हापूर येथे कार्यरत आहेत.   
            अशा एकूण प्रशासकीय सेवेच्या कारकिर्दीत अतिशय महत्वपूर्ण उपयुक्त असे निर्णय घेऊन ते अंमलात आणले.
१)कागल येथे तहसीलदार असताना tahsildarkagal.com व शिरोळ येथे तहसीलदार असताना tahsildarshirol.com या वेबसाईटची निर्मिती केली.आपल्या कार्यात्मक पद्धतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन राज्यातला पहिलाच एक अभिनव उपक्रम साकारला.
२) शिरोळ तालुक्यात तहसीलदार पदावर कार्यरत असताना तहसीलदार कार्यालय,शिरोळ यास आय.एस.ओ. 9001-2008 मानांकन प्राप्त करून देण्यास महत्वाची भूमिका बजावली.तत्कालीन मुख्यमंत्री मा.पृथ्वीराज चव्हाण व महसुलमंत्री मा.ना.बाळासाहेब थोरात महाराष्ट्र राज्य. यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
३) मावळ तालुक्यातील आदिवासी भागातील १८०० पेक्षा अधिक आदिवासी कुटुंबाना व आजरा-भुदरगड तालुक्यातील ३५० धनगर कुटुंबाना जात प्रमाणपत्रांचे शिबिराद्वारा वाटप केले गेले.म्हणजे अडथळ्यांची किती शर्यत पार करून वैयक्तिक जातीचे प्रमाणपत्र काढत असताना करावी लागणारी पराकाष्ठा ओळखून डोंगराळ व जंगल भागात राहणाऱ्या या गरीब,गरजू वंचित लोकांना एकाच छताखाली शिबिराद्वारे जात प्रमाणत्रांचे वाटप केले.
४)सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत राज्यस्तरावर स्वीकृत कोल्हापूर जिल्ह्यातील उपक्रम 'ई चावडी योजना' व चावडी वाचन योजना या योजनांची निर्मिती व यशस्वीपणे अंमलबजावणीमध्ये महत्वपुर्ण योगदान दिले.
४) माफसू अंतर्गत  कार्यरत पशुवैद्यकीय, मत्स्य व दुग्ध तंत्रज्ञान शाखा अंतर्गत महाविद्यालयांकरीता शासनस्तरावरून एकूण २९५ नवीन पदनिर्मिती मंजूर करून घेणेकामी महत्वपूर्ण सहभाग राहिला आहे.
५) सन २००८ पासून प्रलंबित दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय,उदगीर जि-लातूर करिता नवीन ५५ पदनिर्मिती व रु.५७.५८ कोटी इतका निधी शासन स्तरावरून मंजूर करून घेणेकामी महत्वपुर्ण सहभाग राहिला आहे.

एकंदरीत असा प्रभावीपणे कार्य करण्याचा धडाका आणि शासनाच्या विविध योजनांमध्ये महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल अनेक संस्था व शासन स्तरावरून पुरस्कार देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला आहे...
प्राप्त पुरस्कार-
१) मावळ वार्ता वृत्तवाहिनीतर्फे"कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी"म्हणून सन २००६ चा पुरस्कार.
२) सन २०१०-११ या वर्षाकरिता "उत्कृष्ट तहसीलदार" म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांचेकडून विभागीय स्तरावर शिफारस.
३) महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा "उत्तम कार्यकर्ता प्रशासकीय अधिकारी" २०१२ चा पुरस्कार मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री मा.अजित पवार महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
४)ज्येष्ठ पशुवैद्यकीय प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य तर्फे जागतिक पशुवैद्यकीय दिनी २०१३ रोजी पशुवैद्यकीय व प्रशासकीय क्षेत्रातील कामकाजाच्या अनुषंगाने सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
५) सन २०१८-२०१९ या वर्षाकरिता "उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी"म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांचेकडून विभागीय स्तरावर शिफारस.
६) २०१८ चा अनुलोम संस्थेचा अनुलोम संमित्र पुरस्कार मिळाला.
७) नुकताच २०१९ चा आपल्या मंगळूर गावचा मंगळूर भूषण पुरस्कार मिळाला.

                एका छोट्याशा खेडेगावात सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात अशिक्षित आईबापाच्या पोटी जन्म घेतलेला मुलगा मोठा साहेब झाला.प्रशासनातला उच्चपदस्त अधिकारी बनला.घरामध्ये वारकरी संप्रदायाचे वातावरणात, अध्यात्माचा प्रभाव यामुळे "बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे."
असा अवघ्यांच्या कळवळ्याचा,संवेदनशीलतेचा संस्कार लहानवयात कोवळया मनावर कोरला गेला होता..त्यामुळे उपजतच समाजसेवेच्या कार्याची ओढ मनात होती...म्हणून प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून आपल्याला समाजातील अनेक घटकांविषयी चांगले कल्याणकारी काम करता येईल ही महत्वकांक्षा ठेवून  एक वर्ष जनावरांचे डॉक्टरची प्रॅक्टिस तिथून तहसीलदार व सध्या उपजिल्हाधिकारी पदापर्यंतची यशस्वी वाटचाल सुरू राहिली.  लोकाभिमुख काम हीच त्यांची ओळख.सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांशी त्यांच्या कार्याची नाळ जोडली गेली आहे.प्रशासनामधला स्वच्छ व पारदर्शी,प्रामाणिक कर्तबगार अधिकारी म्हणून त्यांचा दबदबा सर्वपरिचित आहे.प्रशासनाचे काम हे लोकाभिमुख असते पण त्याची अंमलबजावणी करणे हे सर्वस्वी अधिकाऱ्यांवर अवलंबून असते.म्हणून हा असा लोकाभिमुख अधिकारी आहे की जो लोकहितासाठी आपली प्रशासकीय सेवा प्रभावीपणे राबविण्याचे काम अत्यंत प्रामाणिक व तळमळीने करत असतो.कोणत्याही कामाचे जर स्पष्टपणे उद्दिष्ट ठरले असेल तर ते काम नेटाने व अधिक जोमाने होत असते.आणि म्हणूनच खिलारी साहेबांच्या सेवेचे उद्दिष्टचं ठरलेले आहे...लोकाभिमुख काम...तळागाळातील लोकांपासून सर्वसामान्य घटकापर्यंत जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं चांगलं करत रहायचं...आणि म्हणून त्यांच्या चांगुलपणाची ओळख समाजात अशी निर्माण झाली आहे की,डॉ.संपत खिलारी साहेब म्हटलं बांधावरच्या शेतकऱ्यांपासून ते नोकरवर्ग, सर्वसामान्य लोक आदराने व आपुलकीने त्यांचे नाव घेत असतात.प्रशासनात त्यांच्या अखत्यारीत ज्या स्नेहीवर्गाने काम केले त्यांच्यामध्येसुद्धा ते बदलून जरी गेले तरी त्यांच्याविषयी एक आपुलकी,आदर व काम करत राहण्याची प्रचंड प्रेरणा त्यांच्याकडून मिळते अशी भावना ऐकायला मिळते.पुढे जाताना मागे आपल्या नावाचं एक प्रेरणादायी अस्तित्व निर्माण करणं...आणि चांगल्या कार्याशी ते नांव जोडलं जाणं हे उत्तम कार्यकर्त्या कर्तव्यदक्ष अधिकाराच्याचं लक्षण समजलं जातं आणि म्हणून
अधिकारी कसा असावा..? तर तो असा असावा ही त्यांच्याविषयीची भावना प्रत्येकाच्या मनात आहे.
           प्रशासकीय सेवा बजावताना हळुवार समाजाच्या कुशीत शिरून दुःखीतांच्या दुःखाशी समरस होऊन ते निवारण्याचे काम करत राहणं हे त्यांच्यातल्या समाजसेवकाचे दर्शन घडवतात.या त्यांच्या चांगुपणाचा एक प्रत्यय म्हणजे मागील वर्षी आजरा तालुक्यातील किटवडे धनगरवाड्यातील पांढरंमिसे कुटुंबातील सहा मुली ज्यांचं पितृछत्र हरपलेलं.उपविभागीय अधिकारी डॉ संपत खिलारी साहेबांच्या पुढाकाराने आजरा महसूल विभागाने प्रत्येकी दहा हजार अशी एकूण ६०००० रु रक्कम या सहा मुलींच्या नावे पोस्टाच्या बचत खात्यात ठेव म्हणून ठेवली.
तसेच याच किटवडे धनगरवाड्यात शाळेसाठी  इमारत नाही..शाळा एका गोठ्यात खाजगी जागेत भरते हे लक्षात आल्यावर प्रांताधिकारी म्हणून विशेष लक्ष घालून योगायोगाने ५ सप्टेंबर २०१९ रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त शिक्षकदिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकाऱ्यांच्या भूसंपादनाच्या आदेशाचे पत्र त्यांनी तहसीलदार व विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत शिक्षक व ग्रामस्थ यांच्याकडे सुपूर्द केले.धनगरवाडा शाळेला शिक्षकदिनी हक्काची जागा मिळवून देऊन खरा न्याय दिला.
                 "जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले.." या अपलेपणाच्या वृत्तीने समाजातील दिनदुबळ्या, वंचीत,निराधार ज्यांच्या आईवडिलांचे छत्र हरपले आहे अशा लहानसहान मुलांना आपलेसे करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य पुरवणे यासाठी स्वतः योगदान देत समाजातील दानशूरवतांची मांदियाळी एकत्र आणून देण्याचे आवाहन करण्याचे काम अधिकारी रूपातला त्यांच्यातला माणूस करत असतो.
               तर कोणत्याही प्रसंगात त्यांच्यातला एक अधिकारी कर्तव्याशी कसा एकनिष्ठ राहतो याचा प्रत्यय या एका उदाहरणावरून येतो.नुकत्याच उदभवलेल्या पूरपरिस्थितीच्या दरम्यान कोल्हापूर येथे जन्मदाता बाप दवाखान्यात उपचारासाठी ऍडमिट होता.पण दवाखान्यात न जाता त्यांचा मुलगा इकडे गारगोटी येथे वास्तव्यास राहून आपले कर्तव्य बजावत होता.बापाची काळजी काळजात होतीच पण पुराच्या संकटात अडकलेल्या असंख्य मायबापांची काळजी घेणं त्याहून त्यांना अधिक महत्वाचं वाटलं.
                   
"पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रैलोकी झेंडा..
कन्या देई ऐसी संत मीराबाई,जनाबाई जैसी" अशी ही पोटाला आलेली चारी भावंडे आहेत.वारकरी संप्रदायाच्या वातावरणात घडलेली...काळ्या मातीच्या जीवावर पोसलेली.
जशी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान,मुक्ताई जन्मले तशी  कोंडाजी व निरक्षर पण त्यांनी संस्कारांनी साक्षर केलेली दांपत्याच्या पोटी ही साजेशी ज्ञानवंत,प्रज्ञावंत लेकरं जन्माला आली...आणि ती आपापल्या क्षेत्रात यशस्वी होऊन सर्वोच्च पदाला पोहीचली.
"इवलेसे रोप लावीयले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी"
या लेकरांनी आपल्या कर्तृत्वाने गगनाला गवसणी घातली आहे.जमिनीवर राहून अवघे आकाश कवेत घेतले आहे.ज्या आईवडिलांनी अंगाखांद्यावर मिरवलं,ज्या मातीवर त्यांची इवलीशी पावलं धडपडली त्या लेकरांनी त्या आईवडिलांचं आणि मातीचं पांग फेडलं. आईवडिलांचे मनात आणि तिथल्या मातीच्या प्रत्येक कणात त्यांच्याविषयीचा अभिमान भरून उरला आहे.
                 खिलारी साहेब ज्यावेळी गावी जातात.त्यावेळी आपल्या माणसांशी एकरूप होतात.. आजही ते शेतात जातात...काम करतात..त्या मातीत मिसळतात...कारण त्या मातीतच हा पिंड घडला आहे...घरात वारकरी संप्रदायाचा वारसा तेवढ्याच भावभक्तीने त्यांनी सुरू ठेवला आहे.गावच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करणे, आषाढी वारीकाळात परिसरातील दिंड्याना सहकार्य करणे...अशा कार्यातून भगवंतांची सेवा करण्याचा वसा व वारसा आजही ते आपल्या व्यापातून जोपासत असतात.
           आमचे गुरुवर्य आदरणीय इंद्रजीत देशमुख काकाजी अधिकारी व प्रशासकीय सेवेविषयी सांगतात...अधिकाऱ्यांचे प्रकार चार आहेत.पहिला प्रकार सुस्त,दुसरा त्रस्त,तिसरा व्यस्त आणि चौथा मस्त जो चौथा प्रकार आहे तो परिपक्व अधिकाऱ्याचे लक्षण आहे.कारण माहिती,ज्ञान आणि शहाणपणा यांच्या अनुषंगाने आलेली परिपक्वता ही चौथ्या प्रकारात मोडते.  जीवन जगण्याचा प्रक्रियेत व्यक्ती,परिस्थिती, घटना यांच्या सहयोगातून ही परिपक्वता आयुष्यात येत असते.आणि म्हणून उपजतच समाजीकतेचा वसा घेऊन आलेले.जो स्वतःसाठी जगतो तो कधीच मेलेला असतो आणि जो दुसऱ्यासाठी जगतो तोच खऱ्या अर्थाने जगतो..असे खऱ्या अर्थाचे जीवन जगणारा आणि परिपक्व असा जबरदस्त अधिकारी म्हणजे आमचे डॉ. संपत खिलारी साहेब.
प्रशासनात दोन PR महत्वाचे असतात.एक म्हणजे public relations  आणि दुसरे person relation अंतर वैयक्तिक संबंध आज समाजाशी संबंध आणि हे संबंध त्याचीच ताकदीची होतात ज्याच्याकडे दोन सद्गुण आहेत.एक म्हणजे निर्भयता आणि दुसरी नम्रता.आणि या सद्गुणांनी समृद्ध असे आपले व्यक्तिमत्त्व आहेच.आणि म्हणून तर समाजाच्या तळागाळापर्यंत आपल्या संवेदनांची नाळ जोडणारा कसदार अधिकारी अशी आपली ओळख आहे.
                    प्रशासनाचा नेमका अर्थ आहे कल्याणकारी राज्य निर्माण करणं आपल्या अस्तित्वानं,सामर्थ्यानं समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत त्याच्या आयुष्यात आनंदात जगण्याच्या लायकीची पात्रता निर्माण करणं...आणि ती आपण कराल असा आम्हांला विश्वास आहे.आपली ही यशस्वी वाटचाल अशीच चालू राहो.आणि लवकरच जिल्हाधिकारी रूपातला  अधिकारी आपल्यातून पहायला मिळो...हीच परमेश्वर चरणी प्रार्थना...

राम कृष्ण हरी.!!

जय हो..!मंगल हो..!!

किरण सुभाष चव्हाण.
८८०६७३७५२८.

शनिवार, १८ जानेवारी, २०२०

'सर्वगुणसंपन्न सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व : गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी.'


'सर्वगुणसंपन्न सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व : आदरणीय गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी.'
                   
                     सांगली जिल्ह्यातील विटा शहराजवळच्या माहुली या छोट्याशा गावी श्री.दत्ताजीराव भाऊसाहेब देशमुख व सौ.विजयालक्ष्मी दत्ताजीराव देशमुख या पुण्यशील दाम्पत्याच्या पोटी आठ लेकरं जन्मली.म्हणतात ना..."शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी." तशी ही लेकरं. आणि त्यातले रसाळ गोमटे शेंडेफळ म्हणजे परमपूज्य गुरुवर्य इंद्रजीत देशमुख (काकाजी) ऊर्फ वासुदेवानंद सरस्वती.काकाजींना तीन भाऊ व पाच बहिणी अशी एकूण आठ भावंडे. एकंदरीत मोठा परिवार.१९ ऑक्टोबर १९६५ रोजीचा काकाजींचा जन्म..आज सर्व आबालवृद्ध आदराने व मायेने त्यांना काकाजी म्हणून संबोधतात..आई विजयालक्ष्मी देशमुख जुनी अकरावी पास असलेल्या तर वडील श्री दत्ताजीराव भाऊसाहेब देशमुख १० वर्षे आमदार होते.मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून प्रथम ज्या दोन आमदारांनी त्यावेळी राजीनामा दिला,त्यापैकी एक काकांजीचे वडील होते.काकाजींच्या वडिलांनी सन १९४५ च्या दरम्यान आपल्या लग्नात स्वतःची ७२ एकर जमीन व मिळालेला आठ हजार रुपये हुंडा त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेला दान स्वरूपात दिला.सामाजिक ऋणानुबंधाच्या दृढतेसाठी केंद्राला स्वमालकीची जागा देऊन माहुलीमध्ये पोस्ट ऑफिस सुरू करणारे काकजींचे देशमुख कुटुंब हे देशातील पहिले कुटूंब होय.१९८२ साली देशमुख कुटुंबाच्याच प्रयत्नाने बँक ऑफ बरोडा या शाखेची स्थापना माहुली या ठिकाणी करण्यात आली.अशा समाजाप्रती उदात्त कळवळा असणाऱ्या समाजसेवी कुटुंबातच काकाजींवर समाजशीलतेचा संस्कार रुजला.काकाजींचे भाग्य मोठे की असे उदार अंतःकरणाचे मायबाप त्यांना लाभले.
                             काकाजींचे प्राथमिक शिक्षण गावच्या जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय माहुली या ठिकाणी झाले.बळवंत कॉलेज विटा येथून बारावी झाल्यानंतर कोल्हापूर येथे बी.एस्सी.ऍग्री व त्यानंतर महात्मा फुले विद्यापीठ राहुरी येथे एम.एस.सी एग्री अभ्यासक्रम पूर्ण केला.असा एकंदरीत त्यांचा शैक्षणिक प्रवास सुरू असताना नंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला.आणि त्यानंतर एम.पी.एस.सी च्या मुलाखतीसाठी पुण्याला जात असताना   काकाजींच्या आयुष्यात एक अनपेक्षित घटना घडली तो दिवस होता २ ऑगस्ट १९९२.कात्रजच्या घाटात काकाजींच्या जीब गाडीचा अपघात झाला. गाडीतले दोघे मित्र जागीच गतप्राण झाले आणि थोरले बंधू आबासाहेब जखमी झाले.सुदैवाने काकाजी थोडक्यात बचावले पण पायाला गंभीर दुखापत झाली.पण अशा जीवावर बेतलेल्या संकटाला धीराने तोंड देत पायाला प्लास्टर असताना काकाजींनी त्यावेळेस स्ट्रेचरवरून मुलाखत दिली.अशाप्रकारे मुलाखत देण्याची एम.पी.एस. सी.च्या इतिहासातील ही पहिलीच घटना असावी पण या अपघाताने काकाजींना आत्मसाक्षात्कार घडला...गाडीमधले दोन जीव जागीच गतप्राण झाले पण परमेश्वर कृपेने आपण जिवंत राहिलो याच्यामागे माझ्याकडून काही चांगले कर्म करवून घेण्यासाठीच दैवाने मला हा पुनर्जन्म दिला आहे.मग असे असेल तर इथून पुढचे जीवन अवघ्या जीवांसाठी वाहून घ्यायचे.अशा आत्मचिंतनातून काकाजींच्या आध्यात्मिक व सत्कार्याची दिशा निश्चित झाली.पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतून पहिल्यांदा गटविकास अधिकारी म्हणून शिरोळ या ठिकाणी रुजू झाले.या ठिकाणी वास्तव्यास असताना काकाजींचे नृसिंहवाडीला येणे जाणे व्हायचे त्यामुळे त्यांच्यातील अध्यात्मिक वृत्ती अधिक दृढ झाली.
                          दत्तगुरूंच्या ठायी असणारे आदरणीय कर्नल रघुनाथराव पाटील उर्फ स्वामी प्रणवानंद यांचे गुरुपद स्वीकारून त्यांचे शिष्यत्व पत्करले..तसेच मुरगुड येथील आदरणीय श्री कृष्ण देशमुख काकाजी यांना ते गुरुपदी मानतात. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर, उपायुक्त जलस्वराज्य पुणे ,पाणी पुरवठा, वसुंधरा प्रकल्पावर सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर इथपर्यंत त्यांचा प्रशासकीय कार्यकिर्दीचा आलेख सर्वोत्तम राहिला..प्रशासनातील स्वच्छ,प्रामाणिक व कर्तबगार अधिकारी व सर्वसामान्य जनतेसाठी त्यांच्या कार्यालयाचे दरवाजे उघडे होते अशी त्यांची कारकीर्द एकंदरीत लोकसेवेकरिता राहिली.नजीकच्या काळात ३१ जुलै २०१८ रोजी त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर येथून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.त्यामुळे पूर्णवेळ समाजसेवारुपी कार्याला त्यांनी अखंड वाहून घेतले आहे.अशा सेवाकार्याच्यामागे काकाजींच्या अर्धांगिनी व अवघ्यांच्या आईसाहेब सौ.प्रतिभाताई इंद्रजीत देशमुख यांची सदैव मोलाची साथ लाभत असते.तसेच काकाजींच्या संसाररूपी वेलीवर संस्काररुपी मुले कन्या यशोमतीदीदी एम.बी.बी.एस चे शिक्षण पूर्ण करून सध्या पी.जी.अभ्यास करत आहे व चिरंजीव प्रणवभैया बारावीचे शिक्षण पूर्ण करून पुढील पदवीधर शिक्षण घेत आहे अशाप्रकारे दरवळणाऱ्या सुगंधी फुलासारखे या मुलांचे जीवन बहरत आहे.
                             ज्ञानाची अखंड वाहणारी  गंगा म्हणजे  काकांजीची अमोघ ओघवती अमृतवाणी.वाचनाचा प्रचंड व्यासंग.काकाजींचे जवळजवळ ७००० पुस्तकांचे स्वतःचे सुसज्ज ग्रंथालय आहे.तसेच काकाजींची स्वतःची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.आपल्या अमृतवाणीतून संतापासून मंहतापर्यंत आणि विचारवंतांपासून समाजसुधारकांच्या विचार संस्काराच्या ज्ञानामृताची संजीवनी अवघ्या जीवांना देत असतात.संतांच्या विचारांचा सार सांगताना शितल असणारी वाणी...छत्रपती शिवाजी महाराजांच्या,मावळ्यांच्या क्रांतीवीरांच्या पराक्रमाची गाथा सांगताना ही वाणी तितकीच प्रखर वीररसाने रोमारोमात अंगार फुलवते.'अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्हीं लोक' माऊलींचा हा संस्कार लेवून काकांजी त्याच माऊलींच्या अंतःकरणाने सुखाचे हे बीज आपल्या मधूर वाणीने जनमाणसांच्या हृदयी रुजवत असतात.अशा मानवसेवेच्या उन्नत कार्यासाठी दिवसरात्र त्यांच्या रथाची चाके अखंड भिरभिरीत असतात.अखंड महाराष्ट्र काकाजींच्या वाणीवर भरभरून प्रेम करतो.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन विचारांचा,प्रबोधनाचा जागर ते मांडत असतात.आजही सोशल मीडियाच्या प्रभावशाली माध्यमातून काकाजींचे विचार सर्वदूर ऐकले जातात.काही मिनिटात जीवनाचा सार सांगणारी अर्थपूर्ण अंतर्मुख करायला लावणारी ही अमृतवाणी  व्हाट्सएपच्या माध्यमातून मोबाईलवर ऐकायला मिळते. त्यातील मौलिक विचार मनाचे आरोग्य उत्तम राखून रोजच्या जगण्याला नवं बळ देतात.अशी काही उदाहरणे आहेत की,दुर्धर आजाराने ग्रासलेल्या रोगी बांधवानाही या अमृतवाणीने नकारात्मक विचारातून बाहेर काढून त्या आजाराशी लढून जगण्याची सकारात्मक प्रेरणा निर्माण केली आहे.कीर्तनकार, प्रवचनकार, नामवंत प्रेरणादायी व्याख्याते,विचारवंत,संत साहित्याचे गाढे अभ्यासक,लेखक,कवी अशी विविध रूपे काकाजींच्या व्यक्तीमत्वात सामावलेली आहेत.अशा बहुआयामी  संगमाच्या उगमस्थानातून प्रसवरवणारी विचारवाणी ज्ञानप्रवाहित होऊन जनासागराला मिळत असते.
                                     नव्या दमाच्या पिढीची ऊर्जा व प्रेरणास्रोत म्हणजे काकाजी.नव्या तरुणाईमध्ये काकाजींच्याविषयी प्रचंड आत्मीयता व लगावआहे. तमाम नवयुवकांना योग्य दिशा देऊन उज्वल,समृद्ध व सक्षमीकरणाचे काकाजींचे अभियान सतत सुरू असते.भारताचे भविष्य ज्या पिढीच्या हातात आहे.तो भारत स्वामी विवेकानंदांच्या आदर्शवादी विचारांचा बलशाली भारत झाला पाहिजे.या विचारमंथनातून स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा वसा व वारसा पुढे नेण्यासाठी आणि समाजसेवेच्या वृंधिंगत  व्यापक विचारातून काकाजींच्या मार्गदर्शनाखाली १२ जानेवारी २००० साली शिवम अध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेची स्थापना घारेवाडी येथे करण्यात आली.या शिवम प्रतिष्ठानच्या माध्यमातून काकांजीच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली लहान मुलांकरिता बालसंस्कार शिबीर,बलशाली भारताच्या स्वप्नपूर्तीच्या उद्देशाने घेतले जाणारे बलशाली युवा हृदय संमेलन जकर..दुष्काळग्रस्त भागात मे महिन्यात माय भू सेवा यात्रेअंतर्गत श्रमदान शिबिर राबविले जाते,पालकांच्यासाठी पालकसंस्कार शिबीर,शिक्षकांसाठी गुरुजन हृदय संमेलन,महाराष्ट्रातील समाजसेवेला वाहून घेतलेल्या व्यक्ती व संस्था यांच्या भेटीचा अभ्यासपूर्ण दौरा म्हणजे सृजनयात्रा,शेतकऱ्यांसाठी शेतकरी हृदय संमेलन, महिलांच्यासाठी शौर्यवर्धिनी शिबिर.असे वर्षभरात सर्वांच्यासाठी सर्वसमावेशक विविध उपक्रम घेतले जातात.अलीकडे नव्याने वृद्धांसाठी सावली वृद्धाश्रम सुरू केले आहे.काकाजी आणि नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर,मकरंद अनासपुरे यांच्या सहयोगातून सध्या महाराष्ट्रात शेतकरी विषयक कार्याचा विस्तार होतोय..नाम फाउंडेशन संस्था व शिवम प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतकरी जीवन हे सुखी,समृद्ध आणि संपन्न व्हावे कोणत्याही शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागू नये यासाठीची एक चळवळ महाराष्ट्रात निर्माण होत आहे.अशाप्रकारे काकाजींच्या सामाजिक कार्याचा विस्तार महाराष्ट्रभर दिवसेंदिवस अधिकाधिक व्यापकदृष्ट्या वृंद्धीगत होतोय.
                       काकांजीबद्दल काय बोलावं आणि किती बोलावं...? आकाशासारखे विशाल आणि महासागरासारखे अथांग असे आमचे काकाजी.त्यांची महती शब्दांत मांडताना त्यांची व्याप्ती त्या शब्दांत मावणे कठीण आहे.

 'इं'- द्रायणीच्या काठचा ज्ञाना वदतो आपल्या मुखातूनी..
ज्ञानामृताने ओंथबती शब्दे पाझरती हृदयातूनी.

'द्र'- वती पाषाणहृदयेही आपुल्या शीतल वाणीने
धन्य होती वाणी वर्षावात भिजूनी अवघ्यांची तने-मने.

'जी'- वा सवे जीव जडवी मायेचा धागा गुंफती आपुली वचने.
चांगुलपणाच्या सुवासाने दरवळती इथली सुमने.

'त'- याजयांच्या सुखाचा ध्यास अखंड आपुल्या हृदयांतळी
अवघ्यांच्या कल्याणाचे साकार करावया स्वप्ने आपुला जिवात्मा तळमळी.

      'इंद्रजीत' या चार अक्षरातून निघणारा अर्थच इतका व्यापक असेल तर मग इंद्रजीत देशमुख काकाजी या व्यक्तिमत्त्वाचे स्वरूप अवकाशाप्रमाणेच किती अथांग.
                                        काकाजी म्हणजे अवघ्यांचे हृदय...अंतरीचे हृदयरुपी काकाजी म्हणजे जगण्यातला चेतनामयी जिवंतपणा...ज्ञानाचा निखळता...खळखळता... नितळ झरा...बुद्धीला शुद्धीची....मनाला मांगल्याची आणि जनाला सज्जनाची जोड देऊन कसं जगावं व कशासाठी जगावं या उद्दिष्टांप्रती आत्मप्रचिती घडवून आणणारी..अशी चैतन्याची,पावित्र्याची,मांगल्याची सर्वांगसुंदर सर्वगुणसंपन्न  मूर्ती... ज्या मंगलमयी मुखातून साक्षात ज्ञानाची वदते सरस्वती असे आमुचे इंद्रजीत देशमुख (काकाजी) उर्फ स्वामी वासुदेवानंद सरस्वती .ज्या कुणाला ही सदमूर्ती भेटली..त्यांना जीवन कळले हो..जीवनाचे सार्थक झाले हो.!!
                                                                     जय हो....मंगल हो...!!
               
गुरुवर्य काकाजींची ध्वनिफीत खालील युट्यूब चॅनेलवर जरूर ऐका.

https://youtu.be/LoFlJ1epcuE

- शिवम साधक
किरण सुभाष चव्हाण
मोबा - ८८०६७३७५२८.

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२०

सामाजिक कार्यकर्ते श्री. सागर गुरव - किरण चव्हाण.


'सागर गुरव म्हणजे  समाजसेवेला वाहून घेतलेलं एक जीवन...'

                         भुदरगड तालुक्यातील कोळवण हे थोडं दुर्गमचं म्हणावं लागेल असं गांव...जेमतेम दोन हजाराच्या घरात असलेली लोकसंख्या...शेती हा प्रमुख तर त्याच्या जोडीला पशुपालन हा जोडव्यवसाय.. अशा या खेडेगावात...सागर गुरव यांचा अतिशय गरीब कुटुंबात जन्म झाला...आईवडील शेतमजूर...घरची फक्त पाच गुंठे जमीन...कुठे तरी मोलमजुरी केल्याशिवाय भागायचे नाही...हातावरचे पोट... आणि त्यात ही तीन मुले पोटाला...सागरजींना तीन भावंडे...थोरली बहीण...भाऊ मग सागरजी...बहीण लग्न होऊन सासरी गेली...भावाचे लग्न झाले...कालांतराने...त्यावेळी सागरजी दहावीला असतील... भावाने आपला वेगळा संसार थाटला...आपला सख्खा भाऊ आपल्यापासून दूर गेल्याची बोच त्यांच्या लहान मनाला लागली...घरचा कर्ता पुरुष म्हणून ज्या भावाने कुटूंबाची  जबाबदारी स्वीकारायची...तोच आपली जबाबदारी झटकून मोकळा झाला...पुढे आणखीन एक दोन वर्षाने सागरजींना असाच धक्का बसला...१२ वी ला असताना वडिलांचे डोळे गेले...दोन्हीं डोळ्यांनी वडील पूर्णपणे अंध झाले..भाऊ तर आधीच विभक्त झालेला...आणि आता वडिलांचा होता आधार तो ही अशाप्रकारे अधू झालेला...आता काय करावं..? घर कस चालवावं..?सागरजींच्या डोळ्यापुढे सगळाच अंधार दाटून आला होता.शिक्षण पूर्ण करायचं की घर चालवायचं...? पण जिद्द न सोडता आर.ए.मोहिते. टेक्स्टाईल या कंपनीत दिवसभर काम करून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे रात्रीच्या कॉलेजमधून ११ वी चे शिक्षण घेतले..आणि पुन्हा गावी येऊन आपले घर सांभाळत १२ वीचे शिक्षण पूर्ण केले.पण आता पुढे खूपच मोठा प्रश्न निर्माण झाला... शिक्षणाकडे लक्ष दिले तर माझ्या वयस्कर आईवडिलांना कसे सांभाळता येईल..? एकीकडे घरची जबाबदारी आणि दुसरीकडे शिक्षण अशा परिस्थितीत स्वतःच्या आईवडिलांकडे पाहून पोरसवदा वयात घराची जबाबदारी अंगावर घेतली...आणि शिक्षण सुटलं...
            पण संकटं काही पाठ सोडायला तयार नव्हती.. थोरला भाऊ दारूच्या पूर्णपणे आहारी गेला होता...दारूचे व्यसन त्याला जडले होते...पुन्हां प्रश्न निर्माण झाला... आपले घर सावरता सावरता आता समोर भावाचे घर उध्वस्त होताना पहायचे का..? चार माणसात बसता-उठता पंचाईत होत होती..नाही मला काही तरी केलं पाहिजे. दारूमुळे मी माझ्या भावाचा संसार उध्वस्त होताना नाही पाहू शकत...मन पेटून उठलं...आणि नकळत पहिल्यांदा इथेच समाजकार्याची पहिली ठिणगी मनात पडली...ती व्यसनमुक्तीची....काहीही झालं तरी या दारूच्या व्यसनातून भावाला सोडवायचा हा विडाच त्यावेळी त्यांनी उचलला..
भावाला समजावून सांगितले ,दारूच्या दुकानात जाऊन सांगावं लागलं माझ्या भावाला दारू देऊ नका म्हणून.पण जिथं आपलंच नाणं खोटं तिथं दुसऱ्याला सांगून तरी काय उपयोग...कित्येक वेळा समजावून सांगण्याचा  हा अयशस्वी प्रयत्न केला... उपयोग झाला नाही...शेवटी गावातील दारूबंदी झाली पाहिजे यासाठी लोकांच्यात मिसळून जनजागृतीला करायला सुरुवात केली...घरोघरी जाऊन दारूबंदी साठी प्रबोधन करावे लागले...गावातील मंडळाच्या माध्यमातून कार्यक्रम राबवून दारू बंदीच्या विरोधात लोकप्रबोधन सुरू केले...सभा घेतल्या...

एक चळवळ उभी केली...यात त्यांच्या पत्नी सौ.अनुराधा गुरव यांची त्यांना मोलाची साथ मिळत गेली.. काहीवेळा रागाने ग्रामपंचायतीच्या दारात दारूचा साठा जाळण्याचाही प्रयत्न केला...शेवटी चांगल्या लोकांच्या सहकार्याने असा एक निर्णय घेतला की,जो कोणी गावात दारू पिऊन येईल त्याची...मुंडन करून धिंड काढण्यात येईल...पण इथे एक सत्वाची आणि तत्वाची परीक्षा सागरजींना द्यावी लागली...की काही विघ्न संतोषी लोकांनी सागरजींच्याच भावाला मुद्दाम माघारी दारू पाजवून गावात आणले...आता कसली धिंड आणि कसलं मुंडन...?त्यांना गंमत बघायची होती... या संकल्पनेची टर उडवायची होती...पण सागरजींनी हिंमत दाखवली...नियम तर सर्वांनाच लागू आहे भाऊ असला म्हणून काय झाले...सागरजींनी स्वतः आपल्या भावाचे मुंडन करून गावातून धिंड काढली...बोले तैसा चाले...या उक्तीप्रमाणे त्याची प्रचीती दाखवून दिली. की फक्त मी बोलतच नाही करून दाखवतो..आणि  लोकांना त्यावेळी पटलं की,नाही एक भाऊ जर अशाप्रकारे भावाची धिंड काढण्याची कठोर पाऊले उचलत असेल तर खरंच ती दारू किती वाईट आहे... हळूहळू यातून भावाचे व्यसन सुटले...पण समाजात आणखीन असे असंख्य भाऊ आहेत जे अशा व्यसनाच्या विळख्यात सापडले आहेत... म्हणून सागरजींनी ही दारूबंदीची चळवळ अधिक व्यापक केली. प्रसंगी पत्नीची कर्णफुले या कार्यासाठी गहाण ठेवली.वटपौर्णिमेच्या दिवशी सहा हजार महिला भगिनींचा मेळावा घेऊन आपल्या गावात कायमची दारूबंदी झाली पाहिजे याचा निर्धार करून गावातील दारूबंदी पूर्णपणे यशस्वी करण्याच्या दृष्टीने पाउले उचलली.या घटनेला आज नऊ वर्षे लोटली. आजतागायत गावात पूर्णपणे दारूबंदी आहे.
           घरची परिस्थिती लक्षात घेऊन अवघ्या २१ व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

एक अशा गरीब कुटूंबातील मुलगीशी लग्न केले की, त्या घराचाही आपल्याला भविष्यात आधार होता येईल...वडिलोपार्जित पाच गुंठे जमीन आणि दोन म्हैशी... एवढीच काय ती दौलत गाठीला.आणि संसार सुरू झाला...अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्हीं लोक..या उक्तीप्रमाणे आपल्या संसाराबरोबर समाजाचा संसारही बघायचा होता...जबाबदारी खूप मोठी होती.. समाजाला आपले कुटुंब मानून समाजसेवेचे व्रत हाती घेतले आणि खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यात सागरजींनी स्वतःला झोकून दिले.
                  व्यसनमुक्ती या कार्यापाठोपाठ अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हाती घेतले ,आसपासच्या शाळेत जाऊन मुलांना याविषयी मार्गदर्शन करणे...लेक वाचवा या गंभीर सामाजिक विषयासंदर्भात शाळेत, समाजात जाणीव जागृती निर्माण करण्यास सुरुवात केली...आपल्या स्वतःच्या कुटूंबाचा मरणोत्तर अवयव दानाचा संकल्प त्यांनी केला आहे एवढेच नाही तर अशाप्रकारे आतापर्यंत २५० जणांना अवयव दान करण्यासाठी परावृत्त केले...वर्षातून तीन वेळा असे आजपर्यंत तब्बल २१ वेळा सागरजींनी रक्तदान केले आहे...सरकारच्या काहीं योजनांचा लाभ गरीब व गरजू लोकांच्यापर्यंत पोहचवणे..


जीवनदायी योजनेच्या माध्यमातून सुमारे २५० पेक्षा जास्त लोकांना लाभ मिळवून दिला...परिसरात वृक्षारोपण करणे,लोकसहभागातून विद्या मंदिर कोळवण या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे...गावातील मयताच्या उतरकार्याला भांडी देण्याची प्रथा मोडीत काढून त्याऐवजी शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी असे शैक्षणिक साहित्य देणे आणि रक्षाविसर्जन नदीमध्ये न करता एखाद्या झाडाला ती घालणे... अशा पारंपरिक प्रथेला मुरड घालून बदलत्या काळानुसार परिवर्तनवादीसंकल्पना त्यांनी मांडल्या आणि त्या सत्यातही उतरवल्या...सागरजी स्वतःच्या बापाची केस,दाढी आजही स्वतः करतात..

 या निमित्ताने आपल्या बापाच्या गालाला मायेचा स्पर्श करण्याची संधी न सोडणारा हा विरळा पुत्र असेल...उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहार समाजातील मुलगा... आईवडील पोटाची खळगी भरण्यासाठी इकडे आलेले ,गावोगाव फिरून लोहारकाम करायचे...अशा भटकंतीमुळे मुलांचे शिक्षण खुंटले होते...जेंव्हा ही गोष्ट सागरजींच्या लक्षात आली तेंव्हा जातिनिशी त्यांनी यात लक्ष घालून त्या आईवडिलांची समजूत काढून त्या मुलाला आणि त्याच्या मामाच्या मुलाला अशा दोन मुलांना मुरगुड विद्यालय मुरगुड येथे  प्रवेश घेतला आणि त्यांचे इ९वीचे शिक्षण सुरु झाले... या मुलांच्या लागणाऱ्या शिक्षणाचा खर्च सागरजींआज लोकसहभागातून  करताहेत.

तसेच मुरगुडमधील शिवमचे साधक डॉ.श्री रणजितसिंह साठे डॉक्टर या मुलांच्या आजारपणात पूर्णपणे मोफत उपचार करतात..आज ही मुले आनंदाने शिक्षण घेत आहेत..आईवडिलांना उपस्थित राहता येत नाही म्हणून स्वतः सागरजी शाळेतील पालकमिटिंगला हजर राहतात...आजही पूर्णपणे त्या मुलाकडे त्यांचे लक्ष देतात.अशाप्रकारे शिक्षणाविना वंचित राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्याला एक नवे जीवन देण्याचे हे मोलाचे कार्य सागरजींच्या हातून घडले आणि घडत आहे..असा हा सागरजींच्या सामाजिक कार्याचा उंचावणाराच आलेख...दोन अडीच वर्षांपासून ते ज्यांना गुरुबंधू मानतात ते दाभोळे साहेब यांच्यामुळे शिवम फाउंडेशनला जोडले गेले...आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या या कार्याची पुण्याई म्हणावी लागेल...की त्यांची इथे मा.इंद्रजीत देशमुख साहेब(काकाजीं) यांच्याशी भेट झाली..


.पुण्याई फळाला आली... गुरुभेट झाली...सागरजींना आपला परमेश्वर भेटला...गुरुशिष्याचे नाते इतके घट्ट झाले...की उठता बसता आपल्या गुरूंचे नामस्मरण करून...सागरजी आपले कार्य पुढे नेटाने करू लागले...प्रातःकाळी उठल्या उठल्या त्यांच्या डोळ्यासमोर पहिल्यांदा उभे राहते ते परमपूज्य काकाजींचे रुप...एवढे सागरजींच्या हृदयात खोलवर रुजले आहेत काकाजीं..आता या कार्याच्या पाठीमागे खरी प्रेरणा,प्रोत्साहन आणि मार्गदर्शन होते ते साक्षात गुरूंचे...मग काय समाजसेवेचा वसा आता अमाप ऊर्जेने आणि प्रेरणेने अगदी जोमाने पुढे चालू आहे.. शिवमच्या माध्यमातून गेल्यावर्षी सिंदखेड लपाली आणि यावर्षी मान तालुक्यातील शिंदी खुर्द या गावी पाणी फाउंडेशनने सुरू केलेल्या पाणी आडवा पाणी जिरवा या श्रमदान शिबिरात ही सागरजींनी उत्साहाने सहभाग घेऊन...पूर्णपणे तनामनाने  श्रमदान केले..


शिवम फाउंडेशनच्या कोणत्याही कार्यात आणि कार्यक्रमात सागरजींचा मोठा सहभाग असतो...एक प्रमुख भूमिका असते...काकाजींचा एकेक शब्द ते जीवाप्रमाण मानतात...काकाजींचा शब्द आणि आशीर्वाद घेऊनच सागरजीं कोणत्याही कामाची सुरुवात करतात.काकांजीची विचारधारा हीच सागरजींची जीवनधारा बनली आहे....
                    सागरजींच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्या  समाजसेवेच्या नीतीला  योग्य गती मिळावी यासाठी अयोध्या फाऊंडेशन कोल्हापूर यांच्यावतीने यावर्षीच्या युवा हृदय संमेलन घारेवाडी येथे सन्मानपूर्वक नाना पाटेकर यांच्या हस्ते बोलेरो गाडी सागरजीना प्रदान करण्यात आली..

त्यांच्या सामाजिक कार्याची ही पोचपावतीच म्हणावी लागेल.आता आपल्याबरोबरीने या गाडीलाही त्यांनी समाजसेवेत रुजू केले आहे...
आपल्या भागातील  गोरगरीब लोकांची सेवा करण्याची अनोखी संधी यातुन त्यांना मिळाली...भागातील अनेक रुग्णांना विनामोबदला फक्त डिझेल खर्च घेऊन जिल्ह्याच्या दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याची सेवा या गाडीच्या माध्यमातून सध्या ते करत आहेत...आज अनेकजण सांगतात...वेळेवर सागर गुरव यांची गाडी आली नि मला वेळेवर उपचार मिळाले....काहीजण सांगतात की खरंच सागरदादांच्या मुळे मला हे नवीन जीवन मिळाले.आहे..आजपर्यंत सहा सात महिन्याच्या काळात ४० भर रुग्णांना दवाखान्याच्या दारात वेळेत पोहोचवण्याची सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली... आज सागरदादांची ही गाडी म्हणजे गोरगरीब, सामान्य जनतेची जीवनवाहिनी बनून फिरते आहे...


पण काहीवेळा अशी ही वेळ येते की साधे डिझेलचे पैसेही समोरच्यांकडून मिळत नाहीत.स्वतःच्या खिशातले तरी कितीवेळा घालायचे...अशी एकेकदा निराशा पदरी यायची...आणि काय योगायोग... ठरलेल्या पेट्रोल पंपावर गाडी घेऊन गेल्यानंतर हजार रुपयांचे डिझेल घाला म्हणतांना तो पाच हजारांचे डिझेल टाकीत भरतो...आणि वरून म्हणतो...सागरदादा एक व्यक्ती आली होती पाच हजार रुपये देऊन गेली...ज्यावेळी सागर गुरुवांची गाडी डीझेल भरायला येईल त्यावेळी या पैशांचे डिझेल त्या गाडीत भरा.म्हणून.आणि हो जाताना माझे नाव त्यांना सांगू नका बरं असे सांगून गेली...आणखीन एक अशीच घटना.ओळख ना पाळख सागरजींच्या माघारी एक व्यक्ती त्यांच्या पत्नीच्या हातात शंभर रुपये ठेवते आणि हे सागरदादांच्या कार्यासाठी घ्या म्हणून सांगते...तेंव्हा खरंच ते पाच हजार असतील किंवा शंभर रुपये... ते केवळ पैसे नसतात तर पैशांच्या रुपात चांगल्या कार्यासाठी मिळालेली ती एक प्रेरणा असते...निराशा बाजूला सरते आणि मन नव्या ऊर्जेने भरते.पुन्हा पुढच्या कामासाठी नवी स्फूर्ती मिळते....असा हा सागरजींचा अनुभव आहे.
                 अलीकडे गावातील शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष पद गावकऱ्यांनी सर्वानुमते सागरजींना दिले आहे..आणि मिळालेल्या या संधीचे सोने करायचे या उद्देशाने अध्यक्ष कसा असावा याचा आदर्श ते आपल्या कामातून घालून देत आहेत... लोकसहभागातून शाळेतील मुलांना जास्तीत जास्त शालेय उपयोगी साहित्य उपलब्ध करून देणे आणि चांगले व्याख्याते,वक्ते मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी शाळेत आणणे असे विविध कार्य अध्यक्ष पदावर राहून ते करत आहेत..तसेच शाळेतील दोन विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शाळेचा संपूर्ण खर्च ते स्वतः करत आहेत... त्याचबरोबर पाच अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करत त्यांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी स्वीकारायची..असा त्यांचा मानस आहे...
               त्यांच्या आतापर्यंतच्या अशा सामाजिक कार्याची दखल घेऊन अनेक संस्थाच्या मार्फत सन्मान व पुरस्कार मिळाले आणि मिळत आहेत...काहीवेळा ते पुरस्कार स्वीकारण्यास तयार होत नाहीत कारण  आपलं कार्यच सर्वश्रेष्ठ मानणारे सागरजी नेहमी अशा प्रसिद्धीपासून स्वतःला दूर ठेवतात...अलीकडेच त्यांना अखिल भारतीय ग्राहक मंच कोल्हापूर यांच्यावतीने मौनी विद्यापीठ गारगोटी येथे  जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे...


                     बोलण्यात नम्रता...वागण्यात सौजन्यता.... लहानथोर कुणाशीही बोलताना पहिल्यांदा मुखात राम कृष्ण हरी हा उच्चार...लहानांची कदर आणि मोठ्यांचा आदर मनापासून करणारे हे व्यक्तिमत्त्व.अतिशय गोड हृदयाचा माणूस...त्यांच्या सहवासात कुणीही राहिलं की हमखास हा गोडवा आपल्याला चाखायला मिळतो...काहीही असो ओठातून नाही तर पोटातून बोलणारा हा माणूस आहे.              स्वतःच्या प्रतिकूल परिस्थितीवर हिमतीने मात करत...समाजकार्याचे व्रत हाती घेतले...आणि आजतागायत ते प्रामाणिकपणे आपले सर्वस्व पणाला लावून हे काम ते करताहेत...आणि यामध्ये मोलाची साथ आहे ती त्यांच्या अर्धांगिनीची......एका आईबापाचा मुलगा एक भाऊ,एक पती, एक पिता ,एक शिष्य आणि एक समजासेवक अशा अनेक रूपातील एक आदर्श जीवन आज सागरजी जगत आहेत..
           खरं तर ऐनवेळी लहान असताना स्वतःच्या भावाने साथ सोडली...आपला वेगळा संसार थाटला...नंतर दारूच्या आहरी गेला..संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर....पण सागरजींनी या स्वतःच्या भावाला मार्गावर आणलेच...त्यांचा संसार सावरलाच भाऊ आज वारकरी झाले आहेत पण समाजातील अशा अनेक बांधवांना आपलेसे करून आपल्या भावाप्रमाणे त्यांचे दारूचे व्यसन सोडायला लावून त्यांना चांगल्या मार्गावर आणले...अनेकांचे या दारूपायी उध्वस्त होणारे संसार वाचवले...कित्येक माताभगिनींच्या कपाळाचे कुंकू त्यांनी मजबूत केले... खरंच पैसा म्हणजे ज्या लोकांना सर्वस्व वाटतो त्या लोकांनी एकदा ह्या व्यक्तीमत्वाकडे जरूर पहावं...जाणून घ्यावं... एका दुर्गम अशा खेडेगावात गरीबीत जन्म घेतलेला,हातावरचे पोट असणारा हा सामान्य माणूस...पण आज असे असामान्य कर्तृत्व करतो..फक्त पैसा असून चालत नाही तर त्यासाठी मनात खूप मोठी जिगर असावी लागते ...मनात आणलं असतं तर कुठेतरी चांगल्याचुंगल्या पगाराची नोकरी करून सुखासमाधानाचा एकट्याचाच संसार थाटला असता...आपल्या बायकामुलांत आनंदात राहता आलं असतं..मग कशासाठी एवढा हट्टाहास ..? कशासाठी एवढी जीवाची धडपड...?पण
हे विश्वची माझे घर
या माऊलींच्या उक्तीप्रमाणे त्यांनी समाजलाच आपले कुटुंब मानले.. माऊलींनी सांगितलंय..
"अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्हीं लोक."
जन्माला आलोय ना तर एकट्याचा नाही अवघ्यांच्या सुखासाठी मी धडपडणार.आहे..मी माझ्या एकट्यासाठी नाही तर संगळ्यांच्यासाठी जगणार आहे.


हा माऊलींच्या विचारांचा वसा आणि वारसा  खऱ्या अर्थाने जगणारा आणि पुढे नेणारा हा माणूस आहे.जो  फक्त स्वतःसाठी जगतो तो कधीच मेलेला असतो पण जो इतरांसाठी जगतो तोच खरा जगतो….आणि हे खरं जगणं सागरजींच्याकडे पाहिल्यानंतर कळतं...धन्य आहे आपले जीवन...आपला हा जीवनप्रवाह म्हणजे निखळ,निर्मळ झऱ्यासारखा आहे... की जीवनाच्या वाटसरुला या आपल्या प्रवाहात आल्यानंतर तृप्तीचा आनंद मिळावा. आणि जीवनाचा खरा मार्ग सापडावा…आपले जीवनकार्य म्हणजे चालते बोलते विद्यापीठ आहे…
का जगावे...?कसे जगावे..? आणि कशासाठी जगावे...? हे सारं काही आपल्याकडून शिकता येतं...खूप काही घेता येतं...शेवटी
आपले हे समाजसेवेचे कार्य पुढे असेच चालू राहो.
आपले विचार,आपल्या संकल्पना पूर्णत्वास जावो..आणि हे सर्व करण्यासाठी आपल्याला व आपल्या परिवाराला निरोगी,उदंड असे आयुष्य मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना... धन्यवाद...

जय हो..!मंगल हो..!!


संवाद साधण्यासाठी संपर्क : 
सामाजिक कार्यकर्ते श्री सागर गुुुुरव.
मोबा - 9146148904


 -किरण सुभाष चव्हाण.
पांगिरे,ता-भुदरगड,जि- कोल्हापूर.
मोबा - ८८०६७३७५२८.

'नववर्षाचे एक कॅलेंडर घेऊन अंध प्रल्हादच्या संघर्षाला बळ देऊ शकता.'





'नववर्षाचे एक कॅलेंडर घेऊन अंध प्रल्हादच्या संघर्षाला बळ देऊ शकता.'
                  
                  वर्षाच्या सरतेशेवटी शहरातून,बाजारपेठेतुन अथवा एखाद्या गल्लीतून अंध व्यक्ती एका हातात काठी व दुसऱ्या आडव्या हातावर कॅलेंडरांची उळी घेऊन फिरत असताना आपल्याला दिसतात.आणि मग संवेदनशील माणसांची आपसूकच पावले त्यांच्याकडील कॅलेंडर विकत घेण्यासाठी वळतात.खरं तर अंध व्यक्तींचे असे कष्ट आणि मुळात त्यांच्याविषयी वाटणारी सहानुभूती यामुळे त्यांच्याकडील कॅलेंडरचा खप होतो ही एक जमेची बाजू आहे...
                  प्रल्हाद दत्तू पाटील ही अशीच एक अंध तरुण व्यक्ती.अंदाजे चाळीसपर्यंत असणारे वय.पाचगांव येथे विरविनायक कॉलनीत महिला मंडळ गिरणीजवळ राहतात.जन्मतः अंधत्व असलेलं. रोज उगवणारा सूर्य त्यांच्या आयुष्यात अंधार घेऊन येतो.लहान असताना त्याांच्या
वडिलांनी आई व या मुलाला सोडून दिले.आणि मग या तान्ह्या लेकराला उराशी कवटाळून आई माहेरी पाचगावमध्ये येऊन राहिली.आई म्हैशी पाळायची.त्यावेळी चार ते पाच म्हैशी घरी होत्या.लहानगा प्रल्हादही आईमागोमाग म्हैशीकडे जायचा.मुळात अंध आणि गरिबी यामुळं शिक्षण घेणं जमलं नाही.अंध मुलगा म्हणून नवऱ्यान जरी  साथ सोडली असली तरी तिच्यातली आई हार मानणारी नव्हती.अगदी हिंमतीने त्या आईने हरेकप्रकारे प्रल्हादला जोपासले.लहानाचे मोठे केले.प्रल्हादही आईला जमेल तशी मदत करायचा.दिवस मागे सरत होते.मायलेकरांची जोडी आनंदाने रहात होती.पण नियतीला हे मान्य नसावं मध्येच आई प्रल्हादला सोडून गेली.हृदय विकाराच्या झटक्याने ती वारली.दुःखाचा डोंगर प्रल्हादवर कोसळला आणि अंध प्रल्हाद मायेविना पोरका झाला.अंधाऱ्या जगातला मायेचा दीपस्तंभ विझला आणि प्रल्हादचे जीवन आणखीनच आतून- बाहेरून अंधकारमय झाले.माय आधाराची काठी होती...माय पुढे आणि पाठी होती.आधाराचे सारे खांब निखळून पडावेत असे झाले.आता जीवनच ओसाड झाले...पण म्हणतात ना 'माय मरो आणि मावशी उरो' आईच्या माघारी मावशीने प्रल्हादला आधार दिला सांभाळ केला. पण त्या मावशीचेही नुकतेच निधन झाले. प्रल्हादचे मामा-मामी ही आज त्याच्याकडे लक्ष देतात. प्रल्हाद स्वतंत्र खोलीत राहतो पण त्याच्या खाण्यापिण्याची सर्व  सोय हे नातलग करतात. आई गेली,मावशी पण गेली या दुःखातून सावरत स्वतःचा धीर खचू न देता प्रल्हाद पुन्हा उभा राहिलाय..आईची जागा आता काठीने घेतली, तीच त्याची सोबतीनं.
                     पण काही का असेना म्हैशीच्या मागे जाण्याची आईची शिकवण शेवटी कामाला आली.प्रल्हादने एक रेडी पाळली होती.रोज तिच्या उसाभरीत तो असायचा.तिच्या खाण्यापिण्याच्या उलाढालीत त्याचा दिवस सरायचा. कोणाच्याही आधाराविना स्वतःच्या शेतातून जमेल तशी वैरणकाडी आणायचा. .दुपारच्या वेळेस रेडीला चारायला सोडणं.विशेष म्हणजे तिला दोरी न लावता बाहेर चारण्यास घेऊन जाणं. प्रल्हादला रेडीचा विशेष लळा लागला होता. असं म्हणायला हरकत नाही की,आईवरच्या प्रेमाची जागा आता त्या मुक्या जनावाराने घेतली आहे. त्याची रेडीही त्याच्या सहवासात माणसाळलेली होती.तो आपल्या रेडीला लाडाने 'रंभा' नावाने हाक मारायचा."रंभा हांई$$" अशी हाळी मारायची पुरशत ती लागलीच त्याच्या जवळ येऊन उभा रहायची.म्हैशीचे शेण काढणे.ते आपल्या शेतात नेऊन त्याच्या शेणी वळणे,कधी म्हैशीचे केस वस्ताऱ्याने कापणे.अशी कामे प्रल्हाद करायचा. पण नियतीला हे नातं ही मान्य नसावं लाडागोडाने जपलेली रंभा सुद्धा अचानक प्रल्हादला सोडून गेली. जवळची म्हैस सुद्धा मरून गेली.प्रल्हाद आता एकटा पडलाय. परंतु त्याने हार मानलेली नाही. स्वतःची दाढी स्वतः करणे.जेवलेली भांडी विसळवून ठेवणे,कपडे धुणे अशी एकंदरीत कामे तो स्वतः करतो. अशाप्रकारे प्रल्हाद स्वावलंबी आहे.
                 वर्षाच्या शेवटी प्रल्हाद दरवर्षी परिसरात कॅलेंडर विकतो.या वर्षीही  त्याने कॅलेंडर विकायला सुरुवात केली आहे.  सकाळी ७ ला घरातून बाहेर पडल्यानंतर कॅलेंडर विकून घरी येण्यास ९-१० वाजतात.रात्रीचे घरी परतताना कधी कोणी गाडीवरुन घरी सोडतात तर कोणी रस्ता दाखवतात. गिऱ्हाईकांच्या हाती कॅलेंडर सोपताना अगदी नम्रपणे प्रल्हाद नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो.पाचगाव परिसरात प्रल्हादची आता ठराविक गिऱ्हाईक तयार झालेत जे दरवर्षी त्याच्याकडून कॅलेंडर घेतात.किंवा असेही काही गिऱ्हाईक आहेत की स्वतःहून प्रल्हादच्या घरी जाऊन खरेदी करतात.
                प्रल्हाद जसा वरून दिसायला साधाभोळा तसा आतूनही.डोळ्यावर घातलेला काळा गॉगल.हातात जाडशीर काठी.खूप नम्र व निरागस स्वभाव.बोलण्यात गोडवा. गाण्याची ही कला अंगात आहे.प्रल्हाद गाणी,अभंग,आरती छानपैकी गातो.
                 प्रल्हादची जिद्द,चिकाटी, मेहनतीच्या बळावर प्रल्हादची जगण्याची लढाई सुरूचं राहणार आहे. अपंगत्वाचे भांडवल करून तो कुणाकडे मदत मागत नाही तर कॅलेंडर विकून किंवा असे छोटेमोठे उद्योग करून स्वाभिमानाने जगू पाहतोय. जीवनाच्या या लढाईत तो एकटा पडलाय. पण ज्याला कोणी नाही त्याला आम्हीं आहोत. प्रल्हाद एकटा नाही तर आपण सर्व त्याच्यासोबत आहोत. चला त्याला हे दाखवून देऊयात आणि जगण्याची हिंमत देऊयात. तसे तर कुठूनही आपण नवीन वर्षाचे कॅलेंडर खरेदी करीतच असतो पण तेच कॅलेंडर आपण प्रल्हादकडून घेऊयात. जेणेकरून प्रल्हादला त्यामाध्यमातून मदतही होईल. हे कॅलेंडर तुमच्या भिंतीवर प्रल्हादच्या संघर्षमय जगण्याची साक्ष देताना तुम्हांला ही जगण्याची प्रेरणा देत राहील आणि तुमच्या प्रतिसादाने  प्रल्हादलाही जगण्याची नवी उमेद मिळत राहील. 

 प्रल्हादकडुन नववर्षाचे कॅलेंडर खरेदी करण्यासाठी....    

संपर्क : प्रल्हाद पाटील पाचगाव.
'मोबा - ७४९९०२९५०५'

- किरण सुभाष चव्हाण 
 (पांगिरे)
मोबा - ८८०६७३७५२८.




-------------------------------------------------------------

ऑडीओ ...


बुधवार, १५ जानेवारी, २०२०

ललितबंध- त्या तिन्हीसांजेला. - किरण चव्हाण.

                           
           
                    त्या तिन्हींसांजेला...
                                                   
                               ...ढळल्या सांजेबरोबर पापण्याही अलगद ढळतात.आणि त्या तिथल्या चाफ्याच्या सावलीत झाडाखाली.... कोमट किरणांत ढळलेली सांज खोलवर आठवत राहते.. तो मवाळ गोळा पुसट डोंगराच्या माथ्यावरून अस्ताला जाताना  कांही क्षणांपुरतीचं अस्तित्व लाभलेली ती उरली सुरली सोनेरी किरणं... सभोवार पसरलेली. शेजारच्या त्या हिरव्यागार गच्च झुडुपवेलींच्या महालातून माघारी वळणाऱ्या किरणांचे कवडसे लुप्त होताना अंधारलेलं ते एकटंदुकटं झुडूप...एका कोपऱ्यातलं भरजरी घनघोर वेळूच बन.त्या तिथे तळ्यातील नितळकाच पाण्यात कमलकळ्या स्वतःला मिटून उभ्या असलेल्या. 


कुठल्याशा घरट्यात परतीची पाखरं जमा होऊन फडफड करत असलेली.आपल्या दमल्या भागल्या पंखाखाली चिमुकल्या पिल्लांना ऊबीला घेताना मायलेकरांच्यात चाललेली चिवचिव.गळून पडलेल्या नाजूक साजूक हिरव्याकंच दांड्याची ताज्या मऊ पाकळी चाफ्याच्या फुलांचा भोवतीभोर पडलेला सडा... 


त्यातलंच एक फुल उचलून तिने माझ्या हातात दिल आणि मोकळ्या सोडलेल्या काळ्याभोर केसांत माझ्या हाताने माळून घेतलं. एका साजिऱ्या फुलाला चिमटीत धरून गोल गोल फिरवत अगदीच त्याला लळा लावत तिचं ते लाडीगोडी लावणं...किंचित माझ्याहून त्या फुलासवे रमलेली ती.माझ्या अधीर मनाला मी कसं समजवावं...?
                                कातरवेळ गडद होताना त्या शांत निरव चाफ्याच्या झाडाखाली अंथरलेल्या चाफ्याच्या फुलांवरची अबोलशी बैठक.


भिडलेल्या नजरेच्या कटाक्षात फक्त एकमेकांच्या एकमेकांनी पुरेपुर भरून घेतलेल्या जागा. डोळे तर तिचे...कोरीव काठांच्या आतला काळांनिळा निशांत डोह...तिच्या त्या पाणीदार डोळ्यातल्या कडकोपऱ्यात साचून राहिलेली ती कातरवेळ...एकट्या दुकट्या त्या शांत नजरेत स्वतःला भरताना कातरभीतीही हवीहवीशी वाटणारी मनात.आणि मग अशावेळी पापण्यांचीही नकोशी झालेली उगाचंच अडसर.पण शेवटी त्या निष्पापाणे हा नजरेंचा डाव उधळला ना..? कुठून कसे घरंगळुन अलगद टपकले तिच्या मऊसूत केसांवर पांढुरके ते इवलेसे फुल...लबाड ..? तिच्या काळ्याभोर केसांच्या भांगेत रुतून बसले अगदी थाटात...  पण एखाद्या मुकुटासारखे शोभत होते तिच्या डोक्यावर...मला हसू फुटलं...आणि मग ती ही लागली ना नकळत हसायला.. मंद वाऱ्याची झुळुकही अधनमधून आमच्यात रेंगाळणारी .तिच्या गालावर अलगद ढळलेली ती नाजूक बट..तिच्याशी  खेळू लागायची वाऱ्याची ती मंद झुळूक...
                              गवताच्या निस्तेज कोवळ्या पात्यावरून कोमल हात मायेने फिरवावा तिने.दुडलेल्या एका निरागस पात्यावर मग रोखावी अखेर शून्यातली नजर.. पाने सळसळतायत ना अधेमधे चाफ्याची.सतारीसारखी वेळूचीही करकर कानाशी भिनत आहे.पुरत्या ढळलेल्या सांजेची किणकिणही कानी गुंज घालतेय आता.अंधार झिरपत आहे ना सर्वदूर..पण तू कुठे चाललीस..? नको...नको...अशी मला तू सोडून दूर जाऊ...भरल्या तिन्हींसांजेला असं मला एकटं टाकून जाणार तू.?  बघ ना  एकवार माााझ्याकडे लपवते 
आहेस का स्वतःला माझ्यापासून...काय तुझ्या डोळ्यांत पाणी.? नको ना गं भरू डोळ्यांत पाणी...नको ना रडू वेडे...,तुझं रडवेलपण बघवेल का मला..?...बघ हं...मी पाहतोय तुझ्या डोळ्यांतील निखळणारे थेंब त्या बिचाऱ्या कोवळ्या फुलांच्या अंगावर टपकताना...बघवेल का गं असं तुझ्या अश्रूंत त्यांना भिजायला...पुरे ना आता  नको ना अशी कासावीस होऊ मलाही कसनुस होतंय गं...
                     .....अंधारले की..कुठे गेलीस...अगं कुठे आहेस तू...?  आता तर इथे होतीस कुठे गेलीस.. कुठे शोधू मी तुला..?....कुठे...........थांब रे वेड्या थांब...थांब ....मिटल्या पापण्यांच्या दाराआड अंधारात किती शोधशील रे तिला..?
उघड ती दारे गच्च मिटलेल्या पापण्यांची...उघड पाहू वाट मोकळी करून दे त्या अश्रूंना...नको रे त्यांना सांजवेळी असे अडवत जाऊ...बिचारे रोज ढासळतायेत अशा सांजेला...मिटल्या पापण्यांआड कुठंवर शोधशील तिला..? नाही भेटावयाची ती तुला... आता जराही ढळू देऊ नकोस पापणी तिन्हींसांजेला.. गेली रे गेली ती लयाला....त्या तिन्हींसांजेला...
                                 




माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...