फॉलोअर

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२०

'बामणकीच्या मळीतली गोदा.'- किरण चव्हाण.

    


                       'बामणकीच्या मळीतली गोदा.'

                

                         कदमाचा बापू आला आसल गावासनं...आता चार दिस झालं की, किती वाट बघायची...? चार दिसामागं बापू लेकीकडं गेलता...त्यायळेला बापू म्हणालता ...आता मी येणार त्ये सरळ पा-सा दिसांनच.मग आज किती दिस झालं...बोटांवरचा हिशोब आज परतच्याला मांडला.. शेवटाला अंगठा दुमडला म्हंजी बक्कळ पाच दिस झालं...आला आसल बापू..? एक मन म्हणतंय आसल एक म्हणतंय नसल.पण आता न्हाई थार व्हइत...डोसक्यात राग घालून जायाची पाळी यील.न्हाई... खुळाचं व्हईनं मी..काय व्हईल ते व्हईल...आता थांबायचं न्हाई...बापूदा आला आगर नसलबी पर आपुन तिथं जाऊन धडकायचंच.  त्याशिवाय आत्मा थंड व्हायचा न्हाई माझा...एक दिस कधी सोडून ऱ्हाता आलं न्हाई...चार दिस कसं काढलं आसतील ते माझं मला म्हाइत...डाव्या आंगाला सुमी बिनघोर निजल्याली...कवाची झोप लागल्याली तिला.आंगावरनं साप गेला तरी सूद गावणार न्हाई....झोप बाई झोप...हिजा आयला हिजा कारटखाऊ बाई...सकाळी उठल्या पासनं नुसती बोंबलत आसतीया माझ्या नावानं...मी बी आसू दे तिकडं म्हणून सोडून देतोय म्हणून..न्हाई तर..? .मरणाचं काम करतीया... हाताला थाराचं न्हाई तिच्या... मी ह्यो आसला.. न्हाई तरी ह्यो प्रपंचा चाललाय कुणाच्या जीवावर...? ती हाय म्हणून तर मी हाय.

                                     भांगलणीचं पैसं मिळाल्यात कायसं आज.तवाच दिवळीतल्या जरबंदी डब्यात मगाशी मेजून ठेवत व्हती. कानावर गल्लीतल्या भजनाचा सबळ आवाज इत व्हता आता कुठं पंचपदी सुरू झाल्याली.तेवढंच देवाधर्माचं चार शबुद कानात शिरत व्हतं.तसंच उताणी पडल्या छातीवर हात जोडलं..'पांडुरंगा तुझं चार चांगलं शबुद कानावर पडल्यात...जसं आता ठरवलयचं तवा तिथं गेल्यावर आमचा बापुदा तेवढा गाठ पडू दे बाबा....आज बारादी न्हाई का धोंडूतात्याची. झोपत बारक्या पोराचा दात खात्याला आवाज यावा तसा वरच्या येळवाच्या जुन्या कोराटलेल्या वास्यातनं कीडा पोखरत्याला आवाज इत व्हता...आणि गोम्याच्या डोसक्यात कवाधरनं निराळाच किडा वळवळालता..डावा हात कोपरात दुमडून त्यानं उशाला घेतल्याला...रातीच्या काळोखात डोळं सताड उघडं... डोळ्याम्होरं तर सगळा आंधार गुडूप... कुठं तरी अंधारात उडी मारावी आणि पार तळाला जावावं तसा उरावर सगळा अंधारचं अंधार.अंधाऱ्या काळोख्यान डोळं पाक लिपल्यालं..डोळं मिटलं काय आणि उघडं काय सारखंच.

                                                  तरीबी कुठल्यातरी इचारानं  गोम्या गापक्यान उठलाच...पायथ्याला भीतीकडं पाण्याच्या डेऱ्याची कट्टी व्हती...तसाच खाली खाली सराकला... जाग्याचा आदमास घित घित रांगतच दमान वरच्या आंगाला सरकू लागला...एकदम दमानं न्हाई तर मग सुमी उठली की धडगत न्हाई...दोन हात भुईला टेकवून ढोपरावर जरा जरा सरकत आला भांड्याच्या लाकडी निकारड्यापाशी...मागच्या भीतीत उजव्या बाजूला दिवळी व्हती..जिथं सुमीनं डब्यात पैसं ठेवलं हुतं... पाची बोटांनं हळूच डब्याचं टोपान उघडलं..हाताला पैशाची उळी गावली...तळाला सुट्ट पैसेबी व्हतं...आज्याबाद आवाज होऊ न देता वरच्या वर नोटांची उळी फकस्त अलगद उचलली.. मुठीत पैसं दाबून मुठ आवळली...टोपान लावून व्हता तसा डबा जग्याला ठेवला...परत खाली बसला बारक्या पोरागत रांगत रांगत...चोरट्या मांजरांगत पुढं पुढं सरकत दाराबशी आला...वर उठला.बेचक्यात आडवा टाकल्याला आडना दमान वर उचलून...उजव्या हाताची फळी मागं केली... मांजरांनं खिडकीच्या गजातनं आपलं आंग अलगद बाहीर काढावं तस मागच्या दारानं एकदासा गोम्या बाहेर आला..परत व्हतं तस दार मिटवून घेतलं आणि बाहेरनं साखळी लावली.परड्याआंगाला अंधार  मावना चिमटीन चिमूटभरबी उजेड कुठं दिसना त्यात खालच्या गावंदरीला बांधावरच्या चिचवर घुबाड घुमायला लागल्यालं...त्ये कानांत घुं$$ घुं$$ आवाज करत म्हवाच्या माशा घुसव्यात तसं वाटत हुतं... ते भेसूर इवाळण एकट्यादुकट्या जीवाला घाबराघुबरा करून सोडत व्हतं...

                                                 गोम्या तसाच खायल्या आंगच्या चांदकीच्या भीतीला उजवा हात घासत घासत मुगळातनं गल्लीआंगाला जाय लागला...तसाच पुढं आला भीतीला सायकल टेकवल्याली हाताला गावली... तसंच तिला मागं ढकलत एकदासं सायकल घिवूनच गोम्या गल्लीला बाहेर पडला...धोंडूतात्याच्या घरासमोर तेवढा पिवळाधमक उजेड पडल्याला...न्हाई तरी बाकी सामसूम गल्ली अंधारात गुडूप झाल्याली.आता तर भजनाचा आवाज सपय कानांवर इत व्हता...टाळांचाखणखणाट,.दुमदुमणारा तबल्याचा ठोका,लव्हारचा इसनुमा पेटीवर अभंग गाईत व्हता..."क्षणोक्षणी हाची करावा विचार,नाशिवंत देह जाणार सकळ"....पण आम्हांस्नी कसला इचार नी फिचार...काय व्हायचं त्ये व्हवू दे आम्हीं त्याचं वाटवर जाणार..असा इचार करतच गोम्या आपला सायकल घेऊन त्या अंधाऱ्याखाईत वरती कडच्या वाटला लागला व्हता..गल्ली संपली...भजनाचा आवाज मागं पडला..दोन्हीं अंगानं चिकाचा घनदाट कूप सुरू झाला...त्या गचपणातन रातकिड्यांच्या किरकिरीला तुटवडाच न्हवता...कांन भरून पावलं हुतं..पुढ जरा धाकल्या घसव्याला गोम्यानं एकदासी सायकवर टांग टाकली...काळ्याभोर अंधारातनं रस्त्याचा आदमास घीत दमान पायातलं पॅडेल रेटू लागला...

                                                 अंधाराला कातरत गोम्याची सायकल पुढं पुढं सरकू लागली...एखाद्या दगडावरनं पुढचं चाक निस्टांयच...हेलपाटायला व्हायचं...मुठीतला ब्रेक आपसूकच आवळला जायचा गती कमी व्हायची...खाचखळगं...दगुडधोंडा आडवा आला तरी आता आंधळ्याची गत व्हती...अंधारात बाण मारावा तशी सायकल मारायची...पर एकच करायचं रस्त्याचा आदमास घित पुढं जायाचं..त्यात चीनवरचा पत्रा चीनला घासून 'खारखार' असा एकसारखा आवाज इत व्हता...काळ्याकुट्ट रातीच्या भयाण शांततेला चिरत गोम्या मजल दरमजल पुढं सरकत व्हता...गावापासनं बरंच अंतर मागं पडलं आता पुढं ती  बामनकीची मळी..मळीच्या डाव्या कुशीला नदीनं घेतल्याला वळसा... रानावनातनं, शिवारातन माग काढत आल्याली नदी बामनकीच्या मळीला यायला उघडी दिसायची...हमस्स्त्याच्या खाली घसव्याला वीसेक पावलांवर तिचं अंतर...नदीच्या अलिकडचा काठ म्हंजी खरबुड उच सखल..नुसत्या काळ्या काळ्या कातळ खडाकाचा.कासवाच्या पाठकवचागत दिसत व्हता...पलीकडंच्या कडन तर हुंबराची,जांभळी,करंजीची झाडं, खसखशीच्या झाडांचं हिरडं,काट्याकुटची झाडूरं...दरडंकडला पाण्यात मुळकांड शिरल्याल्या करंजीच्या झाडांची हिरवीगार कमान नदीच्या पाण्यावर झुकल्याली.. वाऱ्याच्या झोताबरोबर खायच्या ढाळ्यांचं शेंडं पाण्याला शिवून वर यायचं. रानवैरण..घानेरीची घुसपं...हरेक नमुन्याची झुडपं...अशा दाटीवाटीनं पलीकडचा काठ नुसता मुजून गेलता...काठावर सरमधी येळवाचं बेट. रातध्याड त्येंची करकर...आडव्यातिडव्या काट्याकुट्याच्या त्या गचपणात दिवसाउजेडी सावळा अंधार असायचा...वरल्या आंगच्या त्या बेटाच्या बुडक्याजवळ त्यो मॉन ढव..कुणाची बिशात हाय तिकडं फिरकायची..त्या डमकातलं पाणी शांत शांत..तिथंन पुढं पुढं जाईल  तसं चवताळल्यासारं खायल्या उतारीला जोमानं पळायचं...

                                               डावं वळाण घेऊन  गोम्या या बामणकीच्या मळीजवळ आला.रस्त्याच्या खायल्या बाजूनं पाण्याचा झुळझुळाट कानांवर पडत व्हता.तिथं तेवढा छातीत धुडधुडल्यासारं व्हईतं...त्या खायल्या बाजूला न बघता..तितन येगात पायातलं पॅडल फिरवत सायकल रेटली...आणि तेवढा पल्ला कसल्यातरी भ्यानं गोम्यानं पार केला...पुढं जाऊन एका  रस्त्याच्या चढणीला धपापत्या उरानं निस्वास सोडला...'मळी तरी मागं सरली.आयला काय म्हणायचं हे...आसल्या अंधाऱ्या रातीला आपुन एकटं दुकटं बाहीर पडून आलू...खुळ लागलं आसल काय मला ?पुढचं मागचं कायचं दिसना...रात एवढी माजलीया छाती आतल्या आत दडपालिया...गप घरात निजलो आसतो तर लई बरं झालं आसतं...पर बघितलं नव्ह चार दिस झालं  डोळ्याला डोळा लागतोय का ते...आज बापुदा आला आसल म्हणूनंच आलो नवं.आसू दे बापुदा गाठ पडला म्हणजे झालं.अशी मनाची समजी घालत गोम्या सायकल हाकत व्हता...झालं आता ह्यो पाटलाचा उसाचा फड तेवढा मागं टाकला की...हनमनकीच खडाक तितन काय मग जवळच बापुदाची ऱ्हावटी... जाधवाच्या शेतीकाठाचा रस्ता उभ्या चढतीच्या धाटणीचा...सायकलवरनं उतरून तिला ढकलत गोम्या ती दांडगा चढ चढू लागला.

                                             पुढं सपय रस्त्याला परत गोम्यानं सायकलवर टांग टाकली...आणि सायकलला गती दिली...आता कुठंच उतरायचं न्हाई...सरळसोट हणमणकीचं खडाक..पाटलाच्या तोऱ्यागतचं पाटलाचा ऊसबी काठाला तोऱ्यात उभा व्हता...उजव्या बाजूनं मागं सरकत व्हता...त्येजा पुढं गेल्यावर एका डाव्या बगला हावळाचं जुनंपुराणं मोठं झाड...माळतलं मणी तुटून चौखूर इस्कटून पडावं तशी झाडाखाली वाळीखड हावळं पसरून पडल्याली.त्याच्या पुढं आडवा वडा पार करून गोम्या एकदासा माळाला आला...आदमासान रस्त्याच्या उजव्या काठान सायकल वळवून पडीवर घेतली...आणि त्या पडीवरनं सरळ खाली जाऊ लागला...त्या माळावर धाकल्या घसव्याच्या खायल्या टोकाला काठावर चिचंच तरण झाड व्हतं.तिथंच त्या चिचंच्या खोडाला सायकल टेकवली...आणि गोम्यानं  पुढं व्हवून समोर नदार टाकली... एक तांबूस ठिपका नजरला पडला... आणि आनंदाच्या उकळ्या मनात फुटल्या...पक्की खात्री पटली बापुदा आलाय...आपल्या आगुदर मनानं तिथं धाव घेतली...झपापा पावलं त्या दिशेनं पडायला लागली...आता काय रोजचीच पायाबुडची वाट...सकाळ संध्याकाळ या वाटनं फेरी झडायची. आता डोळं झापुन जरी चाललं तरी पायासनी आपोआप माग गावल... एवढा खात्रीशीर आदमास..

                                                       पायाखालचं मातीहेंडं कुस्करत गोम्या चालला अगदी जोमानं..मनाला आनंदाचं उधाण आल्यालं.बक्कळ चार दिसांनी आज ही वाट तुडवत व्हता...काटं सावरीच्या तळाला वळसा घालून लमानकीच्या चिवळाटातन वर आला..दोघातिघा बापयांच बोलणं नीटच कानांवर इत व्हतं.. झालं आता बिनधोक.आता कुठला आडसर न्हाई...अगदी डोळ्यासमोर धा हातांवर बापूदाची शेतातली कुडामेडाची ऱ्हावटी...

"बापुदा.." लांबनच एक जोराची हाळी गोम्यानं ठोकली...तसं कंदिलाच्या उजेडात खोपी बाहेरच्या शेड्यात बसल्याली माणसं अंधारात नजर घुसवून बघायला लागली...डोळ्यासमोर सगळा अंधारच...बापुदा एकदम कावराबावरा होऊन गेला.

  उजवा हात उपडी करून कपाळाला लावत बारीक डोळं करीत बापुदा जोराच्यानं बोलला.

"आरं कोण रं त्यो..?"

तसा अंधाराच्या कचाट्यातन निसटल्यागत पुढ्यात गोम्या हजरचं.कंदिलाच्या उजेडात त्याचं तोंडं सरळ रापलं आणि आवाक होऊन बापुदा बोलला..."आरं गोम्या तू..? आणि या येळला..?"

गोम्या खायच्या घोळक्यात बसत म्हणाला..

"बापुदा तुला पयल बघून लई झ्याक वाटलं बघ...किती दिस झालं...? जीव तळमळतोया माझा "

"तर तर लई बघितलाय... माझ्या वढीचा...दारूसाठी मेल्याला उठशील..चार दिस न्हाई तर कायली झाली आसल तुझ्या जीवाची.."

"बापुदा काय करू सगळं चीनभिन झालतं... काय सुदरना...राची झॉप न्हाई आणि दिवसाला सुमीच्या शिव्यांची घाई..."

"आरं पण एवढ्या रातीला यायला एवढी नड व्हती का..?"

"...मग तुला आता काय सांगालोय...त्यात आज येळचं चांगली म्हणायची...सुमी झोपल्याली बिनघोर...ती झोपायचीचं वाट बघूत व्हतो...ती कधी हातात पैसा टेकवतीया व्हय...ती झोपल्याली बघून बरोबर डल्ला मारला... आता एकदम चार दिसाची पिणार बघ..."

"आरं लेका उद्या आला आसतास तर काय बिघाडलं आसतं.. रात किती झालीया बघ आमचं काय गांव जवळ, घर जवळ."

शेजारी बसलेल्या तीन चार लोकांच्या पंगतीकडं बघत बापुदा पुढं बोलू लागला."..त्यात हे काय सुकाळीचं मला झोपू द्येत्यात.मी आलोय म्हटल्यावर मला गावातनं  पुढं घालून गुत्त्यावर घेऊन आल्यात.."

"आसू दे की मग चांगलंचं झालं की...तान लागल्यावंच माणूस हीर खणतया नवं"

"लई शाना हाईस आरं तू परगावसनं यायचा...गोम्या आरं आजची रात ही भर आवसची ...भुताखेताची रात.."

"ये बापुदा कायबी बोलू नगस... आत गपगुमान पेलं भर बघू...इथं आम्हीच भुतं हाय..आमचा आत्मा पयला थंड कर मग बघू त्या भुतांचं..लागलाय मला शिकवायला.."

गोम्यानं पँटच्या चोरखिशात ठेवल्याली पैशाची उळी दोन बोटांच्या चिमटीतनं वर काढली...आणि तशीच बापुदाच्या हातात ठेवली...

"बापुदा हे घे..आज रोख...आज रोखीनं मनासारखी पिणार बघ..तिजायला मला पैसं दित न्हाई काय...? कशी हातचलाखी केली...मागचीबी उदारी घे चुकती करून..सारखं पिताना टोमनं दित आसतोस"...

"लेका बायकोचं पैसं धापुन तिलाच आन वर शिवा देतोयास व्हय.." बापुदानं पैसं हातात घित आडवी मान हालीवली... उठून आतल्या आंगाला गेला.येताना रमरमीत दोन गेळं भरून घेऊन बाहीर आला.

 कधी एकदा व्हटाला भरला  पेला लावतोय आसं गोम्याला झालतं.

बापुदानं मापाच्या पेल्यात काठोकाठ दारू वतली आणि पेला गोम्यापुढं केला...बाजूच्या मंडळींची आता भागली व्हती..ती उठून जायच्या तयारीला लागल्याली..पण कवाधरनं ती वर उठायचीचं तयारी करीत व्हते...

इकडं गोम्या हावराटासारा एकेल पेला ओठांआड करत व्हता...

"गोम्या बास कर आता.निघ बघू मध्यान रात व्हयाला आली.."

डोळ्यावर तवंग आल्याला अंगात धुंदी माजल्याली... जीभ जड झाल्यागत शब्दाला तान दित गोम्या बोलू लागला.

"बापुदा...आसं काय करतोस...वत आजून वत... वतत ऱ्हा नुसता...."

आता ह्येला काय करावं...ह्ये उठल्याशिवाय तरी आपण कसं उठायचं..बापुदाला कोडं पडलं.

"आरं आरं गोम्या एकदम पिऊन काय मरायचं हाय व्हय रं... थोडी उद्या पी उठ उठ बघू आता..

आज आवसची रात हाय...जातावक्ती बामनकीच्या मळीची जागा चांगली न्हाई...माहिती हाय नवं...आवर बघू लगबगीनं घर जवळ कर.."

"ये बापुदा काय बी सांगू नगस ,मला भ्या घालतोस व्हय...आरं मी वाघ हाय वाघ भितो काय..कोण समजलास तू मला.."

"व्हय व्हय तू वाघच हाईस पर आता उठ तुला हात जोडतो...रात लई झालीया..."

कसतरी करून बापुदानं गोम्याला उठीवलं कामटांचं दार वडून घेतलं साकळी हुकात आडीकली आणि कुलूप घालणार ते कंच्या तरी इचारात त्यानं मागं बघित गोम्याला म्हणाला..." गोम्या... काय पडतोस रं इथं. एवढ्या रातीला कसां जाणार तू..."

..."न्हाई...न्हाई...बापुदा...सुमीचा डोळा चुकवून आलोय...इथंच थांबलो तर ती कैदासीन सकाळच्याला घरात घ्यायची न्हाय.."

"..मग जा तर लवकर जा.पयला..आधीमधी कुठं थांबू नगस आणि व्हय बामनकीची मळी तेवढी झाटदिश्यान गाठून म्होरं व्हो..म्हंजी मग घोर न्हाई.." बोलताना गोम्याची जीभ वळत व्हती.

"आगा सोड की गा...कशाला काळजी करतुयास...तू लाग तुझ्या वाटला मी लागतो माझ्या वाटला."

पाठमोरी व्हवून बोलतच गोम्या आपल्या वाटला आणि बापुदा आपल्या वाटला लागला. बापुदाचा पल्ला काय लांबचा नव्हता...वाटनं जाता वक्ती उगाच काय तरी मनात वाईटसाईट यालतं... आज तर भर आवसची रात...आपोआपच ती बामनकीची मळी बापुदाच्या नजरला यायला लागली. पार मनाच्या तळाची गोष्ट आपोआप वरती येऊ लागली.किती वरसं झाली त्या गोष्टीला. किती न्हानगा व्हतो त्यायेळला जरा कुठं कळत व्हतं....आमच्या गावातली गोदाक्का..चार खेड्यात आसली बाई नसलं.दिसायला लई सुदंर बाई... लगीन झालं. आणि लग्नाच्या दुसऱ्या वर्षीचं ती घटना घडली.त्यो दिवस आवसचा.. भर दुपारच्याला ती एकटीदुकटीचं तरणीताठी बाई नदीला बामनकीच्या मळीला गेली.आणि काय कसं कुणास ठाऊक तिथल्या त्या खॉल मॉन ढवात बुडाली...तिसऱ्या दिशी मडं पाण्यावर तरंगायला लागलं ...ज्या ढवात तिचा जीव गेला तिथंच दुसऱ्या वर्षी पाण्यातली म्हस त्या ढवात जिती वडून नेली..तिजा आजुनबी जीव तिथं घुटमळतोय म्हणत्यात...आवसच्या रातीला बाईमाणसाचा किचाळत्याला आवाज बामनकीच्या मळीला घुमतोय..म्हणून कोण जातंय व्हय आवसला तिकडं..'पण आज गोम्याचं जाईत व्हता...अलीकडच्या पोरास्नी यातलं काय ठाव हाय.कुणाचं ऐकायचं न्हाई काय न्हाई.कुठंबी हुमदांडगापणा करत्यात....कसं व्हायचं या गोम्याचं इचार करत बापुदा घरात कधी पोचला तेजत्येलाच कळलं न्हाई.

                                इकडं परतीची वाट कातरत शेतवडीतनं, सड्या बांधावरनं हेलपाटत गोम्यापुढं सरकू लागला...खायल्या बाजूवर करंजीचं एक मोठं झाड व्हतं.तेज्या वरच्या झावळ्या खाली लोंबत व्हत्या... हाताला गावणाऱ्या त्या तेलकट पानांच्या झावळ्यास्नी मुठीत धरून गोम्या घटकाभर तिथंच थांबला...दारू चांगलीच अंगात भिनली व्हती...वगळाच्या काठानं वाढलेल्या लिंगडीच्या थोरल्या घुसपात... रात किड्यांचा नुसता दंगायोट चालला हुता...रात बरीच झाल्याली पण आता त्यो एकटा कुठं व्हता.सोबत तीबी व्हतीच की,अंगात शिरल्याली...गोम्या तंद्रीत बिनघोर पावलं टाकू लागला...चिचच्या झाडाची वळख गावली...खोडाला टेकवल्याली सायकल घेतली..आता तिला सोबत घेऊन पुढची वाट धरायची...हनमणकीचं खडाक रस्त्याला लागूनच.त्या खडकावरनं रस्त्यावर आला..घसवा व्हता..आता सायकलवर बसायला हरकत नव्हती...डावा पाय एका पॅडेलवर ठेवून कशी तरी पलिकडं ढेंग टाकली सायकल एकदम भेलकांडत शेजारच्या कुपात जाता जाता वाचली..पुन्हा तिनं बरोबर रस्ता धरला आणि एकदासी कशीबशी सायकलसवारी सुरू झाली..एखादा साप वळवळत पुढं जावावा तसं समोरचं चाक एकदा डावीकडं एकदा उजवीकडं वळत व्हतं...रस्ता सपय खरं अंधारानं मुजल्याला.डाव्या अंगानं पाटलाचा ऊस मागं पडला...आणि जाधवाच्या शेताकाठची थोरली घसरण लागली...

                       आता  सायकलंच काम.आपुन फक्त बसायचं मुठीतला बीरेक धरून...सायकल तिचं काम ती करालती..गोम्यान मुठीतला बीरेक आर्धा आवळून धरल्याला तरी त्या घसारतीला तिला जोरात पळू वाटालतं...दगडधोंडा-खाचगळगा माहिती नाही दणादण आपटत तशीच जोमात आली.पुढं  मुर्ग्याला यायला तिला दम लागला..तसं गोम्यान हलक्या पायानं पॅडल रेटलं आणि बरोबर मुरगा सपायला बामनकीची मळी लागली...आणि अंधारात बिनधोक फिरणाऱ्या चाकास्नी गोम्यानं एकदम गाचकन बीरेक लावला तशी जाग्याला सायकल थांबली. सायकलवरून एक पाय खाली टेकवून पुढं बघू लागला.एवढ्या काळ्याधोक अंधारात समोर साऊट कसला.? परत परत पापण्या मिचकून बघितल्या...काय तरी नजरला पांढरधोट दिसालतं एवढं खरं.बघून खिणभर श्वास रोखला.. छातीत एकदम लुकलुकाय लागलं..सगळा जीवचं डोळ्यात जमा झाला...त्या नीसुर रातीला मंद वाऱ्याच्या झुळकेचा सुंकार कानात भरत व्हता...काय करावं..?.पुढं पाऊल टाकावं की नगो....नक्कीच काय तरी भानगड हाय...पांढरंधोट काय तरी नजरला झळमालतं एवढं खरं...पण मी भितोय काय.?..आसा वाघ पुढ्यात आला तरी फाडून ठेवीन...असा ताव दारूमुळं गोम्याच्या अंगात रसरसुन भरल्याला... 

                                         त्या तावातावातच गोम्या पुढं झाला....बघतोय तर काय...बाई..बघून मन चराकलच..टाळा कोरडा पडला...'आता रं हेज्या भन...या रातीला समोर बाई... पुढं जायाचं काय मागं जायाचं उमजना.तिथंच उभा राहून निरीखलं...ती पाठमोरी व्हवून उभा व्हती....

भरजरी साडी नेसल्याली.. पुनवच टिपूर चांदणं फकस्त तिच्या अंगावर पडावं तसं तिच्या अंगावरचा पांढरा उजेड डोळ्याला फेकच दिसालता... पाठीवर मुरत्या काळ्याभोर झिंजोळ्या कंबरपतोर लोंबालत्या...नाजूक साजूक बांध्याचं ते पाठमोरी रुपडंच एवढं गॉड दिसालता मग मुखडा कसा आसल...? गोम्याला भानचं उरलं नव्हतं.. एका जाग्याला ढिम्म उभी ती लावण्यवती.तंवर डाव्या बाजूनं हळुवार तिनं वळण घेतलं..आणि...आणि गोल घडीच गोरंगुमटं मुखकमल नजरेस पडलं..देखणं आरस्पानी सौंदर्य. काळ्याभोर केसांची पिरंगळलेली बट दोन्हीं गालांवर घरंगळलेली..साजरी दिसत व्हती. गोऱ्यागुमट्या गोंदल्या कपाळावर सवासनीच वाण..कोरल्या भुवयांच्या काठाळी खाली नाजूक पापण्यांच्या पाकळीत पाणीदार नितळ काळंभोर टपोरं डोळं...देखणेपणा उठावदार करणारी नाजूक नाकेली.मऊशार गुलाबी दुमडलेली ओठाळी...

नितळकाच पाण्यासारखी ती नितळ कांती.बघून नजर भुलावी...समाधी लागावी...ऐन रातीला कोण अवतरली म्हणायची ही. तिच्याकडं एकटक बघून गोम्या पाकच खुळा झाला..?त्येला काळावेळाचं भानच राहील न्हाई. गोम्या पुरता भुलला..मागं सरत्याला एकेक पाऊल पुढं आपसूकच सरकू लागला...

"कवाधरनं वाट बघतीया नवं तुमची..." तिच्या गोड गळ्यांतनं गुळासारखं गुळमाट शबुद बाहीर पडलं..

तसा गोम्या आवाकंच झाला..

"ऑ$$माझी आणि वाट.?.."

त्या मधाळ नाजूक बोलण्यानं गोम्या पुरता घायाळ झाला.'आयला लगीन झाल्यापासनं सुमी कधी अशी गॉड बोलली न्हाई आणि ही बया म्हणतीया 'वाट बघातूया नवं मी तुमची' नवलच म्हणायचं...

एकेक पाय टाकीत ती गोम्याच्या दिशेनं पुढं सरकू लागली. 

भरजरी साडीच्या खालच्या घोळातन खालचं पाय सबळ दिसत नव्हतं...पण नाजूकशी किणकिण पायतळाला होत होती.

गोम्यानं आवंढा गिळला...नकळत त्यो मागं सराकला...'आता रं... ही तर बया जवळ जवळ यायलिया.'

ती पुढं पुढं आणि ह्यो मागं मागं...दोघांच्यात तिसरी सायकल. तिची चाकं उलटी फिरत व्हती...

"आवं आसं मागं मागं कुठं सरकालाईसा...?"

ती जवळजवळ गोम्याच्या पुढ्यातच गेली....

"मी तुम्हांलाचं न्यायला आलोय नवं"

आणि एकदम तिनं आपला हात गोम्याच्या हातावर ठेवला...गोम्या डोळं बंद करून जाग्याला किचाळलाच...तसा तिनं डावा हात त्याच्या वठावर अलगद ठेवला...मऊ मऊ गरगरीत गार असल्यालं हात आंगाला लागलं...आणि गोम्या मंतारल्यासारखा जागच्या जागला खिळला...काय बोलायचं काय करायचं कायच सुदरना...

मऊशार उजव्या हातानं तिनं गोम्याचा डावा हात गच्च पकडला....आणि जवळ खेचलं..गोम्याला तो स्पर्श हवाहवासा वाटला..

"चला"

"पर कुठं जायाचं..?" गोम्या जीभ आडवी घालत बोलला..नशा दाबून अंगात भरल्याली.

"तुम्हीं चला तर खरं माझ्यामागोमाग.."

गोम्याच्या हातातन सायकल गळून खाली पडली.आता  त्येज त्येलाच दरकार ऱ्हायला नव्हता..आगुदरच दारूची आणि आता बाईची नशा त्याला चढली व्हती...ती पुढं आणि ह्यो  मागणं चालली...पर कुठं..? ती भयाण रात...तशीच ती बामणकीची मळी.. रस्त्याच्या डाव्या बाजूला खायल्या घसव्याला नदीची झुळझुळ...बेटांच्या गचपणातली भेसूर करकर...एरव्ही मॉन ढवाच शांत असणारं पाणी या काठासनं त्या काठाला डचमाळालतं..वाऱ्याचा मंद सुंकार... आणि ही जोडी आपली मंद गतीनं पुढं पुढं चालली..रस्त्याच्या खाली उतारली त्ये सरळ नदीच्या बाजूला...गोम्या आपल्या तंद्रीत टाकतोय आपली पावलं तिच्या मागून... आपण  कुठं जातोय..?कुणा संग जातोय...? कायच ठावं न्हाई....बाईन गोम्याचा हात गच्च धरलेला...दारूच्या नशेत हुल झालेला गोम्या तिच्या संगतीनं चाललेला....नदीकाठ लागला..कातळ काळा खडाक पायाबुडी लागला...थोडीशी जाणीव गोम्याला झाली..." आंग ये ये बया...नेमकं जायाचं तरी कुठं...कुठं न्यालीस मला त्ये तरी सांग बये.." दारूच्या नशेत तेवढी तरी बोलायची शानपती गोम्याला गावली म्हणायची..."आवं रावसाब इथंच ऱ्हाते नवं का मी..किती वरसापासन."

"इथं या आसल्या जाग्याला..?"

"आंग बये तुझं घर कुठाय..? तू मला नेतीस कुठं..? मला कायबी कळना बघ." भोळाभाबडा गोम्या बारक्या पोरानं प्रश्न करावा तसं इचारत व्हता.

गोम्या आसं बोलायला ती बया पाण्यात उतारली आणि एकदम बोलली...

"ते बघा तिथं वयल्या आंगच्या मॉन ढवात हाय माझं घर.." गोम्याचा पयला पाऊल पाण्यात पडायला आणि मॉन ढवात..एवढंचं शबुद ऐकायला एकंच गाठ.झार झार झार...अंगातली दारू उतारली... टकामका तिच्याकडं बघायला लागला...आता तिनं खरं रूप दावलं.बटबटीत डोळ्यातली बुबळांची निशाणीचं गायब झाल्यालं ते निव्वळ पांढुरकं डोळं... भ्यायजोगतं..

".कोण कोण तु..सोड सोड मला..."

"मी व्हय गोदा..म्हाईती न्हाई व्हय..."

 कानावर इस्वासचं बसना...दरदरून आंगाला घाम सुटला घसा कोरडा पडला...गोम्याची पुरती घाबरगुंडी उडाली...

"ये ये बये सोड सोड मला...." गोम्यानं हात झिडकारला...

"आता न्हाई मी सोडायची...मी तुम्हाला घिऊन जायला आले नवं."तीन गच्च हात पकडल्याला...नजरंचा बाण गोम्याकडं रोखून ती हासत व्हती.

                           आता तिच्या आवताराकडं बघून गोम्याला जीव गेल्यागत झालं हुतं.गोम्यानं डाव्या हातानं एक खचून बोंब मारली...ती बोंब त्या नदीकाठाला घुमत राहिली..सगळ्या रानशिवारी पसरली... पण कोण व्हतं तिथं..गोम्या आणि ती गोदा..गोदा नव्ह तिचं भूत...नदीच्या कंबरएवढ्या पाण्यात झटापट सुरू झाली...जिवाच्या अंकातांनं ओरडून बोंबलून सुटायसाठी गोम्या धडपडाय लागला...हातपाय झिंजडाय लागला..गटांगळ्या खायाय लागला...पण काय आणि कसं जीवाची दोरी घट्ट व्हती म्हणायची.. तिच्या हातातनं जो का हात निसाटला तशी एका दणक्यात गोम्यानं नदीच्या बाहेर काठावर उडी मारली...तशाच पायगतीन  म्होरं धावला...मागनं ती बया आरडत व्हती

 "थांब जातोस कुठं मला सोडून..?"

कुत्रं मागं लागल्यागत हेलपाटत त्या काळ्याकुट्ट अंधारातनं कसतरी रस्त्याला आला. नशीब म्हणायचं  पायालालगतच सायकल लागली...कशीतरी ती उचलली सरळ करून ढँग टाकली.गरारा पॅडल फिरवीत गोम्या जीवतोडून रस्ता कापू लागला...पार पार फटफजिती झाली व्हती...अंगावरची धडूती सगळी भिजली व्हती...कापरा भरल्यालं आंग नुसतं थडथडालतं..निम्मा पाण्यानं निम्मा घामानं आंग डबडबून गेलतं...आजूनबी गोदा मागं हायच आस वाटत हुतं... "जातोस कुठं आलो थांब..".हे तिचं शबुद आजुनबी त्येजा मागं लागलं हुतं...दगडाधोंड्यारनं टणाटण उड्या मारत सायकल अंधारातनं जोराची पळत हुती..

                                           पुढची वाट कशी तोडली आसल त्येज त्येला माहिती...सगळा शिवार मागं पडला नी गावची येस सुरू झाली...तरी गोम्या धापा टाकत वडून ताणून सायकल मारतच व्हता...आला आला गल्लीत आला...घरासमोर आला आणि एकदम रापदिश्यांनं घरासमुर आदळला...जोराचा आवाज झाला.नुकतंच भजन सपवून माणसं घरला निघाल्याली...आवाज कसला म्हणून ती आवाजाच्या दिशेनं धावली..तर गोम्या घरासमुर पडुन आरडालता..उभ्या अंगानं लाट लाट कापालता.धपापत्या छातीनं बोलालता.."आली आली गोदा आली वाचवा वाचवा मला.." ह्यो आवाज ऐकून सुमी पण एकदम दार उघडून बाहीर आली...माणसं भोवतीभोर येरगाटली..."आरं गोम्या काय झालं रं आसं आरडायला.?" 

"भूत...भुत... गोदाचं भुत.." त्या तंद्रीतएवढंच गोम्या बरळालता..

सुमी बाहेर आली तशी काय तरी येवजून लगीच घरात गेली..आणि  दाण दाण पाय आपटतचं बाहेर आली..टोपणासकट रिकामा डबा गोम्याच्या आंगावर भिरकावला..आणि तोंडाचा पट्टा सुरू केला.

"बघा बघा चोराच्या उलट्या बोंबा बघा...आज भांगलणीचं पैसं आणून ठेवल्यालं पाक उडाप केलं..सत्यानास केला सगळ्या पैशाचा .आणि वर दारू पिऊन ही कशी मस्ती चाललीया..."

"आरं काय झालं गोम्या...कुठंन आलाइस एवढा घाम्यावून...?" सखुआज्जानं पुसलं.

 " वरतीकडनं आलो...आन बामनकीच्या मळीला..." बोलायचं मधीच थांबला आणि.. "गोदा..गोदा...गोदाचं भुत..गोदाचं भुत.." म्हणून बरळायला लागला.पुढचं बोलायचं त्येला कायच समजना.

जे समजायचं त्ये सखुआज्जानंचं समजलं.आज आवसची रात...सुमीला ते कसं उमगणार...?

"पोरी पुरतं भ्यालंय त्ये त्येला घरात नेजा.."

सुमीला काय कळणार गोम्याची दैना...तिच्या डोक्यात तिडीकच भरल्याली गोम्याची.

"मामासाब आंगमस्ती हाय ती ...दारू जरा कमी प्यायची व्हती....प्यायची ते प्यायची आणि वर हे आसं ढवाऑग  करायचं"..

"पोरी आसू दे पयलं त्येला घरात घिऊन जा बघू.." आसं म्हणून सखुआज्जानं सुमीला जरा दटावलंच..आणि सखुआज्जा कसल्यातरी इचारात आपली वाट तुडवायला लागला.सोबतीची माणसंबी आपापल्या घराच्या वाटला लागली.

                         गोम्या गोदाच्या तावडीतनं सुटला खरं आता सुमीच्या कचाट्यात सापडला व्हता .एकयेळ ती परवाडली पर ही नको अशी गत झालती..कुठंन अवदसा सुचली...आता गोम्याचं काय खरं नव्हतं....सुमीनं गोम्याच्या रट्याला धरलं आणि टरारा वडतचं घरात नेलं..तरीबी गोम्याला वाटतंच हुतं...सुमी न्हाई गोदाचं वडत आपल्याला घरात न्यायलीया...आजूनबी आंग लाट लाट कापालतं.सुमीला त्येज कायच वाटत नव्हतं धाडकन तिनं दार लावून घेतलं.

(या कथेचा मनोरंजन हा फक्त उद्देश असून अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाही अथवा वास्तवाशी याचा काहीही संबंध नाही.)

                                               -किरण चव्हाण.

शनिवार, ८ ऑगस्ट, २०२०

'गावंदरीतलं जुळं' - किरण सुभाष चव्हाण.

    
                        'गावंदरीतलं जुळं'


                               तरीबी या गोष्टीला बारा वरसं गुदरली आसतील.. सुगी नुकतीच मागं सरल्याली.भातकापणी झाल्याली मुंडरी वावरं सगळीकडं दिसत व्हती.भवतीनं जुंधळ्याच्या धाटांचं सड आणि डुई भादरल्यासारं भाताचं मुठ मूठभर गड्ड.सारा शिवार कस मोकळा ढाकळा. आमच्या गल्लीच्या खायल्या आंगची गावंदरबी आता रिकामी झालती.बिचारीला आता सकाळ दुपार संध्याकाळ एकेक पाहुणा अवचित भेट द्यायचाचं.रस्त्याच्या खायच्या बाजूला उतरणीला चार लांबसडक टपणी.तिसऱ्या टपण्याच्या बांधाच्या तळाला चार हात रूंद अशी लांबसडक चिरुटी व्हती त्यानंतर चौथं टपण वलाडंल की,मधी आडवा थोरला बांध..बांधावर मोजून दोनच झाडं एक काट्या बाभळीचं आणि दुसरं लिंबाचं.त्याच्याखाली उरलीसुरली टपणी.थोरली जाणती लोकं या बांधाच्या खाली परसाकडं जायाची. तवा घरा घरात संडास कुठलं...?गावंदर म्हणजे त्यायेळला मोकळं व्हायचं हक्काचं ठिकाण.
                               भर उन्हाची दुपार झालती.उन्हाचा नुसता चटका मारत व्हता.आणि आसल्या वक्ती सातूतात्या टमरॅलाचा गळा पाची बोटांत पकडून आपला दाबात गावंदरीच्या दिशेनं जात व्हता. दोन टपणी वलांडून तिसऱ्या टपण्याच्या काठाला गेला आणि समोर बघून भर दिवसा त्येजा डोळ्यासमोर चांदण्या चमचमल्या.तिथंच टमरॅल भिरकावून सातूतात्या दणाट मागं....
                                   आताचं तर डोळ्याम्होरनं गेल्याला गडी लगीच मागं परातला..म्हटल्यावर पानाची उळी दाढत धरून उगाच चघळत शेड्यावर बसलेल्या शिवामानं म्होरं व्हवून विचारलं...

"आरं... सातबा काय झालं रं... आसं घाबराघुबरा का झालाईस..?"..

आता सातूतात्या काय बोलणार, त्याची पाकच बोबडी वळाल्याली.. तवर आणि चार पाचजण तेज्याभवती जमली...सातूतात्याला भर उन्हाची थंडी वाजून आल्यासारा हुडहूडा भरून आल्याला..आगुदरच भित्राभागु.नक्कीच काय तरी भानगड हाय..लोकांनी आपलं हेरलं...

"आरं बोललास तर कळल नव्ह आम्हांला...काय झालं...बोल की झाटदिश्यान.."

....आंग सारं घामेजून गेल्यालं. थरथरत्या हातानं कपाळाचा घाम पुसत सातूतात्या बोलू लागला.

"आंगा.. बोलण्यासारं काय न्हाई...खाली जाऊन बघा जावा केवढं मोठं जनावार.. लोळाय लागलंय त्ये.."

"काय बोलतुयास..कसलं जनावरं आणि कुठं.." सातूतात्यानं खायल्या बाजूला पुढा केला तसा शिवामानं एक लालभडक पिंक चिकाच्या कुपावर मारत...खायल्या अंगावर नदार टाकली.

सातूतात्यानं खूण दावली तशी समद्यानी खाली धाव घेतली.आणि तिसऱ्या टपण्याच्या टोकाला यायला सगळ्याचं पाय जागच्या जागी थांबलं.बघत्यात तर काय.?मधल्या चिरुटीत चांगलं धा फूट लांबसडक.अशी एकाला दोन सापांचं जुळं....एकमेकात येटोळ घालून आपल्याच नादात दंग व्हती....पायाच्या पेंढरी एवढं जाड.लोदाच्या लोदा..आंगाला तांबट काळसर रंग, तळाला पसरट आणि टापला निमुळता होत गेलेला त्रिकोणी आकार.. मधशीर उठून दिसावी अशी भांगलनीच्या खुरप्यासारी खरबुड धार...असं सरसरून कंबरजोगतं उभा ऱ्हायाचं... एकमेकांच्या आंगाला पीळ द्यायचं...काय हालत हुतं... डुलत व्हतं..डोळ्याचं पारणं फिटावं असं दिसतं व्हतं.

"आरं बाबा...बाबा...सातू म्हंतोय ते खरंच की...दांडगंच हाय की गां  ह्ये..."

"आसलं तसलं न्हाई..बघ तरी फडीवर आकडा हाय.."

"आशील नाग आणि नागीण हाय ती..."

"बाप रे...बाप" नाम्याला स्वर्गातला बाप आठीवला.

तवर गल्लीतलं येणारं जाणारं माणसांचं भिरंच्या भिरं गावंदरीत बघायला जमा झालं..नाक गळकी शेंबडी पोरंबी टाचा उच करून बघायला लागली.तसं शिवामानं त्यासनी हाकलून लावायचा..

"ये..ये...कार्ट्यानों जाताईसा का तिकडं...इथं काय नाचगाणं चाललंय व्हय रं पळताईसा इथनं.."

तशी पोरं बांध चढून रस्त्याला जायची परत नजर चुकवून खाली यायची.घोळका करून एकमेकाला हळूच म्हणायची "केवढा मोठा साप हाय बाबान्या" आणि बोलून आबदार दातानं जीभ चावायची.

केरुनाना मध्येच बोलला..."आगा शिवूदा एवढं मोठं जनावार कधी जलमात बघितलं नसल बघ.."

"व्हय की एवढ्या माणसांच्या वस्तीकाठाला कुठून आलं आसल बघ की ब्येनं...."

"ते पण हाय...आन आसं जुळं कधी बघायला मिळतंय व्हय..." 

" लोकं म्हणत्यात म्हण आसं जुळं कधी बघायचं नसतंय घरादाराला वाईट आसतय म्हण त्ये..आपशकून व्हतोय म्हंत्यांत"...दत्तबा धीरगंभीर बोलला...

"मग रं आता...काय करायचं...?" .

तसा शिवामा पुढं बोलला..."मी ऐकल्यालं आसं जुळं कधी दिसलं तर तेजावर लाल फडकं तरी टाकायचं येक, न्हाई तर..."

"न्हाई तर काय..?" 

"न्हाई तर दोघास्नीबी जीतं सोडायचं न्हाई.."

"आरं मग इचार कसला करताईसा...त्यात आमची पोरटारं इथं गावंदरीतच खेळत्यात नवं..." केरुनाना जरा जोर लावूनच बोलला.

तसा मागचा पुढचा इचार न करता 

"घ्या...घ्या...काठी घ्या...हाणा मारा.." 

लोकांच्या गर्दीतनं एकच सूर उमटला आणि सगळा गोंधळ उडाला...तसा शिवामा हळूच दमात बोलला..
"आरं आरं दमा...कालवा करू नगसा जनावार बुजल की.." 

पण कोण ऐकून घेतोय आणि कुणाच्या छातीत एवढा दम व्हता पुढं जायाचा..जो तो बोलायचा भले धा हात मागं सरकून...माणसं नुसती बोलायची आणि तिथंच वळवळायची..

तितक्यात शिवामा बोलला..."आता एकच गडी हाय... हे काम करावं तर म्हारतुमानच.." 

तसा गर्दीनं एकादमात होकार भरला...

"व्हय व्हय त्येलाच बलवायला पायजे.."

"संप्या पळ लवकर म्हारतुमा घरातच आसल बघ लवकर ये म्हणावं आणि येताना हातातनं टोणा घेऊनचं ये म्हणावं.."

शिवामान त्याला पिटाळून लावला...एवढ्या साऱ्या गर्दीच्या गोंधळानं त्ये मुकजनावार बिथरलं असावं खायच्या चिरुटीत कवाधरनं एकमेकाला बिलगल्याली ती जोडी फुटली...त्यातला एक साप लोकांच्या नजरंसमोरच चपळाईन सळसळत त्याच टपण्याच्या कोनाड्यात असलेल्या बेटाच्या बुडक्याच्या बिळात शिरला...पण दुसरा मात्र भला दांडगा साप तिथंच जाग्याला वळवळत व्हता...सोताच आंग जड झाल्यागत त्येला पुढं सरकायलाच इना झालंतं.डोळं पांढरंफिट दिसत व्हतं.

      "चांगलंचं कातीला आलंय"
गर्दीतनं आसं माणसं कायबाय बोलत व्हती.
                         पयल्या बॉनीची ढोसून आडभीतीला चांगला तनगा लावल्याला म्हारतुमा उठून सदा हातात बाळीगत्याला नेटका टोणका घेऊन हालत डुलत आला.ह्यो म्हारुतमा म्हंजी जगावेगळा माणूस दगडाच्या काळजाचा..एकदा गल्लीत एक पाळीव कुत्रं पिसाळल्यालं कुत्र्याच्या मालकांनं म्हारतुमाला दारूला पैसं दिलं आणि कुत्र्याची वाटाघाट लावायला सांगितली...म्हारतुमानं धिटाईन कुत्र्याच्या गळ्यात दोरी आडीकली आणि अंधार पडायला कुत्र्याला वडत वयल्या डागला नेलं आणि त्याच्या डोक्यात सोटका घालून त्येला ठार मारलं...कधी कधी शिवारात धनगराच्या कळपातलं बकरं मान मुरगाळून गप करायचा आणि कवा बिनपत्या घरला आणायचा.. आसला हा म्हारतुमा...

आला साऱ्या गर्दीच्या तोंडाला आला... पुढ्यात वाट आडवावी तसं ते जनावार जागच्या जाग्याला पडून व्हतं..

गर्दीतन कुणीतरी म्हारमाला उकसावलं.

"म्हारतुमा हाण... बरोबर कात्रीत सापडलंय बघ."

तसा त्येलाबी चेव चढला..म्हारतुमा वावंभर पुढं झाला. हातातला टोण्याचा मागं पाठीला वळंबा केला...मुठी आवळल्या आणि वाऱ्याच्या वेगानं पयलाच पेट टाकला तो सरळ सरळ पाठीच्या कनोट्यातच...तो मुका जीव कळवळला..एकदा डाव्या एकदा उजव्या बाजूला हेलकावं देऊ लागला...भाकरीएवढी फडी काढली...काय वाटलं आसल त्या मुक्या जीवाला आतल्या आत... एवढ्या उन्हाच्या रकात...पाठीवर रगात फुटायजोगता घाव बसल्याला..

लोकं म्हणायची बिळात शिरल्याली ती नागीन आणि ह्यो नाग...बेटाच्या बुडक्यातल्या बिळातन जिभल्या चाटत ती हळूच मुंडकं काढून बघत व्हती...

समोरच तिच्या प्रियकराला ही लोकं आस्मान दाखवत व्हती.

तवर मधी कुणी शानपती केलीच..

."आगा म्हारतुमा...मधी कुठं... डोक्यात हाण की एका दमातच कसा जीव सोडतंय बघ..."

                           तसा कुठंतरी अंगावर येणाऱ्या शत्रूवर तलवारबाजी करावी तसं रागानं फडी काढलेल्या त्याच्या डोक्यावर पेटात पेट टोण्याचं तीन चार तडाख हाणलं...तसं त्या भुईवर त्याचं डोकं चिंदाललं..जिवाच्या आकांतानं कळवला.. कळवला तो बिचारा मुका जीव...पार अंगाची त्यानं तिरपिट केली...जाग्यालाच दोन तीन पलट्या खाल्या.मगाशी जड झाल्यालं आंग आता कसंच काय हालवालतं... उसाचं चिपाड व्हावं तशी तोंडाची गत झाल्याली...लालभडक रक्ताचा सडा तापलेल्या मातीवर भोवतीभर शिपल्याला..म्हारतुमाच्या हातातल्या टोण्याचा शेंडा ताज्या ताज्या रगतानं पाघळत व्हता..शेपटीत तेवढा जीव व्हता कायसा...नुसती इकडं तिकडं घोळसत व्हती...ती बी हळूहळू शांत झाली...मुका जीव निपचित पडला.गतप्राण झाला. तसा इकडं माणसांच्या गर्दीला विजयाचा आनंद झाला.

'है शाबास...' गर्दीतला प्रत्येकजण म्हारतुमाला शाबासकी दित व्हता...बुडक्याच्या सांदरीतल्या बिळातनं जिभल्या चाटत ती नागीण अजूनबी डोकावत व्हतीच...जिवंत असताना धा फुटावरनं बघणारी गर्दी आता गपघार झाल्याल्या त्या नागाभवती जमून तोंडात बोटं घालून अगदी जवळून निरखत व्हती..
                         नाग मारला आता राहिली नागीण..लिंबाच्या सोबतीला असल्यालं त्ये मेसकाटींचं बेट...  दहा बारा मेसकाटींचा त्यो बुडका..लिंबाच्या अन मेसकाटीच्या वाळ्या पानांचा खच अवतीभवती पडल्याला.. तळाला दोन तीन बिळं व्हती. आता लोकांचा मोर्चा म्हारतुमाला पुढं करून या बुडक्याकडं वळाला.पण एकदा का ती बिळातली नागीण आत कुठं सराकली ती पुन्ह्यांदा तिनं तोंड दाखवलंच न्हाई...काय काय खटपटी केल्या खरं ती काय बाहीर आलीच न्हाई...कुणी हातात लांब लोखंडी तारनं घेऊन आत खोचकायचा कुणी रकेल बिळाच्या तोंडातनं आत वतायचा.. तर कोण बिळाच्या तोंडाला डिवळायचा...सगळं उपाय करून बघितलं खरं आतली नागीण काय बाहीर यायला तयारच न्हाई...मारायचं तर दोघास्नीबी मारायचं ठरल्यालं...पण आता काय करायचं...प्रश्न पडला..तसा शिवामा बोलला "आरं ये पोरांनू तुम्हीं इथं थांबू नगसा जावा आणि गल्लीतन एकदोन एकदोन शिणी गोळा करा जावा त्या मुडत्या सापाला आगीन तरी देऊया.."

दोघबी तडाख्याला गावतील वाटल्यालं पण...
सगळ्यांचा हिरमुस झाला त्यात मनात नवीनच शंका इत व्हती ती येगळीच..

पोरांनी आपलं काम चोख पार पाडलं चांगलं डालगंभर शेणी जमा केल्या....जाणत्या माणसांनी वयल्या टपण्यात माणसाचं सराण रचत्यात तशा शेणी रचल्या त्यावर त्या मेलेल्या सापाचा लोळागोळा घातला इकडच्या तिकडच्या काटक्याकुटक्या गोळा करून घातल्या आणि कलत्या उन्हाला इकडं दहीन दिली..शेवटचा एक डाव म्हणून चार पाच शेणीची पेटती खांडं त्या बेटाच्या बुडक्याला टाकून धुमी केली पण शेवटी काय बिळातली नागीण बाहीर आली न्हाई...ह्यो सगळा कारभार आटोपायला सांजवकोत झाला. 
                        सगळी माणसं वर येऊन शिवामाच्या घरासमोर जमली...सगळ्यांच्या मनात एकच पाल चुकचुकत व्हती... आपण जोडी फोडली...एकाला मारलं नि एक वाचलं...मारल्याला नाग हाय आणि वाचल्याली नागीण...आता ती काय गप बसणार न्हाई...ती आपला माग काढून बदला घेणार...म्हणून सगळ्या माणसांनी हे पातक एकट्या म्हारतुमावर ढकललं... माणसांनी आपापसांत एक निर्णय घेतला आणि म्हारतुमाला पुढ्यात घेऊन साऱ्यांच्यावतीनं शिवामा बोलू लागला..."म्हारतुमा...घडलं ते इपरितच घडलं म्हणायचं.आम्हांला वाटलं दोन्हींबी गावतील तावडीला पण एक गावलं नि एक निसाटलं...झालं ते बराबर न्हाय...नागाला मारलं की म्हण नागीण डुख धरतीया..जीवच घेतीया..तवा बरंवाईट काय नगो तु आपलं आता असं कर...आम्ही सगळ्यानी मिळून ठरवलंय.तुला आम्ही पैसं काढून देतो तु आताच्या आता वाघापूर गाठायचं..देवाचा भंडारा ल्यायचा... चुकी झाली म्हणायची आणि देवळातच वस्ती करायची...म्हंजी मग जीवाला घोर न्हाई.."

"व्हय व्हय...शिवा म्हतोय ते खरं हाय...म्हारतुमा तु आपला आताच्या आता निघ बघू.." बोलतच केरुनानानं बंडीच्या आत हात घातला आणि  धा ची नोट काढून म्हारतुमाच्या हातावर ठिवली. तसं सगळ्यांनीच धा-पाच..धा-पाच रुपये म्हारतुमाच्या हातावर ठेवलं...निष्पाप जीवाचा बळी घेतल्याली ती सुपारीचं जणू प्रत्येकजण त्याच्या हातावर ठेवत होता...घडल्या पापाचं खापर त्याच्या डोक्यावर फोडून जो तो हात झटकून मोकळा होत होता.
                          म्हारतुमापण काय कमी हुशार नव्हता...अंधाराची गाठ पडायला म्हारतुमा चालला.आणि गल्लीन निःश्वास सोडला.म्हारतुमा चांगल्या खुशीत झपाझप पाऊल टाकीत व्हता.कधी नव्ह ती पैशांची एवढी बेजमी झाली व्हती. खिशाला कधी एवढ्या पैशांची सवय नव्हती पावलागणिक नुसता खिसा खुळखुळत व्हता.बायकोसंग हुज्जत घालून कवातरी एखादी पाच ची नोट हातात पडायची त्येबी ती शिव्यांनी  वसूल करून घ्यायची.दुधाची तान ताकावर भागायची..पर आता जिथं तान भागायची तिथपर्यंतच म्हारतुमानं धाव घेतली.दारूच्या गुत्त्याबशी पावलं आपोआपच थबकली...तिथनच देवाला नमस्कार केला..आणि गड्यानं वाट वाकडी केली...दारूच्या गुत्त्याची वाट धरली...आज म्हारतुमाची चंगळच व्हती..पायजेल तेवढी दारू प्यायची मनानं पक्कंच केल्यालं.आज म्हणायची खरी हाऊस फिटली..मनाजोगती दारूची तलप भागली...बराच वकोत म्हारतुमा दारू ढोसत बसला.आणि सारी गल्ली सामसूम झाल्यावं मध्यान रातीला घरात येऊन निजला.दुसऱ्या दिवशी गल्लीला माहिती पडलं.म्हारतुमा वाघापूरला गेलाच न्हाई...तवा ज्येला त्येला वाटू लागलं आता म्हारतुमाचं काय खरं न्हाई.
                              पण आज बारा वरसं गुदरली या गोष्टीला.म्हारतुमाच्या घरात ना दारात ती नागीण राहू द्या साधं साप-किरडूबी नजरला पडलं न्हाई.म्हारतुमा रानाशिवारातनं नदीवताडातनं कुठं कुठं फिरला पण साधा इचु चावल्याला आजतागायत माहिती न्हाई.गल्लीला वाटत व्हतं..माग राहिल्याली नागीण बदला घिल...हातात टोणा घेऊन जीव घेणारा म्हारतुमा जसा दोषी व्हता तसा हाणा मारा..म्हणणारा तिथला प्रत्येकजण दोषी व्हता जो की स्वतःला निर्दोषचं समजत व्हता..खरं तर व्हायचं असतं तर कुणाचंबी बरं वाईट झालं असतं... पण तसं काय झालं न्हाई...नुसती लोकं म्हत्यांत म्हणं..पण ती कुठली लोकं... ती काय कुणाला आजून ठाव झाली नाहीत...आणि कधी व्हणारबी न्हाईत...पण एक खरं हाय...त्ये बिचारं मुकं जनावार  कुणाच्या वाटला जाईत न्हाई याचा इस्वास पटला खरा पर अशा माणसाचा इस्वास कसा धरायचा..? देवळात मुर्तीचा...नागपंचमीला मातीचा नाग पूजायचा आणि  इकडं मातूर जिवंत नाग दिसला रं दिसला की ठेचायचा...'जुळं दिसलं की आपशकुन व्हतोय...साप म्हणं डुख धरतोय आणि बदला घेतोय असं लोकं म्हंत्यात म्हणं.' माणसाच्या मनातला ह्यो आंधळा इस्वास कधी जायाचा कधी सुधारायची माणसं..? आवं ते मुक जनावार कधी आपल्या वाटला आलं नव्हतं आणि येणारबी नव्हतं पण त्याच्या वाटला जाऊन त्याचीच यांनी वाट लावली.. जिवाभावाची जोडी फोडली...कायमची ताटातुटी केली...मुक्या जीवाचा हाकनाक बळी दिला.. त्या लोकांच्या निंदनीय करामतीची ती मुकी गावंदर आजही साक्ष देते..गल्ली खायच्या गावंदरीत पाय ठेवला की सगळं कसं ध्यानी मनी येतं आणि आपसूकच गावंदरीतलं ते जुळं नजरला उभं राहतं.

----------------------------------------------------------
                                     - किरण सुभाष चव्हाण.
                                       ८८०६७३७५२८.

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

श्री.जनार्दन बोटे यांच्या जीवनकार्याचा आढावा...

'बँकिंग क्षेत्रातील ४१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून आदरणीय श्री.जनार्दन बोटे साहेब आज रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला हा आढावा...'
            

                      
                         कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पांगिरे या छोट्याशा गावी श्री. महादेव जोतिबा बोटे व सोनाबाई उर्फ गयाबाई महादेव बोटे या पुण्याशील दांपत्याच्या पोटी जनार्दन बोटे यांचा १५ जुलै १९६२ रोजी पांगिरे येथे जन्म झाला.एक भाऊ व बहीण अशी ही मिळून तीन भावंडं. वडील मुबंईला गिरणी कामगार म्हणून कामाला.तुटपुंजा पगार.आई गावी शेतमजूरी करायची.घरची हालाखीची परिस्थिती. गरिबी तर पाचवीलाच पुजलेली.जनार्दन बोटे यांचे प्राथमिक शिक्षण पहिली ते तिसरी पर्यंत पांगिरे या गावी झाले.आणि मग त्यानंतर ४ थी इयत्तेपासून मुंबईत शिक्षण सुरू झाले.उपजतच हुशार,चुणचुणीत असलेले बोटे साहेब प्रत्येक इयत्तेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.त्यानंतर ८ पासून १० पर्यंत नावाजलेल्या शारदा आश्रम विद्या मंदिर दादर या शाळेत शिक्षणासाठी दाखल झाले.कुशाग्र बुद्धिमत्ता,अभ्यासातली आवड,सुदंर हस्ताक्षर असा हा गुणी मुलगा आपसूकच शिक्षकांच्या हृदयात भरला. म्हणून तर शाळेतील कोणत्याही कार्यक्रमानिमित्त सुदंर हस्ताक्षरात फलकलेखन करण्यास हक्काने शिक्षक त्यांनाच सांगायचे.या शाळेत शिकत असताना शेवटपर्यंत अगदी आवडीने हे काम करीत राहिले.शिक्षकांचा असा हा आवडता विद्यार्थी शाळेतील तब्बल ३००० विद्यार्थ्यांमधुन त्या काळी आदर्श विद्यार्थी म्हणून निवडला गेला.विशेषतः शाळेत ब्राम्हण विद्यार्थ्यांची संख्या अधिक त्यातून एखाद्या सामान्य घरातील विद्यार्थ्याला हा मान मिळणे ही असामान्य गोष्ट होती.
                दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरच्या परिस्थितीच्या असहायतेमुळे शिकण्याची इच्छा असताना  नाईलाजास्तव जि.टी. पारसिक बँक ठाणे इथे १९७९ साली शिपाई या पदावर काम करण्यास सुरुवात केली.पण शिकण्याची प्रखर जिद्द उर्मी मनात काही स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून ११ व १२ वीचे शिक्षण रात्रीच्या (नाईट कॉलेज)मधून पूर्ण केले.त्यानंतर (बी.कॉम) पदवीचे तीन वर्षांचे शिक्षण मॉर्निंग कॉलेजमधून पूर्ण केले.शिकण्याची ही तळमळ पाहून आईवडिलांचे प्रोत्साहन तर होतेच पण पारसिक बँकेचे चेअरमन कैलासवासी गोपीनाथ शिवराम पाटील व्हा.चेअरमन श्री. नारायण गजानन गावण यांनी पुढे शिकण्यासाठी प्रेरणा दिली ,सहकार्य केले.म्हणून तर ही ऊर्जा घेऊन बँकिंग क्षेत्रातील विविध पदव्या ते घेत गेले.
             पंखात बळ भरलं की भरारी घ्यायला आकाश ठेंगनं पडतं तसं जिद्दीने पूर्ण केलेल्या शिक्षणाच्या बळावर एक उदात्त ध्येय...एक मोठं स्वप्न..साकारायचं होतं.आणि मग सुरू झाला त्या ध्येयाप्रद प्रवास.. शिपाई या पदावरून झेप घेत पहिल्यांदा  .ज्युनि.क्लार्क, सिनि.क्लार्क..ज्युनि.ऑफिसर..सिनि. ऑफिसर,पुढे चीफ मॅनेजर, असि. जनरल मॅनेजर,डेप्युुडी जनरल मॅनेजर आणि शेवटी मग जनरल मॅनेजर अशी त्यांच्या बँकिंग क्षेत्रातील कारकीर्द बहरत गेली.
                आपल्या सेवेच्या काळात त्यांनी अतिशय प्रमाणिकपणे आपल्या कार्याप्रति स्वतःला वाहून घेऊन काम केले. विशेषतः ते सरकारमान्य वसुली अधिकारी म्हणून आपले कर्तव्य उत्तमप्रकारे पार पाडत राहिले.याचा परिणाम म्हणजे त्यांच्या काळात बँकेचा रिकव्हरी रेट उत्तम राहिला.पारसिक बँकेला जनार्दन बोटेंच्या माध्यमातून असा सारथी लाभला ज्यामुळे त्यांच्या काळात बँकेची डेव्हलपमेंट चांगल्याप्रकारे होत राहिली.महाराष्ट्रभर तसेच गोव्यापर्यंत या बँकेच्या शाखा विखुरल्या आहेत.बँकेचे हे सारथ्य पार पाडत असताना  आपल्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य देत रात्रंदिवस फक्त एकच ध्यास आपल्या बँकेची वाढ..वृद्धी..विकास आणि विस्तार..आणि हे करत असताना त्यांनी नेहमी आपल्या सहकार्यांना विश्वासात घेऊन टीम वर्क पद्धतीने काम करीत राहिले.बँकेतील कर्मचाऱ्यांशी त्यांचे असे नाते म्हणजे की बँक म्हणजे एकप्रकारे आपले कुटुंबच.तिथला प्रत्येक कर्मचारी हा आपला जिवाभावाचा सोबती सहकारी..प्रत्येकाशी प्रेमाने आदराने वागून प्रत्येकाला प्रेरणा प्रोत्साहन देत पुढे जात त्यांनी आपल्या कारकिर्दीत अधिकारी..सहकारी..कर्मचारी.. ग्राहक यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे वलय निर्माण केले..हे सर्व करत असताना त्यांनी एक तत्व प्रमाण मानले की,बँकेने आपल्याला मोठे केले त्या बँकेला आपण मोठे करणार आणि या जाणिवेतून ते अव्याहतपणे काम करीत राहिले.आज पारसिक बँक एक नावाजलेली विश्वासार्ह अशी अग्रणी बँक आहे.
'इवलेसे रोप लावियेलें दारी त्याचा वेलू गेला उंच गगनावरी.'
श्री.जनार्दन बोटे व पारसिक बँक कधी काळी हे छोटं असणारं नाव आज खूप मोठं झालंय.नावारूपाला आलंय.
आज ते ४१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून जनरल मॅनेजर या पदावरून सेवानिवृत्त होत असताना
एखाद्या आईला आपलं लेकरू पारख व्हावं तसा या मायलेकरांच्या ताटातुटीचा आजचा दिवस आहे.तस कोवळ्या वयात तिच्या पदरात दाखल झालेलं हे लेकरू तिच्याच पदरात मोठं झालं तिची सेवा करू लागलं... आणि सेवा करता करता या आईचा उपकाराची परतफेड म्हणून तिला नावारूपाला आणलं.या मायरुपी पारसिक बँकेनेही बोटे साहेबांना खूप काही दिलं.. जन्माची भाकरी दिली मान,सन्मान, प्रतिष्ठा...जे काही नव्हतं ते सारं काही दिलं.आज आपल्या कर्तव्याच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण केलं.कधी काळी हक्काचं घर नव्हतं आज मुंबईसारख्या शहरात आणि कोल्हापूर या ठिकाणी दोन फ्लॅट आहेत.मुलगा आज डिप्लोमा इंजिनिअरचे शिक्षण पूर्ण करून मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करतो.आणि हे सर्व करत असताना जसं म्हटलं जातं एखाद्या कर्तबगार पुरुषामागे एक स्त्री उभी असते तशी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.रंजना बोटे यांची त्यांना मोलाची साथ मिळत गेली.
                     नोकरीच्या निमित्ताने जरी बोटेसाहेब बाहेर असले तरी गावच्या मातीशी त्यांची नाळ अजूनही अतुट आहे.अशी बरीच मंडळी हवेत नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने गाव सोडून गेली आणि शेवटी गावच विसरून गेली पण बोटे साहेब त्याला अपवाद आहेत.गावच्या मातीशी..माणसांशी अजूनही त्यांचे मायेचे नाते कटिबद्ध आहे खरं तर या संस्कारांची प्रेरणा त्यांना वडिलांपासून मिळाली.वडिलांना गावच्या मातीची प्रचंड ओढ..गावची माणसं म्हणजे त्यांच्या मनातील हळवा कोपरा.सतत त्यांचे मन गावाकडे धाव घेई.वडील दत्तगुरुंचे निस्सीम भक्त त्यामुळे बोटे साहेबानी २०१० सालापासून गावात दत्त जयंतीची प्रथा पुनर्जीवित केली.आजही दरवर्षीच्या दत्तजयंतीला जतिनिशी हजर राहून आपली सेवा बजावत असतात.संपूर्ण गावाला महाप्रसाद देतात.
                       आपल्या गावातील नवीन पिढी शिकावी मोठी व्हावी यासाठी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी त्यांना प्रेरणा द्यावी,गावातील हुशार गुणवंत विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद सारख्या विभूतींची पुस्तके भेट देऊन त्यांचा सत्कार करणे ही संकल्पना त्यांनी गावी रुजवायला सुरुवात केली.
अजूनही गावचा विकास..प्रगती यासाठी काही करण्याची त्यांची मनिच्छा आहे. १९९३ साली स्वप्रयत्नातुन पतसंस्था काढली आहे.आज त्याच्या दोन शाखा आणि वार्षिक ८ ते १० कोटींची उलाढाल आहे.
एका गरीब आईबापाच्या पोटी जन्म घेऊन या तिन्हीं भावंडांनी आपल्या मायबापाची कुस उजवली आहे.
आज जनरल मॅनेजर पदावरून निवृत्त होणारे जनार्दन बोटे साहेब त्यांची. एक बहीण मुंबईतील एका शाळेत मुख्याध्यापिका म्हणून तर भाऊ व्यावसायिक आहे.
पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रैलोकी झेंडा.
कन्या व्हावी ऐसी संत मीरा,मुक्ताबाई जैसी.
                        पोटाला अशी लेकरं जन्माला यावीत आज ते पुण्यवंत आईवडील हयात नाहीत पण हयात असताना याची देही याची डोळा आपल्या लेकरांची ही कर्तबगारी त्यांनी पाहिली आहे.मातृपितृभक्त या मुलांनी त्यांची अखेरपर्यंत चांगली सेवा केली.जन्माचे पांग फिटलेल्या त्या मातापित्यानि अपार समाधानाने डोळे मिटले.धन्य...धन्य ते माता पिता.
                 एखाद्या गावखेड्यात गरीब आईबापाच्या पोटी जन्म घेऊन शिक्षणाच्या बळावर प्रचंड जिद्द चिकाटी मेहनत घेऊन एखाद्या शिपाई पदावरून एका प्रतिष्ठित बँकेचा जनरल या बँकेचा जनरल मॅनेजर या पदापर्यंत खूप मोठी भरारी घेणं.. ही खरंच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे.आपल्या कर्तबगारीने बोटे साहेब खरंच आपण आईवडीलांचे,गावचे आपल्या बँकेचे नाव रोशन केले... 'याची केला होता हट्टाहास.' याप्रमाणे जीवनातले असे एक भव्य दिव्य उज्वल उदात्त ध्येय..एक स्वप्न साकार केलात.आणि आज आपण ४१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून मुक्त होता आहात पण.. आज असंख्य जणांची आपण प्रेरणा आहात... कसं शिकावं कसं जगावं..आणि कसं मोठं व्हावं याचं प्रत्येकासाठी मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आपण आहात...आज जरी बँकिंग क्षेत्रातील सेवेतून निवृत्त होणार असला तरी समाजसेवारुपी कार्यात प्रवृत्त होणार हे निश्चित..एक आदर्शवत..निष्कलंक..निर्विवाद..कार्यसेवेतून निवृत्त होत आहात याबद्दल प्रथमतः आपले आपल्याला मोलाची साथ देणारे आपले कुटूंब व आपला सहकारी परिवार आपणा सर्वांचे खूप खूप अभिनंदन... आपले पुढील आयुष्य सुख शांती समाधान..भरभराटीचे जावो... तुमच्या संपूर्ण ईच्छा सफल होवो.. जे जे तुम्हांस हवे ते ते मिळो...
हीच परमेश्वर चरणी प्रार्थना...जय गुरुदेव दत्त.

जय हो... मंगल हो..
----------------------------------------------- 
                       - किरण चव्हाण.(पांगिरे)
                        ८८०६७३७५२८.

शुक्रवार, १७ जुलै, २०२०

जात्यावरच्या ओव्या...किरण चव्हाण.


पहाटेच्या शांत समयी...दिव्याच्या मंद तांबूस उजेडात... जात्यावर दळण दळणारी माय... जात्याची कर्णमधुर घरघर...आणि मायेच्या गोड गळ्यातील मंजुळ ओव्या...नितांत सुंदर.



                             'जात्यावरच्या ओव्या'


पहाटंच्या ओव्या गात जात्यावं दळीते |
रामाधरमाच्या गं पारी गणगोत मांडीते ||
कीर्ती जगी बाई त्यांची  सांगिते |
ऐकायाला ये रं बा तू पंढरीच्या विठ्ठला ||


पहिली माझी ओवी गं प्रभू रामचंद्राला |
सीतामाई शोधासाठी वणवण फिरला ||
घेऊनिया वानरसेना सेतू सागरी बांधीला |
माथा टेकवितो बाई ऐशा पतिराजाला ||


दुसरी माझी ओवी गं किती गुण गाऊ गं |
पती सत्यवानाचा जीव घेऊन आली गं ||
पत्नीधर्म पाळावा कसा गं बाईन |
पतिव्रता सावित्री जशी गेली होऊन ||


तिसरे माझे वंदन थोर आई बापाला |
पुण्याईचे फळ आले संत त्यांच्या पोटाला ||
निवृत्ती-ज्ञानेश्वर...सोपान-मुक्ताई |
भक्तिभाव ज्ञान अवघ्या जगाची माऊली ||


चौथे माझे नमन जिजाऊ बाईला |
पुत्र असा घडविला शोभे राजा प्रजेला ||
शूरवीर घेऊन शत्रुसंगे लढून |
शिवबाने बांधले गं स्वराज्याचे तोरण ||


सावित्रीबाई माझी सरस्वती ज्ञानाची |
शिक्षणाची गंगा तिने घरोघरी आणिली ||
तिच्यामुळे बाई माझ्या लेकीबाळी शिकल्या |थोरमोठ्या जाहल्या नावारूपाला आल्या ||


गांधी जैशा महात्म्यांनी शहाणे केले देशाला |
फुले,शाहू,आंबेडकर समानतेचा मंत्र दिला ||
किती ज्ञानी किती गुणी काय कीर्ती वर्णू मी |
अशा संत,विभूतींनी पावन झाली गं भूमी. ||


शेवटची ओवी माझी स्वातंत्र्याच्या लढ्याला |
देऊनिया बलिदान मुक्त केले देशाला ||
लढले झगडले स्वातंत्र्य मिळाया |
नमस्कार सदा माझा त्यांच्या वीर स्मृतीला ||
  
                                    - किरण चव्हाण.
                                   

शुक्रवार, १० जुलै, २०२०

बायोडाटा.-किरण सुभाष चव्हाण.

  !!श्री. गणेशाय नमः!!


नाव - किरण सुभाष चव्हाण.

जन्म - १०/०९/१९९०

जन्मस्थळ - पांगिरे.

जन्मवेळ - सोमवारी पहाटे ५ वाजता 

जात - हिंदू-चांभार.

शिक्षण - MA.D.Ed.B.Ed (English)

नोकरी - सहायक शिक्षक.(पर्मनंट)
शाळा - माध्यमिक विद्यालय आरदाळ
ता- आजरा, जि- कोल्हापूर.

आवड - लेखन,वाचन,संगीत.
---------------------------------------------------
                          कौटुंबिक माहिती.

वडील - कै.श्री.सुभाष रामचंद्र चव्हाण.

आई - श्रीमती. फुलाबाई सुभाष चव्हाण.

बहिणी - दोन (विवाहित.)

भाऊ - नाही.

पाहू
णे - जाधव,यादव,सूर्यवंशी,माने.

घरचा पत्ता - रा-पांगिरे, ता-भुदरगड, जि-कोल्हापूर.

संपर्क : ८८०६७३७५२८,९२७१७७५४७७.

Kiran Chavan Follow on : Facebook 

/ You tube Channel  - Search by Kiran Chavan

अधिक माहितीसाठी : https://kiranchavanpangire.blogspot.com/2020/07/blog-post_9.html
------------------------------------------------------
संपर्क : ८८०६७३७५२८,९२७१७७५४७७.

गुरुवार, ९ जुलै, २०२०

किरण चव्हाण यांच्याविषयी थोडक्यात......

        

               किरण चव्हाण यांच्याविषयी थोडक्यात...
---------------------------------------------------------------------

                          आई                बाबा
                                    
                                             


           जन्मासी घातलें तुम्हीं मायबापा |
           जपिले फोडाप्रमाणे तळहाता ||
                अपार कष्टसायास झेलीले |
 तरी जीवन ऐसें घडविले  ||
शब्दे अपुरेच पडतील |
काय सांगू तुमची गाथा  ||
चरणांवरी आपुल्या सदैव  |
टेकवितो माझा माथा ||
नाही ऋणातूनी या उतराई  |
अवघे जीवन हे तुमचे ठायी ||

गुरुदेव

                 धन्य झालो बा पांडुरंगा |
     भेट झाली तुझिया स्वरूपा||
अद्वैतची झालो ठायी |
ही सारी तुझीच कृपा ||
भाग्य उदयास आले  |
सुखाचे सुख लाभले ||
जन्मींचे पुण्य फळले
सार्थक झाला हा जन्म पुरता||
शोध नाही गा आता |
मज माझा गुरू भेटला ||
हृदयाचा गाभारा उजळला |
परमेश्वररुपी इंद्र मज सापडला ||


नाव - किरण सुभाष चव्हाण.
        रा - पांगिरे ता- भुदरगड जि-कोल्हापूर.
नोकरी - सहा.शिक्षक माध्यमिक विद्यालय आर्दाळ.
            ता - आजरा, जि-कोल्हापूर.
   मोबा - ८८०६७३७५२८.

Kiran chavan you tube channel .

--------------------------------------------

                           साहित्य

गुरुवर्य इंद्रजीत देशमुख (काकाजी) व गुरुवर्य श्री.सदानंद पुंडपाळ सर यांच्याहस्ते २५ ऑगस्ट २०१७ ला 'नदीकाठचा संसार ' आणि 'लढा-दोन कर्तृत्ववान मुलींचा' या दोन पुस्तकांचे प्रकाशन.





पुस्तक प्रकाशनाची बातमी पहा खालील लिंकवर क्लिक करा.

तिसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन :

आजच्या शिक्षणक्षेत्रातील विदारक सत्य असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते पुणे शिक्षक मतदार संघाचे विद्यमान शिक्षक आमदार जयंत आसगावर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पार पडला.




पुस्तक प्रकाशनाची Tv9 वर आलेली बातमी.





'साहित्य चळवळ -गांवशिवार साहित्य परिवार गारगोटी या संस्थेचा 'लढा-दोन कर्तृत्ववान मुलींचा' या साहित्यकृतीस विशेष पुरस्कार.'



ग्रामीण कथासंग्रह 'नदीकाठचा संसार आणि बालकादंबरी 'लढा...दोन कर्तृत्ववान मुलींचा' या पुस्तकांची महाराष्ट्र राज्य ग्रंथ समितीच्या शासनमान्य ग्रंथ यादीत निवड.



लेखक शिक्षकांच्या संवेदनशील अनुभवातून साकारलेल्या कथांचा विश्वास सुतार संपादित नाळ कथासंग्रहात समाविष्ट माझी कथा 'चित्र पुसलं आणि...' याबद्दल महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री मा.सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याहस्ते लेखक सन्मान स्वीकारताना..



'मुलांच्या लेखन वाचन विकासातील शिक्षकांची भूमिका: या विषयावर मराठी बालकुमार साहित्य सभा यांच्यावतीने घेण्यात आलेल्या निबंधस्पर्धेत दुसरा क्रमांक.



कॉ. गोविंद पानसरे विचारमंच कोल्हापूर आयोजित सामाजिक कविता- काव्यवाचन स्पर्धा 'लई काय नाही थोडं सांगावसं वाटतं.' या कवितेस द्वितीय क्रमांक. साल - २०१५


'न्याय मिळालाचं पाहिजे' या कवितेस प्रथम क्रमांक.साल-२०१८



विविध काव्यवाचन कार्यक्रमात कविता सादरीकरण.



कविता सादरीकरणाचा व्हिडीओ पहा खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/PaX6AaZFavQ

कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावरवरून कविता प्रसारित.


'नागोबाच्या नावानं चांगभलं' या ऑडिओ-व्हिडीओ कॅसेटसाठी सहा गाण्यांचे गीतलेखन.

शालेय नाट्यलेखन :
१) माणूस.
२) नुसती धमाल विनोदी नाटक
३) संस्काराचा परिसस्पर्श.

माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या  संस्काराचा परिसस्पर्श नाटकातील काही क्षणचित्रे.




तीन माहितीपटांचे लेखन :
१) 'माझा गांव माझी माणसं'
२) नागनाथ पाठीराखा.
३) वीर जवान तुझे सलाम.

वृत्तपत्र,मासिक,दिवाळी अंक यातून लेख प्रसिद्ध.

माझे व्यासपीठ - ब्लॉग,फेसबुक, व्हाट्सएपच्या माध्यमातून सातत्यपूर्ण लेखन.

माझ्या ब्लॉगवरील 'अनाथांचा नाथ मायबाप संतोष गर्जे' हा लेख आदरणीय सिंधुताई सपकाळ यांनी वाचला त्या धरतीवर माईंशी साधलेला दूरध्वनीवरून संवाद.


खालील लिंकवर क्लिक करून संवाद ध्वनिफित ऐका.
https://youtu.be/aelgWSoVKTU

--------------------------------------------------------

'विनाअनुदानितच्या लढ्यातील माझे योगदान.' विनाअनुदानित प्रश्नांवर लेखनाच्या माध्यमातून सातत्याने प्रकाशझोत.
'मोदीजी क्या आप हमे न्याय दे सकते हैं' या मथळ्याखाली हिंदीतून लिहिलेले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पाठवलेल्या पत्राची ध्वनिफिती ऐका खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/unyWQ1NwwuA

मा.मुख्यमंत्री/मा.शिक्षणमंत्री यांच्याकडे पत्रातून विनाअनुदानितची मांडली व्यथा.


राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांची पगाराविना झालेली फरफट त्यांची मांडलेली व्यथा याची दखल महाराष्ट्र टाईम्सने घेतली दखल...दि.२०/११/१८
महाराष्ट्र टाईम्स बातमी.


माझ्या 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकाच्या अनुषंगाने विनाअनुदानित प्रश्नांसंदर्भात शिक्षक आमदार दत्ता सावंत यांच्याशी प्रत्यक्ष मुलाखत.तसेच शिक्षक आमदार विक्रम काळे व ना.गो.गाणार यांच्याशी दूरध्वनीवरून मुलाखत.


शिक्षण क्षेत्रातील माझे मार्गदर्शक गुरू आणि विनाअनुदानित पुस्तकाच्या वाटचालीतील मार्गदर्शक शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत हेरंब कुलकर्णी सर.




'विनाअनुदानितची संघर्षगाथा' या पुस्तकाच्या अनुषंगाने माननीय शिक्षणमंत्री महोदया वर्षाताई गायकवाड मॅडम ,पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, नूतन शिक्षक आमदार श्री जयंत आसगावकर.. यांच्या घेतलेल्या भेटीची क्षणचित्रे.






आगामी प्रकाशनाच्या वाटेवर पुस्तके...
१) विनाअनुदानितची संघर्षगाथा.
२) ग्रामीण कथासंग्रह.
३) प्रवास ध्येयवेड्यांचा.
४) कादंबरी 'शानु'

आवड : चित्रकला, संगीत,शेतीकाम.

चित्रकला :



संगीत :



व्हिडीओ पहा खालील लिंकवर क्लिक करा.

संगीत 'गीत प्रथमा' परीक्षेत गारगोटी व कुडाळ केंद्रात प्रथम क्रमांक.


शेती :    


"जसा लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा आणि त्याचं सोनं व्हावं तसा गुरूमाऊलींचा स्पर्श जीवनाला झाला नि माझ्याही जीवनाचे सोने झाले....जीवनार्थ कळाला...धन्य हो गुरुदेवा...जय हो..मंगल हो."
 'अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्हीं लोक...'
'साधू संत येति घरा तोचि दिवाळी दसरा...माझे गुरुदेव माझ्या घरी आले तो आमच्या भाग्याचा क्षण'



सामाजिक कार्य .

माय- भू सेवा शिबिरांतर्गत गुरुवर्य इंद्रजीत देशमुख (काकाजी) सोबत शिंदी खुर्द तालुका-मान जि- सातारा या दुष्काळग्रस्त गावात श्रमदान शिबिरात सहभाग.




पूरग्रस्त चंदूर ता-हातकणंगले जि-कोल्हापूर येथे गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजींच्या मार्गदर्शनाखाली शिवम परिवाराने राबवलेल्या स्वच्छता मोहिमेत सहभाग.




व्हिडीओ पहा खालील लिंकवर क्लिक करा.

शिवम परिवार घारेवाडी 'युवा हृदय संमेलन' दरवर्षीच्या शिबिरात रक्तदानाचा संकल्प.







पांगिरे गावची पूरग्रस्त माहेरवाशीण सौ.उर्मिला पाटील यांना मदतीसाठी लेखनातून आवाहन करून बेळगुंदी येथे जाऊन जीवनाश्यक वस्तूंची मदत.



शैक्षणिक व्यासपीठच्या माध्यमातून गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.


भुदरगड तालुक्यातील आपाचीवाडी या दुर्गम वस्तीतील कु.राधिका गुरव इ ४ थी व गरीब मुलीला समाजात लेखनाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करून शैक्षणिक साहित्यासह जीवनावश्यक वस्तुंची मदत.


व्हिडीओ पहा खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/Sa19f--CMGU

बातमी पहा खालील लिंकवर क्लिक करा.

भुदरगड तालुक्यातील मिणचे खुर्द या दुर्गम वस्तीतील कु.परीट इ ८ वी तील गरीब मुलीला समाजात लेखनाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करून शैक्षणिक साहित्यासह जीवनावश्यक वस्तुंची मदत.


भुदरगड तालुक्यातील पाल या गावी राहत असलेली सौ.मंगला गुरव व त्यांचा अपंग मुलगा कृष्णात गुरव यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या मदतीसाठी लेखनाच्या माध्यमातून आवाहन.



व्हिडीओ पहा खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/x8_NCrk05dA
नसीमा हुरजूक यांनी लेख वाचून अपंग कृष्णात गुरव याची दखल घेऊन त्याचे अपंग पुनर्वसन केंद्र येथे रवानगी केली.. आज कृष्णात सिंधुदुर्ग येथील अपंग पुनर्वसन संस्थेत कामाला आहे.


पांगिरे गावातील निराधार श्रीमती बायक्का पाटील यांची जबाबदारी घेऊन चंद्रमोळी झोपडीत शिवम परिवार पांगिरे या सामाजिक संस्थेची अनोख्या पद्धतीने स्थापनेची संकल्पना.



गावपातळीवर शिवम परिवार पांगिरे या सामाजिक संस्थेची स्थापना..

शिवम परिवार पांगिरे.
गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजींच्या वाढदिवसानिमित्त शिवम परिवाराचा संकल्प...चिक्केवाडी या दुर्गम वस्तीत जाऊन दिवाळी फराळाचे वाटप.



बातमी पहा खालील लिंकवर क्लिक करा

सलग दुसऱ्या वर्षी (२०२०) चिक्केवाडी या दुर्गम वस्तीतील लोकांना शिवम परिवाराच्या माध्यमातून दिवाळी फराळाची भेट




कोरोनाच्या संकटकाळात नाम फाउंडेशन आणि शिवम परिवार पांगिरे यांच्या मार्फत गावातील २० गरजू,गरीब कुटुंबांना व लमाण तांड्यावर जीवनाश्यक वस्तूंचे वाटप.





'अवयवदानाचा संकल्प'
 कोमल न्यू लाईफ फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा कोमल गोडसे पवार (कोमलदिदीने) स्वतः मला अवयवदान प्रमाणपत्र  सुपूर्द केले.



शाहूवाडी शैक्षणिक व्यासपीठ मलकापूर संस्थेने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील माझ्या उल्लेखनीय  कार्याबद्दल ५ सप्टेंबर २०२० शिक्षकदिनानिमित्त 'उपक्रमशील शिक्षक' सन्मानपत्र प्रदान करून गुणगौरव केला.



महाराष्ट्र शासनाच्या 'माझे कुटूंब माझी जबाबदारी' उपक्रमांतर्गत कोविड योद्धा म्हणून ५०० घरांचे कोविड सर्वेक्षणाचे काम.




कोविड सर्वेक्षणाचा व्हिडिओ पहा खालील लिंकवर क्लिक करा.


ज्ञानसंवाद सार्वजनिक वाचनालय वेळूक, ता.मुरबाड, जि. ठाणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त.

विषय -  'कोरोना,माध्यमे व मी.'


'कोरोनाविरुद्धची लढाई आपणच जिंकायची आहे.' या विषयावर कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावरून प्रसारीत झालेले माझे विचार.


खालील लिंकवर क्लिक करून ऐका.

अखिल भारतीय शिक्षक साहित्य,कला-क्रीडा मंच,कोल्हापूर यांच्यावतीने 'गुणवंत साहित्यिक' पुरस्कार प्रदान.


ग्रामपंचायत कळंबा तर्फे ठाणे यांच्यावतीने कोरोना काळात योगदान दिलेल्या कोरोना योध्यांच्या सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.लोकनियुक्त सरपंच मा.सागर भोगम दादा व ग्रामविकास अधिकारी मा.दिलीप तेलवी यांच्या हस्ते माझा कोरोनायोद्धा म्हणून सन्मान करण्यात आला..


त्रिवेणी साहीत्य संमेलन उतूर या ठिकाणी कविता सादर करताना








माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर मा.श्री.एकनाथ आंबोकर साहेब यांची सस्नेह गृहभेट.



सृजन वाचन वसमाज प्रबोधन सांस्कृतिक मंच सरवडेद्वारा कोल्हापूर आयोजित कराओके गीत गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक.




एक गाडी उभी करायची आहे...या आशयाची पोस्ट करून मदतीला धावलेल्या गिरीश प्रकाश कुंभार या युवकाला गाडी समाजाच्या योगदानातून गाडी प्रदान करण्यात आली.



ज्या ठिकाणी गाडी जळाली त्याच ठिकाणी नवीन गाडी उभा केली.








बातम्या - 




गाडी प्रदान कार्यक्रम व सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून पाहा.

https://youtu.be/gjGiBspRs_Y


आजरा तालुक्यातील झुलपेवाडी गावच्या चौगले कुटुंबाला यु ट्युब चॅनेलच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला समाजातून मिळालेला प्रतिसाद.





सविस्तर पाहा.



दान हेचि दे गा देवा |
घडो हाती अखंड सेवा ||

                   जय हो ! मंगल हो!!

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...